उस्मानाबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पूर्व सूचना न देता उस्मानाबाद आगाराने बस सेवा बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
एस टी बस सेवा ही अत्यावश्यक सेवे पैकी एक आहे. ही सेवा अचानक बंद केल्याने महत्वाच्या कामानिमित्त उस्मानाबाद शहरात आलेल्यांचे मोठे हाल झाले. उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी २० मार्च रोजी जिल्हा बंद चे आदेश दिले होते त्यात बस सेवा बंद करण्याचे आदेश दिले नव्हते तरी देखील बस सेवा बंद करण्यात आल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उस्मानाबाद हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने तसेच मुंबई पुणे या ठिकाणाहून काही नागरिक गावाकडे येत आहे त्यांना गावी जाण्यासाठी एकमेव बस सेवेचा आधार आहे.
याबाबत परिवहन विभागाचे अधिकारी शिंदे यांना विचारले असता, याबाबत परिवहन विभागाकडून कुठले आदेश आले नाहीत मात्र गर्दी कमी असल्याने आम्ही गाड्या रद्द केल्या आहेत. प्रवासी आल्यास त्यांच्यासाठी बस सोडण्यात येईल, तसेच उद्या दि २३ रोजी बस सेवा पूर्णपणे बंद असल्याचे सांगितले.
लाल परीची सेवा अचानक बंद, प्रवाशांचे हाल
उस्मानाबाद शहरात आता १२ हॅण्ड वॉश पॉइंट्स – नगराध्यक्ष राजेनिंबाळकर
उस्मानाबाद – कोरोना व्हायरस चा मुकाबला करण्यासाठी उस्मानाबाद नगरपालिका पुढे सरसावली आहे. नागरिकांना वैयक्तिक स्वछता राखता यावी यासाठी शहरात आता १२ हॅण्ड वॉश पॉइंट्स ठरवण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी दिली.
उस्मानाबाद शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे मोठी बाजारपेठ व सर्व सरकारी कार्यालये आहेत यामुळे शहरामध्ये होणारी मोठी गर्दी लक्षात घेता कोरोना व्हायरस च्या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उस्मानाबाद मध्ये येणारे प्रवासी तसेच शहरातील स्थायी नागरिक यांचे हात धुण्यासाठी एकूण बारा ठिकाणे उपलब्ध करणार असा उत्कृष्ठ व लोकोपयोगी निर्णय उस्मानाबाद नगर परिषद व नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी घेतला.
हात धुण्याची बारा ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत.
नगर परिषद उस्मानाबाद, बस स्टँड, तुळाजा भवाणी शॉपिंग सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय मध्यवर्ती इमारत (सेंट्रल बिल्डिंग), आरक्षण क्र.73, देशपांडे नाका भाजी मंडई, नेहरू चौक , साठे चौक बाजार मैदान, बार्शी नाका,दर्गा देवस्थान समोर या पैकी कोणत्याही ठिकाणी गेल्यावर आपण आपले हात स्वच्छ धुवून घ्यावेत असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.
तो कोरोनाचा रूग्ण नाही; यंत्रणेची बेफिकीरी उघड पुण्याहून आल्याने गावकर्यांनी तपासणीची केली जबरदस्ती
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संशयित रूग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र तो रूग्ण कोरोनाचा नसल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांनी दैनिक जनमतशी बोलताना सांगीतले.
याबाबत माहिती अशी की, हा रूग्ण गेल्या काही दिवसात पिंपरी चिंचवड येथे कामानिमीत्त नातेवाईकांकडे गेला होता.समुद्रवाणी येथे गावी परतल्यानंतर केवळ ती व्यक्ती पिंपरी चिंचवड आणि पुणे येथून प्रवास करून आल्याने त्यांना समुद्रवाणी येथील आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेले असता डॉक्टरांनी उस्मानाबाद येथे त्यांना पाठवले. मात्र उस्मानाबाद येथे जिल्हा रूग्णालयात कोरोना वार्डच बंद असल्याने त्यांना काही काळ ताटकाळत उभे रहावे लागले. यातून जिल्हा आरोग्य यंत्रणेची बेफिकीरी दिसून आली. केवळ ढिसाळ यंत्रणेमुळे त्या रूग्णाला ताटकाळत उभे रहावे लागले अशी चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला होता त्यात त्यांना यंत्रणा सज्ज असल्याचे सांगीतले गेले . तसेच आज पालकमंत्री शंकरराव गडाख यांनीही आढवा घेतला त्यांनाही यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र एका आलेल्या रूग्णाने शासकीय यंत्रणेचा कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार उघड केला आहे. मात्र अनाहुतपणे घडलेले हे मॉक ड्रील जिल्हा यंत्रणेला धडा शिकवून जाणारे आहे. त्या रूग्णाची तातडीने तपासणी न करणार्या डॉक्टरांवर काय कारवाई होते हे आता पहावे लागणार आहे. खरच त्या व्यक्तीला जबरदस्तीने दवाखान्यात पाठवण्यात आले आहे का याची माहिती समुद्रवाणी येथील जबाबदार नागरीकांना विचारली असता त्यांनी ते काल पुण्याहून आले आहेत. थोडीशी सर्दी आणि खोकला त्यांना होता मात्र तपासणीसाठी तयार नसल्याने त्यांचे शेजारी आणि नातेवाईकांनी दवाखान्यात पाठवले आहे असे गावकर्यांनी सांगीतले. तसेच त्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसताना समुद्रावानी येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णाला उस्मानाबाद येथे का पाठवले असा प्रश्न विचारला जात आहे.
ती व्यक्ती ठिकठाक- जिल्हा शल्यचिकीत्सक
समुद्रवाणी येथून आलेली व्यक्ती ठिकठाक असून त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीच लक्षणे नाहीत. ते पिंपरी चिंचवड येथून प्रवास करून आल्याने त्यांना नातेवाईकांनी जबरदस्तीने दवाखान्यात पाठवले होते. त्यांची तपासणी केली आहे. कोरोनाची कोणतीच लक्षणे न आढळल्याने त्यांना गावी पाठण्यात येणार आहे. लक्षणे नसल्याने विलगीकरण कक्षात ठेवण्याची गरज नसल्याचे तसेच आरोग्य यंत्रणेने तपासणीसाठी कुचराई न केल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांनी सांगीतले.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती
मुंबई, दि. 14: राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात परीक्षा सुरू राहतील. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरू राहतील. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. दरम्यान, राज्यात कोरोनाचे 26 रुग्ण आढळून आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यासंदर्भात निवेदन करतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने वेळीच हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस प्रशासन यांना राज्य शासनाने सूचना निर्गमीत केल्या आहेत.
राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याकाळात मंडळ परिक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट करताना परिक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे.
राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायीक, यात्रा, धार्मीक, क्रिडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत 26 रुग्ण आढळून आले असून पुणे येथे 10, मुंबई 5, रायगड 1, कल्याण 1, अहमदनगर 1, नागपूर 4, ठाणे 1, यवतमाळ 2, कल्याण 1 रुग्ण आढळून आले आहेत.





























































