८ कोटींचा निधी मंजूर; नुकसानभरपाई वाटपाचा मार्ग मोकळा
तासगाव प्रतिनिधी
गेल्या १८-१९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिजामाता चौक (भिलवडी नाका) ते विटा रोड बायपास रस्त्यासाठी भूसंपादन झालेल्या जमिनींची नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाची मंगळवारी आमदार रोहित पाटील यांच्या ठोस आश्वासनानंतर सांगता झाली.
सन २०२३ च्या अर्थसंकल्पात या बायपास रस्त्यासाठी ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. रस्त्यासाठी ४५ गटांचा सर्व्हे पूर्ण झाला असून सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणे बाकी आहे. त्यापैकी १७ गटांतील शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नोव्हेंबर २०२५ मध्येच केली होती. मात्र निधीअभावी नुकसानभरपाईचे वितरण रखडले होते.
शेतकऱ्यांच्या वारंवार पाठपुराव्यानंतरही निधी उपलब्ध होत नसल्याने ८ जूनपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलनस्थळी माजी आमदार सुमनताई आर. आर. पाटील यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित कागदपत्रांसह संपूर्ण माहिती आमदार रोहित पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
यानंतर आमदार रोहित पाटील यांनी मंत्रालयात तातडीने पाठपुरावा करत ०३/०४ हेडअंतर्गत सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. याबाबतची माहिती त्यांनी प्रशासनाला दूरध्वनीवरून दिली. तसेच निधी वर्ग झाल्यानंतर त्यावरील बीडीएस लॉक हटविण्यासाठीही त्यांनी दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला. त्यामुळे निधी वितरणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
अधीक्षक अभियंता बुरूड आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या गुरुवारपर्यंत काही शेतकऱ्यांच्या डीडी तयार करण्याचे, तसेच पुढील आठवड्यात उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
दरम्यान, आमदार रोहित पाटील व प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे शेतकऱ्यांनी सध्या धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्यक्ष नुकसानभरपाई वाटपावर लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
- रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!
