मेंढरांच्या रिंगणाने रंगला भक्तीमय सोहळा
भूम, प्रतिनिधी – पांडुरंग… पांडुरंग हरी… अशा भक्तिरसात न्हालेल्या गजरांनी आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने भूम नगरी पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाने उजळून निघाली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे मुक्ताईनगर येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले असून, ती मजल दरमजल करत अखेर भूम शहरात आगमनास आली.
पालखीचे शहरात आगमन होताच, वातावरणात एक वेगळाच आध्यात्मिक भार जाणवू लागला. विठूनामाच्या जयघोषात, भक्तीमय अभंगगायनात व पुरुष-महिला वारकऱ्यांच्या संकीर्तनात संपूर्ण शहर दुमदुमून गेले. शहरातील विविध भागांतून फुलांची उधळण, हरिपाठ, कीर्तन, भजन व सेवाभावी स्वागत यामुळे पालखी मार्गावर भक्तीचा महासागर उसळला.
नागोबा चौकात ‘रिंगण’ सोहळा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
शहरातील नागोबा चौकात श्री संत बाळूमामा च्या मेंढराणे येथून आलेल्या संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे आगमन झाल्यावर, पारंपरिक पद्धतीने मेंढरांचे भव्य ‘रिंगण’ सादर करण्यात आले. टाळ- मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी विठूनामाचा जयघोष करत ठेका धरला, आणि उपस्थितांचे मनोबल उंचावले. भक्तिमय वातावरणात रंगलेल्या या रिंगणाने नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
फराळ, भोजन, स्वागत… भक्तांसाठी सेवाभावाचे दर्शन
जिजाऊ चौकात नागोबा तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी फराळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर पालखी साहिल उद्योग समूहाच्या हॉटेल एस पार्क समोर पोहोचली असता, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व नियोजन समिती सदस्या सौ. संयोगिता संजय गाढवे यांनी पालखीचे विधिवत पूजन करत दर्शन घेतले. यावेळी सूरज गाढवे, रामभाऊ बागडे, सुनील माळी, दत्ता नलवडे, मुशीर शेख, अण्णा जाधव, गपाट यांच्यासह ‘विकासरत्न संजय नाना गाढवे प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न.पा.च्यावतीने गौरवाचे स्वागत
पालखी सोहळा नगरपालिका चौकात पोहोचताच, भूम नगरपालिकेच्या वतीने नगर अभियंता गणेश जगदाळे, श्रीधर चव्हाण, ज्ञानेश्वर टकले, सुनील शेटे, तानाजी नाईकवाडी, सतीश कोकणे, नसीम मणियार व अन्य कर्मचाऱ्यांनी पालखीचे पूजन करून भक्तिभावाने स्वागत केले.
भोजन व्यवस्थेत गोष्टी समाजाचा सहभाग
याच परिसरातील चौंडेश्वरी मंदिराजवळ गोष्टी समाज बांधवांच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्थेचे आयोजन करण्यात आले होते. या सेवाभावी उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.
रवींद्र हायस्कूल येथे विसावा
दुपारनंतर संत मुक्ताबाई यांची पालखी शहरातील रवींद्र हायस्कूल येथे विसाव्यास थांबली. या ठिकाणी वारकऱ्यांना विश्रांतीची व धार्मिक चिंतनाची संधी मिळाली.
भाविकांच्या मनात उमलली पंढरपूरची ओढ
या संपूर्ण सोहळ्याने भूम शहरातील वारकरी भाविकांच्या मनात पंढरपूरची ओढ अधिकच बळावली. भक्ती, सेवा आणि सामूहिक सहभाग यांचे सुंदर दर्शन घडवणाऱ्या या पालखी सोहळ्याने वारकरी परंपरेचे अधोरेखित केले.
विशेष:
मेंढरांचे रिंगण, पारंपरिक फराळ, हरिपाठ आणि पालखीचा उत्सव… भूम शहराने यंदाही वारकरी परंपरेचा सन्मान राखत भाविकांना भक्तिरसात न्हाल्याचा अनुभव दिला.