Home Blog

देवकते गल्लीत खंडोबा मंदिराचे भूमीपूजन

धाराशिव : शहरातील देवकते गल्लीत लोकवर्गणीतून खंडोबा मंदिराचे बांधकाम होणार असून आज चंपाषष्ठीचा मुहूर्त साधून समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. यावेळी दामू देवकते, अशोक सोलंकर, प्रा. सोमनाथ लांडगे सर, दिनेश बंडगर, लिंबराज डुकरे, सचिन शेंडगे, बालाजी वगरे, संभाजी सलगर, महेश देवकते, अशोक देवकते,  हणमंत देवकते, वसंत देवकते, मंगेश देवकते, तानाजी देवकते, खंडू ठवरे, पिंटू देवकते, नरसिंह मेटकरी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, आकाश शेंडगे, रामेश्वर घोगरे, शिवम देवकते, गणेश देवकते, रोहन देवकते, तेजस देवकते, अतीष ठवरे, राहुल देवकते, मालोजी देवकते, सुरज देवकते, शुभम कोळेकर, शुभम पांढरे, दत्ता थोरात, शाम ठवरे, प्रमोद ठवरे, कुणाल महानवर, रवि देवकते, विष्णु वाघमोडे व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सादर मंदिराचे काम हे लोकसहभागातून  लोकवर्गणीतून लवकरात लवकर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून माल लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक

सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून माल लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख २८ हजार ६५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी ट्रक चालक रामजी शोभनाथ यादव हे सोलापूर–धुळे महामार्गावरून कंटेनरमधून नवीन टायर वाहतूक करत असताना तेरखेडा परिसरातील लक्ष्मी पारधी पिढी जवळ त्यांच्या कंटेनरमधील टायरची चोरी करण्यात आली होती. या घटनेमुळे महामार्गावरील मालवाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, श्री. विनोद इज्जपवार यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.

त्या अनुषंगाने दि. २१ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गुप्त माहिती मिळाली की अनिल मच्छींद्र पवार (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) याने त्याच्या साथीदारांसह हायवेवरील कंटेनरमधून नवीन टायरची चोरी केली असून, ते टायर तसेच चोरीच्या मोटारसायकली लक्ष्मी पारधी पिढीच्या पाठीमागील जंगल परिसरात लपवून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आरोपी तेरखेडा गावात येणार असून त्याच्याकडील मोटारसायकलही चोरीची असल्याची माहिती मिळाली.

पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली असता संशयित इसम पथकास पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमालाही अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी आपली नावे अनिल मच्छींद्र पवार (वय ३४, रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) आणि नाना तानाजी शिंदे (वय २७, रा. भिकारसारोळा, ता. जि. धाराशिव) अशी सांगितली.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी इतर दोन साथीदारांसह मिळून हायवेवरून जाणाऱ्या कंटेनरमधून नवीन टायरची चोरी केल्याची तसेच पानगाव परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. याशिवाय वाशी, बेंबळी, येरमाळा आणि भादा पोलीस ठाणे हद्दीतून मोटारसायकली चोरून त्या लक्ष्मी पारधी पिढीच्या पाठीमागील जंगल परिसरात लपवून ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावरून पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन झडती घेतली असता २९ नवीन टायर, ४ चोरीच्या मोटारसायकली, गुन्ह्यातील रोख रक्कम तसेच गुन्हा करताना वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण ८,२८,६५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटक, पोलीस हवालदार नितीन जाधवर, बबन जाधवर, चापो. महबुब अरब आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे महामार्गावरील चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या पुरस्कार वितरणात राजकारण;निकष पूर्ण न करणाऱ्यांचा गौरव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून गेल्या आठवड्यात विभागांतर्गत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मात्र या पुरस्कार वितरणात ठरवून दिलेले निकष डावलून राजकीय हस्तक्षेप झाल्याची जोरदार चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. पात्रतेऐवजी जवळीक आणि ओळखीच्या आधारे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कर्मचाऱ्याने आवश्यक असलेली PRE परीक्षा उत्तीर्ण न करता देखील त्याला पुरस्कार देण्यात आला. तसेच किमान दहा वर्षांची सेवा ही मूलभूत अट असताना, केवळ दोन वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याचाही गौरव करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासकीय पुरस्कार हे सार्वजनिक सन्मानाचे प्रतीक असताना त्यांचे वाटप खाजगी मालमत्तेप्रमाणे केले जात असल्याची कुजबूज कर्मचारी वर्गात आहे.

जिल्हा परिषद स्तरावरील या पुरस्कारांसाठी शासनाने स्पष्ट आणि कठोर निकष निश्चित केले आहेत. त्यामध्ये किमान दहा वर्षांची सेवा, मागील पाच वर्षांचे अतिउत्कृष्ट किंवा उत्कृष्ट गोपनीय अहवाल, सचोटी व चारित्र्य, कोणतीही विभागीय चौकशी अथवा न्यायालयीन प्रकरण नसणे, कामातील दखलपात्र कार्यक्षमता, प्रशासकीय कौशल्य, संगणकीकरणातील योगदान, शासकीय खर्चात बचत व महसूलवाढीसाठी केलेले प्रयत्न, तसेच शासन व जिल्हा परिषदेची प्रतिमा उंचावण्यासाठी दिलेले योगदान यांचा समावेश आहे.

याशिवाय लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर वेळेत केलेली कार्यवाही, नस्ती व्यवस्थापन, निर्णय प्रक्रियेसाठी दिलेले सहकार्य, नाविन्यपूर्ण कल्पनांचा अविष्कार, दर्जेदार व निःपक्षपाती कामाची पद्धत आणि कार्यसंस्कृती रुजविण्यासाठी केलेले प्रयत्न या बाबींचाही पुरस्कारासाठी विचार होणे अपेक्षित आहे.

मात्र प्रत्यक्षात या सर्व निकषांकडे दुर्लक्ष करून काही निवडक व्यक्तींनाच लाभ मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व विभागीय व शासनस्तरीय समित्यांकडून निवड झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे शासन स्तरावर एकत्रितरीत्या जाहीर करण्याची प्रक्रिया कितपत पारदर्शक राहिली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मात्र सध्याच्या पुरस्कार वितरणावरून पारदर्शकता, न्याय आणि गुणवत्तेला डावलून राजकारणच हावी झाले असल्याची भावना व्यक्त होत असून, याबाबत चौकशीची मागणीही कर्मचारी वर्तुळातून जोर धरू लागली आहे.

पारगावात अवैध वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश हॉटेल पृथ्वीराज लॉजवर छापा; दोन पीडित मुलींची सुटका

वाशी (राहुल शेळके): धाराशिव जिल्ह्यातील
पोलीस स्टेशन वाशी हद्दीतील पारगाव येथील पृथ्वीराज हॉटेल व लॉज येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर वाशी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाशी तालुक्यातील पारगाव येथील हॉटेल पृथ्वीराज बियर बार च्या वरच्या मजल्यावर लॉज सुरू आहे.या ठिकाणी सदरील लॉज मालक अवैध वेश्या व्यवसाय करत आहेत.अशी खात्रीलायक माहिती मिळताच दि.19 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 8.30 वाजता करण्यात आलेल्या छापा कारवाईत दोन पीडित मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली असून हॉटेल मालक श्रीपती उत्तमराव घुले , कामगार महादेव विष्णू काळे, आणि 4 संबंधित ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, धाराशिव श्रीमती रितु खोखर मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना मॅडम तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल चोरमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
ही कारवाई वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे, अंमलदार बळीराम यादव, विठ्ठल मलंगनेर, नसीर सय्यद, गोपीनाथ पवार, शिवा कोरडे तसेच महिला पोलीस अंमलदार श्रीमती ज्योती बहीरवाल यांच्या पथकाने नियोजनबद्ध छापा टाकून कारवाई केली. छाप्यादरम्यान देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तात्काळ पीडित मुलींना मुक्त करण्यात आले.
सुटका करण्यात आलेल्या मुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांचे समुपदेशन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोपींविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांना मोठा धक्का बसला असून मानवी तस्करी व देहविक्रीविरोधात पोलिस प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

राजकीय राजधानीत गावगाडा विरुद्ध राजवाडा रंगत रंगणार,  इंजिनियर विरुद्ध इंजिनियर उभारणार

धाराशिव जिल्ह्याची राजकीय राजधानी असणाऱ्या तेर मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत रंगत येणार असून गावगाडा विरुद्ध राजवाडा अशी ही लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सक्षणा सलगर यांनी या नावाची चर्चा आहे दोघीही उच्चशिक्षित असून इंजिनीयर विरुद्ध इंजिनियर अशी तर लढत असणार आहे मात्र यापेक्षा गावगाडा विरुद्ध राजवाडा अशी ही निवडणूक होईल असा अंदाज वर्तवला जात आहे सक्षणा सलगर यांना अद्याप तिकीट मिळाल्याचे जाहीर झाले नसले तरी त्यांचे समर्थक त्यांना तेरमधून तिकीट मिळेल अशी आशा व्यक्त करत आहेत.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला या पदासाठी आरक्षित असल्याने अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली जाईल असे बोलले जात आहे मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे तसेच त्यांचे पती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही विधानसभा निवडणूक लढवली आहे घराणेशही चा विरोध करणारा भारतीय जनता पक्ष पुन्हा पाटील परिवारामध्ये उमेदवारी देईल का हे पाहणे औत्सुक्याचे असले तरी अर्चना पाटील समर्थकांकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल असे बोलले जात आहे.

गावगाडा विरुद्ध राजवाडा रंगत!

सक्षणा सलगर या सामान्य घरातून राजकारणात आलेले आहेत तर अर्चना पाटील ह्या डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या सून असून त्यांच्या घराण्याची जिल्ह्यावर सत्ता राहिलेली आहे. ऐतिहासिक भूमी असलेले तेर विकासाच्या दृष्टीने मागासलेले असल्याने विकासाचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा ठरणार आहे.

महाविकास आघाडी मजबूत?

तेर जिल्हा परिषद गटामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने तेर मध्ये महाविकास आघाडी मजबूत असल्याचे चित्र आहे. येत्या निवडणुकीत चित्र कसे असेल हे मतदार ठरवतील.

राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी

खर्चाच्या मर्यादा असणार, कडक आचारसंहिता

मुंबई, दि. १३ :
राज्यातील प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांमुळे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांतील सत्तासमीकरणे ठरणार आहेत.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे.


१२ जिल्ह्यांमध्ये निवडणूक रणधुमाळी

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदांसह त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी ही सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीसाठीची अधिसूचना १६ जानेवारी २०२६ रोजी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल.


आचारसंहिता लागू; घोषणांवर निर्बंध

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घोषणा किंवा कृती करता येणार नाहीत. मात्र, नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन मदत कार्यावर आचारसंहितेची मर्यादा राहणार नाही.


प्रत्येक मतदाराला दोन मते

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकाच वेळी होत असल्याने प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत. एक मत जिल्हा परिषद सदस्यासाठी, तर दुसरे मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी दिले जाईल.


नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीनेच

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. राजकीय पक्ष व उमेदवारांच्या मागणीनुसार ही पद्धत कायम ठेवण्यात आली आहे.


जातवैधता प्रमाणपत्राबाबत स्पष्ट नियम

राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र आवश्यक असून, जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास त्यासाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर करावा लागेल. निकालानंतर सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.


२५ हजारांहून अधिक मतदान केंद्रे; पुरेशा ईव्हीएम

या निवडणुकांसाठी राज्यभरात २५,४८२ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ५१,५३७ कंट्रोल युनिट्स आणि १,१०,३२९ बॅलेट युनिट्स उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयोगाने सांगितले.


१ जुलै २०२५ची मतदार यादी ग्राह्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. दुबार नावे ओळखण्यासाठी संबंधित नोंदीजवळ (**) चिन्ह देण्यात आले आहे.


‘मताधिकार’ अ‍ॅपद्वारे माहिती

मतदारांना मतदान केंद्र, मतदार यादीतील नाव व उमेदवारांची माहिती मिळावी यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे अ‍ॅप Google Play Store वर उपलब्ध आहे.
याशिवाय mahasecvoterlist.in हे संकेतस्थळही कार्यरत आहे.


ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना विशेष सुविधा

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला व तान्ह्या बाळांसह येणाऱ्या महिलांना मतदान केंद्रांवर प्राधान्य दिले जाईल. रॅम्प, व्हीलचेअर, पाणी, वीज, सावली व शौचालय आदी सुविधा उपलब्ध असतील. महिला मतदारसंख्या अधिक असलेल्या ठिकाणी ‘पिंक मतदान केंद्रे’ उभारली जाणार आहेत.


प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी

मतदानाच्या २४ तास आधी म्हणजे ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजता जाहीर प्रचार संपेल. त्यानंतर कोणत्याही माध्यमातून जाहिरात किंवा प्रचार करता येणार नाही.
३ फेब्रुवारी रोजी रात्री १० नंतर सभा व ध्वनिक्षेपावरही बंदी राहील.


उमेदवारांसाठी खर्च मर्यादा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारांना खालीलप्रमाणे कमाल खर्च मर्यादा लागू राहणार आहे –


७१ ते ७५ निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी
जिल्हा परिषद सदस्य : ९ लाख रुपये
पंचायत समिती सदस्य : ६ लाख रुपये
६१ ते ७० निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी
जिल्हा परिषद सदस्य : ७ लाख ५० हजार रुपये
पंचायत समिती सदस्य : ५ लाख २५ हजार रुपये
५० ते ६० निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी
जिल्हा परिषद सदस्य : ६ लाख रुपये
पंचायत समिती सदस्य : ४ लाख ५० हजार रुपये
निवडणूक प्रचाराच्या काळात उमेदवारांनी या खर्च मर्यादेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून, खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे.


एक नजर आकडेवारीवर

जिल्हा परिषद

  • एकूण जागा : ७३१
  • महिलांसाठी : ३६९
  • अनुसूचित जाती : ८३
  • अनुसूचित जमाती : २५
  • नागरिकांचा मागासवर्ग : १९१

पंचायत समिती

  • एकूण जागा : १,४६२
  • महिलांसाठी : ७३१
  • अनुसूचित जाती : १६६
  • अनुसूचित जमाती : ३८
  • नागरिकांचा मागासवर्ग : ३४२

महत्वाच्या तारखा

  • अधिसूचना प्रसिद्धी : १६ जानेवारी २०२६
  • नामनिर्देशनपत्रे : १६ ते २१ जानेवारी
  • छाननी : २२ जानेवारी
  • माघार : २७ जानेवारी
  • मतदान : ५ फेब्रुवारी
  • मतमोजणी : ७ फेब्रुवारी

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

धाराशिव – भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रविण (बप्पा) घुले हे तेरखेडा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

अद्याप जिल्हा परिषद निवडणूका जाहीर झाल्या नसल्या तरी इच्छुकांकडून हालचाली सुरू झाल्या असून मोर्चेबांधणी देखील सुरू करण्यात आली आहे. तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बप्पा घुले हे इच्छुक आहेत. प्रविण घुले हे तेरखेडा जिल्हा परिषद गटात मागील ५ वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच आरोग्य अशा विविध क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत.

तेरखेडा परीसरात मोठ्या संख्येने भूमीहीन किंवा अल्पभूधारक कुटुंब आहेत ज्यांना कायम असा उत्पन्न स्त्रोत नाही. अशा जवळपास २००० व्यक्तींना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असंघटित कामगार आणि कॉर्पोरेट (CSR फंड) माध्यमातून सततचे मानधन मिळवून देण्याचा प्रविण बप्पा घुले यांचा संकल्प आहे.

सार्वजनिक सुरक्षा या अतिशय महत्त्वाच्या विषयात प्रविण (बप्पा) घुले हे मागील ५ वर्षांपासून तेरखेडा आणि परीसरात चालू असलेले विविध अवैध धंदे (अवैध दारूविक्री, मटका, सावकारी, गुंडगिरी) बंद व्हावेत यासाठीही प्रयत्नशील आहेत.

एकीकडे पवनचक्की प्रकल्प कंपन्या तेरखेडा जिल्हा परिषद गटातील सर्वपक्षीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विविध कंत्राटाच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाणीद्वारे हाताशी धरून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असताना, जनसेवक म्हणून ओळखले जाणारे प्रविण (बप्पा) घुले हे सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहेत.

नुकत्याच झालेल्या तेरखेडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत सर्व राजकीय पक्षांच्या एकजूट पॅनल विरोधात भाजपा पॅनल उभे करून एकट्याने कडवी झुंज देणाऱ्या प्रविण बप्पा घुले यांचा सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांसह त्यांच्या वरिष्ठांनीही चांगलाच धसका घेतलेल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. तसेच भाजपकडून देखील आपल्यालाच संधी मिळणार असल्याचा विश्वास प्रवीण घुले व त्यांच्या कार्यकर्त्यांना असून पक्ष नेमकी काय भूमिका घेतो हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले गजाआड

धाराशिव – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले असून, या कारवाईमुळे कळंब–केज मार्गावरील वाढत्या लुटमारीच्या घटनांना आळा बसण्यास मदत झाली आहे.

पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. यरमाळा व कळंब पोलीस ठाणे हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहन अडवून लुटमारीच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही विशेष गस्त राबविण्यात येत होती.

दरम्यान, कळंब ते केज मार्गावर कळंब शहरातील द्वारकानगरीजवळील बंद असलेल्या पेट्रोल पंपाच्या परिसरात दोन पिकअप वाहने व काही संशयित इसम थांबलेले असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाचे वाहन पाहताच काही इसम पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात येताच पोलीस अंमलदारांनी तात्काळ कारवाई करत त्यांना जागीच पकडले.

ताब्यात घेतल्यानंतर संबंधित इसमांकडे थांबण्याबाबत कारण व ओळख विचारली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे चंदर भास्कर काळे (वय ३५), सुभाष ऊर्फ हरी भास्कर काळे (वय ३७), शामसुंदर बिभीषण काळे (वय ३४, तिघे रा. कन्हेरवाडी पाटी, ता. कळंब), नवनाथ अनिल शिंदे (वय २६) व राहुल अनिल शिंदे (वय २४, दोघे रा. लक्ष्मी पारधी पिढी, तरखेडा, ता. वाशी), बालाजी माणिक काळ (वय ३९, रा. शिराढाण) आणि दत्ता हिरा पवार (वय ३४, रा. लाहटा पूर्व, ता. कळंब) अशी माहिती दिली.

सदर माहितीबाबत संशय वाटल्याने पथकाने अधिक चौकशी केली असता संबंधित आरोपींवर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी व वाहन चोरीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. संशय बळावल्याने पंचासमक्ष दोन्ही पिकअप वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. यामध्ये एक लोखंडी धारदार तलवार, एक स्टीलचा रॉड, चार मोबाईल फोन असा मुद्देमाल सापडला. पिकअप वाहनांसह एकूण १० लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस ठाणे कळंब येथे गुरनं ०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), ३१०(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अभिलेखांची पाहणी केली असता त्यांच्यावर यापूर्वीही मालमत्तेसंबंधी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन खटके यांच्यासह पोह. विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, अमोल निंबाळकर, दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, अशोक ढगारे, पुष्कर मुंगळे, चापोह महेबुब अरब व प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

ॲट्रॉसिटी अर्थसाह्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाच मागणारा समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक लाचलुचपत विभागाच्या ताब्यात

धाराशिव जिल्ह्यात समाजकल्याण विभागातील लाचमागणी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या यशस्वी कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडितास देण्यात येणाऱ्या अर्थसाह्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे ४७ वर्षीय पुरुष असून, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करून देण्यासाठी समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी २० हजार रुपये, तर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक रमेश मालू वाघमारे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४, ७ आणि ११ डिसेंबर २०२५ रोजी पडताळणी केली. या दरम्यान समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी पंचांसमक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाले नाही. मात्र, कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे यांनी ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी पंचांसमक्ष पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

तक्रारीची सत्यता निष्पन्न झाल्यानंतर ११ आणि १२ डिसेंबर २०२५ रोजी पंचांसमक्ष सापळा कारवाई राबविण्यात आली. मात्र, आरोपीस संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारण्यास नकार दिला आणि भेट घेणे टाळले. त्यानंतर आज आरोपी रमेश मालू वाघमारे यास ताब्यात घेण्यात आले. ही संपूर्ण कारवाई समाजकल्याण कार्यालय, धाराशिव येथे पार पडली.

आरोपीच्या अंगझडतीदरम्यान अंदाजे ४० हजार रुपये किमतीची होंडा अ‍ॅक्टिवा दुचाकी, सुमारे १० हजार रुपये किमतीचा वनप्लस कंपनीचा मोबाईल हँडसेट तसेच दोन पेन मिळून आले. मोबाईल हँडसेटची तपासणी सुरू असून, आवश्यकतेनुसार तो जप्त करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू आहे.

या कारवाईचे फिर्यादी सरकारतर्फे पोलीस निरीक्षक बाळासाहेब मनोहर नरवटे असून, सापळा अधिकारी म्हणून त्यांनी ही कारवाई पार पाडली. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांचे पर्यवेक्षण होते. सापळा पथकात पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्यासह विजय वगरे, पोलीस हवालदार आशिष पाटील, पोलीस अंमलदार विशाल डोके, जाकेर काझी आणि शशिकांत हजारें यांचा समावेश होता. या कारवाईस पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे तसेच अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ तक्रार करावी. भ्रष्टाचारासंबंधी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रामदास आठवले यांची जाणीवपूर्वक विनोदी प्रतिमा तयार करून आंबेडकरी चळवळीचे नुकसान वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा. सुषमा अंधारे यांची दीर्घ पोस्ट


मुंबई | प्रतिनिधी
खासदार रामदास आठवले यांची लढवय्या, संघर्षशील आणि पॅंथर चळवळीतील भूमिका झाकोळून टाकण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांची प्रतिमा ‘विनोदी शीघ्रकवी’ म्हणून उभी केली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी केला आहे.
रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या दीर्घ फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी सोशल मीडियावरील एका ठराविक वर्गावर आणि संघ–भाजपाच्या राजकीय कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवले आहे.

Damage – Hope – Practice हेच सूत्र


प्रा. अंधारे यांनी म्हटले आहे की, जसे काँग्रेसच्या गांधी–नेहरू मॉडेलला डॅमेज करून ‘७० वर्षांत काहीच झालं नाही’ असा प्रचार केला गेला, त्यानंतर ‘अच्छे दिन’चे होप दाखवून मोदींना आयकॉन म्हणून पुढे आणले गेले, तशीच कार्यपद्धती आंबेडकरी चळवळीबाबतही राबवली गेली.
“पॅंथर चळवळीतून उभे राहिलेले नामदेव ढसाळ, राजा ढाले, अर्जुन डांगळे आणि रामदास आठवले हे आयकॉन्स आधी Destroy केले गेले. अनुयायांकडूनच त्यांची खिल्ली उडवली जावी, अशी पद्धतशीर प्रक्रिया राबवण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.

आठवले यांनी अनेक लढवय्ये कार्यकर्ते घडवले


महाराष्ट्रातील अनेक लढवय्ये चेहरे उभे करण्याचे काम रामदास आठवले यांनी केले असल्याचे प्रा. अंधारे यांनी स्पष्टपणे नमूद केले. सोलापूरचे राजाबाबू सरवदे, सातारचे अशोक बापू गायकवाड, जगदीश गायकवाड, परशुराम वाडेकर, साधू कटके, चंद्रकांता सोनकांबळे यांसारखी अनेक नावे त्यांनी उदाहरणादाखल दिली.
“दुर्दैवाने आठवले साहेबांना ना स्वतःचे मार्केटिंग करता आले, ना आयटी सेल उभा करता आला,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

खैरलांजी प्रकरणानंतरचा अनुभव मांडला


खैरलांजी घटनेनंतर आपल्यावर दाखल झालेल्या अनेक खोट्या केसेसच्या संदर्भात प्रा. अंधारे यांनी वैयक्तिक अनुभवही मांडला. नामदेव ढसाळ यांच्या माध्यमातून विषय लक्षात येताच, रामदास आठवले यांनी थेट तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी चर्चा करून संरक्षण दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
“‘सुषमा चळवळीची असेट आहे, तिला संपवण्याचा डाव आम्ही सहन करणार नाही,’ हे आठवले साहेबांनी अत्यंत ठामपणे मांडले,” असे त्यांनी लिहिले.
‘जेवलास का?’ विचारणारे पॅंथर उरले नाहीत
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियासारख्या दूरवरून आलेल्या कार्यकर्त्यांना ‘जेवलास का?’ आणि ‘परतीच्या तिकिटाचे पैसे आहेत का?’ असे विचारणारे पॅंथर आता दुर्मिळ झाले असल्याचे सांगत, ही आपुलकी आठवले साहेबांना वेगळे ठरवते, असे त्यांनी नमूद केले.

भाजपसोबतच्या मैत्रीवर मतभेद, पण…


रामदास आठवले यांच्या भाजपसोबतच्या राजकीय मैत्रीबाबत मतभेद असल्याचे मान्य करतानाच, “आदर्शवादी भाषा करून विश्वासघात करणाऱ्यांपेक्षा वास्तववादी भूमिका घेणारे लोक श्रेष्ठ,” असे मत प्रा. अंधारे यांनी व्यक्त केले.
‘माणूस जिवंत असतानाच जपा’
“माणूस गेल्यावर कौतुक करण्यापेक्षा तो जिवंत असताना जपणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, या शुभेच्छांवरूनही काहींना त्रास होईल, अशी टिपण्णी करत त्यांनी टीकाकारांवर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला

परंडा आणि भूम नगरपालिकेत सत्ता स्थापन करत मारली मुसंडी

एकटा बास सोशल समाज माध्यमावर प्रतिक्रिया

धाराशिव – भूम परंडा नगरपालिकेत माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आपला गड राखला असून भूम व परंडा नगरपालिकेत अटीतटीच्या सामन्यात दोन्हीही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तानाजी सावंत यांचे निवडून आले आहेत. परंडा येथे जाकीर सौदागर हे 189 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्याचबरोबर तिथं आठ नगरसेवक शिवसेनेला मिळाले आहेत तर भूम मध्ये देखील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संयोगिता गाढवे ह्या 198 मताने निवडून आल्या असून तिथे देखील सहा नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे. तानाजी सावंत यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी ,काँग्रेस, उद्धव ठाकरे गट हे सगळेच पक्ष एकत्र आले असून त्यांनी दोन्ही ठिकाणी सावंतांच्या पॅनल विरोधात पॅनल उभा केले होते एवढेच नाही तर यावेळी आर्थिक रसद देखील जिल्ह्यातील धाराशिव च्या बड्या नेत्याने पुरवली असल्याची चर्चा रंगली होती त्यामुळे सर्वपक्षीय सावंतांच्या विरोधात एकवटल्याने या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुका रंजक झाल्या होत्या.शेवटी तानाजी सावंत यांनी विधानसभेप्रमाणेच शेवटच्या क्षणी दोन्ही साथीदाराच्या सोबत खंबीरपणे उभा राहत या पालिका आपल्या ताब्यात मिळवत सर्वपक्षीय विरोधकांना धोबीपछाड देत आपले वर्चस्व सिद्ध करत गड राखला आहे.