१३ वर्षांची प्रतीक्षा संपली; तासगाव बायपास रस्ता भूसंपादनाला अखेर गती

0
42

आ. रोहित पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ₹१०,९६,४२,८०५ रुपयांच्या भूसंपादन भरपाईच्या धनादेशांचे वाटप


तासगाव 🙁 प्रतिनिधी/राहुल कांबळे )
तासगाव शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा आणि तब्बल १३ वर्षांपासून विविध प्रशासकीय कारणांमुळे रखडलेला तासगाव बायपास रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आ. रोहित पाटील यांनी शासन व संबंधित विभागांकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत माजी आमदार सुमनताई आर. आर. पाटील यांच्या हस्ते ₹१०,९६,४२,८०५ (दहा कोटी शहाण्णव लाख बेचाळीस हजार आठशे पाच रुपये) इतक्या रकमेच्या भूसंपादन भरपाईच्या धनादेशांचे संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या भूसंपादन प्रक्रियेमुळे संबंधित शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत होते. अखेर शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर धनादेशांचे वितरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आ. रोहित पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

तासगाव शहरातील वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता बायपास रस्ता ही शहराची अत्यावश्यक गरज बनली होती. मात्र भूसंपादनाचा प्रश्न निकाली न निघाल्यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामाला वारंवार अडथळे येत होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. रोहित पाटील यांनी महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेऊन निधी मंजूर करण्यासाठी आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने आता बायपास रस्त्याच्या कामाला वेग मिळणार आहे. बायपास पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातून होणारी जड वाहतूक बाहेरील मार्गाने वळवल्यामुळे तासगावच्या नियोजनबद्ध विकासालाही चालना मिळणार आहे.

भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा व्हावी, यासाठीही आ. रोहित पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच तब्बल १३ वर्षांपासून रखडलेला भूसंपादनाचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून बायपास प्रकल्प प्रत्यक्ष मार्गावर आला आहे.

तासगावच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, बायपास प्रकल्पामुळे भविष्यात शहराच्या वाहतूक, व्यापार, उद्योग आणि एकूणच विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here