Home Blog Page 303

2020 हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान हमीभावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत 2020 या वर्षाच्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान हमीभावाला मंजुरी देण्यात आली.
सर्वसाधारण दर्जाच्या वाटी खोबऱ्याची किमान आधारभूत किंमत प्रति क़्विटल 9,521 वरून 9,960 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर संपूर्ण खोबरे डोलची किंमत प्रति क़्विटल . 9,920 वरुन 10,300 रुपये एवढी केली आहे. यामुळे खोबरे उत्पादकांना वाटी खोबऱ्यावर  क़्विटलमागे 439 रुपये तर खोबरेडोलावर क़्विटलमागे 380 रुपयांचा लाभ होणार आहे.
देशभरात तयार होणाऱ्या खोबऱ्याचा सरासरी उत्पादन खर्च लक्षात घेऊन वाटी खोबऱ्याच्या उत्पादनातील 50 टक्के खर्च आणि खोबरे डोल उत्पादनातील 55 टक्के खर्च भरून निघावा, या उद्देशाने हा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.
कृषी उत्पादने खर्च आणि किंमत आयोगाच्या (CACP). शिफारशींवर आधारित हा हमीभाव देण्यात आला आहे.
देशातील कृषी उत्पादनांच्या खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या तत्वावर हा हमीभाव वाढवण्यात आला आहे.
खोबरे उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

दैनिक जनमत १४ मार्च E पेपर

दैनिक जनमत १३ मार्च E पेपर

पुणे-उस्मानाबाद-लातूर इंटरसिटी सुरू करावी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची लोकसभेत मागणी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांच्या मागणीनुसार २०१४

साली घोषीत केलेल्या उस्मानाबाद- तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाईनच्या कामास गती मिळण्यासाठी एक नोडल अधिकारी नेमुन संबधित रेल्वे विभागास रेल्वे लाईनचे काम जलदगतीने करावे यासाठी सुचना देण्यात याव्यात, उस्मानाबाद जिल्हयातून धावणारी लातूर-मुंबई अशी एकच रेल्वे गाडी आहे. लातूर जिल्हयातूनच सदरची रेल्वेगाडी प्रवाशांनी पुर्णपणे भरून येते त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील प्रवाशांना जागा उपलब्ध होत नाही. मोठया प्रमाणात प्रवाशांची संख्या असताना देखिल पुणे किंवा मुंबईला ये-जा करण्यासाठी रेल्वेगाडया मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे रेल्वेच्या अर्थसंकल्पीय चर्चेच्या माध्यमातून संसदेत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पुणे उस्मानाबाद लातूर इंटरसिटी सुरू करावी अशी मागणी मा. रेल्वे राज्यमंत्री यांना केली. त्याचप्रमाणे कळंब रोड स्टेशन किंवा ढोकी स्टेशन रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडयांना थांबा देण्यात यावा अशी देखील यावेळी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे उस्मानाबाद ​रेल्वे स्थानकावर रॅक पाईंट उपलब्ध असून प्लॅटफॉर्म व आवश्यक शेड उपलब्ध करून देण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वेच्या अर्थसंकल्पीय चर्चेच्या माध्यमातून संसदेत मांडल्या.

कोविड-19 आजाराचे नवीन रुग्ण सापडले

 नवी दिल्ली:- देशभरात कोविड-19 आजाराचे आतापर्यंत एकूण 43 रुग्ण सापडले आहेत. त्यातले 40 रुग्ण उपचाराधीन असून, त्यात केरळमधल्या 3 घरी पाठविलेल्या रुग्णांचा समावेश आहे. कालच्या बातमीनंतर आतापर्यंत 4 नवीन रुग्ण सापडले असून, त्यात एक रुग्‍ण केरळ (एर्नाकुलम), एक दिल्ली, एक उत्तर प्रदेश आणि एक रुग्ण जम्मूमध्ये आढळला आहे.
काल आढळलेल्या केरळमधल्या 5 रुग्णांपैकी 3 जण एकाच कुटुंबातील असून, ते नुकतेच इटलीहून परतले होते. उरलेले 2 रुग्ण त्यांचेच नातेवाईक असून, ते या बाधित कुटुंबियांना भेटले होते. बाधित कुटुंबियांनी इटलीहून परतल्यानंतर काही नातेवाईकांना भेट दिली होती आणि काही समारंभांनाही हजेरी लावली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व जणांना शोधून त्यांची चाचणी करण्याचे काम सध्या सुरु आहे.
देशभरातून एकूण 3003 नमुन्यांची कोविड-19 साठी चाचणी करण्यात आली होती, त्यातील 2,694 नमुने विषाणूमुक्त असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे एकूण 43 नमुनेच विषाणूबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत परेदशातून आलेल्या एकूण 8 लाख 74 हजार 708 प्रवाशांची विषाणू चाचणी विमानतळांवरच करण्यात आली असून, त्यातील 1 हजार 921 प्रवाशांमध्ये विषाणूंची लक्षणे दिसून आली होती. त्यातील 177 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 33 हजार 599 प्रवासी निरीक्षणाखाली असून, 21 हजार 867 प्रवाशांचा निरिक्षण कालावधी पूर्ण झाला आहे.
परदेशातून प्रवास करुन आलेल्या प्रवाशांनी त्यांना भरण्यासाठी दिलेल्या स्व-घोषणा (self-declaration) पत्रिका योग्य रीतीने भराव्यात, तसेच आपण कोणकोणत्या ठिकाणांना भेट देऊन आलो आहोत, त्याची पूर्ण माहिती अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन शासनाने केले आहे.
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद इथल्या रुग्णाची कोविड-19 साठी केलेली चाचणी नकारात्मक आली आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत कोविड-19 आजाराने एकही मृत्यू झाला नसल्याचे विशेष आरोग्य सचिवांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन कोविड-19 बद्दलच्या चालू परिस्थितीचा, केलेल्या कार्यवाहीचा आणि राज्यांच्या याबद्दलच्या तयारीचा आढावा सतत घेत आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव याबद्दलच्या परिस्थितीचा आढावा राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांबरोबर सतत घेत आहेत.
आरोग्‍य मंत्रालयाने जनतेला आवाहन केले आहे, की या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व उपाययोजनांचा, खोकतांना घेण्याच्या काळजीचा आणि हात वारंवार धुण्याच्या सवयीचा अवलंब करावा, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

उस्मानाबाद कळंब मतदारसंघात रस्त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीतून 26 कोटी रूपयाचा निधी मंजुर- आ . कैलास पाटील




उस्मानाबाद —कळंब विधानसभा मतदार संघातील 10 रस्त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत 2020—21 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून 26 कोटी रूपयाचा निधी मंजुर झाल्याची माहिती आ. कैलास पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली

उस्मानाबाद —कळंब विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या मंजुरीसाठी सततच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने 2020—21 च्या अर्थसंकल्पात खालील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळून निधी प्राप्त झाला आहे.
1. देवधानोरा एकुरगा शिराढोण रस्त्याची सुधारणा करणे (प्रजिमा. 18) 3 कोटी 10 लक्ष
2. पिंपळगाव गोजवडा बावी परतापूर तडवळा रस्त्याची सुधारणा करणे (प्रजिमा. 14) 2 कोटी 50 लक्ष
3. मांडवा गोविंदपूर वाटवडा रस्त्याची सुधारणा करणे (रामा 57) 5 कोटी 
4. शिक्षक कॉलनी ते रेल्वे स्टेशन रस्त्याची सुधारणा करणे 5 कोटी
5. बावी खामसवाडी केशेगाव बावी ते खामसवाडी रस्त्याची सुधारणा करणे – 1 कोटी
6. मुरूड ते जागजी रस्त्याची सुधारणा करणे – 2 कोटी 50 लक्ष
7. जागजी ते कोंड रस्त्याची सुधारणा करणे -1 कोटी 10 लक्ष
8. चिलवडी ते राघूचीवाडी रस्त्याची सुधारणा करणे- 1 कोटी 60 लक्ष
9. खेड खामगाव तडवळा रस्त्याची सुधारणा करणे (प्रजिमा 25) 1 कोटी 20 लक्ष
10. कावळेवाडी बुकनवाडी मोहतरवाडी रस्त्याची सुधारणा करणे (प्रजिमा 35) 3 कोटी

एक्स-ट्रिम फिटनेसकडून स्त्री कर्तृत्वाचा सन्मान..

उस्मानाबाद : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आणि पुढील पिढीसमोर आदर्श ठेवणा-या कर्तृत्ववान स्रीयांचा सन्मान एक्स-ट्रिम फिटनेस कडून करण्यात आला.
या कार्यक्रमात महिला व विद्यार्थ्यीनींच्या समस्या निराकरणासाठी आयुष्यभर कार्य केलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक माया दामोदरे (पानसे), सामान्य मुलगी ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खो खो संघाला अनेक वेळा सुवर्ण पदक मिळवून देणारी कर्णधार क्रीडाधिकारी सारिका काळे, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात रंगावलीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या शुभदा पंडित, अल्पकाळातच वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवणा-या डाॅ.प्रियंका चौरे, मागील दोन वर्षांपासून एक्स-ट्रिम फिटनेसच्या माध्यमातून महिलांना फिटनेसचे धडे देण्या-या मानसी डोलारे यांचा सत्कार जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. इंजिनियरींग पदवी घेवून अध्यापन करत करत राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणा-या जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांचाही विशेष सत्कार एक्स-ट्रिम तर्फे करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना अस्मिता कांबळे यांनी महिलांनी शरिराबरोबरच मनानेही कणखर असले पाहिजे असे प्रतिपादन केले. माया पानसे यांनी महिलांनी नाती तोडण्यापेक्षा ती जोडायला शिकले पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या. तर शुभदा पंडित यांनी आयुष्यात कलेला किती महत्त्व आहे हे सांगितले.
याच कार्यक्रमात डाॅ.प्रियंका चौरे यांचा महिलांतील स्थूलपणा, विविध आजार, पोषण आहार आणि व्यायाम या विषयावर मार्गदर्शनपर संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना डाॅ.प्रियंका यांनी दैनंदिन जीवनातील आहार आणि व्यायामामाचे महत्त्व अतिशय सोप्या शब्दात सांगितले. महिलांना होणारे विविध आजार त्या मागची कारणे आणि उपायही त्यांनी सांगितले. त्वचारोग, केसांशी संबंधित समस्या आणि विशेष करून सध्या धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरस विषयी त्यांनी माहिती दिली.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एक्स-ट्रिमच्या संचालिका मानसी डोलारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सरोज देवकुळे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी शहर व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शबाना शेख, संगीता पाठक, प्रियंका पवार, रंजना पेठे आदींनी परिश्रम घेतले.