Home Blog Page 47

तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकांना फुटले पाय,दिलीप नाईकवाडी, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, मंदिर सुरक्षा संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे गायब

मागील दोन वर्षापासून संचिका गायब झाल्याचा अहवाल ठेवला दडवून

धाराशिव -महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकांना पाय फुटले असून त्या गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचा अहवाल दैनिक जनमत च्या हाती लागला असून मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या अशा महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक संचिका गायब झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थान हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहायला मिळतं. भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या तुळजाभवानी मंदिरात यापूर्वी सोने-चांदीचे मौल्यवान पुरातन दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यासोबतच दानपेटी घोटाळा उघडकीस आला. दोन्ही प्रकरणे न्यायालयात सुरू असून मंदिर संस्थान मध्ये कार्यरत असलेल्या तत्कालीन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवरती नेहमीच भ्रष्टाचार आरोप केले गेले आहेत. एवढेच नाही तर आता तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकाच गायब झाल्याचा प्रकार दैनिक जनमत ने समोर आणला आहे.

यात मोठी धक्कादायक माहिती समोर आली असून तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर आणि मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याच्या संदर्भातील महत्त्वाची संचिकाच गायब असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जून 2013 मधील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे दस्तावेज, श्री तुळजाभवानी मंदिरातील गैर कारभाराची चौकशी संदर्भातील सप्टेंबर 2012 मधील संचिका,  तुळजापूर दानपेटी मोजणी संदर्भातील तहसील कार्यालयाची संचिका, मंदिरातील भरती प्रक्रियेतील महत्त्वाची दस्त गायब झाले आहेत. मे 2022 मध्ये संचिका गायब प्रकरणी 3 सदस्य समिती स्थापन करून याची चौकशी करण्यात आली होती. मागील दोन वर्ष हा अहवाल गुपित ठेवण्यात आला होता. लेखाधिकारी यांच्या मार्फत चौकशी केल्यानंतर विविध विषयांच्या महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक संचिका गायब असल्याचा अहवाल देण्यात आला होता.

मौल्यवान दागिने प्रकरण नेमकं काय आहे?

तुळजाभवानी मंदिर संस्थानातील तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याने तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारला. जवळपास 35 तोळे सोने, 71 किलो चांदी, 71 प्राचीन नाणी, गायब केली. या प्रकरणी 13 सप्टेंबर 2020 रोजी याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच दिलीप नाईकवाडी याला अटकही करण्यात आली. नाईकवाडी याने 17 वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने पुरातन नाणी गायब केली. तुळजाभवानी देवीला अनेक राजेराजवाडे यांनी अर्पण केलेले बहुतांश मौल्यवान व प्राचीन दागिने तिजोरीतून गायब करून गैर व्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते त्याचा ठपका नाईकवाडी याच्यावर ठेवत नाईकवाडी याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती मात्र आता याच तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी संदर्भातील महत्त्वाचे कागदपत्र मंदिर संस्थान कार्यालयातून गायब झाले आहेत.

संचिका गायब प्रकरणी या समितीने केली चौकशी

मंदिर संस्थान लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्य समिती स्थापन करण्यात आली होती. समितीमध्ये लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, सहाय्यक व्यवस्थापक स्थापत्य राजकुमार भोसले या समितीने 29 एप्रिल 2022 रोजी अभिलेख कक्षामध्ये प्रत्यक्ष तपासणी केली. दरम्यान समितीला 50 पेक्षा अधिक महत्त्वाच्या संचिका गायब असल्याचे लक्षात आले. त्या अनुषंगाने या समितीने 4 मे 2022 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासनाकडे संचिका गायब असल्याचा अहवाल बनवून सुपूर्द केला. यावर मंदिर प्रशासनाने नेमकी काय भूमिका घेतली हे अद्याप समोर आले नसले तरी तरी अहवालातून उघड झालेल्या प्रकारावर मंदिर प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

पारा येथील विशाल गोडसे च्या अंगावर पडली मेन लाईनची तार वेळ आली होती पण काळ आला नव्हता युवक सुखरूप!

महावितरणच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह

पारा येथील विशाल गोडसे च्या अंगावर पडली मेन लाईनची तार वेळ आली होती पण काळ आला नव्हता युवक सुखरूप!


पारा (राहूल शेळके): वाशी तालुक्यातील पारा येथील नवयुवक विशाल गोडसे चे दैव बलवत्तर म्हणून दि. २५ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अंगावर महावितरण ची मेन लाईनची तार पडून सुद्धा हा  युवक सुखरूप बचावला आहे .
            याबाबत अधिक माहिती अशी की , पारा येथील नवयुवक विशाल लक्ष्मण गोडसे हा युवक सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पारा गावातून स्वतःच्या शेताकडे जात असताना गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर वाशी रोडवर स्वतःच्या मोटरसायकल वरून जात असताना अचानक वाशी ते पारा जाणारी महावितरण ची मेन लाईनची तार तुटून अचानक अंगावर पडली व तो युवक गाडीवरून पडला . दैव बलवत्तर म्हणून या युवकाला थोडासा करंट लागला परंतु शारीरिक काही नुकसान झाले नाही. याबाबत युवकाने वाशी व पारा येथील महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईलवर संपर्क केला असता कोणीही कॉल घेतला नाही.         

दैनिक जनमतने वारंवार बातमीतून तसेच प्रतिनिधीने अधिकारी व कर्मचाऱ्यांशी भेटून पारा येथेच 33 के व्ही प्रि मान्सून मेन्टेनन्स ची कामे करण्यात यावी म्हणून पाठपुरावा केला आहे .परंतु या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अध्याप पर्यंत काहीही कामे केलेली नाहीत. अशा निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या पारा 33 के वी चे काही देणे घेणे दिसत नाही .पावसाळापूर्वी प्रि मेन्टेनन्स ची   कामे जर वाशी महावितरण केले असते तर आज ही वेळ आली नसती. वाशि महावितरण ने या गंभीर गोष्टीची दखल घेऊन प्रि मान्सून मेन्टेनन्स ची कामे करावीत अन् ग्राहकांना विज पुरवठा सुरळीत द्यावा अशी मागणी होत आहे.

खरीप २०२३ मधील नुकसानीपोटी विमा वितरणास सुरुवात; आठवडाभरात १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाईची रक्कम – आ. राणाजगजितसिंह पाटील

खरीप २०२३ मध्ये सुरुवातीला पावसातील खंड व नंतर अवेळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते. अवेळी पावसाने झालेल्या नुकसानी बाबत ऑनलाइन तक्रारी देण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यावेळी शेतकऱ्यांना केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत विहित मुदतीत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपनीला दिल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया विमा कंपनीने सुरू केली असून तक्रार दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील विमा वितरित करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

पावसातील खंडामुळे संभाव्य नुकसानीच्या २५% अग्रीम प्रमाणे रु. २५३ कोटी यापूर्वीच शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. खरीप हंगामात अवेळी पावसाने देखील सोयबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत ऑनलाईन तक्रारी देण्याचे आवाहन त्यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना केले होते. या अनुषंगाने नुकसानीच्या साधारणत: १,९२,००० ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
या तक्रारींच्या अनुषंगाने नुकसान भरपाई रकमेचे वितरण सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या सूचना विमा कंपनीला देण्यात आल्या आहेत. तसेच तक्रारी दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील इतरांप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

दुष्काळी परिस्थितीत खरीप हंगामा ची पेरणी तोंडावर असताना पेरणी पूर्वी पैसे उपलब्ध होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. यामुळे त्यांना मोठा आधार मिळत आहे. ठाकरे सरकारच्या काळातील खरीप २०२० व २०२१ मधील उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दुष्काळी मदत फक्त पंचनामे व घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व जमा करा – आ. कैलास पाटील यांची प्रधान सचिवांकडे मागणी

धाराशिव – धाराशिव जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे व घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व जमा करण्याची मागणी आ. कैलास पाटील यांनी प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांच्याकडे केली आहे.

धाराशिव जिल्हयात मागील चार दिवसापासुन अवकाळी पाऊस व गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे व फळबागांचे, जनावरांचा मृत्यू, राहती घरे, जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. सध्या पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी बि-बियाणे, खते आणण्यास पैसे उपलब्ध नसल्यामुळे त्याचे फक्त पंचनामे, घोषणा न करता पेरणीपुर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे आवश्यक आहे.
धाराशिव जिल्हयात दिनांक-११/०४/२०२४ तसेच त्यानंतर दि. २०/०४/२०२४ रोजी अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते.३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिके सोडुन जिरायत पिका खालील ४०२ बाधित शेतकऱ्यांच्या १४१.५० हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम रु. १३६०० प्रमाणे रु.१९.२४०० लक्ष, ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिके सोडुन बागायत पिका खालील २०९ बाधित शेतकऱ्यांच्या ७३.५० हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम रु. २७००० प्रमाणे रु.१९.८४५०० लक्ष, ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिका खालील २०३१ बाधित शेतकऱ्यांच्या १२२०.६० हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम रु. ३६००० प्रमाणे रक्कम रु.४३९.४१६०० लक्ष असे एकुण ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या एकुण २६४२ शेतकऱ्यांना रक्कम रु.-४७८.५०५०० लक्ष मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या कडुन आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर झाला असुन सदर प्रस्ताव तात्काळ मागवुन शेतकऱ्यांना पेरणीपुर्वी नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असताना सदरील प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. धाराशिव जिल्ह्यात धाराशिव, लोहारा, वाशी या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असुन उर्वरीत कळंब, तुळजापुर, उमरगा, भुम, परंडा तालुक्यातील ३३ मंडळांना दुष्काळ सदृष्य म्हणुन घोषीत करण्यात आलेले आहे. या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळ घोषीत केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणे दुष्काळी अनुदान देणेबाबत घोषणा करण्यात आलेली होती. परंतु स्वतःला निर्णय वेगवान गतीमान सरकार म्हणवुन घेणाऱ्या घोषणाबाज सरकारने या तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत दुष्काळाची एक रुपयाचीही मदत दिलेली नाही. त्यामुळे फक्त घोषणा व पंचनामे न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळाचे अनुदान पेरणीपुर्व जमा होणे आवश्यक आहे.धाराशिव जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे व घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व जमा करणेबाबत आपल्या स्तरावरुन तात्काळ कार्यवाही करावी असे आ. कैलास पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

धाराशिव शहराला होणार नऊ दिवसाआड पाणी पुरवठा – मुख्याधिकारी वसुधा फड

धाराशिव – गेल्या अनेक दिवसांपासून धाराशिव शहरात नियमित पाणी पुरवठा होत नव्हता. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत होता. पुढील काही दिवस पाणीपुरवठा होणार असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक वसुधा फड यांनी प्रसिद्धीपत्रक काढून यांनी सांगितले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
धाराशिव शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या पंपगृहांना महावितरण मार्फत होणारा विद्युतपुरवठा सध्यस्थितीत सुरू असलेल्या पावसाळी वातावरण व वाऱ्यामुळे वारंवार खंडित होत आहे. तसेच उजनी जलाशयात पाणीसाठा नसल्याने शहरास अत्यल्प प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेमार्फत शहरात नऊ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.

शेत जमिनीची नोटीस काढून फेरफार ला नोंद घेण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली तलाठ्या विरोधात गुन्हा नोंद

धाराशिव – शेत जमिनीची नोटीस काढून फेरफार ला नोंद घेण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने तलाठ्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत माहिती अशी की
आरोपी
कल्याण शामराव राठोड, वय-43 वर्षे, धंदा-नोकरी, पद-तलाठी, सज्जा आंदोरा, अतिरिक्त कार्यभार- सज्जा ईटकुर, तालुका कळंब जिल्हा-धाराशीव. रा. ज्ञानेश्वर नगर, राजीव गांधी चौक, आयटीआय कॅालेजच्या पाठीमागे, जिल्हा बीड यांनी तक्रारदार यांचे भावाचे नावे खरेदी घेतलेल्या शेत जमिनीची नोटीस काढून फेरफार ला नोंद घेण्यासाठी स्वतःसाठी व साहेबाला द्यावे लागतील असे म्हणून 14 मे रोजी तक्रारदार यांचेकडे 4000/- रु. लाच रकमेची मागणी करून तरजोडीअंती 3000/- रु. लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून पोलीस स्टेशन कळंब, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले तर सापळा पथकात पोलीस अमलदार स.फौ. इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, विष्णु बेळे, सचिन शेवाळे, नागेश शेरकर यांचा समावेश आहे

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 63.88 टक्के मतदान

  • सर्वाधिक मतदान तुळजापूर विधानसभा क्षेत्रात
  • 12 लक्ष 72 हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
  • 81 पैकी 20 तृतीयपंथीयांनी केले मतदान

धाराशिव,दि.8(प्रतिनिधी) उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले. या निवडणूकीच्या मतदानाची टक्केवारी 63.88 इतकी आहे. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
औसा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 56 हजार 479 पुरुष, 1 लक्ष 37 हजार 604 स्त्री व 3 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लक्ष 94 हजार 86 मतदार असून त्यापैकी 1 लक्ष 1 हजार 978 पुरुष, 87 हजार 536 स्त्री आणि एक तृतीयपंथी अशा एकूण 1 लक्ष 89 हजार 515 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुषांची मतदानाची टक्केवारी 65.17 टक्के, महिलांची 63.61 टक्के तर तृतीयपंथीयांची 33.33 टक्के अशी एकूण 64.44 टक्के इतकी आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघात 3 लक्ष 10 हजार 703 मतदार असून यामध्ये 1 लक्ष 64 हजार 500 पुरुष, 1 लक्ष 46 हजार 193 स्त्री आणि 10 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यापैकी 1 लक्ष 291 पुरुष, 87 हजार 56 स्त्री आणि 4 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 1 लक्ष 87 हजार 351 मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदारांची टक्केवारी 60.97, स्त्री मतदारांची 59.55 टक्के आणि तृतीय पंथीयांची टक्केवारी 40 टक्के असे एकूण टक्केवारी 60.30 टक्के आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले त्याची टक्केवारी 65.40 इतकी आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 98 हजार 517 पुरुष, 1 लक्ष 77 हजार 39 स्त्री आणि 6 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून काल झालेल्या निवडणूकीत 1 लक्ष 34 हजार 1 पुरुष, 1 लक्ष 11 हजार 625 स्त्री आणि एका तृतीयपंथीयाने अशा एकूण 2 लक्ष 45 हजार 627 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 67.50 टक्के पुरुष, 63.05 टक्के स्त्री व 16.67 टक्के तृतीयपंथी अशा एकूण 65.40 टक्के मतदारांनी मतदान केले.
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 92 हजार 957 पुरुष, 1 लक्ष 72 हजार 977 स्त्री व 17 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 65 हजार 951 मतदार आहेत. त्यापैकी 1 लक्ष 28 हजार 121 पुरुष, 1 लक्ष 5 हजार 985 स्त्री अशा 2 लक्ष 34 हजार 106 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 66.40 टक्के पुरुष, 61.27 टक्के स्त्री असे एकूण 63.97 टक्के मतदान झाले.
परंडा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 73 हजार 146 पुरुष, 1 लक्ष 52 हजार 13 स्त्री व 6 तृतीयपंथी मतदार असे एकूण 3 लक्ष 25 हजार 165 मतदार असून त्यापैकी 1 लक्ष 13 हजार 940 पुरुष, 92 हजार 673 स्त्री व 3 तृतीयपंथी असे एकूण 2 लक्ष 6 हजार 616 मतदारांनी मतदान केले. मतदानाची पुरुषांची टक्केवारी 65.81, स्त्री टक्केवारी 60.96 टक्के व 50 टक्के तृतीयपंथी अशी एकूण टक्केवारी 63.54 टक्के इतकी आहे.
बार्शी विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 66 हजार 497 पुरुष, 1 लक्ष 54 हजार 734 स्त्री व 39 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 3 लक्ष 21 हजार 270 मतदारांचा समावेश आहे. 7 मे रोजी 1 लक्ष 12 हजार 202 पुरुष, 97 हजार 541 स्त्री आणि 11 तृतीयपंथी अशा एकूण 2 लक्ष 9 हजार 754 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 67.39 टक्के पुरुष, 63.04 स्त्री व 28.21 तृतीयपंथी अशा एकूण 65.29 टक्के मतदारांनी मतदान केले.
येत्या 7 मे रोजी झालेल्या निवडणूकीसाठी 10 लक्ष 52 हजार 96 पुरुष, 9 लक्ष 40 हजार 560 स्त्री आणि 81 तृतीयपंथी असे एकूण 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांचा मतदार यादीत समावेश आहे. त्यापैकी 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री व 20 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा या निवडणूकीत हक्क बजावला. यामध्ये 65.63 टक्के पुरुष, 61.92 टक्के स्त्री व 24.69 टक्के तृतीयपंथी अशा एकूण 63.88 टक्के मतदारांनी मतदान केले.
उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक 31 उमेदवार या निवडणूक रिंगणात आहे. सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकीत 14 उमेदवार, सन 2014 च्या निवडणूकीत 27 उमेदवार, सन 2009 च्या निवडणूकीत 25 उमेदवार, सन 2004 मध्ये 8 उमेदवार, सन 1999 मध्ये 5 उमेदवार, सन 1998 मध्ये 7 उमेदवार, सन 1996 मध्ये 21 उमेदवार, सन 1991 मध्ये 17 उमेदवार, सन 1989 मध्ये 12 उमेदवार, सन 1984 मध्ये 6 उमेदवार, सन 1980 मध्ये 5 उमेदवार, सन 1977 मध्ये 3 उमेदवार, सन 1971 मध्ये 5 उमेदवार, सन 1967 मध्ये 3 उमेदवार, सन 1962 मध्ये 3 उमेदवार, सन 1957 मध्ये 2 उमेदवार, सन 1951-52 च्या सार्वत्रिक निवडणूकीत 2 उमेदवारांत लढत झाली.
येत्या 4 जून 2024 रोजी 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतमोजणी होणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील 31 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून सर्वांचे लक्ष 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

या पुढे पवनराजे निबांळकर यांच्या बद्दल ब्र शब्द काढला तर खपऊन घेणार नाही ओमराजे यांचा विरोधाकांना इशारा

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा परंडा तालुक्यात झंजावत……

परंडा ( प्रतिनिधी) कै. पवनराजे निबांळकर यांच्या बद्दल या पुढे ब्रशब्द काढाल तर खपऊन घेणार नाही.४०वर्ष मंत्री राहून जिल्हयावर एकाधीकार शाही गाजवलेल्या पाटील पितापुत्राना एका झटक्याट गार करून आलो तुम्ही किस झाड की पत्ती असा इशारा ओमराजे
निबांळकर यांनी विरोधाकांना कंडारी येथे बोलताना दिला आहे.
दि २६ रोजी परंडा तालूक्यातील हिगणगाव,वाकडी, कंडारी व डोंजा येथे ओमराजे निंबळकर यांच्या प्रचारार्थ झंजावती सभा घेन्यात आल्या यावेळी बोलताना ओमराजे
निबांकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
पालकमंत्री डॉ.सावंत यांनी मीरगव्हाण येथील कार्यक्रमात बोलताना ओमराजे निंबाळकर यांना शंभर बापाचा असा आक्षेपाहार्य विधान केले होते.तसेच तेरणा साखर कारखाना येथिल शिवसेना कार्यकर्ता मेळ्याव्यात डॉ.सावंत यांनी ओमराजे यांचा मी राजकीय बाप आहे असा उल्लेख केल्याने ओमराजे सावंत यांच्यावर चांगलेच भडकले असुन या पुढे माझा बापाबद्दल बोलाल तर सहन करणार नसल्याचा इशारा दिला आहे.
मी फोन उचलून गोरगरीब, शेतकरी,कष्ठकरी,सर्वसामान्य जनतेची कामे करतो ते विरोधकांना पहावत नाही,मी जनतेच्या संपर्कात राहुन जनतेची कामे केल्या मुळे जनता विरोधकांना या निवडनुकीत धडा शिकवेल असा टोला निबांळकर यांनी विरोधकांना लगावला.गॅस सिलेंडर ४०० रूपयाचे होते तेव्हा महागाईवर बोलनारे मोदी म्हणाले होते मतदानाला जाताना गॅस सिलेंडर ला नमस्कार करून जावा.आता गॅस सिलेंडरचा दर हजार रूपयेच्या पुढे गेला आहे. आता तर दंडवत करूनच मतदानाला जावे लागणार असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी मोदी यांच्या आच्छे दिनाची आठवन करून दिली.
या वेळी मा.आ.ज्ञानेश्वर पाटील,मा.आ.राहुल मोटे, प्रतापसिंह पाटील,दादासाहेब पाटील सोनारीकर,शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील,
तालूका प्रमुख मेघराज पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड.संदिप पाटील,राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, माजी जिप सदस्य धनंजय मोरे, भागचंद नेटके,अॅड.सिराज मोगल,हनुमंत कोलते पाटील, अॅड.हनुमंत वाघमोडे,डॉ नवनाथ वाघमोडे,श्रीहरी नाईकवाडी,नंदू शिंदे,नसीर शहाबर्फीवाले, धनश्याम शिंदे,गणी हावरे, बुध्दीवान लटके,धनंजय हांडे,डॉ रविंद्र जगताप,अॅड.श्रीकांत भालेराव,बाजार समिती संचालक दादा घोगरे,पंकज पाटील,नितीन गाढवे यांच्यासह महा विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरीक मोठया संखेने उपस्थित होते.

पत्नीस पळवून नेल्याच्या रागातून प्रियकराच्या वडीलांचा खून,परंडा तालुक्यातील घटना

डोक्यात दगड घालून केला खून, फरार आरोपीस परंडा पोलिस पथकाने दोन तासात केली अटक

परंडा ( प्रतिनिधी ) तुझ्याच मुलाने माझ्या पत्नीस पळऊन नेहले आहे तीला शोधण्यासाठी चल असे म्हणून बापू ऊर्फ उत्तम कदम यांना घरातून नेऊन आरोपी सुधीर काळे याने दगडाने ठेचून खून केला ही घटना दि.२५ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास परंडा तालुक्यातील साकत बुद्रुक येथे घडली आहे.
याबाबत पोलिसा कडून मिळालेले माहिती अशी की
काही दिवसांपूर्वी मयत उत्तम कदम रा.भूम याचा मुलगा राम कदम याने सुधीर उर्फ पापा काळे याची पत्नी सोना हीला प्रेम संबंधातून पळवून नेले होते. त्यानंतर सुधीर काळे याने बापू कदम यास माझी बायको शोधण्यासाठी माझ्या बरोबर चल, तुझ्याच मुलाने माझी बायको पळवून नेलेली आहे.तिला शोधून देणे आता तूझीच जबाबदारी आहे.जो पर्यंत माझी बायको सापडत नाही तोपर्यंत तुला सोडणार नाही असे म्हणून स्वतःच्या पिकअप वाहणातून आस्तिक भोबडे नावाच्या चालकास सोबत घेवून त्याच्या बायकोचा शोध घेण्यासाठी दि २४ एप्रील रोजी भूम येथून घरातून निघाले होते.
संभावीत ठिकाणांवर पळून गेलेल्या राम आणि सोना यांचा शोध घेतला परंतू ते दोघे सापडले नाहीत.दि.२५ एप्रिल रोजी सोलापुर जिल्हयातील टेंभूर्णी येथे शोध घेवून साकत मार्गे परत भूमकडे जात असताना साकत (बू) रोडवर अंदाजे १०.३० वा सूधीरने वाहनाची चावी काढून घेतली आणी गाडीखाली उतरला आणी गाडीची चावी खाली रानात फेकून दिली.त्याच्या मागोमाग बापू कदम हा देखील गाडीतून खाली उतरला आणि सुधीरला चल आपण भूमला जाऊया म्हणून विनंती करू लागला.परंतू सूधीरने बापूचे एकले नाही उलट बापूच्या मुलाने त्याच्या बायकोला पळवून नेल्याचा राग मनात धरून बापूच्या दिशेने दगडे भिरकावु लागला.दगडाचा मार लागून बापू रोडवर पडल्यावर सुधीरने एक मोठा दगड बापूच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांनी तात्काळ घटनास्थळास भेट दिली.
पोलीस अधिक्षक अतूल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन,उप विभागीय पोलीस अधिकारी भूम गोरीप्रसाद हिरेमठ यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे,सहाय्यक पोलीसउपनिरीक्षक मुळे,पोलीस हवलदार दिलीप पवार,पोलीस हवलदा विशाल खोसे,पो.ना.शेवाळे,पोना,काकडे,पो.का.कोळेकर यांच्या पथकाने आरोपीस पळून जात असताना अवघ्या दोन तासात परंडा तालूक्यातील आंतरगाव येथून ताब्यात घेतले.
सदरील प्रकरणात मयताचा मूलगा लक्ष्मण उत्तम कदम याच्या फिर्यादीवरून कलम ३०२ नुसार परंडा पोलीस स्टेशनला आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे करीत आहेत.

दूध भेसळ प्रकरणी समृद्धी मिल्क व फूड प्रोसेसिंग प्लांटवर कारवाई

  • प्रकल्पाचा परवाना निलंबित
  • दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व विक्रीस प्रतिबंध

धाराशिव दि.25,(प्रतिनिधी) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रत्नापूर येथे दुध भेसळ होत असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी जिल्हास्तरीय दुध भेसळ रोखणाऱ्या समितीने आज 25 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6.30 वाजता अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वात अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक गौहर हसन,अन्न व प्रशासनचे निरिक्षक,वजन व मापे अधिकारी,प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी,छत्रपती संभाजीनगर आणि संरक्षणार्थ 10 ते 15 पोलीस यांच्या सहपथकाने धाड टाकून कारवाई केली.

रत्नापूर येथील समृध्दी मिल्क अँड फुड प्रासेसिंग प्लँट या प्रकल्पावर जिल्हास्तरीय दुध भेसळ समिती पथकाने धाड टाकली असता घटनास्थळी शेडमध्ये दुध उत्पादने, कुल्फी,बदाम शेक बनविण्यात येत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले.अतिशय अस्वच्छ वातावरणात दुध उत्पादने बनविण्याची प्रक्रीया होत असल्याचे दिसुन आले.त्यामध्ये बदाम शेक,खवा,प्रोटीन पावडर हे पदार्थ आढळुन आले.पदार्थाचे नमुने काढुन अन्न व औषध प्रशासनामार्फत पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

या प्रकल्पावर बदाम शेक व एक स्टेनलेस स्टील कॅनला बुरशी लागलेली असल्याचे दिसून आले. यावेळी बदाम शेक नष्ट करण्यात आला.या प्रकल्पावर एक वजन काटा मुद्रांकीत नसल्याने वजन मापे अधिकारी यांनी प्रकल्पावर दंडात्मक कारवाई केली.या प्रकल्पात आढळुन आलेले पदार्थ अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करण्यात आले. प्रकल्पाचा परवाना निलंबीत करण्यात आला.पुढील आदेशापर्यंत प्रकल्पामध्ये दुध व दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादन / विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे.

ही कारवाई दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आली.सदर कारवाई विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.आयुक्त पशुसंवर्धन विभाग व आयुक्त,दुग्धव्यवसाय विकास विभाग यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
*