Home Blog

देवकते गल्लीत खंडोबा मंदिराचे भूमीपूजन

धाराशिव : शहरातील देवकते गल्लीत लोकवर्गणीतून खंडोबा मंदिराचे बांधकाम होणार असून आज चंपाषष्ठीचा मुहूर्त साधून समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. यावेळी दामू देवकते, अशोक सोलंकर, प्रा. सोमनाथ लांडगे सर, दिनेश बंडगर, लिंबराज डुकरे, सचिन शेंडगे, बालाजी वगरे, संभाजी सलगर, महेश देवकते, अशोक देवकते,  हणमंत देवकते, वसंत देवकते, मंगेश देवकते, तानाजी देवकते, खंडू ठवरे, पिंटू देवकते, नरसिंह मेटकरी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, आकाश शेंडगे, रामेश्वर घोगरे, शिवम देवकते, गणेश देवकते, रोहन देवकते, तेजस देवकते, अतीष ठवरे, राहुल देवकते, मालोजी देवकते, सुरज देवकते, शुभम कोळेकर, शुभम पांढरे, दत्ता थोरात, शाम ठवरे, प्रमोद ठवरे, कुणाल महानवर, रवि देवकते, विष्णु वाघमोडे व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सादर मंदिराचे काम हे लोकसहभागातून  लोकवर्गणीतून लवकरात लवकर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चार आरोपी अटकेत; ४ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त, पवनचक्की चोरीचे चार गुन्हे उघड

वाशी (राहुल शेळके) : पवनचक्कीच्या पॉइंटवरून कॉपर केबल, कॉपर रॉड, तार आदी साहित्य चोरी करणाऱ्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींकडून पवनचक्कीचे चोरीचे साहित्य आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा एकूण ४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पवनचक्की चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

दि. ७ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी अनसुर्डा शिवारातील फॉरेस्ट परिसरात पवनचक्कीच्या पॉइंटवरून चोरी करणारी टोळी दाट झाडीमध्ये थांबली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहने काही अंतरावर थांबवून पायी जात संशयितांचा शोध घेतला. पोलिसांची चाहूल लागताच काही इसम झाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून चौघांना शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांची अभिलेखावरून माहिती घेतली असता, त्यांच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्येही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पवनचक्की चोरीबाबत चौकशी केली असता, नंदू रामा शिंदे (रा. खामकरवाडी) याने खामकरवाडी येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पवनचक्कीचे चोरी केलेले साहित्य ठेवले असल्याची माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ खामकरवाडी येथे जाऊन कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार आदी साहित्य ताब्यात घेतले. या मुद्देमालाबाबत अधिक तपास केला असता, वाशी आणि येरमाळा पोलीस ठाण्यांमध्ये पवनचक्की चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

या कारवाईत अनिल नाना काळे (वय ४०, रा. मस्सा), नंदू रामा शिंदे (रा. खामकरवाडी), बबलू ऊर्फ राम शिवाजी शिंदे (वय २९, रा. खामकरवाडी) आणि शाम ऊर्फ बाबा शंकर शिंदे (वय २८, रा. खामकरवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून पवनचक्कीचे कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा एकूण ४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तो वाशी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पवनचक्की चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार आणि सपोनि सचिन खटके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.

कारवाईत पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, पोलीस नाईक बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, चापोहे महेबुब अरब, प्रकाश बोईनवाड आणि रोहित दंडनाईक यांनी सहभाग घेतला.

परंड्यात अवैध शस्त्र बाळगणारे दोन अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; मॅगजिनसह अग्निशस्त्र जप्त

परंडा (दि. ८ ऑगस्ट) : परंडा शहरासह परिसरामध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. गोपनीय बातमीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत सीना नदी पात्रातून प्रतिबंधित अग्निशस्त्र (पिस्तूल) बाळगणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यासह एका अन्य व्यक्तीविरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी परंडा पोलीस ठाण्यातील गोपनीय पथकाला माहिती मिळाली की, परंडा शहर आणि भोत्रा शिवारादरम्यान काही इसम बेकायदेशीरपणे प्रतिबंधित शस्त्र बाळगून वावरत आहेत. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने भोत्रा शिवारातील सीना नदी पात्रात सापळा रचला.

पंच व शासकीय पथकाच्या मदतीने नदी पात्रात शोध घेतला असता, तेथे दोन तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली व पंचांसमक्ष झडती घेतली. यादरम्यान एका अल्पवयीन मुलाच्या कंबरेला लोखंडी धातूचे मॅगजिन असलेले एक अग्निशस्त्र (पिस्तूल) मिळून आले. चौकशीदरम्यान हे शस्त्र सुजित पवार (रा. भोत्रा) याने आणून दिल्याची माहिती समोर आली.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

अग्निशस्त्र : लोखंडी धातूचे मॅगजिनसह एक अग्निशस्त्र, ज्याच्या ग्रिपवर प्लॅस्टिकची पट्टी असून त्यावर स्टार चिन्ह आहे. जुन्या वापरातील या अग्निशस्त्राची अंदाजे किंमत २० हजार रुपये आहे. पोलीस पथकाने पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सदर अग्निशस्त्र जप्त केले आणि त्यावर पंच व पोलिसांच्या स्वाक्षऱ्यांचे लेबल लावून बंद पाकिटात सील केले.

कायदेशीर कारवाई

जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि विनापरवाना घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन्ही अल्पवयीन मुलांसह सुजित पवार (रा. भोत्रा) यांच्यावर कलम ३, २५ भारतीय शस्त्र अधिनियम तसेच कलम १३५ मुंबई पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.

परंड्यात महावितरणचा ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी केला लक्ष्य; ६० किलो कॉपर तार आणि ऑईल चोरीला

परंडा (दि. ८ ऑगस्ट) : परंडा तालुक्यातील सोनगिरी येथील शेतशिवारात महावितरणचा डीपी (ट्रान्सफॉर्मर) पोलवरून खाली उतरवून त्यातील सुमारे ३८ हजार रुपयांचे तांबे (कॉपर तार) आणि ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) २००३च्या कलम १३६ अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परंडा येथील महावितरण कार्यालयात सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेले संकेत सुरेंद्र मगर (वय २५, रा. परंडा) यांना दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण नामदेव वेताळ (रा. सोनगिरी) यांनी फोनवरून कळविले की, शकुंतला सुरेश वेताळ यांच्या गट क्र. ३० मधील शेतात बसविलेला डीपी बंद पडला आहे.

या माहितीनंतर सहायक अभियंता संकेत मगर यांनी जनमित्र वायरमन संदीप धन्यकुमार देशमुख यांच्यासह तात्काळ सोनगिरी शिवार गाठून पाहणी केली. त्यावेळी डीपी जमिनीवर उतरवलेला असून, त्याचे झाकण उघडे असल्याचे दिसून आले. डीपीमधील आतील साहित्य आणि ऑईल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सहायक अभियंता मगर यांनी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चोरी गेलेला मुद्देमाल :

  • ६० किलो वजनाची कॉपर कॉईल (तार) : अंदाजे किंमत १८ हजार रुपये (३०० रुपये प्रति किलो)
  • २०० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑईल : अंदाजे किंमत २० हजार रुपये (१०० रुपये प्रति लिटर)

एकूण मालमत्ता नुकसान : ३८ हजार रुपये

दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेपासून ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या दरम्यान ही चोरी झाली असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

विठ्ठल दर्शनासोबत आधुनिक शेतीचे पंढरीत दर्शन (श्रीमंत सुधाकरपंत परिचारक कृषी महोत्सवाचा जय्यत तयारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन)


तुंगत (विकास सरवळे): आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असताना, शेती क्षेत्रालाही नवी दिशा देणारा श्रीमंत सुधाकरपंत परिचारक कृषी महोत्सव यंदा सलग ११ व्या वर्षी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. भक्ती आणि शेती यांचा सुंदर संगम घडविणारा हा महोत्सव शेतकरी, कृषी उद्योजक आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.



यंदाच्या कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असून, त्यांच्यासमवेत राज्यातील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या महोत्सवाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

या महोत्सवात आधुनिक शेती तंत्रज्ञान, अत्याधुनिक कृषी अवजारे, सिंचन पद्धती, सेंद्रिय शेती, फळबाग व्यवस्थापन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कृषी प्रक्रिया उद्योग, ड्रोन तंत्रज्ञान, कृषी यांत्रिकीकरण तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

विशेष म्हणजे, आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात आलेल्या लाखो शेतकरी वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनासोबत शेतीविषयक आधुनिक ज्ञान मिळावे, नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि शेती अधिक समृद्ध करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कृषी महोत्सवात नामांकित कंपन्यांचे स्टॉल, बियाणे, खते, कृषी यंत्रसामग्री, ठिबक सिंचन, शेतीपूरक उद्योग, बचत गट, कृषी स्टार्टअप्स तसेच कृषी संशोधन संस्थांचे माहिती केंद्र उभारण्यात आले असून शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रातील यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव, प्रात्यक्षिके आणि विविध विषयांवरील मार्गदर्शनपर व्याख्यानेही आयोजित करण्यात आली आहेत.

गेल्या दहा वर्षांत हजारो शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवाचा लाभ घेतला असून, अनेकांनी आधुनिक शेतीचा स्वीकार करून उत्पादनात वाढ आणि आर्थिक प्रगती साधली आहे. त्यामुळे यंदाच्या ११ व्या कृषी महोत्सवाबाबतही शेतकरी वर्गामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आषाढी यात्रेच्या धार्मिक वातावरणात “भक्तीबरोबरच प्रगत शेतीची वाटचाल” हा संदेश देणारा श्रीमंत सुधाकरपंत परिचारक कृषी महोत्सव शेतकरी आणि वारकरी यांच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

पि.एम.श्री.जि.प.कें.प्रा.पारा शाळेतील पोषण आहारात अळ्या आढळल्याचा पालकांचा आरोप; अन्न व औषध पथकाकडून अन्नधान्याची तपासणी


वाशी ( प्रतिनिधी राहुल शेळके): धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा येथील पि.एम.श्री.जि.प .कें.प्रा. शाळेतील 301 विद्यार्थ्यांना शनिवारी, दि. १८ जुलै रोजी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात आळ्या आढळल्याचा आरोप पालकांनी केला आहे.या घटनेनंतर पालकांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) कडे तक्रार दाखल केली होती .
सदरील तक्रारीची तात्काळ दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे धाराशिव चे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने शनिवारी रात्री उशिरापर्यंत शाळेतील पोषण आहार, वापरलेले धान्य व इतर संबंधित साहित्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत . खराब मालाची पथकाने खड्डा करून त्याच ठिकाणी विल्हेवाट लावली आहे .
शनिवारी मुलांनी घरी आणलेला भाताचा डब्बा उघडून बघितला असता त्यात टाकलेल्या सोयाबीन वड्या मध्ये आळ्या निघाल्याची माहिती पालकांनी शाळेला दिली. सदरील सोयाबीन वड्या बाहेरून चांगल्या दिसत असल्या तरी त्या फोडून बघितल्या तर आत मध्ये अळ्या दिसत आहेत.तरी संबंधित पुरवठादार, आहार तयार करणारी यंत्रणा आणि जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी होणार खेळ थांबवावा अशी मागणी पालकांनी केली आहे .
दरम्यान, वाशीचे गटशिक्षणाधिकारी सोमनाथ घोलप यांनी सांगितले की, तालुक्यातील सर्व शाळांना मुदत संपलेले अन्नपदार्थ तपासून शिजवण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. शालेय पोषण आहार तयार करताना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अन्न व औषध प्रशासनाने नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. या घटनेमुळे परिसरात शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

१३ वर्षांची प्रतीक्षा संपली; तासगाव बायपास रस्ता भूसंपादनाला अखेर गती

आ. रोहित पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ₹१०,९६,४२,८०५ रुपयांच्या भूसंपादन भरपाईच्या धनादेशांचे वाटप


तासगाव 🙁 प्रतिनिधी/राहुल कांबळे )
तासगाव शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा आणि तब्बल १३ वर्षांपासून विविध प्रशासकीय कारणांमुळे रखडलेला तासगाव बायपास रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आ. रोहित पाटील यांनी शासन व संबंधित विभागांकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत माजी आमदार सुमनताई आर. आर. पाटील यांच्या हस्ते ₹१०,९६,४२,८०५ (दहा कोटी शहाण्णव लाख बेचाळीस हजार आठशे पाच रुपये) इतक्या रकमेच्या भूसंपादन भरपाईच्या धनादेशांचे संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या भूसंपादन प्रक्रियेमुळे संबंधित शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत होते. अखेर शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर धनादेशांचे वितरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आ. रोहित पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

तासगाव शहरातील वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता बायपास रस्ता ही शहराची अत्यावश्यक गरज बनली होती. मात्र भूसंपादनाचा प्रश्न निकाली न निघाल्यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामाला वारंवार अडथळे येत होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. रोहित पाटील यांनी महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेऊन निधी मंजूर करण्यासाठी आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने आता बायपास रस्त्याच्या कामाला वेग मिळणार आहे. बायपास पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातून होणारी जड वाहतूक बाहेरील मार्गाने वळवल्यामुळे तासगावच्या नियोजनबद्ध विकासालाही चालना मिळणार आहे.

भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा व्हावी, यासाठीही आ. रोहित पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच तब्बल १३ वर्षांपासून रखडलेला भूसंपादनाचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून बायपास प्रकल्प प्रत्यक्ष मार्गावर आला आहे.

तासगावच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, बायपास प्रकल्पामुळे भविष्यात शहराच्या वाहतूक, व्यापार, उद्योग आणि एकूणच विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने नूतन एमआयडीसीत  ₹1100 कोटींची गुंतवणूक होणार – आम.रोहीत पाटील



तासगांव एम.आय.डी.सी.त जपान व अमेरिका गुंतवणुकी संदर्भात स्वरासे पत्र मुख्यमंत्र्यांनी दिला ग्रीन सिग्नल



तासगाव प्रतिनिधी

मातीला अंतर देऊ नका,माती तुम्हाला अंतर देणार नाही,हे स्वर्गीय लोकनेते,माजी गृहमंत्री आर.आर. आबा पाटील यांचे शब्द आजही तासगाव-
कवठेमहांकाळच्या मातीला नवी दिशा देत आहेत.आबांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजी आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील व विद्यमान आमदार आमदार रोहितदादांनी केलेल्या अथक प्रयत्नांतून आज एमआयडीसीच्या पर्यावरणपूरक आणि आर्थिक विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल पडले.

मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’, ₹1,100 कोटींची गुंतवणूक निश्चित 
माजी आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील व आमदार रोहित आर. आर.पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन एमआयडीसी संदर्भात सविस्तर मांडणी केली. मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीला संपूर्ण पाठबळाची ग्वाही देत ‘ग्रीन सिग्नल’दिला.या बैठकीचे सर्वात मोठे फलित म्हणजे दोन बलाढ्य कंपन्यांनी सुमारे ₹1,100 कोटींच्या गुंतवणुकीची स्वारस्य पत्रे सादर केली आहेत.

या बैठकीस डॉ.पारीख (इंडो-अमेरिका चेंबर्स ऑफ कॉमर्स) व श्री. पुराणिक (जपान इकॉनॉमिक्स अँड ट्रेड कमिटी) यांचे डेलिगेशन्स विशेष उपस्थित होते.’लोकांची एमआयडीसी’आता थेट जगाशी जोडली जाणार आहे.अमेरिका व जपान येथे महाराष्ट्रातील डेलिगेशन्स घेऊन तासगाव MIDC चे प्रेझेंटेशन्स करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आबांच्या स्वप्नासाठी गेली अनेक वर्षे आम्ही लढतोय,आज त्या प्रयत्नांना यश येताना पाहून उर अभिमानाने भरून येतो,अशी भावना आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केली.

आबांचा साधेपणा, रोहितदादांची गरुड भरारी
स्वर्गीय आर.आर.आबा पाटील यांची लोकमानसातली विचारसरणी आजही दिशादर्शक आहे.कधी पदाचा बडेजाव नाही,कधी अहंकार नाही.शेतकरी,वंचित, भूमिहीन यांच्या बांधावर,झोपडीत जाऊन त्यांनी जनतेची सुख-दुःखे जाणून घेतली.हाच साधेपणाचा,जनसेवेचा कित्ता आमदार रोहित पाटील तंतोतंत चालवत आहेत.

लहान वयात मोठी झेप : बेरोजगारीवर थेट घाव
वयाने लहान असूनही कामाच्या बाबतीत आमदार रोहित पाटील गरुड भरारी घेत आहेत. मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम मिळावे,या एकमेव उद्देशाने आबांनी एमआयडीसीसाठी अथक प्रयत्न केले. तोच ध्यास उराशी बाळगून रोहितदादा आज मिशन एमआयडीसी’यशस्वी करत आहेत.वरिष्ठ पातळीवरूनही त्यांना खंबीर पाठबळ मिळत असल्याने मतदारसंघातील बेरोजगारीवर आता थेट घाव बसणार आहे.

जनतेतून प्रचंड पाठबळ : आमचा दादा,कामाचा दादा
आबांच्या पश्चातही पाटील घराण्यावर जनतेने तेवढाच विश्वास ठेवला.रोहितदादांच्या कामाची पद्धत, लोकांमध्ये मिसळणे, प्रश्न सोडवण्याची तळमळ यामुळे जनतेतून त्यांना भरपूर पाठबळ मिळत आहे. आमचा दादा,कामाचा दादा अशी भावना आज तरुणाईतून व्यक्त होत आहे.ही केवळ एमआयडीसी नाही,तर ‘आबांचं स्वप्न आणि रोहितदादांचा संकल्प’ आहे. स्थानिक हातांना जागतिक स्वप्नांची जोड मिळणार आहे.

शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार

कामती, दि. २२ : शेतीच्या वादातून कामती खुर्द येथील लमाण तांड्यावर चुलत्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २२) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पती संजीवकुमार शिंदे यांच्या नावे असलेल्या १२ एकर जमिनीपैकी सहा एकर जमीन परस्पर विकल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून सुरेखा सतीश शिंदे, रणजीत सतीश शिंदे आणि रितेश सतीश शिंदे यांनी संगनमत करून संजीवकुमार शिंदे यांची हत्या केल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे.
तक्रारीनुसार, सुरेखा शिंदे हिने प्रथम मयताच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर रणजीत शिंदे व रितेश शिंदे यांनी त्यांच्या ताब्यातील तलवारीने हात, गळा आणि डोक्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात संजीवकुमार शिंदे यांचा मृत्यू झाला.
फिर्यादीने आरोपींनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे करीत असून आरोपींच्या शोधासाठी कामती पोलीस ठाण्याची चार तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.

आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित

८ कोटींचा निधी मंजूर; नुकसानभरपाई वाटपाचा मार्ग मोकळा

तासगाव प्रतिनिधी

गेल्या १८-१९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिजामाता चौक (भिलवडी नाका) ते विटा रोड बायपास रस्त्यासाठी भूसंपादन झालेल्या जमिनींची नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाची मंगळवारी आमदार रोहित पाटील यांच्या ठोस आश्वासनानंतर सांगता झाली.

सन २०२३ च्या अर्थसंकल्पात या बायपास रस्त्यासाठी ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. रस्त्यासाठी ४५ गटांचा सर्व्हे पूर्ण झाला असून सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणे बाकी आहे. त्यापैकी १७ गटांतील शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नोव्हेंबर २०२५ मध्येच केली होती. मात्र निधीअभावी नुकसानभरपाईचे वितरण रखडले होते.

शेतकऱ्यांच्या वारंवार पाठपुराव्यानंतरही निधी उपलब्ध होत नसल्याने ८ जूनपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलनस्थळी माजी आमदार सुमनताई आर. आर. पाटील यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित कागदपत्रांसह संपूर्ण माहिती आमदार रोहित पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.

यानंतर आमदार रोहित पाटील यांनी मंत्रालयात तातडीने पाठपुरावा करत ०३/०४ हेडअंतर्गत सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. याबाबतची माहिती त्यांनी प्रशासनाला दूरध्वनीवरून दिली. तसेच निधी वर्ग झाल्यानंतर त्यावरील बीडीएस लॉक हटविण्यासाठीही त्यांनी दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला. त्यामुळे निधी वितरणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

अधीक्षक अभियंता बुरूड आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या गुरुवारपर्यंत काही शेतकऱ्यांच्या डीडी तयार करण्याचे, तसेच पुढील आठवड्यात उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.

दरम्यान, आमदार रोहित पाटील व प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे शेतकऱ्यांनी सध्या धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्यक्ष नुकसानभरपाई वाटपावर लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन


धाराशिव, प्रतिनिधी : शिधापत्रिका तसेच पुरवठा विभागाशी संबंधित सर्व सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही एजंट, दलाल किंवा मध्यस्थांकडे कागदपत्रे देऊ नयेत, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र शासनाने १६ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार केशरी, पिवळी व शुभ्र रंगाच्या पुस्तकी शिधापत्रिका बंद करून त्याऐवजी डिजिटल ऑनलाईन शिधापत्रिका प्रणाली लागू केली आहे. यानुसार AAY, PHH, APL Farmer, NPH आणि APL White या प्रकारच्या शिधापत्रिका नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
पुरवठा विभागातील सर्व कामकाज महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात असून शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नवीन नाव समाविष्ट करणे, नवीन शिधापत्रिका मिळविणे, शिधापत्रिकेची दुय्यम प्रत काढणे तसेच इतर विविध सेवा नागरिकांना घरबसल्या उपलब्ध आहेत.
यासाठी नागरिकांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतः अर्ज सादर करावा. आवश्यक शुल्कही शासनाच्या GRAS प्रणालीद्वारे थेट भरता येते. NPH शिधापत्रिकेसाठी ५० रुपये तर APL White शिधापत्रिकेसाठी १०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तसेच विविध शासकीय प्रमाणपत्रे व योजनांसाठी शासनाने निश्चित केलेले शुल्कच भरावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण असल्यास शासनमान्य सुविधा केंद्रांची मदत घेता येईल. मात्र कोणत्याही अनधिकृत एजंट किंवा दलालांकडे कागदपत्रे देऊन आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे.
नायब तहसीलदार सामाजिक सहाय्य योजना श्री. एम. जी. शिंदे, नायब तहसीलदार महसूल-२ तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती विशाखा बलकवडे आणि तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी नागरिकांना सतर्क राहून सर्व सेवा अधिकृत माध्यमातूनच घेण्याचे आवाहन केले आहे.