Home Blog Page 40

पालकमंत्री कार्यालयाजवळ खासदारांचे संपर्क कार्यालय होणार!

पालकमंत्र्यांची अन् खासदारांची जवळीक राहणार!

धाराशिव – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची जवळीक येत्या काळात अधिक राहणार आहे. नियोजन भवनात पालकमंत्री कार्यालय असून कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर खासदारांना संपर्क कार्यालयासाठी जागा देण्यात येणार आहे. काल दि २७ जानेवारी रोजी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या दालनाची पाहणी देखील केली आहे.


२०२१ मध्ये नव्या नियोजन भवनाचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते झाले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वतः खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे होते. त्यांच्या पक्षाची सत्ता असताना देखील त्यांना या इमारती मध्ये दालन दिले गेले नव्हते. महायुतीचे सरकार आल्यानंतर डॉ. तानाजी सावंत पालकमंत्री झाल्यानंतर देखील कार्यालय देण्याबाबत कुठलीच हालचाल पाहायला मिळाली नव्हती मात्र महायुतीच्या काळात विशेषतः शिंदे गटाचे पालकमंत्री जिल्ह्यात असताना आणि खा. राजेनिंबाळकर यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरू असताना या कार्यालयासाठी जागा मिळणे हा दुर्मिळ योग नाही.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खासदारांना फॅसिलीटेशन सेंटर साठी दालन देण्यात येते त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात जागा देण्यात येते. खासदारांनी नियोजन भवनात कार्यालयासाठी जागा मागितली असून नियोजन भवनात दालन देण्याचे अधिकार पालकमंत्र्यांकडे असल्याने दोन मित्रांची जवळीक कोणते नवीन राजकीय समीकरण जुळवून आणते हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

याच ठिकाणी खा. राजेनिंबाळकर यांना हेच दालन देण्याची चर्चा आहे

अपर विभागीय आयुक्तांची स्थगिती असताना देखील फेरफार ची नोंद

महसूल विभागाचा बेधुंद कारभार


मंडळ अधिकारी,तलाठी यांचा महापराक्रम

धाराशिव – अपर विभागीय आयुक्तांची स्थगिती असताना देखील तलाठ्याने फेरफार ची नोंद घेतल्याने महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे रहात असून जिल्ह्याला वाली आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मौजे उपळा (मा.) ता. व जि. धाराशिव, येथील गट नंबर ७२०, ७२१ व ७२४ चा प्रलंबित फेरफार नोंद क्र. ५३२३ व ५३२४ खरेदीदार शुभांगी पंकज पडवळ व खरेदीदार मेघराज पंकज पडवळ यांनी प्रवीण भातलवंडे, तलाठी, मौजे उपळा (मा.) ता. धाराशिव) व श्रीमती. डी. डी. मुळुक (मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी कार्यालय, येडशी), ता व जि. धाराशिव यांच्याशी संधान साधून अपर विभागीय आयुक्त क्र-२, छत्रपती संभाजी नगर यांचे न्यायालयात सदरील शेतजमिनी बाबत प्रलंबित फेरफार नोंद क्र. ५३२३ व ५३२४ यास स्थगिती आदेश असून फेरफार मंजुर करून अपर विभागीय आयुक्त क्र-२, छत्रपती संभाजी नगर यांचे स्थगिती आदेशास संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी भीमपराक्रम करून केराची टोपली यांनी दाखवली आहे.
एखादे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना त्यावर स्थगिती असताना त्याची नोंद घेता येत नाही हे माहिती असताना देखील सातबाऱ्यावर आलेली नोंद अर्थपूर्ण व्यवहाराशिवाय शक्य आहे का? महसूल विभागात उंबरठे झिजवून देखील अनेक कामे होत नाहीत असा अनुभव सामान्यांना असताना या फेरफारची नोंद वायू वेगाने कशी झाली याचे उत्तर महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देणे अपेक्षित आहे

खा. राजेनिंबाळकरांच्या पोस्ट मधून पक्षप्रमुख गायब, स्व. आनंद दिघे यांच्या जयंतीची पोस्ट व्हायरल

धाराशिव – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू असताना स्व. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी शुभेच्छा देताना सोशल मीडियावर जी पोस्ट टाकली त्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब असल्याने पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे.

धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ओमराजे महायुती सोबत असल्याचे म्हणल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. महाविकास आघाडीचे सरकार जाण्यासाठी ज्या प्राथमिक गोष्टी होत्या त्यात ठाणे जिल्हा, स्व. आनंद दिघे यांचे विचार, प्रताप सरनाईक यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडण्याचे पत्र या गोष्टी नंतर सत्तांतर झाले होते. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा त्याच गोष्टींचा योग जुळून येत असल्याने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. मंत्री प्रताप सरनाईक आणि खा. राजेनिंबाळकर २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते एकाच बॅचचे आमदार असल्याने दोघात सख्य देखील आहे. मात्र शिंदे गटासोबत राहिल्याने त्यांना सत्तेच्या पदांचा लाभ मिळाला मात्र खा. राजेनिंबाळकर सत्तेच्या पदापासून अजूनही लांब असल्याने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर भविष्यात कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल

खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकरांनी पोस्ट केली एडिट

प्रसार माध्यमात बातम्या आल्यानंतर खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सोशल मीडियावर असलेली पोस्ट बदलली आहे.

तासगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष गुलाबराव काका पाटील यांचे दुःखद निधन


तासगाव (प्रतिनिधी)
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तासगाव नगरपालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक  दर्यावरती किसान व्यायाम मंडळचे कार्यवाह स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीचे माजी व्हॉइस चेअरमन    गुलाबराव काका पाटील यांचे शुक्रवार दिनांक 24 रोजी सकाळी अकरा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले निधनाची बातमी समजतात काकांचे राहते घरी त्यांच्यावर प्रेम करणारी तासगाव शहरातील नागरिक तासगाव नगरपालिकेचे आजी माजी नगराध्यक्ष आजी माजी नगरसेवक सूतगिरणीचे संचालक मार्केट कमिटीचे संचालक खरेदी विक्री संघाचे संचालक यांनी गुलाबराव काका पाटील यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले वरचे गल्ली तसेच तासगाव शहरावर काकांची निधनाची बातमी समजतात दुःखाचा डोंगर कोसळला कै गुलाबराव काका पाटील यांचे ८६ वर्षे वय होते तर काँग्रेस पक्षाचेवतीने काँग्रेस भवन समोर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल दादा पाटील यांनीही काकांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, माती सावरण्याचा कार्यक्रम सोमवार २७ रोजी ठीक ९.३० वाजता अमरधाम स्मशानभूमी तासगाव येथे आहे.

शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार

महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन

महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती

धाराशिव- नागपूर ते गोवा या प्रस्तावित असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२४) एकदिवसीय धरणे आंदोलन करून महामार्ग कायमचा रद्द करावा अशी मागणी केली. यावेळी बाधित शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठींबा दिला.
शक्तिपीठ महामार्ग पवनार ते पत्रादेवी (नागपूर – गोवा) महाराष्ट्र द्रुतगती महामार्ग  धाराशिव जिल्ह्यातून नेऊ नये, कोल्हापूर जिल्हा ज्याप्रमाणे या प्रकल्पातून वगळला त्याप्रमाणे धाराशिव जिल्हादेखील वगळण्यात यावा, जिल्ह्यातील बागायती जमिनी कवडीमोल किंमतीत अधिग्रहित केल्यास इथला शेतकरी देशोधडीला लागेल त्यामुळे कुणीही मागणी न केलेला हा महामार्ग कायमचा रद्द करावा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी आमच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रयत्न केला तर प्राण पणाला लावून त्याला विरोध केला जाईल असा इशारा दिला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर या नेत्यांनी भाषणे केली. शक्तीपीठ महामार्ग जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, शासनाने शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवू नये अन्यथा त्याची किंमत शासनाला मोजावी लागेल असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी भाषणातून दिला. शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना दिले. यावेळी शोभा जाधव यांच्यासमोर बाधित शेतकरी महिलांनी कैफियत मांडली. धीरज पाटील यांनी यावेळी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवा आणि महामार्ग रद्द करण्याचा अहवाल शासनाला पाठवा अशी विनंती जाधव यांना केली. या आंदोलनात शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या  नितळी, घूगी लासोना, सांगवी, कामेगाव, चिखली, माळंगी, बरमगाव बु. मेडसिंगा, धाराशिव ग्रामीण, देवळाली, शेकापूर, गावसुद, वरवंटी, पोहनेर, बेगडा, सुर्डी, खुंटेवाडी या 19 गावातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बर्ड फ्लू बाबत धाराशिव जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग सतर्क

धाराशिव – पक्षातील बर्ड फ्लू रोगाच्या प्रादुर्भाव बाबत पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून पशुधन विकास अधिकारी, जिल्हा परिषदेच्या सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांना सूचना आणि खबरदारीचे पत्र काढले आहे.
स्थलांतरीत पक्षी माहे ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान बर्ड फ्लू रोगप्रसारामध्ये महत्वाची भुमीका बजावतात त्यामुळ आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या वॉटर बॉडीज (Water Bodies) च्या ठिकाणाहुन वन विभागाशी संपर्क साधुन संबधीत वन परिक्षेत्रातील पक्ष्यांचे ताजे Fecal Dropings नमुने प्रामुख्याने तात्काळ सादर करण्यास सांगितले आहे.

बर्ड फ्लू : खबरदारी व उपाय

संकलनः डॉ. निटुरे जि. एस.

पशुधन विकास अधिकारी, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय रेणापूर जि. लातूर

आजाराबद्दल माहितीः

बर्ड फ्लू हा विषाणू पासून होणारा संसर्गजन्य रोग आहे. महाराष्ट्रमध्ये हा आजार 2006 मध्ये प्रथम नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे आढळला होता. हा विषाणू प्रामुख्याने स्थलांतरित पक्षांमध्ये (जसे बदक, हंस, कबुतर, साळुंकी, पानपक्षी) आढळतो व त्यांच्याकडून इतर पक्षी जसे कावळे तसेच कुक्कुट पक्षांना याचा प्रसार होतो.

बर्ड फ्लू विषयी शास्त्रोक्त माहिती असणे अत्यंत गरजेचे असून, योग्य खबरदारी व उपाय केल्यास या रोगाचा प्रसार थांबवता येतो व पर्यायी कुक्कुट पालन व्यवसायाशी निगडीत लाखो कुटुंबांना आर्थिक आधार देता येईल.

कुक्कुट पक्षांमधील बर्ड फ्लूची लक्षणेः

या रोगाची लागण व मरतुकीचे प्रमाण सौम्य स्वरूपा पासून ते १००% पर्यन्त आढळते. आजारी पक्षी कमी खातात, ते शिंकतात, खोकतात, धापा टाकतात, नाकातून चिकट द्रव स्त्रावतो, तूरा व गलोल सुजते – काळेनिळे पडतात, पायावर रक्तस्त्रावाचे ठिपके दिसतात, विष्ठा पातळ होते, पक्षांची अंडी उत्पादन घटते, अंडी कवचरहित अथवा मऊ कवचाची रबरासारखी निर्माण होतात. कधी-कधी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कुठलेही लक्षण न दाखवता अचानक मरतुक होते.

उपचारः

बाधित क्षेत्रातील पक्षी, खाद्य यांना नष्ट करणे व विषाणूचा प्रसार रोखणे

बर्ड फ्लू होण्याचा धोका कोणाला आहे?

तुम्ही कोंबड्या – बदकं पाळली असतील, त्यांना हाताळत असाल, किंवा तुमचं पोल्ट्री फार्म आहे जिथे भरपूर कोंबड्या आहेत, किंवा मग कोंबड्यांच्या मांस विक्रीशी तुमचा जवळचा संबंध असेल, परिसरात बर्ड फ्लूची बाधा झाली असेल तर तुम्हाला या संसर्गाची शक्यता वाढते. पक्षी हाताळताना रबर ग्लोव्ह्ज आणि मास्क, फेस शील्ड चा वापर करावा. तसेच शासनाकडून याबाबत देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे.

मानवात संक्रमण आढळलेलं नाही-

देशात अनेक ठिकाणी पक्षांमध्ये बर्ड फ्लू संक्रमण आढळलं असलं तरी मानवांमध्ये मात्र अ‌द्याप हे संक्रमण आढळून आलेलं नाही.

भारतात मानवांमध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी-

बर्ड फ्लूचा प्रसार बाधित पक्षांमुळे होतो. बर्ड फ्लूचा विषाणूचा 70 अंश सेल्सियस वर नाश होतो. भारतीय खाद्य संस्कृती मध्ये अंडी चिकन 100 अंश सेल्सियस पेक्षा जास्त तापमानामध्ये उकडले व शिजवले जात असल्याने या विषाणू चा प्रसार होण्याची शक्यता कमी असते. कच्चे चिकन अथवा कच्ची अंडी खावू नये.

प्रतिबंध व नियंत्रणः

व्यावसायिक कुक्कुट पक्षीगृह चालकांनी पक्षांची असाधारण मरतुकीची माहिती त्वरित कळवणे.

कुक्कुट मांस (चिकन), अंडी विक्रेते यांनी दुकानाची व वापरात येणाऱ्या सर्व साहित्यांची वारंवार निर्जंतुकीकरण करावे. दुकानातील पक्षी ठेवण्याची जागा स्वच्छ ठेवणे, कुक्कुट पक्षांची विष्ठा, पिसे गोळा करून योग्य विल्हेवाट लावणे अथवा पुरुन टाकणे, आजारी पक्षांची विक्री न करणे.

ग्लोव्ज व मास्क यांचा वापर करा, वरचेवर हात धुवा, सॅनिटायजर वापरा, हात चेहऱ्याला नाका- तोंडाला लावू नका. आणि तुमच्या जवळपास पाळीव पक्षी, इतर पक्षी किंवा स्थलांतरित पक्षी मरून पडत असल्याचं आढळलं तर त्यांची परस्पर विल्हेवाट न करता पशुवैद्यकीय दवाखान्यास संपर्क साधणे.

कुक्कुट पक्षिगृह व परिसराची नियमित निर्जंतुकीकरण करणे. यासाठी २% सोडियम हायपोक्लोराईड, ४% फोरम्यालीन तसेच धुण्याचा सोडा व सोडियम कार्बोनेट (१ लीटर पाण्यात ७ ग्रॅम मिसळून) यांचा वापर करू शकता.

बाहेरील व्यक्तीस, वस्तू, वाहने इत्यादीचा पक्षीगृहामध्ये येण्यास प्रतिबंध करावा.

  • कुक्कुट पक्षीगृह परिसरात जैवसुरक्षा नियमाची योग्य अमलबजावणी करणे

लहान मुले परसातील आजारी कोंबड्याच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्या

शक्यतो घरगुती कोंबड्या पासून अंतर राखा. घरामध्ये पाळीव कोंबड्‌यांचा वावर थांबवावे

  • कोंबड्यांच्या, पक्षांच्या संपर्कात आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत

आजारी कोंबड्‌याना इतर सदृढ कोंबड्‌यापासून वेगळ्या ठेवाव्यात.

अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरू नये

क्रेन च्या साहाय्याने भलमोठा पुष्पहार घालत संजय गाढवे यांचा वाढदिवस साजरा

भूम ( वसीम काजळेकर)- येथील नगरपरिषदेचे गटनेते तथा विकासाचे मॉडेल म्हणून भूम चा विकास करनारे संजय गाढवे यांचा वाढदिवस शहरात अतिशय उल्हासात उत्साहात साजरा करण्यात आला . वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हनून रक्तदान शिबिर, शालेय साहित्याचे वाटप  असे विविध उपक्रम घेत कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला . यावेळी घेण्यात आलेल्या रक्त दान शिबिरात ११५ बहादरांनी रक्तदान केले.

यावेळी मा. नागराध्यक्ष संजय गाढवे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या शहरातील कसबा येथील सार्थक या निवासस्थानी सकाळी पासून रात्री उशिरापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकारणी, तसेच कार्यकर्ते, सर्व नगरसेवक आनी आलमप्रभू शहर विकास आघाडीचे पदाधिकारी यांची  होती गर्दी झाली होती. तसेच यावेळी संजय गाढवे प्रतिष्ठान च्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने क्रेन च्या साहाय्याने भलमोठा हार घालत आनी रिमोट द्वारे उडणारी शोभेची दारू उडऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.

या वेळी नियोजन समिती सदस्या तथा उपनगराध्यक्षा संयोगिता गाढवे , युवा नेते साहिल गाढवे ,आलमप्रभू भूम शहर विकास आघाडीचे अध्यक्ष संजय साबळे , सचिव तथा सूरज गाढवे,  युवा नेते खंडेराव गोयकर, यशस्वी  उद्योजक बाळासाहेब सुर्वे,  आदर्श शिक्षक अमोल गायकवाड , एस . जी . फॅन्स क्लबचे बालाजी अंधारे,संत सावता परिषदेचे सुनील माळी , पाकिजा ग्रुपचे मुशीर शेख , राकेश जाधव, शाहरुख सय्यद  यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

बंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने केला स्वतःचे गाडीवर हल्ला करण्याचा बनाव

धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की आणि त्यातून होणाऱ्या तक्रारी मुळे भितीचे वातावरण निर्माण झालेले असताना मेसाई जवळगा येथील सरपंचावर हल्ला झाला हा हल्ला पवनचक्की प्रकरणात झाल्याचा प्राथमिक संशय निर्माण करण्यात आला होता मात्र याबाबत हा हल्ला बंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने स्वतःच्या गाडीवर हल्ला करण्याचा बनाव केल्याचे तपासातून समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
फिर्यादी . नामदेव बालीश निकम, वय 38 वर्षे, व्यवसाय गाडी धंदा टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स पुणे ह.मु. जवळगा मेसाई यांनी दिनांक 27 डिसेंबर रोजी फिर्यादी जबाब दिली की, फिर्यादी व त्यांचा मित्र प्रविण नरहरी इंगळे हे दोघे दि.26.डिसेंबर रोजी रात्री 10 वाजणेचे सुमारास व्होनाळा ते जवळगा मेसाई रोडने त्यांची कार क्र. MH 12 QT 7790 मध्ये जात असताना दोन नेमप्लेट झाकलेल्या मोटारसायकल वरील तोंड झाकलेल्या चार अज्ञात व्यक्तीने मिळून फिर्यादी यांचे गाडीवर दोन्ही बाजूने अंडे, दगड, सिमेंटचा ठोकळा असलेल्या पाईपने मारुन काच फोडली. त्यानंतर गाडीत असणारे फिर्यादी व साक्षीदार प्रविण इंगळे यांचे अंगावरती पेट्रोल भरलेला फुगा फेकुन हल्ला केला आहे. अशा प्रकारची माहिती पोलीसांना कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी रवाना होवून घटनासथ्ळाची पाहणी केली. नामदेव बालीश निकम यांचे फिर्याद जबाब वरुन अज्ञात चार लोकाविरुध्द पोस्टे तुळजापूर गु.रं.नं. 591/2024 कलम 110,324 (6), 118(1), 126(2),352, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करुन सदर गुन्ह्याचा तपास सुरु केला.

सदर गुन्ह्याचे तपासामध्ये घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले असता घटनास्थळावरील परिस्थिती आणि फिर्यादी यांनी सागिंतलेली घटना यामध्ये विसंगती दिसुन येत होती. सदर गुन्ह्याचा तांत्रीक पध्दतीने तपास करुन यातील फिर्यादी नामदेव निकम व साक्षीदार प्रविण इंगळे या दोघांना विश्वासात घेवून अधिक तपास केला असता फिर्यादी व साक्षीदार यांनी सदरची घटना ही फिर्यादी यांना बंदुकीचे लायसन्स काढणेसाठी स्वतःवर इतर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तरी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी स्वतःला बंदुकीचे लायसन्स मिळविणे करीता स्वतःव साक्षीदार यांचेवर पेट्रोल टाकुन, गाडीचे काच फोडून हल्ला केल्याचे कृत्य हे फिर्यादीने स्वतःच करुन हल्ला केल्याचा बनाव केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक संजय जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस
अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे व स्थानिक गुन्हे शाखेची टिम, पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, सपोनि भालेराव, सपोनि चासकर यांनी केलेला आहे.

शैक्षणिक सहल बसला अपघात, पाच विद्यार्थी किरकोळ जखमी!


कसबे तडवळे : धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जय हिंद विद्यालयाच्या शैक्षणिक सहल एसटी बस देवगड हुन कुणकेश्वर  कडे जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील खाक्षी घाट परिसरातील तीव्र वळणावर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने साडेतीनच्या सुमारास अपघात झाला. सदर बस चालकाच्या प्रसंगावधातेने चाळीस विद्यार्थी मृत्यूच्या दाढेतून बचावले आहेत.
या बाबत मिळालेली माहिती अशी की,  देवगडहून कुणकेश्वरकडे जाणारी धाराशीव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जयहिंद विद्यालयाची शैक्षणिक सहलीच्या एसटी बसला खाक्षी घाट परिसरातील तीव्र वळणावर गाडीचे ब्रेकफेल झाल्याने अपघात घडला. एसटी बस चालकाच्या प्रसंगावधातेने नजीकच्या देवगड प्रादेशिक नळपाणी योजनेच्या पाईप लाईनला धडकली व भेंडले माडावर जाऊन नजीकच्या झाळीत अडकली गाडीत सुमारे चाळीस  विद्यार्थी होते. सुदैवाने गाडीतील पाच  विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.


या .अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थ विनोद पेडणेकर उदय परब, महेश कोयघाडी, दर्शन नवलू , समीर लाड यांनी धाव घेतली व अन्य वाहनांना सूचना करून सहकार्य केले. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्याना देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील प्रवासासाठी मार्गस्त झाले.घटनास्थळी स्थानिक आगार प्रमुख श्रीकांत सैतवडेकर, हेड मकेनिक ब्रम्हदेव चव्हाण, पोलिस हवालदार आशिष कदम यांनी धाव घेतली. जय हिंद विद्यालयाची  शैक्षणिक सहल लांजा येथून देवगड कडे आली होती. त्यानंतर कुणकेश्वर मार्गे मालवण कडे जात असताना जामसंडे साक्षी या मार्गावरून कुणकेश्वरकडे जात असताना खाक्षी घाटीमध्ये एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाचे लक्षात येताच त्याने मोठ्याने ओरडून गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे सांगितले व विद्यार्थी शिक्षक यांना सावध केले.

या अपघातात पृथ्वीराज अमोल धाबेकर, (१४), गणेश सिद्धेस्वर भडके(१५), श्रीकृष्ण शीवाजी करंजकर१४), संकेत सुखदेव सुकांडे (१६), प्रतिक,दत्तात्रय शिंदे (१६) याचा समावेश आहे.दरम्यान पुढील प्रवासाकरीता देवगड आगाराने पर्यायी गाडी व बस चालक उपलब्ध करून दिला.

आमदार रोहित पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार गट ) विधीमंडळच्या मुख्य प्रतोदपदी निवड

प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांची घोषणा

पंचवीस वर्षे च्या तरूण आमदाराचा विधिमंडळात घुमणार आवाज

तासगाव ( राहुल कांबळे ) तासगाव - कवठेमहांकाळचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा आमदार रोहित दादा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ही निवड जाहीर केली. या निवडीमुळे देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचा आवाज विधानसभेत घुमणार आहे. अत्यंत तरुण वयात पाटील यांच्यावर मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी टाकल्याने त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे समर्थकांबरोबरच राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पाटील यांनी तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघातून बाजी मारली. या मतदारसंघात स्व. आर. आर. आबा पाटील कुटुंबीयांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी, माजी खासदार संजय पाटील हे त्यांच्या विरोधात उभे होते. राज्याचे लक्ष लागून लागलेला राहिलेल्या या निवडणुकीत रोहित पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांचा २९००० इतक्या मतांनी पराभव केला. देशातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मिळवला. दरम्यान, तासगाव - कवठेमहांकाळमध्ये महाविकास आघाडीचा आमदार झाला असला तरी राज्यात मात्र महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस या तिन्ही पक्षांना मिळून पन्नास उमेदवारही निवडून आणता आले नाहीत. त्यामुळे या विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडून आलेले देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षाने अधिकची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. विधिमंडळातील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी त्यांची आज निवड करण्यात आली आहे. रोहित पाटील हे देशातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत. परंपरागत प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय पाटील यांना चितपट करून त्यांनी विधानसभेत धडाकेबाज 'एन्ट्री' केली आहे. स्व आर. आर.आबा पाटील यांचे चिरंजीव म्हणून राज्यभर त्यांच्या नावाभोवती 'ग्लॅमर' आहेच. मात्र आता देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील यांचा देशभर नावलौकिक होत आहे. अत्यंत नम्र, अभ्यासू, कोणत्याही गोष्टीचा खोलात जाऊन माहिती घेण्याचा स्वभाव, वक्तृत्व कौशल्य, साधी राहणी - उच्च विचारसरणी यामुळे रोहित पाटील यांच्याकडे नेहमीच सर्वांचा 'फोकस' असतो. आता ते राज्याच्या विधानसभेत काम करताना दिसणार आहेत. वय कमी असले तरी अभ्यासू वृत्तीमुळे विधानसभेत ते विरोधी बाकावर बसूनही आपला आवाज घुमवतील, यात शंका नाही. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी गटनेते पदी आमदार जितेंद्र आव्हाड तर रोहित पाटील यांची आज पक्षाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोदपदी ,व प्रतोत पदी माळशिरस चे आमदार उत्तम जानकर यांची निवड केली.आम.रोहित पाटील त्यांच्यावर आता पक्षाने अधिकची जबाबदारी टाकली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तरुण आमदारांना पुढे आणून आगामी काळात त्यांना राज्याचे भविष्य बनविले जात असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.

आमदार रोहित दादा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधीमंडळ मुख्य प्रतोत पदी निवड करण्यात आल्याचे समजताच तासगाव शहरांमध्ये व मतदारसंघांमध्ये फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.