सर्वसाधारण सभा, स्थायी समितीचे इतिवृत्त गायब? धाराशिव नगरपरिषदेत पारदर्शकतेचा बोजवारा?आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्याचा फुगा फुटला!

0
53

धाराशिव : शहरातील नागरिक समस्यांनी त्रस्त असताना त्या समस्या सोडविण्याचे तर दूरच मात्र पारदर्शक कारभासाठी आवश्यक जबाबदाऱ्या देखील सत्ताधाऱ्यांना पेलवत नसून
निवडणुकीदरम्यान पारदर्शक आणि उत्तरदायी कारभाराचे गाजावाजा करणाऱ्या भाजपा नेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात असणाऱ्या कारभाऱ्यांनी सभांचे इतिवृत्त नागरिकांसाठी उपलब्ध न करून दिल्याने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या दाव्याचा फुगा फुटला असून हा प्रकार शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीमुळे उघडकीस आला आहे.नगरपरिषद धाराशिवमधील कामकाजात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करत नगरसेवक सचिन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

नगरसेवकांच्या निवेदनानुसार, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ८१ च्या तरतुदींचा भंग करून नगरपरिषद प्रशासनाने अनेक महत्त्वाच्या सभांचे इतिवृत्त पुढील सभेत मंजुरीसाठी मांडलेले नाही. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या विषय समिती, सर्वसाधारण आणि अर्थसंकल्पीय सभांचे कामकाज पूर्ण होऊनही त्याची अधिकृत नोंद नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

या संदर्भात नगरपरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती नेहा काकडे आणि मुख्याधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी टाकण्यात आली आहे. “मागील सभांचे इतिवृत्त मंजूर न करता पुढील सभा घेणे हे बेकायदेशीर असून लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे,” असा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदार नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कठोर भूमिका घेत, जोपर्यंत प्रलंबित सभांचे इतिवृत्त मंजूर होत नाहीत तोपर्यंत नवीन सभा घेण्यास मनाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर अनेक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.याबाबत सर्वसाधारण सभेचे सचिव असणाऱ्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here