Home Blog Page 4

पेड पीआरओ टीम ने केलेला अन् अंगलट आलेला कार्यक्रम ,आधी शेतकरी वाचवा नंतर खुर्ची

जिल्हाधिकारी हे केवळ पद नसून ती एक जबाबदारी आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा देवीच्या गाण्यावर ठेका धरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् गोंधळ उडाला त्याला कारण होते जिल्हाभरात शेतीचे, शेतकऱ्यांचे, पशुपालकांचे झालेले नुकसान. एकीकडे माय बाप शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन ठेका धरतात ही चिड आणणारी गोष्ट आहे. राज्यभरातून या घटनेवर टिका टिपण्णी झाली पडसाद उमटले. अमोल जाधव या शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले तिथे पोलिसांनी केलेली बाचाबाची महाराष्ट्राने पाहिली. त्याच्या काही वेळानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा दिलगिरी व्यक्त केलेला संदेश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला. दिलगिरी व्यक्त करताना पुन्हा जो दिलदारपणा हवा होता तो मात्र दिसला नाही कुठल्याही अधिकृत लेटरपॅड किंवा साधी सही नसलेला मजकूर अधिकृत मानावा की अनधिकृत हा प्रश्न त्यातून निर्माण होतो. पण हे झाले कशामुळे याचे मूळ कुठे आहे हा प्रश्न अजून अनुत्तरित होता त्याचे मूळ आहे प्रसिद्धित. तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे कव्हरेज करण्यासाठी एक पी आर ओ टीम नेमल्याची चर्चा आहे त्या पी आर ओ टीम ने जिल्हाधिकाऱ्यांची प्रसिद्धी करण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता मात्र प्रकरण अंगलट आले. पत्रकारितेचा अनुभव नसताना राजकीय लोकांच्या टोळीत राहिलेल्यांना प्रसिद्धीचे काम दिले गेले की अशी बोंब होते हे जगातील सर्वात अवघड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना कोण समजावून सांगणार? विशेष म्हणजे त्याच पी आर ओ टीम ने तो व्हिडिओ हटवून टाकला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात इतर माध्यमे चालवत असलेली पोस्ट टाकली.

जिल्हाधिकारी आणि प्रशासन पूर,नुकसान या आपत्तीमध्ये काम करत आहे का तर याचे उत्तर हो आहे. मात्र प्रसिद्धीच्या नादात अप्रत्यक्षपणे झालेला हा प्रकार त्यातून प्रशासनाची झालेली बदनामी, चांगल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यावर ही वेळ कशामुळे आली याचे चिंतन कोण करणार?

जिल्हाधिकारी त्यांचे करत असलेले काम याबाबत पुन्हा सोशल मीडियातून बाजू लावून धरण्याचा प्रयत्न होत आहे ते किती चांगले काम करत आहेत याबद्दलच्या पोस्ट फिरवल्या जात आहेत. एक लोकसेवक म्हणून त्यांची जबाबदारी ते योग्यरित्या पार पाडत आहेत आपत्ती आणि उत्सव यातील समतोल राखताना अशी गडबड होऊ शकते हे मान्य मात्र तुळजाभवानी देवी आणि तुळजापूरच्या सकारात्मक बातम्या धाराशिव जिल्ह्यातील माध्यमे नेहमीच प्रसिद्ध करतात मात्र असे असताना तुळजाभवानीच्या निधीतून किंवा जिल्हा प्रशासनाच्या निधीतून पेड जनसंपर्क करावा लागतो हे खेदजनक नाही का? जिल्ह्यातील नागरिक जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन घेऊन येतात मात्र त्यांची निवेदने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारावी असा वेगळा पायंडा पाडला गेला हे लोकशाहीला धरून आहे का? जिल्हाधिकारी हे पद राजकीय नसून प्रशासनातील सेवेचे पद आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते जिल्ह्यात आलेले आहेत त्यांच्याकडून सेवा मिळावी हीच प्रामाणिक अपेक्षा आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत कोणाचे वैयक्तिक वैर नाही किंवा आकस देखील नाही मात्र जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर एकमेकांच्या हातात हात घालून चालणे अपेक्षित आहे.

हा धार्मिक कार्यक्रम नाही

ज्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरला तो कार्यक्रम पूर्वापार चालत आलेला नसून तुळजाभवानी देवीच्या नित्य कार्यक्रमाचा आणि या कार्यक्रमाचा कुठलाही संबंध नाही. मात्र या प्रकरणी सत्ताधारी राजकीय पक्षाकडून सोशल मीडियावर कँपेनिंग सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांना नव्हे तर त्या पीआरओला जो सत्ताधारी पक्षाचे काम पाहतो त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शेतीचे पंचनामे, शेतकऱ्यांना मदत आवश्यकता

या प्रकरणात थेट प्रशासनाचे प्रमुख असल्याने गेल्या दोन दिवसात प्रशासनाची काम करण्याची गती कमी झाली असून शेतकऱ्यांना जलद मदत मिळण्यासाठी सरकारने, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणे आवश्यक असून शेतकऱ्यांना फटका बसणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

प्रसिद्धीच्या टेंडरची आता तरी माहित्या द्या

तुळजाभवानी च्या नवरात्र महोत्सवाची प्रसिद्धी करण्यासाठी एक टेंडर काढल्याची चर्चा आहे मात्र पत्रकारांना याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाने अद्याप दिली नसून किमान आता तरी ही माहिती द्यायला हवी खर्च होणारा पैसा कसा खर्च होतो आहे, तरदतूद कुठून केली आहे याची माहिती सर्वसामान्यांना मिळायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आकाश नरोटे

कार्यकारी संपादक

दैनिक जनमत

सही न केलेला माफीनामा, जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा एकदा शेतकऱ्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न

धाराशिव – जिल्हाधिकारी व उप जिल्हाधिकारी यांचा सोशल मीडियावर नाच करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून प्रेस नोट काढण्यात आली प्रशासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांबाबत दिलगिरी व्यक्त करणारी एक प्रेस नोट जाहीर केली. मात्र या प्रेस नोटमुळेच नवीन वादळ उठले आहे. कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याची यात सही नाही. ज्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची एव्हाना ज्या माय बाप जनतेच्या कराच्या पैशातून त्यांचे वेतन होते त्यांची दिलगिरी व्यक्त करताना खाली सही करावी वाटत नाही हे खेदजनक आहे.

समाजसेवक मनोज जाधव यांनी या प्रेस नोटवर जोरदार हल्लाबोल केला असून, “ही नोट अधिकृत आहे की दिशाभूल करण्यासाठी तयार करण्यात आली आहे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

जाधव म्हणाले की, या प्रेस नोटमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव नाही, जिल्हाधिकारी कार्यालयाचा लेटरपॅड नाही, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. अशा परिस्थितीत ही नोट अधिकृत मानायची कशी? प्रशासनाने ही भूमिका घेत शेतकऱ्यांची थेट दिशाभूल केली असल्याची टीका त्यांनी केली.
याचबरोबर जाधव यांनी प्रशासनास ठाम इशारा दिला की,

“तुम्ही अधिकृत प्रेस नोट जाहीर करा किंवा प्रसारमाध्यमांसमोर येऊन शेतकऱ्यांची माफी मागा. अन्यथा मी माझ्या आंदोलनावर ठाम राहीन व कोणत्याही क्षणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडेन.”
पूरग्रस्त शेतकरी आधीच संकटातून जात असताना, प्रशासनाचे हे हलगर्जीपण व चुकीची भूमिका धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.

माफी मागणे म्हणजे स्वतः केलेल्या चुकांची कबुली देऊन ती क्षमा करण्याची विनंती करणे.यात आपली चूक मान्य केली जाते आणि समोरच्या व्यक्तीकडून क्षमा मागितली जाते.
दिलगिरी व्यक्त करणे म्हणजे काही अयोग्य, दुःखद किंवा नकोसे घडले याबद्दल खंत आणि सहानुभूती व्यक्त करणे.यात नेहमीच स्वतःची चूक असतेच असे नाही; कधी कधी परिस्थितीमुळे झालेल्या त्रासाबद्दलही दिलगिरी व्यक्त केली जाते.

सध्या जिल्ह्यातील वातावरण तापले असून, प्रशासनाची कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समाजसेवक मनोज जाधव यांचा लढाऊ इशारा आता प्रशासनाला हादरवणारा ठरणार का? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अनेक गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून मदत व बचाव कार्याला गती देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच इतर मंत्र्यांचे दौरे होणार असल्याने प्रशासनाकडून सज्जता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद धाराशिवच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक २३ सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद व तिच्या अधिनस्त सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी २३ ते २६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुख्यालयी अनिवार्य उपस्थित राहणे आवश्यक आहे.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या परिपत्रकात स्पष्ट सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. त्यानुसार—

  • कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये.
  • अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही स्वरूपाची रजा मंजूर करण्यात येऊ नये.
  • सर्व विभाग प्रमुख व क्षेत्रीय स्तरावरील कार्यालय प्रमुख यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना सूचित करावे.
  • कोणत्याही स्तरावर झालेल्या कुचराईसाठी संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल.

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी ही पावले उचलण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान मदत व बचाव कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, यावर प्रशासनाने भर दिला आहे.

परिपत्रकात विशेषतः नमूद करण्यात आले आहे की, क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारीदेखील पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाहीत. याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखांवर टाकण्यात आली आहे.

पुरपरिस्थितीत मदत व बचाव कार्यात कोणतीही कुचराई राहू नये तसेच प्रशासनाचा वेग मंदावू नये, यासाठी जिल्हा परिषदेकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलेला हा आदेश अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

वाशी तालुक्यातील फक्राबाद गावात शिरले मांजरा नदी पुराचे पाणी


वाशी (प्रतिनिधी):
वाशी तालुक्यातील फक्राबाद गावचा मांजरा नदीला आलेल्या महा भयंकर पुरामुळे संपर्क तुटला असून मोबाईल द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, फक्राबाद गावातील सहा घरांत पाणी शिरले असून प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी कोणाशीही संपर्कात नाहीं. त्यामुळे फक्राबाद गावातील नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. जीव मुठीत धरून हे नागरिक आपल्या कुटुंबासमवेत गावात राहत आहेत.लवकरात लवकर आम्हाला सुरक्षित स्थळी हलवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

स्वस्थ नारी सशक्त परिवार शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र पारा येथे संपन्न

वाशी (प्रतिनिधी):
महिला सशक्तीकरण साठी स्वस्थ नारी सशक्त परिवार या शिबिरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास सर यांच्या सूचनेप्रमाणे वाशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ महिंद्रकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 19 सप्टेंबर रोजी वाशी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पारा येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार शिबीर चा शुभारंभ अंगणवाडी पर्यवेक्षिका मुरकुटे मॅडम, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ शिंदे सर, बालरोगतज्ज्ञ डॉ सूळ सर, दंतचिकित्सक डॉ देवगिरे मॅडम या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला, यावेळी नेत्र चिकित्सक श्री गायकवाड उपस्थित होते.
या शिबीर अंतर्गत महिलांचे आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी महिलांचे विविध आजार, गरोदर माता तपासणी, बालकांची तपासणी, बालकांचे लसीकरण,दातांची तपासणी, डोळयांची तपासणी, महिला व एकात्मिक बालविकास च्या माध्यमातून अंगणवाडी सेविका यांनी पोषण आहाराबाबत सर्व रुग्णांना माहिती दिली, प्रा आ केंद्र प्रयोगशाळा अंतर्गत HB, मधुमेह तपासणी व महालॅब मार्फत सिकलसेल व इतर आरोग्य तपासन्या करण्यात आल्या.
टीबी आजाराविषयी जनजागृती तसेच बेडका तपासणी करण्यात आली,आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्ड, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत मोबाईल मेडिकल व्हॅन च्या माध्यमातून एक्सरे काढण्यात आले.एकूण 210 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ शिवानी पाटील मॅडम, डॉ किलचे सर यांनी या शिबीर साठी मोलाचे परिश्रम घेतले.वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,औषध निर्माण अधिकारी, वाहन चालक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, महालॅब तंत्रज्ञ, गट प्रवर्तक, आशा कार्यकर्ती, अर्धवेळ स्त्री परिचर, पु परिचर, अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांनी मोलाचे सहकार्य केले.

भूम पंचायत समिती कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

वाशी, दि. १७ (प्रतिनिधी) – भूम पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर पैशाच्या मोबदल्यात झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून पुढील तपासात आणखी साथीदारांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ईट–जातेगाव रोडवर किनारा हॉटेलजवळ श्रीकृष्ण अर्जुन बांगर (वय ३९, रा. पाटोदा, जि. बीड) व त्यांचे सहकारी रविंद्र राख हे बोलेरो गाडीतून जात असताना चार अनोळखी इसमांनी गाडी अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत दोघांना रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९०/२०२५ भा. न्याय संहिता कलम १०९ (१), ११५ (२), ११८ (१), ३५१ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. पोलिस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सलमान पठाण (रा. भूम) व रितेश अंधारे (रा. हाडोंगरी) या दोघांना येरमाळा उड्डाणपुलाजवळून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पैशाच्या मोबदल्यात हा हल्ला केल्याची कबुली दिली तसेच इतर साथीदारांची नावेही सांगितली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, दयानंद गादेकर, चालक नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे व प्रकाश बोईनवाड यांनी सहभाग घेतला.

ही धाडसी कारवाई पोलिस अधीक्षक  रितू खोखर व अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पालकमंत्र्यांच्या आदेशाला जिल्हाधिकाऱ्यांचा खो

तुळजापूर विकास आराखडा : प्रशासनाच्या भूमिकेवर संशय

धाराशिव – तुळजापूर विकास आराखड्याबाबतची गोंधळलेली स्थिती अजूनही कायम असून यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पालकमंत्र्यांच्या आदेशालाच खो दिल्याचे समोर आले आहे.

15 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांना स्पष्ट निर्देश दिले होते – “सात दिवसांच्या आत नागरिकांना विकास आराखड्याचे प्रेझेंटेशन दाखवा आणि बैठक घ्या.” मात्र 16 सप्टेंबरपर्यंत अशी कोणतीही बैठक घेतली गेली नाही. परिणामी, पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.

स्थानिक नागरिक धीरज कदम पाटील यांनीही याची पुष्टी करत सांगितले की, “आम्हाला अजूनपर्यंत प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून बोलावले गेलेले नाही.”

याआधी नागरिकांनी विकास आराखड्याचे प्रेझेंटेशनच दाखवले गेले नसल्याची तक्रार केली होती. आता उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानंतर पालकमंत्री सरनाईक स्वतः याची चौकशी करतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी होणारी बैठक तुळजापूर विकास आराखड्याच्या भवितव्याची दिशा ठरवणारी ठरणार आहे.

15 ऑगस्ट च्या बैठकीत काय घडलं होतं याबाबत थोडक्यात…

तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात आक्षेपांची सुनावणी न घेणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग असल्याची खंत पालकमंत्री तथा तुळजापूर विकास आराखडा समितीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी तुळजापूरचे स्थानिक नागरिक व पालकमंत्री यांच्यात बैठक झाली.

विकास आराखड्याचे प्रेझेंटेशन स्थानिक नागरिकांना दाखवले गेले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना दिली. तसेच या विकास आराखड्यास किती लोकांची संमती आहे, याची माहिती लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देशही दिले.स्थानिकांच्या घरांवर बुलडोझर फिरवला जाणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिला.


तुळजापूर मंदिर विकासासाठी 1988 आणि 2012 मध्ये जागा दिली असून, त्यावेळी विरोध झाला नव्हता. मात्र आता आणखी किती जागा द्यायची, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. मंदिराजवळील घरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याने त्यांना हेरिटेज दर्जा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.


या आराखड्यासाठी हेमंत पाटील हेच आर्किटेक्ट असल्याचे, आणि ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे ऐकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पहिल्या आराखड्यात आमची घरे नव्हती, मात्र दुसऱ्या व तिसऱ्या आराखड्यात ती दाखवली गेली, हे संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्याचे आठवडाभर आधी ठरले होते. मात्र बाधित नागरिकांना त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याबाबत तहसीलदार उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.


पालकमंत्री  प्रताप सरनाईक यांचा धाराशिव जिल्हा दौरा

धाराशिव, दि. १२ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक येत्या १५ ते १७ सप्टेंबर २०२५ दरम्यान पुणे, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध विकासकामांचे उद्घाटन, पाहणी आणि बैठका घेणार आहेत.

१५ सप्टेंबर: पुणे जिल्हा दौरा
मा. मंत्री सरनाईक यांचा दौरा सोमवारी, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता लोणावळा बस स्थानक (MSRTC), पुणे येथून सुरू होईल. येथे ते बस स्थानकाची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता खाजगी वाहनाने (MH-04-MP-7578) चाकण (MIDC), ता. खेड येथे रवाना होतील. दुपारी ११:४५ वाजता चाकण येथील मर्सिडीज बेंझ कंपनीला सदिच्छा भेट देऊन ते चर्चा करतील. यावेळी श्री. सत्यजीत पाटील (मो. ९७३०८१११००) उपस्थित राहतील. दुपारी १:३० वाजता ते VVIP सर्कीट हाऊस, पुणे येथे पोहोचतील आणि दुपारी २ वाजेपर्यंत विश्रांती घेतील. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पोहोचून रात्रीचा मुक्काम करतील.

१६ सप्टेंबर: सोलापूर आणि धाराशिव दौरा
मंगळवारी, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांसमवेत सोलापूर जिल्ह्यातील विविध विषयांवर बैठक होईल. दुपारी १:१५ वाजता ते तूळजापूर, जि. धाराशिव येथे रवाना होतील आणि दुपारी २:१५ वाजता तुळजाभवानी मंदिर, तूळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ च्या तयारीची पाहणी आणि आढावा बैठक घेतील. यावेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी उपस्थित राहतील. सायंकाळी ५:३० वाजता ते धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील आणि सायंकाळी ६ वाजता धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील. रात्री ९ वाजता याच ठिकाणी मुक्काम करतील.

१७ सप्टेंबर: धाराशिव जिल्हा दौरा
बुधवारी, दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८:२५ वाजता मा. सरनाईक शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. सकाळी ८:४५ वाजता ते “मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिन” समारंभाला उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे “उम्मीद निदान केंद्र” आणि “रक्त साठवण केंद्र” यांचे उद्घाटन करतील. यावेळी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र द. चौहान (मो. ७५८८६९३०३२) उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे “४५ मीटर ध्वज” उभारणी कार्यक्रमाचे भूमिपूजन करतील. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (मो. ९६०४३४६४६१) उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता ते धाराशिव येथून समृद्धी महामार्गामार्फत (धाराशिव-छत्रपती संभाजीनगर-नाशिक-ठाणे) ठाणे येथील निवासस्थानाकडे रवाना होतील आणि रात्री ९ वाजता तिथे पोहोचतील.

१५ वर्षीय मुलीचे अपहरण प्रकरण: आरोपी अटकेत, पीडितेची सुखरूप सुटका

धाराशिव, दि. १२ सप्टेंबर २०२५ (प्रतिनिधी) : उसतोड कामगाराच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी गुप्त आणि तांत्रिक तपास करून आरोपी आणि पीडित मुलीला अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात झाली.

घटना १८ मार्च २०२४ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी उसतोड कामगाराने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली की, संशयित सुनिल लक्ष्मण धोत्रे याने त्यांच्या १५ वर्षीय मुलीला अज्ञात कारणास्तव फूस लावून पळवून नेले. यावरून २३ मार्च २०२४ रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ (अपहरण) आणि ३७० (मानवी वाहतुक) अंतर्गत गुन्हा दाखल झाला. सुरुवातीला वाशी पोलिसांनी तपास हाती घेतला. नंतर, १८ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिस अधीक्षक धाराशिव यांनी हा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग केला.

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन केले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक सोनटक्के, महिला पोलिस हवालदार नदाफ, पोलिस हवालदार केवटे आणि पोलिस नाईक माने यांचा समावेश होता. पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपी आणि पीडितेचा ठावठिकाणा शोधला. अहिल्यानगर शहरात दोघे असल्याची खात्री झाल्यानंतर, ११ सप्टेंबर २०२५ रोजी पथकाने कारवाई करून आरोपी सुनिल लक्ष्मण धोत्रेला ताब्यात घेतले आणि पीडित मुलीची सुखरूप सुटका केली. दोघांनाही वाशी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

सध्या आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे, आणि पीडित मुलीला आवश्यक वैद्यकीय व मानसिक आधार दिला जात आहे. पोलिसांचा तपास पुढे सुरू आहे.

माऊलीच्या ट्रेंड ने भाजपमध्ये अस्वस्थता!

धाराशिव (Aakashh Natote)- जिल्ह्यात निवडणुका म्हणलं की राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची चर्चा होते. मात्र राज्यात आणि देशात सत्तेत असलेली भाजपा आता पाटीलमय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने पाटील परिवार समर्थकांनी त्यांच्या अनॉफिशियल सोशल मीडियावर माऊली होणार जिल्हा परिषद अध्यक्ष अश्या पोस्ट टाकून नवा ट्रेंड सुरू केला हाच ट्रेंड इमानेइतबारे तळागाळापर्यंत काम करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. लोकसभेला पाटील कुटुंबियांसाठी काम केले, विधानसभेला पुन्हा पाटील कुटुंबियांसाठी काम केले आणि आता जिल्हा परिषदेसाठी त्यांच्याच साठी काम करावे लागेल का? भाजप नवख्या आणि काम करणाऱ्यांना संधी आहे की नाही या विचाराने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

अर्चना पाटील अध्यक्षपदासाठी दावेदार?

माऊली ही बिरुदावली अर्चना पाटील यांना त्यांचे समर्थक वापरतात. सर्वसाधारण महिला यासाठी अध्यक्षपद असल्याने त्या अध्यक्ष व्हाव्यात अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. आता त्यांना अध्यक्षपदी बसविण्याचे स्वप्न पाटील परिवार समर्थक पाहत आहेत.

अर्चना पाटील नेमक्या कुठे?

अर्चना पाटील यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. मात्र त्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. भाजपच्या राजकीय मंचावर देखील त्यांना त्यानंतर फारसे पाहिले गेले नसल्याने त्या नेमके कोणत्या पक्षात आहेत हे स्पष्ट नाही

घराणेशाही चा आरोप

पाटील कुटुंबीयांवर त्यांचे विरोधक घराणेशाहीचा आरोप करतात लोकसभेला त्यांना राष्ट्रवादीतून तिकीट दिल्याने त्या आरोपांना अधिकच धार मिळाली मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना भाजपने तिकीट दिले आणि अध्यक्षपदावर दावा केला तर भाजप घराणेशाहीला बळ देते या आरोपावर शिक्कामोर्तब होणार आहे.