धाराशिव ( नरोटे आकाश – 9545591355): “आमची लढाई आरएसएससोबत नाही,” असे विधान काँग्रेसचे उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेचे उमेदवार महेश देशमुख यांनी केले असून, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेची उमेदवारी महेश देशमुख यांना मिळाली आहे. त्यांनी आज (दि. १ जून) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“भाजपमधील गुंडांच्या टोळीविरोधात आमची लढाई असून, नीट पेपरफुटी आणि महागाईविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत,” असेही ते यावेळी म्हणाले.
धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीचे पुरेसे संख्याबळ नसल्याबाबत प्रश्न विचारला असता, “संख्याबळ येत्या अकरा दिवसांत दिसून येईल. तसेच नाराज गटाशी संपर्क सुरू आहे,” असे महेश देशमुख यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला आ. प्रवीण स्वामी, विश्वास आप्पा शिंदे, काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, राष्ट्रवादीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आरएसएसला विरोध नाही, भाजपमधील गुंडांच्या टोळीला विरोध; याचा अर्थ काय?
महेश देशमुख यांनी “आरएसएसला विरोध नाही” हे केलेले वक्तव्य अनेक अन्वयार्थांना वाव देणारे ठरत आहे. निवडणुकीत संघाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. विशेषतः काँग्रेसच्या उमेदवाराने असे वक्तव्य केल्याने भाजपच्या उमेदवाराला याचा फटका बसू शकतो का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
मात्र, या विधानाचा सर्वाधिक परिणाम भाजपमधील गटबाजीवर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या वक्तव्याचा निवडणुकीच्या निकालावर नेमका काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
- रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!
