उस्मानाबाद- लोकशाहीत मालकाला नोकराने माहिती दिली पाहिजे असे स्पष्ट मत दिलीप धारूरकर राज्य माहिती आयुक्त औरंगाबाद खंडपीठ यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. माहिती अधिकार कायद्याबाबत कार्यशाळा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि सार्वजनिक प्राधिकरण यांच्या सोयीसाठी राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर उस्मानाबाद येथे आले होते 28 व 29 जानेवारी रोजी प्रत्येकी दीडशे अपिलांची सुनावणी राज्य माहिती आयुक्त यांनी घेतली या सर्व सुनावण्यासाठी अपीलार्थी व जन माहिती अधिकारी तसेच प्रथम अपीलीय अधिकारी यांनी व्यक्तीश: उपस्थित राहून आपली बाजू मांडली. त्यानुषंगाने आयुक्तांनी लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेऊन सर्व द्वितीय अपिलावर आदेश पारित केलेले आहेत. तसेच माहिती अधिकार कायद्याचा प्रभावीपणे वापर केल्यास लोक कल्याणकारी राज्य निर्माण होईल असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी रा. चो. सरवदे उपसचिव राज्य माहिती आयुक्त, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची उपस्थिती होती.
तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रभाकर डोंबाळे
श्रीपतराव भोसले विद्यालयात ‘भागिरिथी युवा महोत्सवास’ उत्साहात प्रारंभ
पहिल्या दिवशी रंगले मैदानी सांघिक खेळ
उस्मानाबाद: येथील श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षी प्रमाणे साजरा होणा-या भागिरिथी युवा महोत्सवाची आज विविध मैदानी खेळांनी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. भागिरिथी युवा महोत्सवाचे हे 3रे वर्ष आहे.
यावेळी कबड्डी, थ्रोबाॅल, रस्सीखेच, खो खो स्पर्धांचे उद्घाटन होऊन कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी खेळांमधील कौशल्य दाखविले. शिक्षकांमधील झालेल्या कबड्डीच्या विशेष सामन्याने सर्वांचे लक्ष वेधले.
यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, मुख्याध्यापक सुधीर पडवळ, उपप्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे, कला विभाग प्रमुख प्रा.नंदकुमार नन्नवरे, पर्यवेक्षक प्रा.तानाजी हाजगुडे, प्रा.अरविंद भगत, प्रा.मेघमाला देशमुख, प्रा.सविता जाधव आणि विद्यालयातील सर्व शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती.
आठवडाभर चालणा-या या महोत्सवात मैदानी स्पर्धांसोबतच वैयक्तिक स्पर्धा, आनंद मेळा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम होऊन इ.12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
आजच्या क्रीडास्पर्धांच्या यशस्वीततेसाठी क्रीडा शिक्षक प्रा.विवेक कापसे, प्रा.मनोज डोलारे, प्रा.रविंद्र माने, अमित लोमटे, प्रा.मोहन शिंदे, प्रा.प्रसाद माशाळकर, प्रा.सचिन तेली यांनी अथक परिश्रम घेतले. या स्पर्धांमध्ये मोठ्या सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.
पळसप येथील ८ वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. दत्ता भगत
उस्मानाबाद दि. २४शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठाण, किसान वाचनालय पळसप व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ फेबुवारी २०२० रोजी ८ वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप ता. जि. उस्मानाबाद येथे संपन्न होणार आहे.संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत यांची निवड करण्यात आली आहे तर संमेलनस्थळास ‘शिक्षणमहर्षी वसंतराव काळे साहित्य नगरी’ नाव देण्यात आले आहे. शिक्षणमहर्षी आ. वसंतराव काळे यांच्या १४ व्या स्मृतीदिना निमित्त संमेलन आयोजन करण्यात आले आहे.
२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०.३० वा. संमेलनाचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंढे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द साहित्यिक आसाराम लोमटे, खासदार
ओमराजे निंबाळकर, मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतिश चव्हाण, उस्मानाबाद विधानसभेचे आमदार कैलास पाटील आदिंची उपस्थिती राहणार आहे. दुपारी १.३० वा. ‘कृषी साक्षरता -काळाजी गरज’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाचे अध्यक्ष स्थान कृषी महाविद्यालय, लातूरचे प्राचार्य डॉ. बी. एम. ठोंबरे भूषविणार आहेत. परिसंवादात कृषी अभ्यासक प्रा. डॉ. उध्दव आळसे, प्रगतशिल शेतकरी नवनाथ कसपटे व राजशेखर पाटील यांचा सहभाग होणार आहे.दुपारी ३.०० वा. कथाकथन होणार आहे. कथाकथनचे अध्यक्षस्थान कळमनुरीचे ज्येष्ठ कथाकार शिलवंत वाढवे भुषविणार आहेत. यामध्ये प्रभाकर शेळके, विवेक गंगणे, नयन राजमाने आदिंचा सहभाग होणार आहे.सायंकाळी ४.०० वा. प्रा. डॉ. वि. रा. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीतांचे कवी संमेलन होणार आहे. सायंकाळी ६.०० वा. संमेलनाध्यक्ष दत्ता भगत यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. डॉ. मथू सावंत, लातूर
ग्रामिण विधान सभेचे आमदार धिरज देशमुख उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८.०० वा. संमेलन स्थळापासून ग्रंथदिंडी निघणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करणार आहेत. संमेलन स्थळी ग्रंथ प्रदर्शन लावण्यात येणार आहे. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी १०.०० वा. जिल्हा ग्रंथालय अधिकारी उस्मानाबादचे अनिल सुर्यवंशी करणार आहेत. चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी १०.१५ वा. सुप्रसिध्द कलावंत मंगेश निपाणीकर करणार आहेत. सुप्रसिध्द व्यंगचित्रकार किशोर शितोळे यांच्या व्यंगचित्र प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. तसेच सौदागर वेबनाळे यांच्या पुरातन नाणी व वस्तूंच्या संग्रहाचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. रात्री ८.०० वा. शिवकुमार मोहेकर यांचा संगित दरबार तसेच वसंतोत्सव सांस्कृतिक मंचचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
तत्पूर्वी १ फेब्रुवारी रोजी नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी व आय. एम. ए. कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबीर होणार आहे. रात्री ८.०० वा. ह. भ. प. प्रा. गोविंद इंगळे महाराज
अहमदपूरकर यांचे किर्तन होणार आहे. तरी मराठवाडयातील साहित्यिक, रसिक, शिक्षक, प्राध्यापक, नागरीक आदिंनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संमेलन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांचा मतदानाचा अधिकार काढला
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकत शेतकर्यांना असलेला अधिकार काढून घेत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पूर्वीप्रमाणेच कार्यकारी सहकारी संस्थांमधून सदस्य निवडणार करण्यात येणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकर्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी २०१७ मध्ये केलेली सुधारणा रद्द करून पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्यास व त्यादृष्टीने अध्यादेश प्रख्यापित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासाठी शेतकर्यांना मतदानाचा अधिकार आहे. यामुळे मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बाजार समित्यांच्या निवडणुकीचा खर्च देखिल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या समित्यांना शासनातर्फे कोणतेही अनुदान दिले जात नाही. केवळ बाजार फी मधून या समित्या आपला खर्च भागवतात. काही बाजार समित्यांच्या निवडणुका वेळीच न घेतल्याने उच्च न्यायालयाने देखील नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शेतकर्यांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमधून निवडलेले-११, ग्रामपंचायत सदस्यांमधून-४, अशा एकूण १५ शेतकरी प्रतिनिधींची निवड करण्याची तरतूद कायम ठेवण्यात येईल. २०१७ मध्ये बाजार क्षेत्रात राहणार्या किमान १० आर इतकी जमीन धारण करणार्या आणि बाजार समितीमध्ये आपल्या कृषी उत्पन्नाची विक्री करणार्या शेतकर्याला मतदानाचा अधिकार देण्याची सुधारणा करण्यात आली होती. ती आता अध्यादेशाद्वारे रद्द करण्यात येईल.






















































