Home Blog Page 51

उदघटना नंतरचे उद्घाटन,बारा वाजले तरी उद्घाटन नाही

धाराशिव – केंद्रीय मंत्र्यांनी एखाद्या कामाचे उद्घाटन केले असेल आणि नंतर त्याच कामाचे श्रेय घेण्यासाठी एखादे उद्घाटन करण्याचा प्रकार क्वचितच घडला असेल.
धाराशिव शहरात डी मार्ट जवळ राष्ट्रीय महामार्गावर अंडर पास मंजूर झाला त्याचे आणि इतर कामाचे असे १७४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल लातूर येथून केले. मात्र शिवसेनेच्या वतीने आज पुन्हा याच कामाचे उद्घाटन करण्याचा घाट घालण्यात आला आहे मात्र बारा वाजले तरी देखील या कामाचे उद्घाटन करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि त्यांचे सहकारी न आल्याने परिसरातून बोलावलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना कालच्या कार्यक्रमाचे निमंत्रण होते, कार्यक्रम पत्रिकेवर त्यांचे नाव देखील होते मात्र शहरात असून देखील त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.

शिवसैनिक पुरवतात हट्ट

येणारी लोकसभा त्यापूर्वी सरकारने जनतेच्या मान्य केलेल्या मागण्या यावरून भाजप सरकारने मागणी मान्य केली मात्र याचे श्रेय भाजपाला मिळत आहेत या उद्विग्नेतून खासदारांच्या समर्थकांनी हा कार्यक्रम घेत हट्ट पूर्ण केल्याचे कार्यक्रम स्थळी बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाले तुतारी चिन्ह

मुंबई – राष्ट्रवादीतील फुटी नंतर अपेक्षित पणे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाले मात्र ज्यांनी पक्ष स्थापन केला त्या शरद पवार यांच्या पक्षाला कोणते चिन्ह मिळते याची उत्सुकता अनेकांना होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. पक्षाच्या वतीने फेसबुक वरील ऑफशियल पेजवर एक पोस्ट करत हे चिन्ह मिळाल्याचे सांगितले आहे.
पोस्ट मध्ये म्हटले आहे की,

“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”

“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”

चक्काजाम करणाऱ्या ३४ जणांवर गुन्हा दाखल, जमावबंदी शस्त्रबंदीचे उल्लंघन

धाराशिव – छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू असलेल्या चक्काजाम करणाऱ्या सांजा येथील आंदोलकांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे नोंदवले आहेत.
-बाजीराव बप्पा सुर्यवंशी, रा. सांजा 2) ओम भुजंग सुर्यवंशी, 3)संतोष सुर्यवंशी, 4) अभिजीत काका सुर्यवंशी, 5) सतिश मोहिते, 6) संताजी सुर्यवंशी, 7) बालाजी बप्पा सुर्यवंशी, 8)विशाल मोन्या सुर्यवंशी, 9) सतिश बप्पा सुर्यवंशी, 10) सोहम सुर्यवंशी, 11) काका पाटील, 12) बाळू कदम, 13) सुनिल नाना सुर्यवंशी, 14) नंदु पाटील, 15) प्रशांत सुर्यवंशी, 16) प्रविण कदम, 17) बालाजी सुर्यवंशी, 18) अक्षय पौळे, 19) ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत, 20) धर्मराज  आण्णासाहेब सुर्यवंशी, 21) सागर शेळके, 22) अजय सुर्यवंशी, 23) नागेश शिंदे, 24) जिवन जाधव सर्व रा. सांजा, 25) बलराज श्रीमंतराव रणदिवे, रा. म.गांधीनगर, 26) सत्यजित पडवळ, रा. शाहुनगर, 27) निखील जगताप रा. इंगळे गल्ली, 28) मनोज जाधव, रा. मेडसिंगा, 29) अमोल जाधव रा. कारी, 30) अक्षय अंकुश नाईकवाडी, रा कौडगाव, 31) धैर्यशिल बाळासाहेब सस्ते, रा. धाराशिव, 32 हनुमंत यादव, रा. गणेश नगर, 33) अविनाश खानापुरे रा. तांबरी विभाग, 34) व्यंकटेश पडिले रा. बालाजीनगर व इतर 30 ते 40 इसमांनी दि. 15.02.2024 रोजी 11.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे मराठा समाजाच्या आरक्षाणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येणारे जाणारे रोडवर बैलगाडी व ट्रॅक्टर उभे करुन तसेच बैलांना डांबरी रस्त्यावर तिन दिवस उन्हात बांधून त्यांना वेदना होतील असा छळ करुन क्रुरतेने वागणुक देवून बैलगाड्या आडव्या लावून येणारे जाणारे वाहनाना अटकाव करुन मानवाच्या जिवीतास धोका निर्माध होईल अशा स्थितीत बैल रिकामे सोडून सर्व रोड बंद करुन चक्का जाम आंदोलन सुरुच ठेवून मा. जिल्हा अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हनुमंत जालींदर म्हेत्रे, वय 36 पोलीस नाईक 1474 नेमणुक पोलीस ठाणे आनंदनगर यांनी दि.18.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 341,283,188 भा.दं.वि.सं. सह म.पो.का. 119,135 सह कलम 11(1)(क) प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

रिधोरे येथे रास्ता रोको;टायर पेटवून व्यक्त केला निषेध

रिधोरे/प्रतिनिधी: मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत खालावल्याने आता आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.त्यामुळे बार्शी-कुर्डूवाडी रोडवर रिधोरे येथील सिना नदी पुलावर टायर जाळून सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करत रास्ता रोको करण्यात आला.यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या.
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज अधिक आक्रमक झाला असून सरकारने सगेसोयरे यांचा अध्यादेश पारित करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून तत्काळ अंमलबजावणी करावी यासाठी दि.१० फेब्रुवारी पासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसलेले आहेत.दरम्यान त्यांची तब्येत खालावली असून या पार्श्वभूमीवर येथील आंदोलकांनी बार्शी- कुर्डूवाडी रोडवर रिधोरे येथे दि.१६ रोजी रात्री ९:३० वा.सिना नदी पुलावर टायर जाळून निषेध व्यक्त केला.

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

विक्रमी वेळेत, अहोरात्र काम करून सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्धल कौतुक

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबई दिनांक १६: राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वर्षा येथे आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडे तीन ते चार लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतूक केले. या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून राज्यात युद्धपातळीवर मराठा व खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण २ फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आले. राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. याकामी गोखले इन्स्टिट्युट, आयआयपीएस या नामांकित संस्थेची मदत झाली. विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गावात दवंडी पिटवून सर्वेक्षणास नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत जलदगतीने पार पडले.

या कामकाजाकारिता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. तसेच राज्यातील जमीन अधिग्रहण, जमीन धारणा, जमाबंदी, भूमी अभिलेख, तसेच शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये समाजाचे प्रमाण व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाण इत्यदी बाबींची प्रत्यक्ष माहिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सर्व विभागांच्या सचिवानी आयोगाला माहिती उपलब्ध करून दिली. तसेच शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांची माहिती सुद्धा आयोगास उपलब्ध करून देण्यात आली. याव्यतिरिक्त राज्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा तरुणांच्या आत्महत्याविषयीची सुद्धा माहिती आयोगास उपलब्ध करून देण्यात आली.

कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाला सांगितले होते. साडेतीन ते चार लाख लोक यासाठी दिवसरात्र काम करीत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले मात्र दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नव्हते. आज सादर करण्यात आलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चा होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अगदी पहिल्यापासून आम्ही सकारात्मक असून तशी पाऊले वेळोवेळी उचलली आहेत. आयोगाने विक्रमी वेळेत सर्वेक्षण पूर्ण केले असून मला विश्वास वाटतो की, कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न बसता आम्हाला देता येईल.

आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आम्ही सत्तेवर आल्यापासून अनेक ठोस पाऊले उचलली आहे. आयोगाने आज विक्रमी वेळेत आपला अहवालही सादर केला आहे. २० फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन देखील आम्ही बोलाविले आहे. हे सर्व पाहता आपले आंदोलन आंदोलनकर्त्यांनी मागे घ्यावे असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आज अहवाल देतेवेळी मुख्य सचिव डॉ नितीन करीर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयोगाचे सदस्य अंबादास मोहिते, ओमप्रकाश जाधव, मच्छिंद्रनाथ तांबे, ज्योतिराम चव्हाण, मारुती शिंकारे, डॉ गोविंद काळे, डॉ गजानन खराटे, नीलिमा सरप(लखाडे), सदस्य सचिव आ.उ. पाटील उपस्थित होते.

धाराशिव जिल्ह्यात 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी

धाराशिव – जिल्ह्यात 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी लागू करण्यात आली असून अपर जिल्हा दंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
याबाबत माहिती अशी की धाराशिव जिल्ह्यात विविध पक्ष संघटना यांचे वतीने त्यांचे मागणी संदर्भात धरणे, मोर्चे, बंद, संप, रस्तारोको, इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित आहेत. धाराशिव जिल्ह्यात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शासकीय) उत्सव साजरा होणार आहे. दिनांक २४ फेब्रुवारी रोजी श्री. रोहीदास महाराज जयंती उत्सव साजरा होणार आहे. दिनांक २५ फेब्रुवारी रोजी शब-ए-बरात (बडीरात) हे सण साजरा होणार आहे. दिनांक २७ फेब्रुवारी रोजी श्री महालक्ष्मी देवी मंदिर मोजे चिवरी ता. तुळजापूर येथे यात्रा साजरी होणार आहे, दिनांक ८ मार्च रोजी महाशिवरात्री हे सण / उत्सव साजरा होणार आहे. दिनांक २१ फेब्रुवारी ते दिनांक १९ मार्च या कालावधीत धाराशिव जिल्हयात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा फेब्रवारी मार्च 2024 आयोजित आहेत. दिनांक ०१ मार्च ते दिनांक २६ मार्च या कालावधीत धाराशिव जिल्हयात माध्यमिक प्रमाणपत्र (SSC) परीक्षा फेब्रवारी / मार्च-2024 आयोजित आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष / संघटना यांचे कडून आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिकविमा व नुकसान भरपाईची देय रक्कम मिळावी आणि इतर मागण्या अनुषंगाने शेतकरी तसेच विविध पक्ष / संघटना यांच कडून धरणे, मोर्चे, उपोषण, आत्मदहन, बंद, निदर्शने, तालाढोको व रास्तारोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हयात पर्जन्यमान कमी झाल्याने विविध पक्ष / संघटना व शेतकरी संघटना यांचे कडून धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीकरीता आंदोलने होत आहेत. धाराशिव जिल्हयात ग्रामीण / शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा / जत्रा / ऊरुस लहान मोठ्या स्वरुपात साजरे करण्यात येतात. व्यक्ती, व्यक्ती समुह तसेच विविध पक्ष / संघटना यांचे वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी अचानकपणे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी वरील प्रमाणे संपन्न होणारे धार्मिक सण उत्सव, कार्यकम व यात्रा जत्रा ऊरुस तसेच आंदोलनात्मक कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यात शांततेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 15 फेब्रुवारी रोजीचे 00:01 पासून ते दिनांक १५ मार्च रोजी 24:00 वाजेपर्यंत जमावबंदी व शस्त्रवंदी आदेश संपुर्ण धाराशिव जिल्ह्यात लागू असणार आहेत

खालील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे

1) शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत.

2) लाठ्या, काठ्या, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तु
3) बाळगणार नाहीत. कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत.

4) दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडवयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन

ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.

5) आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत.

6) जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व

7) असभ्य वर्तन करणार नाहीत व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत.

8) पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक / मोर्चा काढता येणार नाही,नाहीत.

प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरीता लागू होणार

1 धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी

2) अंत्ययात्रा

3) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी

4) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे

आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस फौजदार चांदखान पठाण यांचे निधन


पारा (प्रतिनिधी ): धाराशिव येथील गालिब नगर येथे राहत असलेले सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस फौजदार चांदखान मेहबूब खान पठाण (वय 64वर्ष)यांचे दि. 10फेब्रुवारी 2024 रोजी तीन वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले .
वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या दुरुक्षेत्र पारा येथील जमादार मोहसीन खान पठाण यांचे ते वडील होते .त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा त्यांचा परिवार आहे .त्यांच्या जाण्याने आप्तेष्ट, मिञ परिवार व संपूर्ण गालिब नगरावर शोककळा पसरली होती.

शिक्षक आमदारांना सापडले बॅनरबाजीचे फुकट ठिकाण, वाहनचालकांना नाहक त्रास

धाराशिव – अनधिकृत बॅनर बाजीवर उच्च न्यायालयाने शासनाला अनेकदा फटकारले आहे. याबाबत सूचना देखील केल्या आहेत. मात्र पुढाऱ्यांकडून या निर्देशांना नेहमी मूठमाती दिली जाते. धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या दिशादर्शक कमानीवर बॅनर लावण्याचे आणि कार्यक्रम उलटून १० दिवस तसेच ठेवण्याचे धाडस मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी केले आहे.
स्व. वसंतराव काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे संमेलन भरविण्यात आले असून शिक्षक आमदार विक्रम काळे हे त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. ०२ फेब्रुवारी रोजी हे संमेलन भरविण्यात आले होते मात्र दहा दिवस उलटून देखील बार्शी लातूर मार्गावर असलेल्या या कमानीवर झळकत असलेले हे बॅनर वाहनचालकांसाठी अडचणीचे ठरत आहेत. शासकीय मालमत्ता फुकटात वापरण्याची ही क्लृप्ती कदाचित यापूर्वी कधीच वापरली गेली नाही. या बॅनर मुळे अनेकांचा मार्ग भटकण्याचा, खोळंबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने देखील याकडे दुर्लक्ष केल्याने अधिकारी नेमक्या कोणत्या दबावात आहेत याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

धाराशिव येथे 500 खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजूर

मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वैद्यकिय महाविद्यालये व सामान्य रुग्णालये एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) यांच्या अर्थसहाय्यातून उन्नती करणेबाबतची V.C. मा. ना. डॉ. तानाजीराव सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण महाराष्ट्र राज्य व मा. प्रविणसिंह परदेशी सिईओ मित्रा, मा. आरोग्य आयुक्त व मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांचेसोबत आज दिनांक 12/2/2024 रोजी व्हि. सी. व्दारे बैठक संपन्न झाली.

यामध्ये महाराष्ट्र शासनाने देशपातळीवर ७ धोरणात्मक निर्णय घेतल्याने एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) ने एकूण 4000 कोटी पैकी 1200 कोटी चा पहिला हप्ता महाराष्ट्र शासनास देण्याचे मान्य केले. मा. ना. डॉ. तानाजीराव सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांनी धाराशिव या आकांक्षीत जिल्हयातील रुग्णांच्या अडचणीबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांना अवगत केले. प्राप्त निधीतून 500 खाटांचे नविन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जवळ-जवळ 67000 स्केयर मिटर (Sqm) बांधकाम कर्मचारी

निवासस्थानासह टाईप प्लॅन प्रमाणे बांधकाम करणेबाबत सुचना देण्यात आल्या.

त्यानूसार महाराष्ट्र शासनाची उपलब्ध कुष्ठधामाची जागा मा. जिल्हाधिकारी, धाराशिव महोदयांनी मा. ना. डॉ. तानाजीराव सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्या सुचनेनुसार लगेच 20 एक्कर जागा देण्याचे मान्य केले. सदर जागेची पाहणी दिनांक 9/2/2024 रोजी मा. प्रविणसिंह परदेशी सिईओ मित्रा यांनी करुन जागा योग्य असल्याचेही मान्य केले. याकरिता लागणारे एकूण रु.350 कोटी इतका निधी एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) च्या अर्थसहाय्यातून देण्याचेही मान्य करण्यात आले. याकरिता मा. आरोग्य मंत्री महोदय यांनी मा. मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले.

पात्रता प्रवेश परीक्षांमधील संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) विधेयक, 2024’ राज्यसभेत मंजूर

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2024

पेपरफुटी, गैरप्रकार तसेच यूपीएससी, एसएससी  इत्यादी भरती परीक्षा आणि नीट, जेईई आणि सीयूईटी  सारख्या प्रवेश परीक्षांमधील संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी  ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना  प्रतिबंध) विधेयक, 2024’ ला राज्यसभेने आज मंजुरी दिली. लोकसभेने यापूर्वीच मंजूर केलेले हे विधेयक आता अधिसूचना जारी झाल्यानंतर कायद्यात रूपांतरित होईल.

विधेयकावरील चर्चेला सुरुवात करताना, केंद्रीय कार्मिक प्रशिक्षण राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, “सार्वजनिक परीक्षा विधेयक, जे भारताच्या संसदेच्या इतिहासातील बहुधा अशा प्रकारचे पहिले विधेयक भारतातील युवकांप्रती समर्पित आहे”.
“अनुचित साधनांना प्रतिबंध विधेयक, 2024” मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे, बँकिंग भरती परीक्षा आणि राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे आयोजित केलेल्या सर्व संगणक-आधारित परीक्षांचा समावेश असेल.

लोकसभेने याआधीच 6 फेब्रुवारी 2024 रोजी व्यापक चर्चेनंतर हे विधेयक मंजूर केले आहे.

काँग्रेसचे दिग्विजय सिंह, भाजपचे प्रकाश जावडेकर, द्रमुकचे पी. विल्सन; आप चे संदीपकुमार पाठक; बीजेडी चे मुझिबुल्ला खान; सीपीआय(एम) चे डॉ. व्ही. शिवदासन; काँग्रेसचे डॉ अमेय याज्ञिक; भाजपचे दिनेश शर्मा, सीपीआयचे संतोष कुमार पी. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ फौजिया खान यांनी या विधेयकावरील चर्चेमध्‍ये भाग घेतला.