Home Blog Page 85

शालेय साहित्य विक्री दुकानांचे ऑडिट करण्याची मागणी

 


धाराशिव दि ६ (प्रतिनिधी) -जागृती फाउंडेशनच्या वतीने पाठ्य पुस्तके दुकाने यांचे ऑडिट करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की शहरातील पाठ्य पुस्तके दुकानदार शालेय साहित्य विक्रीमध्ये ग्राहकांना अवाजवी किंमती घेऊन आर्थिक पिळवणूक करत आहेत ग्राहकांना जीएसटी व सीजीएसटी युक्त देयके दिली जात नाहीत. ग्राहकांना बील मागितले तर थातुर मातूर बीले दिली जातात. यातून हे पाठ्य पुस्तके (होलसेल) दुकानदार ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करतात आणि पैशाचा अपहार करून आयकर विभागास ही चुना लावतात. त्यामुळे या दुकानांची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी. त्यामुळे विद्यार्थाची व पालकांची ही आर्थिक पिळवणूक होणार नाही. अगदी काल परवाच इयत्ता दहावीची आणि बारावीची निकाल लागला असून लवकरच पुढील शिक्षणासाठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी तुंबळ गर्दी आहे यात आपल्या शहरातील पाठ्यपुस्तक विक्रेते प्रिंटेड किमतीवर आणणे मनाला वाटेल तसे खुल्या साहित्यावर किमती लावून सर्वसामान्य ग्राहकांची लूट करतात यामुळे याकडे गांभीर्याने पाहून शहरातील सर्व दुकानदारांची बिलबुके, आयकर परतावा, जीएसटी, सीएसटी भरणा इत्यादी तपासण्या करण्यात येऊन सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी असे निवेदनात नमूद केलेले आहे. या निवेदनावर विजय बनसोडे, आनंद गाडे, नंदकुमार हावळे, कुंदन वाघमारे, इन्नुस पटेल, बाबा वाघमारे, सोमनाथ नागटिळक, विद्यानंद वाघमारे ,बाळासाहेब जानराव आदींच्या स्वाक्षरी आहेत

दैनिक जनमत ०६ जून २०२३ E paper

 

दैनिक जनमत ०५ जून २०२३ E paper

 

परंडा आगाराच्या एस.टी बसचा परंडा-बार्शी राज्य मार्गावर अपघात





अपघातात ३०/३५ प्रवाशी जखमी,जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

परंडा ( प्रतिनिधी ) बार्शी /परंडा राज्य मार्गावरील सोनगीरी नदी लगतच्या वळणावर परंडा आगाराची एस.टी बस रस्त्याच्या खाली गेल्याने बस पलटी होऊन झालेल्या अपघाता ३० ते ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. हि घटना दि ३ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमीना परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले असुन चार ते पाच प्रवाश्यांचे हात,पाय फॅक्चर झाले असल्याची माहिती मिळली आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी उपजिल्हा रूग्णालयात गर्दी केली होतीया अपघाता मध्ये दत्तात्रय वेताळ, चंद्रभागा वेताळ,नुसरत काझी,मंगल बोराडे,समीना पठाण,तमन्ना पठाण, विश्वनाथ पाडूळे,आफरीन डोंगरे,सहेर सय्यद,अजिनाथ मुळीक,कैलास लांडगे,बाळासाहेब कानगुडे, हारून बेसकर,मेहराज बेसकर, संतोष व्हटकर,सतीस पसारे, अन्नासाहेब काकडे,बाळू काशीद कैलास लांडगे,साक्षी पाटील, शांताबाई पाटील,कमलाबाई पवार,जुबेदा मुंडे,सोमनाथ गायकवाड,लताबाई गुडे,संगीता धुमाळ,नंदाबाई वाडेकर,सरस्वती जाधव,रमेश जाधव,शिवकन्या दुबवड,दौलतराव नलवडे यांच्या ईतर प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात चार ते पाच प्रवासी फॅक्चर झाले असल्याची माहिती मिळाली असुन त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात येत आहे.अपघाताची माहिती मिळताच परंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार केरबा कांबळे,पो.ना क्षिरसागर,पो.ना शेवाळे,पो.ना अफरोज शेख,पोह म्हेत्रे,पोकॉ यादव यांच्यासह सोनगीरी,खासगाव,पिंपळवाडी येथील नागरीकानी अपघातातील प्रवाश्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवीण्यासाठी मदत केली.यावेळी अगार प्रमुख उल्हास शिंनगारे यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.

जिल्हयात नव्याने स्त्री,उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना मंजूरी, लवकरच बांधकामास होणार सुरुवात

 जिल्हयात नव्याने स्त्री,उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना मंजूरी, लवकरच बांधकामास होणार सुरुवात


पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या विशेष प्रयत्नांना यश



         उस्मानाबाद,दि.2(प्रतिनिधी):- सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या विशेष प्रयत्नामुळे व जिल्हयातील नागरीकांच्या आरोग्य सेवेची निकड/गरज लक्षात घेवून उस्मानाबाद जिल्हयात खालील प्रमाणे स्त्री,उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना मंजूरी मिळालेली आहे.
       परंडा येथे १०० खाटांचे नविन स्त्री रुग्णालयास मंजूरी मिळाली असून एकूण ४३८६.०० लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आले.सन २०२३-२४ मध्ये १०९६.५ लक्ष इतक्या निधीस मंजूरी  मिळाली असून जागा निश्चित करण्याची कार्यवाही चालू आहे. परंडा येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मंजूरी मिळाली असून एकूण ४३८६.०० लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आले.सन २०२३-२४ मध्ये १०९६.५ लक्ष इतक्या निधीस मंजूरी  मिळाली असून जागा निश्चित करण्याची कार्यवाही चालू आहे.भूम येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मंजूरी मिळाली असून एकूण २४५३.०० लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आले.सन २०२३-२४ मध्ये ६१३.२५ लक्ष इतक्या निधीस मंजूरी  मिळाली असून जागा निश्चित करण्याची कार्यवाही चालू आहे. वाशी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मंजूरी मिळाली असून एकूण २४५३.०० लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आले.सन २०२३-२४ मध्ये ६१३.२५ लक्ष इतक्या निधीस मंजूरी  मिळाली असून जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची कार्यवाही चालू आहे.वालवड ता.भूम येथे नविन ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयास मंजूरी मिळाली असून एकूण १७७५.०० लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आले.सन २०२३-२४ मध्ये ४४३.७५ लक्ष इतक्या निधीस मंजूरी  मिळाली असून जुनी इमारत पाडण्यासाठीची कार्यवाही चालू आहे.
  वरील प्रमाणे उस्मानाबाद जिल्हयात नव्याने रुग्णालयास मंजूरी मिळाली असून लवकरच बांधकामास सुरुवात होणार आहे.

धाराशिव जिल्ह्यात कृषि विभागाची कारवाई दहा कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित

 

धाराशिव दि,01(प्रतिनिधी):-खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाकडून नियमित कृषी सेवा केंद्र तपासणी करण्यात येत असून तपासाणी अंती अनियमितता आढळून आलेल्या 10 कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित व 03 कृषी सेवा केंद्राना ताकीद देण्यात आलेली आहे. तपासणीमध्ये जादा दराने खताची विक्री करणे , ई-पॉस मशीन प्रमाणे साठा न जुळणे , परवान्यात समाविष्ट स्त्रोताव्यतिरिक्त इतर निविष्ठाची खरेदी विक्री करणे , साठा रजिस्टरला नोंद नसणे ,शेतक-यांना विहीत नमुन्यात पावती न देणे इ.अनियमितता आढळून आलेली आहे. यामध्ये तुळजापूर तालुक्यातील 06 , लोहारा तालुक्यातील 01 व भूम तालुक्यातील 03 कृषी सेवा केंद्राचा समावेश आहे तसेच उमरगा तालुक्यातील 01 व भूम तालुक्यातील 02 कृषी सेवा केंद्राना ताकीद देण्यात आलेली आहे. 

            यानंतर देखील तपासणी सुरुच राहणार असून दोषी विक्रेत्यांवर बियाणे/खते/किटकनाशके कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.  जिल्हयातील खत विक्री केंद्राने शेतक-यांना जादा दराने विक्री करणे, लिंकिंग करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्री केंद्र/गोदामात उपलब्ध असलेल्या खताचा साठा याची माहिती भावफलक/दरफलकावर नोंद न करणे इ. प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

              तसेच शेतक-यांनी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करत असताना अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी, खरेदी करताना पक्की पावती घ्यावी पावतीवर खरेदी केलेल्या निविष्ठाचा संपूर्ण तपशील, विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी.अनुदानित रायासनिक खताची खरेदी केल्यावर विक्रेत्याकडून ई-


पॉस मशीनवरील बिल घ्यावे व खरेदी केल्यानंतर खताच्या बॅगवरील किंमत व विक्रेत्याने दिलेले बिल तपासून घ्यावे तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग, वेस्टन, पिशवी व त्यातील  थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करुन ठेवावेत. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व त्यावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. नामांकित कंपनीचे बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करावीत.

                  निविष्ठा उपलब्धतेच्या व दराच्या अनुषंगाने  तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक 02472223794  असा असून यावर whatsapp द्वारे देखील तक्रार स्विकारली जाणार आहे. तक्रार नोंदवताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व तक्रारीचा थोडक्यात तपशील द्यावा तसेच साध्या को-या कागदावर ही माहिती लिहून त्याचे छायाचित्र काढून ते व्हॉटससॲप ने पाठवता येऊ शकेल . याशिवाय शेतक-यांना आपले तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी यांचेकडे देखील तक्रार नोंदवता येईल असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी , रविंद्र माने यांनी केले आहे.            

सोलापूर जिल्ह्यात दि. 2, 3 जूनला उष्णतेच्या लाटेसम स्थिती

सोलापूर, दि. 1 (प्रतिनिधी) – प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबईच्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यातील काही भागात दि. 2 व 3 जून रोजी उष्णतेच्या लाटेसम स्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे गरजेशिवाय  उन्हात जास्त फिरू नये, उन्हाच्या झळांपासून संरक्षण करण्यासाठी पुरेशी तयारी करूनच घराबाहेर पडावे. डोक्यावर टोपी घालावी किंवा सुती कपडा गुंडाळावा. सोबत पाणी, लिंबू पाणी किंवा ओआरएस ठेवावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी केले आहे.

डॉ. पद्मसिंह पाटील यांचे मातृप्रेम.. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आठवणींना उजाळा

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने डॉ. पद्मसिंह पाटील यांचे मातृप्रेम कसे आहे हे सांगणारा किस्सा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे. तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.


सन 1989-90 चा काळ होता. माझी डॉक्टर साहेबांशी ओळख कशी व कुठे झाली हेच मला आठवत नाही. कारण त्यांनी मला इतक जवळ केले कि, जणू काही मी त्यांच्या घरातलाच. निष्ठा काय असते हे खरतंर मी त्यांच्याकडूनच शिकलो. आपला नेता जे सांगेल ती लक्ष्मणरेषा. 


सन 1991 साली श्री. शरद पवार साहेबांविरुद्ध महाराष्ट्रात काही जणांनी बंड केले. त्या बंडाला सामोरे जाताना मी त्यांना बघितले. एखाद्या कार्यकर्त्याने जे करावं ते डॉक्टर साहेब करत होते. आपल्या वयाचा विचार न करता त्यांच वागण मी स्वत:च्या डोळ्याने बघीतले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याचा हात पकडून फक्त दाबला तर त्या नेत्याच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे कुठल्या ताकतीने तो हात दाबला गेला असेल याचा विचार आपणच करावा. तेव्हाचे एक महासचिव जे या बंडात साहेबांच्या विरोधात होते ते एका कॅबिनमध्ये बसले असता फोन खणखणला. फोन जवळ डॉक्टर साहेब बसले होते. दोघांचाही हात फोन उचलायला गेला. डॉक्टरांनी फोन तर उचललाच, पण उचलता उचलता तो फोन त्या नेत्याच्या तोंडावर बसला. ते कस झाले असेल ते तुम्हीच समजून घ्या. 


श्री. शरद पवार साहेब संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले. जाताना इथे मुख्यमंत्री कोण याची स्पर्धा सुरु झाली. श्री. शरद पवार साहेबांच्या जवळ असलेल्या प्रत्येकाला वाटत होते कि डॉक्टर साहेबांनी मुख्यमंत्री व्हाव. मला त्यावेळस हे गट तट काही माहितीच नव्हते. पण, त्यांच्या जवळ असल्य़ाकारणाने मलाही वाटत होते कि त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं. तसे त्यांनी संध्याकाळी मला सांगितले देखील कि, सकाळी लवकर ये आपले नाव होईल अस वाटतय. पण, नंतर जे काही झाले ते वेगळेच होते. आणि श्री. सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री झाले. सुधाकरराव मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्यावेळेस बाबरी मस्जिद पडली. त्यानंतर राजकारणाला वेगळं वळण लागले. आणि परत एकदा डॉक्टर साहेब हे श्री. शरद पवार साहेबांसाठी सक्रिय झाले.


डॉक्टर साहेब आणि श्री. सुधाकरराव नाईक यांच्यामध्ये दुरावा कायम होता. त्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. रणजीत देशमुख हे होते. श्री. प्रणवकुमार मुखर्जी, श्री. जी. के. मुपनार आणि श्री. जनार्दन पुजारी हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले होते. ह्या दोघांना भेटायला हायमाऊंट या शासकीय विश्रामगृहात श्री. सुधाकरराव नाईक आले. श्री. सुधाकरराव नाईक यांच्या जमावाने श्री. शरद पवार साहेबांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली असता तिथे आमची झटापट झाली. मी आणि श्री. मदन बाफना आम्ही दोघेच त्या ठिकाणी उपस्थित होतो. झटापटीमध्ये श्री. सुधाकरराव नाईक यांना धक्का लागला आणि ते खाली पडले. ही तक्रार श्री. सुधाकरराव नाईक यांनी श्री. प्रणवकुमार मुखर्जी व श्री. जी. के. मुपनार यांच्याकडे केली. तिथून काही अंतरावर राहत असलेल्या डॉक्टर साहेबांना लगेच बोलाविण्यात आले. डॉक्टर साहेब आले आणि जाताना मला आणि श्री. मदन बाफनांना विचारले काय झाले ? आम्ही सर्व सविस्तर सांगितले. ते वरुन खाली आले आणि आमच्याकडे बघून हसले. तेवढ्यात मुंबई पोलीसांची गाडी आली. त्या गाडीमधील एकाने उतरून मला बोलावले. माझे नशीब चांगले कि, त्याचवेळेस डॉक्टरसाहेब खाली आलेले होते. मला पोलीस बोलवत आहेत हे बघितल्यानंतर ते स्वत:च पुढे आले आणि विचारले काय झाले. पोलीसांनी सांगितले कि आम्हांला यांना चौकशीसाठी न्यायचे आहे. त्यांनी त्यांच्याच स्टाईलमध्ये सांगितले. ह्या घरातल्या भांडणात तुमचे काही काम नाही चला जा…त्यांनी मला सांगितले गाडीत बस आणि मला स्वत:च्या निवासस्थानी घेऊन गेले.


त्यानंतर बरीच वर्षे आम्ही त्यांच्या सानिध्यात काम केलं आहे. ते जेव्हा पाटबंधारे विभागाचे मंत्री होते. तेव्हा ठाण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी मी त्यांच्याकडे हट्ट धरला. तेव्हा माझा बालहट्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून मुंबईला देण्यासाठी 1952 साली चितळे आणि गोडबोले आयोगाने Notified (सुचविलेले) धरण हे त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या नावावरुन काढून घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या नावावर केले. हे धरण झाल तर 2040 पर्यंत ठाण्याचा पाणी प्रश्न मिटेल अशी परिस्थिती त्यावेळेस होती. त्यांनी कुठलेले आडेवेडे न घेता ते धरण ठाणे महानगरपालिकेला देऊ केले. अर्थात त्यानंतर शासनामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये थोडेसे समज गैरसमज होत गेले आणि महापालिकेने ते धरण करण्यास नकार दिला.


अशा अनेक गोष्टी मला त्यांच्याबद्दल सांगता येतील. पण, त्यांच्या सानिध्यातील दिवस हे कधीच विसरता येणार नाहीत. राष्ट्रपती बाजूला उभे आहेत. बाजूला श्री. शरद पवार साहेब उभे आहेत. दोघेही विमानतळावरती आहेत. आणि डॉ. पद्मसिंह पाटील त्यांच्या बाजूलाच उभे राहून मी बाहेर गर्दीत उभा असतांना पटकन ओरडून म्हणाले ‘बंटी आतमध्ये ये’ हे मी कधीच विसरणार नाही. मला आजही आठवते कि, 9 मे 1991 रोजी मी औरंगाबाद येथे होतो. राजीव गांधी हे औरंगाबादला प्रचारासाठी आले होते. आतमध्ये राजीव गांधी, राजीव गांधी यांचे मित्र सुमन दुबे, श्री. शरद पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष श्री. निलंगीकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील हे आतमध्ये बसलेले होते. पटकन बाहेर एक पोलीस धावत आला आणि माझ्या कानात येऊन म्हणाला तुम्हांला आतमध्ये बोलावले आहे. आतमध्ये डॉ. साहेबांनी मला बोलावून घेतले आणि जवळ-जवळ 1 तास राजीव गांधी यांच्याबरोबर श्री. शरद पवार साहेब गप्पा मारत असतांना मी शांतपणाने हे सगळं बघत होतो. हे सगळं केवळ डॉक्टर साहेबांमुळेच माझ्या आयुष्यात घडले. इतका मनाने मोठा, निर्मळ माणूस माझ्या आयुष्यात आला हे मी माझे भाग्यच समजतो. त्यांचे चालणे, त्यांची व्यायामाची छाती हे सगळे त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभेसे होते.


हे सगळं असताना देखिल त्यांची मातृभक्ती ही वाखणण्याजोगी होती. एवढा मोठा कॅबिनेट मिनिस्टर, त्यांचा संपूर्ण राजकीय वर्तुळातील दरारा हे सगळं असताना त्यांच्या आईला ते दररोज संध्याकाळी फिरायला घेऊन जायचे. त्यांच्या बिल्डिंगला लिफ्ट नव्हती. आई तिसऱ्या माळ्यावर भावाबरोबर राहायची. डॉक्टर साहेब तीला स्वतःच्या पाठीवर उचलून घेऊन खाली आणायचे. आणि फिरायला घेऊन जायचे व परत उचलून घेऊन घरी आणून सोडायचे. हे सगळ एका माणसाच्या व्यक्ती चारित्र्यामध्ये असणं ह्याच मला आश्चर्यच वाटत.


त्यांच्या स्वभावामुळे राजकारणात त्यांची दहशत तर होतीच. पण, स्वकियांबरोबरच विरोधकांमध्येही आदरयुक्त भिती होती. मला खरतर श्री. शरद पवार साहेब यांच्या दारात दोन माणसे घेऊन गेली त्यांना मी कधीही विसरु शकत नाही. एक म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील आणि दुसरे म्हणजे सुरेश कलमाडी. 


आज डॉक्टर साहेबांचा वाढदिवस आहे. थकलेले डॉक्टर साहेब यांचा आवाज ऐकला कि, मन अस्वस्थ होतं. आजही मुंबईला कुठलिही राजकीय हालचाल झाली कि, सकाळी 6 ते 7 च्या मध्ये त्यांचा फोन येणार आणि परिस्थितीबद्दल विचारणा करणार. त्यांच्या मनातलं साहेबांविषयीचे प्रेम हे त्यांच्या प्रत्येक शब्दांत आजही दिसून येते. त्यांची प्रकृती ठणठणीत राहो आणि ते शतकवीर होवो ह्याच शुभेच्छा ! कारण आजच्या जगात अशी माणसे फार कमी आढळतात.

डॉ. जितेंद्र आव्हाड..