Home Blog

देवकते गल्लीत खंडोबा मंदिराचे भूमीपूजन

धाराशिव : शहरातील देवकते गल्लीत लोकवर्गणीतून खंडोबा मंदिराचे बांधकाम होणार असून आज चंपाषष्ठीचा मुहूर्त साधून समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. यावेळी दामू देवकते, अशोक सोलंकर, प्रा. सोमनाथ लांडगे सर, दिनेश बंडगर, लिंबराज डुकरे, सचिन शेंडगे, बालाजी वगरे, संभाजी सलगर, महेश देवकते, अशोक देवकते,  हणमंत देवकते, वसंत देवकते, मंगेश देवकते, तानाजी देवकते, खंडू ठवरे, पिंटू देवकते, नरसिंह मेटकरी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, आकाश शेंडगे, रामेश्वर घोगरे, शिवम देवकते, गणेश देवकते, रोहन देवकते, तेजस देवकते, अतीष ठवरे, राहुल देवकते, मालोजी देवकते, सुरज देवकते, शुभम कोळेकर, शुभम पांढरे, दत्ता थोरात, शाम ठवरे, प्रमोद ठवरे, कुणाल महानवर, रवि देवकते, विष्णु वाघमोडे व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सादर मंदिराचे काम हे लोकसहभागातून  लोकवर्गणीतून लवकरात लवकर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

पालकमंत्र्यांच्या आदेशाला जिल्हाधिकाऱ्यांचा खो

तुळजापूर विकास आराखडा : प्रशासनाच्या भूमिकेवर संशय

धाराशिव – तुळजापूर विकास आराखड्याबाबतची गोंधळलेली स्थिती अजूनही कायम असून यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पालकमंत्र्यांच्या आदेशालाच खो दिल्याचे समोर आले आहे.

15 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांना स्पष्ट निर्देश दिले होते – “सात दिवसांच्या आत नागरिकांना विकास आराखड्याचे प्रेझेंटेशन दाखवा आणि बैठक घ्या.” मात्र 16 सप्टेंबरपर्यंत अशी कोणतीही बैठक घेतली गेली नाही. परिणामी, पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.

स्थानिक नागरिक धीरज कदम पाटील यांनीही याची पुष्टी करत सांगितले की, “आम्हाला अजूनपर्यंत प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून बोलावले गेलेले नाही.”

याआधी नागरिकांनी विकास आराखड्याचे प्रेझेंटेशनच दाखवले गेले नसल्याची तक्रार केली होती. आता उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानंतर पालकमंत्री सरनाईक स्वतः याची चौकशी करतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी होणारी बैठक तुळजापूर विकास आराखड्याच्या भवितव्याची दिशा ठरवणारी ठरणार आहे.

15 ऑगस्ट च्या बैठकीत काय घडलं होतं याबाबत थोडक्यात…

तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात आक्षेपांची सुनावणी न घेणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग असल्याची खंत पालकमंत्री तथा तुळजापूर विकास आराखडा समितीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी तुळजापूरचे स्थानिक नागरिक व पालकमंत्री यांच्यात बैठक झाली.

विकास आराखड्याचे प्रेझेंटेशन स्थानिक नागरिकांना दाखवले गेले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना दिली. तसेच या विकास आराखड्यास किती लोकांची संमती आहे, याची माहिती लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देशही दिले.स्थानिकांच्या घरांवर बुलडोझर फिरवला जाणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिला.


तुळजापूर मंदिर विकासासाठी 1988 आणि 2012 मध्ये जागा दिली असून, त्यावेळी विरोध झाला नव्हता. मात्र आता आणखी किती जागा द्यायची, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. मंदिराजवळील घरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याने त्यांना हेरिटेज दर्जा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.


या आराखड्यासाठी हेमंत पाटील हेच आर्किटेक्ट असल्याचे, आणि ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे ऐकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पहिल्या आराखड्यात आमची घरे नव्हती, मात्र दुसऱ्या व तिसऱ्या आराखड्यात ती दाखवली गेली, हे संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्याचे आठवडाभर आधी ठरले होते. मात्र बाधित नागरिकांना त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याबाबत तहसीलदार उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.


पालकमंत्री  प्रताप सरनाईक यांचा धाराशिव जिल्हा दौरा

धाराशिव, दि. १२ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक येत्या १५ ते १७ सप्टेंबर २०२५ दरम्यान पुणे, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध विकासकामांचे उद्घाटन, पाहणी आणि बैठका घेणार आहेत.

१५ सप्टेंबर: पुणे जिल्हा दौरा
मा. मंत्री सरनाईक यांचा दौरा सोमवारी, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता लोणावळा बस स्थानक (MSRTC), पुणे येथून सुरू होईल. येथे ते बस स्थानकाची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता खाजगी वाहनाने (MH-04-MP-7578) चाकण (MIDC), ता. खेड येथे रवाना होतील. दुपारी ११:४५ वाजता चाकण येथील मर्सिडीज बेंझ कंपनीला सदिच्छा भेट देऊन ते चर्चा करतील. यावेळी श्री. सत्यजीत पाटील (मो. ९७३०८१११००) उपस्थित राहतील. दुपारी १:३० वाजता ते VVIP सर्कीट हाऊस, पुणे येथे पोहोचतील आणि दुपारी २ वाजेपर्यंत विश्रांती घेतील. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पोहोचून रात्रीचा मुक्काम करतील.

१६ सप्टेंबर: सोलापूर आणि धाराशिव दौरा
मंगळवारी, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांसमवेत सोलापूर जिल्ह्यातील विविध विषयांवर बैठक होईल. दुपारी १:१५ वाजता ते तूळजापूर, जि. धाराशिव येथे रवाना होतील आणि दुपारी २:१५ वाजता तुळजाभवानी मंदिर, तूळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ च्या तयारीची पाहणी आणि आढावा बैठक घेतील. यावेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी उपस्थित राहतील. सायंकाळी ५:३० वाजता ते धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील आणि सायंकाळी ६ वाजता धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील. रात्री ९ वाजता याच ठिकाणी मुक्काम करतील.

१७ सप्टेंबर: धाराशिव जिल्हा दौरा
बुधवारी, दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८:२५ वाजता मा. सरनाईक शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. सकाळी ८:४५ वाजता ते “मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिन” समारंभाला उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे “उम्मीद निदान केंद्र” आणि “रक्त साठवण केंद्र” यांचे उद्घाटन करतील. यावेळी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र द. चौहान (मो. ७५८८६९३०३२) उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे “४५ मीटर ध्वज” उभारणी कार्यक्रमाचे भूमिपूजन करतील. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (मो. ९६०४३४६४६१) उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता ते धाराशिव येथून समृद्धी महामार्गामार्फत (धाराशिव-छत्रपती संभाजीनगर-नाशिक-ठाणे) ठाणे येथील निवासस्थानाकडे रवाना होतील आणि रात्री ९ वाजता तिथे पोहोचतील.

१५ वर्षीय मुलीचे अपहरण प्रकरण: आरोपी अटकेत, पीडितेची सुखरूप सुटका

धाराशिव, दि. १२ सप्टेंबर २०२५ (प्रतिनिधी) : उसतोड कामगाराच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी गुप्त आणि तांत्रिक तपास करून आरोपी आणि पीडित मुलीला अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात झाली.

घटना १८ मार्च २०२४ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी उसतोड कामगाराने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली की, संशयित सुनिल लक्ष्मण धोत्रे याने त्यांच्या १५ वर्षीय मुलीला अज्ञात कारणास्तव फूस लावून पळवून नेले. यावरून २३ मार्च २०२४ रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ (अपहरण) आणि ३७० (मानवी वाहतुक) अंतर्गत गुन्हा दाखल झाला. सुरुवातीला वाशी पोलिसांनी तपास हाती घेतला. नंतर, १८ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिस अधीक्षक धाराशिव यांनी हा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग केला.

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन केले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक सोनटक्के, महिला पोलिस हवालदार नदाफ, पोलिस हवालदार केवटे आणि पोलिस नाईक माने यांचा समावेश होता. पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपी आणि पीडितेचा ठावठिकाणा शोधला. अहिल्यानगर शहरात दोघे असल्याची खात्री झाल्यानंतर, ११ सप्टेंबर २०२५ रोजी पथकाने कारवाई करून आरोपी सुनिल लक्ष्मण धोत्रेला ताब्यात घेतले आणि पीडित मुलीची सुखरूप सुटका केली. दोघांनाही वाशी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

सध्या आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे, आणि पीडित मुलीला आवश्यक वैद्यकीय व मानसिक आधार दिला जात आहे. पोलिसांचा तपास पुढे सुरू आहे.

माऊलीच्या ट्रेंड ने भाजपमध्ये अस्वस्थता!

धाराशिव (Aakashh Natote)- जिल्ह्यात निवडणुका म्हणलं की राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची चर्चा होते. मात्र राज्यात आणि देशात सत्तेत असलेली भाजपा आता पाटीलमय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने पाटील परिवार समर्थकांनी त्यांच्या अनॉफिशियल सोशल मीडियावर माऊली होणार जिल्हा परिषद अध्यक्ष अश्या पोस्ट टाकून नवा ट्रेंड सुरू केला हाच ट्रेंड इमानेइतबारे तळागाळापर्यंत काम करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. लोकसभेला पाटील कुटुंबियांसाठी काम केले, विधानसभेला पुन्हा पाटील कुटुंबियांसाठी काम केले आणि आता जिल्हा परिषदेसाठी त्यांच्याच साठी काम करावे लागेल का? भाजप नवख्या आणि काम करणाऱ्यांना संधी आहे की नाही या विचाराने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

अर्चना पाटील अध्यक्षपदासाठी दावेदार?

माऊली ही बिरुदावली अर्चना पाटील यांना त्यांचे समर्थक वापरतात. सर्वसाधारण महिला यासाठी अध्यक्षपद असल्याने त्या अध्यक्ष व्हाव्यात अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. आता त्यांना अध्यक्षपदी बसविण्याचे स्वप्न पाटील परिवार समर्थक पाहत आहेत.

अर्चना पाटील नेमक्या कुठे?

अर्चना पाटील यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. मात्र त्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. भाजपच्या राजकीय मंचावर देखील त्यांना त्यानंतर फारसे पाहिले गेले नसल्याने त्या नेमके कोणत्या पक्षात आहेत हे स्पष्ट नाही

घराणेशाही चा आरोप

पाटील कुटुंबीयांवर त्यांचे विरोधक घराणेशाहीचा आरोप करतात लोकसभेला त्यांना राष्ट्रवादीतून तिकीट दिल्याने त्या आरोपांना अधिकच धार मिळाली मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना भाजपने तिकीट दिले आणि अध्यक्षपदावर दावा केला तर भाजप घराणेशाहीला बळ देते या आरोपावर शिक्कामोर्तब होणार आहे.

मद्यप्राशन केल्याचा संशय जिल्हा परिषदेतील ९ कर्मचाऱ्यांची अचानक चाचणी

धाराशिव – जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत आज सकाळी अचानक ९ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी नियमित आरोग्य तपासणी नसून थेट ब्रीद ॲनालायझर टेस्ट घेण्यात आली होती.

शिक्षण विभागात काही कर्मचारी कर्तव्यावर असतानाच मद्यप्राशन करून कार्यालयात हजर होत असल्याचा संशय व्यक्त होत होता. यामुळे कामकाजात शिस्तभंग, कुचराई व शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार संबंधित विभाग प्रमुखांकडे आली होती. अखेर विभाग प्रमुखांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या आवारात येऊन संबंधित कर्मचाऱ्यांची एकामागून एक श्वासाद्वारे तपासणी केली. मिळालेल्या माहितीनुसार सर्व नऊ कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तथापि, शासकीय कर्तव्यावर असताना दारू सेवन करण्याची हिम्मत करणाऱ्यांना या तपासणीमुळे धडा शिकविण्यात आला आहे, असे प्रशासनातील जाणकारांचे म्हणणे आहे.

अलीकडेच परंडा तालुक्यात एका शिक्षकाने शाळेतच मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने त्याला निलंबित केले होते. या घटनेनंतर जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

जिल्हा परिषदेतील आजची कारवाई ही केवळ तपासणीपुरती मर्यादित नसून, “कर्तव्यावर असताना कुठलाही शासकीय कर्मचारी दारू सेवन करून आला तर त्याच्यावर कडक शिस्तभंगात्मक कारवाई होणार” असा संदेश प्रशासनाने या निमित्ताने दिला आहे.

हायवेवरुन जाणाऱ्या वाहनावर चढुन चोऱ्या करणाऱ्या टोळीस  स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

धाराशिव : जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत सहा सराईत दरोडेखोरांना जेरबंद केले. हे आरोपी हायवेवरून जाणाऱ्या वाहनांवर चढून मालाची चोरी करत होते. शनिवारी (दि. ८ सप्टेंबर) हेच आरोपी येडेश्वरी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबलेले असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी या कारवाईत तब्बल ११ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींपैकी तिघांवर पुण्यातील ५० लाखांच्या दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्याने वाढली खबरदारी
तेरखेडा येथे हायवेवरून जाणाऱ्या ट्रकवर काही चोरटे चढून माल लुटत असल्याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत  पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांनी स्थानिक गुन्हे शाखेला शोधमोहीमेचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथक गस्तीस रवाना झाले.

गोपनीय माहिती आणि कारवाई
येरमाळा येथे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर पाटी ते येडेश्वरी मंदिर रस्त्यावर एक स्कॉर्पिओ गाडीत संशयित थांबले होते. ते भाविकांची वाहने आडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे कळताच पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

संध्याकाळी साधारण ५.५० वाजता पोलिसांनी कारवाई केली असता दोन आरोपी गाडीतून उतरून पळण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. उर्वरित आरोपींना गाडीतूनच ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेले आरोपी
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

  1. अमोल नाना काळे (२८)
  2. किरण बापु पवार (२५)
  3. दत्ता दादा काळे (२१)
  4. गणेश नाना काळे (३२)
  5. सुभाष तानाजी काळे (२४)
  6. शिवा रामा पवार (२२)
    (सर्व राहणार तेरखेडा)

मुद्देमाल जप्त
गाडीची तपासणी केली असता दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य, मोबाईल फोन आणि महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन असा एकूण ११ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना मुद्देमालासह येरमाळा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

पुण्यातील दरोड्याशी संबंध
तपासात समोर आले की, अटक केलेल्या आरोपींपैकी तीन आरोपी व त्यांच्याकडील स्कॉर्पिओ वाहन पुणे शहरातील आंबेगाव पोस्टे हद्दीत झालेल्या तब्बल ५० लाखांच्या दरोड्याच्या गुन्ह्यात वांछित आहेत. त्यामुळे या कारवाईमुळे पुणे पोलिसांनाही महत्त्वाचा धागा लागला आहे.

ही कारवाई करणारे अधिकारी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, पोह. विनोद जानराव, नितीन जाधवर, पोना. बबन जाधवर, चापोह महेबुब अरब, विनायक दहिहंडे व प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली.

लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

ड्रग्स प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना पत्र

धाराशिव – तुळजापूर शहरात गाजत असलेल्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणावरून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. या प्रकरणात पोलिसांची कारवाई केवळ दिखाऊ असून मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, या सगळ्या काळात वादग्रस्त डीवायएसपी निलेश देशमुख यांना बदली न करता मुदतवाढ देण्यात आली. “ज्याच्या कार्यकाळात ड्रग्जचा सुळसुळाट झाला, त्याच अधिकाऱ्याकडे तपास ठेवणे म्हणजे लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण देण्यासारखे आहे,” अशा शब्दांत खासदारांनी सरकारवर हल्लाबोल केला.

खासदार राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ९ सप्टेंबर रोजी थेट पत्र पाठवून या मुदतवाढीला तीव्र आक्षेप नोंदवला आहे. यात त्यांनी ड्रग्ज प्रकरणातील कारवाईतील त्रुटींवर बोट ठेवले असून ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

राजेनिंबाळकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, ड्रग्ज रॅकेटमधील अनेक आरोपींना जामीन मिळाल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. याउलट, आरोपींपैकी एका व्यक्तीचा राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सत्कार केल्याची गंभीर बाब त्यांनी उघड केली. त्यामुळे सरकारची नीयत संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.

खासदारांच्या चार प्रमुख मागण्या

  1. ड्रग्ज रॅकेटमधील सर्व मुख्य आरोपींना तातडीने अटक करून मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी.
  2. आरोपीचा सत्कार करणाऱ्या मंत्र्यांवर नैतिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.
  3. डीवायएसपी निलेश देशमुख यांना दिलेली मुदतवाढ रद्द करून त्यांची बदली करावी.
  4. संपूर्ण प्रकरणाचा तपास स्वतंत्र आणि उच्चस्तरीय यंत्रणेकडे सोपवावा.

राजकीय भेद विसरून या गंभीर प्रकरणात कठोर आणि निःपक्ष कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा राजकीय व प्रशासनिक गुंता आणखी गडद झाला आहे.

धाराशिव-सोलापूर रेल्वे प्रकल्पाचा खर्च 900 कोटींवरून 3000 कोटींवर दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती

खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी घेतला आढावा, आ. कैलास पाटील आ. प्रवीण स्वामी यांची उपस्थिती

धाराशिव, 03 सप्टेंबर 2025: धाराशिव-सोलापूर-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या खर्चात तब्बल 900 कोटींवरून 3000 कोटींवर वाढ झाल्याने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. दिशा समितीच्या सात तास चाललेल्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत केंद्र सरकारच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, रेल्वे प्रकल्पाच्या खर्चवाढीचे कारण आणि त्याची आकडेवारी मागवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खा. राजेनिंबाळकर यांनी सांगितले की, 2000-2014 मध्ये घोषित झालेल्या या रेल्वे मार्गाचे काम 2019 पर्यंत प्रगतीपथावर नव्हते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे धाराशिव ते सोलापूर रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले असून, मार्च 2026 पर्यंत इंजिन ट्रायल पूर्ण होईल. मात्र, तुळजापूर ते सोलापूर या मार्गाचे टेंडर अद्याप बाकी आहे. यापूर्वी रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) 900 कोटी रुपये होता, परंतु आता हा खर्च 3000 कोटींवर गेला आहे. “ही किंमत का वाढली? कोणत्या संरचना यात समाविष्ट केल्या, ज्यामुळे खर्चात वाढ झाली? याची सविस्तर आकडेवारी मला द्या,” अशी विचारणा त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली. तसेच, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दिशा समितीचा आढावा आणि इतर प्रकल्प:
दिशा समितीच्या बैठकीत केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यात राष्ट्रीय महामार्ग, एमएसआयडीसी रस्ते प्रकल्प आणि सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड हायवेचा समावेश आहे. खा. राजेनिंबाळकर यांनी येरमळ्याजवळील  रस्त्याचे अपूर्ण काम आणि त्यामुळे वाढलेल्या चोरीच्या घटनांवरही लक्ष वेधले. “हा रस्ता जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होईल,” असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, धाराशिव जिल्ह्यात इटकूर आणि तेरखेडा येथे नवीन पोस्ट ऑफिसेस मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय, 118 नवीन पोस्ट ऑफिसेसच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर स्थगितीचा परिणाम:
खा. राजेनिंबाळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींहून अधिक निधीवर राज्य सरकारने लादलेल्या स्थगितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील औषधांचा तुटवडा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कॅथलॅब सुविधा आणि शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम रखडले आहे. “हा जनतेचा पैसा आहे, सरकार फक्त विश्वस्त आहे. तरीही काही लोक स्वतःच्या वडिलोपार्जित मालमत्तेसारखे वागतात. अशा नीचवृत्तीच्या राजकारणाला जनता आता ओळखते आहे,” अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

मराठा आरक्षण आणि सरकारच्या वचनांचा मुद्दा:
मराठा आरक्षणाबाबत बोलताना खा. राजेनिंबाळकर यांनी सरकारने मनोज जरंगे-पाटील यांना दिलेले वचन पाळण्यात अपयश आल्याचे सांगितले. “मराठा समाज स्वयंस्फूर्तपणे रस्त्यावर उतरला होता. सरकारने जीआर काढून काही गोष्टी मान्य केल्या, पण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, अन्यथा समाजाची फसवणूक होईल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ओबीसी आरक्षणाबाबत लक्ष्मण हाके यांच्या टीकेवर, “वचन देणाऱ्यांना विचारा, त्यांनी काय शब्द दिला होता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वे प्रकल्पाच्या खर्चवाढीवर प्रश्न उपस्थित करताना स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. तसेच, राज्य सरकारच्या निधीवरील स्थगितीमुळे जनतेच्या हिताच्या कामांना खीळ बसत असल्याची खंत व्यक्त केली.

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ, पायाभूत प्रकल्पांना गती

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सामाजिक न्याय, नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, कामगार आदी विभागांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

🔹 सामाजिक न्याय विभाग

  • संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या मासिक अर्थसहाय्यात ₹1000 ने वाढ.
  • लाभार्थ्यांना दरमहा आता ₹2500 इतकी मदत मिळणार.

🔹 नगर विकास विभाग

  • ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुणे मेट्रो मार्गिका 2 व 4, नागपूर मेट्रो टप्पा-2 यासाठी कर्जास मान्यता.
  • पुण्यातील स्वारगेट–कात्रज मार्गावर बिबवेवाडी व बालाजीनगर ही दोन नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास मंजुरी; 421 मीटरने कात्रज स्टेशन स्थलांतरित होणार. यासाठी ₹683 कोटींची तरतूद.
  • पुणे–लोणावळा लोकलच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेस राज्य सरकार MUTP धर्तीवर निधी उभारणार.
  • ठाणे ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग (PPP तत्त्वावर) सिडकोमार्फत राबविणार.
  • मुंबई मेट्रो मार्गिका-11 (वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया) प्रकल्पास ₹23,487 कोटींची तरतूद.
  • नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता व 4 ट्रक-बस टर्मिनल उभारणीस मंजुरी.
  • ‘नवीन नागपूर’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र (IBFC) विकसित करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हिंगणा तालुक्यात मंजूर.
  • MUTP-3B प्रकल्पात राज्याचा 50% आर्थिक सहभाग निश्चित.

🔹 विधी व न्याय विभाग

  • वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलासाठी ₹3,750 कोटींचा खर्च मंजूर.

🔹 ऊर्जा विभाग

  • महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या वापराबाबत धोरण निश्चित.

🔹 कामगार विभाग

  • महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 2017 तसेच कारखाने अधिनियम, 1948 मध्ये सुधारणा.

🔹 आदिवासी विकास विभाग

  • अनुसूचित जमातीतील नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्राची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू.

राज्यातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, सामाजिक न्याय व औद्योगिक विकासाला गती देणारे हे निर्णय असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलन तीव्र: सकल मराठा समाजाची लवकरच जिल्हा बंदची हाक, मुंबईला जाणारा दूध-भाजीपाला बंद करण्याचा इशारा

धाराशिव, दि. २ सप्टेंबर २०२५ (दैनिक जनमत प्रतिनिधी): मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरू असून, त्यांच्या मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास धाराशिव जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. यात जिल्हा बंदची हाक, आंदोलनकाळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभांना परवानगी न देणे, मुंबईला जाणारे दूध आणि भाजीपाला बंद करण्याचा इशारा तसेच भगव्या गमजाच्या मुद्द्यावरून सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सकल मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून हे मुद्दे मांडले असून, दैनिक जनमतशी बोलताना समाजाच्या एका प्रतिनिधीने या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.

सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीने सादर केलेल्या ५८ लाख कुणबी नोंदीनुसार ओबीसी आरक्षण तातडीने लागू करावे. हैदराबाद, सातारा आणि मुंबई गॅझेटमधील नोंदींच्या आधारे कुणबी-मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. तसेच, मुंबईतील आंदोलनादरम्यान धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्षाने कार्यक्रम घेऊ नये, अन्यथा समाज त्याला विरोध करेल. निवेदनात आझाद मैदानाकडे जाणारे रस्ते मोकळे करावे, आंदोलकांना अन्न-पाण्याची व्यवस्था करावी आणि स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. उपोषण सोडवले नाही तर जिल्ह्यात कठोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

दैनिक जनमतशी बोलताना सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधीने सांगितले की, “मनोज दादांचे उपोषण पाचव्या दिवशी आहे आणि कालपासून त्यांनी पाणीही सोडले आहे. सरकारने मागण्या तातडीने मंजूर कराव्यात. आझाद मैदानाकडे जाणाऱ्या गाड्यांना अडवू नये. आम्ही नियमांचे पालन करत आहोत, पण सरकार किंवा त्यांचे लोक गाड्या आडवून कोंडी करत आहेत.” त्यांनी भगव्या गमजाच्या मुद्द्यावरून तीव्र शब्दांत टीका केली. “महाराष्ट्रात भगवा गमजा घालायचा नाही तर काय घालायचे? यूपी-बिहारसारखा नवीन प्रकार आणायचा का? हा आमचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आम्हाला सांगितले आहे की, भगवा गमजा घातलेल्यांना उचलले जाईल. पण काही ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिस सिव्हिल ड्रेसमध्ये भगवा गमजा घालून आंदोलनात मिसळून दिशाभूल करत आहेत. हे फडणवीस सरकार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी चालवलेले बदनामीचे षडयंत्र आहे.”

प्रतिनिधीने पुढे सांगितले की, मागण्या मंजूर न झाल्यास धाराशिव जिल्ह्यात शैक्षणिक संस्था बंद करण्यात येतील आणि जिल्हा बंदची हाक देण्यात येईल. “आम्ही प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे. येणाऱ्या दोन दिवसांत मुंबईला जाणारे दूध आणि भाजीपाला बंद करण्याचा प्रयत्न करू. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही, तोपर्यंत जिल्ह्यात एकाही राजकीय पक्षाचा कार्यक्रम होऊ देणार नाही. तो उधळून लावू.” तसेच, मुंबईतील आंदोलकांवर होणाऱ्या अन्यायावरून काही माध्यमांना दोष देत त्यांनी मनोज दादांच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले.

या आंदोलनामुळे धाराशिव जिल्ह्यात  वातावरण तापले असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. सकल मराठा समाजाने स्पष्ट केले आहे की, मनोज जरांगे यांच्या तब्येतीला काही झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि त्याला सरकार जबाबदार असेल.