Home Blog Page 158

विकासकामांना आडकाठी आणण्याच्या मनसुब्याला न्यायालयाकडून चपराक!

 

भुयारी गटार योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात – विकलांग मानसिकतेला मतदार थारा देणार नाहीत
माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची पत्रकार परिषद
उस्मानाबाद –
उस्मानाबाद नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भुयारी गटार योजना आणि रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात सुमारे 300 कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यामुळे या कामांचे श्रेय शिवसेनेला मिळू नये म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील व त्यांच्या बगलबच्चांनी सतत विकासकामात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या तब्बल पाच याचिकांवर न्यायाधीशांनी निकाल देत विकासकामात खोडा घालणार्‍यांना चपराक दिली आहे.  नुकतेच 6 मे रोजीच्या निकालात याचिकाकर्ते अभय इंगळे यांनी न्यायालयात याचिकेसाठी जमा केलेले एक लाख रुपयाचे डिपॉझिट देखील जप्त करण्यात आले आहे. त्यांच्या विकलांग मानसिकतेला जनता थारा देणार नाही, असे नमूद करत यांनी विरोधकांवर पत्रकार परिषदेत निशाणा साधला.
उस्मानाबाद शहरातील भुयारी गटार योजनेच्या संदर्भात विरोधकांकडून सातत्याने न्यायालयात याचिका दाखल करुन विकासकांना अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असताना उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आज (दि.7.05.2022) रोजी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा समाचार घेतला.  यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, सोमनाथ गुरव, श्याम कुलकर्णी, हनुमंत देवकते उपस्थित होते.
  उस्मानाबाद(धाराशिव) शहराच्या विकासासाठी महत्वाकांक्षी भुयारी गटार योजनेसाठी आम्ही विविध पातळ्यांवर सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. विकासकामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री.आदित्यजी ठाकरे , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री शंकररावजी गडाख , माजी मंत्री आमदार प्रा.तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब,  आमदार कैलास पाटील  यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. भुयारी गटारीचे काम आगामी दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आखले होते. परंतु विरोधकांनी केवळ विरोध म्हणून भुयारी गटार योजनेविरोधात सतत न्यायालयात याचिका दाखल करुन खोडा घालण्याचा प्रयत्न केला. वास्तविक विकासकामामध्ये अनियमितता, भ्रष्टाचार झाला असेल तर खुशाल न्यायालयात दाद मागावी. परंतु विरोधासाठी तुम्ही प्रत्येकवेळी याचिका दाखल करत असाल तर जनतेला देखील हे कळून चुकले आहे. उच्च न्यायालयाने देखील या प्रकरणात ‘दुध का दुध आणि पानी का पानी’ प्रमाणे निकाल देत राणा पाटील आणि त्यांच्या बगलबच्चांचे मनसुबे उधळून लावले आहेत. त्यामुळे आता भुयारी गटार योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. 
तब्बल पाच वेळा याचिका!
भुयारी गटार योजनेच्या कामात अभय इंगळे, उदय निंबाळकर आणि कामाचा ठेका न मिळालेल्या ठेकेदाराला हाताशी धरून अशा वेगवेगळ्या पाच याचिका उच्च न्यायालयात दाखल झालेल्या होत्या. या सर्वच याचिकांमध्ये नगर परिषदेच्या बाजूने निकाल दिला. जनहिताची याचिका असल्याचे भासवून विकासकामात खोडा घातला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कठोर शब्दात सुनावले होते. तसेच त्यांना याचिकेसाठी भरणा करण्यास सांगितलेले एक लाख रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत. 
जनतेला त्रास होतो याचे भान ठेवा
राणा पाटील आणि त्यांचे विकलांग मानसिकता असलेल्या बगलबच्च्यांकडून सातत्याने विकासकामांना आडकाठी आणण्याचा प्रयत्न नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आल्यापासून मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तुम्ही आडकाठी आणता, मात्र विकासकामे खोळंबून जात असल्यामुळे जनतेला याचा त्रास होतोय, याचे भान आतातरी ठेवावे, असे खडे बोल  यावेळी विरोधकांना सुनावले.
शहराचे किती नुकसान केलेत याचे उत्तर द्या
जनहिताचे निर्णय आम्ही घेत असल्याचा कांगावा करणार्‍या विरोधकांमुळे भुयारी गटार योजनेच्या कामात सतत अडथळे आणल्यामुळे योजनेचे मूल्य वाढत गेले. त्याचबरोबर योजनेच्या कामाला सुरुवात होण्यास देखील चार ते पाच महिन्यांचा विलंब झाला. योजनेच्या कामापाठोपाठ शहरात साठ ते सत्तर कोटी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे देखील झाली असती. परंतु सर्व कामे खोळंबली. तुमच्या आडकाठीमुळे शहराचे किती नुकसान झाले आहे, याचेही उत्तर द्यावे. नाहीतर जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे   विरोधकांना आव्हान दिले आहे.


दैनिक जनमत ०७ मे २०२२ E paper

दैनिक जनमत ०६ मे २०२२ E paper

उस्मानाबाद-तुळजापुर-सोलापुर रेल्वेसंदर्भात परिवहन मंत्र्याची बैठक

 


राज्य हिश्याबाबचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवण्याच्या सुचना  – आमदार कैलास घाडगे-पाटील यांची माहिती 


उस्मानाबाद-तुळजापुर-सोलापुर रेल्वे मार्गाच्या निधीसंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली, एकुण निधीपैकी राज्याने पन्नास टक्के वाटा उचलण्याबाबत तसा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवण्याच्या सुचना परिवहनमंत्री श्री.परब यानी दिल्याची माहिती आमदार कैलास घाडगे-पाटील यानी दिली.

परिवहनमंत्री श्री.परब यानी बोलावलेल्या बैठकीला रेल्वेचे मुख्य अभियंता सुधीर पटेल,परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,सहसचिव राजेंद्र होळकर यांची उपस्थिती होती.

मंजुर असलेल्या महत्वाच्या रेल्वेमार्गाबाबत निधीच्या बाबतीत मोठ्या अडचणी येत असल्याने याबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक बोलाविण्याची मागणी आमदार घाडगे पाटील यांनी परिवहनमंत्री श्री.परब यांच्याकडे केली होती.त्यानुसार बैठक आयोजीत करण्यात आली,बैठकीच्या माध्यमातुन अनेक गोष्टीसमोर आल्या आहेत,त्यामुळे भविष्यात काय कार्यवाही करायची याबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सचिव यांनी उस्मानाबाद-तुळजापुर-सोलापुर रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारच्यावतीने आठ जानेवारी 2019 रोजी पन्नास टक्के वाटा उचलण्याबाबत रेल्वे विभागाला पत्र दिले होते.हा प्रकल्प 904 कोटीचा असुन राज्याने त्यातील पन्नास टक्के वाटा उचलण्याची तयारी त्या पत्राद्वारे दाखविली होती.मात्र नंतर जी कार्यवाही करणे अपेक्षित होते ते काहीच झाले नाही.पत्र दिल्यानंतर मंत्रीमंडळासमोर हा विषय येणे अत्यावश्यक होते,त्याला मंत्रीमंडळाची मंजुरी देखील गरजेची होती.तसे काहीच न झाल्याने निधीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.त्यातही केंद्र सरकारने रेल्वेमार्ग जाहीर केल्यानंतरही घोषीत होणाऱ्या सलग तीन अर्थसंकल्पात केंद्राची आर्थिक तरतुद शंभर टक्के दाखविली असल्याची बाब या बैठकीत समोर आली. नुकत्याच झालेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पामध्ये केंद्राने त्यात दुरुस्ती केली असुन केंद्राचा पन्नास टक्केच वाटा दाखवला आहे. यापुढे हा रेल्वेमार्ग अधिक गतीने पुर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याबाबत सदरील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. रेल्वे विभागाकडून सविस्तर प्रस्ताव घेऊन राज्य परिवहन विभागाने वित्त विभागाची मान्यता घेऊन  सदर प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीसमोर ठेवण्याच्या सुचना मंत्री महोदयांनी दिल्या आहेत. सद्यस्थितीला वस्तुस्थिती समोर आली असुन यामध्ये कोणाची चुक? कोण बरोबर? यामध्ये न पडता राज्यशासनाने हा रेल्वेमार्ग सूरु करण्यासाठी पाऊले उचलली असल्याचे समाधान आमदार घाडगे-पाटील यांनी व्यक्त केले आहे. पुढील काळात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास आमदार घाडगे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.

गोआयबीबो ला ग्राहक आयोगाचा दणका



उस्मानाबाद –

जिल्हा ग्राहक आयोगाने  हवाई सेवेचे तिकीट आरक्षित करणाऱ्या गोआयबीबो या कंपनीला दंड केला आहे.

कोरोना काळात उस्मानाबाद येथील रहिवाशी असलेले एका व्यक्तींनी गोआयबीबो  ॲपवरून दि.१३ मार्च २०२० रोजी इंडिगो एअर लाईन्स या विमान कंपनीची पुणे ते दिल्ली अशी एकूण ८ जणांची जाण्याची व येण्याची दि.२० एप्रिल २०२० रोजीची तिकीटे बुक केली होती.

कोरोना काळात शासनाने आपत्ती घोषित करून सर्व देशात टाळेबंदी केली होती त्या कारणाने सर्व विमान उड्डाणे रद्द केली होती गोआयबीबो व इंडिगो एअर लाईन्स यांनी तक्रारकर्ताच्या तिकीटाची रक्कम तात्काळ जमा केली नाही त्यामुळे तक्रारकर्तांनी वेळोवळी या वरील दोन्ही कंपन्यांकडे तिकीटाची रक्कम जमा करण्याची विनंती केली होती मात्र गोआयबीबोने तक्रारकर्ता यांच्या खातेदार वालेट मध्ये दि ७ ऑक्टोबर २०२० रोजी ४४२२४ हजार रूपये जमा केली तक्रारकर्तांनी वरील दोन्ही कंपनीच्या कस्टमर केअर शी संपर्क करून तिकीटाची रक्कम ही बचत खात्यावर जमा करावी अशी विनंती केली पण गोआयबीबो व इंडिगो एअर लाईन्स यांनी ४४२२४ रूपयांपैकी ३६८० रूपये हि कनव्हीनियंस फीस कपात करण्यात आल्याचे कळविले व उर्वरित रक्कम देखील तक्रारकर्ताच्या खात्यावर जमा करायला नकार दिला व सदरील रकमेचा विनियोग देखील गोआयबीबो यांच्या मार्फत पुढील प्रवासकरिता तिकीटाचे बुकींग करून करावा लागेल असा निर्बंध घालण्यात आला. तक्रारकर्तांनी वरील दोन्ही कंपन्यांस ई-मेल करून बुकींग केलेली रक्कम  व्याजसह मिळावी याची विनंती केली पण त्यांनी ती रक्कम त्यांना अदा केली नाही  त्यामुळे तक्रारकर्तांनी ग्राहक मंच आयोगासमोर तक्रार दाखल केली.गोआयबीबो यांना तक्रारकर्तांनी ई-मेल द्वारे नोटीसची बजावणी करूनही गोआयबीबो हे आयोगासमोर उपस्थित झाले नाहीत त्यामुळे गोआयबीबो यांचे विरुद्ध एकतर्फा आदेश पारीत करण्यात. या आदेशात तिकीटाची संपूर्ण रक्कम व मानसिक व शारीरिक त्रास तक्रार अर्जाच्या खर्चापोटी ५००० रुपये देण्यात यावेत असे आदेश दिले आहेत.  तक्रारदार यांच्याकडून ॲड मनीष शहाणे यांनी काम पाहिले त्यांना ॲड. अमर चव्हाण, ॲड हर्षद देशमुख यांचे सहकार्य लाभले.


राष्ट्रवादी महिला काँग्रेस लातूर विभागाच्या अध्यक्ष पदी वैशाली मोटे यांची निवड

 

उस्मानाबाद – राष्ट्रवादी महिला काँग्रेस लातूर विभागच्या अध्यक्ष पदी वैशाली मोटे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. फौजिया खान आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी ही घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस ची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि पक्ष तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी या निवडी केल्या असल्याचे डॉ. फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तेरणा बचाव संघर्ष समितीचा सामूहिक आत्मदहनचा इशारा

 


उस्मानाबाद – तेरणा लवकरात लवकर सुरू व्हावा या मागणीसाठी तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की, सन २०१२ ते २०२२ गेल्या १० वर्षीपासून तेरणा कारखाना बंद आहे २०२१ ला तेरणा बचाव संघर्ष समितीने आंदोलन केले होते जिल्हा मध्यवर्ती बँकेने मार्ग काढून २५ नोव्हेंबर २०२१ हा कारखाना भाडेतत्त्वावर दिला होता पण २१ शुगर्स लातूर व भैरवनाथ शुगर सोनारी यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले गेल्या ६ महिन्यांपासून हे प्रकरण या न्यायालयातून त्या न्यायालयात चालू आहे तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या दोन संस्थांमध्ये  मध्ये तडजोड करून तेरणा चालू करावा व तेरणा परिसरातील शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबावी अन्यथा ४ जून रोजी तेरणा साखर कारखान्यासमोर शेतकरी व कर्मचारी आत्मदहन करणार आहेत या निवेदनावर अनिल कोकाटे, सुनिल समुद्रे,शहाजी शिंदे, श्रीकांत परीट,बबलू सिरसिर, शशिकांत देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



ईट येथे वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने वीजपुरवठा; युवा सेनेचा रास्ता रोकोचा इशारा

 


ईट(प्रतिनिधी) ईट येथील वीज वितरण कंपनीच्या शाखेकडून ईटसह परिसरात कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. तसेच वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित पण होतो . तसेच लोडशेडिंग यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना निवेदन देण्यात आले असून हे प्रकार असेच सुरू राहिल्यास दिनांक चार मे रोजी जातेगाव -भुम रोड वर नागेवाडी चौकांमध्ये युवा सेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन युवा सेना तालुका प्रमुख निलेश चव्हाण तसेच प्रविण देशमुख ,राकेश भोसले आदींनी दिलेल आहे.  दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की  विद्युत पुरवठा कमी चालत असल्याने फॅन कुलर चालत नाहीत . यामुळे याचा विशेष करून  त्रास लहान बालकांना व वयोवृद्ध नागरिकांना होत आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे कामकाज ही  कमी दाबाने चालणारे विजेमुळे  बंद पडत आहे .यामुळे या परिसरातील नागरिकांना आर्थिक ही त्रास सहन करावा लागत आहे. तरी विद्युत पुरवठा याबाबत नागरिकांच्या अडचणी दूर करण्यात याव्यात अन्यथा युवा सेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.