Home Blog Page 4

मोटारसायकल चोर टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात – चार चोरीच्या मोटारसायकलींसह दोन आरोपी पकडले

धाराशिव, दि. २८ ऑक्टोबर : प्रतिनिधी

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण कामगिरी करत चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, दोन संशयित इसमांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या पथकाला धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्याच्या मोहिमेत असताना, कळंब येथे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी आणले आहेत. प्राप्त माहितीनुसार पथकाने तत्काळ सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी चोरी केलेल्य मोटारसायकलींची कबुली दिली. त्यांच्या सांगण्यावरून पथकाने त्यांच्या ताब्यातून एकूण चार मोटारसायकली जप्त केल्या.

गुन्हे शाखेने तपास करताना या मोटारसायकली आनंदनगर, तुळजापूर, येरमाळा (धाराशिव जिल्हा) आणि मुरुड (लातूर जिल्हा) या ठिकाणांहून चोरीस गेल्या असल्याचे उघड झाले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
1️⃣ अर्जुन साहेबराव काळे (वय २९ वर्षे, रा. वाकडी पारधी पिढी, ता. कळंब, जि. धाराशिव)
2️⃣ नितीन विश्वास शिंदे (वय २५ वर्षे, रा. नांदूर, ता. केज, जि. बीड, ह.मु. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव).

दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, तसेच शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.

या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पारा येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून हडप केलेली रक्कम शासन खात्यात जमा करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

बाजीराव उद्धव भराटे यांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याला अखेर यश

वाशी (राहुल शेळके): वाशी तालुक्यातील सर्वात मोठी, सतत चर्चेत असणारी आणि वादग्रस्त ग्रामपंचायत — पारा ग्रामपंचायत — येथील भ्रष्टाचार अखेर उघड झाला आहे. राजकीय वरदहस्तामुळे सतत कारवाईतून बचावत आलेले सरपंच राजेंद्र पांडुरंग काशीद आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण देशमुख यांना अखेर शासन खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर (भाप्रसे), छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी नुकतेच दिले आहेत. या आदेशामुळे वाशी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, तालुक्यातील ज्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी अपहार केलेला आहे, त्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील पारा येथील वादी बाजीराव उद्धव भराटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांनी चौकशी केली असता खालीलप्रमाणे अनियमितता आढळून आली:

  • वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेची रक्कम रुपये 2,33,000/-
  • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजना रक्कम रुपये 60,000/-
  • ग्रामनिधी खात्यावरील रक्कम रुपये 43,000/-
    अशा प्रकारे एकूण रुपये 3,36,000/- इतकी रक्कम सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अनियमित पद्धतीने वापरल्याचे दिसून आले.

सदर दोघांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहितेमधील वित्तीय नियमांचे उल्लंघन केले असून, विकास कामे व साहित्य खरेदी करताना शासनाने ठरविलेल्या प्रक्रिया आणि गुणवत्ता तपासणीचे नियम पाळले नाहीत. देयकांमधील शासकीय कपातीसंदर्भातही आवश्यक कार्यवाही झाल्याचे नोंदीत दिसून आले नाही. त्यामुळे सरपंच राजेंद्र पांडुरंग काशीद आणि ग्रामविकास अधिकारी हे प्रथमदर्शनी जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे सरपंच राजेंद्र काशीद यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) नुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली. या संदर्भातील सुनावण्या दि. 6/1/24, दि. 11/12/24, आणि दि. 13/5/25 रोजी घेण्यात आल्या. त्या वेळी प्रशासनाच्या वतीने पंचायत समिती वाशीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बी. एस. राठोड, विस्तार अधिकारी (पं.) व्ही. बी. रूपवट, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी पी. बी. देशमुख, आणि कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी ए. बी. शेख उपस्थित होते.

पुढील सुनावणीच्या तारखा 24/6/25, 15/7/25, 29/7/25, आणि 12/8/25 रोजी ठरवण्यात आल्या होत्या. अखेर दि. 30/9/25 रोजी खालीलप्रमाणे निर्णय देण्यात आला:

  1. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांचा अहवाल (जा. क्र. जि. प. धा./सा. प्र. वि./2/ग्रा. प. वि.8/सीआर-ई-855774/कावि/56/2024, दि. 28/1/2025) मान्य करण्यात येतो.
  2. गैरअर्जदार राजेंद्र पांडुरंग काशीद, सरपंच, ग्रामपंचायत पारा, ता. वाशी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) नुसार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरून सांप्रत कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात येत आहे.
  3. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांनी चौकशी अहवालाच्या अनुषंगाने अपहारित रक्कम निश्चित करण्यासाठी विशेष समिती गठित करून ती शासन खात्यात जमा करण्याची कार्यवाही करावी. तसेच रक्कम वसूल न झाल्यास संबंधितांच्या मालमत्तेवर (उदा. 7/12 नोंदणीवर) अपहारित रकमेचा बोजा टाकण्याची कार्यवाही करावी.

असे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर (भाप्रसे), छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी दिले आहेत. आता या आदेशाची अंमलबजावणी करून सरपंच राजेंद्र काशीद यांच्या कडील अपहारित रक्कम कशी आणि किती दिवसात वसूल केली जाते, तसेच ग्रामविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव कोणती कार्यवाही करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

रस्ते कामाच्या चौकशीसाठी एस आय टी नेमा,नगरविकास प्रधान सचिव गोविंदराजांच्या विरोधाभासी शिफारशींवर प्रश्नचिन्ह महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

एस आय टी नेमून दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या महाविकास आघाडी आक्रमक

धाराशिव, २६ ऑक्टोबर २०२५: धाराशिव शहरातील १४० कोटींच्या ५९ रस्त्यांच्या कामांना तब्बल १८ महिन्यांचा विलंब झाल्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचार आणि दबावतंत्राचे गंभीर आरोप केले आहेत. आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची सविस्तर वस्तुस्थिती मांडताना, विशेषतः नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्या दोन परस्परविरोधी शिफारशींवर जोरदार टीका केली. या विरोधाभासी निर्णयांमागे दबाव आणि भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत त्यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशीची मागणी केली आहे.  डॉ. गोविंदराज यांच्या या निर्णयांमुळे प्रशासनिक गोंधळ उफाळून आल्याचे पाटील यांनी सांगितले.

१८ महिन्यांचा विलंब, कुणाचा दबाव?
आमदार कैलास पाटील यांनी सांगितले की, २३ फेब्रुवारी २०२४ रोजी १४० कोटींच्या रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रशासकीय आदेशानुसार, तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, ८ मार्च २०२४ रोजी निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर २९ मार्च २०२४ ते २४ जानेवारी २०२५ या सात महिन्यांच्या कालावधीत कोणतीही प्रगती झाली नाही. यामागील कारण म्हणजे चार निविदांपैकी एका बाहेरील कंत्राटदाराला दबाव टाकून माघार घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला. “हा सात महिन्यांचा विलंब कुणाच्या सांगण्यावरून झाला? याची चौकशी व्हायला हवी,” असे त्यांनी ठणकावले.

पाटील यांनी पुढे सांगितले की, महाविकास आघाडीने याबाबत  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवर नार्कोटेस्टची मागणी केली होती. त्यानंतर ६ जानेवारी २०२५ रोजी रस्ता रोको आंदोलन केले असता, मुख्याधिकाऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, निविदा प्रक्रिया २५ जानेवारी २०२५ रोजीच उघडण्यात आली. यावेळी चौथ्या कंत्राटदाराला ‘बीड व्हॅलिडिटी’च्या कारणास्तव अपात्र ठरवण्यात आले आणि सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या कंत्राटदाराला १५% अभावाने निविदा मंजूर झाल्याचा दावा पाटील यांनी केला.

नगरविकास प्रधान सचिव गोविंदराजांच्या विरोधाभासी शिफारशी: फेरनिविदा की कार्यारंभ आदेश?
या प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्या दोन वेगवेगळ्या शिफारशी असल्याचे पाटील यांनी उघड केले.  राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी २३ मे २०२५ रोजी झालेल्या बैठकीत स्पष्ट शिफारस केली की, निविदा प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी लक्षात घेता फेरनिविदा प्रक्रिया राबवावी. “उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सदर प्रकल्पाची विहित मार्गाने फेरनिविदेची राबविण्याची शिफारस केली आहे,” असे त्यांच्या शिफारशीत नमूद आहे.

मात्र, केवळ चार महिन्यांनंतर, त्याच समितीच्या १८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत डॉ. गोविंदराज यांनी पूर्णपणे उलट शिफारस केली. यावेळी त्यांनी सांगितले की, “तांत्रिक बाबींची पूर्तता करून उपरोक्त शिफारशीच्या पूर्ततेसह मुख्याधिकाऱ्यांनी कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात यावा.” एकाच अधिकाऱ्याने, एकाच समितीत, दोन परस्परविरोधी निर्णय का घेतले? “हा गोंधळ कुणाच्या दबावामुळे? गोविंदराज यांचा ‘गजनी’ झाला का? एका वेळी फेरनिविदा, दुसऱ्या वेळी वर्क ऑर्डर – यामागील कारण चौकशीतच बाहेर येईल,” असे पाटील यांनी सांगितले. त्यांनी पुढे नमूद केले की, २ मे २०२५ रोजी नगरपरिषद संचालकांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले होते की, कंत्राटदार तयार असेल तर चालू अंदाजपत्रक दराने काम करा, अन्यथा फेरनिविदा काढा. कंत्राटदाराने लेखी तयारी दाखवली असतानाही २३ मे २०२५ च्या बैठकीत फेरनिविदेची शिफारस का? “शासनाने याचे उत्तर द्यावे,” असे पाटील यांनी मागणी केली.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही या मुद्द्यावर बोलताना गोविंदराज यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. “प्रधान सचिवांसारखा वरिष्ठ अधिकारी दोन वेळा वेगळे बोलतोय, हे दबावाशिवाय शक्य नाही. नगरपालिकेच्या सी ओ ते प्रधान सचिवापर्यंत कोणाचा दबाव होता? याची एसआयटी चौकशी व्हायला हवी,” असे त्यांनी सांगितले. राजेनिंबाळकर यांनी नमूद केले की, पालकमंत्र्यांनी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नगरविकास मंत्र्यांना पत्र लिहून १८ सप्टेंबरच्या बैठकीचे इतिवृत्त स्थगित करण्याची मागणी केली होती, ज्यात बीड व्हॅलिडिटीच्या मुद्द्यावर तक्रार केली होती. मात्र, गोविंदराज यांच्या शिफारशींमुळे हा गोंधळ वाढला असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्र्यांचे आश्वासन आणि फेरनिविदेची शिफारस
महाविकास आघाडीने २८ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी पालकमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप करत उपोषण सोडवले आणि लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र, गोविंदराज यांच्या २३ मे २०२५ च्या शिफारशीमुळे फेरनिविदेचा निर्णय झाला. “कंत्राटदार तयार असतानाही फेरनिविदा का? यामागे कोणाचा हात?” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

खासदार राजेनिंबाळकरांचा हल्लाबोल
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भाजपवर जोरदार टीका करताना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचार आणि स्वार्थाचे आरोप केले. “निविदा प्रक्रियेला नऊ महिन्यांचा विलंब का झाला? मनासारखा कंत्राटदार निवडण्यासाठी हा विलंब जाणीवपूर्वक केला गेला का? १५% अभावाने निविदा देण्यामागे कोणाचा घाट होता?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या ‘लायकी’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना, “ज्या पक्षाने तुम्हाला ४० वर्षे मंत्रिपद दिले, त्या पक्षाला एका रात्रीत सोडून तुम्ही कमळाकडे गेलात. आम्ही मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत संकटकाळातही एकनिष्ठ राहिलो,” असे ठणकावले.

राजेनिंबाळकर यांनी पुढे सांगितले की, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात, त्यापैकी दीड वर्षे कोरोनामुळे गेली असतानाही, धाराशिवसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम बदलून मोठी कामे मार्गी लावली गेली. याउलट, सत्ताधाऱ्यांच्या ४० वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर गेला, अशी टीकाही त्यांनी केली.

६० कोटी वाचल्याचा दावा खोटा?
सत्ताधारी पक्षाने ६० कोटी रुपये वाचल्याचा दावा केला असला, तरी आ. पाटील यांनी हा दावा फेटाळला. “सध्या लागू असलेली दरसूची (DSR) २०२२-२३ चीच आहे. २०२३-२४ च्या दराने काम होणार असल्याचा दावा करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. जर फेरनिविदा झाली असती, तर ३०% बिलाने कामे झाली असती,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, जीएसटी दरात कपात झाल्याने खर्चात वाढ होण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी नमूद केले.

एसआयटी चौकशीची मागणी
महाविकास आघाडीने या प्रकरणात भ्रष्टाचार आणि दबावतंत्राचा वापर झाल्याचा आरोप करत एसआयटी चौकशीची मागणी लावून धरली आहे. “१८ महिन्यांचा विलंब, अपघात आणि जीवितहानी याला जबाबदार कोण? गोविंदराज यांच्या निर्णयांमागे कोणाचा दबाव? याची चौकशी झालीच पाहिजे. जर सरकारने एसआयटी नेमली नाही, तर आम्ही कोर्टात जाऊ,” असे राजेनिंबाळकर यांनी ठणकावले. तसेच, सत्ताधाऱ्यांना समोरासमोर चर्चेचे आव्हान देताना त्यांनी, “तारीख आणि वेळ ठरवा, आम्ही तयार आहोत,” असे जाहीर केले.

नागरिकांचा त्रास आणि जबाबदारी
पाटील आणि राजेनिंबाळकर यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना झालेल्या त्रासावर आणि अपघातांमुळे झालेल्या जीवितहानीवर दु:ख व्यक्त केले. “१८ महिन्यांत ही कामे पूर्ण झाली असती, तर नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळाले असते. गोविंदराज यांच्या विरोधाभासी शिफारशींमुळे हा त्रास वाढला. याला जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे सांगितले की,  मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना निवेदन देऊन या प्रकरणात, विशेषतः गोविंदराज यांच्या निर्णयांवर, एसआयटी चौकशीची मागणी करणार आहेत.


धाराशिवमधील रस्त्यांच्या कामांना झालेल्या विलंबावरून महाविकास आघाडीने सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनावर भ्रष्टाचार आणि दबावतंत्राचे गंभीर आरोप केले आहेत. नगरविकास प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांच्या दोन विरोधाभासी शिफारशींमुळे निर्माण झालेल्या गोंधळावर विशेष प्रकाश टाकत त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. हा वाद पुढील काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, ज्यात गोविंदराज यांच्या भूमिकेची सखोल तपासणी अपेक्षित आहे.

भाजप प्रवक्त्यांच्या प्रसिद्धीपत्रकाचा फुसका बार !

खा. राजेनिंबाळकर आणि आ. पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे प्रवक्ते नितीन भोसले यांनी प्रसिद्धिपत्रक काढले वास्तविक काल आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी 18 महिन्याचा विलंब का लागला या प्रश्नाला उत्तर दिले नव्हते मात्र आज आ. कैलास पाटील आणि खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेतल्यावर एक प्रसिद्धिपत्रक काढले ते केवळ फुसका बार असल्याचे बोलले जात आहे. भाजप जिल्हा प्रवक्ते भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,


धाराशिव शहर नगरोत्थान योजनेतून रस्त्यांच्या कामासाठी संभाजीनगरच्या आपल्या लाडक्या कंत्राटदाराला काम मिळाले नाही म्हणूनच आमदार कैलास पाटील व खासदार राजेनिंबालकर यांचा तिळपापड सुरू आहे.

त्यासाठीच वारंवार यंत्रणेवर तुम्ही दबाव आणला. या दबावामुळे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी यावर कांहीही कारवाई केली नाही. परिणामी इतके दिवस काम रखडले. शहरवासीयांना खड्ड्यात रहावे लागले.

तुमच्या नाकर्तेपणामुळे शहराची जी बकाल अवस्था झाली आहे, त्याचा नागरिकांना होणारा त्रास वाचवण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाठपुरावा करून १४० कोटी निधो आणला. जे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना सुचले तेच शहाणपण तुम्हाल तुमच्या सत्ताकाळात का सुचलं नाही?

पालिका तुमच्याकडे, आमदार तुम्ही, खासदार तुम्ही, राज्याचे प्रमुख तुमचेच नेते असे असतानाही शहरातील खराब रस्त्यांना एक रुपया देखील निधी आपण आणू शकला नाहीत. आणि आता तुम्ही नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल बोलत आहेत. तुम्हाला नागरिकांची काळजी नसून तुमच्या लाडक्या कंत्राटदाराला काम मिळाले नाही याचे जास्त दुःख आहे हे जनतेला ठाऊक आहे.

बरे झाले तुम्ही एसआयटीचा मुद्दा उपस्थित केला. नसता आम्हीच एसआयटीची मागणी करणार होतो. कारण धाराशिव-बेंबळी-उजनी रस्त्याचे काम टक्केवारीसाठी दोन वर्षे कोण अडवलं.? येरमाळा-कळंब रस्त्याचे काम टक्केवारीसाठी कोण अडवलं.? पवनचक्कीच्या कामात कोणाचे हात काळे झाले आहेत..? कोणाचा भाऊ तेर-तुळजापूर रस्त्याच्या कामात पार्टनर आहे..? कोणाचा भाऊ धाराशिव-औसा रस्त्याच्या कामात पार्टनर आहे..? त्याचा कंत्राटदार कोण आहे..? कोणाचा मामा महावितरणची कामे करतो..?  याची देखील एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करण्याचीही धमक आपण दाखवणार का?

धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन

रस्त्याच्या कामाला उशिर का झाला त्यात पडायचं नाही, नार्को टेस्टबद्दल विरोधकांसोबत वन टू वन करणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव – 23 फेब्रुवारी 2024 रोजी मंजूर झालेल्या 59 रस्त्यांच्या 140 कोटींच्या कामाचे कार्यारंभ आदेश अखेर निघाले असून, खड्डेमय रस्त्यांचा 18 महिन्यांचा अनुभव घेतलेल्या धाराशिवकरांना आता नव्या रस्त्यांची आशा दिसू लागली आहे. या कामाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कामाला उशीर का झाला, असा प्रश्न विचारला असता “त्यात पडायचं नाही,” असे उत्तर आमदार पाटील यांनी दिले. तर विरोधकांनी केलेल्या नार्कोटेस्टच्या मागणीवर बोलताना ते म्हणाले, “वन टू वन करायला तयार आहे, पत्रकारांनी तेव्हा उपस्थित रहावं.”

साधारण 26 किलोमीटर लांबीचे 59 प्रमुख रस्ते आणि नाल्यांचे काम या निधीतून होणार आहे. या प्रकल्पाचा शासन निर्णय 23 फेब्रुवारी 2024 रोजी झाला होता, परंतु प्रशासकीय कारणांमुळे तो पुढे ढकलला गेला. आता वर्क ऑर्डर मंजूर झाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले. या निधीच्या मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि संपर्क मंत्री जयकुमार गोरे यांचेही त्यांनी आभार मानले.

धाराशिवमध्ये तुळजापूर आणि नळदुर्गप्रमाणेच दर्जेदार रस्ते बांधले जातील, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाला 18 महिन्यांची मुदत असून, उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, आमदार पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीने तीव्र प्रतिक्रिया दिली. “दिड वर्षांपासून रखडलेल्या 140 कोटींच्या रस्ते कामाचे कार्यारंभ आदेश आता काढले जात आहेत. भाजप याचा गाजावाजा करत असले तरी प्रक्रिया एवढे दिवस का थांबली, याचे उत्तर त्यांनी द्यावे,” अशी बोचरी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली.https://youtu.be/AupKIDABrDo

महाविकास आघाडीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, “स्वतः रस्ते कामांची अडवणूक करायची आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरु होत असल्याचा दिखावा करायचा ही राणाजगजितसिंह पाटील यांची जुनी खोड आहे. निविदा रकमेपेक्षा 22 कोटी अधिक देऊन आपल्या गुत्तेदाराला काम देण्यासाठी धाराशिवकरांना दिड वर्ष अडवून ठेवले. अखेर त्याच्याच पदरात हे काम देऊन कार्यारंभ आदेश काढले गेले. राणा पाटील यांचा खरा चेहरा आता सर्वांसमोर आला आहे.”

आघाडीच्या नेत्यांनी पुढे म्हटले, “ही कामे सुरु व्हावीत म्हणून आम्ही आंदोलन, उपोषण, रास्ता रोको आणि पालकमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शहरवासियांच्या माथी बसणारा अतिरिक्त 22 कोटींचा बोजा वाचवण्यात आघाडीला यश आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कामे सुरु करणे क्रमप्राप्त होतेच, अन्यथा शहरात मते मागायला कोणत्या तोंडाने जायचे हा विचार करून सरकारला शहाणपण सुचले आहे.”

हे प्रसिद्धीपत्रक काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष अय्याज शेख आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केले असून, “कारण काहीही असो, पण शहरवासियांच्या हक्काच्या रस्त्यांची कामे आता तरी तातडीने सुरु व्हावीत,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!

धाराशिव –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांची जिल्हास्तरीय आढावा बैठक कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र या बैठकीत केवळ सात ते आठ महिला उपस्थित होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर पदे आरक्षित आहेत. विशेष म्हणजे, ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. तसेच धाराशिव नगरपालिकेचे अध्यक्षपद ‘इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला’ प्रवर्गासाठी, तर कळंब आणि भूम नगरपालिकांची अध्यक्षपदे ‘खुला प्रवर्ग महिला’ यासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा आणि मुरूम या नगरपालिकांची अध्यक्षपदे सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) पुरुषांसाठी राखीव ठरली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’ येणार असले तरी राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत महिलांचा सहभाग नगण्य असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पक्षाकडे महिला पदाधिकारीच नसतील, तर आगामी निवडणुकीत अध्यक्षपदांसाठी महिला उमेदवार मिळतील का, हा प्रश्न या बैठकीनंतर चर्चेत आला आहे. आणि जर महिला उमेदवार मिळाल्या तरी त्या निवडून आल्या तर त्या केवळ ‘नामधारी’ राहतील, अशी टीकाही होत आहे.

या बैठकीत माजी आमदार राहुल मोटे यांच्या समर्थकांची उपस्थिती लक्षणीय होती, त्यामुळे सभागृहातील खुर्च्या रिकाम्या राहिल्या नाहीत.

धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे शिक्षक आमदार विक्रम काळे आहेत. मात्र त्यांच्या उपस्थितीतही या बैठकीत महिलांचा सहभाग अत्यल्प होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादीला भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या पाठबळावर लढवाव्या लागतील, अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.

महिला धोरणाचा पाया रचणारे शरद पवार यांच्यापासून विभक्त झालेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत महिलांना आता स्थान नाही का, असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. पुरुषांच्या हातातच सत्तेची सूत्रे ठेवण्याचा वाढता कल हा महिलांच्या राजकीय आरक्षणासाठी आणि त्यांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी धोक्याचा संकेत मानला जात आहे.

कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून विकी चव्हाण यांच्या नावाची चर्चा जोरात

धाराशिव –
जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच राजकीय पातळीवर नवे समीकरण घडू लागले आहे. तेरखेडा गट हा यंदा सर्वसाधारण गटासाठी राखीव सुटल्याने, या गटातून तरुण व दमदार व्यक्तिमत्व असलेल्या विकी चव्हाण यांच्या नावाची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.

गेल्या काही वर्षांपासून समाजकारण, कुस्ती आणि व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या विकी चव्हाण यांनी आता राजकारणाच्या रिंगणात उतरण्याची मनोमन तयारी सुरू केली असल्याचे समजते.

विकी चव्हाण हे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले, पण मेहनत, मैत्री आणि मनमोकळ्या स्वभावामुळे ओळख निर्माण केलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लांना धूळ चारली असून, आता राजकीय आखाड्यात शड्डू ठोकण्याची वेळ आली आहे, असे त्यांच्या जवळच्या वर्तुळात म्हटले जात आहे.

राजकीयदृष्ट्या ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री तानाजी सावंत, धनंजय सावंत, आणि प्रतापसिंह पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. तानाजी सावंत यांच्या विजयात विकी चव्हाण आणि त्यांच्या टीमचा मोठा वाटा राहिला असल्याची चर्चाही गाजत आहे.

व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकणाऱ्या विकी चव्हाण यांचे कार्यकर्ते, मित्रमंडळी आणि चाहत्यांचा मोठा वर्ग असून, तेरखेडा गटातून उमेदवारीची संधी मिळाल्यास या “मल्ला”चं सोनं होईल, असा आत्मविश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये दिसून येतो.

धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

धाराशिव : आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर धाराशिव नगरपरिषदेने प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या आहेत. या प्रकरणी मुख्याधिकारी श्रीमती निता अंधारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार धाराशिव नगरपरिषदेची प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली. तथापि, या यादीत अनेक गंभीर अनियमितता आढळल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.

तक्रारीनुसार, मुळ प्रभागातील मतदारांचा इतर प्रभागात समावेश, काही प्रभागांतील मतदारसंख्या कमी दाखविणे, दुबार नावे दाखविणे, तसेच अनुसूचित जाती आरक्षित प्रभागांतील मतदार कमी दर्शविणे अशा अनेक त्रुटी झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी  किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) यांनी मुख्याधिकारी निता अंधारे यांच्यावर मतदार यादी तयार करताना गंभीर दुर्लक्ष आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नोटिशीत नमूद केल्याप्रमाणे,

“निवडणुकीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेकडे गांभीर्य न दाखविता नियम व सुचनांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे आपणास जबाबदार धरून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७६ नुसार कार्यवाही प्रस्तावित केली जाऊ शकते.”

मुख्याधिकारींनी याबाबतचा स्वयंस्पष्ट खुलासा दोन दिवसांत जिल्हाधिकारी समक्ष सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुदतीत खुलासा न मिळाल्यास किंवा समाधानकारक नसल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.

धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीतील या अनियमिततेमुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याबाबत नागरिकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

धाराशिव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर

धाराशिव प्रतिनिधी :
धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गटांचे आरक्षण अखेर आज (सोमवार) जाहीर करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून जिल्ह्यात या आरक्षणाबाबत चर्चा रंगली होती. आज आरक्षण निश्चित झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली आहे.

आरक्षण जाहीर होताच तालुक्यांतील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून विविध पक्षांनी संघटनात्मक हालचालींना गती दिली आहे. महिला उमेदवारांनाही यंदा मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाली आहे.


🔹 अनुसूचित जातीसाठी राखीव गट – ९ (महिला – ५)

सिंदफळ (महिला), वडगाव सि. (महिला), डिकसळ (महिला), सांजा, येरमाळा (येरमाळा), काक्रबा, खामसवाडी, सास्तुर (महिला), शहापूर.


🔹 अनुसूचित जमातीसाठी राखीव गट – १

ढोकी.


🔹 इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी राखीव गट – १४ (महिला – ७)

वालवड (महिला), शिराढोण, उपळा (महिला), पळसप, येडशी, काटी (महिला), काटगाव, लोणी (महिला), येणेगुर (महिला), मोहा (महिला), मंगरूळ, पाथरूड, तुरोरी (महिला), सुकटा (महिला).


🔹 सर्वसाधारण गटासाठी राखीव – ३१ (महिला – १६)

ईट (महिला), आष्टा, पारगाव (महिला), पारा (महिला), तेरखेडा, ईटकुर, मंगरुळ (महिला), नायगांव, कोंड (महिला), तेर (तेर), अंबेजवळगा (महिला), पाडोळी, केशेगाव (महिला), बेंबळी, शेळगाव, आनाळा (महिला), जवळा (नि.), डोंजा, जळकोट (महिला), अणदूर, नंदगाव, कानेगाव (महिला), माकणी (महिला), जेवळी (महिला), कवठा, बलसूर (महिला), कुन्हाळी (महिला), गुंजोटी, दाळिंब, आलूर, कदेर (महिला).


आरक्षणाच्या घोषणेनंतर काही गटांमध्ये समाधान तर काही ठिकाणी नाराजीचे सूरही उमटले आहेत. काही नेत्यांनी अपेक्षित गट त्यांच्या प्रवर्गासाठी न राखीव झाल्याने नाराजी व्यक्त केली असून, यापुढील काही दिवसांत राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या आरक्षणामुळे महिलांसाठीचा राजकीय सहभाग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अनेक नवीन चेहरे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरतील, अशी शक्यता आहे.


सहा महिन्यांपासून फरार असलेला ड्रग्ज तस्कर ‘मस्तान भाई’ परंड्यात जेरबंद

परंडा पोलिसांची मोठी कारवाई


अंमली पदार्थ रॅकेटचा ‘मुख्य पुरवठादार’ गजाआड; गुन्हेगारी जगतात खळबळ

परंडा (दि. ११ ऑक्टोबर):
अंमली पदार्थ तस्करी (ड्रग्ज रॅकेट) प्रकरणातील मुख्य आरोपी आणि गेल्या सहा महिन्यांपासून बार्शी व सोलापूर पोलिसांना गुंगारा देणारा फिरोज उर्फ मस्तान शेख याला परंडा पोलिसांनी पकडण्यात मोठे यश मिळविले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा परंडा शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात ही कारवाई करण्यात आली. या ड्रग्ज रॅकेटमधील मुख्य पुरवठादार अटकेत आल्यानंतर गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

फिरोज उर्फ मस्तान शेख हा एनडीपीएस (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार होता. शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलिस फौजदार गजानन मुळे आणि पोलिस अंमलदार राहुल खताळ हे शहरातील उपजिल्हा रुग्णालयात एका रुग्णाला भेटण्यासाठी गेले असता, रुग्णालय परिसरातील गोल्डन चौक येथे त्यांना हा फरार आरोपी दिसला.

बार्शी आणि सोलापूर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद असलेला आणि अत्यंत चलाखीने पोलिसांपासून लपत असलेला मस्तान दिसताच, सहाय्यक फौजदार गजानन मुळे आणि अंमलदार राहुल खताळ यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि अत्यंत शिताफीने फिरोज उर्फ मस्तान शेख यास अटक करून परंडा पोलिस ठाण्यात आणले.

अटकेनंतर तात्काळ सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेला या घटनेची माहिती देण्यात आली. शनिवारी सकाळी पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपीला सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

मस्तान शेख हा अंमली पदार्थ तस्करीतील मुख्य पुरवठादार असून, तो इतर राज्यांतून ड्रग्ज आणून परंडा परिसरातून इतर डिलर्स व किरकोळ विक्रेत्यांना विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाकणीजवळ झालेल्या १८ ग्रॅम ड्रग्ज कारवाईत मस्तानचे नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आले होते. बार्शी येथील गुन्ह्यात फरार असतानाही त्याने ड्रग्ज तस्करी सुरूच ठेवली होती.

या अवैध धंद्यातून फिरोजने मोठी संपत्ती जमवून परंडा शहरात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. किरकोळ कारणांवरून त्याने परंडा शहरातील मुख्य चौकात दोन वेळा हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची माहिती आहे. मात्र, या फायरिंग प्रकरणी पोलिसात कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही, असे सांगण्यात आले. मस्तानच्या अटकेनंतर शहरातील अवैध धंदे आणि दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर पोलिसांचा वचक अधिक वाढणार आहे.


उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांनी केले पोलिसांचे विशेष कौतुक

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनिल चोरमले यांनी परंडा पोलिस ठाण्यात भेट देऊन सहाय्यक पोलिस फौजदार गजानन मुळे आणि पोलिस अंमलदार राहुल खताळ यांच्या सतर्कतेचे व धाडसाचे विशेष कौतुक केले.

या कारवाईत पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब खरात, सहाय्यक पोलिस फौजदार गजानन मुळे, पोलिस अंमलदार राहुल खताळ, शिंदे आणि शिवाजी राऊत आदींचा सहभाग होता.

मसला खुर्द येथे सभागृह पाडले; प्रशासनाची डोळेझाक!

मसला खुर्द (ता. तुळजापूर) येथे शासकीय निधीतून उभारलेले नव्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण होऊन अवघे सहा महिने होत नाही तोच ते जमीनदोस्त करण्यात आल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निधीतून तब्बल १० लाख रुपयांचा खर्च करून बांधलेले हे सभागृह अद्याप ताबा प्रक्रियेत असतानाच पाडण्यात आले. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकरणी मसला खुर्द येथील नागरिक हर्षद गुलाब पाटील यांनी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊनही कारवाईची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांत प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, “शासकीय नवीन बंदिस्त सभागृह कामाचा ताबा पूर्ण न होता पाडण्यात आले आहे. या प्रकाराबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी करण्यात आली आहे.

हे सभागृह आमदार राणा पाटील यांच्या विकासनिधीतून उभारण्यात आले होते. केवळ सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झालेले हे बांधकाम अचानक पाडण्यात आल्याने गावात आश्चर्य आणि संतापाचे वातावरण आहे. या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी देवानंद रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

तक्रार दाखल होऊन आठवडा उलटला असतानाही प्रशासनाने ग्रामपंचायतीवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना अभय मिळत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांचा प्रश्न आहे — शासकीय निधीचा असा उघड अपव्यय होत असताना संबंधित अधिकारी गप्प का बसले आहेत? प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे तात्काळ लक्ष देऊन दोषींवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.