Home Blog

देवकते गल्लीत खंडोबा मंदिराचे भूमीपूजन

धाराशिव : शहरातील देवकते गल्लीत लोकवर्गणीतून खंडोबा मंदिराचे बांधकाम होणार असून आज चंपाषष्ठीचा मुहूर्त साधून समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. यावेळी दामू देवकते, अशोक सोलंकर, प्रा. सोमनाथ लांडगे सर, दिनेश बंडगर, लिंबराज डुकरे, सचिन शेंडगे, बालाजी वगरे, संभाजी सलगर, महेश देवकते, अशोक देवकते,  हणमंत देवकते, वसंत देवकते, मंगेश देवकते, तानाजी देवकते, खंडू ठवरे, पिंटू देवकते, नरसिंह मेटकरी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, आकाश शेंडगे, रामेश्वर घोगरे, शिवम देवकते, गणेश देवकते, रोहन देवकते, तेजस देवकते, अतीष ठवरे, राहुल देवकते, मालोजी देवकते, सुरज देवकते, शुभम कोळेकर, शुभम पांढरे, दत्ता थोरात, शाम ठवरे, प्रमोद ठवरे, कुणाल महानवर, रवि देवकते, विष्णु वाघमोडे व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सादर मंदिराचे काम हे लोकसहभागातून  लोकवर्गणीतून लवकरात लवकर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

धाराशिव-सोलापूर रेल्वे प्रकल्पाचा खर्च 900 कोटींवरून 3000 कोटींवर दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती

खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी घेतला आढावा, आ. कैलास पाटील आ. प्रवीण स्वामी यांची उपस्थिती

धाराशिव, 03 सप्टेंबर 2025: धाराशिव-सोलापूर-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या खर्चात तब्बल 900 कोटींवरून 3000 कोटींवर वाढ झाल्याने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. दिशा समितीच्या सात तास चाललेल्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत केंद्र सरकारच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, रेल्वे प्रकल्पाच्या खर्चवाढीचे कारण आणि त्याची आकडेवारी मागवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खा. राजेनिंबाळकर यांनी सांगितले की, 2000-2014 मध्ये घोषित झालेल्या या रेल्वे मार्गाचे काम 2019 पर्यंत प्रगतीपथावर नव्हते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे धाराशिव ते सोलापूर रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले असून, मार्च 2026 पर्यंत इंजिन ट्रायल पूर्ण होईल. मात्र, तुळजापूर ते सोलापूर या मार्गाचे टेंडर अद्याप बाकी आहे. यापूर्वी रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) 900 कोटी रुपये होता, परंतु आता हा खर्च 3000 कोटींवर गेला आहे. “ही किंमत का वाढली? कोणत्या संरचना यात समाविष्ट केल्या, ज्यामुळे खर्चात वाढ झाली? याची सविस्तर आकडेवारी मला द्या,” अशी विचारणा त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली. तसेच, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दिशा समितीचा आढावा आणि इतर प्रकल्प:
दिशा समितीच्या बैठकीत केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यात राष्ट्रीय महामार्ग, एमएसआयडीसी रस्ते प्रकल्प आणि सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड हायवेचा समावेश आहे. खा. राजेनिंबाळकर यांनी येरमळ्याजवळील  रस्त्याचे अपूर्ण काम आणि त्यामुळे वाढलेल्या चोरीच्या घटनांवरही लक्ष वेधले. “हा रस्ता जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होईल,” असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, धाराशिव जिल्ह्यात इटकूर आणि तेरखेडा येथे नवीन पोस्ट ऑफिसेस मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय, 118 नवीन पोस्ट ऑफिसेसच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर स्थगितीचा परिणाम:
खा. राजेनिंबाळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींहून अधिक निधीवर राज्य सरकारने लादलेल्या स्थगितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील औषधांचा तुटवडा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कॅथलॅब सुविधा आणि शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम रखडले आहे. “हा जनतेचा पैसा आहे, सरकार फक्त विश्वस्त आहे. तरीही काही लोक स्वतःच्या वडिलोपार्जित मालमत्तेसारखे वागतात. अशा नीचवृत्तीच्या राजकारणाला जनता आता ओळखते आहे,” अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

मराठा आरक्षण आणि सरकारच्या वचनांचा मुद्दा:
मराठा आरक्षणाबाबत बोलताना खा. राजेनिंबाळकर यांनी सरकारने मनोज जरंगे-पाटील यांना दिलेले वचन पाळण्यात अपयश आल्याचे सांगितले. “मराठा समाज स्वयंस्फूर्तपणे रस्त्यावर उतरला होता. सरकारने जीआर काढून काही गोष्टी मान्य केल्या, पण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, अन्यथा समाजाची फसवणूक होईल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ओबीसी आरक्षणाबाबत लक्ष्मण हाके यांच्या टीकेवर, “वचन देणाऱ्यांना विचारा, त्यांनी काय शब्द दिला होता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वे प्रकल्पाच्या खर्चवाढीवर प्रश्न उपस्थित करताना स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. तसेच, राज्य सरकारच्या निधीवरील स्थगितीमुळे जनतेच्या हिताच्या कामांना खीळ बसत असल्याची खंत व्यक्त केली.

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ, पायाभूत प्रकल्पांना गती

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सामाजिक न्याय, नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, कामगार आदी विभागांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

🔹 सामाजिक न्याय विभाग

  • संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या मासिक अर्थसहाय्यात ₹1000 ने वाढ.
  • लाभार्थ्यांना दरमहा आता ₹2500 इतकी मदत मिळणार.

🔹 नगर विकास विभाग

  • ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुणे मेट्रो मार्गिका 2 व 4, नागपूर मेट्रो टप्पा-2 यासाठी कर्जास मान्यता.
  • पुण्यातील स्वारगेट–कात्रज मार्गावर बिबवेवाडी व बालाजीनगर ही दोन नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास मंजुरी; 421 मीटरने कात्रज स्टेशन स्थलांतरित होणार. यासाठी ₹683 कोटींची तरतूद.
  • पुणे–लोणावळा लोकलच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेस राज्य सरकार MUTP धर्तीवर निधी उभारणार.
  • ठाणे ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग (PPP तत्त्वावर) सिडकोमार्फत राबविणार.
  • मुंबई मेट्रो मार्गिका-11 (वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया) प्रकल्पास ₹23,487 कोटींची तरतूद.
  • नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता व 4 ट्रक-बस टर्मिनल उभारणीस मंजुरी.
  • ‘नवीन नागपूर’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र (IBFC) विकसित करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हिंगणा तालुक्यात मंजूर.
  • MUTP-3B प्रकल्पात राज्याचा 50% आर्थिक सहभाग निश्चित.

🔹 विधी व न्याय विभाग

  • वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलासाठी ₹3,750 कोटींचा खर्च मंजूर.

🔹 ऊर्जा विभाग

  • महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या वापराबाबत धोरण निश्चित.

🔹 कामगार विभाग

  • महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 2017 तसेच कारखाने अधिनियम, 1948 मध्ये सुधारणा.

🔹 आदिवासी विकास विभाग

  • अनुसूचित जमातीतील नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्राची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू.

राज्यातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, सामाजिक न्याय व औद्योगिक विकासाला गती देणारे हे निर्णय असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलन तीव्र: सकल मराठा समाजाची लवकरच जिल्हा बंदची हाक, मुंबईला जाणारा दूध-भाजीपाला बंद करण्याचा इशारा

धाराशिव, दि. २ सप्टेंबर २०२५ (दैनिक जनमत प्रतिनिधी): मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरू असून, त्यांच्या मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास धाराशिव जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. यात जिल्हा बंदची हाक, आंदोलनकाळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभांना परवानगी न देणे, मुंबईला जाणारे दूध आणि भाजीपाला बंद करण्याचा इशारा तसेच भगव्या गमजाच्या मुद्द्यावरून सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सकल मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून हे मुद्दे मांडले असून, दैनिक जनमतशी बोलताना समाजाच्या एका प्रतिनिधीने या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.

सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीने सादर केलेल्या ५८ लाख कुणबी नोंदीनुसार ओबीसी आरक्षण तातडीने लागू करावे. हैदराबाद, सातारा आणि मुंबई गॅझेटमधील नोंदींच्या आधारे कुणबी-मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. तसेच, मुंबईतील आंदोलनादरम्यान धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्षाने कार्यक्रम घेऊ नये, अन्यथा समाज त्याला विरोध करेल. निवेदनात आझाद मैदानाकडे जाणारे रस्ते मोकळे करावे, आंदोलकांना अन्न-पाण्याची व्यवस्था करावी आणि स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. उपोषण सोडवले नाही तर जिल्ह्यात कठोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

दैनिक जनमतशी बोलताना सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधीने सांगितले की, “मनोज दादांचे उपोषण पाचव्या दिवशी आहे आणि कालपासून त्यांनी पाणीही सोडले आहे. सरकारने मागण्या तातडीने मंजूर कराव्यात. आझाद मैदानाकडे जाणाऱ्या गाड्यांना अडवू नये. आम्ही नियमांचे पालन करत आहोत, पण सरकार किंवा त्यांचे लोक गाड्या आडवून कोंडी करत आहेत.” त्यांनी भगव्या गमजाच्या मुद्द्यावरून तीव्र शब्दांत टीका केली. “महाराष्ट्रात भगवा गमजा घालायचा नाही तर काय घालायचे? यूपी-बिहारसारखा नवीन प्रकार आणायचा का? हा आमचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आम्हाला सांगितले आहे की, भगवा गमजा घातलेल्यांना उचलले जाईल. पण काही ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिस सिव्हिल ड्रेसमध्ये भगवा गमजा घालून आंदोलनात मिसळून दिशाभूल करत आहेत. हे फडणवीस सरकार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी चालवलेले बदनामीचे षडयंत्र आहे.”

प्रतिनिधीने पुढे सांगितले की, मागण्या मंजूर न झाल्यास धाराशिव जिल्ह्यात शैक्षणिक संस्था बंद करण्यात येतील आणि जिल्हा बंदची हाक देण्यात येईल. “आम्ही प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे. येणाऱ्या दोन दिवसांत मुंबईला जाणारे दूध आणि भाजीपाला बंद करण्याचा प्रयत्न करू. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही, तोपर्यंत जिल्ह्यात एकाही राजकीय पक्षाचा कार्यक्रम होऊ देणार नाही. तो उधळून लावू.” तसेच, मुंबईतील आंदोलकांवर होणाऱ्या अन्यायावरून काही माध्यमांना दोष देत त्यांनी मनोज दादांच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले.

या आंदोलनामुळे धाराशिव जिल्ह्यात  वातावरण तापले असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. सकल मराठा समाजाने स्पष्ट केले आहे की, मनोज जरांगे यांच्या तब्येतीला काही झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि त्याला सरकार जबाबदार असेल.

येडशी बसस्थानक वगळून जाणाऱ्या एसटी बसला चाप: ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीनंतर चालक-वाहकावर कारवाई

धाराशिव, दि. २ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस चालक आणि वाहकांच्या मनमानी कारभाराला चाप बसला आहे. येडशी बसस्थानक हे अधिकृत थांबा असूनही, अनेक बस चालक-वाहक या ठिकाणी बस न थांबवता सरळ बाह्यवळण रस्त्याने मार्गस्थ होतात. यामुळे प्रवाशांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, तक्रारी दाखल न होत असल्याने अशा प्रकारांना आळा बसत नव्हता. आता धाराशिव जिल्ह्यातील सातेफळ (येडशी) येथील ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक दिलीप प. कांबळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर अंबड आगाराने संबंधित चालक आणि वाहकांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या घटनेमुळे इतर चालक-वाहकांच्या मनमानीला चाप लागेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

दिलीप कांबळे यांनी १३ नोव्हेंबर २०२४ रोजी जालना विभागातील विभाग नियंत्रक, अंबड आगार व्यवस्थापक आणि धाराशिव आगार व्यवस्थापक यांना पत्राद्वारे तक्रार नोंदवली होती. त्यात त्यांनी सोलापूर-जालना (गाडी क्रमांक MH-20 BL 3345, निळ्या रंगाची) या बसच्या चालक आणि वाहकांच्या मनमानी कारभाराचा उल्लेख केला आहे. दिलीप कांबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.५५ वाजता धाराशिव बसस्थानकात ही बस आली. येडशी जाणारे ८ ते १० प्रवासी बस चढत असताना वाहकाने “येडशीवाले बसू नका, ही गाडी जादा आहे. येडशी स्टँडला जाणार नाही, डायरेक्ट येरमाळा जाणारे लोक बसा,” असे बजावले. यामुळे इतर प्रवासी बाजूला झाले, पण गुडघ्याच्या आजारामुळे कांबळे बसून राहिले. वाहकाने त्यांना धाराशिव ते येडशीचे तिकीट दिले.

बस सुमारे १५ ते २० प्रवाशांसह निघाली आणि सायंकाळी ६.२० वाजता येडशीजवळील सोनेगाव रोड चौकात थांबली. वाहकाने बेल मारून बस थांबवली आणि चालकाने कांबळेंना उतरण्यास सांगितले. “आपली गाडी स्टँडला जाणार नाही,” असे सांगून त्यांना तेथेच उतरवण्यात आले. सोनेगाव रोड ते येडशी बसस्थानकाचे अंतर दीड किलोमीटरपेक्षा जास्त आहे. अंधारात हे अंतर चालत जावे लागल्याने कांबळेंना शारीरिक आणि मानसिक त्रास झाला. त्यातच कळंबला जाणारी ६.३० वाजताची सेटल गाडी सुटली, ज्यामुळे त्यांना स्वतंत्र टमटम रिक्षा करून गावी जावे लागले. यामुळे आर्थिक नुकसानही झाले.

कांबळे यांनी तक्रारीत येडशी बसस्थानकाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे गाव धुळे-सोलापूर आणि लातूर-पुणे या प्रमुख महामार्गांवर आहे. येथून दररोज असंख्य एसटी बस प्रवाशांची ने-आण करतात. आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील बससुद्धा रात्री-अपरात्री येथे थांबतात. असे असतानाही “जादा” बस येडशी स्टँडला का जात नाही? चालक-वाहकांना प्रवाशांना नाकारण्याचा अधिकार आहे का? ज्येष्ठ नागरिकांना अंधारात निर्जन ठिकाणी सोडणे हे बेकायदेशीर, अमानुष आणि संतापजनक नाही का? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी संबंधित लोकसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई मागितली.

या तक्रारीवर अंबड आगाराने तातडीने कारवाई केली. ७ ऑगस्ट २०२५ रोजीच्या पत्रात आगार प्रमुखांनी कांबळेंना कळवले की, चालक द.अ. जाधव (क्र. ४७७) आणि वाहक म.अं. वाल्हेकर (क्र. ८९७८) यांच्यावर अनुक्रमे अपराध प्रकरण क्र. ६०/२५ आणि ६१/२५ अंतर्गत रा.प. शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

या घटनेमुळे एसटीच्या चालक-वाहकांच्या मनमानीला चाप बसण्याची अपेक्षा आहे. अनेकदा अधिकृत थांब्यांवर बस न थांबवल्याने प्रवाशांना त्रास होतो, पण तक्रारी नसल्याने कारवाई होत नाही. कांबळेंच्या तक्रारीने एक उदाहरण घालून दिले आहे. आता इतर प्रवासीही तक्रारी दाखल करतील आणि एसटी महामंडळ अधिक जबाबदार होईल, अशी आशा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी महामंडळाने कठोर धोरण अवलंबावे, अशी मागणी होत आहे.

मराठा समाजाच्या कल्याणासाठी फडणवीस-शिंदेंचे सर्वाधिक योगदान : नरेंद्र पाटील

मुंबई : मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक काम केले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही पुढाकाराने मराठा तरुणांसाठी विविध योजना राबवल्या गेल्या. मात्र, सध्याचे आंदोलन हे काही विरोधकांनी माथी भडकावल्यामुळे केवळ व्यक्तिविरोधी झाले आहे, अशी टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोमवारी येथे केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.

नरेंद्र पाटील म्हणाले, “शरद पवारांनी बंद केलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुनर्स्थापना फडणवीस सरकारने 2014-19 मध्ये केली. याच काळात मराठा समाजातील दीड लाख तरुण उद्योजक घडवले गेले. तब्बल 13 हजार कोटींचे कर्ज, 1300 कोटींचा व्याज परतावा या महामंडळामार्फत दिला गेला. हे यश महायुती सरकारचे आहे.”

मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी या हेतूने ‘सारथी’ महामंडळाची स्थापना करण्यात आली. बार्टीच्या धर्तीवर उभारलेल्या या संस्थेमुळे मराठा तरुणांना शिक्षण आणि करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या, असेही ते म्हणाले.

चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 750 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी 350 कोटींचा निधी देण्यात आला होता. यंदा पहिल्याच टप्प्यात 300 कोटींचा निधी वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यात निजामाच्या काळापासून मराठा समाजाला ओबीसी अथवा कुणबी हा दर्जा मिळत होता. तो अबाधित राहावा तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासाठी कायदेशीर तपास आवश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

“महाराष्ट्रात 12 मराठा मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांनी समाजासाठी काहीही केले नाही. मराठवाड्यात सर्वाधिक मुख्यमंत्री होऊनही गरीबी दूर झाली नाही, याचा आत्मपरीक्षण काँग्रेसने करायला हवे,” असा टोला त्यांनी लगावला.

आंदोलनाबाबत बोलताना पाटील म्हणाले, “शांततेने आंदोलन करणे हा सर्वांचा अधिकार आहे. पण सर्वसामान्यांना त्रास देऊन आंदोलन बदनाम करू नका. 2016 मध्ये मूकमोर्चे निघाले तरी कुणालाही त्रास झाला नव्हता. तसाच संयम ठेवावा. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महायुती सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर न्याय्य तोडगा काढेल, यावर विश्वास ठेवावा.”

धाराशिव जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

मेडसिंगा ग्रामपंचायतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

धाराशिव : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला आता धाराशिव जिल्ह्यातूनही मोठा पाठिंबा मिळू लागला आहे.

मेडसिंगा ग्रामपंचायत कार्यालयाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. सततच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडत असल्याने शासनाने तातडीने मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा उद्भवणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल, असा इशारा ग्रामपंचायतीने पत्राद्वारे दिला आहे.

ग्रामपंचायतीने स्पष्ट केले की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मात्र शासनाने सकारात्मक भूमिका घेतली नसल्यामुळे संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर मेडसिंगा ग्रामपंचायत ठामपणे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील इतर गावांमधूनही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत असून आगामी काळात हा जनसमर्थनाचा आवाज आणखी मोठा होण्याची चिन्हे आहेत.

समुद्रवाणी गावात मराठा आरक्षणासाठी मुंबईतील उपोषणाला पाठिंबा

धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी गावात आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी साखळी पद्धतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे.

आजच्या उपोषणात सहभागी झालेले आहेत:

  • संतोष महादेव घुले
  • सोमनाथ चंद्रसेन पाटील
  • सूर्योदय सतीश कदम

समुद्रवाणी गावातील गावकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून स्थानिक पातळीवरही आरक्षणाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरंगे पाटील उपोषण करत असताना गावगावातील मराठा समाजाने देखील आपली भूमिका ठाम पद्धतीने मांडली आहे.

उपोषणाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी समाजाची एकजूट आणि इच्छाशक्ती स्पष्ट होते. ग्रामीण भागातील या कृतीमुळे आरक्षणाच्या मागण्यांबाबत स्थानिक आणि राज्य प्रशासनाच्या लक्षात पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे.

  

धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी घरफोडी व चोरीच्या घटना

धाराशिव : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी व चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

परंडा तालुका :
फिर्यादी धनाजी रामचंद्र यादव (वय 53, रा. आसु, ता. परंडा) यांच्या घरी 30 ऑगस्ट रोजी रात्री 1.00 ते 3.00 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कडी–कोंडा तोडून प्रवेश केला. या वेळी त्यांच्या घरासह सोमनाथ जाधव, कुसुम जाधव, बळीराम बुरुंगे, हरिदास बुरुंगे व बजरंग जाधव यांच्या घरातून रोख रक्कम व सोन्या–चांदीचे दागिने, साड्या असा एकूण 88 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 331 (4), 305, 62 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा तालुका :
दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता उमरगा बसस्थानक येथे कदेर (ता. उमरगा) येथील प्रणिता विलास जाधव (वय 27) या उमरगा–लातूर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत पर्स मधून 40 ग्रॅम सोन्याचे दागिने व ओपो मोबाईल फोन, एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

दोन्ही प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस ठाण्याचे पथक करीत असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

कळंबमध्ये खंडणी प्रकरणी गुन्हा नोंद

कळंब (जि. धाराशिव) : कळंब शहरातील मयुर साडी सेंटर येथे दुकान चालवण्यासाठी दरमहा दोन लाख रुपये खंडणीची मागणी केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मयुर जयप्रकाश रुणवाल (वय 39, रा. कळंब) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी लखन विजय गायकवाड, अमर विजय गायकवाड, अमित भारत जाधव, रोहीत हौसलमल (रा. कळंब) तसेच शितल बलदोटा, पंकज काटे, शितल काटे (रा. लातूर) यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8.15 वा. ते 30 ऑगस्ट रोजी पहाटे 1 वा. या कालावधीत बेकायदेशीरपणे जमाव जमवून फिर्यादीकडे खंडणीची मागणी केली.

दुकान सुरू ठेवायचे असेल तर दरमहा दोन लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा दुकान चालू देणार नाही, अशा धमक्या आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय दुकानाच्या शटरवर पोस्टर लावून “दुकान उघडले तर सोडणार नाही आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करू” अशीही धमकी दिली गेली.

या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 308(2), 189(2), 191(2), 190(2), 329(3), 351(2) अन्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रिया मराठेचे निधन – कॅन्सरशी झुंज देत ३८व्या वर्षी अखेरचा श्वास

मुंबई – मराठी तसेच हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी, सकाळी चार वाजता निधन झाले. त्या अवघ्या ३८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या कॅन्सरशी लढा देत होत्या, मात्र अखेरीस आजारावर मात करता आली नाही.

अभिनय प्रवास

प्रिया मराठे यांनी २००६ मध्ये या सुखांनो या या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मराठी मालिकांमध्ये चार दिवस सासूचे, तू तिथे मी, तुझेच मी गीत गात आहे यांसारख्या मालिकांमध्ये प्रभावी भूमिका केल्या. हिंदी मालिकांमध्ये कसम से, पवित्र रिश्ता आणि बडे अच्छे लगते है या लोकप्रिय कार्यक्रमांमधून त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या.

चित्रपटसृष्टीतदेखील त्यांनी आपले स्थान निर्माण केले. विघ्नहर्ता महागणपती (२०१६) आणि किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी (२०१६) या मराठी चित्रपटांत त्यांच्या भूमिका प्रेक्षकांनी आवडल्या.

वैयक्तिक आयुष्य

२३ एप्रिल १९८७ रोजी ठाण्यात जन्मलेल्या प्रियाने २४ एप्रिल २०१२ रोजी अभिनेता शंतनु मोघे (अभिनेता श्रीकांत मोघे यांचा मुलगा) याच्यासोबत विवाह केला. लग्नानंतरही त्यांनी अभिनय क्षेत्रात सक्रिय राहून अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या.

आजाराशी संघर्ष

काही वर्षांपूर्वी प्रियाला कॅन्सरचे निदान झाले होते. उपचार सुरू असतानाही त्यांनी धैर्याने आजाराशी सामना केला. मात्र आजाराने अखेरीस पुन्हा जोर धरला आणि मीरारोड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कलाविश्वातील प्रतिक्रिया

प्रिया मराठे यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. चाहत्यांनी व सहकलाकारांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. अभिनेता सुबोध भावे यांनी भावनिक शब्दांत त्यांना आठवत लिहिले की, “माझी बहीण लढवय्या होती, पण कॅन्सरच्या लढाईत ती हरली.”

प्रिया मराठे या मराठी-हिंदी मालिकांतून प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेल्या. त्यांचा अभिनय प्रवास, त्यांची जिद्द आणि कलेप्रती असलेलं प्रेम हे नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या अकाली निधनाने कलाविश्वातील एक उज्वल तारा हरपला आहे.