Home Blog

देवकते गल्लीत खंडोबा मंदिराचे भूमीपूजन

धाराशिव : शहरातील देवकते गल्लीत लोकवर्गणीतून खंडोबा मंदिराचे बांधकाम होणार असून आज चंपाषष्ठीचा मुहूर्त साधून समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. यावेळी दामू देवकते, अशोक सोलंकर, प्रा. सोमनाथ लांडगे सर, दिनेश बंडगर, लिंबराज डुकरे, सचिन शेंडगे, बालाजी वगरे, संभाजी सलगर, महेश देवकते, अशोक देवकते,  हणमंत देवकते, वसंत देवकते, मंगेश देवकते, तानाजी देवकते, खंडू ठवरे, पिंटू देवकते, नरसिंह मेटकरी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, आकाश शेंडगे, रामेश्वर घोगरे, शिवम देवकते, गणेश देवकते, रोहन देवकते, तेजस देवकते, अतीष ठवरे, राहुल देवकते, मालोजी देवकते, सुरज देवकते, शुभम कोळेकर, शुभम पांढरे, दत्ता थोरात, शाम ठवरे, प्रमोद ठवरे, कुणाल महानवर, रवि देवकते, विष्णु वाघमोडे व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सादर मंदिराचे काम हे लोकसहभागातून  लोकवर्गणीतून लवकरात लवकर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

“ प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” — पालकमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव (३ मार्च) — जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम शब्दांत भूमिका स्पष्ट केली आहे. “सत्ता महत्त्वाची असली, तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
नुकत्याच झालेल्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र लढवल्या होत्या. त्यामुळे पुढेही एकत्रित सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू असतानाच, काही मंडळींकडून माध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. “स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून शिवसेनेत मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “आमचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अखंड, अभेद्य आणि सशक्त आहे. कोणत्याही अफवांना आम्ही बळी पडणार नाही,” असे ते म्हणाले.
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा ताई पवार यांच्याशी चर्चा करून पुढील राजकीय रणनीती ठरवणार आहोत, असे सांगताना सरनाईक यांनी तथाकथित बोलघेवड्या स्वयंभू नेत्यांना पक्षाच्या पुढील रणनीती बाबत भाष्य न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
“ सत्ता हे ध्येय असले तरी तत्त्वांशी तडजोड नाही. दबाव, आमिष किंवा अफवांच्या आधारे शिवसेनेची एकजूट ढळणार नाही,” असा विश्वास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करून पक्षनेतृत्व जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून, संघटन बळकट करण्यावर भर द्यावा, असे आवाहन करत सरनाईक यांनी आगामी राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना अधिक सक्षमपणे उभी राहील, असा निर्धार व्यक्त केला.

भूम तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानास सुरुवात

भूम : च्या महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा १” अंतर्गत भुम तालुक्यात मंडळनिहाय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ७ मार्च २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत ही शिबिरे पार पडणार असून नागरिकांच्या महसूल विषयक दैनंदिन प्रश्नांचे तत्काळ निवारण करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे – ७ मार्च २०२६ रोजी माणकेश्वर, १४ मार्च २०२६ रोजी पाथरूड, १० एप्रिल २०२६ रोजी वाळवड, १७ एप्रिल २०२६ रोजी आंबी, २४ एप्रिल २०२६ रोजी ईट, ८ मे २०२६ रोजी भुम व १५ मे २०२६ रोजी आष्टा येथे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

या शिबिरांमध्ये ७/१२ उताऱ्यावरील किरकोळ दुरुस्ती अर्ज स्वीकारणे व तत्काळ नोंदी करणे, डिजिटल ७/१२ संदर्भात मार्गदर्शन, फेरफार प्रकरणांचा निकाल, ‘जिवंत ७/१२’ टप्पा-१ अंतर्गत वारस नोंदी घेणे व निर्णय करणे, तसेच शासनाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्याबाबत मार्गदर्शन व कार्यवाही केली जाणार आहे.

तसेच लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न, रहिवासी, जात, नॉनक्रिमिलिअर आदी प्रमाणपत्रांचे अर्ज स्वीकारून शिबिरातच वितरण केले जाणार आहे. प्रलंबित प्रकरणांची यादी तयार करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, पोस्ट ऑफिस विमा योजना याबाबत मार्गदर्शन तसेच ई-मोजणीसह विविध सेवा उपलब्ध राहणार आहेत.

तहसीलदार भुम श्री. जयवंत पाटील यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

परंड्यात वाळू घाट लिलावाचा ‘धडाका’; ३.०५ कोटींची विक्रमी बोली

परंडा (भजनदास गुडे) : परंडा तालुक्यातील वाळू घाट लिलाव प्रक्रिया सन २०२५-२६ साठी अखेर मार्गी लागली असून एकूण १० वाळू घाटांचा ई-लिलाव यशस्वीरीत्या पार पडला आहे. सीना आणि उल्फा नदीपात्रातील वाळू उपशासाठी महसूल विभागाने कंबर कसली असून या लिलावातून तब्बल ३ कोटी ५ लाख ४३ हजार २१२ रुपयांची सर्वोच्च बोली लागली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झालेल्या या लिलावात पुणे येथील तिरुपती एंटरप्रायजेस यांनी विक्रमी बोली लावत कंत्राट मिळवले. एकूण ३७ हजार ७३० ब्रास वाळू साठ्याचा ताबा देण्याची प्रक्रिया प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केली आहे. अटी-शर्तींची पूर्तता झाल्यानंतर करंजा-१ व पिठापुरी या दोन घाटांचा पंचनामा करून संबंधित ठेकेदारास ताबा देण्यात आला आहे. उर्वरित आठ घाटांचे सीमांकन व ड्रोन चित्रीकरण सुरू असून लवकरच सर्व घाट कार्यान्वित होणार आहेत.

अधिकृत वाळू घाट सुरू झाल्यामुळे घरकूल लाभधारक व सामान्य नागरिकांना वाजवी दरात वाळू उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यावरणीय नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घाटाचा सविस्तर पंचनामा व नोंदवही तयार केली जात आहे.


▪ परंड्यात सर्वाधिक नैसर्गिक वाळूसाठा

परंडा तालुक्यात नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणावर वाळू साठा उपलब्ध आहे. सीना नदीपात्रातील ९ व उल्फा नदीवरील १ अशा एकूण १० घाटांमधून वाळू उत्खनन होणार आहे. ९ जून २०२६ पर्यंत उत्खननाची, तर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत विक्रीची मुदत ठेकेदारास देण्यात आली आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला गती मिळण्याची अपेक्षा आहे.


▪ अवैध वाळू उपशावर प्रशासनाचा लगाम

लिलाव प्रक्रियेमुळे शासनाच्या तिजोरीत ३ कोटी ५ लाख ४३ हजार २१२ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यापूर्वी सीना व उल्फा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी होत्या. महसूल विभागाने आक्रमक कारवाया करत अवैध वाळू चोरांवर दंडात्मक कारवाई केली आहे. अधिकृत लिलावामुळे अवैध उपशाला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


▪ करंजा-१ व पिठापुरी घाटांचा ताबा पूर्ण

महसूल प्रशासनाने करंजा-१ व पिठापुरी घाटांचा कायदेशीर पंचनामा करून ठेकेदारास ताबा दिला आहे. उर्वरित घाटांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच सर्व घाट कार्यान्वित केले जातील. “अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर प्रशासनाचे काटेकोर लक्ष राहील,” असे प्रभारी तहसीलदार विजयकुमार बाडकर यांनी सांगितले.


▪ परंडा तालुक्यातील १० वाळू घाटांची माहिती (मंजूर ब्रास)

१) करंजा-१ – १९५२
२) करंजा-२ – २५५७
३) वागेगव्हाण-१ – ६३८१
४) वागेगव्हाण-२ – २७२०
५) लोहारा – ४८४८
६) शिराळा – ७९५०
७) पिठापुरी – ३९५७
८) कपिलापुरी-१ – ३०५७
९) कपिलापुरी-२ – २१८७
१०) आवरपिंपरी – २१२१

एकूण मंजूर परिमाण : ३७,७३० ब्रास

पळवलेले सदस्य दिले वापस, शिवसेनेचा आरोप भाजपने खरा ठरवला?


धाराशिव – जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात एक महत्वाची घडामोड घडली असून काल भाजपकडून एक फोटो व्हायरल करण्यात आला त्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक, उपनेते ज्ञानराज चौगुले, संपर्कप्रमुख राजन साळवी, भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील त्यांचे पुत्र मल्हार पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, सुनील बनसोडे आणि पूजा शिंदे यांचा समावेश होता. मल्हार पाटील यांनी भाजप शिवसेना अभेद्य अशी पोस्ट करत फोटो पोस्ट केला होता तर राजन साळवी यांनी शिवसेना अभेद्य असे कॅप्शन देत फोटो पोस्ट केला होता. त्यावरून शिवसेना आणि भाजप मध्ये एकमत नाही हे दिसत आहे.

तो आरोप खरा ठरला?


जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे दोन सदस्य भाजपने पळवले असल्याचा आरोप ॲड.अजित खोत यांनी पत्रकार परिषदेत केला होता तोच आरोप नंतर जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके आणि युवा सेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अविनाश खापे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्या पत्रकार परिषदेच्या अगोदर भाजपचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरता गेले होते मात्र त्यांनी भेट नाकारली होती त्यांना तब्बल तीन तास तिथे थांबवावे लागले होते. दोन सदस्य भाजपच्या गोटात असल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी ही भेट नाकारल्याचे त्यावेळी बोलले जात होते. त्याच सदस्यांना सोबत आणल्याशिवाय उपमुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली नाही. तसेच शिवसेनेच्या वतीने सदस्य पळवल्याच्या आरोपावर हे फोटो पाहून शिक्कामोर्तब होत असल्याचे जाणकार सांगतात.

आ. तानाजी सावंत यांची अनुपस्थिती


जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडीच्या संदर्भात सर्वाधिकार आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांना दिले असल्याचे बोलले जात आहे मात्र भाजपच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेताना आमदार तानाजी सावंत तिथे नव्हते त्यामुळे त्यांच्याशिवाय कुठलेच राजकीय समीकरण होणार नसल्याने ही भेट अधुरी आणि निष्फळ असल्याचे राजकीय जाणकार सांगतात

13 मार्च रोजी अध्यक्षपदाची निवड


13 मार्च रोजी धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांची निवड होणार असून भाजपकडे संख्याबळ जरी जास्त असले तरी ते बहुमतापासून लांब आहे. शिवसेना शिंदे गट हा जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणातला गेम चेंजर पक्ष असून शिंदे गट ठरवेल तोच अध्यक्ष होणार असून निवड होण्यापूर्वी नेमके राजकारण काय घडते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

वाशी पोलिसांचा थरारक सर्जिकल स्ट्राईक! ‘पखरुड’च्या शिवारात अफूचा काळा बाजार उद्ध्वस्त!


ईट (सोमेश्वर स्वामी ) धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलिसांनी गुन्हेगारी जगताला हादरवून टाकणारी एक ‘हाय-व्होल्टेज’ कारवाई केली आहे. वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पखरुड शिवारात सुरू असलेल्या अवैध अफूच्या शेतीवर पोलिसांनी ‘छापामार’ कारवाई करत, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईने जिल्हाभरातील अंमली पदार्थ माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे!

पोलीस अधीक्षकांचा मास्टरप्लॅन; अन् शेत हादरलं!

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी चक्र फिरवली. पाखरुड शिवारातील अशोक, राजेंद्र आणि धोंडिबा चव्हाण या तीन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोन्यासारख्या पिकांऐवजी ‘अफू’चे विष पेरल्याची खात्री पटताच, पोलिसांनी रात्रीच्या काळोखात सापळा रचला आणि एकाच वेळी झडप घातली!

दत्तक फौजफाटा आणि फॉरेन्सिक टीमचा ताफा!


ही कारवाई साधीसुधी नव्हती! पोलीस निरीक्षक शंकर शिंदे आणि त्यांच्या ‘किंग मेकर’ पथकाने संपूर्ण परिसराला वेढा घातला. पारदर्शकतेसाठी चक्क व्हिडिओग्राफर, कार्यकारी दंडाधिकारी आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते.

जप्तीचा ‘आकडा’ पाहून डोळे विस्फारतील!


पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ५८ किलोपेक्षा जास्त वजनाची ओला अफूची झाडे जप्त केली आहेत. यामध्ये:
अशोक चव्हाण: ३६ किलो अफू (किंमत ५.४० लाख)
राजेंद्र चव्हाण: १८ किलो अफू (किंमत २.७० लाख)
धोंडिबा चव्हाण: ४.५ किलो अफू (किंमत ६७ हजार)
एकूण ८ लाख ७७ हजारांचे ‘काळे सोने’ पोलिसांनी धुळीला मिळवले आहे!

आरोपींच्या मुसक्या आवळल्या, ‘NDPS’चा बडगा!


जागेवरच वजनाचा काटा फिरला आणि पंचनामा झाला! पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकून पोलीस कोठडीची हवा दाखवली आहे. त्यांच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांच्या या ‘धडाकेबाज’ कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, “गुन्हेगारांनो सावधान, आता तुमची खैर नाही!” असाच इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.

प्रभाग ४ मध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई; घंटागाडीही गायब, आंदोलनाचा इशारा

धाराशिव – शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासोबतच कचरा संकलनासाठी येणारी घंटागाडीही नियमित येत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

याबाबत नागरिकांनी मा. मुख्याधिकारी, यांना निवेदन दिले आहे. “आम्ही धाराशिव शहरात राहतो, राजस्थानच्या वाळवंटात नाही. नगरपालिकेला नियमित नळपट्टी भरत असताना पाणीपुरवठा का होत नाही?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

तसेच प्रभागात घंटागाडी येत नसल्याबद्दलही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. “घंटागाडी येण्यासाठी अटारी बॉर्डर आडवी आहे का?” असा उपरोधिक प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी तात्काळ कचरा संकलन सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

सदर सुविधा तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

हे निवेदन प्रशांत बापू साळुंके, सुधीर बंडगर, महेंद्र शिंदे, अजित बाकले यांच्यासह प्रभागातील नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे.

भाजपने हिंदुत्व सोडलं?, ‘माधव’ला धक्का?, जरांगे फॅक्टर चालला तर आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा करिष्मा घटला!

धाराशिव जिल्हा परिषदेतील निकालाचे विश्लेषण

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने भरघोस यश मिळवले असून गत निवडणुकीत 4 सदस्य असणाऱ्या भाजपने 19 वर मजल मारली असली तरी हा विजय मिळविण्यासाठी भाजपाने आपल्या भूमिकांमध्ये बदल केले असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. राजकीय पक्षाने सर्वधर्म समभाव पाळावा अशी आपली राज्यघटना सांगते आणि कोणताही पक्ष ती भूमिका घेत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे त्याचे समर्थन करायला हवे मात्र भाजपने यापूर्वी उमेदवारी देताना मुस्लिम उमेदवार दिले नसल्याचे चित्र होते मात्र या निवडणुकीत त्यांनी दोन उमेदवार दिले त्यातील एक उमेदवार निवडून आला तर दुसऱ्याचा पराभव झाला विशेष म्हणजे त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मंत्र्यांनी सभा देखील घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपने हिंदुत्व सोडलं असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा वैयक्तिक करिष्मा घटला असून मागच्या काळात त्यांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादीचे 26 जिल्हा परिषद निवडणून आले होते मात्र सध्या त्यांच्या नेतृत्वात 19 सदस्य निवडून आले असल्याने हा करिश्मा घटल्याचे बोलले जात आहे. तर ओबीसी हा भाजपाचा डी एन ए असल्याचे भाजपकडून सांगितले जाते, माधव म्हणजेच माळी धनगर वंजारी या समूहाला संख्येच्या तुलनेत संधी दिली गेली नाही. त्यामुळे भाजपने केलेला राजकीय धोरणातील बदल चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महत्वाचा ठरलेला जरांगे फॅक्टर या निवडणुकीत ठळकपणे दिसून आला त्यांच्या आंदोलनाला यश आले 14 ओबीसींच्या उमेदवारांपैकी 5 जागा कुणबी आल्या आहेत त्यातील 3 जागा एकट्या धाराशिव तालुक्यातून असून त्यातील दोन भाजपाच्या आहेत तर एक जागा शिवसेना शिंदे गटाची आहे तर उर्वरित 2 जागा अपक्षांच्या आहेत. हा धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमधील सर्वात मोठा बदल समजला जातो.
भाजप धाराशिव जिल्ह्यात मोठा राजकीय पक्ष ठरला असला तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यांवर मतदान फिरले त्याच्या पेक्षा वेगळे मुद्दे आणि रणनीती भाजपने आखली त्यामुळेच हा विजय भाजपला मिळवता आला. धाराशिव नगरपालिका निवडणुकीत भाजपने मुस्लिम बहुल भागात स्वतःच उमेदवार दिला नव्हता तरीदेखील त्याभागात त्यांना चांगले मतदान मिळाले हे विशेष. हिंदुत्व सोडून भाजपला चांगले यश मिळत असून त्याचा काय परिणाम येणाऱ्या काळात होतो हे पाहावे लागेल.
तर भाजपाने थेट प्रचार न करता सुप्त पद्धतीने केला तर सोशल मीडियावर राज्य स्तरावरून प्रचार करण्यात आला. भाजपने धनशक्ती वापरल्याचा आरोप राजकीय विरोधकांकडून केला जात असला तरी प्रशासनाला तसे प्रकार न आढळल्याने आणि त्या संदर्भात कुठेही साधी तक्रार दिसून आली नाही.

निवडणून आलेल्या 19 सदस्यांपैकी केवळ 2 ते 3 सदस्य मूळ भाजपचे आहेत तर उर्वरित सदस्य हे आ. राणाजगजितसिंह पाटील समर्थक असून जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत म्हणावे तसे प्रतिनिधित्व दिले नसल्याने मूळ भाजप विचारावर मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये देखील नाराजी पाहायला मिळाली.

पारदर्शक कारभाराचा वचननामा टांगला वेशीवर,भाजपने पत्रकारांना बाहेर काढून दाखवलं!

तुतारी और कमल एकीच है!

धाराशिव – धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित पत्रकारांना बाहेर हाकलवून भाजपने पारदर्शक कारभार करणार असल्याच्या वचननाम्याला वेशीवर टांगून तिलांजली वाहिली आहे. यापूर्वीच्या सर्वसाधारण सभेला पत्रकारांना आत बसू दिले जात होते वार्तांकन करू दिले जात होते मात्र नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपच्या नगराध्यक्षांनी आणि नगरसेवकांनी पत्रकारांना एन्ट्री देण्यास विरोध केला आणि बाहेर जाण्यास सांगितले पत्रकारांना आत बसू द्या अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेते आणि नगरसेवकांनी मांडली मात्र त्याची दखल पीठासन अधिकाऱ्यांनी घेतली नाही तसेच भाजपच्या गटनेत्यांनी देखील त्याला विरोध केला.

उपनगराध्यक्षांनी कानात सांगितलं आणि अध्यक्षांनी ऐकलं

पत्रकार सभागृहात गेल्यानंतर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी अध्यक्षांच्या कानात हळूच पत्रकार आल्याचे सांगितले आणि त्यानंतरच अध्यक्षांनी पत्रकारांना बाहेर जाण्याची विनंती केली मात्र यापूर्वी पत्रकार सभागृहात उपस्थित राहत होते हे विरोधकांनी लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी पत्रकारांना उपस्थित राहण्यास विरोध केला

तुतारी और कमल एकीच है!

पत्रकारांना बसू देऊ नका जशी भाजपची भूमिका होती त्या भूमिकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मूक समती होती त्यांच्या वतीने ना त्यांचे गटनेते बोलले ना नगरसेवक त्यामुळे काही दिवसापूर्वी वायरल झालेला एक व्हिडिओ आणि त्यातील संवाद तुतारी और कमल एकीचे हे सत्यात उतरते

वचननामा पाळायचा नसतो हे पहिल्याच सभेत दिसले

पारदर्शक कारभार करायचा असल्यास सभागृहात काय चाललंय हे नागरिकांना कळण्याचे महत्त्वाचे साधन आणि दुवा पत्रकार आणि माध्यमे असतात
रामराज्याप्रमाणे कारभार करून असे स्वप्न दाखवणाऱ्या भाजपने पारदर्शक कारभार करण्याचे वचन दिले मात्र वचननामा पाळायचा नसतो हे पत्रकारांना बाहेर काढून दाखवून दिले.

धाराशिव जिल्ह्यात भाजप शिवसेनेपेक्षा केवळ 3 टक्क्यांनी पुढे

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवून सत्तेची बाजू मजबूत केली असली तरी मतांची आकडेवारी पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अजूनही धाराशिव जिल्ह्यामध्ये जिवंत आणि स्पर्धात्मक राहिला आहे. एकूण मतदान ७,४७,३७० असताना भाजपला १९७,३५९ मतं (२६.४१%) मिळाली, तर शिवसेना उबाठा १७०,४१९ मतं (२२.८०%) मिळाली. यात फक्त ३.६१ टक्के इतकाच फरक आहे – म्हणजे अवघ्या २६,९४० मतांचा!

मतांची आकडेवारी आणि अंतर

भाजप: १९७,३५९ मतं → २६.४१%
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे: १७०,४१९ मतं → २२.८०%
अंतर: भाजप पुढे २६,९४० मतांनी (किंवा ३.६१% ने)


हे अंतर खूप मोठे नाही, विशेषतः जेव्हा जिल्ह्यातील बहुतांश लढत भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा गट अशीच होती. अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये थेट सामना झाला आणि मतविभागणीमुळे  भाजपला फायदा झाला. पण मतांची टक्केवारी दाखवते की, उद्धव ठाकरे गटाला ग्रामीण मतदारांची मोठी साथ आहे आणि ते कमी जागा मिळाल्या तरी जनाधार अजूनही मजबूत आहे.

विरोधी पक्षाची ताकद कायम


धाराशिवसारख्या पारंपरिकदृष्ट्या शिवसेना-प्रभावी जिल्ह्यात उद्धव गटाने भाजपला इतक्या जवळून टक्कर दिल्याने विरोधक अजूनही जिवंत असल्याचे स्पष्ट होते. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शिवसेनेने चांगली कामगिरी दाखवली.  महाविकास आघाडीच्या इतर घटकांसोबत (काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट) एकत्र आल्यास महायुतीला धाराशिवमध्ये आव्हान कायम राहू शकते.

इतर पक्षांची स्थिती


शिवसेना (शिंदे गट): १३५,५२५ मतं (१८.१३%)
राष्ट्रवादी (अजित गट): ८३,२१७ मतं (११.१३%)
काँग्रेस: ६२,०३५ मतं (८.३०%)
राष्ट्रवादी (शरद पवार गट): १८,६०५ मतं (२.४९%)

परंडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी चुरशीचे मतदान;७३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद!

९ फेब्रुवारीच्या निकालाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष…


परंडा | भजनदास गुडे (दि. ७ फेब्रुवारी)
परंडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० जागांसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५२.८३ टक्के मतदान उत्साहात आणि चुरशीने पार पडले. तालुक्यात एकूण १३० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक रिंगणातील एकूण ७३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, आता सर्वांना ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा आहे.
सकाळपासूनच मतदानास उत्साहात सुरुवात झाली होती. दिवसभर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती. अनेक मोठ्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.
दुपारी ३:३० वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी ५२.८३ टक्के मतदान झाले होते.
शेळगाव गण व गट – ५४.७१%,
आनाळा गण व गट – ५४.००%,
जवळा गण व गट – ५४.१४%,
डोंजा गण व गट – ५०.१७%,
लोणी गण व गट – ५१.४२%.
यामध्ये महिला २६,९६० आणि पुरुष २९,७०५ असे एकूण ५६,६६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी व पंचरंगी लढती होत असल्याने उमेदवारांच्या समर्थकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. यामुळे काही मतदान केंद्रांच्या परिसरात किरकोळ प्रकार घडले असले तरी तालुक्यात एकूणच शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
यावेळी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर उपस्थित मतदारांचे मतदान पूर्ण झाल्यावर मतपेट्या सीलबंद करण्यात येणार होत्या. परंडा शहरातील करमाळा रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह येथे बसेस व इतर खासगी वाहनांद्वारे या मतपेट्या सुरक्षितपणे आणण्यात येणार आहेत. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आता सर्वांच्या नजरा ९ फेब्रुवारीच्या निकालाकडे लागल्या आहेत.