उस्मानाबाद – समाज विघातक प्रवृत्तींमुळे समाजात धार्मीक असहिष्णुता पसरुन सार्वजनिक शांतता भंगाच्या दुर्देवी घटना देशभरात यापुर्वी अनेकदा घडल्या आहेत. येत्या दि. 10 जुलै रोजी बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन उत्सव साजरे होणार आहेत. या उत्सवांना समाज कंटकांकडून गालबोट लागू नये तसेच त्यांच्यावर जरब निर्माण व्हावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्त्वाच्या रस्त्यांवर, भागांत शिस्तबध्द पध्दतीने पोलीस पथसंचलन करत आहेत. यासोबतच पोलीस ठाणे हद्दीतील सर्व धर्मीय नागरीकांच्या बैठका पोलीस ठाण्यात आयोजीत केल्या जात असून नागरीकांनी सामाजिक सलोखा राखून दोन्ही उत्सव साजरे करावेत असे आवाहन उस्मानाबाद पोलीस दलातर्फे जनतेस केले जात आहे.