Home Blog Page 37

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची सोलापूर येथे बदली

धाराशिव – धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची सोलापूर येथे बदली झाली असून सोलापूर महानगरपालिका आयुक्त पदी त्यांची वर्णी लागली आहे.
जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी धाराशिव जिल्ह्यात काही महत्वाचे निर्णय घेतले होते तसेच तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दाराच्या कामासाठी त्यांनी मोठा पाठपुरावा केला असून आराखडा मंजूर होण्यापूर्वीच त्यांची बदली झाली आहे. दोन वर्षापूर्वी त्यांची जिल्हाधिकारी म्हणून
बोगस नॉन क्री मी लेअर प्रकरणात डॉ. सचिन ओम्बासे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार दाखल असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे.

केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या नावे खोटी नोकर भरती प्रक्रिया: NRDRM संस्थेचा फसवणुकीचा प्रयत्न

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2025:

केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या नावाने एका खोट्या संस्थेने नोकर भरतीची फसवी जाहिरात प्रसिद्ध केली असून, जनतेला अशा प्रकारच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “राष्ट्रीय ग्राम विकास आणि सामाजिक मनोरंजन अभियान” (National Rural Development & Recreation Mission – NRDRM) या नावाने कार्यरत असलेल्या संस्थेने केंद्र सरकारच्या मंत्रालयाशी संलग्न असल्याचा दावा करत अनेक नागरिकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, NRDRM संस्थेने आपला पत्ता “डॉ. राजेंद्र प्रसाद मार्ग, नवी दिल्ली, 110001” असा दर्शवला असून, www.nrdrm.com आणि www.nrdrmvacancy.com ही संकेतस्थळे आपल्या अखत्यारीत असल्याचे भासवले आहे. मात्र, केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने या दाव्यांना साफ खोटे ठरवत अशा कोणत्याही संस्थेला अधिकृत मान्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

खोटी भरती प्रक्रिया आणि जनतेची फसवणूक

NRDRM संस्थेने विविध पदांसाठी भरती जाहीर करत अर्जदारांकडून नोंदणी शुल्क आणि इतर प्रक्रियेसाठी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे. या फसवणुकीच्या माध्यमातून अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी करून जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या अधिकृत सूचनेनुसार:

  1. मंत्रालय कोणत्याही प्रकारच्या नोकर भरती प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क घेत नाही.
  2. मंत्रालय अर्जदारांकडून त्यांच्या बँक खात्याच्या माहितीची मागणी करत नाही.
  3. मंत्रालयाच्या सर्व अधिकृत नोकर भरती प्रक्रियेची माहिती केवळ rural.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच उपलब्ध असते.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी घ्यायची काळजी

नागरिकांनी अशा फसव्या भरती प्रक्रियांच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी पुढील गोष्टींची दक्षता घ्यावी:

  • कोणत्याही भरती प्रक्रियेच्या अधिकृततेबाबत खात्री करण्यासाठी rural.gov.in संकेतस्थळावर चौकशी करावी.
  • संशयास्पद भरती जाहिराती किंवा संकेतस्थळे आढळल्यास, त्वरित अधिकृत यंत्रणांना किंवा स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी.
  • कोणत्याही अनधिकृत किंवा खाजगी माध्यमातून पैसे भरू नयेत.

संबंधित यंत्रणांकडून कठोर कारवाईची शक्यता

या प्रकरणी केंद्रीय ग्राम विकास मंत्रालय आणि संबंधित तपास यंत्रणा कारवाईसाठी पुढाकार घेत असून, अशा फसव्या संस्थांविरोधात कठोर कायदेशीर पावले उचलण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी सतर्क राहून अधिकृत माहितीच्या आधारेच कोणत्याही नोकर भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.

भारतीय कृषी विमा कंपनीचे अपील फेटाळले – शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश

मुंबई: खरीप हंगाम 2022 संदर्भात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत आज मंत्रालयात राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली. या बैठकीत भारतीय कृषी विमा कंपनीने विभागीय आयुक्तांच्या विरोधात केलेले अपील समितीने फेटाळले आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने भारतीय कृषी विमा कंपनीला आदेश दिले की, शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे द्यावेत आणि पंचनाम्यातील अहवालानुसार नुकसानभरपाई अदा करावी. तसेच, पूर्वसूचना दिलेल्या भागांचे सर्वेक्षण करून योग्य नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी कंपनीवर टाकण्यात आली. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रधान सचिव (कृषी) श्री. विकास रस्तोगी होते. तसेच, अवर सचिव सरिता पाटील, आमदार प्रवीण स्वामी, शेतकरी प्रतिनिधी अनिल जगताप, तक्रारदार पद्मराज गडदे आणि श्री. माने, भारतीय कृषी विमा कंपनीचे अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे सोनटक्के, कृषी आयुक्त आणि सांख्यिकी विभागाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

लातूरहून निघालेल्या तांदळाची खुल्या बाजारात विक्री – तुटीच्या आकड्यांमागे मोठा घोटाळा?

धाराशिव: सार्वजनिक वितरण व्यवस्थेत कितीही पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झाला तरीही धान्य चोरी, काळाबाजार आणि गैरव्यवहाराच्या घटना समोर येतच असतात. अशाच एका प्रकारात, लातूरहून धाराशिव येथील गोदामात येणारा तांदूळ  तेर येथे मोठ्या प्रमाणावर खुल्या बाजारात विक्री झाल्याचे उघडकीस आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला असून, सुरुवातीला हा मुद्दा दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र, माध्यमांमध्ये बातम्या झळकल्यानंतर पुरवठा विभागाने मोठ्या गडबडीत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.

प्रशासनाने या तांदळाची तूट भरून काढण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असल्या, तरी या प्रकारामध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत. आता जबाबदारी कोणावर टाकावी, यासाठी प्रशासन बळीच्या बकऱ्याचा शोध घेत असल्याची चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, प्रश्न असा आहे की, एका ट्रकचालकाने इतक्या मोठ्या प्रमाणावर तांदूळ विक्री करणे शक्य आहे का?

लातूरहून निघालेल्या तांदळाचा प्रवास आणि संशयास्पद तूट

लातूर येथून निघालेल्या ट्रकमधील तांदूळ धाराशिव जिल्ह्यातील पळसप आणि तेर येथे विक्रीसाठी उतरवला गेल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणावर कट्टे विकले गेले तरी केवळ ९०० किलो तूट असल्याचा दावा करण्यात येत आहे, जो संशयास्पद वाटतो. ट्रकने प्रवास करताना विविध ठिकाणी तांदळाची विक्री झाल्याची चर्चा असून, काही व्यापाऱ्यांना हा तांदूळ कमी दरात विकण्यात आला असल्याचे देखील समोर आले आहे.

ट्रकचालक आणि व्यापाऱ्यांमध्ये साटेलोटे?

हा संपूर्ण प्रकार ट्रकचालकाच्या एकट्याच्या कृत्याचा परिणाम असू शकतो का, हा मोठा प्रश्न आहे. ट्रक चालक आणि काही स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये साटेलोटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रक धाराशिवला पोहोचण्यापूर्वीच, लातूर ते धाराशिव या मार्गावर काही गावांमध्ये तांदूळ उतरवला गेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

मिलीभगत कोणाकोणाची?

या घोटाळ्यात केवळ ट्रकचालक नव्हे, तर पुरवठा विभागातील काही अधिकारी, व्यापारी आणि इतर घटक सामील असण्याची शक्यता आहे. प्रशासनाने केवळ तांदूळ परत मिळवण्यासाठी हालचाली केल्या, परंतु त्यामागील खरी साखळी कोणती आहे, हे शोधून काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली, तर आणखी धक्कादायक माहिती उघड होऊ शकते.

सखोल चौकशीची गरज

जर या प्रकरणाची नीट चौकशी झाली, तर तांदूळ चोरी आणि खुल्या बाजारातील विक्रीमध्ये अनेक बडी नावं समोर येऊ शकतात. यासाठी केवळ एका ट्रक चालकावर खापर फोडण्यापेक्षा, संपूर्ण पुरवठा साखळीतील दोषींवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, अशा घटना पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या या प्रकरणात कोणावर कारवाई होते, आणि यातून आणखी कोणते मोठे चेहरे उघडकीस येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिना कोळेगाव धरणा लगतच्या शेतकऱ्यांचा आनाळा साठवण तलाव आणि कंडारी कालव्याला पाणी सोडण्यास विरोध

परंडा (दि. १६ फेब्रुवारी) – परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव धरणातून आनाळा साठवण तलाव व कंडारी कालव्यात पाणी सोडण्यास धरणलगतच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

शेतकऱ्यांनी तहसीलदार व सिना कोळेगाव धरण कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, सिना कोळेगाव धरणासाठी त्यांच्या बागायती जमिनी संपादित करण्यात आल्या असून अद्याप त्यांना संपूर्ण भरपाई मिळालेली नाही.

कंडारी कालव्याच्या दुरवस्थेचा आरोप

शेतकऱ्यांच्या मते, कंडारी कालवा नादुरुस्त असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून झाडे वाढलेली आहेत. त्यामुळे पाण्याची गळती होत आहे आणि ओढ्याद्वारे वाया जात आहे. तसेच पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

आनाळा साठवण तलावात पाणी सोडण्यास कायदेशीर आधार नाही

शेतकऱ्यांनी सांगितले की, आनाळा साठवण तलाव व साकत प्रकल्पात पाणी सोडण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे धरणातील पाणी कमी होत असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बँका व खाजगी सावकारांकडून कर्ज काढून शेती केली आहे. जर पाण्याचा अव्यवस्थित उपसा सुरूच राहिला, तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

सिना कोळेगाव धरणातील पाणी वाटपाबाबत १० फेब्रुवारी रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा समितीची बैठक झाली.

या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच, नागरी पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल, याची दक्षता घेण्यास सांगितले.

त्याचबरोबर सिना-कोळेगाव प्रकल्पांतर्गत भोत्रा येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात नियमित पाणी सोडावे, त्यामुळे ३५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस उपस्थित मान्यवर

या बैठकीला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील-घाडगे यांनी ऑनलाईन सहभाग घेतला. तसेच जिल्हाधिकारी **डॉ. सचिन ओंबासे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूरच्या अधीक्षक अभियंता व प्रशासक रुपाली ठोंबरे, धाराशिवच्या अधीक्षक अभियंता थोरात, कार्यकारी अभियंता ए. एन. पाटील, सिना-कोळेगाव व निम्न तेरणा प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता के. व्ही. कालेकर, धाराशिव पाटबंधारे मंडळाचे सहायक अधीक्षक अभियंता सी. आर. पाटील आणि निम्न तेरणा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एन. बी. पाटील उपस्थित होते.


तुळजापुरात विक्रीसाठी आणलेले एमडी ड्रग्स जप्त – तिघे अटकेत

तुळजापुरात विक्रीसाठी आणलेले एमडी ड्रग्स स्थानिक गुन्हे शाखा आणि तामलवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाईत जप्त केले असून, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे 2.50 लाख रुपये असून, गुन्ह्यात वापरलेली मोटारकार आणि मोबाईलसह एकूण 10.75 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

गुप्त माहितीवरून कारवाई

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने तुळजापूर उपविभागात गस्त घालत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही इसम अमली पदार्थ तुळजापूरमध्ये विक्रीसाठी आणणार आहेत. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तामलवाडी पोलिसांची मदत घेत सोलापूर-तुळजापूर महामार्गावर गस्त सुरू केली.

संशयित कारची तपासणी आणि मोठी कारवाई

तामलवाडी टोल नाक्याच्या पुढे तुळजापूरच्या दिशेने एक मोटारकार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता, त्यामध्ये तीन इसम आढळले. चौकशी दरम्यान, त्यांच्याकडे एमडी (मेथॅम्फेटामाइन) अमली पदार्थ असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांनी हा अमली पदार्थ मुंबईहून तुळजापुरात विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून 59 पुड्या एमडी अमली पदार्थ (किंमत 2.50 लाख रुपये), गुन्ह्यात वापरलेली मोटारकार आणि मोबाईल असा एकूण 10.75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तीघांना अटक, एन.डी.पी.एस कायद्यानुसार गुन्हा दाखल

या प्रकरणी अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे, युवराज देविदास दळवी (दोघे रा. तुळजापूर) आणि संदीप संजय राठोड (रा. नळदुर्ग) या तिघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार यांनी फिर्याद दिल्यानंतर तिघांविरुद्ध एन.डी.पी.एस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.

पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि गोकुळ ठाकुर, पोउपनि लोंढे, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले, तसेच तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माने, सलगर, सुरनर, चौगुले आणि चालक शेख यांनी ही यशस्वी कारवाई केली.

अमली पदार्थांविरुद्ध कठोर पावले उचलणार – पोलीस प्रशासन

जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. अशा कारवायांमुळे अमली पदार्थ तस्करांवर वचक बसणार असून, भविष्यातही अशा गुन्हेगारी कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील सेतू केंद्रांच्या निविदा प्रक्रियेत सुधारणा – शासनाचे नवे निर्देश

मुंबई, 14 फेब्रुवारी 2025 – महाराष्ट्र शासनाने जिल्हा आणि तहसील कार्यालयांतील सेतू सुविधा केंद्रांच्या निविदा प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. सेतू केंद्रे ही नागरिकांना विविध शासकीय सेवा एका छताखाली सुलभपणे मिळाव्यात यासाठी स्थापन करण्यात आली आहेत. मात्र, काही केंद्रांवरील कंत्राटी एजन्सींच्या कराराचा कालावधी संपल्यामुळे नवीन निविदा प्रक्रियेसाठी शासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

सुधारित निविदा प्रक्रियेचे महत्त्वाचे मुद्दे:

  1. पारदर्शक निविदा प्रक्रिया – जिल्हा सेतू समित्यांनी कंत्राटी पद्धतीने सेतू केंद्रांचे व्यवस्थापन खासगी संस्थांना सोपवण्यासाठी पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवावी.
  2. कराराचा कालावधी – सुरुवातीस 3 वर्षांचा करार करण्यात येईल. नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कमाल 2 वेळा, प्रत्येकी 1 वर्षाची मुदतवाढ दिली जाऊ शकते.
  3. एकाच ठेकेदाराला मर्यादाकोणत्याही एका ठेकेदाराला राज्यातील 4 पेक्षा अधिक जिल्ह्यांचे सेतू केंद्र कंत्राट मिळणार नाही.
  4. जिल्हाधिकारी यांना अधिकार – जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रे एका ठेकेदाराला द्यायची की अनेक ठेकेदारांमध्ये विभागायची, हा निर्णय स्थानिक गरजा पाहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा.
  5. हमीपत्र घेणे अनिवार्य – निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या ठेकेदारांकडून हमीपत्र घेण्यात येईल, जेणेकरून सेवा अधिक पारदर्शक व जबाबदारीने दिली जाईल.

या निर्णयामुळे नागरिकांना सेतू केंद्रांच्या माध्यमातून मिळणाऱ्या शासकीय सेवांची उपलब्धता अधिक सुकर होणार असून, सेवा प्रदात्यांमध्ये स्पर्धात्मकता निर्माण होईल, असे शासनाचे मत आहे. अधिकृत मार्गदर्शक सूचना शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी, तत्कालीन पोलिस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि तहसीलदार यांची राज्यपालांकडे तक्रार

ॲट्रॉसिटी चा गुन्हा असताना शस्त्र परवाना रद्द न केल्याचा गंभीर आरोप

धाराशिव ( प्रतिनिधी)
धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि अन्य अधिकाऱ्यांवर नियमबाह्य शस्त्र परवाना मंजुरीबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लहू रामा खंडागळे यांनी राज्यपाल, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तत्कालीन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उप जिल्हाधिकारी शोभा जाधव, सध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड,तहसीलदार आभिजित जगताप यांच्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ॲड. शरद जाधवर सरकारी वकील होते ३१ ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला होता. त्यांच्यावर यांच्यावर १७ मार्च २०२३ रोजी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. ०१ सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी नवीन शस्त्र खरेदी केले ते केल्यानंतर त्याची पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांनी करून घेतली मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्यावर दाखल असलेला गुन्ह्याची पडताळणी न करता ॲड. जाधवर यांना खरेदी केलेल्या नव्या शस्त्राचा परवाना देऊन टाकला. पोलिस विभागाने देखील गुन्ह्याची पडताळणी न केल्याचा गंभीर आरोप तक्रारी मध्ये करण्यात आला आहे.
लहू रामा खंडागळे यांनी राज्यपाल, गृह विभाग आणि पोलिस महासंचालकांकडे
संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करावी.
पोलिस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शिस्तभंग कारवाई करावी.
शस्त्र परवाना मंजूर करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवावे अशी मागणी केली आहे.

संगनमताचा आरोप

ॲड. शरद जाधवर यांचा शस्त्र परवाना कायम ठेवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी संगनमत केले असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.


शस्त्र परवाना माझ्या कार्यकाळात नसून परवाना रद्द करावा म्हणून पोलिसांकडून अहवाल आलेला नाही
शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी


परवाना कळंब पोलिस स्टेशन ने दिला असून माझ्याकडे परवाना रद्द करण्याबाबत कुठलाही तक्रारी अर्ज आलेला नाही.
स्वप्नील राठोड, उपविभागीय अधिकारी अधिकारी

श्री सिध्दीविनायक परिवाराच्या ऊस गळीत हंगाम २०२४-२५ ची यशस्वी सांगता

धाराशिव: जिल्ह्यातील अग्रगण्य औद्योगिक समूह असलेल्या श्री सिध्दीविनायक परिवार अंतर्गत कार्यरत ऊस कारखान्यांचा २०२४-२५ गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या हंगामात एकूण १ लाख ५७ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले.

हंगाम समारंभ उत्साहात संपन्न

हंगामाच्या सांगता समारंभास श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी हंगामातील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देत, शेतकरी आणि ऊस वाहतूक क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

शेतकरी हित सर्वोच्च प्राधान्य

शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्याच्या वचनबद्धतेप्रमाणे, जानेवारी महिन्यापर्यंतच्या गळीत उसाचे संपूर्ण देयके शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहेत. श्री सिध्दीविनायक परिवार शेतकरी हितासाठी सदैव कटिबद्ध असून, आगामी हंगाम अधिक सुव्यवस्थित आणि आधुनिक पद्धतीने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कारखान्याच्या प्रगतीसाठी सहकार्य महत्त्वाचे – दत्ताभाऊ कुलकर्णी

यावेळी बोलताना दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले,
“श्री सिध्दीविनायक परिवार शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या पाठबळावर प्रगती करत आहे. उच्च तंत्रज्ञान, पारदर्शक व्यवहार आणि वेळेत ऊस बिले मिळावीत, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करावा, यासाठी संस्थेच्या वतीने विविध प्रशिक्षण उपक्रम राबवले जातील.”

उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते

समारंभास व्यंकटेश कोरे, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, रामचंद्र सारडे, धनंजय गुंड, मंगेश कुलकर्णी, हेमंत कुलकर्णी, बालाजी जमाले, अभयसिंह शिंदे, प्रदीप धोंगडे यांच्यासह कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, उस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार आणि वाहन मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भविष्यातील संकल्प

आगामी हंगामासाठी सुधारित यंत्रणा, अत्याधुनिक ऊस वाहतूक आणि अधिक जलद प्रक्रिया तंत्रज्ञान राबवले जाणार असून, शेतकऱ्यांसाठी विविध सहाय्यक योजनांची आखणी केली जाणार आहे.

श्री सिध्दीविनायक परिवार हे शेती, उद्योग आणि सामाजिक प्रगतीला समर्पित असलेले नाविन्यपूर्ण संस्थान आहे. आगामी काळातही शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत अधिक शाश्वत आणि पारदर्शी ऊस गळीत हंगाम राबवण्याचा निर्धार संस्थेने केला आहे.

दिवसा घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

येरमाळा (दि. 12 फेब्रुवारी 2025) – येरमाळा पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव येथे भरदिवसा घरफोडी करून 15.79 लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

दि. 7 फेब्रुवारी रोजी वडगाव येथील रामभाऊ गहिनीनाथ नवले हे शेतातील कामासाठी गेले असता अज्ञात इसमाने त्यांच्या घराचा लोखंडी कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील 18 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 15,79,600 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. येरमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित सुरज दादासाहेब शिनगारे (रा. शेलगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली व चोरी केलेल्या ऐवजाबाबत माहिती दिली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडून 18 तोळे सोन्याचे दागिने, 40,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 15,09,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, मपोशैला टेळे, पोअं योगेश कोळी, चालक रत्नदिप डोंगरे आणि नितीन भोसले यांच्या पथकाने केली.