Home Blog

देवकते गल्लीत खंडोबा मंदिराचे भूमीपूजन

धाराशिव : शहरातील देवकते गल्लीत लोकवर्गणीतून खंडोबा मंदिराचे बांधकाम होणार असून आज चंपाषष्ठीचा मुहूर्त साधून समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. यावेळी दामू देवकते, अशोक सोलंकर, प्रा. सोमनाथ लांडगे सर, दिनेश बंडगर, लिंबराज डुकरे, सचिन शेंडगे, बालाजी वगरे, संभाजी सलगर, महेश देवकते, अशोक देवकते,  हणमंत देवकते, वसंत देवकते, मंगेश देवकते, तानाजी देवकते, खंडू ठवरे, पिंटू देवकते, नरसिंह मेटकरी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, आकाश शेंडगे, रामेश्वर घोगरे, शिवम देवकते, गणेश देवकते, रोहन देवकते, तेजस देवकते, अतीष ठवरे, राहुल देवकते, मालोजी देवकते, सुरज देवकते, शुभम कोळेकर, शुभम पांढरे, दत्ता थोरात, शाम ठवरे, प्रमोद ठवरे, कुणाल महानवर, रवि देवकते, विष्णु वाघमोडे व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सादर मंदिराचे काम हे लोकसहभागातून  लोकवर्गणीतून लवकरात लवकर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

मतदानाला 36 तास शिल्लक असताना माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्याकडून धाराशिव नगरपालिकेत 2017 ते 2020 काळात 250 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप !

धाराशिव – धाराशिव नगरपालिकेच्या मतदानासाठी अवघे छत्तीस तास शिल्लक असताना भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पत्रकार परिषद घेत 2017 ते 2020 या काळात नगराध्यक्षांनी अडीचशे कोटींचा भ्रष्टाचार  केल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप स्थानिक लेखा परीक्षणाचा हवाला देत करण्यात आले असून स्थानिक लेखापरीक्षणात अनियमितता केल्याचा उल्लेख आहे ही अनियमित्ता आहे की भ्रष्टाचार आहे आणि त्यावर अद्याप पर्यंत कारवाई का झाली नाही याचे उत्तर भाजपकडून देण्यात आले नाही तसेच या पत्रकार परिषदेत उपस्थित युवराज नळे नगरपालिकेत गटनेते होते त्या काळात नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अशा अनियमितता झाल्याच्या चर्चा कधीच घडल्या नाहीत या प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

तत्पूर्वी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी म्हणाले की, विरोधकांकडे विकासाचा अजेंडा नाही.नगरपालिकेची निवडणूक महत्वाची, ज्याचं सरकार होतं त्यांच्याकडून जे अपेक्षित होतं ते नाही झालं.मूलभूत सोयी सुविधा कशा मिळतील याच्यावर बोलण्यापेक्षा संभ्रम निर्माण करून मत मिळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून आम्हीवचननामा जाहीर केला तो दारोदारी पोहचवण्यात काम सुरू आहे. विकासाचं व्हिजन न मांडता विरोधक टीका करत असल्याचे ते म्हणाले.

हे प्रकरण आजपर्यंत का काढले नाही?

आरोप केलेले प्रकरण जर गंभीर असेल तर हे प्रकरण आजपर्यंत का काढले गेले नाही. प्रशासकाच्या काळात राज्यात भाजपची सत्ता असताना यावर भाष्य न केले गेल्याने आरोपात तथ्य आहे की नाही याचा मागमूस लागेल की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र भाजप त्यांची सत्ता असताना देखील आजपर्यंत गप्प का हा मोठा प्रश्न आहे.

त्यावेळचे उपाध्यक्ष आता उमेदवार आणि युतीत!

शेवटच्या दोन वर्षाच्या काळात नगरपालिकेचे उपाध्यक्षपद अभय इंगळे यांच्याकडे होते या आरोपाबाबत त्यांना विचारले असता मी संख्येच्या बळावर उपाध्यक्ष होतो मला विशेष अधिकार नव्हते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच सत्तेच्या सुरुवातीच्या काळात सूरज साळुंके हे उपाध्यक्षपदी होते ते सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून त्यांच्या पक्षाने नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे त्यांची या संदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र विरोधकांचे संख्याबळ कमी नव्हते तरीदेखील अशी प्रकरणे तेव्हा बाहेर निघाली नाहीत त्यामुळे या प्रकरणात सत्तेतील कोणी अडकत तर नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे.

पत्रकार परिषदेत काही प्रकरणांचा उल्लेख

स्वच्छतागृहांचा प्रश्न, त्यांच्या स्वच्छतेसाठी 54 लाख खर्च, त्यांना पाणीपुरवठा करायसाठी 17 लाख खर्च,260 किमी रस्ते साफ करताना 1कोटी 42 लाख,नाली साफ करण्यासाठी 1 कोटी 46 लाख खर्च,25 लाख रुपयांची फवारणी,साहित्य खरेदीसाठी 93 लाख खर्च,औषध खरेदीत 1 कोटीचा भ्रष्टाचार आदी प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी आरोप केले

चार ठिकाणी उमेदवार न देणं हीच पक्षाची भूमिका आ. राणाजगजितसिंह पाटील

त्या चार ठिकाणी भाजपचा ‘माणूस’ कोण भाजपचा छुपा पाठिंबा कोणाला? की भाजपला छुप्या पाठिंब्याची गरज?

धाराशिव – अवघ्या काही तासांनी धाराशिव शहरात मतदार आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत मात्र शहरात छुपी युती कोणाकोणाची आहे याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू असताना आ. राणाजगजितसिंह  पाटील यांच्या वक्तव्याने वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. भाजपने प्रभाग 17 आणि 18 मध्ये आपले उमेदवार दिलेले नाहीत. त्याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांना विचारले असता त्यांनी उमेदवार न देणं हीच पक्षाची भूमिका असल्याचे सांगितले. भाजपाने मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना युतीत घेतले नाही.दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. बोलणी मध्ये त्यांनी दोन्ही पक्षांना कमी जागा देण्याचे ठरवल्याने युती फिस्कटली मात्र भाजपने प्रभाग 17 आणि 18 मध्ये उमेदवार का दिले नसावेत? तिथे उमेदवार न दिल्याने त्याचा काय परिणाम होणार? दोन्ही प्रभागामध्ये मुस्लिम मतदार जास्त आहेत. तिथे छुपी मदत घेऊन नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतविभागणी करण्याची भाजपची रणनीती आहे का? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट हा पुरोगामी विचारांचा पक्ष मानला जातो त्यांना भाजपने सोबत घेऊन मुस्लिम बहुल भागात उमेदवार देता आले असते मात्र भाजपने ते केले नाही. भाजप काँग्रेसची मदत घेऊ शकत नाही. मग तिथल्या मदतीचा भाजप कुठे उपयोग करून घेणार?

भाजपसारख्या देशात सत्ता असणाऱ्या पक्षाला इथे उमेदवार का मिळाले नसतील? उमेदवारी न देण्यामागे भाजपची नेमकी रणनीती काय? भाजपचा मतदार कोणाला मतदान करणार? हाताला? घड्याळाला? पतंगाला? की तुतारी वाजवणाऱ्या माणसाला? हे मतमोजणीत समजू शकेल मात्र उमेदवारच न देण्याची रणनीती मतविभाजनासाठी आहे की काय याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

त्या दोन प्रभागात सभा घेऊ – आ. राणाजगजितसिंह पाटील

प्रभाग 17 आणि 18 मध्ये उमेदवार दिले नाहीत यावर ही ही भूमिका पक्षाची भूमिका असल्याचे आ. पाटील म्हणाले मात्र खोचक उत्तर देताना दोन प्रभागाच्या मध्यावर एखादी सभा घेऊ असे देखील म्हणाले मात्र जिथे उमेदवारच दिले नाहीत तिथे सभा कोणासाठी घेणार हा प्रश्न आहे. केवळ नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी ही सभा आयोजित केली जाईल का याबाबत शंका असून दोन्ही प्रभागात भाजप प्रचार का करत नाही? त्यांचा ‘ माणूस’ कोण हे नागरिक ओळखतील का? त्यांचा छुपा पाठिंबा किंवा त्यांना कोणाचा छुपा पाठिंबा आहे हे निकालानंतर स्पष्ट होईल.

तुतारी सोबत स्पर्धेचा प्रचार

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमची तुतारीसोबत स्पर्धा असल्याचे भाजपाचे नेते जाहीर सांगत आहेत तसा प्रचार करत आहेत मात्र राज्यात भाजपचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साडे तीन जिल्ह्यांचा पक्ष, संपलेला पक्ष असे हिणवतात हा पक्ष धाराशिव मध्ये अचानक स्पर्धक कसा झाला की यामागे कुठली छुपी रणनीती आहे हे मतमोजणी नंतर समजणार आहे.

सामाजिक वनीकरणातील अधिकाऱ्यांची ॲडव्हान्स सही लागवड..!

धाराशिव – सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीपेक्षा “कागदी लागवड” अधिक प्रभावीपणे होत असल्याचे नेहमीच ऐकायला मिळते. पण आता या विभागातील काही अधिकाऱ्यांनी तर हजेरीच भविष्यात लावून ठेवत, जणू स्वतःची ‘भविष्यवाणी क्षमता’ सिद्ध केली आहे. कार्यालयाला आणि सामाजिक वनीकरणाला खरोखरच कोणी वाली नाही, हे या प्रकारातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

धाराशिव येथील सामाजिक वनीकरण विभागात हजेरी नोंदवहीत गंभीर अनियमितता आढळल्याची माहिती मिळत आहे. विभागाच्या कार्यालयात दोन दिवसांपूर्वीच आगामी दिवसांच्या उपस्थितीच्या सह्या नोंदवलेल्या असल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले. उपस्थिती नोंद हे शासकीय कामकाजातील महत्त्वाचे दस्तऐवज मानले जातात. अशा नोंदी भविष्यात आधीच भरल्या जाणे हे नियमबाह्य असून त्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

एका कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत हजेरी पट पाहण्याची विनंती करण्यात आली असता संबंधित नोंदवही दाखवण्यात आली. त्यावेळी भविष्यातील तारखांच्या सह्या नोंद झालेल्या असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. सरकारी हजेरी नोंदी या प्रत्यक्ष उपस्थितीवर आधारित असणे बंधनकारक असताना अशा पूर्वलिखित हजेरीचे स्वरूप विभागातील नियंत्रण यंत्रणेवर मोठा प्रश्न उपस्थित करते.

या प्रकाराबाबत वरिष्ठांकडून चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी पुढे येत आहे. आवश्यक असल्यास या नोंदींची तपासणी करून प्रत्यक्ष हजेरीची खातरजमा करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यक्षेत्र मोठे असून कर्मचारी रोजच्या कामावर अवलंबून असतात. अशा स्थितीत उपस्थिती नोंदीतील अनियमितता ही गंभीर बाब मानली जात आहे. धाराशिवच्या सामाजिक वनीकरण विभागातील हजेरी नोंदवहीत भविष्यातील तारखांच्या सह्या आढळणे ही घटना गंभीर स्वरूपाची असून यामुळे विभागीय कामकाजाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सरकारी हजेरी नोंद ही प्रत्यक्ष उपस्थितीची अधिकृत नोंद असताना अशा प्रकारचे व्यवहार शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन मानले जातात. त्यामुळे या घटनेची तातडीने चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस आचारसंहिता तसेच भारतीय दंड संहितेतील लागू कलमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी स्थानिक नागरिकांची ठाम मागणी आहे.

नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुक २०२५ : तुळजापूर–धाराशिव परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त धडक कारवाई

नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकांच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तुळजापूर व धाराशिव परिसरात अवैध हातभट्टी निर्मितीविरोधात मोठी संयुक्त मोहीम राबवली. आयुक्त राजेश देशमुख, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, तसेच विभागीय उपआयुक्त (छ. संभाजीनगर) संगिता दरेकर यांच्या आदेशानुसार आणि धाराशिव अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली.

या कारवाईत निरीक्षक डी. एल. दिंडकर (तुळजापूर), दुय्यम निरीक्षक एस. पी. कांबळे, पुष्पावती वायकुळे, भरारी पथक धाराशिवचे दुय्यम निरीक्षक बी. टी. ढोकरे, तसेच तलमोड येथील सीमा तपासणी नाका प्रभारी एम. बी. जाधव यांच्या पथकांनी पळसगाव तांडा परिसरात अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर साखळी छापे टाकले.

या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत एकूण १० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तपास पथकांनी १२,१०० लिटर गुळमिश्रीत रसायन, ७३० लिटर तयार गावठी दारू, तीन मोटारसायकली व इतर साहित्य असा एकूण ६,९३,३०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

मोहीमेत दुय्यम निरीक्षक आर. के. बागवान, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर. आर. गिरी, तसेच जवान व्ही. ए. हजारे, व्ही. दहिफळे, एस. एच. नन्नवरे, ए. ए. गवंडी, टी. एच. नेर्लेकर, ए. खराडे, ए. गटकांबळे, ए. इंगळे, एस. पी. मुंजाळ, एन. डी. गरड, एस. सी. कोल्हे यांच्यासह इतर कर्मचारी तसेच वाहनचालक ए. आर. शेख व एस. बी. कलमले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या संयुक्त मोहिमेचा पुढील तपास निरीक्षक डी. एल. दिंडकर, एम. बी. जाधव आणि कु. पुष्पावती वायकुळे करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या धडक कारवाईमुळे पळसगाव तांडा परिसरातील अवैध दारूगुन्हेगारीला मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे.

प्रि जीबी, पत्रकारांना मज्जाव धाराशिव नगरपालिकेचा असाही इतिहास

धाराशिव (आकाश नरोटे) – धाराशिव नगरपालिकेचा रणसंग्राम सध्या सुरू असून काही दिवसात शहराच्या प्रथम नागरिकाची निवड जनता करणार असून पूर्वी सदस्यांमधून निवडले जाणारे नगराध्यक्षपद आता थेट नागरिक निवडणार आहेत. सध्याची निवडणूक निधी स्थगिती, पायाभूत सुविधा याभोवती फिरणार असली तरी भाजपने राष्ट्रीय पॅटर्न वापरला असून देशात नरेंद्र मोदींचा चेहरा वापरून मत मागितले जाते तसे धाराशिव नगरपालिकेसाठी तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा चेहरा वापरला आहे. तर इतर पक्षांनी आपापल्या उमेदवारालाच सक्षम चेहरा म्हणून वापरले आहे.

जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यापूर्वी पाटील परिवाराची सत्ता होती त्या काळात जी व्यक्ती अध्यक्ष असायची त्याला विशेष म्हणून अधिकार नव्हते कारण जेव्हा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा व्हायची त्या सभेला वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना मध्ये येऊ दिले जात नव्हते. पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षांचा अधिकार असताना त्यांना थेट ‘भवन’ वरून ‘आदेश’ यायचे. सर्व पत्रकार नगराध्यक्षांना जेव्हा प्रवेश देण्याबाबत विचाराचे तेव्हा अध्यक्ष हात वर करून नकार द्यायचे. त्यामुळे सर्वसाधारण सभेत काय घडले हे समजत नव्हते. तसेच ही सर्वसाधारण सभा होण्यापूर्वी त्याच भवन मध्ये एक प्रि जीबी केली जायची तिथे जे विषय ठरतील तेच विषय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेतले जात असल्याचे त्यावेळचे नगरसेवक अगदी दबक्या आवाजात सांगायचे.

येत्या निवडणुकीत जनता कोणाच्या मागे राहते हे मतदानानंतर समजेल मात्र आपला सेवक निवडताना जनता तो सेवक आधीच कोणाचा सेवक आहे की नाही याची चाचपणी करणार असल्याची चर्चा आहे. पत्रकारांना सर्वसाधारण सभेत प्रवेश देणे ही तर किरकोळ बाब आहे. मत मागायला येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला नागरिकांनी पत्रकारांना प्रवेश दिला जाईल की नाही याबाबत विचारले तरच निवडणुकांना अर्थ राहणार आहे. जनतेचा सेवक रबर स्टॅम्प ठरू द्यायचा नसेल तर सद्सद्विवेक बुद्धी प्रत्येक नागरिक वापरेल याबाबत शंका नाही. महाराष्ट्रात सध्या काही ठिकाणी नगरसेवकांकडून काम करणार असल्याचे हमीपत्र घेतले जात आहे जनतेच्या तक्रारी लेखी घेणारे किंवा तक्रार असल्यास तोंडी तक्रार देण्या एवजी लेखी तक्रार करण्याची मागणी करणारे लोक प्रतिनिधी त्यांचे उमेदवार किंवा त्यांचा पक्ष कोणती कामे करणार याचे लेखी हमीपत्र देईल का? हा देखील या निवडणुकीत औत्सुक्याचा विषय राहणार आहे.

भाजपच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा महंतांच्या पत्राने टरा टरा फाटला!

कुटील राजकारणापुढे महंतांची माघार?

धाराशिव – राजकारण हे सज्जनांचे क्षेत्र नाही असे म्हणतात ते खोटे ठरवण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची असते. कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या नगरीत महंतांना कुटील राजकारणापुढे माघार घ्यावी लागली मात्र त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामुळे भाजपच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे.धर्म, संस्कृती या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भाजपने त्याच मुद्द्याचे पाईक असणाऱ्या महंतांना नगराध्यक्ष पदाचे तिकीट न दिल्याने हा बुरखा फाटला आहे. कालपर्यंत विरोधकांना शह काटशह देणाऱ्या भाजपाने थेट महंतांना उमेदवारी न देऊन आपल्याच विचारसरणीला मूठ माती दिली आहे.

महंत इच्छागिरी महाराजांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,मी महंत ईच्छागिरी, मठाधिपती सोमवार गिरी मठ, तुळजापूर श्री क्षेत्र तुळजापूरचे नाव गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत सातत्याने आहे, परंतु त्या चर्चेचे कारण शक्तीपीठ, धार्मिक, शैक्षिणक, क्रीडा, कला किंवा आध्यात्मित नसून व्यसन, अराजकता, गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि अस्वच्छ राजकारण हे होते. श्री क्षेत्र तुळजापूर ची ओळख शक्तीपीठ म्हणून आहे. तुळजापूर म्हणजे धर्म, परंपरा, मर्यादा व अध्यात्म ही आहे. पण गेल्या काही काळापासून तुळजापूरची ओळख एक दुर्दैवी आणि वाईट दिशेने वळवण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. जेव्हा समाजात अराजकता वाढते व राजसत्ता ही दिशाहीन होते, तेव्हा धर्मसतेने राजसते मध्ये हस्तक्षेप करून मार्गदर्शन करीत पुनर्स्थापना करणे आवश्यक असते.

याच भावनेतून मी, महंत योगी मावजीनाथ महाराज आणि महंत व्यंकट अरण्य महाराज यांनी या पवित्र भूमीच्या रक्षणासाठी तुळजापूर नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला.

तुळजापूर निवडणूक बद्दल महंतांचे स्पष्टीकरण

निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक नागरिक मला भेटण्यास येऊ लागले. एक मोठा लोकाग्रह सुरु झाला. त्यांचे एकंदरीत मत होते.

या पवित्र भूमीत पैशाचा जोरावर राजकारण होऊ नये. कारण जिथे अर्थकारणाच्या माध्यमातून सत्ता आणि सतेतून माध्यमातून अर्थकारण सुरू होते, तिथे विकासाचे सर्व मार्ग बंद होतात. यामुळे आम्ही शहरातील सर्व मान्यवर, ज्येष्ठ तसेच प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा केली यात विशेषतः सर्व पक्षीय नेते व पदाधिकारी ही सहभागी होते. त्याच वेळेस दोन्ही पक्ष बिनविरोध नगराध्यक्ष करण्याचे प्रस्ताव येऊ लागले.

तुळजापूर नगराध्यक्ष पद हे बिनविरोध व्हावे आणि शुद्ध मनाने प्रशासन चालावे या भावनेतून आम्ही सर्व पक्षांशी व सर्व उमेदवारांशी संवाद साधला. पण काही कारणांमुळे तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.

इच्छागिरीउमेदवारी विषयी स्पष्टीकरण

मी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या नावे एक उमेदवारी अर्ज आणि एक अपक्ष अर्ज असे दोन अर्ज भरले होते. परंतु भाजपाची उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाचा उमेदवारी अर्ज बाद झाला परंतु अपक्ष उमेदवारी अर्ज हा कायम राहिला. अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेले असता वेळेअभावी तो अर्ज मागे घेणे शक्य झाले नाही. मात्र हे मी स्पष्टपणे सांगतो मी या निवडणूक प्रक्रियेतील लढतीचा भाग नाही.

तरी तुळजापूरकरांना माझे जाहीर निवेदन आहे की कृपया इतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारापैकी योग्य व्यक्तीस आपण निवडावे व एक लक्षात ठेवावे आपण फक्त एक बटण दाबत नाही तर आपले पाच वर्षाचे भविष्य ठरवत आहोत. 100% मतदान करावे.

सदरील सर्व प्रक्रियेमध्ये आपण तुळजापूर नगरीतील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व पक्षाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.

महंत इच्छागिरी महाराज सध्या संत मार्गदर्शक समिती, विश्व हिंदू परिषद, विभाग- धाराशिव.
सदस्य श्री. पंच दशनाम जुना आखाडा, वाराणसी, उत्तर प्रदेश,मठाधिपती – सोमवारगिरी मठ, तुळजापूर,
अध्यक्ष – नारायणगिरी मठ ट्रस्ट, तुळजापूर,सचिव – श्री दुधेश्वर नाथ महादेव मंदिर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश
संरक्षक नमम फाउंडेशन, उत्तर प्रदेश,
अध्यक्ष, मठ मंदिर समन्वय समिती, विभाग – तुळजापूर
संरक्षक – अंतर राष्ट्रीय हिंदू शक्ती सेना, भारत वर्ष अशा विविध जबाबदा-या पार पाडत आहेत.

‘राणाजगजितसिंह पाटील यांचा फडणवीसांच्या खात्यावर अविश्वास ते उमेदवारीचा जावईशोध’

महंतांना उमेदवारी नाकारून ड्रग्स प्रकरणातील आरोपीला उमेदवारी, तुळजापूर नगराध्यक्षपद निवडणुकीत रंगत वाढली

धाराशिव – तुळजापूर नगराध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार बनली मात्र त्यात रंग चढवले ते सत्ताधाऱ्यांनीच. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी एक पत्र खा. सुप्रिया सुळे यांना लिहिले त्यात त्यांनी विनोद गंगणे  या व्यक्तीने ड्रग्स चे हे सगळे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. दुर्दैवाने पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच यात आरोपी बनविले असा दावा आ. पाटील यांनी केला.खरे तर पोलिसांनी विनोद गंगणेना आरोपी बनवले असे म्हणणे म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर अविश्वास दाखवण्यासारखे नाही का? विनोद गंगणे यांनी ड्रग्स सेवन केले हे कबूल केले आहे कायद्यानुसार ड्रग्स सेवन करणे हा देखील गुन्हा आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी रॅलीतील भाषणात उल्लेख करताना म्हटले की निवडणुकांच्या वेळी त्यांना महिलांनी ड्रग्स बाबत माहिती दिली मात्र प्रत्यक्षात गुन्हा फेब्रुवारी महिन्यात दाखल झाला मधल्या काळात गुन्हा का दाखल झाला नाही हा देखील अभ्यासाचा विषय आहे.
महंतांना उमेदवारी नाकारून ड्रग्स प्रकरणातील आरोपीला उमेदवारी दिली, महंतांच्या उमेदवारीसाठी नागपुरातून प्रयत्न झाला होता याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की हा जावई शोध कुणी लावला त्याला समोर आणा. महंत इच्छागिरी महाराज यांच्या उमेदवारीसाठी नागपूरच नव्हे तर दिल्ली येथून देखील प्रयत्न करण्यात आले होते त्याबाबत तुळजापूर शहरात जोरात चर्चा सुरू आहे त्याला आ. पाटील जावई शोध म्हणत असतील तर हे अजबच म्हणावे लागेल.

महंत इच्छागिरी महाराज सध्या संत मार्गदर्शक समिती, विश्व हिंदू परिषद, विभाग- धाराशिव.
सदस्य श्री. पंच दशनाम जुना आखाडा, वाराणसी, उत्तर प्रदेश,मठाधिपती – सोमवारगिरी मठ, तुळजापूर,
अध्यक्ष – नारायणगिरी मठ ट्रस्ट, तुळजापूर,सचिव – श्री दुधेश्वर नाथ महादेव मंदिर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश
संरक्षक नमम फाउंडेशन, उत्तर प्रदेश,
अध्यक्ष, मठ मंदिर समन्वय समिती, विभाग – तुळजापूर
संरक्षक – अंतर राष्ट्रीय हिंदू शक्ती सेना, भारत वर्ष अशा विविध जबाबदा-या पार पाडत आहे. वरील जबाबदाऱ्या पाहता त्यांच्यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न केले नसतील असा अन्वयार्थ काढणे चुकीचे ठरेल मात्र भाजपाच्या विचारसरणीसाठी झटणाऱ्या महंतांना उमेदवारी न देणे ही देखील शोकांतिका ठरेल.

भाजपने टेकले गुन्हेगारांसमोर गुडघे,महंतांना डावलून ड्रग्स प्रकरणातील आरोपीला भाजपाने दिली उमेदवारी!

धाराशिव (आकाश नरोटे)- संत महंत येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणतात अलीकडच्या काळात महंत, मठ प्रमुख यांना उमेदवारी देण्याचे प्रमाण वाढले आहे. बिघडलेल्या राजकारणात महंत उमेदवार असतील तर आशादायी चित्र राहील या उद्देशाने अशा उमेदवाऱ्या दिल्या जातात. संस्कृती रक्षक म्हणून स्वतःचा प्रचार करणारा भारतीय जनता पक्षाने मात्र महंतांना डावलून थेट ड्रग्स प्रकरणात आरोपी असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नगरीत नगराध्यक्षपदासाठी भाजपने विनोद गंगणे यांना अधिकृत उमेदवारी दिली मात्र ही उमेदवारी गिरिगोसावी महंत इच्छागिरी गुरुमहादेवगिरी यांना डावलून देण्यात आल्याने भाजपला राजकारण कुठे नेऊन ठेवायचे आहे याचा मेळ लागताना दिसत नाही. महंत इच्छागिरी महाराज हे मोठे प्रस्थ असून क्लीन इमेज आहे सोबत नागपूर येथून त्यांच्यासाठी आग्रह असताना विनोद गंगणे यांना उमेदवारी का दिली गेली हे न उलगडलेले कोडे आहे. तुळजापूर चे राजकारण आ. राणाजगजितसिंह पाटील पाहतात अर्थात तिथे नगराध्यक्षपदाचा उमेदवार त्यांच्याच मर्जीतला असणे स्वाभाविक होते. निधी मंजूर करून आणला म्हणून त्यांचा सत्काराचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला त्याचे आयोजक विनोद गंगणे हेच होते. त्यावेळी देखील ड्रग्स प्रकरणावरून मोठी टीका झाली होती. मात्र आता महंतांना डावलून जर भाजप उमेदवारी देत असेल तर ज्यांच्याकडे आर्थिक रसद आहे त्यांनाच उमेदवारी असा नवा पायंडा भाजप मध्ये पडत असून हे राजकारणासाठी धोकादायक आहे. गुन्हेगारांना शासन व्हावे समाज सुधारावा अशी भूमिका सत्ताधारी भाजपकडे असणे अपेक्षित होते प्रत्यक्षात मात्र भाजपने गुन्हेगारांसमोर गुडघे टेकल्याचे यानिमित्ताने चर्चिले जात आहे.

ड्रग्स प्रकरणात मुख्यमंत्र्यांची चुप्पी

तुळजापूर ड्रग्स प्रकरणात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुप्पी राखली आहे. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नगरीत ड्रग्स बाबत त्यांनी ठोस भूमिका कधीच जाहीर केली नाही. मात्र भाजपमध्ये या प्रकरणातील आरोपींचा वावर असून विनोद गंगणे यांना उमेदवारी देऊन आरोपींना गुन्हेगारांना राजाश्रय दिला जात असल्याचा आरोप आहे.

सुप्रिया सुळेंचे आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ड्रग्स प्रकरणातील आरोपींना भाजप मध्ये प्रवेश दिल्याच्या संदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले होते, दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र त्याला देखील फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही.

जिल्ह्यात नव्हे राज्यात होणार परिणाम

ड्रग्स च्या विळख्यात अडकलेली तरुणाई आणि प्रमुख राजकीय पक्ष असलेला भाजप त्या गुन्ह्यातील आरोपींना उमेदवारी देत असेल तर त्याचे पडसाद केवळ धाराशिव जिल्ह्यात होणार नसून राज्यभर त्याचा फटका भाजपच्या इमेजला बसणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

अबब… डॉक्टरांचे पथक आले तपासणी करून ट्रॅक्टरने गेले नागपूरला!

प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार बोगस बिलांच्या आजारावर आरोग्य विभाग उपचार करणार का?

धाराशिव : आरोग्य विभागातील गैरव्यवहारांवर प्रकाश टाकणारा आणि प्रशासनालाच हादरा देणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरहून NQAS (नॅशनल कॉलिटी ऍश्युरन्स स्टॅंडर्ड) तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने तपासणी पूर्ण केल्यानंतर जातेवेळी नागपूरला परत जाण्यासाठी MH 24 D 4011 या लातूर जिल्ह्यात नोंद असलेल्या ट्रॅक्टरने प्रवास केला, अशी नोंद अधिकृत बिलांमध्ये असल्याचा सनसनाटी आरोप नागरिक आकाश लहु खंडागळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.

तक्रारीनुसार उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत सत्यदेव कापसे, कोल्हापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील करूंडवाडे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र केशेगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गंगा मुधोळकर यांनी संगनमत करून तपासणी दौऱ्याच्या वाहनभाडे, निवास व भोजन या नावाखाली बनावट पावत्या सादर करून हजारो रुपयांचा अपहार केला.

विशेष म्हणजे केशेगाव–नागपूर असा शेकडो किलोमीटरचा परतीचा प्रवास ट्रॅक्टरने केला, असे रसिदीत दाखवण्यात आले असून या नोंदीवरूनच गैरव्यवहाराचा संशय आणखी दृढ झाला आहे.

ट्रॅक्टरचा MH 24 D 4011 हा नंबर लातूर जिल्ह्यातील असूनही नागपूरच्या ‘ओंकार मल्टीसर्व्हिसेस’ या परिवहनदाराकडून 6,875 रुपयांचे वाहनभाडे बिल सादर करण्यात आले.
“तपासणी करायला डॉक्टरांचे पथक आले… आणि तपासणी करून ट्रॅक्टरने नागपूरला परत गेले म्हणे! ही तर थेट जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे,” असा आरोप तक्रारदाराने केला.

तक्रारीत असेही नमूद आहे की—

  • निवास–भोजनासाठी 9,224 रुपये,
  • डॉ. कापसे यांच्या खात्यात 13,875 रुपये,
  • तर डॉ. करूंडवाडे यांच्या खात्यात 7,754 रुपये जमा झाले.

ही सर्व बिले कृत्रिमरीत्या तयार करण्यात आली असून या प्रक्रियेत डॉ. गंगा मुधोळकर यांचा सक्रिय सहभाग असल्याचा आरोप आहे.

लांबचा नागपूरचा प्रवास परतीसाठी ट्रॅक्टर दाखवणे, त्यासाठी खाजगी सेवा पुरवठादाराचे पावतीपत्र जोडणे, आणि खर्चाचे फुगवलेले आकडे — या सर्वामुळे संपूर्ण व्यवहार अत्यंत संशयास्पद असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. “हा प्रकार केवळ बनावट पावत्यांपुरता मर्यादित नसून आरोग्य विभागातील आणखी मोठ्या आर्थिक अनियमिततांची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र केशेगावचे लेखापरीक्षण करून सर्व व्यवहारांची चौकशी व्हावी,” अशी मागणीही खंडागळे यांनी केली आहे.

या गंभीर आरोपांबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एल. हरिदास यांना विचारले असता त्यांनी दैनिक जनमतशी बोलताना,
“तक्रार प्राप्त झाली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल,”
अशी अधिकृत प्रतिक्रिया दिली.

धाराशिव नगरपालिकेसाठी भाजपकडे 16 जणांनी दिल्या मुलाखती

धाराशिव – जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली असून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार कोण आहेत याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

महायुतीतील बिग ब्रदर असणाऱ्या भाजपकडून १६ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याकडे लक्ष लागले आहे.

मुलाखती दिलेल्या उमेदवार

१) नेहा राहुल काकडे

२) सुवर्णा खंडेराव चौरे

३)छाया पांडुरंग लाटे

४)शिवानी राजेंद्र परदेशी

५)राजकन्या अडसूळ पवार

६) ॲड. अंजली पांडुरंग कोरे

७) मीनाक्षी संभाजी धत्तुरे

८) वर्षा युवराज नळे

९)रुक्मिणी पिराजी मंजुळे

१०)ज्योती भोई मुंडे

११)शर्मिला संभाजी सलगर

१२) डॉ. अश्विनी चंद्रकांत मुंडे

१३) डॉ. शैलजा सुधीर कुलकर्णी

१४) पूर्वा अक्षय ढोबळे

१५) मंजुषा विशाल साखरे

१६)वंदना अमित शिंदे

महाविकास आघाडी आणि इतर पक्ष कोणते उमेदवार देतात यावरून पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.