Home Blog Page 80

दैनिक जनमत ०१ जुलै २०२३ E paper

दैनिक जनमत ३० जून २०२३ E paper

काळे दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान



आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्या हस्ते आज पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.
“बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, राज्यावरची सगळी संकटं, आरिष्ट दूर होऊ दे, राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, हे राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे, राज्यातील सर्व समाजघटक सुखी, समाधानी झाला पाहिजे, त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे” अशी प्रार्थना यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठूराया चरणी केली.
यंदा अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी (ता. नेवासा) येथील भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि सौ.मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्यास मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजेचा मान मिळाला. श्री. काळे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून भास्कर गिरी महाराजांसोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करतात.
महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मानाच्या वारकरी दाम्पत्याला दिला जाणारा मोफत वार्षिक बस प्रवास पास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे वितरण आणि वारी संदर्भात छायाचित्रांचे संकलन असलेल्या ‘भू वैकुंठ’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुस्लिम बांधवांचा मोठेपणा; उद्या बकरी ईद असूनही सलगरा परिसरात कुर्बानी न देण्याचा निर्णय

 



सलगरा,दि.२८(प्रतिक भोसले) 

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवार, दि.२७ जुन रोजी आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या अनुषंगाने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित हिंदू – मुस्लिम बांधवांना सपोनि. सिद्धेश्वर गोरे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीचा उद्देश समजावून सांगितला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, समाजातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांचे सर्वच सण आनंदाने उत्साहात एकोप्याने साजरे व्हावेत ही शासनाची व सर्वच जाती धर्माच्या नागरिकांची भावना असते. त्यामुळे कुठेही गालबोट लागू नये यासाठी पोलिस प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करून योग्य ती खबरदारी घेत असते. यामध्ये नागरिकांचे देखील सहकार्य मिळत असल्यामुळे अडचणी येत नाहीत. गंधोरा, किलज, वडगाव, वाणेगाव, आदी गावातील सर्वच नागरिक शांतता प्रेमी असल्यामुळे आजपर्यंत पोलीस प्रशासनाला अडचणी आलेल्या नाहीत. याचा आवर्जून उल्लेख करून त्याबद्दल नागरिकांचे कौतुक केले. येणारे धार्मिक सण आणि उत्सव शांततेने होण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. ईतर जिल्हयातील पडसाद आपल्याकडे येऊ नयेत या साठी खबरदारी म्हणून आज या शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये समाज माध्यमांची भूमिका महत्वाची असल्याने सर्व समाज माध्यम म्हणजेच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर सतर्कतेने करावा. सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट जर नियम भंग करणाऱ्या ठरल्या तर या मुळे होणाऱ्या गुन्ह्याचे संबंधिताच्या भविष्यावर गंभीर परिणाम होतात. याची जाणीव देखील सगळ्यांना करून देणे गरजेचे आहे खास करून तरुणांना असे ते बोलताना म्हणाले. या वेळी सरपंच विष्णु वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, जिवन लोमटे, शशिकांत लोमटे, मुरतुजा पटेल, नजीर पटेल, हरीश पटेल, अब्दुल पठाण, पापा मुलाणी, रहीम पटेल, अहमद शेख, तोहीद पटेल, अजित लोमटे, नवनाथ मुळे, बलभीम लोमटे, गहिनीनाथ लोमटे, अनिल लोमटे, श्रीकांत लोमटे, प्रशांत बोधणे, सुनिल अंदगावकर, राहुल काटवटे, रमेश कांबळे, देवानंद माळी, सतिश स्वामी, इराप्पा मस्के, अविनाश भालशंकर यांच्या सह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी मुस्लिम बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, बकरी ईद सणाला मुस्लिम बांधव कुर्बानी देतात परंतु यावर्षी हिंदू बांधवांचा ‘आषाढी एकादशी’ व मुस्लिम बांधवांचा ‘बकरी ईद’ हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे हिंदू बांधवांना त्याच दिवशी ‘आषाढी एकादशी’ सण साजरा करावा लागणार आहे. मुस्लिम बांधवांना ‘बकरी ईद’ ला कुर्बानी देण्यासाठी पुढील दोन दिवस असतात. त्यामुळे हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर करून मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त जर एखादा मुस्लिम बांधव कुर्बानी देत असेल तर सर्व मुस्लिम बांधव त्याला विरोध करून शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुस्लिम बांधवांच्या वतीने सांगण्यात आले. या पाठोपाठ गंधोरा, किलज, वडगाव, वाणेगाव या गावांमध्ये पण असाच निर्णय घेण्यात आला आहे. असे त्या त्या गावातील प्रतिष्ठित मुस्लिम बांधवांनी दैनिक जनमतशी बोलताना सांगितले. 


उद्या २९ तारखेला दोन्ही धर्माचे प्रमुख सण एकाच दिवशी येत आहेत हे धार्मिक सण शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही गावोगावी शांतता कमिटीच्या बैठकी घेत आहोत. या कालावधीत आपला सण साजरा करताना ईतर धर्मियांना सहकार्य व समन्वय राखण्यासाठी या पूर्वी देखील आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील शांतता कमिटीच्या सदस्यांनी चांगले काम केले आहे. त्या मुळे त्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि अशीच सतर्कता येणाऱ्या सण उत्सवांच्या काळात देखील राखली जावी अशी आशा बाळगतो, विशेष म्हणजे बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने नागरीकांनी एकमेकांच्या धार्मिक परंपरा व रितीरिवाजाचे आदर करुन सौहार्दपूर्ण वातावरणात सण / उत्सव शांततेत पार पाडावेत. तसेच कुर्बानी अनुषंगाने प्रचलित कायद्यांचे उल्लंघन होणार नाही व इतरांच्या भावना दुखविल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

सहायक पोलीस निरीक्षक – सिद्धेश्वर गोरे

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

 मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री यांचेसह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.



👉  संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय :


✅ वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव


✅ मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव


✅ राज्यात ७०० ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’; २१० कोटी रुपयांना मान्यता


✅ भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ


✅ महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार. २ कोटी कार्ड वाटणार; आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.


✅ संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ


✅ आता असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार


✅ नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा;  विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश


✅ मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.


✅ पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ कि.मी.च्या नद्यांमधील गाळ काढणार


✅ मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड


✅ भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण


✅ मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये


✅ राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र


✅ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन; पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार


✅ बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित


✅ जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता


✅ राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता


✅ बुलडाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय


✅ दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविणार


✅ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ


✅ देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता


✅ चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट


✅ सर जे. जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ


✅ गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता


✅ ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ


✅ पाकिस्तानने पकडलेल्या मासेमारी करणाऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार


✅ पर्यटन उपविभागासाठी उप सचिव

“बकरी ईद”ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, दि.२८ जून ऐवजी गुरुवार, दि.२९ जून रोजी जाहीर

 शासनाकडून सन २०२३ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील “बकरी ईद” ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, दि.२८ जून २०२३ रोजी दर्शविण्यात आली होती. मात्र हा सण गुरुवार, दि.२९ जून २०२३ रोजी येत असल्याने दि.२८ जून २०२३ रोजीची सुट्टी रद्द करुन गुरुवार, दि.२९ जून २०२३ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सो.ना.बागुल यांनी जाहीर केली आहे.

    तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.