Home Blog Page 50

भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या संयोजकपदी ज्ञानेश्वर बोधणे

सलगरा,दि.१४ (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक समन्वय आघाडीची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. या मध्ये सलगरा दिवटी येथील ज्ञानेश्वर शरणाप्पा बोधणे यांची अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे १) संयोजक – ज्ञानेश्वर शरणाप्पा बोधणे, (सलगरा दिवटी, ता.तुळजापूर), २) सहसंयोजक – प्रशांत विलास घोडके, (बलसूर, ता.उमरगा), ३) सहसंयोजक – लखन शहाजी वाघमारे,(बाभळगाव, ता.कळंब) ४) सदस्य – राजेंद्र जाधव, (उमरा, ता.कळंब), ५) सदस्य – भिम सुरवसे,( मुळज,ता.उमरगा), ६) सदस्य – गणपत भोरे, (कार्ला, ता.परंडा), ७) सदस्य – रामभाऊ गुरव, (तांदूळवाडी, ता.परंडा), ८) सदस्य – हरिदास लोखंडे, (तोरंबा, ता.धाराशिव), ९) सदस्य – श्रावण आदटराव (करजखेडा, ता.धाराशिव), १०) सदस्य – जिवनसिंह ठाकूर (मांडवा, ता.वाशी), ११) सदस्य – विष्णुपंत मुंडे, (अणदूर,ता.तुळजापूर), १२) सदस्य – महावीर कासार, (तुळजापूर) १३) सदस्य – प्रभाकर नेलवडे (कोंडजीगड, ता.लोहारा) विशेष म्हणजे येत्या काही दिवसात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला चांगले काम करून दाखविण्याची संधी मिळाली आहे, या संधीचे सोने करण्याची जबाबदारी या कार्यकारिणीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार सर्वत्र पोहोचवण्याबरोबरच जनजागृती करत आपण सर्व मिळून एकजुटीने खूप चांगले उपक्रम, कार्यक्रम घडवून आणण्याचा प्रयत्न करूया, असे ज्ञानेश्वर बोधणे हे बोलताना म्हणाले.

या झालेल्या निवडीबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील, मा.आ.सुजितसिंह ठाकूर, जिल्हा अध्यक्ष संताजीराव चालुक्य, मिलिंद पाटील, नितीन काळे, प्रवीण पाठक, रामचंद्र कुलकर्णी, विकास कुलकर्णी, संतोष बोबडे, प्रभाकर मुळे यांनी सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

ईव्हीएम मशिनचे क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यास EVM मशिनद्वारे निवडणूक घेणे अडचणीचे ठरणार जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला मागविले मार्गदर्शन

धाराशिव – जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी झालेली असतानाच संभाव्य अडचणीच्या स्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांना पत्र लिहीत मार्गदर्शन मागविले आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात मराठा समाजास इतर मागासवर्ग संवर्गातून आरक्षण देणेचे अनुषंगाने उपोषण, रास्ता रोको आयोजित केले जात आहेत, त्यातच मराठा समाजास इतर मागासवर्ग संवर्गातून आरक्षण दिले जात नसल्याने मराठा समाजातील नागरीक नाराजीने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये जास्तीत जास्त लोकसभा सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास EVM मशिनचे क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यास EVM मशिनद्वारे निवडणूक घेणे अडचणीचे ठरणार आहे.

मतपत्रीका व मतपेट्यांचा वापर करुन निवडणुक घ्यावयाची झाल्यास त्यासाठी अपुरे मनुष्यबळ, मतपेट्या अनुपलब्धता अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्याशिवाय मतपत्रीकेवर उमेदवारांच्या संख्या वाढल्यास मतपत्रीकाही तीतकीच मोठ्या आकाराची होणार आहे व त्याची घडी घातल्यानंतर मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे व त्यामुळे मतपेट्या देखील मोठ्या प्रमाणात लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतपेट्यांची संख्या वाढल्यास मतदान केंद्रात नियुक्त करावयाचे मतदान अधिकारी/कर्मचारी यांचे संख्येत तसेच सदर निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर पाठविणे व स्ट्रॉग रुम मध्ये जमा करणेसाठी अतिरिक्त वाहनांची आवश्यक्ता भासणार आहे. त्याच प्रमाणे निवडणूका झाल्यास मतमोजणी पावेतो मतपेट्या सुरक्षित ठेवणेकामी जागा देखील अपुरी पडणार आहे.

तरी परिस्थितीचे अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची निवडणूक प्रक्रिया अंमलबजावणी करण्यास येणा-या अडचणी निदर्शनास आणून देत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पत्रात म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांची  धाराशिव जिल्ह्यात जनसंवाद यात्रा;औसा, उमरगा, तुळजापुर,कळंब व भुम येथे धडाडणार तोफ

धाराशिव –
              महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख  उध्दव ठाकरे  हे धाराशिव लोकसभा मतदार संघात जनसंवाद यात्रा करणार असून या यात्रेत ते 5 ठिकाणी जाहिर सभाव्दारे जनतेस संवाद साधणार आहे या जनसंवाद यात्रेचा दौरा खालील प्रमाणे आहे.
दिनांक 07 मार्च 2024 रोजी खाजगी विमानाने लातूर एअरपोर्ट येथे 12  वाजता पोहोचणार असून त्यानंतर 12.30 वाजता औसा येथे विजय मंगल कार्यालयात सभा घेणार आहेत व त्यानंतर लामजना, किल्लारी, नारंगवाडी पाटी, नाईचाकुर, कासारशिरसी, मुळज मार्गे उमरगा असा प्रवास करणार आहेत दिनांक 07 मार्च रोजी सायं. 4 वाजता उमरगा येथे कै. शिवाजी दादा मोरे क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी कॉलेज येथे सभा होणार आहे. यानंतर तुळजापूर येथे संध्याकाळी 7 वाजता डॉ आंबेडकर चौक, तुळजापुर येथे  सभा होणार आहे त्यानंतर तुळजापुरची सभा संपल्यानंतर पुष्पक मंगल पार्क, धाराशिव येथे मुक्काम राहणार आहेत.

             त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 08 मार्च रोजी पुष्पक पार्क, धाराशिव येथून आळणी फाटा, ढोकी येथे स्वागत होणार असून ते कळंबकडे प्रवास करणार असून कळंब येथील मार्केट यार्ड येथे 08 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सभा होणार आहे व त्यानंतर कळंबहून येरमाळा येथे स्वागत होणार असून  कुसळंब, बार्शी बायपास मार्गे परंडा कडे प्रवास करणार आहेत परंडा येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत होणार असून ते परंडयाहून  सोनारी कडे प्रवास करणार आहेत त्यानंतर अनाळा ,वालवड मार्गे  भूम कडे प्रवास करणार आहेत व भूम येथे दि. 08 मार्च रोजी सायं. 04.00  वा. नगर पालीकच्या समोर चौकात सभा होणार आहे व सभा  संपल्यानंतर भुमहून छत्रपती संभाजी नगर एअरपोर्ट कडे प्रवास करणार आहेत अशा प्रकारचा दौरा आहे.

शालेय पोषण आहारावर शाळेचा डल्ला, शासनाची फसवणूक केल्याची तक्रार

शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरीता सुरू झालेल्या शालेय पोषण आहारावर शाळेनेच डल्ला मारला असून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
महात्मा गांधी विद्यालय केसर जवळगा ता. उमरगा या शाळेत हा प्रकार घडला असून राजशेखर सिद्रामप्पा चिंचोरे यांनी याबाबत तक्रार केली आहे.
या प्रकरणात भ्रष्टाचार झालेला असल्याने आणि लहान मुलांच्या पोषण आहारावर डल्ला मारून स्वतःच्या स्वार्थासाठी, पैसे मिळवण्यासाठी, लाभासाठी, शासनाला -वरिष्ठांना खोटे अहवाल पाठवून, खोटे पटसंख्या दाखवून, बँकेतील स्टेटमेंट कोणतेही जुळत नसताना देखील त्याबाबतची बिले काढून, स्वतःच्या लाभासाठी संबंधित मुख्याध्यापक, संबंधित गटशिक्षणाधिकारी, संबंधित गटविकास अधिकारी आणि शालेय पोषण आहार व तद संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संघटित रित्या गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखून शासनाचे नुकसान केले आहे. त्याचप्रमाणे शासनाचे आर्थिक नुकसान केलेले आहे, तसेच लहान मुलांच्या मूलभूत हक्काचा शालेय पोषण आहार त्यांना दिला गेला नाही असे तक्रारीत म्हटले आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीचा शड्डू ठोकला, १९५ उमेदवार केले जाहीर, नरेंद्र मोदी वाराणसीतूनच लढणार

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने पहिला डाव टाकला असून तब्बल १९५ उमेदवार जाहीर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणासीतून लढणार आहेत, अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची नावे आहेत. दोन माजी मंत्र्यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. 28 महिलांना यावेळी लोकसभेचं तिकीट देण्यात आल्याची घोषणाही भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी केली आहे. भाजपने पहिल्या यादीत सोशल इंजिनिअरींगवर भर दिला आहे. भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराला यापूर्वीच सुरुवात केली आहे. विरोधकांच्या आघाडीचे जागा वाटप निश्चित होण्यापूर्वी उमेदवार जाहीर करून भाजपने खेळी खेळली आहे.

भाजपचे महासचिव विनोद तावडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजंत पांडा आणि माध्यम प्रमूख अनिल बलोनी यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांची यादी आज घोषित करण्यात येत असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं. या यादीत एकूण 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांना तिकीट देण्यात आलं आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आहे. मोदींना वाराणासीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अमित शाह हे गांधीनगरमधून लढणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अंदमान निकोबारमधून विष्णू पडारे, अरुणाचल प्रदेश वेस्टमधून किरण रिजीजू, अरुणाचल ईस्टमधून तापीर गांवता निवडणूक लढणार आहेत.

भाजपच्या पहिल्या यादीत विविध राज्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 26, मध्यप्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, केरळमधील 12, तेलंगनातील 9, आसाममधील 14, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 5, जम्मू-काश्मीरमधील दोन, उत्तराखंडमधील तीन, अरुणाचल प्रदेशातील दोन, गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकी एका उमेदवाराचं नाव आहे.

आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्पातील सायकलचे वाटप

जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते विद्यार्थीनीना चारशे सायकलचे वाटप

सायकलीमुळे विद्यार्थीनींची शाळेत उपस्थिती वाढून मुलीच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे – गटशिक्षण अधिकारी अर्जून जाधव

परंडा प्रतिनिधी -आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतील दुसऱ्या टप्पातील गरजू चारशे विद्यार्थीनीना जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते दि.२ मार्च रोजी गटशिक्षण कार्यालय परंडा येथे सायकलीचे वाटप करण्यात आले.
आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नामुळे परंडा, भूम,वाशी या तीन तालुक्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना १००० सायकलीचे वाटप करण्यात येत आसुन यातील पहिल्या टप्प्यात २०० सायकलीचे २५ जानेवारी रोजी विद्यार्थीनीना आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते.
उर्वरित आठशे सायकली वाटपास प्रारंभ झाला असून दुसऱ्या टप्प्यात परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी शाळेतील ४०० गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटपाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे.
सदर सायकली मुळे शाळेत विद्यार्थिनींची उपस्थिती वाढून,मुलींच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस त्यांच्या चांगला परिणाम होणार असल्याचे गटशिक्षणा धिकारी अर्जुन जाधव यांनी बोलताना सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुके,पंचायत समितीचे मा.सभापती गौतम लटके, मा. नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर, जयदेव गोपणे,गुलाब शिंदे,विष्णू सांगडे,बालाजी नेटके,मोल नलावडे यांच्या सह पात्र शाळेचे मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख,पालक व लाभार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थिती होत्या.

एनव्हीपी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे पेमेंट १६ व्या दिवशी देण्याचे सातत्य ठेवून आदर्श निर्माण केला – खा. राजेनिंबाळकर

धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) – तालुक्यातील जागजी येथील एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. या कारखान्यास गळपासाठी ऊस दिलेल्या शेतकऱ्यांचे बील दर १६ व्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. तर ऊस तोडणी ठेकेदार व मजुर, कर्मचारी यांचे पेमेंट देखील नियमितपणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम कारखाना सुरू केल्यापासून पहिल्या १६ व्या दिवसांपासून चालू केले आहे. ते बिल व पेमेंट देण्याचे सातत्य कायम ठेवून शेतकऱ्यांना भरोसा व विश्वास देण्याचे महत्त्वाचे काम करण्याबरोबरच इतर कारखान्यांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.१ मार्च रोजी केले.

धाराशिव तालुक्यातील जागजी शिवारामध्ये असलेल्या एनव्हीपी शुगर प्रा. लि., या कारखान्याने आजपर्यंत १ लाख १ टन उसाचे गाळप केले आहे. तर त्यापासून ३० किलो वजनाच्या ४ लाख ९१ हजार गुळ पावडर पोत्यांचे पूजन खा राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आप्पासाहेब पाटील, कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब उर्फ बालाजी पाटील, सी.ए. सचिन शिंदे, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, राजाभाऊ देशमुख, अक्षय पाटील, प्रशासकीय अधिकारी सुनिल लोमटे, चिफ इंजिनिअर अविनाश समुद्रे, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, मे.चिफ केमिस्ट बिक्कड, पॅन इन्चार्ज राजेंद्र शिंदे, नरसिंह मोरे, समाधान शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, एनव्हीपी शुगर कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत १ लाख १ टन शेतकऱ्यांच्या उसाचे यशस्वी गाळप करण्याचे काम झाले आहे. त्याच्यामध्ये आनंदाची दुसरी गोष्ट अशी की ज्या शेतकऱ्यांनी ऊस गळपास घातला. त्या शेतकऱ्यांच्या उसाचे बिल पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव या बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे. विशेष म्हणजे काल दि.२९ फेब्रुवारीपर्यंत जो
ऊस गाळप करण्यात आला. त्या उसाचे बिलाची रक्कम देखील संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या दिवशीच जमा झाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच पेमेंट देण्याचा देखील या कारखान्याने क्रम ठरविला असून प्रथम क्रम ऊस उत्पादक शेतकरी तर दुसरा क्रम ऊस तोडणी करणारे ठेकेदार व ऊस तोड मजूर तसेच तिसरा क्रम सर्व कामगारांचा ठेवला असून चौथा क्रम कारखानदाराचा असल्याचा त्यांनी सांगितले. यावेळी खा राजेनिंबाळकर यांनी कारखान्यातील वेगवेगळ्या प्लांटची प्रत्यक्ष पत्रकारांसमवेत पाहणी केली.‌ यावेळी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांच्यासह जागजी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

……………………………

२८ ऑक्टोबर २०२३ पासून कारखान्याचे गाळप सुरू केले असून आजपर्यंत १ लाख २ टन उसाचे गाळप या कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या कारखान्यास गाळपासाठी दिलेल्या उसाचे बिल १६ व्या दिवशी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम सातत्याने केले जात आहे. पहिल्यापासून शेतकऱ्यांना प्राधान्य दिले असून उसास २ हजार ८०० रुपये दर दिला असून शेतकऱ्यांनी देखील या कारखान्यास ऊस देऊन चांगले सहकार्य केले असल्याचे कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी सांगितले. तसेच २५ मार्चपर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. विशेष ज्या कालपर्यंत गळपासाठी ऊस दिलेला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांचे बिल पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को- ऑफ सोसायटी लि., या बँकेमध्ये जमा करण्यात आले असून त्या बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी ती रक्कम उचलावी. तसेच शेतकऱ्यांनी देखील आपला ऊस या कारखान्यास गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन देखील पाटील यांनी केले

रेल्वे मार्गाच्या भुसंपादनातील चुकीचे निवाडे दुरुस्त करुन सबंधितावर कारवाई करण्याची आमदार कैलास पाटील यांची महसुलमंत्र्यांकडे मागणी


धाराशिव – धाराशिव तुळजापुर-सोलापुर रेल्वे प्रकल्पा अंतर्गत मार्गातील भुसंपादनाचे चुकीचे निवाडे करणाऱ्या अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच चुकीच्या पध्दतीने केलेले निवाडयाची दुरुस्ती करुन सुधारीत निवाडा करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे. यावर मंत्रीमहोदय त्यावर विभागीय आयुक्त यांना अहवाल देण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
धाराशिव-तुळजापुर-सोलापुर रेल्वे प्रकल्पासाठी बांधीत शेतकऱ्यांच्या (धाराशिव व तुळजापुर तालुक्यातील) गावाचे निवाडे जाहिर करण्यात आले आहेत. त्यात गावातील २०१८ ते २०२१ मधिल जमिन खरेदी विक्री व्यवहार ग्रहित धरताना फक्त उच्चतम रकमेचे व्यवहार हे अवाजवी दर व ४० गुंठयापेक्ष कमी या कारणामुळे वगळण्यात आले आहेत. वगळण्यात आलेले व्यवहार हे भुसंपादन अणि पुनर्वसन कायद्यामधील नियमांच्या तरतुदीचे उल्लंघन ठरत आहे.जमिनीचे सरासरी मुल्यांकन फारच कमी झाले असुन एकुण द्यायचा मावेजा जमिनीच्या चालु बाजार भावापेक्षा कितीतरी कमी झाला आहे. जाहीर केलेले अंतिम निवाडे यांच्यातील मोबदला व प्रारुप निवाडे यामध्ये बराच मोठी तफावत असुन परिणामी शेतकऱ्यांना मोबदला खुपच कमी मिळत आहे. या निवाडयामध्ये बागायत जमिनीस जिरायती जमिनीचे दर दिलेआहेत. जमिनीतील पाईपलाईन, विहिर, विंधन विहीर, फळबाग, पत्रा शेड यांचेही मुल्यांकन कमी केलेले आहे. या अन्यायकारक व बेकायदेशिर निवाडयाची चौकशी करावी, निवाडयामध्ये करण्यात आलेल्या गंभीर चुकांची दुरुस्ती करुन सुधारीत निवाडे करावेत अशी मागणी केली आहे. तसेच अशी बेकायदेशीर व चुकीचे निवाडे करणार्‍या अधिकार्‍यांना शासन होण्याची अपेक्षा आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. यापुढेही जिल्ह्यातुन मोठे प्रकल्प तसेच मार्ग जाणार आहेत. त्यांच्यावर आताच कारवाईचा बडगा उगारला तर भविष्यात या यंत्रणेकडून अशी बेकायदेशीर प्रक्रीया होणार नाही त्यामुळे या अधिकार्‍यांचे तात्काळ निलंबन करावे अशी आग्रही मागणी आमदार पाटील यांनी महसुलमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

बेछूट आरोप करायचे बंद करा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, टेबल लावून टक्केवारी गोळा करतानाचा व्हिडिओ योग्य वेळ आल्यावर दाखवू – सतिषकुमार सोमाणी

धाराशिव – भाजप आणि शिवसेनेतील(उबाठा)१७४ कोटींच्या विकासकामांच्या उद्घटनावरून सुरू झालेल्या आरोपांच्या फैरी अद्याप थांबलेल्या नाहीत त्याचा पुढचा अंक आज तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी यांनी केलेल्या टिकेवरून दिसून आला त्यालाही भाजपकडून लागलीच प्रत्युत्तर दिल्याने हा सिलसिला निवडणुका होईपर्यंत थांबणार नसल्याचे चित्र आहे. दरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवर बेछूट आरोप करायचे बंद करा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा सतिषकुमार सोमाणी यांनी दिला. तसेच येत्या काळात योग्य वेळ आल्यानंतर टेबल लावून टक्केवारी गोळा करतानाचे व्हिडिओ देखील दाखवू असे सोमाणी यावेळी म्हणाले.
धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली डॉ.पद्मसिंह पाटील हे अब्जाधीश खासदारांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आले, परंतु धाराशिव जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आला. अशा कर्तृत्त्ववान नेत्याचे लांगूलचालन करण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे करत आहेत. डॉ.पद्मसिंह पाटील यांनी धाराशिव येथे मंजूर  झालेले वैद्यकीय महाविद्यालय स्वतःच्या संस्थेच्या घशात घातले. सुतगिरणी, कुकुट्टपालन उद्योगही बुडविले. हजारो बेरोजगारांचा रोजगार बुडवून विकासाची भाषा करणार्‍या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जनाची नाही तरी मनाची लाज बाळगावी, त्यांच्या या कामाची कीव येत असल्याचेही  सोमाणी म्हणाले.

सोमनाथ गुरव यांनी लावला तो व्हिडिओ

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी एका सभेत बोलताना आ. पाटील यांच्यावर टीका करताना मोठ्या आवेशात भाषण करताना फाईव फाईव वन वन या क्रमांकावरून खिल्ली उडवली होती. तोच व्हिडिओ सोमनाथ गुरव यांनी दाखवला. तसेच नगर पालिकेच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून धाराशिव शहरातील बायपास रोडवरील पर्यायी रस्ता व पथदिवे यासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला.

गोरगरिबांच्या हक्काचा रेशनाचा गहू व तांदूळ चोरीचे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांना तालुकाप्रमुख का केलं? आमदार,खासदारांनी उत्तर द्यावे- अभय इंगळे

गोरगरिब नागरिकांना पोटभर अन्न मिळावे यासाठी सरकारने दिलेला रेशनचा तांदूळ व गहू चोरून त्याची विक्री करण्याचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तीला स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून राज्यभर ओळख असलेल्या राणा दादांवर बोलण्याचा अधिकार आहे का..? हे सगळं माहिती असताना सोमानींना तालुका प्रमुख करण्यामागे खासदार व आमदारांना नेमकं कोणाचं हित साधायचं होत याच त्यांनी उत्तर द्यावे असा घणाघात भाजपचे शहर अध्यक्ष अभय इंगळे यांनी केला आहे.

सोमाणी यांनी पत्र परिषदेत केलेल्या आरोपांना उत्तर देताना इंगळे यांनी त्यांच्यावर रेशनचा माल चोरीचे असलेल्या गुन्ह्याची उजळणी करून देऊन जोरदार प्रतिहल्ला केला आहे.अधिकारी,कंत्राटदार यांच्याकडून टक्केवारी घेणे ही तुमची संस्कृती आहे म्हणत इंगळे यांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा सामान्य कार्यकर्ता तुम्हाला तुमची जागा दाखवेल अस म्हटले आहे.

पाच वर्षात धाराशिव शहरात भ्रष्ट कारभार केल्याने शहरातील नागरिकांचे होणाऱ्या हालअपेष्टाला तुमचे नेते जबाबदार असून तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्पांना एक रुपया आणू शकला नाहीत हे तुमचे कर्तृत्व सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे.तुमच्या नेत्यांनी कोणाकडून किती वसुली केली याची पुराव्यानिशी माहिती लवकरच जनतेसमोर आणली जाईल.

चालू तेरणा कारखाना बंद पाडणे, चालू जिल्हा बँक डबघाईला आणणे हे तुमच्या नेत्यांचे कार्य संबंध जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे.या पापात तुम्ही देखील भागीदार आहात.महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातील महत्वाचे सर्वच विषय मार्गि लागत आहेत,मोठ्या प्रमाणात सरकार निधी उपलब्ध करून देत आहे म्हणून तुमचा पोटशूळ उठला आहे हे सर्वश्रुत आहे.त्यामुळे इथून पुढे तोंड सांभाळून बोला अन्यथा तुमचे व तुमच्या नेत्यांचे काळे कारनामे लवकरच बाहेर काढले जातील असा इशारा अभय इंगळे यांनी दिला आहे. 

श्रीराम सार्वजनिक वाचनालय भोंजा यांच्या वतीने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

परंडा प्रतिनिधी -भोंजा येथील श्रीराम सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून भोंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्याना वाचनालयाचे चालक कृष्णा मांजरे सर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिवजयंती निमित्त भोजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्याच्या विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या यात वकृत्व स्पर्धा,पाढे पाठांतर स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, इंग्रजी शब्द पाठांतर स्पर्धा, शिवजयंती सजावट स्पर्धा या स्पर्धेत विजेत्यां विद्यार्थ्याना कृष्णा मांजरे सर यांच्या वतीने पॅड,कंपास,पेन्सिल,रजिस्टर आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.पारितोशीक स्विकारल्या नंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. मार्गदर्शन पुस्तकाचे उपस्थित पालकांना वाटप करण्यात आले.
यावेळी भोंजा ग्रामपंचायतीच्या सरपंच राणी समाधान कोळी,उपाध्यक्ष नवनाथ नेटके,बिरमल कोंडलकर,खंडू मोरे,हनुमंत जगताप,महादेव काशीद,बाळासाहेब नेटके, पल्लवी सावंत,रणजित नेटके, राजू सुतार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब घोगरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अधीकराव शेळवणे सर यांनी कले.कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षिका ज्योती माळी,राऊत मॅडम,सोमनाथ पवार परिश्रम घेतले.