Home Blog Page 27

खरा दानशूर… 1 कोटीचं दान केलं पण नाव समोर नाही येऊ दिलं

श्रीतुळजाभवानी चरणी अज्ञात भक्ताकडून 1 किलो 100 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे अर्पण

धाराशिव – केलेलं दान एका हाताचे दुसऱ्या हाताला समजू नये असे म्हणतात आणि जो हा नियम पाळतो तोच खरा दानशूर मानला जातो. जाहिरातबाजीच्या दुनियेत अपवादात्मक स्थितीत अशी व्यक्ती सापडते. महाराष्ट्रची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी एका भक्ताने तब्बल एक कोटी रुपयांचं सुवर्ण दान केलं आहे.

नियमित मोजणीसाठी शुक्रवार दि 28 मार्च 2025 रोजी तुळजाभवानी मंदिरातील दानपेटया उघडल्या असता देवीजींच्या मूळ गभऱ्यासमोर असलेल्या चोपदार दरवाजातील सिंहासन पेटी क्र 2 मध्ये सोन्याची 11 बिस्किटे आढळून आली. यातील प्रत्येक बिस्कीट 100 ग्रॅम वजनाचे असून त्याचे एकूण वजन 1100 ग्रॅम आहे. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत जवळपास 1 कोटी इतकी आहे.
मंदिर संस्थान येथे दानपेट्यांची मोजणी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी होत असल्याने हे दान बुधवार किंवा गुरुवारी झाले आहे. या बिस्किटांवर त्याचे वजन 100 ग्रॅम आणि शुद्धता 999.0 असे लिहिले आहे.

मंदिर संस्थान कडून सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सन्मान

अशा प्रकारे दान करताना भाविकांना सुरक्षित वातावरण मंदिर परिसर व गाभाऱ्यात ठेवणे तसेच भाविकांचे दान योग्य ठिकाणी जाईल याबाबत योग्य दक्षता मंदिर संस्थानचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी घेत असतात. यास्तव कौतुकाची थाप म्हणून मंदिर संस्थान कडून कर्तव्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांचा श्रीफळ व देवींजींचा फोटो देऊन सन्मान केला.

ट्रक नागपूरचा वाहतूक धाराशिव मध्ये

ट्रक मालक अमित कानडे चा विशाल रॉडलाईन्सशी संबंध काय?

घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी पुन्हा प्रेस नोट द्वारे खुलासा करण्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा खटाटोप

भाग ७

धाराशिव (आकाश नरोटे) धान्य वितरण व्यवस्थेमधून जिल्हा पुरवठा विभागाने २०० कोटींपेक्षा अधिक घोटाळा केला असल्याची बातमी दैनिक जनमत ने यापूर्वीच प्रसिद्ध केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेला खुलासा देखील छापला आहे. मात्र हे प्रकरण ८.९४ क्विंटल धान्य अफरातफरीचे नसून यात २०० कोटींपेक्षा जास्त मोठा घोटाळा असल्याबाबत काही प्रश्न जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना विचारण्यात आले होते त्याबाबत काहीच माहिती न देता ढोकी पोलिस ठाण्यांतर्गत दाखल असलेला गुन्हा आणि त्यातीलच कारवाई जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या मार्फत माध्यमांना देऊन जिल्हा पुरवठा अधिकारी स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत.

एम. एच. ४० एन ७५१३ या ट्रक मधून हे धान्य आणण्यात आले होते. हा ट्रक नागपूरच्या अमित कानडे या व्यक्तीच्या नावावर असल्याचे समजते आणि वाहतुकीचे कंत्राट विशाल रॉडलाईन्स या कंपनीला दिले असल्याने विशाल रोडलाईन्स आणि अमित कानडे याचा संबंध काय? अमित कानडे याची ट्रक वापरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी घेतली गेली होती का? याबाबत प्रश्न विचारून देखील त्याबाबत अद्याप कसलाच खुलासा करण्यात आला नाही.
ज्या ट्रक मधून वाहतूक केली गेली त्याचा विमा, फिटनेस, पीयूसी नसल्याबाबत जेव्हा बातमीतून माहिती समोर आणली तेव्हा त्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्यावर देखील विशेष असा खुलासा करण्यात आला नाही. त्या ट्रक मधून काळाबाजार व्हावा यासाठी जी. पी. एस. यंत्रणा बसवली नसल्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते त्यावर देखील कोणताच खुलासा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अद्याप केला नाही. उलट जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या आशिर्वादाने ही अवैध वाहतूक केली गेल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना संभ्रमित करण्यात पुरवठा विभाग यशस्वी

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना तांदूळ घोटाळ्यात संभ्रमित करण्यात जिल्हा पुरवठा विभाग यशस्वी झाला असल्याने या प्रकरणी दोन मॅरेथॉन बैठका घेऊन देखील कुठलीही कारवाई अद्याप केली गेली नाही. जिल्हाधिकारी नवखे असल्याने त्यांना घोटाळ्याच्या मूळाशी जाण्यापासून रोखले जात आहे. ८.९४ क्विंटल किंवा 200 कोटी पेक्षा अधिकचा हा घोटाळा असल्याने उच्च स्तरीय समिती नेमण्याची कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. जिल्हाधिकारी याबाबत नेमकी कोणती भूमिका घेतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बडे अधिकारी सामील?

२०० कोटीपेक्षा अधिक हा घोटाळा असला तरी एकट्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमध्ये एवढे धाडस नसून यात बदली होऊन गेलेले वरिष्ठ अधिकारी सामील असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त?

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त असल्यामुळे त्यांनी कंत्राटदाराला मोकळीक दिली? जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कोणाचे बळ मिळत असल्याने अवैध वाहतूक होत असताना, घोटाळा होत असताना त्या गप्प राहिल्या याबाबत उलट सुलट चर्चा सध्या सुरू आहेत.

नवा किस्सा नवी माहिती

पुरवठा विभागात यापूर्वी अफरातफर घडली नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी शासकीय प्रेस नोट मध्ये सांगतात. नोव्हेंबर महिन्यात तुळजापूर तालुक्यात पकडलेला ट्रक कोणाच्या सांगण्यावरून सोडला? त्यात लाखो रुपयांची डील कोणी केली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असताना पुरवठा विभागातील एक अधिकारी अहमदपूर तालुक्यात नोकरीला असताना त्यांच्यावर लाच लुचपत विभागाची रेड पडणार होती मात्र त्यापूर्वीच त्यांनी शिपायाच्या फटफटीवरून पलायन केल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नसल्याचा किस्सा देखील आता जिल्हाधिकारी कार्यालयात रंगवून रंगवून सांगितला जात आहे.

भाग ६
भाग ५
भाग ४
भाग ३
भाग २
भाग १

लुटीच्या मालासह दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात



धाराशिव : दिनांक 26 मार्च 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी रवाना झाले असता, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कळंब पोलीस ठाणे हद्दीतील डिकसळ पाटीजवळ झालेल्या जबरी चोरीतील आरोपी कळंब पारधी पिढीत असल्याचे समजले. आरोपींची नावे लल्ल्या, मिर्च्या आणि गंग्या पवार असल्याची माहिती मिळाली.

तत्काळ कारवाई करत पथकाने लल्ल्या उर्फ अनिल बादल शिंदे (रा. मोहा पारधी पिढी कळंब) आणि मिर्च्या उर्फ आकाश रवि काळे (रा. कळंब पारधी पिढी कळंब) यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी डिकसळ पाटीजवळ एका पती-पत्नीला अडवून त्यांचे सोन्याचे दागिने लुटल्याचे कबूल केले.

पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा क्रमांक 104/2025, कलम 309 (4), 126(2), 3(5) भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत आरोपींनी चोरी केलेला मुद्देमाल साथीदार गंगाराम बापू पवार याच्या बहिण सोनाली काळे हिच्या मदतीने केज येथील एका सोनाराला विकल्याचे सांगितले.

पोलीस निरीक्षक इज्जपवार यांच्या परवानगीने पथकाने तत्काळ केज येथे जाऊन 4.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले, मंगळसूत्र, मणी, असा एकूण 27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी युसुफवडगाव (जि. बीड) येथेही एक जबरी चोरी केल्याची कबुली दिली.

जप्त मुद्देमाल आणि ताब्यात घेतलेले आरोपी पुढील कार्यवाहीसाठी कळंब पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहान पठाण, जावेद काझी, चापोका रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली.

15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पॅरामेडिकल वर्कर रंगेहात पकडला

धाराशिव, दि. 25 मार्च 2025 — लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (लाप्रवि) धाराशिव येथे मोठी कारवाई करत 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पॅरामेडिकल वर्करला रंगेहात पकडले. या प्रकरणात आरोपी नरसिंग तुकाराम सूर्यवंशी (वय 50 वर्षे), जो सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयात कंत्राटी पॅरामेडिकल वर्कर म्हणून कार्यरत आहे, याला अटक करण्यात आली.

तक्रारीची पार्श्वभूमी
तक्रारदार हे आरोग्य विभागात लोहारा येथे पॅरामेडिकल वर्कर (कुष्ठरोग) म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा फेब्रुवारी आणि मार्च 2025 महिन्यांचा पगार तसेच 2023-2024 या आर्थिक वर्षातील टीए (प्रवास भत्ता) बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी आरोपी नरसिंग सूर्यवंशी याने 25,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

पडताळणी आणि सापळा रचला
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, लाचलुचपत विभागाने आरोपीवर नजर ठेवली. आज सकाळी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कार्यालयात तक्रारदारासोबत आरोपीने 27,000 रुपयांची लाच मागणी करत तडजोडीनंतर पहिला हप्ता म्हणून 15,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाप्रवि पथकाने सापळा रचला.

लाच स्वीकारताना रंगेहात अटक
आरोपी नरसिंग सूर्यवंशी याने तक्रारदाराकडून 15,000 रुपये स्वीकारले, त्याच क्षणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये 15,000 रुपयांची लाच रक्कम, 5 ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी, अतिरिक्त 300 रुपये रोख रक्कम आणि विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.

आरोपीच्या घरझडतीला सुरुवात
पोलिसांनी आरोपीच्या निवासस्थानीही झडती सुरू केली असून अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. तसेच आरोपीचा मोबाईल तपासणीसाठी जप्त करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल आणि पुढील तपास
या प्रकरणी आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अ नुसार आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

सापळा पथकातील अधिकारी आणि कर्मचारी
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी केले. त्यांच्यासोबत पोलीस उप अधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नेताजी अनपट, सचिन शेवाळे, विशाल डोके, नागेश शेरकर, शशिकांत हजारे, प्रकाश भोसले आणि चालक दत्तात्रय करडे यांनी ही यशस्वी कारवाई केली.

दरोड्याच्या तयारीत असणारे तीन इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

धाराशिव – दिनांक 24 मार्च 2025 रोजी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक रात्र गस्तीसाठी पेट्रोलिंग करत असताना पथकास ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्या जवळील जुना पळसप रोडवर संशयास्पद पाच इसम दिसले.

पथकाने संशय आल्याने जवळ जाऊन पाहणी केली असता दोन इसम अंधाराचा फायदा घेत मोटरसायकलसह पळून गेले, तर उर्वरित तीन इसम पळून जात असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशी आणि झडती घेतली असता त्यांच्याकडे दरोड्याचे साहित्य, कत्ती, कटावणी, कटर, 600 रुपये रोख रक्कम, तीन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 90,700 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे संतोष प्रभाकर कुराडे (वय 36, रा. सुभाष नगर, अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली), अविनाश प्रभाकर कुराडे (वय 34, रा. सुभाष नगर, अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली) आणि प्रवीण राजाराम मोरे (वय 30, रा. चांदोल वसाहत, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) अशी आहेत.

यापूर्वीही धाराशिव आणि सांगली जिल्ह्यात त्यांच्यावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्री झाल्यानंतर सपोनि कासार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाणे ढोकी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 97/25, कलम 310(4), 301(5) भारतीय दंड संहितेसह कलम 4, 25 भा.ह.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या इसमांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे ढोकी येथे हजर करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे आणि नितीन भोसले यांनी पार पाडली.

८.९४ क्विंटलची अफरातफर नव्हे, तर जिल्हा पुरवठा विभागात सुमारे २०० कोटींचा घोटाळा?

धान्य वितरण व्यवस्थेत जी.पी.एस. संनियंत्रण कक्ष नावालाच

आकाश नरोटे
भाग ६

धाराशिव – जिल्ह्यातील ८.९४ क्विंटल तांदूळ अफरातफर प्रकरणाने संपूर्ण राज्यभर खळबळ माजवली आहे. मात्र हे प्रकरण केवळ ८.९४ क्विंटलपुरते मर्यादित नसून, यामागे २०० कोटी रुपयांपर्यंतचा महाघोटाळा उघडकीस येत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत, कंत्राटदारांच्या सोयीसाठी सरकारी यंत्रणांना नाममात्र ठेवल्याचा आरोप केला जात आहे.


शासनाच्या नियमांना हरताळ

धान्य वितरण प्रणालीमध्ये अपहार आणि काळाबाजार टाळण्यासाठी सरकारने जी.पी.एस. ट्रॅकिंग यंत्रणा बसवणे बंधनकारक केले आहे. वाहतूक निश्चित मार्गानेच होईल याची खात्री करण्यासाठी जी.पी.एस. डेटा संनियंत्रण कक्षामार्फत तपासला जातो. मात्र, जिल्हा पुरवठा अधिकारी शेंडे यांनी ही यंत्रणा कागदोपत्री ठेवत प्रत्यक्षात कोणतेही नियमन केले नाही.

शासकीय धान्य ठरलेल्या रस्त्यांवरून न नेता अनधिकृत मार्गाने वाहतूक केल्याची शक्यता आहे. यामध्ये कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यातील संगनमत स्पष्टपणे दिसून येत आहे.


२०० कोटींच्या घोटाळ्याचा अंदाज

प्राथमिक तपासानुसार ८.९४ क्विंटलच्या तांदळाच्या अफरातफरीप्रमाणेच शेकडो टन धान्याचे काळ्या बाजारात विक्रीसाठी गैरवापर करण्यात आला असावा. या प्रक्रियेत २०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, यामध्ये केवळ एका प्रकरणातच नव्हे, तर गेल्या काही वर्षांत झालेल्या वाहतुकीवर सखोल चौकशी केल्यास घोटाळ्याचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.


विशाल रोडलाईन्सवर गंभीर आरोप

विशाल रोड लाईन्स या कंपनीला शासकीय धान्य वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, या कंपनीने जी.पी.एस. यंत्रणा बसवलेली नसलेली वाहने वापरून वाहतूक केल्याचा आरोप आहे. यामुळे धान्याचा माग काढणे अशक्य झाले आहे.

यामध्ये कंपनीने वाहतुकीसाठी अपात्र वाहने वापरली, वाहतुकीचे खोटे अहवाल सादर केले आणि संनियंत्रण यंत्रणेला फसवले, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कंत्राटाचे मूल्य २०० कोटींचे असले, तरी अपहाराचा आकडा आणखी मोठा असू शकतो.


जी.पी.एस. संनियंत्रण कक्षाचा फज्जा

शासनाने सर्व जिल्हा पुरवठा कार्यालयांमध्ये जी.पी.एस. संनियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा आदेश दिला होता. या कक्षामार्फत वाहतुकीचे थेट निरीक्षण केले जाते. मात्र, धाराशिव येथे हा कक्ष केवळ नावालाच होता.

जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी संनियंत्रण कक्षाचे कामकाज ठप्प ठेवून कंत्राटदारांना मोकळीक दिली.

कक्षात नियमित डेटा मॉनिटरिंग झालं नाही.

वाहतूक अहवालांची पडताळणी झाली नाही.

अनधिकृत मार्गांची तपासणी केली गेली नाही.

या निष्काळजीपणामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळाला आणि शेकडो कोटी रुपयांचा अपहार शक्य झाला.


अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

या घोटाळ्यातील मुख्य जबाबदार अधिकारी स्वाती शेंडे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, त्यांना निलंबित करण्यात यावे आणि संपूर्ण पुरवठा विभागाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


हे प्रश्न अनुत्तरित

स्वाती शेंडे यांनी संनियंत्रण कक्ष कार्यान्वित का केला नाही?

जी.पी.एस. यंत्रणांची नियमित तपासणी का झाली नाही?

कंत्राटदारांच्या अपात्र वाहनांना कसे परवानगी देण्यात आली?

गेल्या काही वर्षांत किती टन धान्याचा अपहार झाला?

या अपहारातून कोणाला थेट फायदा झाला?


राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या प्रकरणाची सामाजिक न्याय आणि प्रशासन विभागामार्फत सखोल चौकशी सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आहे. धान्य वितरणातील जी.पी.एस. डेटा, गोदामातील सी.सी.टी.व्ही. फुटेज आणि वाहनांची यादी यांची सखोल तपासणी केली जावी.

या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी आणि धान्य वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी कडक उपाययोजना राबवाव्यात, अशी जनतेची मागणी आहे.

भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५

पंधरा वर्षानंतर पारा गावातून ऋषिकेश शेळके यांची भारतीय आर्मीमध्ये टेक्निकल पदावर निवड; जल्लोषात मिरवणूक काढत गावकऱ्यांचा आनंदोत्सव

वाशी प्रतिनिधी (राहुल शेळके): धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा गावाने १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आनंदोत्सव साजरा केला आहे. गावातील ऋषिकेश जीवन शेळके (वय 21) यांनी भारतीय सैन्यात टेक्निकल पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशस्वी कामगिरीचा गावकऱ्यांनी जल्लोषात आनंद साजरा केला. शुक्रवारी सायंकाळी गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी पेढे वाटत, डीजेच्या तालावर नाचत त्यांचे अभिनंदन केले.

कष्टकऱ्यांच्या पोटी जन्मलेल्या ऋषिकेशचा जिद्दीचा प्रवास

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले ऋषिकेश शेळके यांचे जीवन संघर्षमय राहिले आहे. त्यांचे वडील जीवन शेळके अल्पभूधारक शेतकरी असून, आई गृहिणी आहेत. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या ऋषिकेश यांनी शिक्षण घेतानाच सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.

त्यांचे प्राथमिक शिक्षण डोंगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण जय भवानी विद्यालय, पारा येथे पूर्ण केले. पुढील स्वप्नासाठी त्यांनी ईट येथील वीर भगतसिंग अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांनी शारीरिक व मानसिक तयारीसाठी कठोर मेहनत घेतली. तीन महिन्यांपूर्वी अहिल्यानगर येथे झालेल्या सैन्य भरती प्रक्रियेत त्यांनी भाग घेतला होता. 21 मार्च रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांनी यश संपादन केले आणि भारतीय आर्मीमध्ये टेक्निकल पदावर निवड मिळवली.

गावकऱ्यांचा अभिमान — १५ वर्षांनी सैन्यात गावाचा सुपुत्र

पारा गावातून यापूर्वी १५ वर्षांपूर्वी विलास शेळके यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला होता. त्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी गावातून ऋषिकेश यांची निवड झाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. त्याच्या यशाची बातमी गावात पसरताच गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत करण्याचे ठरवले.

डिजेच्या तालावर नाचत, गुलाल उधळत व पेढे वाटत ऋषिकेश यांची मिरवणूक गावभर फिरवण्यात आली. नागनाथ नाईकवाडी, महादेव लोकरे, जीवन भराटे, युवराज भराटे, शंकर शेळके, शैलेश पाटील, बाजीराव भराटे, उद्धव शेळके, लाला शेळके, महेश खोले, बालाजी कुरुंद, पोपट कुरुंद, बळीराम शिनगारे, रोहित शेळके आदी मान्यवरांसह गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

जय भवानी विद्यालयात ऋषिकेश यांचा सत्कार सोहळा

22 मार्च रोजी पारा गावातील जय भवानी विद्यालयात ऋषिकेश यांचा माजी विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांनी ऋषिकेशच्या मेहनतीची प्रशंसा करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांच्या बळावर ऋषिकेशने यश मिळवले आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी तो एक आदर्श ठरेल,” असे गौरवोद्गार मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी काढले.

या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग, शालेय समिती अध्यक्ष शंकर शेळके, माजी विद्यार्थी, तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी ऋषिकेशच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कुटुंबीयांचा अभिमान आणि ऋषिकेशचे मनोगत

यावेळी ऋषिकेश यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
“माझ्या यशामागे माझ्या आई-वडिलांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि गावकऱ्यांचे आशीर्वाद आहेत. भारतीय सैन्यात देशसेवा करण्याचे स्वप्न लहानपणापासून बाळगले होते. ते आता पूर्ण झाले. मी यासाठी माझ्या संपूर्ण कुटुंबाचे आणि गावकऱ्यांचे आभार मानतो.”

पारा गावातील ऋषिकेश शेळके यांच्या यशामुळे संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्यांची देशसेवेसाठीची सुरुवात अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. त्यांच्या पुढील प्रवासासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्हा पुरवठा अधिकारीच तांदूळ अफरातफरीच्या सूत्रधार ?

जळजळीत बातम्या मिळमिळीत खुलासा

तांदूळ अफरातफरीत विचारलेले प्रश्न अनुत्तरीतच

धाराशिव – तांदूळ अफरातफरीच्या बातम्यांचे चार भाग छापल्यानंतर अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी खुलासा केला असून चार जळजळीत बातम्या छापल्यानंतर मिळमिळीत खुलासा आल्याने आता या प्रकरणात शासनाने उच्च स्तरीय समिती स्थापन करावी तरच दूध का दूध पाणी का पाणी होईल अन्यथा पुरवठा विभाग आणि त्यातील अधिकारी ‘हातावर तांदूळ देऊन पसार ‘ होतील.
पहिल्या भागात तुटीच्या आकड्यामागे मोठा घोटाळा असल्याचे म्हणले होते त्यात तेर सोबत पळसप येथे हा तांदूळ विकला गेल्याचे म्हटले होते त्यावर कुठलाही खुलासा केला नाही तसेच पोलिसांना तक्रार करताना पळसप चा उल्लेख देखील केला गेला नाही.

दुसऱ्या भागात आरोपी अलीम शेखच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते सहाय्यक पुरवठा अधिकाऱ्यांनी गोदामपालाच्या अहवालावरून गुन्हा दाखल केला त्यात अलीम शेख चा पूर्ण पत्ता, त्याचे वय याबाबत प्रश्न विचारले होते त्याबाबत देखील कुठलाच खुलासा केला गेला नाही.

तिसऱ्या भागात तांदूळ अफरातफरीत पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा हात असल्याचे म्हटले होते ज्या वाहनाने ही वाहतूक केली गेली त्या वाहनाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती का हा सवाल करण्यात आला होता त्याचेही उत्तर पुरवठा विभागाने दिले नाही.

चौथ्या भागात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, आर टी ओ आणि पोलीस यांची मिलीभगत असल्याचे म्हणले होते यावर पुरवठा विभागाने गाडीची माहिती कंत्राटदाराकडून घेऊन खुलासा करताना द्यायला हवी होती, पोलिस तपासाबाबत सुरू असलेल्या कारवाईबाबत सध्या काय सुरू आहे असे सांगणे अपेक्षित असताना त्याबाबत सांगितले न गेल्याने ही अफरातफर थोडी नसून मोठ्ठी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तांदूळ अफरातफर आणि त्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा असलेला हात समोर आणायचा असेल तर उच्च स्तरीय समिती स्थापन करून जलदगतीने चौकशी करायला हवी.

नोव्हेंबर मध्ये पकडलेले वाहन कोण सोडले

यापुर्वी वाहतूकी दरम्यान धान्याची अफरातफर झाल्याची निदर्शनास आलेले नाही असा खुलासा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केला आहे मात्र नोव्हेंबर महिन्यात तुळजापूर तालुक्यात एक वाहन पकडले होते ते कोणी सोडले त्यात कोणी कोणी हात ओले करून घेतले याबाबत देखील उलटसुलट चर्चा सुरू आहे.

ए.सी.बी.च्या गुन्ह्याचं काय?

जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांच्यावर सांगली जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे ते प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट असले तरी अशी केस दाखल असताना जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा कार्यभार कसा मिळतो याबाबत जिल्हा प्रशासनाने विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालयाने खुलासा करायला हवा.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा दैनिक जनमत कडे खुलासा

प्रस्तुत प्रकरणात धाराशिव गोदामपाल यांनी भारतीय खादय निगम यांचे एम.एस.डब्ल्यू.सी.लातूर गोदामातून दि. १३/०२/२०२५ रोजी प्राधान्य योजनेचा तांदूळ धाराशिव गोदामाकरिता अतिरिक्त वाहन क्रमांक एमएच.४०-एन.७५१३ मध्ये भरणा करण्यात आलेला होता. सदर वाहन दि. १४/०२/२०२५ रोजी धाराशिव गोदाम येथे आल्याचे तसेच सदर वाहनातील धान्याची टी.पी. क्रमांक २८१६७ अन्वये ८.९४ क्विंटल (२१ कट्टे) इतके धान्य कमी आल्याचे या कार्यालयास त्यांनी निदर्शनास आणून दिलेले आहे. तसेच सदर बाबत आपल्या वर्तमान पत्रातही मौजे तेर ता. धाराशिव येथे २५ ते ३० कटटे इतक्या धान्याची विक्री केलेबाबत बातमीही प्रसिध्द झालेली होती.

वाहन क्रमांक एमएच.४०-एन.७५१३ मध्ये वाहतूकी दरम्यान कमी आढळलेले धान्य ८.९४ क्विंटल च्या अफरातफर प्रकरणी दोषी संबंधिताविरुध्द जीवनावश्यक वस्तु कायदा, १९५५ अंतर्गत पोलीस ठाणे ढोकी येथे प्रथम खबर अहवाल (एफ.आय.आर.) क्रं.००५० दि. १८/०२/२०२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.

यापुर्वी वाहतूकी दरम्यान धान्याची अफरातफर झाल्याची निदर्शनास आलेले नाही. प्रथमवेळी अफरातफर प्रकरणी शासन तरतुदीनुसार अपहारीत धान्याची किंमत बाजार भावाच्या दुप्पट दराने वाहतूकदाराकडून वसूल करणेबाबत तरतुद असल्याने सदर प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे.

तसेच सदर वाहनाचे विमा, फिटनेस, पीयुसी नसलेबाबत आपण प्रसिध्द केलेल्या बातमीच्या अनुषंगाने शासन तरतुदीनुसार वाहन वापराबाबत वाहनाचा कर, विमा, प्रदुषण इ. बाबत शासनाच्या अस्तित्वात असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यास वाहतूक कंत्राटदार बांधील असल्याने सदर वाहनावर दंडात्मक कार्यवाही करणेबाबत परिवहन अधिकारी, धाराशिव यांना कळविण्यात आलेले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस, आणि आर.टी.ओ.ची मिलीभगत? तांदूळ अफरातफरीत प्रशासनाची चुप्पी!

विमा, फिटनेस, पीयूसी नसलेल्या वाहनातून धान्याची अवैध वाहतूक – 8.94 क्विंटल नव्हे, तर शेकडो क्विंटल चोरीचा संशय


भाग ४

धाराशिव – (आकाश नरोटे)

जिल्ह्यात 14 फेब्रुवारी रोजी उघडकीस आलेल्या शासकीय धान्याच्या अवैध विक्री प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ज्या ट्रकद्वारे ही तांदळाची अफरातफर झाली, त्या वाहनाच्या विमा, फिटनेस आणि प्रदूषण प्रमाणपत्रांचा (पीयूसी) कालावधी संपलेला असूनही ती ट्रक कशी काय रस्त्यावर धावत होती, यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एम.एच. 40 एन 7513 या क्रमांकाच्या या ट्रकवर 8.94 क्विंटल धान्याची चोरीची केस दाखल झाली असली, तरी प्रत्यक्षात शेकडो क्विंटल धान्याची अफरातफर झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

प्रशासनाची चुप्पी – जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न?

या प्रकरणावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पुरवठा विभाग आणि उपविभागीय परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. दैनिक जनमतने यापूर्वी याबाबत तीन सखोल बातम्या प्रकाशित केल्या होत्या, ज्यामध्ये जिल्हा पुरवठा कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सहभागाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने या आरोपांवर कोणताही खुलासा दिलेला नाही.

वाहन नियमांचा भंग – तरीही प्रशासन गप्प का?

  • ट्रक फिटनेस:
    सदर ट्रकचा फिटनेस प्रमाणपत्र 18 जानेवारी 2024 रोजीच संपला होता. तरीही ही गाडी लातूरच्या वखार महामंडळाच्या गोदामातून धान्य घेऊन धाराशिवकडे आली.
  • पीयूसी प्रमाणपत्र:
    ट्रकचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) 31 जानेवारी 2023 ला कालबाह्य झाले.
  • विमा समाप्त:
    गाडीचा इन्शुरन्स 17 जानेवारी 2023 रोजीच संपलेला होता.
  • आर.टी.ओ.ची भूमिका:
    अशा परिस्थितीत **आर.टी.ओ.**ने ही ट्रक तपासली नाही, ही बाब संशयास्पद आहे. अशा वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर कशी चालतात, हा प्रश्न प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर संशय निर्माण करतो.

अवैध परवानगी आणि मालाची वाहतूक

या प्रकरणात अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रकला कोणत्या आधारावर धान्य वाहतुकीची परवानगी मिळाली? जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुरवठा विभागाने दिलेल्या परवानग्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

  • गोदाम अधिकाऱ्यांची भूमिका:
    धाराशिव येथील गोदामपालाने या ट्रकमधून धान्य उतरवून कसे घेतले? गाडीचे कागदपत्र वैध नसतानाही त्याला प्रवेश कसा मिळाला?
  • ट्रान्सपोर्ट पास:
    कोणत्या आधारावर आणि कशाच्या आधारे ट्रान्सपोर्ट पास दिला गेला?
  • पोलिस तपास शून्य:
    18 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला असला तरी, पोलिस तपासात अद्याप कोणतीही लक्षणीय प्रगती दिसून आलेली नाही.

अफरातफरी 8.94 क्विंटल नव्हे, तर शेकडो क्विंटल?

हा केवळ 8.94 क्विंटल धान्याचा प्रश्न नाही, तर यामागे मोठ्या प्रमाणावर अफरातफरी झाल्याचा संशय आहे.

  • शेकडो क्विंटल धान्य चोरीला?
    प्राथमिक माहितीवरून हे समोर आले आहे की, या ट्रकने शेकडो क्विंटल शासकीय धान्याची बेकायदेशीर वाहतूक केली असू शकते.
  • गरिबांच्या हक्काचे धान्य लंपास:
    शासनाने गरिबांसाठी सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पुरवठा केलेले धान्य काही प्रभावशाली व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने खाजगी बाजारात विकले जात असल्याचा आरोप आहे.

आरोपी आणि कारवाईची गरज

या प्रकरणात संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी, आर.टी.ओ. अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्यावर चौकशी करण्याची तातडीची गरज आहे.

  • जिल्हाधिकारी कार्यालय: परवानगी देताना काय नियम पाळले गेले, याची चौकशी करावी.
  • आर.टी.ओ. विभाग: वाहन परवानग्या आणि नियमभंगांबाबत भूमिका स्पष्ट करावी.
  • पोलिस विभाग: अफरातफरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी.

या गंभीर प्रकरणाने धाराशिव जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांची बेजबाबदारपणा पुन्हा एकदा उघडकीस आणली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे या प्रकारातील मुख्य सूत्रधार मोकाट फिरत आहेत.

सरकारने याप्रकरणी तातडीने स्वतंत्र चौकशी समिती नेमून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

वन विभाग व कपिलापुरी ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश – चार महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जाळ्यात अडकला

परंडा, २० मार्च – परंडा तालुक्यात चार महिन्यांपासून धुमाकूळ घालून २० ते २५ जनावरांचा फडशा पाडणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. कपिलापुरी येथे हा बिबट्या यशस्वीरित्या पकडण्यात आला.

मागील दोन दिवसांपासून बिबट्याने कपिलापुरी गावात दहशत निर्माण केली होती. दि. १८ मार्च रोजी कपिलापुरी येथील दत्तू मसगुडे यांच्या शेळीवर भरदिवसा हल्ला केला. त्याच रात्री १२.३० च्या सुमारास वर्धमान जैन यांच्या महेशीच्या दोन रेड्यांवर बिबट्याने हल्ला चढवला. या घटनांमुळे कपिलापुरीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची मोहिम

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वन विभागाला तत्काळ कळवले. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. मात्र, १९ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पिंजऱ्याचे गज तोडून आत ठेवलेला बोकड घेऊन पसार झाला. या घटनेमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

दुसऱ्या दिवशी बिबट्या अखेर जाळ्यात

दि. २० मार्च रोजी वन विभाग आणि ग्रामस्थांनी त्वरित परिस्थिती हाताळत पिंजऱ्याची दुरुस्ती केली. सुरक्षाव्यवस्था वाढवून पुन्हा पिंजरा लावण्यात आला. अखेर २० मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

बिबट्याला पकडल्याची बातमी गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली. बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी कपिलापुरी येथे गर्दी केली. ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडत वन विभागाचे आभार मानले.

पुढील कार्यवाही सुरू

वन विभागाने बिबट्याच्या सुरक्षिततेची काळजी घेत त्याला जंगलात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

बिबट्याला पाहण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, हभप बालाजी महाराज बोराडे, माजी नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर, पत्रकार निसार मुजावर आणि अशितोष बनसोडे यांनी कपिलापुरी येथे भेट दिली. त्यांनी वन विभागाच्या यशस्वी मोहिमेचे कौतुक केले.

वन विभागाचा उल्लेखनीय प्रयत्न

वन विभाग आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बिबट्याला अखेर जेरबंद करता आले. या यशस्वी कारवाईमुळे कपिलापुरी गावासह संपूर्ण परंडा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.