Home Blog Page 54

धाराशिव जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी

धाराशिव,दि.31(प्रतिनिधी) जिल्ह्यात सन 2023-24 मध्ये सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.तसेच जिल्ह्यातील वाशी,धाराशिव व लोहारा हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहे.
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी, धाराशिव यांचेद्वारे महाराष्ट्र वैरण (निर्यात नियंत्रक) आदेश 2001 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील गुरांचा चारा / गवत / वैरण जिल्ह्याबाहेर अन्यत्र वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.तसेच हे आदेश आजपासून पुढील आदेश होईपर्यंत अंमलात राहणार आहेत.
यासाठी जिल्ह्यातील सर्व चारा उत्पादक,पशुपालक व चारा व्यावसायिकांनी जिल्ह्यातील पशुधनाच्या आवश्यकतेस विचारात घेऊन जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक वा विक्री करु नये.असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर कामांच्या वाटपात अनियमितता, लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप

धाराशिव – जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर कामांच्या वाटपात अनियमितता होत असून लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप असल्याचा आरोप बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

जिल्हा नियोजन समितीमार्फत नगर परिषद धाराशिव अंतर्गत १०५ विकासकामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. नगर परिषदेअंतर्गत असलेली ही विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली असून बांधकाम विभागामार्फतच त्यांना मंजुरी देण्यात येत आहे. ही विकासकामे खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी आपआपसात वाटून घेऊन कार्यकर्त्यांना देण्याची शिफारस करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

जर लोकप्रतिनिधी आपापल्या कार्यकर्त्यांना कामे वाटप करण्याची शिफारस देत असतील तर इतरांवर हा अन्याय असून मग आम्ही काय करावे ? असा सवाल उपस्थित होत आहे. कामे वाटपामध्ये लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढत असल्याचे दिसत आहे. कामे मिळत नसल्यामुळे अन्य मजूर संस्था, अभियंते, ठेकेदारांवर अन्याय होत असल्यामुळे तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. कामे वाटपाचा हा वाद जिल्हाधिकारी महोदयांनी स्वतः लक्ष घालून मार्ग काढावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी धनंजय शिंगाडे, खलील सय्यद यांच्यासह सामाजिक संघटनांचे सदस्य उपस्थित होते.

परिवर्तन फाउंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांचा सत्कार

कोल्हापूर, दि.२६ (प्रतिनिधी) भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे डिन (अधिष्ठाता) डॉ. प्रकाश गुरव यांनी विविध ठिकाणी केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा कोल्हापूरकर नागरिक व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने जीवनरक्षक धन्वंतरी स्मृतीचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आले.
याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. शिशिर मुरगुंडे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, डॉ. झहीर आदी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे विविध डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख, डॉक्टर्स, परिचारिका, कक्षसेवक तसेच छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर परिवर्तन फाउंडेशन एन.जी.ओ.च्या वतीने हॉस्पिटल परिसरातील रुग्णाच्या नातेवाईकांना मिठाई वाटप करण्यात आले.

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रादेशिक  परिवहन कार्यालय धाराशिव व दिपक ड्रायव्हिंग स्कुल परंडा यांच्या वतीने परंडा येथे वाहन चालकांना मार्गदर्शन

आपघात टाळण्यासाठी वाहतूकीचे नियमाचे पालन करून हेल्मेट व सिट बेल्टचा वापर करा- प्रशांत भांगे

परंडा ( प्रतिनिधी )रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आपघाताचे प्रमाण कमी करण्या साठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शना खाली मोटार वाहन निरीक्षक प्रशांत भांगे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक बदर,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नकाते तसेच दिपक मोटार ड्रायव्हींग स्कुल परंडा चे संचालक दिपक थोरबोले यांच्या वतीने परंडा येथील नगऱ परिषदेच्या स्व.गोपीनाथ मुंडे सभागृहात दि २५ जानेवारी रोजी जनजागृतीसाठी वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
आपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करून मोटार सायकल चालकाने हेल्मेट वापराने तसेच चारचाकी वाहण चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा तसेच रस्त्याने पायी चालनाऱ्या नागरीकांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे असे अवाहन मोटार वाहन निरीक्षक प्रशांत भांगे यांनी केले आहे.
आपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे मोटार वाहन निरीक्षक प्रशांत भांगे,बादर,नकाते व दिपक मोटार ड्रायव्हींग स्कुलचे संचालक दिपक थोरबोले यांनी सांगीतले.
यावेळी दिपक मोटार ड्रायव्हिग स्कुल चे संचालक दिपक थोरबोले यांच्या वतीने लकी ड्रॉ पध्दतीने चिट्टया काडून उपस्थित असलेल्या वाहन चालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
मीरा काळे,प्रिया रॉय,महमंद हुसेन सौदागर,सुनील तांबे. मुनाफ सौदागर यांना हेल्मेट वाटप करण्यात आले.
यावेळी महेश थोरबोले, ओंकार थोरबोले,संजय वैद्य, सचिन वारे,गणेश सरवदे,अरुण बनसोडे,नवनाथ पवार यांच्या सह वाहन चालक उपस्थित होते.

आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते श्रीम.सारिका शिंदे (हेगडकर) यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

परंडा (प्रतिनिधी) – सन२०२२-२३या वर्षातील तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीम.सारिका त्रिंबक (हेगडकर)शिदें यांना राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे यांच्या हस्ते दि.२५ जानेवारी रोजी प्रदान करण्यात आला.
गटशिक्षण कार्यालयातील मूळ पदाचा पदभार सांभाळून जि.प.प्रशाला सोनारी येथे इयत्ता नववी,दहावी गणित,विज्ञान विषयाचे अध्यापन तसेच शंभर टक्के निकाल तसेच तेथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक मिळवला जि.प.प्रशाला जवळा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयाचे अध्यापन व शंभर टक्के निकाल.शाळेवर शिक्षकाचे पद रिक्त असताना आत्तापर्यंत पांढरेवाडी,मुगाव,खानापूर, ब्रम्हगाव इतापेवस्ती,सरणवाडी नं.१अशा अनेक शाळेवर उत्कृष्ट अध्यापन,शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न, विभागस्तरीय,जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये सहभाग, तालुकास्तरीय,केंद्रस्तरीय प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन.विज्ञान प्रदर्शन,विज्ञान मिळावे यामध्ये सहकार्य.शाळा भेटी दरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीम.सारिका शिदे (हेगडकर) यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष धनंजय सावंत,
मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.राहुल गुप्ता,शिक्षणाधिकारी श्रीम.सुधा साळुंखे,गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, विस्ताराधिकारी अशोक खुळे, विस्तार अधिकारी सुर्यभान हाके यांच्यासह गटशिक्षण कार्यालयातील सर्व स्टाफ, शिक्षक बंधू,शिक्षक भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कबाब, शबाब, महात्मा गांधी वाटप केले जातील त्याला बळी पडलात तर संविधान गेलं म्हणून समजा – ॲड. प्रकाश आंबेडकर

धाराशिव – निवडणुकीच्या काळात कबाब, शबाब, महात्मा गांधी वाटप केले जातील त्याला बळी पडलात तर संविधान गेलं म्हणून समजा असा सावधानतेचा इशारा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी महाएल्गार सभेसाठी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना दिला. तसेच लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ओबीसींचे १२ -१३ खासदार संसदेत गेले नाहीत तर आरक्षण टिकणार नाही. अशी काळजी त्यांनी यावेळी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेल्या या मेळाव्याला प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की,
जुन्या काळी सत्ता पुजाऱ्याच्या हातून चालत असे आत सत्तेचे केंद्र विधानसभा आहे.सत्तेचे केंद्र आमदार, खासदारांनी घेतलं आहे.आरक्षण आपण वाचविणार, नुसतं वाचवायचं नाही तर आरक्षांतून लोकांचा विकास झाला पाहिजे, उमेदवारी मिळायला पाहिजे, महाराष्ट्राची सत्ता १५९ कुटुंबामध्ये अडकली आहे. अडकलेल्या सत्तेला सोडवायचे आणि सर्व सामान्य लोकांमध्ये फिरवलं पाहिजे.आरक्षणवादी लोकांना उमेदवारी दिली पाहिजे,किमान जो पक्ष १२ ते १५ उमेदवारी देईल तोच आपला पक्ष,दोन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यात ओबीसींचे १२ -१३ खासदार गेले नाहीत तर आरक्षण टिकणार नाही.धर्म धोक्यात नाही मात्र धोक्यात असल्याचा कांगावा आरक्षण विरोधकांनी केला
मला कुठल्याही धर्माला विरोध करायचा नाही, समतेचा विचार पुढे घेऊन जायचे आहे असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

काठी न घोंगडं घेऊ द्या की मला बी विधानसभेत जाऊ द्या की र – प्रकाश शेंडगे
आरक्षण बचाव महाएल्गार ओबीसी मेळाव्याला संबोधित करताना भाषणाच्या प्रारंभीच माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी काठी न घोंगडं घेऊ द्या की मला बी विधासभेत जाऊ द्या की र या ओळी म्हणून दाखवल्या.
सामाजिक बहिष्काराची भाषा केली, ती बंद करा
घटनात्मक आरक्षण घ्या,ओबीसी दलितांचे राज्य आणा मराठा समाजाची गरिबी हटवू, शिंदे समितीचा जी आर रात्री पावणे तीन वाजता काढला,
सगळं आरक्षण फस्त करण्याचा प्लॅन, तुमचा एकपण दाखला आम्हाला मान्य नाही, तसेच २६ जानेवारी रोजी मुंबईत आझाद मैदान येथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच जिल्ह्यातील आमदारांवर देखील टीका केली.

राज्य सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, २६ जानेवारीला ओबीसींचे मुंबईत आंदोलन – प्रकाश अण्णा शेंडगे

धाराशिव – ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे लेखी आश्वासन राज्य सरकारने दिले होते मात्र सरकारने ओबीसींचा घात केला असल्याचा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केला.
धाराशिव येथे ओबीसींचा महाएल्गार मेळावा आयोजित केला होता तत्पूर्वी पत्रकार परिषद घेत त्यांनी हा आरोप केला आहे.
तसेच मागासवर्ग आयोग हायजॅक केला आहे मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष जरांगे पाटील यांच्या स्टेज वर सर सर म्हणून हाक मारतात मराठा समाज गरीब दाखवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. सरकारने ५४ लाख कुणबी दाखले असल्याचे सांगितले आहे त्याबाबत देखील स्पष्टता नाही, सर्वेक्षण करताना शासकीय कर्मचारी गरीब नसलेल्यांना गरीब दाखवत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाग पाडू. ओबीसींना त्यांच्या हक्काची जाणीव झाली आहे प्रत्येक गावात ६० टक्के ओबीसी समाज आहे येत्या काळात ओबीसींचा च मुख्यमंत्री होईल. मराठा समाजाला ईडब्लूएस चे १० टक्क्याचे आरक्षण आहे राज्यात साडे आठ टक्का लाभ त्यांनी घेतला आहे. आंदोलन थांबवायचं असेल तर राज्य सरकारने निर्णय घ्यावा असेही ते यावेळी म्हणाले.
पत्रकार परिषदेला टी.पी. मुंडे, यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

ओबीसींचे देखील मुंबईत आंदोलन

मराठा समाजाच्या पाठोपाठ आता ओबीसी देखील मुंबईत आंदोलन करणार असून २६ जानेवारीला आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत.

दोन दिवसात रेल्वे भूसंपादन प्रकरणी होणार लवादाची नियुक्ती ; विभागीय आयुक्तांकडे लवाद नेमण्याची प्रक्रिया सुरू : आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव -तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी राबविण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा खूप कमी मावेजा मंजूर करण्यात आला आहे. वाटाघाटीने ही भूसंपादन प्रक्रिया पार पडली असती तर लवादाकडे दाद मागण्याची सोय राहिली नसती. प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी थेट भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना लवादाकडे दाद मागण्याचा मार्ग शिल्लक राहिला आहे. पुढील दोन दिवसात लवादाची नियुक्ती केली जाणार आहे. विभागीय आयुक्तांकडे त्यासाठी प्रक्रिया सुरू असून आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा करीत असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव -तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांचे भूसंपादन करण्यात आले आहे त्यांना योग्य भाव  मिळवून देण्यासाठी तातडीने लवाद नेमावा यासाठी आपला रेल्वे विभागाकडे सतत पाठपुरावा सुरू होता. सोमवार २२ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या महसूल आयुक्तांना लवाद म्हणून काम करण्यासाठी वरिष्ठ महसुली अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी रेल्वे विभागाकडून पत्र देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ततातडीने लवाद म्हणून जिल्हाधिकारी यांचीच नेमणूक करण्याबाबत मराठवाडा विभागाचे आयुक्त श्री मधुकर आर्दड यांच्याशी आपण स्वतः फोनवरून चर्चा केली आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने लवाद नेमण्याबाबत आश्वस्त केले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

सध्या राबविण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी ज्या चुका केल्या आहेत त्याबाबत प्रत्येक गावातील प्रमुख तक्रारी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात याव्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या तक्रारींचा अभ्यास करून सविस्तर अहवाल तयार करावा अश्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.अहवाल प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी,या प्रक्रियेशी संबंधित अधिकारी,शेतकरी व वकिलांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या अहवालातील महत्वपूर्ण निष्कर्षानुसार लवादासमोर कायदेशीर बाबी मांडल्यामुळे फायदा होणार आहे. या प्रकल्पातील सर्व शेतकऱ्यांना रास्त मोबदला मिळावा यासाठी आपण कटिबद्ध असून जोवर न्याय मिळत नाही तोवर आपण लढा देत राहणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

1 कोटी घरांच्या छतांवर सौर उर्जा यंत्रणा बसवण्याच्या उद्दिष्टासह “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी करणे हा या योजनेचा उद्देश

मोठ्या प्रमाणात छतावर सौर ऊर्जा यंत्रणेचा अवलंब करण्याच्या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित करण्यासाठी भव्य राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश

अयोध्या येथे सूर्यवंशी भगवान श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आटोपून दिल्लीत परतल्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी, 1 कोटी घरांच्या  छतावर सौरऊर्जा यंत्रणा  बसवण्याच्या उद्देशाने “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करण्यासाठी एका बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. बैठकीदरम्यान पंतप्रधान म्हणाले की, यामुळे प्रत्येक घराला त्याच्या छतावर सूर्यप्रकाशाचा उपयोग करून त्यांचे वीज बिल कमी करता येईल आणि त्यांना त्यांच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवता येईल.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा उद्देश अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल बसवून त्याद्वारे  वीज उपलब्ध करून देणे आणि अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे हा  आहे.

मोठ्या प्रमाणात छतावर सौर ऊर्जा पॅनेलचा अवलंब करण्याच्या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित  करण्यासाठी भव्य राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना मिळणार छतावरील सौर ऊर्जा यंत्रणा

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत 1 कोटी कुटुंबांना छतावरील सौर ऊर्जा यंत्रणा मिळणार आहे.

पंतप्रधान म्हणाले, “आज, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, देशातील जनतेच्या घराच्या छतावर स्वतःची सौर ऊर्जा यंत्रणा असावी, हा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे.

यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होण्याबरोबरच ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होईल.

एक्स पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणाले:

“जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्रीरामाच्या दर्शनातून नेहमीच ऊर्जा मिळते.

आज, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सौर ऊर्जा यंत्रणा असावी, हा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांच्या  छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे.

यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरही  होईल.

उद्यापासून धाराशिव जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे

राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करुन (इंम्पेरिकल डेटा) माहिती संकलित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांना निर्देश दिलले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांचेकडून प्राप्त सूचनांनुसार धाराशिव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी व माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या सर्वेक्षणाचे काम हे दि. 23 जानेवारी 2024 ते दि. 31 जानेवारी 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या कालावधीत या कामासाठी नियुक्त प्रगणक हे गावातील, शहरातील प्रत्येक कुटंबास भेट देऊन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून देण्यात आलेल्या प्रशावलीनुसार मोबाईल अॅपद्वारे माहिती संकलित करणार आहेत. तरी या सर्वेक्षणादरम्यान कुटुंब प्रमुखांनी घरी थांबुन आपली माहिती प्रगणकांना देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.