नियंत्रक मॅडम जरा जपून…. पोलीस सुरक्षेची आवश्यकता
उस्मानाबाद – आज सरकारने एस टी कर्मचाऱ्यांना दिलेल्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस. यासाठी विभागीय नियंत्रक कार्यालयात कर्मचारी सुनावणीसाठी येत आहेत मात्र यासोबत काही कर्मचारी ‘टुल्ल’ होऊन येत असल्याने विभागीय नियंत्रक आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना सुरक्षेची आवश्यकता आहे.
आज सकाळी पत्रकार वार्तांकनासाठी गेले असता त्यांना काही कर्मचाऱ्यांमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षेची आवश्यकता आहेच मात्र कोणी कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आहेत का याची तपासणी करण्यासाठी वेगळ्या यंत्रणेची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यातील काही कर्मचाऱ्यांनी मद्य प्राशन केल्याची चर्चा आहे. उस्मानाबाद विभागीय नियंत्रक कार्यालयात तसा गोंधळ होऊ द्यायचा नसेल तर वेळीच खबरदारी घ्यावी लागेल. टल्ली होऊन येणारे आणि ज्यांना गोंधळ घालायचा आहे अश्या कर्मचाऱ्यांबाबत दैनिक जनमत ने विभाग नियंत्रकांना कळवले आहे. पोलीस प्रशासनाने देखील याची काळजी घ्यावी यासाठी आहे ‘वृत्तप्रपंच’.
चोराखळी नजिक अपघात दोघांचा मृत्यू
उस्मानाबाद – कळंब तालुक्यातील चोराखळी नजिक राष्ट्रीय महामार्ग वर झालेल्या विचित्र अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ७ जणांना उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा (ता.वाशी) येथील गोळे कुटुंबातील सदस्य लग्न समारंभासाठी सकाळी उस्मानाबादकडे येत होते. त्याचवेळी उस्मानाबाद येथून परंड्याकडे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पथक अनुज्ञप्ती नोंदणीच्या शिबिरासाठी जात होते. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडगाव (ज) गावाजवळ अचानक रस्त्यात जनावर आडवे आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून आरटीओ कार्यालयाची जीप (एमएच 06 -एडब्ल्यू रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध मार्गावर आली. त्याचवेळी समोरुन येणार्या कारला जीपची जोराची धडक लागली. या अपघातात निर्मला सुरेश गोळे (65) ही वृद्ध महिला जागीच ठार झाली. तर एसटी महामंडळाचे नियंत्रक बाळासाहेब काळे (वय45) यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक श्रीकांत शिंदे, सहायक मोटार वाहन निरीक्षक कुणाल होले, संगणक चालक सुनील पडवळ, एसटी महामंडळाचे नियंत्रक अनंत आदमाने (40), तेरखेडा येथील धीरज गोळे (25), शिवप्रसाद धीरज गोळे (1.5 वर्ष), वृषाली धीरज गोळे (24), चंद्रकला सदाशिव गोळे (70), प्रकाश सदाशिव गोळे (45) हे गंभीर जखमी झाले. प्रकृती चिंताजनक असलेल्या दोघांना उस्मानाबाद शहरातील इतर खासगी रुग्णालयात तर दोघांना सोलापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
जयंतीचे बॅनर फाडल्याने काजळा गावात तणावपूर्ण शांतता
उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले असल्याने गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. हा बॅनर अंदाजे बाराच्या नंतर फाडले आहे सकाळी समाज बांधवांनी हा प्रकार बघितला असता त्यांनी बिट अंमलदार कट्टे यांना सकाळी आठ वाजता फोन करून या घटनेची माहिती दिली. सकाळपासून गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यांनी याची पाहणी केली असून पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे








































































