Home Blog

देवकते गल्लीत खंडोबा मंदिराचे भूमीपूजन

धाराशिव : शहरातील देवकते गल्लीत लोकवर्गणीतून खंडोबा मंदिराचे बांधकाम होणार असून आज चंपाषष्ठीचा मुहूर्त साधून समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. यावेळी दामू देवकते, अशोक सोलंकर, प्रा. सोमनाथ लांडगे सर, दिनेश बंडगर, लिंबराज डुकरे, सचिन शेंडगे, बालाजी वगरे, संभाजी सलगर, महेश देवकते, अशोक देवकते,  हणमंत देवकते, वसंत देवकते, मंगेश देवकते, तानाजी देवकते, खंडू ठवरे, पिंटू देवकते, नरसिंह मेटकरी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, आकाश शेंडगे, रामेश्वर घोगरे, शिवम देवकते, गणेश देवकते, रोहन देवकते, तेजस देवकते, अतीष ठवरे, राहुल देवकते, मालोजी देवकते, सुरज देवकते, शुभम कोळेकर, शुभम पांढरे, दत्ता थोरात, शाम ठवरे, प्रमोद ठवरे, कुणाल महानवर, रवि देवकते, विष्णु वाघमोडे व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सादर मंदिराचे काम हे लोकसहभागातून  लोकवर्गणीतून लवकरात लवकर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

महिला मुख्याधिकारी यांना त्रास देण्याचे काम विरोधकांचे, शहरातील पाणी पुरवठा सुरळीत – जाकीर सौदागर

परंडा – भजनदास गुडे (दि. ५ एप्रिल) महिला मुख्याधिकाऱ्यांना त्रास देण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे, असा आरोप नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी केला. मागील काही दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्या अनुशंगाने रविवारी दि. ५ एप्रिल रोजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका केली.

मुख्याधिकारी यांनी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना कॅबिन न दिल्याने ते महिला मुख्याधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप नगराध्यक्ष सौदागर यांनी केला. तर बहुमतात असलेल्या विरोधकांकडे पाणी पुरवठा सभापतीपद आहे. त्यामुळे शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याला विरोधक जबाबदार आहेत. मुख्याधिकारी फोन उचलत नाहीत, दोन महिने पालिकेत आल्या नसल्याचा आरोप तथ्यहीन आहे, असे सौदागर यांनी सांगितले. ऐनवेळी विद्युत पंप नादुरुस्त झाला, त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही भागात निर्माण झाला होता. मात्र सध्या शहरात कुठेही पाणीटंचाई नसल्याचे नगराध्यक्ष सौदागर यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेवक वाजीद दखनी, बच्चन गायकवाड, माजी नगरसेवक संजय घाडगे, वैभव पवार, रत्नकांत शिंदे, दिलीप रणभोर, जावेद पठाण, शरीफ तांबोळी, मदन दीक्षित, इरफान शेख, सनी राशनकर, रवि भिस्ते, सुनील जगताप, दिपक कडबने, समीर पठाण, राहुल बनसोडे, बालाजी खताळ, अफताब शहाबर्फीलीवाले, जयंत शिंदे, खयुम तुटके, स्वप्निल तळकेर, तन्नु मुजावर, फैसल पठाण आदी उपस्थित होते.

येरमाळा यात्रेत मंगळसूत्र चोरी करणारे तिघे जेरबंद

धाराशिव, दि. 3 एप्रिल – येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी यात्रेत महिला भाविकांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 1 लाख 31 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यात्रेतील गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत आमराई परिसरातील मंदिराजवळ दोन महिला व एक पुरुष संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन संशयितांवर नजर ठेवली असता ते गर्दीत चोरीचा प्रयत्न करताना आढळून आले.

पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन येरमाळा पोलीस ठाण्यात चौकशी केली असता त्यांनी आपली नावे अनिल शेषेराव शिंदे (वय 34), सुनिता अनिल शिंदे (वय 29) आणि हिराबाई रमेश शिंदे (वय 40, सर्व रा. इंदिरानगर पाथरी, जि. परभणी) अशी सांगितली.

अंगझडतीदरम्यान अनिल शिंदे याच्या खिशातून चार वेगवेगळे सोन्याचे मनी मंगळसूत्र आढळून आले. चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, यात्रेत अंघोळीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून ते अनिल शिंदे याच्याकडे जमा केले जात होते.

जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 1 लाख 31 हजार रुपये असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके तसेच पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली.

परंडा-सोनारी रोडवर भीषण अपघात; आयशर टेम्पोच्या धडकेत कुक्कडगावचा मोटारसायकलस्वार जागीच ठार

परंडा (दि. २८ मार्च) : परंडा-सोनारी रोडवरील खानापूर पाटीजवळ शनिवार, दि. २८ मार्च रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आयशर टेम्पो आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या धडकेत दुचाकीस्वार आश्रुबा मांडवे (रा. कुक्कडगाव, ता. परंडा) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. धडक इतकी जोरात होती की मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, या घटनेमुळे कुक्कडगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आश्रुबा मांडवे हे आपल्या मोटारसायकल (क्र. MH25 BC 9079) वरून एकटेच परंड्याकडे येत होते. दुपारी २:२० च्या सुमारास ते खानापूर पाटीजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. संबंधित टेम्पोचे मालक गोविंद वाघ (रा. राळेसांगवी, ता. भूम) हे परंड्याकडून नान्नजजवळ कलिंगड भरण्यासाठी जात होते.

अपघाताची भीषणता इतकी होती की समोरासमोर झालेल्या या धडकेत दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. धडक बसल्यानंतर मांडवे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

पोलिसांची कारवाई : घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे आणि क्षीरसागर यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. अपघातास कारणीभूत ठरलेला आयशर टेम्पो आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ईट नगरीत कडाडणार शड्डूचा आवाज! खोपेश्वर महादेवाच्या पावन भूमीत रंगणार कुस्तीचा महासंग्राम

ईट ( सोमेश्वर स्वामी )
बलोपासनेचा दैदिप्यमान वारसा आणि लाल मातीचा अस्सल रांगडेपणा जोपासणाऱ्या भूम तालुक्यातील ईट नगरीत, कुस्तीचा महाकुंभ भरला जाणार आहे. जागृत देवस्थान श्री खोपेश्वर महादेव यांच्या वार्षिक यात्रेचे औचित्य साधून, मंगळवार, दि. ३१ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता पी एम श्री जिल्हा परिषद प्रशालेच्या विस्तीर्ण मैदानावर ‘जंगी निकाली कुस्त्यांचा आखाडा’ रंगणार आहे.
या स्पर्धेसाठी मानाची चांदीची गदा अन् लाखांची ईनामे! बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेली आहेत .
या होत असलेल्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात महाराष्ट्रातील दिग्गज मल्ल आपले बाहुबळ पणाला लावणार आहेत. “ईट येथील या भव्य कुस्ती मैदानात पैलवानांसाठी भरघोस बक्षिसांची लयलूट करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानाचे बक्षीस माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ भोरे यांच्या वतीने ७१ हजार रुपये रोख आणि चांदीची गदा देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पुणे येथील लहुजी सेना कार्याध्यक्ष गणेश थोरात यांच्या वतीने ६१ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस भुम पंचायत समीती सदस्य बाळासाहेब खरवडे यांच्या वतीने ५१ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच चौथ्या क्रमांकासाठी डॉ. मनोज सासवडे यांच्याकडून ४० हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकासाठी पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक उमेश पानसरे यांच्या वतीने २१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सोबतच ११ हजार रुपयांची बक्षिसे सुनील देशमुख ,गणेश दीक्षित ,अशोक लिमकर , बालाजी हुंबे ,रमेश भोसले , ज्ञानेश्वर डोके ,उमेश सोन्ने , सयाजीराजे हुंबे यांनी दिली आहेत . ५००० हजारांसह अनेक  बक्षिसेही या मैदानाचे आकर्षण असणार आहेत.”
कुस्ती शौकिनांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा थरार आपल्या पहाडी आवाजात गुंफण्यासाठी प्रसिद्ध कुस्ती निवेदक युवराज सोलंकर उपस्थित राहणार आहेत.
या भव्य दिव्य आयोजनासाठी सयाजीराजे हुंबे, विनोद वाडकर, अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ईट ग्रामस्थ आणि कुस्ती कमिटी अहोरात्र परिश्रम घेत आहे. पंच कमिटी आणि वस्ताद मंडळींच्या देखरेखीखाली होणाऱ्या या ‘निकाली’ कुस्त्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त खोटे? अनंत कुंभार यांचा ‘नोटीस चुकून’ आल्याचा अजब दावा

उत्तरपत्रिका तपासणी गैरहजेरी प्रकरणाने घेतले वेगळे वळण


धाराशिव : सेवा प्रवेशोत्तर परीक्षा-2024 च्या उत्तरपत्रिका तपासणी कामास गैरहजेरी लावल्याच्या कारणावरून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून काढण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस आता वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी “ती नोटीस चुकून आली” असा दावा केल्याने प्रशासनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाने 2 मार्च 2026 रोजी आदेश काढून 6 व 7 मार्च रोजी उत्तरपत्रिका तपासणीचे काम आयोजित केले होते. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अनुपस्थित राहिल्याचा ठपका ठेवत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, वरिष्ठांचे आदेश न पाळल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 चा भंग झाला आहे. तसेच अनुपस्थितीबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी, “या प्रकरणाची माहिती आम्हाला वृत्तपत्रातून मिळाली आहे. सदर बाब विभागीय आयुक्त स्तरावर असल्याने पुढील आदेश आल्यानंतरच कारवाई करण्यात येईल,” अशी भूमिका मांडली.

मात्र, या संपूर्ण प्रकरणात अनंत कुंभार यांनी दिलेला खुलासा लक्षवेधी ठरला आहे. “सदर नोटीस चुकून पाठविण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले आहे. मला उपस्थित राहण्याचे कोणतेही आदेश नव्हते,” असे त्यांनी म्हटले आहे.

यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने काढलेली अधिकृत नोटीस चुकीची ठरते का? की संबंधित अधिकाऱ्यांना आदेशच देण्यात आले नव्हते? अशा परस्परविरोधी दाव्यांमुळे प्रशासनातील समन्वय आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सदर प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अधिकृत स्पष्टीकरण येणे गरजेचे असून, या वादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या हॉटेलवर तहसील प्रशासनाची कारवाई, गुन्हा दाखल

धाराशिव : शहरातील हॉटेल मध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर होत असल्याचा प्रकार तहसील कार्यालयाच्या दक्षता पथकाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन व्यावसायिकांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार १८ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी नायब तहसिलदार विशाखा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शहरातील विविध ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबवली. यावेळी डीआयसी रोडवरील पवार वडापाव मिसळ सेंटर तसेच काकडे प्लॉट येथील संजय राठोड यांच्या हॉटेल तेजप्रताप टी पॉईंट येथे तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान दोन्ही ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले. पवार वडापाव मिसळ सेंटर व हॉटेल तेजप्रताप येथून प्रत्येकी दोन असे एकूण चार सिलेंडर जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या सिलेंडरची एकूण किंमत सुमारे ३७१६ रुपये असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय, पॅराडाईज हॉटेलमध्ये तपासणी केली असता तेथे व्यावसायिक वापराचा अधिकृत सिलेंडर आढळून आला. त्यामुळे त्या ठिकाणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
जप्त केलेले सिलेंडर आनंद नगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून, प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाखा बलकवडे यांनी संबंधित व्यावसायिकांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून अशा प्रकारच्या गैरवापरावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला असून, व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाजप नेते धनंजय सावंत यांच्या गाडीला अपघात

सोलापूर–पुणे महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली असून, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची कार एका भरधाव कंटेनरला धडकली. अपघात अत्यंत भीषण असतानाही सावंत सुखरूप बचावले, तर चालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंत हे बुधवारी मुंबई येथे झालेल्या भाजप प्रवेश सोहळ्यानंतर आपल्या फॉर्च्युनर (MH 12 SE 5559) वाहनाने परंड्याकडे परतत होते. गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भिगवणजवळील डाळज २ गावाच्या हद्दीत त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या कंटेनरने (MH 12 WJ 6374) जोरदार धडक दिली.
या अपघाताची तीव्रता इतकी होती की फॉर्च्युनर गाडीचा चालक बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. मात्र, सुदैवाने सावंत यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातात चालक आणि सुरक्षारक्षक जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, सावंत हे महाराष्ट्राचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे असून, त्यांच्या सुरक्षिततेमुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.

आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळाचे वाटप

परंडा (दि१५मार्च)माजी आरोग्य मंत्री तथा परंडा,भुम,वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना,युवासेनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून माजीआमदार,मंत्री प्रा.डॉ.सावंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
      या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख परंडा  आण्णासाहेब जाधव,डॉ.अबरार पठाण, मा.सरपंच अशोक गरड,संजय गांधी निराधार समिती सदस्य गुलाब शिंदे,कल्याण दबडे,शिवसेना सोशल मिडिया परंडा तालुका प्रमुख शहाजी ढोरे, दत्ता करळे,राजाभाऊ शिंदे,महाविर नरुटे, सुर्यभान नरुटे,पांडुरंग पवार,अनिल पवार, महाविर नरुटे,विष्णू गरड,युवराज गरड, आप्पा जगताप यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाला बदनाम करणाऱ्या उपोषणकर्त्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देश

धाराशिव :
मौजे कसबे तडवळे (ता. धाराशिव) येथील गट क्रमांक ५४२ या जमिनीच्या वारसा फेरफार प्रकरणावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देणारे सुभाष मुरलीधर कदम यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. मृणाल जाधव यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक, ढोकी यांना याबाबत पत्र पाठवून आवश्यक ती कारवाई करून अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मौजे कसबे तडवळे येथील गट क्रमांक ५४२ या जमिनीचे मूळ खातेदार मुरलीधर जगनाथ कदम यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नोंद करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला होता. अर्जासोबत न्यायालयाने दिलेले वारस प्रमाणपत्रही जोडण्यात आले होते. त्यानुसार १ जुलै २०२५ रोजी वारसा रजिस्टर (६ क) मध्ये ठराव क्रमांक ५०२ अंतर्गत नोंद घेण्यात आली. त्यानंतर २२ जुलै २०२५ रोजी सदर नोंद प्रमाणित करण्यात आली आणि त्यावरून वारसा फेरफार क्रमांक ९६८९ तयार करण्यात आला.

सदर फेरफार प्रक्रियेदरम्यान सर्व संबंधित हितसंबंधितांना नमुना ९ ची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर सुभाष मुरलीधर कदम यांनी फेरफार क्रमांक ९६८९ मंजूर करू नये, अशी हरकत अर्जाद्वारे नोंदवली. हा अर्ज विवादग्रस्त प्रकरणांच्या नोंदवही (६ अ) मध्ये नोंदवून पुढील सुनावणीसाठी मंडळ अधिकारी, ढोकी यांच्याकडे वर्ग करण्यात आला.

मंडळ अधिकाऱ्यांनी अर्जदार व आक्षेप अर्जदार या दोन्ही बाजूंना वाजवी मुदत देऊन त्यांचे लेखी तसेच तोंडी म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर न्यायालयाच्या वारस प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित वारसा फेरफार क्रमांक ९६८९ मंजूर करण्यात आला असल्याचे प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सुभाष मुरलीधर कदम यांनी फेरफार मंजूर झाल्यानंतर हा फेरफार चुकीचा असून त्यामध्ये त्यांचे नाव जाणूनबुजून वगळण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयाची व स्वतःची दिशाभूल झाल्याचा दावा करत त्यांनी ९ मार्च २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे सादर केला होता.

मात्र प्रशासनाच्या अहवालानुसार वारसा रजिस्टर (६ क) ठराव क्रमांक ५०२ तसेच वारसा फेरफार क्रमांक ९६८९ या दोन्ही नोंदींमध्ये सुभाष मुरलीधर कदम यांचे नाव अनुक्रमांक ८ वर नमूद आहे. तसेच संबंधित जमिनीच्या खात्यात त्यांचे नाव यापूर्वीपासूनच असल्याने संगणकीकृत ७/१२ उताऱ्यावर ते नाव पुन्हा दुबार दाखविले जात नाही. त्यामुळे त्यांचे नाव वगळण्यात आलेले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय संबंधित व्यक्ती वारंवार कोणतेही कारण देऊन उपोषणास बसण्याची भूमिका घेत प्रशासनावर दबाव आणत असल्याचा आरोपही अहवालात करण्यात आला आहे. प्रशासनाने समुपदेशन करून कायद्यातील तरतुदी समजावून सांगितल्या असतानाही ते ऐकत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. वारंवार उपोषणाची पत्रे देऊन प्रशासनाला मानसिक त्रास दिला जात असून त्यामुळे दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

तसेच बॅनर लावून आणि विविध डिजिटल माध्यमांना मुलाखती देऊन प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नाहक बदनामी केल्याचाही आरोप प्रशासनाने केला आहे. या पार्श्वभूमीवर केवळ प्रशासनाला त्रास देणे आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने उपोषणाची घोषणा करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या सर्व बाबींचा विचार करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुभाष मुरलीधर कदम यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना सहाय्यक पोलिस निरीक्षक, ढोकी यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या कारवाईबाबतचा अनुपालन अहवाल तहसीलदार कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भूम-परंडा-वाशी पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा, आ. तानाजी सावंत यांचे वर्चस्व अबाधित

धाराशिव : भूम, परंडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यांच्या पंचायत समित्यांवरील सभापती-उपसभापती निवडीत आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तिन्ही पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकला असून सभापतीपदी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत.

या निवडीत आमदार सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी सह इतर पक्ष, तसेच इतर पक्षांनी एकत्रित आव्हान दिले होते. मात्र तिन्ही तालुक्यांत सावंत गटाने आपले स्पष्ट वर्चस्व राखत पंचायत समित्यांवर सत्ता मिळवली.

परंडा पंचायत समितीच्या सभापतीपदी अर्चना जाधव यांची तर उपसभापतीपदी परसु गवारे यांची निवड झाली. भूम पंचायत समितीत झालेल्या चुरशीच्या निवडीत सभापतीपदी पूजा ढगे यांची निवड झाली असून उपसभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे रण बागुल विजयी झाले. वाशी पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रणिता गायकवाड तर उपसभापतीपदी नितीन रणदिवे यांची निवड झाली.

सभापती-उपसभापती निवडीनंतर तिन्ही तालुक्यांत शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. गुलाल उधळत व फटाके फोडत कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष व्यक्त केला. या निकालामुळे आमदार सावंत यांची मतदारसंघातील राजकीय पकड पुन्हा अधोरेखित झाली आहे.