Home Blog

देवकते गल्लीत खंडोबा मंदिराचे भूमीपूजन

धाराशिव : शहरातील देवकते गल्लीत लोकवर्गणीतून खंडोबा मंदिराचे बांधकाम होणार असून आज चंपाषष्ठीचा मुहूर्त साधून समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. यावेळी दामू देवकते, अशोक सोलंकर, प्रा. सोमनाथ लांडगे सर, दिनेश बंडगर, लिंबराज डुकरे, सचिन शेंडगे, बालाजी वगरे, संभाजी सलगर, महेश देवकते, अशोक देवकते,  हणमंत देवकते, वसंत देवकते, मंगेश देवकते, तानाजी देवकते, खंडू ठवरे, पिंटू देवकते, नरसिंह मेटकरी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, आकाश शेंडगे, रामेश्वर घोगरे, शिवम देवकते, गणेश देवकते, रोहन देवकते, तेजस देवकते, अतीष ठवरे, राहुल देवकते, मालोजी देवकते, सुरज देवकते, शुभम कोळेकर, शुभम पांढरे, दत्ता थोरात, शाम ठवरे, प्रमोद ठवरे, कुणाल महानवर, रवि देवकते, विष्णु वाघमोडे व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सादर मंदिराचे काम हे लोकसहभागातून  लोकवर्गणीतून लवकरात लवकर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी

खर्चाच्या मर्यादा असणार, कडक आचारसंहिता

मुंबई, दि. १३ :
राज्यातील प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांमुळे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांतील सत्तासमीकरणे ठरणार आहेत.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे.


१२ जिल्ह्यांमध्ये निवडणूक रणधुमाळी

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदांसह त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी ही सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीसाठीची अधिसूचना १६ जानेवारी २०२६ रोजी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल.


आचारसंहिता लागू; घोषणांवर निर्बंध

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घोषणा किंवा कृती करता येणार नाहीत. मात्र, नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन मदत कार्यावर आचारसंहितेची मर्यादा राहणार नाही.


प्रत्येक मतदाराला दोन मते

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकाच वेळी होत असल्याने प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत. एक मत जिल्हा परिषद सदस्यासाठी, तर दुसरे मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी दिले जाईल.


नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीनेच

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. राजकीय पक्ष व उमेदवारांच्या मागणीनुसार ही पद्धत कायम ठेवण्यात आली आहे.


जातवैधता प्रमाणपत्राबाबत स्पष्ट नियम

राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र आवश्यक असून, जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास त्यासाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर करावा लागेल. निकालानंतर सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.


२५ हजारांहून अधिक मतदान केंद्रे; पुरेशा ईव्हीएम

या निवडणुकांसाठी राज्यभरात २५,४८२ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ५१,५३७ कंट्रोल युनिट्स आणि १,१०,३२९ बॅलेट युनिट्स उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयोगाने सांगितले.


१ जुलै २०२५ची मतदार यादी ग्राह्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. दुबार नावे ओळखण्यासाठी संबंधित नोंदीजवळ (**) चिन्ह देण्यात आले आहे.


‘मताधिकार’ अ‍ॅपद्वारे माहिती

मतदारांना मतदान केंद्र, मतदार यादीतील नाव व उमेदवारांची माहिती मिळावी यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे अ‍ॅप Google Play Store वर उपलब्ध आहे.
याशिवाय mahasecvoterlist.in हे संकेतस्थळही कार्यरत आहे.


ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना विशेष सुविधा

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला व तान्ह्या बाळांसह येणाऱ्या महिलांना मतदान केंद्रांवर प्राधान्य दिले जाईल. रॅम्प, व्हीलचेअर, पाणी, वीज, सावली व शौचालय आदी सुविधा उपलब्ध असतील. महिला मतदारसंख्या अधिक असलेल्या ठिकाणी ‘पिंक मतदान केंद्रे’ उभारली जाणार आहेत.


प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी

मतदानाच्या २४ तास आधी म्हणजे ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजता जाहीर प्रचार संपेल. त्यानंतर कोणत्याही माध्यमातून जाहिरात किंवा प्रचार करता येणार नाही.
३ फेब्रुवारी रोजी रात्री १० नंतर सभा व ध्वनिक्षेपावरही बंदी राहील.


उमेदवारांसाठी खर्च मर्यादा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारांना खालीलप्रमाणे कमाल खर्च मर्यादा लागू राहणार आहे –


७१ ते ७५ निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी
जिल्हा परिषद सदस्य : ९ लाख रुपये
पंचायत समिती सदस्य : ६ लाख रुपये
६१ ते ७० निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी
जिल्हा परिषद सदस्य : ७ लाख ५० हजार रुपये
पंचायत समिती सदस्य : ५ लाख २५ हजार रुपये
५० ते ६० निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी
जिल्हा परिषद सदस्य : ६ लाख रुपये
पंचायत समिती सदस्य : ४ लाख ५० हजार रुपये
निवडणूक प्रचाराच्या काळात उमेदवारांनी या खर्च मर्यादेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून, खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे.


एक नजर आकडेवारीवर

जिल्हा परिषद

  • एकूण जागा : ७३१
  • महिलांसाठी : ३६९
  • अनुसूचित जाती : ८३
  • अनुसूचित जमाती : २५
  • नागरिकांचा मागासवर्ग : १९१

पंचायत समिती

  • एकूण जागा : १,४६२
  • महिलांसाठी : ७३१
  • अनुसूचित जाती : १६६
  • अनुसूचित जमाती : ३८
  • नागरिकांचा मागासवर्ग : ३४२

महत्वाच्या तारखा

  • अधिसूचना प्रसिद्धी : १६ जानेवारी २०२६
  • नामनिर्देशनपत्रे : १६ ते २१ जानेवारी
  • छाननी : २२ जानेवारी
  • माघार : २७ जानेवारी
  • मतदान : ५ फेब्रुवारी
  • मतमोजणी : ७ फेब्रुवारी

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

धाराशिव – भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रविण (बप्पा) घुले हे तेरखेडा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

अद्याप जिल्हा परिषद निवडणूका जाहीर झाल्या नसल्या तरी इच्छुकांकडून हालचाली सुरू झाल्या असून मोर्चेबांधणी देखील सुरू करण्यात आली आहे. तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बप्पा घुले हे इच्छुक आहेत. प्रविण घुले हे तेरखेडा जिल्हा परिषद गटात मागील ५ वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच आरोग्य अशा विविध क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत.

तेरखेडा परीसरात मोठ्या संख्येने भूमीहीन किंवा अल्पभूधारक कुटुंब आहेत ज्यांना कायम असा उत्पन्न स्त्रोत नाही. अशा जवळपास २००० व्यक्तींना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असंघटित कामगार आणि कॉर्पोरेट (CSR फंड) माध्यमातून सततचे मानधन मिळवून देण्याचा प्रविण बप्पा घुले यांचा संकल्प आहे.

सार्वजनिक सुरक्षा या अतिशय महत्त्वाच्या विषयात प्रविण (बप्पा) घुले हे मागील ५ वर्षांपासून तेरखेडा आणि परीसरात चालू असलेले विविध अवैध धंदे (अवैध दारूविक्री, मटका, सावकारी, गुंडगिरी) बंद व्हावेत यासाठीही प्रयत्नशील आहेत.

एकीकडे पवनचक्की प्रकल्प कंपन्या तेरखेडा जिल्हा परिषद गटातील सर्वपक्षीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विविध कंत्राटाच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाणीद्वारे हाताशी धरून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असताना, जनसेवक म्हणून ओळखले जाणारे प्रविण (बप्पा) घुले हे सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहेत.

नुकत्याच झालेल्या तेरखेडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत सर्व राजकीय पक्षांच्या एकजूट पॅनल विरोधात भाजपा पॅनल उभे करून एकट्याने कडवी झुंज देणाऱ्या प्रविण बप्पा घुले यांचा सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांसह त्यांच्या वरिष्ठांनीही चांगलाच धसका घेतलेल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. तसेच भाजपकडून देखील आपल्यालाच संधी मिळणार असल्याचा विश्वास प्रवीण घुले व त्यांच्या कार्यकर्त्यांना असून पक्ष नेमकी काय भूमिका घेतो हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले गजाआड

धाराशिव – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले असून, या कारवाईमुळे कळंब–केज मार्गावरील वाढत्या लुटमारीच्या घटनांना आळा बसण्यास मदत झाली आहे.

पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. यरमाळा व कळंब पोलीस ठाणे हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहन अडवून लुटमारीच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही विशेष गस्त राबविण्यात येत होती.

दरम्यान, कळंब ते केज मार्गावर कळंब शहरातील द्वारकानगरीजवळील बंद असलेल्या पेट्रोल पंपाच्या परिसरात दोन पिकअप वाहने व काही संशयित इसम थांबलेले असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाचे वाहन पाहताच काही इसम पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात येताच पोलीस अंमलदारांनी तात्काळ कारवाई करत त्यांना जागीच पकडले.

ताब्यात घेतल्यानंतर संबंधित इसमांकडे थांबण्याबाबत कारण व ओळख विचारली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे चंदर भास्कर काळे (वय ३५), सुभाष ऊर्फ हरी भास्कर काळे (वय ३७), शामसुंदर बिभीषण काळे (वय ३४, तिघे रा. कन्हेरवाडी पाटी, ता. कळंब), नवनाथ अनिल शिंदे (वय २६) व राहुल अनिल शिंदे (वय २४, दोघे रा. लक्ष्मी पारधी पिढी, तरखेडा, ता. वाशी), बालाजी माणिक काळ (वय ३९, रा. शिराढाण) आणि दत्ता हिरा पवार (वय ३४, रा. लाहटा पूर्व, ता. कळंब) अशी माहिती दिली.

सदर माहितीबाबत संशय वाटल्याने पथकाने अधिक चौकशी केली असता संबंधित आरोपींवर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी व वाहन चोरीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. संशय बळावल्याने पंचासमक्ष दोन्ही पिकअप वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. यामध्ये एक लोखंडी धारदार तलवार, एक स्टीलचा रॉड, चार मोबाईल फोन असा मुद्देमाल सापडला. पिकअप वाहनांसह एकूण १० लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस ठाणे कळंब येथे गुरनं ०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), ३१०(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अभिलेखांची पाहणी केली असता त्यांच्यावर यापूर्वीही मालमत्तेसंबंधी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन खटके यांच्यासह पोह. विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, अमोल निंबाळकर, दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, अशोक ढगारे, पुष्कर मुंगळे, चापोह महेबुब अरब व प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

ॲट्रॉसिटी अर्थसाह्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाच मागणारा समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक लाचलुचपत विभागाच्या ताब्यात

धाराशिव जिल्ह्यात समाजकल्याण विभागातील लाचमागणी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या यशस्वी कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडितास देण्यात येणाऱ्या अर्थसाह्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे ४७ वर्षीय पुरुष असून, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करून देण्यासाठी समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी २० हजार रुपये, तर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक रमेश मालू वाघमारे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४, ७ आणि ११ डिसेंबर २०२५ रोजी पडताळणी केली. या दरम्यान समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी पंचांसमक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाले नाही. मात्र, कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे यांनी ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी पंचांसमक्ष पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

तक्रारीची सत्यता निष्पन्न झाल्यानंतर ११ आणि १२ डिसेंबर २०२५ रोजी पंचांसमक्ष सापळा कारवाई राबविण्यात आली. मात्र, आरोपीस संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारण्यास नकार दिला आणि भेट घेणे टाळले. त्यानंतर आज आरोपी रमेश मालू वाघमारे यास ताब्यात घेण्यात आले. ही संपूर्ण कारवाई समाजकल्याण कार्यालय, धाराशिव येथे पार पडली.

आरोपीच्या अंगझडतीदरम्यान अंदाजे ४० हजार रुपये किमतीची होंडा अ‍ॅक्टिवा दुचाकी, सुमारे १० हजार रुपये किमतीचा वनप्लस कंपनीचा मोबाईल हँडसेट तसेच दोन पेन मिळून आले. मोबाईल हँडसेटची तपासणी सुरू असून, आवश्यकतेनुसार तो जप्त करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू आहे.

या कारवाईचे फिर्यादी सरकारतर्फे पोलीस निरीक्षक बाळासाहेब मनोहर नरवटे असून, सापळा अधिकारी म्हणून त्यांनी ही कारवाई पार पाडली. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांचे पर्यवेक्षण होते. सापळा पथकात पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्यासह विजय वगरे, पोलीस हवालदार आशिष पाटील, पोलीस अंमलदार विशाल डोके, जाकेर काझी आणि शशिकांत हजारें यांचा समावेश होता. या कारवाईस पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे तसेच अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ तक्रार करावी. भ्रष्टाचारासंबंधी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रामदास आठवले यांची जाणीवपूर्वक विनोदी प्रतिमा तयार करून आंबेडकरी चळवळीचे नुकसान वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा. सुषमा अंधारे यांची दीर्घ पोस्ट


मुंबई | प्रतिनिधी
खासदार रामदास आठवले यांची लढवय्या, संघर्षशील आणि पॅंथर चळवळीतील भूमिका झाकोळून टाकण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांची प्रतिमा ‘विनोदी शीघ्रकवी’ म्हणून उभी केली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी केला आहे.
रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या दीर्घ फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी सोशल मीडियावरील एका ठराविक वर्गावर आणि संघ–भाजपाच्या राजकीय कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवले आहे.

Damage – Hope – Practice हेच सूत्र


प्रा. अंधारे यांनी म्हटले आहे की, जसे काँग्रेसच्या गांधी–नेहरू मॉडेलला डॅमेज करून ‘७० वर्षांत काहीच झालं नाही’ असा प्रचार केला गेला, त्यानंतर ‘अच्छे दिन’चे होप दाखवून मोदींना आयकॉन म्हणून पुढे आणले गेले, तशीच कार्यपद्धती आंबेडकरी चळवळीबाबतही राबवली गेली.
“पॅंथर चळवळीतून उभे राहिलेले नामदेव ढसाळ, राजा ढाले, अर्जुन डांगळे आणि रामदास आठवले हे आयकॉन्स आधी Destroy केले गेले. अनुयायांकडूनच त्यांची खिल्ली उडवली जावी, अशी पद्धतशीर प्रक्रिया राबवण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.

आठवले यांनी अनेक लढवय्ये कार्यकर्ते घडवले


महाराष्ट्रातील अनेक लढवय्ये चेहरे उभे करण्याचे काम रामदास आठवले यांनी केले असल्याचे प्रा. अंधारे यांनी स्पष्टपणे नमूद केले. सोलापूरचे राजाबाबू सरवदे, सातारचे अशोक बापू गायकवाड, जगदीश गायकवाड, परशुराम वाडेकर, साधू कटके, चंद्रकांता सोनकांबळे यांसारखी अनेक नावे त्यांनी उदाहरणादाखल दिली.
“दुर्दैवाने आठवले साहेबांना ना स्वतःचे मार्केटिंग करता आले, ना आयटी सेल उभा करता आला,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

खैरलांजी प्रकरणानंतरचा अनुभव मांडला


खैरलांजी घटनेनंतर आपल्यावर दाखल झालेल्या अनेक खोट्या केसेसच्या संदर्भात प्रा. अंधारे यांनी वैयक्तिक अनुभवही मांडला. नामदेव ढसाळ यांच्या माध्यमातून विषय लक्षात येताच, रामदास आठवले यांनी थेट तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी चर्चा करून संरक्षण दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
“‘सुषमा चळवळीची असेट आहे, तिला संपवण्याचा डाव आम्ही सहन करणार नाही,’ हे आठवले साहेबांनी अत्यंत ठामपणे मांडले,” असे त्यांनी लिहिले.
‘जेवलास का?’ विचारणारे पॅंथर उरले नाहीत
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियासारख्या दूरवरून आलेल्या कार्यकर्त्यांना ‘जेवलास का?’ आणि ‘परतीच्या तिकिटाचे पैसे आहेत का?’ असे विचारणारे पॅंथर आता दुर्मिळ झाले असल्याचे सांगत, ही आपुलकी आठवले साहेबांना वेगळे ठरवते, असे त्यांनी नमूद केले.

भाजपसोबतच्या मैत्रीवर मतभेद, पण…


रामदास आठवले यांच्या भाजपसोबतच्या राजकीय मैत्रीबाबत मतभेद असल्याचे मान्य करतानाच, “आदर्शवादी भाषा करून विश्वासघात करणाऱ्यांपेक्षा वास्तववादी भूमिका घेणारे लोक श्रेष्ठ,” असे मत प्रा. अंधारे यांनी व्यक्त केले.
‘माणूस जिवंत असतानाच जपा’
“माणूस गेल्यावर कौतुक करण्यापेक्षा तो जिवंत असताना जपणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, या शुभेच्छांवरूनही काहींना त्रास होईल, अशी टिपण्णी करत त्यांनी टीकाकारांवर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला

परंडा आणि भूम नगरपालिकेत सत्ता स्थापन करत मारली मुसंडी

एकटा बास सोशल समाज माध्यमावर प्रतिक्रिया

धाराशिव – भूम परंडा नगरपालिकेत माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आपला गड राखला असून भूम व परंडा नगरपालिकेत अटीतटीच्या सामन्यात दोन्हीही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तानाजी सावंत यांचे निवडून आले आहेत. परंडा येथे जाकीर सौदागर हे 189 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्याचबरोबर तिथं आठ नगरसेवक शिवसेनेला मिळाले आहेत तर भूम मध्ये देखील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संयोगिता गाढवे ह्या 198 मताने निवडून आल्या असून तिथे देखील सहा नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे. तानाजी सावंत यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी ,काँग्रेस, उद्धव ठाकरे गट हे सगळेच पक्ष एकत्र आले असून त्यांनी दोन्ही ठिकाणी सावंतांच्या पॅनल विरोधात पॅनल उभा केले होते एवढेच नाही तर यावेळी आर्थिक रसद देखील जिल्ह्यातील धाराशिव च्या बड्या नेत्याने पुरवली असल्याची चर्चा रंगली होती त्यामुळे सर्वपक्षीय सावंतांच्या विरोधात एकवटल्याने या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुका रंजक झाल्या होत्या.शेवटी तानाजी सावंत यांनी विधानसभेप्रमाणेच शेवटच्या क्षणी दोन्ही साथीदाराच्या सोबत खंबीरपणे उभा राहत या पालिका आपल्या ताब्यात मिळवत सर्वपक्षीय विरोधकांना धोबीपछाड देत आपले वर्चस्व सिद्ध करत गड राखला आहे.

विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले

भूम प्रतिनिधी :- शहरातील शंकरराव पाटील महाविद्यालयासमोरील तीव्र उतार पुन्हा एकदा अपघातास कारणीभूत ठरला आहे. शनिवारी (दि. २०) सकाळी आणि दुपारी केवळ काही तासांच्या अंतराने ऊस वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पलटी झाल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही अपघातांत ट्रॅक्टरसह एका चारचाकी कारचे, दुचाकी बुलेटचे तसेच संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.
वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याचा ऊस ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. २५ ए.डब्ल्यू. ३६५२ व एम.एच. १३ बी.आर. ३१६ द्वारे महाविद्यालयाच्या रस्त्याने वाहतूक केली जात होती. सकाळी अंदाजे ११ वाजता पहिला ट्रॅक्टर उतारावरून वेगाने उतरत असताना समोर अचानक आलेल्या दुचाकीला वाचविताना चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात रस्त्यालगत असलेले अमर जमादार यांचे ‘ए. जे. मोटर्स’ दुकान आणि दुकाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचा थोडक्यात बचाव झाला.
दरम्यान, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी ऊस वाहतूक करणारा दुसरा ट्रॅक्टरही पलटी झाला. या अपघातात एका चारचाकी कारचे व बुलेटचे मोठे नुकसान झाले.
एकाच दिवशी दोन अपघात घडल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. महाविद्यालयासमोरील उतारावर गतिरोधक किंवा झेब्रा क्रॉसिंग नसल्याने वाहनांचा वेग नियंत्रणात राहत नाही आणि त्यामुळेच वारंवार अपघात होतात, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या ठिकाणी तातडीने गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग उभारावे, अशी जोरदार मागणी होत असून महाविद्यालय प्रशासनाने यासंदर्भात अनेक वेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.

पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल

धाराशिव : पेट्रोल पंपातून पाणीमिश्रित डिझेल दिल्याने वाहनाचे नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देत नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारदार मुकुंद पि. बाळासाहेब माढेकर (वय ३६, रा. रामनगर, उस्मानाबाद) यांनी उस्मानाबाद पोलीस पेट्रोल पंपाविरोधात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पाणी मिश्रित डिझेलमुळे त्यांच्या चारचाकी वाहनाचे इंजिन बंद पडले, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती खर्च करावा लागला, असा आरोप करण्यात आला होता.

२३ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री डिझेल भरल्यानंतर काही अंतरावरच गाडी बंद पडल्याचे तक्रारदाराने सांगितले. पुढील दिवशी वाहन टोईंगसाठी ४,००० रुपये, दुरुस्तीकरिता २,६९१ रुपये आणि पुढील तपासणी व अंदाजित दुरुस्तीमध्ये तब्बल १.२५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे जॉबकार्डमध्ये नमूद करण्यात आले होते. चव्हाण मोटर्स आणि सोलापूर वर्कशॉपच्या अहवालात स्पष्टपणे “पाणीमिश्रित डिझेलमुळे इंजिन नॉकिंग” असल्याचे उल्लेख आढळले.

सामनेवाले पेट्रोल पंप आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने आरोप नाकारले असले तरी, आयोगाने पुराव्यांच्या आधारे सेवा त्रुटी अंशतः सिद्ध झाल्याचे नमूद केले. इंधन पावती, अधिकृत सर्विस केंद्राचा अहवाल आणि घटनाक्रमातील सुसूत्रता लक्षात घेऊन आयोगाने तक्रारदारास नुकसानभरपाई मिळण्यास पात्र ठरवले.

या प्रकरणाची सुनावणी अध्यक्ष प्रज्ञा हेंढे आणि सदस्य वैशाली बोराडे यांनी केली. जवळपास ३ वर्षे ३ महिने ९ दिवस सुनावणी चालल्यानंतर हा निर्णायक आदेश पारित करण्यात आला.

का आहे हा निकाल महत्त्वाचा?

  • पाणीमिश्रित इंधनप्रकरणी ग्राहकाची बाजू सिद्ध होण्याचे दुर्मिळ उदाहरण
  • अधिकृत सर्व्हिस सेंटरचे जॉबकार्ड निर्णायक पुरावा
  • पेट्रोल पंपांच्या गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि इंधन वितरणातील गुणवत्ता राखण्यासाठी आयोगाचा हा निर्णय महत्वाचा ठरणार असल्याचे कायदेविषयक तज्ञांचे मत आहे.

विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ तसेच नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या अनुषंगाने १८ डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरात धडक देत तब्बल १४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाशी येथे गोवा राज्यात निर्मिती होणारी आणि केवळ तेथेच विक्रीसाठी परवानाधारक असलेली विदेशी दारू अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने सापळा रचला. या कारवाईत महिंद्रा स्कॉर्पिओ (क्रमांक MH-२५-R-३८३५) आणि महिंद्रा XUV ५०० (क्रमांक IIR-५१-AT-९४८६) अशी दोन चारचाकी वाहने तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणी तानाजी अंबऋषी लटके (रा. वाशी) आणि अविनाश नामदेव पवार (रा. वाशी) या दोघांना अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १३ लाख ८१ हजार १२० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त श्रीमती संगीता दरेकर आणि अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्र.निरीक्षक बाळकृष्ण ढोकरे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने ही मोहीम राबवली.

या कारवाईत आर. के. बागवान, ए.ए. गवंडी, टी.एच. नेर्लेकर, ए.सी. खराडे, ए.डी. गटकांबळे, संतोष कलमले, महिला जवान ऐश्वर्या इंगळे तसेच राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव आणि भुम येथील अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.

या घटनेचा पुढील तपास प्र.निरीक्षक बाळकृष्ण ढोकरे यांच्या मार्फत सुरू आहे.

भाजपची हुजरेगिरी करणे महागात पडले, खोटी माहिती पसरवल्याने अखेर तीन सोशल मिडिया पेजवर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ!

धाराशिव – निवडणूक काळात भाजपची हुजरेगिरी करणाऱ्या तीन सोशल मीडियावर पेजवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून नगरपालिका निवडणुकीत खोटी माहिती प्रसारित करून मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

नगरपालिका निवडणुकीदरम्यान पसरवण्यात आलेल्या बनावट एक्झिट पोल प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 10 दिवसानंतर धाराशिव सायबर पोलिस ठाण्यात बनावट एक्झिट पोल वायरल करणाऱ्या धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका बनावट टीव्ही चॅनलच्या नावाखाली एका उमेदवाराला विजयी दाखवणारा फेक एक्झिट पोल व्हायरल करण्यात आला होता. मतदानापूर्वी अशाप्रकारे दिशाभूल करणारे साहित्य प्रसारित करणे हे लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951, कलम 126(A) चे स्पष्ट उल्लंघन ठरते. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी ९ डिसेंबर रोजी “तात्काळ FIR करा” असा कठोर आदेश जारी केला होता. ओंकार देशमुख यांनी आदेश काढुनही गुन्हा दाखल होत नसल्याने युवासेना आक्रमक झाली होती. दरम्यान, गुन्हा दाखल झाला नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील युवा सेनेकडून देण्यात आला होता. युवा सेनेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तात्काळ धाराशिव येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, आदेश दिल्यानंतरही तब्बल नऊ दिवस कारवाई न झाल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आता सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने प्रकरणात गती येण्याची शक्यता आहे. तरीही, उशीर का झाला? आदेश असूनही FIR त्वरित नोंदवली गेली नाही, यामागे नेमके कोणाचा दबाव होता? असा प्रश्न नागरिकांमध्ये अद्यापही तीव्रतेने कायम आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू करण्यात आली असून बनावट एक्झिट पोल तयार करणारे आणि व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाने धाराशिव नगरपालिका निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपचा उमेदवार विजयी होत असल्याचा उल्लेख

कायद्याने बंदी असलेल्या बनावट आणि बोगस ओपिनियन पोल मध्ये भाजपच्या उमेदवार विजयी होत असल्याचं दाखवलं होतं एकप्रकारे भाजपची हुजरेगिरी या सोशल मीडिया ने केली होती त्याचा फटका अखेर त्या पेजला बसला आहे.

या कलमानुसार करण्यात आला गुन्हा दाखल

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 126 (A), BNS 2023-223, 337, 353, IT ACT – 66(5) या कलमान्वये धाराशिव 2.0, jlha dharashiv, All about Dharashiv वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवा सेनेच्या पाठपुराव्याला यश

दरम्यान सदर प्रकरणात, युवा सेनेचे तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी फेक एक्झिट पोल प्रकरणात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत धाराशिव चे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना स्वयंस्पष्ट अहवाल देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.