Home Blog

देवकते गल्लीत खंडोबा मंदिराचे भूमीपूजन

धाराशिव : शहरातील देवकते गल्लीत लोकवर्गणीतून खंडोबा मंदिराचे बांधकाम होणार असून आज चंपाषष्ठीचा मुहूर्त साधून समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. यावेळी दामू देवकते, अशोक सोलंकर, प्रा. सोमनाथ लांडगे सर, दिनेश बंडगर, लिंबराज डुकरे, सचिन शेंडगे, बालाजी वगरे, संभाजी सलगर, महेश देवकते, अशोक देवकते,  हणमंत देवकते, वसंत देवकते, मंगेश देवकते, तानाजी देवकते, खंडू ठवरे, पिंटू देवकते, नरसिंह मेटकरी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, आकाश शेंडगे, रामेश्वर घोगरे, शिवम देवकते, गणेश देवकते, रोहन देवकते, तेजस देवकते, अतीष ठवरे, राहुल देवकते, मालोजी देवकते, सुरज देवकते, शुभम कोळेकर, शुभम पांढरे, दत्ता थोरात, शाम ठवरे, प्रमोद ठवरे, कुणाल महानवर, रवि देवकते, विष्णु वाघमोडे व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सादर मंदिराचे काम हे लोकसहभागातून  लोकवर्गणीतून लवकरात लवकर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला

परंडा आणि भूम नगरपालिकेत सत्ता स्थापन करत मारली मुसंडी

एकटा बास सोशल समाज माध्यमावर प्रतिक्रिया

धाराशिव – भूम परंडा नगरपालिकेत माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आपला गड राखला असून भूम व परंडा नगरपालिकेत अटीतटीच्या सामन्यात दोन्हीही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तानाजी सावंत यांचे निवडून आले आहेत. परंडा येथे जाकीर सौदागर हे 189 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्याचबरोबर तिथं आठ नगरसेवक शिवसेनेला मिळाले आहेत तर भूम मध्ये देखील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संयोगिता गाढवे ह्या 198 मताने निवडून आल्या असून तिथे देखील सहा नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे. तानाजी सावंत यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी ,काँग्रेस, उद्धव ठाकरे गट हे सगळेच पक्ष एकत्र आले असून त्यांनी दोन्ही ठिकाणी सावंतांच्या पॅनल विरोधात पॅनल उभा केले होते एवढेच नाही तर यावेळी आर्थिक रसद देखील जिल्ह्यातील धाराशिव च्या बड्या नेत्याने पुरवली असल्याची चर्चा रंगली होती त्यामुळे सर्वपक्षीय सावंतांच्या विरोधात एकवटल्याने या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुका रंजक झाल्या होत्या.शेवटी तानाजी सावंत यांनी विधानसभेप्रमाणेच शेवटच्या क्षणी दोन्ही साथीदाराच्या सोबत खंबीरपणे उभा राहत या पालिका आपल्या ताब्यात मिळवत सर्वपक्षीय विरोधकांना धोबीपछाड देत आपले वर्चस्व सिद्ध करत गड राखला आहे.

विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले

भूम प्रतिनिधी :- शहरातील शंकरराव पाटील महाविद्यालयासमोरील तीव्र उतार पुन्हा एकदा अपघातास कारणीभूत ठरला आहे. शनिवारी (दि. २०) सकाळी आणि दुपारी केवळ काही तासांच्या अंतराने ऊस वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पलटी झाल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही अपघातांत ट्रॅक्टरसह एका चारचाकी कारचे, दुचाकी बुलेटचे तसेच संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.
वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याचा ऊस ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. २५ ए.डब्ल्यू. ३६५२ व एम.एच. १३ बी.आर. ३१६ द्वारे महाविद्यालयाच्या रस्त्याने वाहतूक केली जात होती. सकाळी अंदाजे ११ वाजता पहिला ट्रॅक्टर उतारावरून वेगाने उतरत असताना समोर अचानक आलेल्या दुचाकीला वाचविताना चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात रस्त्यालगत असलेले अमर जमादार यांचे ‘ए. जे. मोटर्स’ दुकान आणि दुकाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचा थोडक्यात बचाव झाला.
दरम्यान, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी ऊस वाहतूक करणारा दुसरा ट्रॅक्टरही पलटी झाला. या अपघातात एका चारचाकी कारचे व बुलेटचे मोठे नुकसान झाले.
एकाच दिवशी दोन अपघात घडल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. महाविद्यालयासमोरील उतारावर गतिरोधक किंवा झेब्रा क्रॉसिंग नसल्याने वाहनांचा वेग नियंत्रणात राहत नाही आणि त्यामुळेच वारंवार अपघात होतात, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या ठिकाणी तातडीने गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग उभारावे, अशी जोरदार मागणी होत असून महाविद्यालय प्रशासनाने यासंदर्भात अनेक वेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.

पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल

धाराशिव : पेट्रोल पंपातून पाणीमिश्रित डिझेल दिल्याने वाहनाचे नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देत नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारदार मुकुंद पि. बाळासाहेब माढेकर (वय ३६, रा. रामनगर, उस्मानाबाद) यांनी उस्मानाबाद पोलीस पेट्रोल पंपाविरोधात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पाणी मिश्रित डिझेलमुळे त्यांच्या चारचाकी वाहनाचे इंजिन बंद पडले, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती खर्च करावा लागला, असा आरोप करण्यात आला होता.

२३ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री डिझेल भरल्यानंतर काही अंतरावरच गाडी बंद पडल्याचे तक्रारदाराने सांगितले. पुढील दिवशी वाहन टोईंगसाठी ४,००० रुपये, दुरुस्तीकरिता २,६९१ रुपये आणि पुढील तपासणी व अंदाजित दुरुस्तीमध्ये तब्बल १.२५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे जॉबकार्डमध्ये नमूद करण्यात आले होते. चव्हाण मोटर्स आणि सोलापूर वर्कशॉपच्या अहवालात स्पष्टपणे “पाणीमिश्रित डिझेलमुळे इंजिन नॉकिंग” असल्याचे उल्लेख आढळले.

सामनेवाले पेट्रोल पंप आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने आरोप नाकारले असले तरी, आयोगाने पुराव्यांच्या आधारे सेवा त्रुटी अंशतः सिद्ध झाल्याचे नमूद केले. इंधन पावती, अधिकृत सर्विस केंद्राचा अहवाल आणि घटनाक्रमातील सुसूत्रता लक्षात घेऊन आयोगाने तक्रारदारास नुकसानभरपाई मिळण्यास पात्र ठरवले.

या प्रकरणाची सुनावणी अध्यक्ष प्रज्ञा हेंढे आणि सदस्य वैशाली बोराडे यांनी केली. जवळपास ३ वर्षे ३ महिने ९ दिवस सुनावणी चालल्यानंतर हा निर्णायक आदेश पारित करण्यात आला.

का आहे हा निकाल महत्त्वाचा?

  • पाणीमिश्रित इंधनप्रकरणी ग्राहकाची बाजू सिद्ध होण्याचे दुर्मिळ उदाहरण
  • अधिकृत सर्व्हिस सेंटरचे जॉबकार्ड निर्णायक पुरावा
  • पेट्रोल पंपांच्या गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि इंधन वितरणातील गुणवत्ता राखण्यासाठी आयोगाचा हा निर्णय महत्वाचा ठरणार असल्याचे कायदेविषयक तज्ञांचे मत आहे.

विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ तसेच नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या अनुषंगाने १८ डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरात धडक देत तब्बल १४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाशी येथे गोवा राज्यात निर्मिती होणारी आणि केवळ तेथेच विक्रीसाठी परवानाधारक असलेली विदेशी दारू अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने सापळा रचला. या कारवाईत महिंद्रा स्कॉर्पिओ (क्रमांक MH-२५-R-३८३५) आणि महिंद्रा XUV ५०० (क्रमांक IIR-५१-AT-९४८६) अशी दोन चारचाकी वाहने तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणी तानाजी अंबऋषी लटके (रा. वाशी) आणि अविनाश नामदेव पवार (रा. वाशी) या दोघांना अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १३ लाख ८१ हजार १२० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त श्रीमती संगीता दरेकर आणि अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्र.निरीक्षक बाळकृष्ण ढोकरे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने ही मोहीम राबवली.

या कारवाईत आर. के. बागवान, ए.ए. गवंडी, टी.एच. नेर्लेकर, ए.सी. खराडे, ए.डी. गटकांबळे, संतोष कलमले, महिला जवान ऐश्वर्या इंगळे तसेच राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव आणि भुम येथील अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.

या घटनेचा पुढील तपास प्र.निरीक्षक बाळकृष्ण ढोकरे यांच्या मार्फत सुरू आहे.

भाजपची हुजरेगिरी करणे महागात पडले, खोटी माहिती पसरवल्याने अखेर तीन सोशल मिडिया पेजवर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ!

धाराशिव – निवडणूक काळात भाजपची हुजरेगिरी करणाऱ्या तीन सोशल मीडियावर पेजवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून नगरपालिका निवडणुकीत खोटी माहिती प्रसारित करून मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

नगरपालिका निवडणुकीदरम्यान पसरवण्यात आलेल्या बनावट एक्झिट पोल प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 10 दिवसानंतर धाराशिव सायबर पोलिस ठाण्यात बनावट एक्झिट पोल वायरल करणाऱ्या धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका बनावट टीव्ही चॅनलच्या नावाखाली एका उमेदवाराला विजयी दाखवणारा फेक एक्झिट पोल व्हायरल करण्यात आला होता. मतदानापूर्वी अशाप्रकारे दिशाभूल करणारे साहित्य प्रसारित करणे हे लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951, कलम 126(A) चे स्पष्ट उल्लंघन ठरते. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी ९ डिसेंबर रोजी “तात्काळ FIR करा” असा कठोर आदेश जारी केला होता. ओंकार देशमुख यांनी आदेश काढुनही गुन्हा दाखल होत नसल्याने युवासेना आक्रमक झाली होती. दरम्यान, गुन्हा दाखल झाला नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील युवा सेनेकडून देण्यात आला होता. युवा सेनेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तात्काळ धाराशिव येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, आदेश दिल्यानंतरही तब्बल नऊ दिवस कारवाई न झाल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आता सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने प्रकरणात गती येण्याची शक्यता आहे. तरीही, उशीर का झाला? आदेश असूनही FIR त्वरित नोंदवली गेली नाही, यामागे नेमके कोणाचा दबाव होता? असा प्रश्न नागरिकांमध्ये अद्यापही तीव्रतेने कायम आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू करण्यात आली असून बनावट एक्झिट पोल तयार करणारे आणि व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाने धाराशिव नगरपालिका निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपचा उमेदवार विजयी होत असल्याचा उल्लेख

कायद्याने बंदी असलेल्या बनावट आणि बोगस ओपिनियन पोल मध्ये भाजपच्या उमेदवार विजयी होत असल्याचं दाखवलं होतं एकप्रकारे भाजपची हुजरेगिरी या सोशल मीडिया ने केली होती त्याचा फटका अखेर त्या पेजला बसला आहे.

या कलमानुसार करण्यात आला गुन्हा दाखल

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 126 (A), BNS 2023-223, 337, 353, IT ACT – 66(5) या कलमान्वये धाराशिव 2.0, jlha dharashiv, All about Dharashiv वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवा सेनेच्या पाठपुराव्याला यश

दरम्यान सदर प्रकरणात, युवा सेनेचे तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी फेक एक्झिट पोल प्रकरणात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत धाराशिव चे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना स्वयंस्पष्ट अहवाल देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

बोगस एक्झिट पोल प्रकरणात कायद्याचे उल्लंघन, एस.डी.एम.चे आदेश; तरीही गुन्हा दाखल नाही

धाराशिव :
नगरपालिका निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उघड उल्लंघन होऊनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या बनावट एक्झिट पोलच्या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी ९ डिसेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात लोकप्रतिनिधित्व कायद्याचे स्पष्ट उल्लंघन झाल्याचे नमूद करून तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

देशमुख यांनी या प्रकरणातील पुढील कार्यवाहीसाठी उपमुख्याधिकारी विश्वंभर सोनखेडकर यांना प्राधिकृत केले असून “गुन्हा दाखल करण्यास कोणताही विलंब होणार नाही, याची गांभीर्यपूर्वक दक्षता घ्यावी” असा विशेष उल्लेख आदेशपत्रात करण्यात आला आहे.

तथापि, आदेश जारी होऊनही पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, ही बाब लक्षवेधी ठरत आहे. सोशल मीडियावर एका बनावट टीव्ही चॅनलचा आधार घेत नगरपालिकेतील एका उमेदवाराला विजयी ठरविणारा कथित एक्झिट पोल प्रदर्शित करण्यात आला होता. मतदानापूर्वी अशा प्रकारचा साहित्य प्रसारित करणे हे लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 126(1)(ख) तसेच निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते.

कायद्याचे उल्लंघन स्पष्ट असताना आणि एस.डी.एम.चे निर्देशही जारी झाल्यानंतरही गुन्हा का नोंदवला गेला नाही, याबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणातील विलंब नेमका कोणासाठी आणि कशासाठी, याबाबत स्थानिक पातळीवर चर्चांना ऊत आला आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार अशा प्रकारच्या उल्लंघनांवर तात्काळ गुन्हा नोंदवणे बंधनकारक असताना, धाराशिवमधील प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्याप शांत असल्याचे चित्र कायम आहे.

राकेश सूर्यवंशी यांची तक्रार

या प्रकरणी  राकेश सूर्यवंशी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वतंत्र तक्रार दाखल केली होती. सोशल मीडियावर बनावट एक्झिट पोल प्रसारित करून मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट नमूद केले आहे. मतदानापूर्वी अशाप्रकारे उमेदवारांच्या विजय-पराजयाचे चित्र उभे करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. सूर्यवंशी यांच्या या औपचारिक तक्रारीनंतरच निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जारी केले.

मतदानाला 36 तास शिल्लक असताना माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्याकडून धाराशिव नगरपालिकेत 2017 ते 2020 काळात 250 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप !

धाराशिव – धाराशिव नगरपालिकेच्या मतदानासाठी अवघे छत्तीस तास शिल्लक असताना भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पत्रकार परिषद घेत 2017 ते 2020 या काळात नगराध्यक्षांनी अडीचशे कोटींचा भ्रष्टाचार  केल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप स्थानिक लेखा परीक्षणाचा हवाला देत करण्यात आले असून स्थानिक लेखापरीक्षणात अनियमितता केल्याचा उल्लेख आहे ही अनियमित्ता आहे की भ्रष्टाचार आहे आणि त्यावर अद्याप पर्यंत कारवाई का झाली नाही याचे उत्तर भाजपकडून देण्यात आले नाही तसेच या पत्रकार परिषदेत उपस्थित युवराज नळे नगरपालिकेत गटनेते होते त्या काळात नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अशा अनियमितता झाल्याच्या चर्चा कधीच घडल्या नाहीत या प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

तत्पूर्वी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी म्हणाले की, विरोधकांकडे विकासाचा अजेंडा नाही.नगरपालिकेची निवडणूक महत्वाची, ज्याचं सरकार होतं त्यांच्याकडून जे अपेक्षित होतं ते नाही झालं.मूलभूत सोयी सुविधा कशा मिळतील याच्यावर बोलण्यापेक्षा संभ्रम निर्माण करून मत मिळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून आम्हीवचननामा जाहीर केला तो दारोदारी पोहचवण्यात काम सुरू आहे. विकासाचं व्हिजन न मांडता विरोधक टीका करत असल्याचे ते म्हणाले.

हे प्रकरण आजपर्यंत का काढले नाही?

आरोप केलेले प्रकरण जर गंभीर असेल तर हे प्रकरण आजपर्यंत का काढले गेले नाही. प्रशासकाच्या काळात राज्यात भाजपची सत्ता असताना यावर भाष्य न केले गेल्याने आरोपात तथ्य आहे की नाही याचा मागमूस लागेल की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र भाजप त्यांची सत्ता असताना देखील आजपर्यंत गप्प का हा मोठा प्रश्न आहे.

त्यावेळचे उपाध्यक्ष आता उमेदवार आणि युतीत!

शेवटच्या दोन वर्षाच्या काळात नगरपालिकेचे उपाध्यक्षपद अभय इंगळे यांच्याकडे होते या आरोपाबाबत त्यांना विचारले असता मी संख्येच्या बळावर उपाध्यक्ष होतो मला विशेष अधिकार नव्हते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच सत्तेच्या सुरुवातीच्या काळात सूरज साळुंके हे उपाध्यक्षपदी होते ते सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून त्यांच्या पक्षाने नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे त्यांची या संदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र विरोधकांचे संख्याबळ कमी नव्हते तरीदेखील अशी प्रकरणे तेव्हा बाहेर निघाली नाहीत त्यामुळे या प्रकरणात सत्तेतील कोणी अडकत तर नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे.

पत्रकार परिषदेत काही प्रकरणांचा उल्लेख

स्वच्छतागृहांचा प्रश्न, त्यांच्या स्वच्छतेसाठी 54 लाख खर्च, त्यांना पाणीपुरवठा करायसाठी 17 लाख खर्च,260 किमी रस्ते साफ करताना 1कोटी 42 लाख,नाली साफ करण्यासाठी 1 कोटी 46 लाख खर्च,25 लाख रुपयांची फवारणी,साहित्य खरेदीसाठी 93 लाख खर्च,औषध खरेदीत 1 कोटीचा भ्रष्टाचार आदी प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी आरोप केले

चार ठिकाणी उमेदवार न देणं हीच पक्षाची भूमिका आ. राणाजगजितसिंह पाटील

त्या चार ठिकाणी भाजपचा ‘माणूस’ कोण भाजपचा छुपा पाठिंबा कोणाला? की भाजपला छुप्या पाठिंब्याची गरज?

धाराशिव – अवघ्या काही तासांनी धाराशिव शहरात मतदार आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत मात्र शहरात छुपी युती कोणाकोणाची आहे याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू असताना आ. राणाजगजितसिंह  पाटील यांच्या वक्तव्याने वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. भाजपने प्रभाग 17 आणि 18 मध्ये आपले उमेदवार दिलेले नाहीत. त्याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांना विचारले असता त्यांनी उमेदवार न देणं हीच पक्षाची भूमिका असल्याचे सांगितले. भाजपाने मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना युतीत घेतले नाही.दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. बोलणी मध्ये त्यांनी दोन्ही पक्षांना कमी जागा देण्याचे ठरवल्याने युती फिस्कटली मात्र भाजपने प्रभाग 17 आणि 18 मध्ये उमेदवार का दिले नसावेत? तिथे उमेदवार न दिल्याने त्याचा काय परिणाम होणार? दोन्ही प्रभागामध्ये मुस्लिम मतदार जास्त आहेत. तिथे छुपी मदत घेऊन नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतविभागणी करण्याची भाजपची रणनीती आहे का? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट हा पुरोगामी विचारांचा पक्ष मानला जातो त्यांना भाजपने सोबत घेऊन मुस्लिम बहुल भागात उमेदवार देता आले असते मात्र भाजपने ते केले नाही. भाजप काँग्रेसची मदत घेऊ शकत नाही. मग तिथल्या मदतीचा भाजप कुठे उपयोग करून घेणार?

भाजपसारख्या देशात सत्ता असणाऱ्या पक्षाला इथे उमेदवार का मिळाले नसतील? उमेदवारी न देण्यामागे भाजपची नेमकी रणनीती काय? भाजपचा मतदार कोणाला मतदान करणार? हाताला? घड्याळाला? पतंगाला? की तुतारी वाजवणाऱ्या माणसाला? हे मतमोजणीत समजू शकेल मात्र उमेदवारच न देण्याची रणनीती मतविभाजनासाठी आहे की काय याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

त्या दोन प्रभागात सभा घेऊ – आ. राणाजगजितसिंह पाटील

प्रभाग 17 आणि 18 मध्ये उमेदवार दिले नाहीत यावर ही ही भूमिका पक्षाची भूमिका असल्याचे आ. पाटील म्हणाले मात्र खोचक उत्तर देताना दोन प्रभागाच्या मध्यावर एखादी सभा घेऊ असे देखील म्हणाले मात्र जिथे उमेदवारच दिले नाहीत तिथे सभा कोणासाठी घेणार हा प्रश्न आहे. केवळ नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी ही सभा आयोजित केली जाईल का याबाबत शंका असून दोन्ही प्रभागात भाजप प्रचार का करत नाही? त्यांचा ‘ माणूस’ कोण हे नागरिक ओळखतील का? त्यांचा छुपा पाठिंबा किंवा त्यांना कोणाचा छुपा पाठिंबा आहे हे निकालानंतर स्पष्ट होईल.

तुतारी सोबत स्पर्धेचा प्रचार

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमची तुतारीसोबत स्पर्धा असल्याचे भाजपाचे नेते जाहीर सांगत आहेत तसा प्रचार करत आहेत मात्र राज्यात भाजपचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साडे तीन जिल्ह्यांचा पक्ष, संपलेला पक्ष असे हिणवतात हा पक्ष धाराशिव मध्ये अचानक स्पर्धक कसा झाला की यामागे कुठली छुपी रणनीती आहे हे मतमोजणी नंतर समजणार आहे.

सामाजिक वनीकरणातील अधिकाऱ्यांची ॲडव्हान्स सही लागवड..!

धाराशिव – सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीपेक्षा “कागदी लागवड” अधिक प्रभावीपणे होत असल्याचे नेहमीच ऐकायला मिळते. पण आता या विभागातील काही अधिकाऱ्यांनी तर हजेरीच भविष्यात लावून ठेवत, जणू स्वतःची ‘भविष्यवाणी क्षमता’ सिद्ध केली आहे. कार्यालयाला आणि सामाजिक वनीकरणाला खरोखरच कोणी वाली नाही, हे या प्रकारातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

धाराशिव येथील सामाजिक वनीकरण विभागात हजेरी नोंदवहीत गंभीर अनियमितता आढळल्याची माहिती मिळत आहे. विभागाच्या कार्यालयात दोन दिवसांपूर्वीच आगामी दिवसांच्या उपस्थितीच्या सह्या नोंदवलेल्या असल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले. उपस्थिती नोंद हे शासकीय कामकाजातील महत्त्वाचे दस्तऐवज मानले जातात. अशा नोंदी भविष्यात आधीच भरल्या जाणे हे नियमबाह्य असून त्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

एका कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत हजेरी पट पाहण्याची विनंती करण्यात आली असता संबंधित नोंदवही दाखवण्यात आली. त्यावेळी भविष्यातील तारखांच्या सह्या नोंद झालेल्या असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. सरकारी हजेरी नोंदी या प्रत्यक्ष उपस्थितीवर आधारित असणे बंधनकारक असताना अशा पूर्वलिखित हजेरीचे स्वरूप विभागातील नियंत्रण यंत्रणेवर मोठा प्रश्न उपस्थित करते.

या प्रकाराबाबत वरिष्ठांकडून चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी पुढे येत आहे. आवश्यक असल्यास या नोंदींची तपासणी करून प्रत्यक्ष हजेरीची खातरजमा करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यक्षेत्र मोठे असून कर्मचारी रोजच्या कामावर अवलंबून असतात. अशा स्थितीत उपस्थिती नोंदीतील अनियमितता ही गंभीर बाब मानली जात आहे. धाराशिवच्या सामाजिक वनीकरण विभागातील हजेरी नोंदवहीत भविष्यातील तारखांच्या सह्या आढळणे ही घटना गंभीर स्वरूपाची असून यामुळे विभागीय कामकाजाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सरकारी हजेरी नोंद ही प्रत्यक्ष उपस्थितीची अधिकृत नोंद असताना अशा प्रकारचे व्यवहार शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन मानले जातात. त्यामुळे या घटनेची तातडीने चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस आचारसंहिता तसेच भारतीय दंड संहितेतील लागू कलमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी स्थानिक नागरिकांची ठाम मागणी आहे.

नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुक २०२५ : तुळजापूर–धाराशिव परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त धडक कारवाई

नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकांच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तुळजापूर व धाराशिव परिसरात अवैध हातभट्टी निर्मितीविरोधात मोठी संयुक्त मोहीम राबवली. आयुक्त राजेश देशमुख, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, तसेच विभागीय उपआयुक्त (छ. संभाजीनगर) संगिता दरेकर यांच्या आदेशानुसार आणि धाराशिव अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली.

या कारवाईत निरीक्षक डी. एल. दिंडकर (तुळजापूर), दुय्यम निरीक्षक एस. पी. कांबळे, पुष्पावती वायकुळे, भरारी पथक धाराशिवचे दुय्यम निरीक्षक बी. टी. ढोकरे, तसेच तलमोड येथील सीमा तपासणी नाका प्रभारी एम. बी. जाधव यांच्या पथकांनी पळसगाव तांडा परिसरात अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर साखळी छापे टाकले.

या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत एकूण १० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तपास पथकांनी १२,१०० लिटर गुळमिश्रीत रसायन, ७३० लिटर तयार गावठी दारू, तीन मोटारसायकली व इतर साहित्य असा एकूण ६,९३,३०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

मोहीमेत दुय्यम निरीक्षक आर. के. बागवान, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर. आर. गिरी, तसेच जवान व्ही. ए. हजारे, व्ही. दहिफळे, एस. एच. नन्नवरे, ए. ए. गवंडी, टी. एच. नेर्लेकर, ए. खराडे, ए. गटकांबळे, ए. इंगळे, एस. पी. मुंजाळ, एन. डी. गरड, एस. सी. कोल्हे यांच्यासह इतर कर्मचारी तसेच वाहनचालक ए. आर. शेख व एस. बी. कलमले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या संयुक्त मोहिमेचा पुढील तपास निरीक्षक डी. एल. दिंडकर, एम. बी. जाधव आणि कु. पुष्पावती वायकुळे करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या धडक कारवाईमुळे पळसगाव तांडा परिसरातील अवैध दारूगुन्हेगारीला मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे.