Home Blog Page 4

‘तिरंगा रॅली’ महायुतीतील भाजप – शिवसेनेचा ‘सवता सुभा’, राष्ट्रवादीत ‘सन्नाटा’

धाराशिव – ऑपरेशन सिंदूर राजकीय प्रदर्शनाचा भाग होऊ शकत नाही मात्र अचानक सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिल्याने महायुतीत मोर्चेबांधणी सुरू असून त्यात तिरंगा रॅली काढून दोन्ही पक्षांनी आपापला सवता सुभा केला आहे.

धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेकडून २२ मे रोजी तिरंगा रॅली काढली तर आज २३ मे रोजी भाजपकडून धाराशिव शहरात रॅली काढण्यात आली. तत्पूर्वी तुळजापूर शहरात भाजपने रॅली काढून जिल्ह्यात स्वबळाचा अप्रत्यक्ष नारा देण्यात आल्याने रॅलीच्या निमित्ताने महायुतीतील राजकीय एकोपा संपला असून सवता सुभा सुरू झाला आहे. तर महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीत तुर्तास सन्नाटा आहे. राष्ट्रवादीत पदाधिकाऱ्यांची संख्या भरपूर असली तरी रस्त्यावरची ताकद मात्र तोकडी असल्याने अशी रॅली आयोजित केली अन् प्रतिसाद मिळाला नाही तर नाचक्की होण्यापेक्षा शांत राहण्यात त्यांनी स्वारस्य मानले.

या रॅली मध्ये दोन्ही पक्षांनी आपापले झेंडे वापरले नसले तरी नेत्यांचा सहभाग पहाता कोणत्या पक्षाची रॅली आहे हे स्पष्टपणे दिसते.

दोन्ही पक्षांच्या रॅलीला चांगला प्रतिसाद देखील मिळाला मात्र महायुतीतील घटकपक्षांनी एकत्र येत या रॅली काढल्या असत्या तर त्याची भव्य दिव्यता आणखी चांगली झाली असती असे बोलले जात आहे.

सध्या पावसाळी वातावरण आणि निवडणुकांना असलेला अवधी पाहता रणनीती ठरण्यास भरपूर काळ शिल्लक असल्याने महायुतीत पुन्हा एकोपा राहतो की मोठा भाऊ भाजप पुन्हा जिल्ह्यातील राजकारणात वरचढ ठरतो हे येणारा काळच सांगेल.

शेतरस्त्यांच्या नोंदी ७/१२ उताऱ्यावर; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मिळणार मोठा आधार

मुंबई, – शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी आणि शेतरस्त्यांशी संबंधित वाद कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १४३ आणि मामलेदार कोर्ट अॅक्ट, १९०६ च्या कलम ५ अंतर्गत शेतरस्त्यांची अधिकृत नोंद ७/१२ उताऱ्याच्या ‘इतर हक्क’ या सदरात करण्याचे निर्देश शासनाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासह, शेतीतील वाढत्या यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी पारंपरिक अरुंद शेतरस्त्यांऐवजी किमान ३ ते ४ मीटर रुंदीचे रस्ते उपलब्ध करून देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार असून, शेतीमालाची जलद आणि सुरक्षित वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल.

शेतरस्त्यांचे महत्त्व आणि यांत्रिकीकरणाची गरज

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १४३ नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी आणि शेतीमाल वाहतुकीसाठी रस्त्याचा हक्क आहे. परंतु, पारंपारिक पायवाटा आणि बैलगाडी मार्ग आता ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, हार्वेस्टर यांसारख्या मोठ्या कृषी अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे पडत आहेत. शेतीत वाढते यांत्रिकीकरण आणि प्रगतीशील शेतीच्या गरजा लक्षात घेऊन शासनाने शेतरस्त्यांची रुंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळतील आणि शेतीमालाची वाहतूक अधिक कार्यक्षम होईल.

७/१२ उताऱ्यावर नोंदणीचे महत्त्व

शेतरस्त्यांच्या नोंदी ७/१२ उताऱ्याच्या ‘इतर हक्क’ या सदरात करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यामुळे शेतरस्त्यांना कायदेशीर वैधता प्राप्त होईल आणि भविष्यात अतिक्रमण किंवा वादांचे प्रमाण कमी होईल. शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीदरम्यान संभाव्य खरेदीदारांना या रस्त्यांच्या हक्काची स्पष्ट माहिती मिळेल. सक्षम अधिकाऱ्यांना आदेशात शेतरस्त्याचा गट क्रमांक, सर्वे क्रमांक, रुंदी, लांबी, दिशा आणि सीमा यांचा स्पष्ट उल्लेख करून त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शेतरस्त्यांची रुंदी आणि स्थानिक परिस्थितीचा विचार

शासन निर्णयानुसार, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून किमान ३ ते ४ मीटर रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत. यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक मार्ग, पायवाटा आणि शेजारील भूधारकांच्या हक्कांचा विचार करावा लागेल. जर थेट रुंद रस्ता देणे शक्य नसेल, तर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा, जरी तो थोडा लांबचा असला तरी. अपवादात्मक परिस्थितीत ३ ते ४ मीटरपेक्षा कमी रुंदीचा रस्ता देणे शक्य असल्यास, जास्तीत जास्त रुंदीचा रस्ता उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश आहेत.

याशिवाय, बांधांचे नैसर्गिक स्वरूप जपण्याचे आणि अनावश्यक रुंदीकरण टाळण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बांधावरून रस्ता देताना दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी, जेणेकरून भविष्यात सीमावाद उद्भवणार नाहीत.

९० दिवसांत प्रकरणांचा निपटारा

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम १४३ आणि मामलेदार कोर्ट अॅक्ट, १९०६ चे कलम ५ अंतर्गत प्राप्त अर्जांवर ९० दिवसांत अंतिम आदेश पारित करावेत, असे निर्देश शासनाने दिले आहेत. याशिवाय, सध्या प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे या शासन निर्णयाच्या तारखेपासून ९० दिवसांत निकाली काढण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळण्यास मदत होईल आणि प्रशासकीय विलंब टाळला जाईल.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पाऊल

हा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शेतरस्त्यांची कायदेशीर नोंद आणि योग्य रुंदीच्या रस्त्यांची तरतूद यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या सुविधांचा लाभ घेता येईल. याशिवाय, शेतरस्त्यांशी संबंधित वाद कमी होऊन ग्रामीण भागात शांतता आणि समृद्धीला चालना मिळेल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि शेतीच्या आधुनिकीकरणासाठी एक मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

धाराशिवच्या पोलीस अधीक्षकपदी रितु खोकर यांची नियुक्ती – एमडी ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बदली की आणखी काही? कारण अस्पष्ट

धाराशिव :
राज्य शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेतला असून, यामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी रितु खोकर (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी सांगली येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होत्या.

या बदल्यांमुळे विद्यमान पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून, गृह विभागाच्या ए.डी.-10010/25/2025/पोल-1 या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. रितु खोकर या आता धाराशिव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणार आहेत.

या बदल्यांकडे फक्त प्रशासकीय निर्णय म्हणून न पाहता, मागील काही महिन्यांतील जिल्ह्यातील घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवरही पाहिले जात आहे. विशेषतः एमडी ड्रग्ज प्रकरण, ज्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवली होती, त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. समाजमाध्यमांवर विधासभेतील उत्तर आधीच व्हायरल झाले होते त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाची विश्वासार्हता आणि कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले होते.

संजय जाधव यांच्यावर कोणतीही थेट कारवाई किंवा आरोप नसतानाही त्यांची अचानक झालेली बदली अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे ही बदली नेमकी कार्यक्षमतेच्या मूल्यांकनावर आधारित आहे की, विशिष्ट दबावाच्या पार्श्वभूमीवर – असा प्रश्नही उपस्थित होतो आहे.

दरम्यान, रितु खोकर यांच्याकडून नव्या जबाबदारीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कडक कारवाई आणि सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यशैलीकडे जिल्ह्याचे राजकीय, सामाजिक आणि नागरिक वर्तुळ उत्सुकतेने पाहत आहेत.

राज्यात एकाच वेळी २० हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये धाराशिवसाठी घेतलेला हा निर्णय भविष्यातील पोलीस धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.

दस्तापूर खून प्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत छडा — आरोपीला अटक

धाराशिव: मुरुम पोलीस ठाणे हद्दीतील दस्तापूर (ता. उमरगा) येथील हैद्राबाद महामार्गावर एका बोलेरो जीपजवळ सापडलेल्या मृतदेहाने खळबळ उडवली होती. पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.

दि. १९ मे रोजी सकाळच्या सुमारास बोलेरो जीप अपघातग्रस्त स्थितीत उभी असल्याची माहिती मिळताच मुरुम पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गाडीच्या शेजारी एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला. मृताची ओळख दाळिंब (ता. उमरगा) येथील शमशुद्दीन मियासाहेब पटेल (वय अंदाजे ४५) अशी पटली.

प्रथमदर्शनी सदर व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मात्र गुन्हा कोणी केला, याबाबत कोणतीही ठोस माहिती नव्हती. सततचा पाऊस, वीज पुरवठ्यातील अडथळे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज अपुरे असल्यामुळे तपासात अडथळे निर्माण झाले. तरीही स्थानिक गुन्हे शाखा आणि मुरुम पोलिसांनी मिळून संपूर्ण परिसर पिंजून काढत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळवले.

खुनाचा उगम जुन्या वैमनस्यातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दाळिंब येथीलच ज्ञानेश्वर भोळे आणि त्याच्या साथीदाराने मिळून गुन्हा केला. ज्ञानेश्वर भोळेला तुगाव येथे रात्री उशिरा अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार (स्थानीय गुन्हे शाखा), सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दहीफळे (मुरुम), सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, तसेच पोलीस अंमलदार सचिन खटके, विनोद जानराव, बबन जाधवर, नितीन जाधवर, जावेद काझी, दयानंद गादेकर, समाधान वाघमारे, चालक विजय घुगे, सुभाष चौरे व मुरुम पोलीस ठाण्याचा संपूर्ण स्टाफ यांनी संयुक्तरित्या उल्लेखनीय कामगिरी बजावली.

ही कामगिरी पोलिसांच्या सतर्कतेचे आणि तांत्रिक कौशल्याचे उदाहरण ठरली आहे.

पिक विमा योजनेत 1313 कोटींचे येणे प्रलंबित : अनिल जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने वसुलीची मागणी

मुंबई : राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील 80-110 मॉडेल (बीड पॅटर्न) अंतर्गत 1313 कोटी 26 लाख रुपयांची प्रलंबित रक्कम तातडीने वसूल करावी, अशी मागणी कृषी अभ्यासक अनिल जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य शासनाने सन 2020-21 पासून पिक विमा योजनेमध्ये 80-110 टक्केचे मॉडेल स्वीकारले आहे. या मॉडेलनुसार जर कंपनीला विमा हप्ता म्हणून 100 कोटी रुपये देण्यात आले आणि त्यांनी शेतकऱ्यांना 75 कोटी रुपये भरपाई दिली, तर 20 कोटी रुपये कंपनीकडे राहतात आणि उर्वरित 5 कोटी रुपये शासनाला परत द्यावे लागतात. त्याचवेळी, 110 टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाई झाल्यास कंपनीला स्वतःचे 10 टक्के अधिक घालून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी लागते, तर 110 टक्क्यांच्या पुढील भरपाईसाठी शासन मदत करते.

या मॉडेलनुसार 2020-21 ते 2023-24 रब्बी हंगाम पर्यंत शासनाला विमा कंपन्यांकडून अपेक्षित परतावा 3403 कोटी 52 लाख रुपये होता. यापैकी 2090 कोटी 26 लाख रुपये मिळाले असून 1313 कोटी 26 लाख रुपये अजूनही प्रलंबित आहेत, ही माहिती कृषी आयुक्तालयाने अनिल जगताप यांच्या माहिती अधिकाराच्या अर्जावर उत्तरादाखल दिली आहे.

याशिवाय, 110 टक्क्यांपलीकडील नुकसान भरपाईसाठी शासनाने 2405 कोटी 89 लाख रुपयांची मदत करायची होती, त्यापैकी 2158 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून 247 कोटी रुपये अजूनही विमा कंपन्यांना देणे बाकी असल्याची माहितीही उघड झाली आहे.

अनिल जगताप यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देताना अनेक वेळा अडथळे निर्माण करतात, परंतु राज्य शासनाची मोठी रक्कम त्यांच्या कडे अडकून पडलेली आहे. ही रक्कम तातडीने वसूल करणे आवश्यक आहे.”

राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे ही रक्कम अद्याप वसूल झालेली नाही आणि याचा परिपाक शेतकऱ्यांच्या विमा लाभावर होतो आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून संबंधित विमा कंपन्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल करून शेतकऱ्यांच्या हितासाठी ती उपयोगात आणावी, अशी स्पष्ट मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा अडकवून ठेवणाऱ्या विमा कंपन्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी जनतेचीही जोरदार मागणी होत आहे.

नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा धाराशिव दौरा – २३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

धाराशिव : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे मा. अध्यक्ष तथा मंत्री दर्जाचे श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा २३ मे २०२५ रोजी होत आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील, विशेषतः मराठा समाजातील युवकांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि त्याचा जिल्हानिहाय लाभ घेण्याची स्थिती यावर या बैठकीत सखोल चर्चा होणार आहे.

महामंडळाच्या या योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यभरात रु. १,१२१ कोटींपेक्षा अधिक रक्कम लाभार्थ्यांना व्याज परताव्याच्या स्वरूपात वितरित करण्यात आली आहे.

सदर बैठकीसाठी जिल्ह्याचे उपनिबंधक (D.D.R.), मुख्य जिल्हा प्रबंधक (L.D.M.) व सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तरुणांना योजनेचा लाभ मिळवून देता येईल.

या दौऱ्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील युवकांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जाणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

धाराशिव जिल्ह्यात 3 जून 2025 पर्यंत ड्रोनसह सर्व प्रकारच्या उड्डाणांवर बंदी; ‘नो फ्लायिंग झोन’ घोषित

धाराशिव (प्रतिनिधी) : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत, धाराशिव जिल्ह्यात 3 जून 2025 पर्यंत ड्रोनसह सर्व प्रकारच्या उडत्या यंत्रांवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, धाराशिव जिल्हा संपूर्णपणे ‘नो फ्लायिंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

हा निर्णय भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदुर’ मोहिमेनंतर घेतला आहे. या मोहिमेद्वारे जैश-ए-मोहम्मद (JEM), लष्कर-ए-तय्यबा (LET) आणि हिज्बुल मुजाहिद्दीन (HM) या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या कारवाईचा सूड घेण्यासाठी संबंधित संघटना त्यांच्या स्लीपर सेलच्या माध्यमातून भारतातील विविध ठिकाणी, विशेषतः महाराष्ट्र राज्यात ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक, धाराशिव यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या तसेच सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने, कोणत्याही प्रकारचा ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रो एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून आणि तत्सम उड्डाण करणाऱ्या यंत्रांचा वापर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत या आदेशाची तातडीने अंमलबजावणी केली आहे. आदेशानुसार, या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा संघटनेविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

प्रशासनाने नागरिकांना या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले असून, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही शंका किंवा माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

या काळात कोणत्याही वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक किंवा सरकारी कारणांसाठीही ड्रोन वा तत्सम यंत्रांच्या उड्डाणास परवानगी दिली जाणार नाही.

संपूर्ण जिल्ह्यात नो फ्लायिंग झोन लागू – काय बंदी आहे?

  • ड्रोन
  • रिमोट नियंत्रित मायक्रो एअरक्राफ्ट
  • पॅरा ग्लायडर्स
  • हँग ग्लायडर्स
  • हॉट एअर बलून
  • तत्सम कोणतीही उडणारी वस्तू

बंदी कालावधी : आदेश दिनांकापासून 3 जून 2025 पर्यंत
कायदेशीर कारवाई : भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 अन्वये शिक्षेस पात्र

सूचना : जिल्ह्यातील नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सजग राहून, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास स्थानिक पोलिसांना कळवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वाशी तालुक्यात बोगस रासायनिक खत रॅकेटचा पर्दाफाश; कृषी विभागाची मोठी कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

वाशी (प्रतिनिधी – राहुल शेळके): खरिपाच्या तोंडावर वाशी तालुक्यात बोगस रासायनिक खतांचा मोठा साठा उघडकीस आला असून, कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत बनावट खत विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान या रॅकेटचे धागेदोरे थेट गुजरातपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे.

दि. १५ मे रोजी सकाळी ११ वाजता वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथे, दसमेगाव रस्त्याच्या पश्चिमेला सुमारे ७०० मीटर अंतरावर गट नंबर ५६९ मधील एका कुकुटपालन शेडवर कृषी विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली. यावेळी सात वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर विनापरवाना साठवलेली ४५६ पोती रासायनिक खते (एकूण वजन सुमारे २०.२१५ टन, अंदाजित किंमत ४,६१,१२० रुपये) जप्त करण्यात आली.

या कारवाईचे नियोजन धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, कृषी संचालक (गुणवत्ता व नियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक (लातूर) साहेबराव दिवेकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र माने आणि कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

संबंधित शेडमधील व्यक्तीकडे विचारणा केली असता, त्याने समाधानकारक उत्तर देण्यात अपयश आल्याने, जप्त खतांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ज्यांच्या नावावर ही खते होती, त्या कंपन्यांशी संपर्क साधला असता, संबंधित लॉट नंबर त्यांच्या नोंदीत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सदर साठा बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी वाशी तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय लिबराज तावरे (रा. पिंपळगाव लिंगी) आणि विकास रामभाऊ होळे (रा. खामकरवाडी) यांच्याविरोधात वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तालुक्यात अजूनही बनावट खताचा साठा असण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली असून, पुढील कारवाईसाठी तपास अधिक गतीने सुरू आहे. अवैध खत विक्री रोखण्यासाठी कृषी विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

तुळजाभवानी मंदिरात गेल्या ६ महिन्यांत १२ पुजाऱ्यांना प्रवेशबंदी; देऊळ कवायत कायद्याअंतर्गत कारवाई

तुळजापूर (ता. १४): तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे मागील सहा महिन्यांत एकूण १२ पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील शिस्तभंग, अनुशासनबाह्य वर्तन, तसेच कायदा व सुव्यवस्थेस धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून, सर्व प्रक्रिया देऊळ कवायत कायद्याच्या तरतुदींनुसार करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर संस्थान प्रशासनाने दिली.

मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले की, देऊळ कवायत कायदा लागू असलेल्या तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांचे वर्तन व कार्यपद्धती यांच्यावर नियमित नियंत्रण ठेवले जाते. संस्थानच्या वतीने वेळोवेळी पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात येतात. त्या अनुषंगाने चौकशी करून दोषी आढळलेल्या पुजाऱ्यांवर विशिष्ट कालावधीसाठी मंदिर प्रवेशबंदीची कारवाई केली जाते.

प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आलेल्या पुजाऱ्यांची नावे व कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  1. ओंकार हेमंत इंगळे – 27 नोव्हेंबर 2024 ते 26 डिसेंबर 2024 (1 महिना)
  2. अभिजीत माधवराव कुतवळ – 27 नोव्हेंबर 2024 ते 26 डिसेंबर 2024 (1 महिना)
  3. श्रीधर विनायक क्षीरसागर – 17 डिसेंबर 2024 ते 01 जानेवारी 2025 (15 दिवस)
  4. अक्षय किशोर कदम – 17 डिसेंबर 2024 ते 01 जानेवारी 2025 (15 दिवस)
  5. महेश भारत रोचकरी – 04 जानेवारी 2025 ते 18 जानेवारी 2025 (15 दिवस)
  6. अजय संजय शिंदे – 04 जानेवारी 2025 ते 18 जानेवारी 2025 (15 दिवस)
  7. सुदर्शन यशवंत वाघमारे – 01 जानेवारी 2025 ते 01 जुलै 2025 (6 महिने)
  8. रणजीत अविनाश साळूंके – 20 फेब्रुवारी 2025 ते 20 एप्रिल 2025 (2 महिने)
  9. अमित दत्तात्रय तेलंग-कदम – 12 एप्रिल 2025 ते 12 मे 2025 (1 महिना)
  10. नानासाहेब जगन्नाथ चोपदार – 13 एप्रिल 2025 ते 13 मे 2025 (1 महिना)
  11. तुषार विजयकुमार पेंदे – 23 एप्रिल 2025 ते 23 जुलै 2025 (3 महिने)
  12. प्रदीप विलास मोटे – 12 मे 2025 ते 12 ऑगस्ट 2025 (3 महिने)

या कारवाईमुळे पुजारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून, काही पुजाऱ्यांनी संस्थान प्रशासनाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवत संबंधित कारवाईच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुसरीकडे, मंदिर प्रशासनाने मंदिराच्या अनुशासनात्मक धोरणांप्रती कटिबद्धता व्यक्त करत ही कारवाई नियमबद्ध आणि आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

तुळजाभवानी मंदिर हे राज्यातील प्रमुख शक्तीपीठ असून, येथे दररोज हजारो भाविक भेट देत असतात. त्यामुळे मंदिरातील शिस्त व धार्मिक कार्यपद्धतींचे पालन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अशा पार्श्वभूमीवर संस्थानचे हे पाऊल भविष्यात पुजारी वर्गासाठी एक इशारा मानला जात आहे.

शिक्षण विस्ताराधिकारी दादासाहेब घोगरे यांना राज्यस्तरीय गौरव पुरस्कार,

पुरस्कार वितरण १८ मे रोजी लातूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत

परंडा, दि. १४ मे (प्रतिनिधी) – डोंजा (ता. परंडा) येथील रहिवासी व तांदुळवाडी बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी दादासाहेब घोगरे यांची मानव जीवनगौरव व मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. १९८८ पासून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात केलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना “उत्कृष्ट अधिकारी” या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.

हा पुरस्कार दि. १८ मे रोजी लातूर येथील दयानंद कॉलेज सभागृहात भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती पंढरपूरचे सहकार्याध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, जागतिक कीर्तीचे भागवताचार्य पं. रमाकांत व्यास, प्रसिद्ध गायक डॉ. अंबरीष महाराज देगलूरकर व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा. बाबासाहेब पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या गौरवप्राप्त निवडीबद्दल परंडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे, भूम प.स.चे गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी, परंडा प.स.चे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण मुळे, तसेच शिक्षण विस्ताराधिकारी सूर्यभान हाके, शिवाजी काळे, गटशिक्षण कार्यालयातील सर्व कर्मचारी, तांदुळवाडी बीटमधील केंद्रप्रमुख भागवत घोगरे (डोंजा) व आनंद गायकवाड (तांदुळवाडी), बीटमधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, तंत्रस्नेही शिक्षक आणि डोंजा व परिसरातील ग्रामस्थ यांनी घोगरे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

दादासाहेब घोगरे यांच्या चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या कार्याला मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.