Home Blog

देवकते गल्लीत खंडोबा मंदिराचे भूमीपूजन

धाराशिव : शहरातील देवकते गल्लीत लोकवर्गणीतून खंडोबा मंदिराचे बांधकाम होणार असून आज चंपाषष्ठीचा मुहूर्त साधून समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. यावेळी दामू देवकते, अशोक सोलंकर, प्रा. सोमनाथ लांडगे सर, दिनेश बंडगर, लिंबराज डुकरे, सचिन शेंडगे, बालाजी वगरे, संभाजी सलगर, महेश देवकते, अशोक देवकते,  हणमंत देवकते, वसंत देवकते, मंगेश देवकते, तानाजी देवकते, खंडू ठवरे, पिंटू देवकते, नरसिंह मेटकरी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, आकाश शेंडगे, रामेश्वर घोगरे, शिवम देवकते, गणेश देवकते, रोहन देवकते, तेजस देवकते, अतीष ठवरे, राहुल देवकते, मालोजी देवकते, सुरज देवकते, शुभम कोळेकर, शुभम पांढरे, दत्ता थोरात, शाम ठवरे, प्रमोद ठवरे, कुणाल महानवर, रवि देवकते, विष्णु वाघमोडे व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सादर मंदिराचे काम हे लोकसहभागातून  लोकवर्गणीतून लवकरात लवकर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!

प्रभारी प्राचार्य म्हणतात, ‘मीच विशाखा समितीचा अध्यक्ष’; ही मग्रुरी नव्हे काय?

भाग 2

धाराशिव – नामांकित महाविद्यालयाने महिला छेडछाडीची घटना दाबल्याची पहिली बातमी दैनिक जनमतने समोर आणली. मात्र, या घटनेमध्ये महिलेची, पीडितेची तक्रार नसल्याने ही घटना खरी आहे की खोटी याबाबत शंका वर्तवण्यात येत आहेत. मात्र, शहरातील या नामांकित महाविद्यालयात घडलेली ही घटना दडपशाहीची असून पीडितेवर अन्याय करणारी आहे. रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादावर चालणाऱ्या या महाविद्यालयात पुतण्या प्रभारी प्राचार्य असताना त्याच्या काकाकडून हे कृष्णकृत्य घडलेले असतानाही त्या घटनेला दाबण्यात आल्याचा आरोप होत आहे.

ते काका पूर्वी त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि घटना घडली त्या काळात त्यांचे वास्तव्य महाविद्यालयाच्या आवारातच होते. निवृत्त असतानाही त्यांना ते निवासस्थान कसे मिळाले? निवृत्त झाल्यानंतरही त्यांना प्रचंड अधिकार कोणी दिले? त्यांच्यावर कोणाचा आशीर्वाद आहे? हा संशोधनाचा विषय आहे. छेडछाडीच्या घटनेमुळे या काकांना शहरातील बार्शी नाका आणि हातलाई परिसरात चोपदेखील दिला असल्याची चर्चा आहे.

महाविद्यालयाचा परिसर आणि संस्था आपल्या खिशात असल्याच्या अविर्भावात असलेल्या या मंडळींनी पीडितेवर दबाव टाकल्याची चर्चा आहे. मात्र, पीडितेला योग्य न्याय मिळावा आणि अशा घटनांना चाप बसावा, तसेच शहरातील शैक्षणिक वातावरण चांगले राहावे यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. महाविद्यालयात प्राचार्यपदासाठी अनेकांचे ज्येष्ठत्व असताना कमी अनुभव असणाऱ्याला प्राचार्यपद कसे मिळाले, याचा शोध सामाजिक, राजकीय संघटना आणि पालकांनी घेतल्यास उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांची उकल होणार असून संबंधित संस्थेने याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.

विशाखा समितीचा मीच अध्यक्ष


ही घटना घडली आहे की नाही याबाबत विचारण्यासाठी प्रभारी प्राचार्यांना संपर्क केला असता त्यांनी ही घटना घडली नसल्याचे सांगितले. तसेच आपल्या महाविद्यालयात विशाखा समिती आहे का, असा प्रश्न केल्यानंतर “हो आहे,” असे उत्तर दिले. त्याचे अध्यक्ष कोण आहेत, असे विचारल्यानंतर “मीच या विशाखा समितीचा अध्यक्ष आहे,” असे त्यांनी सांगितले.

विशाखा समिती ही कोणत्याही संस्थेत काम करणाऱ्या महिलांवर लैंगिक अत्याचार होत असतील तर त्याचे तक्रार निवारण करणारी समिती आहे. तिचे अध्यक्षपद हे संस्थेतील महिलेकडेच असणे क्रमप्राप्त असताना प्रभारी प्राचार्यांनी दिलेले उत्तर अजब तर आहेच, पण त्यातून एक वेगळ्याच प्रकारची मग्रुरी दिसून येते.

प्रशासन आता काय कारवाई करणार?


एखाद्या संस्थेत विशाखा समिती अस्तित्वात नसेल तर त्याच्यावर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या संस्थेत विशाखा समिती आहे की नाही, हाच संशोधनाचा विषय आहे. जर पुरुष या समितीचे अध्यक्ष असतील तर प्रशासन यावर काय कारवाई करणार, हे पाहणे गरजेचे आहे.

महिलांचे मंगळसूत्र चोरणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह ८.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव : तुळजाभवानी मंदिर परिसरासह येरमाळा भागात भाविक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या कडून ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २७ ग्रॅम सोन्याचे दागिने व चोरीसाठी वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनाचा समावेश आहे.

तुळजापूर पोलीस ठाण्यात दि. १ मे २०२६ रोजी तुळजाभवानी मंदिरात भाविक महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकारचे काही गुन्हे जिल्ह्यात नोंद असल्याने पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले होते.

त्यानुसार दि. १५ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वाशी येथील पारगाव टोलनाक्यावर कारवाई केली. यावेळी दोन महिला व दोन पुरुषांना स्कॉर्पिओ वाहनासह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी तुळजापूर व येरमाळा परिसरात साथीदारांच्या मदतीने महिलांचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत तुळजापूर येथील १ आणि येरमाळा पोलीस ठाण्यातील ३ असे एकूण ४ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिता सुनिल शिंदे, हिराबाई रमेश शिंदे, चिरंजीव रमेश शिंदे आणि किरण शेषेराव शिंदे (सर्व रा. पिंपळगाव तांडा, ता. अंबड, जि. जालना) यांचा समावेश आहे. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने केली.

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!

तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

जिल्हा परिषद सदस्य विकी चव्हाण व बालाजी आण्णा घोलप यांच्या पुढाकारातून विविध रस्त्यांची पाहणी


वाशी ( प्रतिनिधी)
“८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार आजही विकासकामांच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचे काम माजी मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून तेरखेडा जिल्हा परिषद गटातही विकासाची गंगा पोहोचत आहे. निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचे शेतरस्ते मोठ्या प्रमाणात करण्यात येतील, असा शब्द आमदार तानाजीराव सावंत यांनी दिला होता. तो शब्द आता प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसत आहे.
मतांसाठी नव्हे तर समाजकारणाच्या भूमिकेतून निवडणुकीपूर्वीही अनेक शेतरस्त्यांची कामे करण्यात आली होती. आता शासनाच्या माध्यमातून विविध रस्त्यांच्या कामांना गती देण्यात येत आहे. दिनांक १५ मे रोजी तेरखेडा जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य विकी चव्हाण व बालाजी घोलप यांनी पुढाकार घेत तेरखेडा, खामकरवाडी, सटवाईवाडी, कडकनाथवाडी परिसरातील विविध रस्त्यांची पाहणी केली.
यामध्ये नॅशनल हायवे ५२ तेरखेडा ते वडजी रस्ता, सटवाईवाडी रस्ता ते हेडसरी रस्ता, सटवाईवाडी रस्ता ते बसवेश्वर मंदिर शिवार रस्ता, माणिकदंड रस्ता ते सटवाईवाडी रस्ता तसेच खामकरवाडी ते उंबरगा रस्त्याची पाहणी करण्यात आली. तसेच गोळे शिवार, उकरंडे शिवार, घोलप शिवार, हलकरे शिवारातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करून संबंधित कामांना लवकर गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी तालुक्याचे तहसीलदार प्रकाश मेहत्रे, बालाजी हलकरे, कृष्णा माळी, रामलिंग शिंदे, स्वप्निल पोळ, समाधान घोलप, रोहित घोलप यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटोच्या जोरावर ब्लॅकमेल; लव्ह जिहादचा आरोप, नराधम पोलिसांच्या ताब्यात

तुळजापूर (प्रतिनिधी):
शिक्षणासाठी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून, तिला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. आरोपीने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी २० वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर ‘पोक्सो’सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपीकडे आणखी काही व्हिडिओ असून अनेक प्रतिष्ठित महिलांचे संपर्क क्रमांक त्यात असल्याची माहिती आहे मात्र पोलिस प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नसून आरोपीला न्यायालयासमोर हजार केल्यानंतर ही माहिती समोर येणार आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तुळजापूर शहरातील एका सायन्स अकॅडमीमध्ये शिकवणीसाठी (क्लासेस) जात होती. याच काळात आरोपी साहिल सलीम शेख (वय २० वर्षे) हा तिचा सतत पाठलाग करत असे. त्याने पीडितेकडे अनेकदा मोबाईल नंबरची मागणी केली, मात्र मुलीने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर आरोपीने सोशल मीडियाचा वापर करत ‘स्नॅपचॅट’वर (Snapchat) तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि मेसेज करून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.

गुंगीचे औषध देऊन अत्याचार


काही काळानंतर, जुने प्रकरण मिटवून घेण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेशी संवाद साधला. तिला विश्वासात घेऊन तो लातूर येथील बसस्थानक परिसरातील एका कॅफेमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने पीडितेच्या मँगो ज्यूसमध्ये गुंगीचे औषध मिसळले. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिचे आक्षेपार्ह फोटो काढले.

फोटोच्या जोरावर ब्लॅकमेलिंग


अत्याचार केल्यानंतर आरोपी साहिल शेख याने पीडितेच्या फोटोंचा वापर करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने त्रास दिला जात होता. अखेर या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पीडितेने धाडस करून कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला.

धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत छुप्या युतीत ठिणगी? भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत गोंधळ!


धाराशिव – तुतारी और कमल एकीच है हे प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आज धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत गोंधळ पहायला मिळाला. जो विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर नव्हता, जो विषय आयत्या वेळी मांडला गेला ज्याला सूचक आणि अनुमोदक नसताना गोंधळ झाल्याने हे सत्ताधारी गटाचे दबावतंत्र असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीच्या सर्वसाधारण सभांमध्ये राष्ट्रवादी शप कडून भाजपला जोरदार विरोध पाहायला मिळाला नव्हता मात्र आजच्या सर्वसाधारण सभेत झालेला विरोध आणि गोंधळ नेमका कोण घडवून आणला याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. कागदावर नसलेली कमल आणि तुतारीची युती जास्त काळ टिकणार नसल्याचे यावरून बोलले जात आहे. गणेश नगर येथील पाइपलाइनच्या कामावरून हा गोंधळ झाला असून या गोंधळात अध्यक्ष आणि सचिवांना देखील अर्वाच्य भाषेत बोलले गेल्याने अध्यक्षांनी यावेळेस समज दिली असून पुन्हा असा प्रकार घडल्यास कारवाई करणार असल्याचे सांगितले. मात्र घडल्या प्रकाराबद्दल अध्यक्षाच्या दालनातील फुटेज आणि दोन्ही बाजूकडून भूमिका स्पष्ट होणार नाही तोपर्यंत गोंधळाचे कारण गुलदस्त्यात राहणार आहे.

शिवसेनेचा सभात्याग
सर्वसाधारण सभेचे इतिवृत लोकांसाठी खुले केले नसल्याने कालच शिवसेनेने तक्रार दिली होती त्यावरून नगरसेवक राजाभाऊ पवार यांनी सभात्याग केल्याने सभागृहात फक्त भाजप, राष्ट्रवादी आणि एमआयएमचे एक नगरसेवक यांचीच उपस्थिती होती.

सर्वसाधारण सभा, स्थायी समितीचे इतिवृत्त गायब? धाराशिव नगरपरिषदेत पारदर्शकतेचा बोजवारा?आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्याचा फुगा फुटला!

धाराशिव : शहरातील नागरिक समस्यांनी त्रस्त असताना त्या समस्या सोडविण्याचे तर दूरच मात्र पारदर्शक कारभासाठी आवश्यक जबाबदाऱ्या देखील सत्ताधाऱ्यांना पेलवत नसून
निवडणुकीदरम्यान पारदर्शक आणि उत्तरदायी कारभाराचे गाजावाजा करणाऱ्या भाजपा नेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात असणाऱ्या कारभाऱ्यांनी सभांचे इतिवृत्त नागरिकांसाठी उपलब्ध न करून दिल्याने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या दाव्याचा फुगा फुटला असून हा प्रकार शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीमुळे उघडकीस आला आहे.नगरपरिषद धाराशिवमधील कामकाजात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करत नगरसेवक सचिन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

नगरसेवकांच्या निवेदनानुसार, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ८१ च्या तरतुदींचा भंग करून नगरपरिषद प्रशासनाने अनेक महत्त्वाच्या सभांचे इतिवृत्त पुढील सभेत मंजुरीसाठी मांडलेले नाही. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या विषय समिती, सर्वसाधारण आणि अर्थसंकल्पीय सभांचे कामकाज पूर्ण होऊनही त्याची अधिकृत नोंद नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

या संदर्भात नगरपरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती नेहा काकडे आणि मुख्याधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी टाकण्यात आली आहे. “मागील सभांचे इतिवृत्त मंजूर न करता पुढील सभा घेणे हे बेकायदेशीर असून लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे,” असा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदार नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कठोर भूमिका घेत, जोपर्यंत प्रलंबित सभांचे इतिवृत्त मंजूर होत नाहीत तोपर्यंत नवीन सभा घेण्यास मनाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर अनेक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.याबाबत सर्वसाधारण सभेचे सचिव असणाऱ्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

परंडा तालुक्यात माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा; २४ तासांत टोळी जेरबंद, गुन्हे शाखेची कामगिरी

धाराशिव, दि. २५ (प्रतिनिधी) : परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथे माजी सैनिकाच्या शेतवस्तीवरील घरावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. या कारवाईत सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप हे आपल्या पत्नीसमवेत घरासमोर झोपले असताना अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर हल्ला चढवला. आरोपींनी जगताप यांच्यावर चाकूने प्राणघातक वार करून त्यांना गंभीर जखमी केले, तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.

घटना अंधारात घडल्याने आणि परिसरात सीसीटीव्ही नसल्यामुळे आरोपींचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. तरीही पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी भुम विभागाचे चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी डोकेवाडी शिवारात सापळा रचून आरोपींना वेढा घालत शिताफीने अटक केली. अटकेत घेतलेल्या आरोपींमध्ये किरण पंडित शिंदे (रा. अनाळा), राघवा निवांत्या शिंदे (रा. अनाळा), ज्ञानेश्वर लिग्या काळे (रा. हिवडा), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी), सुनील प्रकाश भोसले (रा. अंजनसोंडा), चेतन किरण शिंदे (रा. अनाळा) व सुनील चरण शिंदे (रा. अनाळा) यांचा समावेश आहे.

चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली असा एकूण सुमारे १.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने केली असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टेक्सटाईल पार्कवरून आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा यू -टर्न?;
कौडगावसाठी डिफेन्स हबचे नवे आश्वासन, जुन्या बाटलीत नवी दारू!

धाराशिव – ( नरोटे आकाश)

एखादा प्रकल्प करणे शक्य नसतानाही त्याबाबत आश्वासन दिले जाते आणि ते पूर्ण न करता त्याच्या जागी नवे आश्वासन देण्याची किमया भाजपचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी घडवून आणली आहे. त्यांचा गेम चेंजर प्रकल्प असणाऱ्या टेक्निकल टेक्सटाइल प्रकल्पावरून त्यांनी यू-टर्न घेतला असून तो आता इतरत्र होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव जिल्ह्यात टेक्निकल टेक्सटाईल पार्क होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजप आणि आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा पुढे करत मतदारांचा पाठिंबा मागितला होता.

मात्र नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी टेक्निकल टेक्सटाईल प्रकल्प कौडगावऐवजी इतर ठिकाणी हलवण्याचे संकेत दिले असून, पूर्वीच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कौडगावसाठी आता डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हबचे नवे आश्वासन पुढे करण्यात आले आहे.

आ. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौडगाव एमआयडीसी येथे ग्लोबल फोर्ज कंपनीमार्फत सुमारे 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन टीएनटी व प्रोपेलेंट उत्पादनाचा प्रकल्प उभारला जाईल. या माध्यमातून सुमारे 3000 रोजगार निर्माण होतील, असा दावा करण्यात आला आहे.

प्रेस नोटमध्ये या प्रकल्पाला “औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेशा” असे संबोधण्यात आले असून, भविष्यात 5000 एकरवर डिफेन्स हब उभारण्याचेही संकेत देण्यात आले आहेत. तसेच नेपियर गवतावर आधारित कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्प उभारून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

मात्र या नव्या घोषणांबाबतही अनिश्चितता कायम आहे. संबंधित प्रकल्पासाठी अधिकृत सामंजस्य करार (MoU) झाल्याचे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

यामुळे टेक्निकल टेक्सटाईल पार्कप्रमाणेच डिफेन्स प्रकल्पही सध्या कागदावर असल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे मोठ्या गुंतवणुकीचे आणि रोजगाराचे दावे केले जात असताना, दुसरीकडे ठोस करार, कालमर्यादा आणि अंमलबजावणीबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.

एकूणच, टेक्सटाईल पार्कपासून डिफेन्स हबपर्यंत आश्वासनांची मालिका सुरू असली, तरी प्रत्यक्षात प्रकल्प कितपत साकारतील, याकडे धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे. मात्र विकासासाठी भारतीय जनता पार्टीत गेलेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना रोजगार मिळवून देणारे प्रकल्प आणण्यात यश मिळाले नसल्याचे चित्र आहे.

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी जेरबंद; ५ आरोपींसह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव : पवनचक्की परिसरात दरोडा व चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करून ५ आरोपींना अटक केली असून सुमारे ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

दि. ७ एप्रिल २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरेगव्हाण शिवारात दोन सुरक्षारक्षकांना दोरीने बांधून मारहाण करत ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा व रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९९/२०२६ अंतर्गत संबंधित कलमान्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की साहित्य चोरीचे अनेक गुन्हे घडले होते.

गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.

दि. १६ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ढोकी-कळंब रोडवरील गोविंदपूर पाटी येथे सापळा रचून ५ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ३ वाहने व चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान आरोपींनी मेंढा, उमरेगव्हाण, चिकुंद्रा, गंधोरा, कन्हेरवाडी व वाशी परिसरात पवनचक्कीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीदरम्यान सुरक्षारक्षकांना धमकावण्यासाठी त्यांना मारहाण केल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलीसांनी आरोपींकडून रोख रक्कम, तांब्याच्या तारा तसेच २ महिंद्रा स्कॉर्पिओ आणि १ बोलेरो अशी वाहने जप्त केली असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ४२ लाख रुपये आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
सुनिल कालिदार शिंदे (रा. ढोकी), लखन बापू पवार (रा. उपळा), सिद्राम पोपट पवार (रा. वरूडा), उद्धव बापू शिंदे (रा. बावी) आणि विक्रम लक्ष्मण पवार (रा. खामकरवाडी). या टोळीतील इतर काही साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी बेंबळी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, तसेच पोलीस कर्मचारी गणेश पाटील, शिवाजी भुतेकर, शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण, नागनाथ गुख आणि रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली.

तासगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व शांततेत साजरी

मा.खास. संजय काका पाटील व आम. रोहित दादा पाटील, नगराध्यक्षा सौ विजया बाबासाहेब पाटील यांनी केले अभिवादन

तासगाव प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती तासगाव येथे अत्यंत उत्साहात व शांततेत पार पडली,
सम्राट कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे वतीने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कांबळेवाडी व सम्राटअशोक नगर येथे भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तर मंडळाचे सनी कांबळे, शुभम कांबळे, तसेच युवा कार्यकर्त्यांनी त्यामध्ये रितेश कांबळे वेदांत कांबळे सुजल कांबळे निखिल धोत्रे प्रसाद कांबळे केतन कांबळे यांनी अंकलखोप येथून भिमज्योत आणली होती, २५ किलोमीटर धावत ही भिमज्योत तासगाव शहरांमध्ये साडेनऊ वाजता भिलवडी नाका येथे दाखल झाली होती यामध्ये शेकडो कार्यकर्तेने सहभाग नोंदवला होता,
सकाळी ठीक ८.३० वाजता तासगावचे लोकप्रिय तहसीलदार श्री अतुल पाटोळे साहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पगुच्छ अर्पण करीत अभिवादन केले यावेळी भीमराव भाऊ भंडारे, दिलीप भाऊ पाटील, चव्हाण आबा उपस्थित होते, साडेनऊ वाजता सांगली जिल्ह्याचे माजी खासदार ज्यानी हा पुतळा उभारण्यासाठी प्रचंड मेहनत केली महाराष्ट्र शासन व नगरपालिकेच्या सहकार्यतून लोक समाज वर्गणीतून हा पुतळा उभा केला ते नेते मा.संजय काका पाटील त्यांच्यासोबत तासगावच्या प्रथम नागरिक सौ विजया बाबासाहेब पाटील, उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान,बाबासाहेब पाटील, युवा नगरसेवक रोहन भैय्या कांबळे, माजी उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ दिपालीताई पाटील, नगरसेविका सौ शिंदे मॅडम,सौ धोत्रे,श्रीमती धाबगुडे, गटनेते सतीश लिंबळे ज्येष्ठ नगरसेवक अनिलभाऊ कुत्ते संतोष आबा बेले, माजी नगरसेवक मोहन नाना कांबळे,नगरसेवक संदीप सावंत, संजय लुगडे, नगरसेवक, नगरसेविका सह तासगाव पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विशाल टकले साहेब, पोलीस स्टेशनचे व नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, यावेळी संविधान प्रत व शिवाजी कोण होते हे पुस्तक वाटप आप्पासाहेब कांबळे सर रवींद्र कामत , अनिल कांबळे विक्रांत कांबळे, महेंद्र कांबळे प्रमोद कांबळे, पत्रकार राहुल कांबळे इ उपस्थित होते
साडेनऊ वाजता आंबेडकर पुतळा येथे बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सांगली नाका येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्कल येथे बुद्ध वंदना घेऊन कांबळेवाडी येथेही भीम जयंती चे स्वागत करण्यात आले त्यानंतर सम्राट अशोक नगर येथे तरुण युवक महिला भगिनी आणि उत्स्फूर्त स्वागत केले,
तासगाव कवठेमंहकाळ मतदारसंघाचे युवा आमदार रोहित दादा पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी नगरसेविका सौ उषाताई दकांबळे, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, एडवोकेट गजानन खुजट, प्रमोद अमृतसगार, नगरसेवक अरुण साळुंखे,रोहन पवार जे.के.भाऊ कांबळे जितेंद्र कांबळे, रोहन कांबळे, अर्जुन थोरात निशिकांत देवकुळे प्रकाश देवकुळे, उपस्थित होते
सायंकाळी पाच वाजता सम्राट अशोक नगर येथून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते हे मिरवणूक कांबळेवाडी पागा गल्ली सांगली नाका डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्कल गुरुवार पेठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सिद्धेश्वर रोड वरचे गल्ली अशा तऱ्हेने मिरवणुकीचे आयोजन सम्राट अशोक कला क्रीडा मंडळाचे वतीने करण्यात आले होते, मिरवणुकीमध्ये हजारो महिला युवक,आभाल वुध्द सहभागी झाले होते हे विशेष आहे, चालू वर्षी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या महिला भगिनी व समता सैनिक दल यांनी विशेष परिश्रम घेतले होते. मिरवणुकीमध्ये चित्ररथ हा सगळ्यांची नजर वेधून घेत होता,सर्व कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पडला कोणतही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तासगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विशाल टकले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.