Home Blog Page 33

वर्ग २ च्या जमिनींचा कितीही वेळा शर्तभंग झाला तरी एकदाच शुल्क भरण्याचा शासन आदेश निर्गमित

धाराशिव: महाराष्ट्र शासनाने हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २०२४ अंतर्गत मोठा निर्णय घेतला आहे. या सुधारित कायद्यानुसार, वर्ग २ च्या जमिनींवरील कितीही वेळा शर्तभंग झाला तरी एकदाच शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सुधारणा

पूर्वीच्या कायद्यानुसार, वर्ग २ च्या जमिनींच्या हस्तांतरणासाठी आणि वापर बदलासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता होती. तसेच, शर्तभंग झाल्यास प्रत्येकी वेगळे शुल्क द्यावे लागत होते. यामुळे शेतकरी आणि जमिनीचे धारक आर्थिक अडचणीत सापडत होते. मात्र, सुधारित कायद्यानुसार एकदाच शुल्क भरल्यानंतर पुन्हा शर्तभंगाचा दंड लागू होणार नाही.

५०% ऐवजी फक्त ५% नजराणा शुल्क

मदतमाश इनाम जमिनींच्या हस्तांतरणावर पूर्वी ५०% नजराणा शुल्क आकारले जात होते. मात्र, सुधारित अधिनियमानुसार हे शुल्क फक्त ५% करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.

न्यायालयीन प्रकरणांमध्ये स्पष्टता

जर इनाम जमिनी संदर्भातील वाद उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले असतील, तर त्या न्यायालयाच्या निर्णयानुसार संबंधित जिल्हाधिकारी योग्य ती कारवाई करतील. तसेच, जर कोणतीही जमीन वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केली असेल, तर वक्फ बोर्डाने ती यादीतून वगळल्याशिवाय महसूल विभागाने तशी नोंद घेऊ नये, असा स्पष्ट निर्देशही देण्यात आला आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे होणारे फायदे:

  • शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींच्या हस्तांतरणावरचा आर्थिक बोजा कमी होणार.
  • शेतकऱ्यांच्या जमिनींवरील निर्बंध कमी होऊन त्याचा उपयोग कृषी आणि अन्य विकासकामांसाठी करता येणार.
  • वर्ग २ जमिनींबाबत चालणाऱ्या वादांना मर्यादा येऊन, न्यायालयीन प्रकरणांमध्ये स्पष्टता राहील.
  • शासन परवानगीशिवाय झालेल्या हस्तांतरणांची नियमितता आणण्यासाठी मोठा फायदा होणार.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडे इनाम जमिनी आहेत. अनेकांनी गेल्या काही दशकांत या जमिनी विकत घेतल्या किंवा उपयोग बदल केला. मात्र, जुन्या कायद्यामुळे अनेकांना अडचणी येत होत्या. आता सुधारित कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी अधिकृतरित्या नियमित होतील आणि त्यांचा उपयोग विकासासाठी करता येईल.

शासन निर्णयाचा दूरगामी परिणाम

हा निर्णय शेतकरी आणि जमिनीच्या कायदेशीर अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय जमिनींच्या हस्तांतरण आणि नियमिततेसंदर्भात ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.

पानबुडी मोटर चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – आरोपी गजाआड

धाराशिव जिल्ह्यातील रामवाडी शिवारात पानबुडी मोटर चोरी झाल्याच्या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुन्ह्याचा तपास लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, 3 मार्च 2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणातून काही संशयितांची नावे शोधून काढली. त्यानंतर पथकाने लातूर जिल्ह्यातील मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन संशयिताला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीस गेलेली दोन पानबुडी मोटर (किंमत 35,000 रुपये), चोरीसाठी वापरलेले चारचाकी वाहन (8,00,000 रुपये) आणि दुचाकी (90,000 रुपये) असा एकूण 9,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर मुद्देमाल ढोकी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 75/2025 अंतर्गत जप्त करण्यात आला.

या गुन्ह्यात आरोपी आकाश पप्पू कसबे (रा. दत्तनगर, मुरुड, जि. लातूर) याला अटक करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी त्याला ढोकी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या पथकात पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फहरान पठाण, चालक रत्नदीप डोंगरे आणि नितीन भोसले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

PM किसान योजनेच्या बनावट APK लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांची फसवणूक!

धाराशिव: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना बनावट PM Kisan List APK किंवा PM Kisan APK लिंक पाठवून फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. या लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब होत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

शासन निर्णय क्र.- किसनि २०२३/प्र.क्र. ४२/११-अ दिनांक १५ जून २०२३ अन्वये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषि विभागामार्फत राबविली जाते. मात्र, सायबर गुन्हेगारांनी या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना बनावट लिंक पाठवून त्यांची फसवणूक सुरू केली आहे.

शेतकऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी:

  • PM Kisan List APK किंवा PM Kisan APK नावाच्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
  • अधिकृत माहितीसाठी फक्त PM Kisan च्या अधिकृत वेबसाईटवर (https://pmkisan.gov.in/) भेट द्यावी.
  • अशा फसवणुकीस त्वरित सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.

या संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धाराशिव श्री. रविंद्र माने यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

चोरट्यांचा हल्ला: शेतकऱ्याचा मृत्यू, ग्रामस्थांचा रास्ता रोको

धाराशिव – तालुक्यातील हिंगळजवाडी येथे चोरीस विरोध करणाऱ्या शेतकऱ्यावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला करून त्यांचा निर्दयीपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

प्राप्त माहितीनुसार, हिंगळजवाडी गावालगतच्या गायराण शेतजमिनीतील शेडमध्ये बांधलेल्या शेळ्या चोरताना चोरट्यांनी शेडसमोर झोपलेल्या तानाजी भगवान मुळे (वय 65) यांना अडथळा समजून डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले.  ही घटना दिनांक ०३ मार्च रोजी मध्य रात्री १२.३० च्या नंतर घडली.या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी संजय राजेंद्र पवार, जितेंद्र प्रभू पवार (रा. तेर, धाराशिव), अमोल ईश्वर काळे आणि ईश्वर रामा काळे (रा. हिंगळजवाडी, धाराशिव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास सपोनि हजारे करत आहेत.

या निर्घृण हत्येच्या घटनेमुळे गावात तीव्र संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आरोपींना अटक करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात गावातील कोणीच सहभागी नसताना केशेगाव येथे बांधला शौर्यस्तंभ

तत्कालीन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत यांच्या संगनमताचा आरोप

विभागीय आयुक्तांकडे लहू खंडागळे यांची तक्रार

ज्या गावात मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात कोणीच सहभागी झाले नाही कोणी शहीदही झाले नाही अशा गावांमध्ये स्मृती स्तंभ बांधून शासकीय निधीचा अपव्यव केला गेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम युद्धातील शहीद वीर जवानांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मृती स्तंभावर मोठा वाद निर्माण झाला आहे. तक्रारदार लहू रामा खंडागळे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर अधिकाऱ्यांवर शासकीय निधीच्या गैरवापराचे गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण

धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव येथे 2023-24 या आर्थिक वर्षात स्मृती स्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या गावातील एकही जवान मराठवाडा मुक्तिसंग्राम युद्धात शहीद झालेला नाही. तरीही, प्रशासनाने योग्य ती खातरजमा न करता लाखो रुपयांची शासकीय तिजोरी वाया घालवली, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

हे प्रकरण उघडे पडू नये म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नव्यानेच केशेगाव (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे स्मृती स्तंभ उभारण्याची प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये सुद्धा भौगोलिक ठिकाण न पाहता प्रशासनाने चुकीच्या ठिकाणी स्मृती स्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला.

गैरव्यवहार कसा झाला? – महत्त्वाचे मुद्दे

  1. स्मृती स्तंभ उभारण्याचा निर्णय चुकीच्या गावात
    • धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथे एकही जवान शहीद नसताना स्मृती स्तंभ उभारण्यात आला.
    • केशेगाव ग्रामपंचायतीने हे सत्य लपवून ठेवले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली.
    • तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही चौकशी न करता निर्णय घेतला.
  2. प्रशासनाचा अधिकाराचा गैरवापर
    • जिल्हा नियोजन समितीने 17 ऑगस्ट 2023 रोजी केशेगाव येथे स्मृती स्तंभ उभारण्यास मंजुरी दिली.
    • हा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही 28 नोव्हेंबर 2023 रोजी केशेगाव (ता. तुळजापूर) येथे पुन्हा स्मृती स्तंभ उभारण्याची मंजुरी देण्यात आली.
  3. ग्रामपंचायतीने बेकायदेशीर ठराव मंजूर केला
    • ग्रामपंचायतीच्या ठरावाला क्रमांक नव्हता.
    • ठराव अध्यक्ष अनुपस्थित असताना मंजूर केला गेला.
    • 14 ऑगस्ट 2023 रोजी झालेली मासिक सभा दाखवण्यात आली, पण त्याचा पुरावा नाही.
  4. नियम डावलून कामकाज
    • 17 सप्टेंबर 2023 ला स्मृती स्तंभाचे उद्घाटन करण्यात आले, पण कामाचे आदेश 18 सप्टेंबरला दिले गेले!
    • म्हणजेच कार्यादेश मिळण्याच्या आधीच काम पूर्ण झाले.
    • शौर्य स्तंभावर कोनशिला कोणाच्या नावाने लावायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला.
  5. दुहेरी निधी मंजूर करून आर्थिक गैरव्यवहार
    • केशेगाव (ता. धाराशिव) येथे चुकीच्या स्मृती स्तंभासाठी निधी खर्च केला गेला.
    • त्यानंतर पुन्हा केशेगाव (ता. तुळजापूर) येथे स्मृती स्तंभासाठी नवीन निधी मंजूर केला गेला.
    • म्हणजेच, एकाच कामासाठी दोनदा निधी मंजूर करून शासनाच्या पैशांचा अपव्यय केला गेला.

कोणकोणते अधिकारी व कर्मचारी दोषी?

तक्रारदारांनी खालील अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत:

  1. तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे
  2. मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. धाराशिव)
  3. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प. विभाग, जि.प. धाराशिव)
  4. गटविकास अधिकारी (पंचायत समिती, धाराशिव)
  5. कार्यकारी अभियंता (सा. बा. विभाग, जि.प. धाराशिव)
  6. केशेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक

प्रकरणाचा परिणाम आणि तक्रारदारांची मागणी

तक्रारदार लहू खंडागळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, नियमबाह्य खर्च झालेली संपूर्ण रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी, अशीही मागणी केली आहे.

सरकार आणि प्रशासनाची भूमिका काय?

या गंभीर आरोपांवर सरकार आणि प्रशासनाने कोणती भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शासकीय निधीचा अपव्यय, अधिकारांचा गैरवापर, बेकायदेशीर ठराव मंजूर करणे आणि नियम धाब्यावर बसवणे या आरोपांची खातरजमा करण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे.

तक्रारदार लहू रामा खंडागळे

धाराशिव जिल्ह्यातील या संपूर्ण प्रकरणावरुन प्रशासनातील अनागोंदी व भ्रष्टाचाराचे गंभीर चित्र उभे राहते. शहीद जवानांच्या सन्मानासाठी उभारल्या जाणाऱ्या स्मृती स्तंभावरच शासन आणि प्रशासनाने गैरव्यवहार केला असल्याचा आरोप झाल्याने जनतेमध्ये संतापाची भावना आहे.

या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जात नाही, तर भविष्यातही अशा प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहारांना उत्तेजन मिळेल. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

करजखेडा येथे जलजीवन मिशन योजनेच्या पाईप चोरीची घटना

धाराशिव, 28 फेब्रुवारी 2025: करजखेडा येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत साठवून ठेवण्यात आलेले सुमारे 5.74 लाख रुपये किमतीचे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धाराशिव येथील ठेकेदार राजाभाऊ शिवाजी गडकर (वय 60, व्यवसाय – शासकीय ठेकेदार) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पाणीपुरवठा योजनेतील महत्त्वाचे साहित्य चोरीला

राजाभाऊ गडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या आदेशानुसार संतोष मुरकुटे यांच्या एस.टी.एम. इन्फ्रा. हायटेक प्रा. लि., नांदेड या कंपनीला कानेगाव व करजखेडा संयुक्त पाणीपुरवठा योजनेचे काम मिळाले होते. सदर योजनेतील काही भागाचे काम गडकर यांच्या राज कन्स्ट्रक्शन फर्म मार्फत सुरू होते.

योजनेच्या अंतर्गत माकणी येथील निम्न तेरणा धरणातून कानेगाव व करजखेडा गावांना पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे व इतर कामे करण्यात येत होती. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने DI व HDPE पाईप्स पुरवले होते. हे पाईप विविध ठिकाणी साठवून ठेवण्यात आले होते, त्यापैकी काही करजखेडा आठवडा बाजार येथील पाण्याच्या टाकीजवळ साठवण्यात आले होते.

चोरीला गेलेले साहित्य:

150 मिमी व्यासाचे 35 लोखंडी पाईप (किंमत – ₹3,57,665)

100 मिमी व्यासाचे 30 लोखंडी पाईप (किंमत – ₹2,17,140)

एकूण नुकसान – ₹5,74,805

चोरीचा प्रकार कसा उघडकीस आला?

गडकर यांनी सांगितले की, सदर पाणीपुरवठा योजनेसाठी 18 डिसेंबर 2024 रोजी करजखेडा येथे 100 मिमी व्यासाचे 286 पाईप, 23 जानेवारी 2025 रोजी कानेगाव येथे 150 मिमी व्यासाचे 165 पाईप, तसेच 25 जानेवारी 2025 रोजी करजखेडा येथे 150 मिमी व्यासाचे 165 पाईप उतरवले गेले होते. हे पाईप टप्प्याटप्प्याने योजनेसाठी वापरण्यात येत होते.

30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत गडकर प्रकृती अस्वस्थतेमुळे कामावर हजर राहू शकले नाहीत. त्यानंतर इतर कामांमुळे करजखेडा येथे लक्ष देता आले नाही. मात्र, 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता गडकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता किरण जाधव आणि चॉईस कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि., अंधेरीचे अभियंता पंकज गुंड यांच्यासह पाहणीसाठी गेले असता पाईप कमी असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी योजनेच्या इतर ठिकाणी कामाची तपासणी केली असता अनेक पाईप योजनेसाठी वापरण्यात आल्याचे दिसले, मात्र करजखेडा येथील काही पाईपांचा हिशोब लागत नव्हता. त्यानंतर त्यांनी करजखेडा येथे पुन्हा जाऊन बारकाईने पाहणी केली असता खालील वर्णनाचे आणि किमतीचे पाईप चोरीला गेलेले असल्याचे स्पष्ट झाले.

चोरीला गेलेले साहित्य व अंदाजित नुकसान:

26 जानेवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान चोरी

गडकर यांच्या म्हणण्यानुसार, ही चोरी 26 जानेवारी 2025 दुपारी 2 वाजल्यापासून 22 फेब्रुवारी 2025 दुपारी 4 वाजेच्या दरम्यान घडली असावी. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने करजखेडा आठवडी बाजारातील पाण्याच्या टाकीजवळ साठवलेले 65 पाईप चोरून नेले आहेत.

पोलिसांत गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू

या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडकर यांनी या चोरीची सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आज आणि उद्या जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीस मंजुरीसाठी 1 व 2 मार्च रोजी कार्यालये सुरू राहणार

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश

धाराशिव : चालू आर्थिक वर्ष 2024-25 लवकरच संपत येत असून, जिल्हा वार्षिक योजना तसेच विविध योजनांअंतर्गत प्राप्त निधीस प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी 1 व 2 मार्च 2025 रोजी सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुखांनी कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, सर्व संबंधित विभागांनी या दिवशी कार्यालयात उपस्थित राहून विविध योजनांसाठी निधी मंजुरीसाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. तसेच, प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून निधीच्या उपयोगास मार्ग मोकळा करावा.

मैनक घोष यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, उक्त दिनांकांनंतर निधीस प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया प्रलंबित राहणार नाही. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी या बाबीची गंभीर नोंद घ्यावी व निर्धारित वेळेत आवश्यक मंजुरी प्रक्रिया पूर्ण करावी.

जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा महत्त्वाचा टप्पा असून, प्रशासकीय कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी दोन दिवस कार्यालये सुरू राहणार आहेत.

महिला सुरक्षेसाठी एस.टी. महामंडळाचे ठोस निर्णय; परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२५ – राज्यातील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एस.टी. महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली, ज्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.

एस.टी. महामंडळाने महिला प्रवाशांना ५०% सवलत लागू केल्यापासून बससेवेचा वापर करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पुढील ठोस पावले उचलण्यात येणार आहेत.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:

सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा बसवणे अनिवार्य करण्यात येणार आहे, जेणेकरून प्रवाशांची सुरक्षितता वाढेल.
सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवली जाणार असून, महिलांना प्रवासादरम्यान अधिक सुरक्षित वाटावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व बस डेपोचे ऑडिट करण्यात येईल, जेणेकरून सुरक्षा व स्वच्छतेबाबत योग्य उपाययोजना करता येतील.
परिवहन विभागात आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून सुरक्षाव्यवस्थेला अधिक बळकटी दिली जाणार आहे.
एस.टी. आगारातील भंगार वाहने १५ एप्रिलपर्यंत हटवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सुटसुटीत होणार आहे.
शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे, जेणेकरून महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर नियम लागू करता येतील.
बस डेपोंमध्ये स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे, जेणेकरून प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळू शकेल.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “महिला प्रवाशांची सुरक्षा ही आमच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. या निर्णयांमुळे एस.टी. प्रवास अधिक सुरक्षित आणि सुसज्ज होईल. याचा लाभ लाखो महिला प्रवाशांना होणार आहे.”

या निर्णयांमुळे महिला प्रवाशांचा विश्वास वाढेल आणि एस.टी. सेवेकडे अधिक महिलांचा कल राहील, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.

निम्न तेरणा प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी भूसंपादनास तीव्र विरोध – सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांचा इशारा

माकणी (ता. लोहारा) :

निम्न तेरणा प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या हालचालींना विरोध दर्शवत शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. या संदर्भात मुंबई येथे 12 फेब्रुवारी रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत धरणाची उंची वाढवण्याच्या शक्यतांचा आढावा घेण्यात आला. मात्र, या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना जमिनी गमवाव्या लागतील, त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

धरणाच्या उंचीमुळे शेतकऱ्यांवर संकट

1989 साली निर्मित निम्न तेरणा प्रकल्पाच्या जलसाठा क्षमतेवर गेल्या काही वर्षांपासून मोठा परिणाम झाला आहे. नाशिकच्या मेरी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, धरणाच्या क्षमतेपैकी जवळपास 30 टक्के भाग गाळाने भरला आहे. सध्या या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता 130 दशलक्ष घनमीटर आहे, मात्र गाळामुळे ती कमी झाली आहे.

धरणाच्या उंची वाढवण्यासाठी आवश्यक असेल, तर अतिरिक्त जमीन संपादन करावी लागणार आहे. मात्र, सध्या धरण 100% भरले तरी काही शेतकऱ्यांच्या जमिनींमध्ये पाणी घुसत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे उंची वाढविण्यात आली, तर त्या भागातील अनेक शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होण्याची भीती आहे. भातागळी, माकणी, कानेगाव, मसलगा, नागूर, कमालपूर, उजनी, मातोळा, वांगजी, लोहटा या गावांतील शेतकऱ्यांनी आधीच आपली बरीचशी जमीन धरणासाठी गमावली आहे. त्यामुळे उरलेल्या अल्प जमिनीही गेल्यास शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान होईल.

पाणीपुरवठा योजनांवर परिणाम

निम्न तेरणा प्रकल्पातून औसा, निलंगा, उमरगा या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच, या धरणाच्या पाण्यावर 68 खेडी अवलंबून आहेत. लवकरच लोहारा शहरालाही या धरणातून पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. मात्र, सत्ताधारी आमदाराने बेलकुंड येथून उपसा सिंचन योजना राबवून धरणातील पाणी अन्य ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी धरणाच्या उंची वाढवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनाचा इशारा

आंदोलनाचा इशारा

या धरणाची उंची वाढवली जाणार असल्यास शेतकऱ्यांच्या हक्कांची रक्षा करण्यासाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा अनिल जगताप यांनी दिला आहे. 2011 मध्येही निम्न तेरणा प्रकल्पातून 20 दशलक्ष घनमीटर पाणी औसा तालुक्यातील शिंदाळा-टेंभी येथे नियोजित भेल महाजनको प्रकल्पासाठी आरक्षित करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, सर्व पक्षांच्या एकत्रित लढ्यामुळे हा निर्णय रोखण्यात आला होता.

याच धर्तीवर, लवकरच धरण उंची विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात येणार असून, शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करेल. जर प्रक्रिया थांबवली गेली नाही, तर मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलन छेडले जाईल, असे अनिल जगताप यांनी जाहीर केले आहे.

अनैतिक देह व्यापार प्रकरणी बार व लॉजवर छापा—तीन आरोपींवर गुन्हा दाखल

कळंब (धाराशिव) | शहरातील हिमालय बार आणि लॉजवर कळंब पोलिसांनी अनैतिक देह व्यापार प्रकरणी धाड टाकून चार पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची नावे:

  1. विजय परशुराम कदम (वय 47, रा. शिक्षक कॉलनी, कळंब)
  2. प्रशांत विठ्ठल काळे (वय 44, रा. मंगरुळ, ता. कळंब)
  3. सलाउद्दीन दगडू शेख (वय 38, रा. चोंदे गल्ली, कळंब)

घटनाक्रम:
दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता कळंब पोलिसांना हिमालय बार व लॉजमध्ये अनैतिक देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता, आरोपींनी संगणमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चार महिलांना वाणिज्यिक कारणांसाठी आश्रय दिल्याचे आढळले. या महिलांना ग्राहकांच्या मागणीनुसार लैंगिक समागमासाठी प्रवृत्त करून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते.

पोलिसांची कारवाई:
कळंब पोलिसांनी त्वरित कारवाई करत घटनास्थळी असलेल्या पीडित महिलांची सुटका केली. आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 144 आणि अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास:
या प्रकरणाचा अधिक तपास कळंब पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. पीडित महिलांना पुनर्वसनासाठी योग्य मदत आणि संरक्षण देण्याच्या दृष्टीने प्रशासन आवश्यक पावले उचलत आहे.