Home Blog Page 153

सलगरा प्राथमिक आरोग्य केंद्राला झेडपी च्या सीईओंची भेट ; तीन तास तळ ठोकून घेतली झाडाझडती


सलगरा,दि.२५(प्रतिनिधी) – 

बुधवारी सकाळी अचानक प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ११ वा.सु. अचानक भेट दिली. त्या मुळे सगळ्यांची चांगलीच धांदल उडाली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑपरेशन थिएटर वापरायोग्य असतानासुद्धा वर्षभरापासून बंद असल्याचे गुप्ता यांच्या पाहणीत समोर आले. संबंधितांना फैलावर घेत लवकरात लवकर त्याचे निर्जंतुकीकरण करून पंधरा दिवसात पुन्हा ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचे आदेश त्यावेळी तेथील आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. प्रसुतीचे प्रमाण हे फारसे समाधानकारक नसल्याचे नमूद करीत हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. या वेळी गुप्ता यांनी जवळपास तीन तास आरोग्य केंद्राची झाडाझडती घेतली. या मध्ये पहिल्या आस्थापनांची तपासणी केली, त्यात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तिका अद्यावत नसल्याचे समोर आले. तेव्हा संबंधित कर्मचाऱ्यांना त्या सेवा पुस्तिका अद्यावत करण्याचे आदेश दिले. 

त्याचबरोबर तेथील निवासी इमारतीत वीज कनेक्शन ची अडचण असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. त्या नंतर माता व बाल संगोपन राष्ट्रीय कार्यक्रम चांगले सुरू असून शासनाच्या आदेशाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना दिली. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले विशेष म्हणजे आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यीका रेनके यांनी अचानक भेट देऊन पण या वेळी चांगल्या प्रकारचे प्रेझेंटेशन दिले त्या बद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवेच्या बाबतीत सतर्क राहावे असे सांगितले या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश गायकवाड यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक जनमत २६ मे २०२२ E paper

 

राज्य सरकारने पेट्रोल वरील कर कमी केलाच नाही-भाजयुमो

 


उस्मानाबाद – राज्य सरकारने पेट्रोल डिझेल स्वस्त केल्याची घोषणा केली होती ती बोगस असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चा ने केला आहे.

भाजपा युवा मोर्चा च्या वतीने राज्य सरकारद्वारे आकारण्यात येणाऱ्या इंधनावरील कर कमी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की जागतिक स्थरावर कच्या तेलाचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत हे सर्वजण जाणतात पण असे असतांना सुद्धा देशातूल जनतेला महागाई पासुन दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्कामधुन पट्रोलवर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रूपये जनतेकरीता कर कमी केलेला आहे. यामुळे केंद्र सरकारला जवळपास २ लाख कोटींपेक्षा जास्तचा भार बसणार आहे. पण केवळ जनतेचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने हे आक्रमक पाऊल उचलले. आजच्या घटकेले केंद्र सरकारचा कर हा १९ रुपये आकारते आहे व रु ३० कर हा राज्य सरकार आकारते आहे. महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशामध्ये पेट्रोल व डिझेलवर सर्वात जास्त कर आकारणारे राज्य असुन जनतेच्या हितासाठी व महागाई कमी करण्यासाठी तत्काळ हे इंधनावरील कर कमी करण्यात यावे. संपूर्ण देशातील इतर राज्य १७-१८ रुपये कर आकारत असतांना महाराष्ट्र सरकारमधील महाविकास आघाडीने ऐव्हड्या मोठ्या प्रमाणात आकारण्यात आलेला कर हा जनतेवर होणारा घोर अन्याय आहे.

 राज्य सरकारद्वारे आकारण्यात येणारा इंधनावरील कर हा त्वरित कमी करण्यात यावा जेणेकरून महागाईला “आळा बसेल आणि जनतेला दिलासा मिळेल. जर का हे पाऊल येणाऱ्या ३ दिवसांमध्ये म्हणजेच ७२ तासांमध्ये उचलले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आक्रामक आंदोलन करण्यात येईल आणि मग ज्या गोष्टी घडतील त्याला संपूर्णपणे महाविकास आघाडी जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजसिंहा निंबाळकर,अमोल नाईकवाडी,सागर दंडनाईक, ओंकार देवकते, हिम्मत भोसले,सुजित साळूंके, ज्ञानेश्वर पडवळ,धनराज नवले, अँड फूलदिपसिंग भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन खडकी येथे निषेध

 


तुळजापूर तालुक्यातील खडकी येथे सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

राजे मल्हारराव होळकर यांच्या बद्दल पाठीमागच्या काळामध्ये ही जितेंद्र आव्हाड यांनी अपशब्द वापरले होते. आताही राजे मल्हारराव होळकर व छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरुन महाराष्ट्रातील व भारत देशातील तमाम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.वारंवार महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून महापुरुषांचा अपमान करण्यात येत आहे.राजे मल्हारराव होळकर यांनी संपुर्ण भारतात सह इराण इराक पर्यंत अटक भारताचा झेंडा लावला आहे. भारत भुमी साठी राजे मल्हारराव होळकर व छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांचे खुप मोठे योगदान आहे. हे योगदान येथील राजकीय मंडळी जर विसरणार असतील अन् बेताल वक्तव्य करणार असतील तर महाराष्ट्रातील व देशातील जनता तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली,तरी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी व आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उपस्थिती धनगर समाज बांधवांनी केली आहे.

यावेळी उपस्थित संतप्त धनगर समाज बांधवांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी राम जवान, म्हाळाप्पा सुरवसे, भरत जवान, विठ्ठल भंडारे, ज्ञानेश्वर जवान, विद्याधर सोनवणे, सिद्धाराम सुरवसे, संजय आडसुळ, उमेश जवान, सचीन भंडारे, संतोष गायकवाड, सतीश कांबळे, महादेव सुरवसे, विकास साबळे, संतोष कांबळे यांच्या सह समाज बांधव व खडकी ग्रामस्थ उपस्थित होते.

कळंब अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मंजूरीचा मार्ग सुकर – आ.कैलास पाटील

 


उस्मानाबाद
कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मंजूरीचा मार्ग सुकर झाला असून नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय सचिवांच्या बैठकीत कळंब येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) या दोन्ही न्यायालयास आवश्यक असणार्‍या पदनिर्मितीस उच्चस्तरीय सचीव समितीने मान्यता दिली असल्याची माहीती आ. कैलास पाटील यांनी दिली आहे.

कळंब येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय करावे अशी मागच्या अडीच दशकांपासून आग्रही मागणी आहे. यासंदर्भात वारंवार मागणी होवूनही त्यास मुहूर्त लागत नव्हते. दरम्यान, मागच्या अडीच वर्षापासून या विषयावर आ. कैलास पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून येत असलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

यानुसार याठिकाणी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, याठिकाणी अतिरिक सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर मंजूरी मिळावी व न्याय विभागाकडून गरजेचं मनुष्यबळासाठी पदनिर्मिती व्हावी यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर,आ. कैलास पाटील यांचे प्रयत्न सुरू होते.या प्रशासकीय बाबी मार्गी लागाव्यात मागच्या तीन महिन्यात अधीक गतीने कार्यवाही अनुसण्यात आली आहे. 

यानुसार मागच्या ७ जानेवारी रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर ) कळंब याठिकाणच्या पदनिर्मितीच्या अनुषंगाने उपसमितीची बैठक झाली होती. यानंतर एप्रिलअखेर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचीव समितीच्या बैठकीत अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालयाच्या एकूण ३३ पदनिर्मितीस अनुमती प्राप्त झाली आहे असे आ. कैलास पाटील यांनी कळवले आहे. 
याकामी मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे साहेब,माजी मंत्री प्रा तानाजीराव सावंत साहेब, पालकमंत्री गडाख साहेब, खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, आ चौगुले साहेब यांचे आ कैलास पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत.


लवकरच मंत्री मंडळ बैठकीत प्रस्ताव दाखल होईल

सचिवांच्या उच्चस्तरीय समितीने कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यासाठी आवश्यक असलेल्या पदनिर्मितीस अनुमती दिल्यानंतर यांचा अहवाल २३ मे रोजी विधी व न्याय विभागास प्राप्त झाला आहे. संबधित विभाग हा प्रस्ताव तयार करून मंत्रीमंडळ बैठकीस लवकरच सादर करणार असल्याचे आ. कैलास पाटील यांनी सांगितले. 

इमारतीच्या फर्निचरसाठी निधी कमी पडणार नाही… 

अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयासाठी गरजेच्या पायाभूत सुविधा जवळपास पूर्णत्वास आलेल्या आहेत. दोन वर्षापूर्वी इमारत बांधकाम पूर्ण झाले असताना फर्निचर व तत्सम कामासाठी निधीची वाणवा होती.त्यासाठी 2021 च्या अर्थसंकल्प मध्ये 1 कोटी ३७ लक्ष ची तरतूद केलेली होती, त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे लवकरच कळंब येथील अतिरिक्त न्यायलयास हिरवा कंदील मिळेल असे आ. कैलास पाटील यांनी कळवले आहे.

उस्मानाबाद येथील स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आग्रही मागणी

 


उस्मानाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे कार्यरत आहेत. सदर उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठ म्हणुन कार्यान्वयीत करणे बाबतचा अहवाल शासनाने मागीतला आहे. या प्रस्तुत विषयास अनुसरुन डॉ.प्रकाश बच्छाव सह संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी उपकेंद्रास भेट दिली व सर्वांचे मत एकुन घेतले व विद्यापीठ उपकेंद्राची पाहणी केली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने  सह संचालक यांना निवेदन दिले.

उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, ही जिल्हावासीयांची अनेक दिवसाची मागणी आहे. विद्यापीठ उपकेंद्र मंजूर करून घेतल्यानंतर भविष्यात स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी एमआयडीसी ची ६० एकर जागा खास बाब म्हणून उपकेंद्रासाठी तत्कालीन राज्यमंत्री आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी उपलब्ध करून घेतली होती. राणा दादा यांच्या मार्गदर्शनाने सर्व पक्षीय भेद बाजुला ठेऊन ऐकोपाने आपल्या जिल्हयात विद्यापीठ झाले पाहीजे ही भावना या प्रसंगी व्यक्त केली. उस्मानाबादचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात असून येथील युवकांना विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण येथेच राहून करता यावे यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची नितांत गरज आहे. उस्मानाबाद जिल्हयातील अनेक विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत, विद्यार्थ्यांना प्रवास खर्च व औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडी विद्यापीठ येथे शिक्षण घेण्याचा शैक्षणिक खर्च पेलवत नसल्यामुळे बाहेर जात नाहीत, यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मर्यादा पडत आहे, याचा आपण गांर्भीर्याने विचार करावा.

दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीचा संदर्भ देत उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याच्या अनुषंगाने माजी कुलगुरू श्री.आर.एन.माळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केल्याचे वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.

परंतु यानंतर दि १९ सेप्टेंबर २०२० रोजीच्या औरंगाबाद येथील पत्रकार परिषदे मध्ये विद्यापीठाचे विभाजन नाही, उस्मानाबाद उपकेंद्र विकासासाठी स्थापन केलेली समिती विभाजनासाठी नाही, विद्यापीठाचे दोन भाग करण्याचा कुठलाही प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून होणार नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मोठ्या कष्टाने निर्माण झाले असून उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ करण्याचा प्रश्नच नाही असे सांगितले होते.

यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये मोठा संभ्रम असून  शासनाने आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करून जिल्हावासीयांची गरज व मागणी लक्षात घेवून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना द्याव्यात.

उस्मानाबाद विद्यापीठ होण्याच्या धोरणातुन सोईस्कर रित्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय वेगवेगळया भुमिकेमुळे जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे. या विषयावर परस्पर विरोधी वक्तव्ये चीड निर्माण करणारी असून आपण शासनाची अधिकृत भूमिका तात्काळ स्पष्ट करून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करावे, अशी आग्रही मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील उपकेंद्राचे रुपांतर विद्यापीठामध्ये झाले तर जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्तेला खरे अर्थाने प्रोत्साहन, चालना मिळेल व अनेकांना रोजगाराची संधी मिळवुन आर्थीक स्थर उंचावेल अशी आशा आहे. व आपण याचा सकारात्मक विचार करावा अशी विनंती करण्यात आली.

या प्रसंगी सिनेट सदस्य संजय निंबाळकर, ॲड.मिलींद पाटील, प्रा.देशमुख सर, प्रा.संभाजी भोसले,  भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भाजप शहराध्यक्ष राहुल काकडे, आत्मनिर्भर जिल्हा संयोजक सचिन लोंढे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुजित साळुंके, विद्यार्थी जिल्हा संयोजक विशाल पाटील, जिल्हा सहसंयोजक सलमान शेख, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील नाईकवाडी, सचिव गणेश एडके, धनराज नवले, सागर दंडनाईक सह सर्व पक्षीय नेते, विद्यार्थी प्रतिनीधी व युवामोर्चाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

उस्मानाबाद शहरासाठी उजनी धरणातून वाढीव पाणी आरक्षण मंजुर

  उजनी उस्मानाबाद समांतर पाणी योजनेचा मार्ग मोकळा 



उस्मानाबाद – 

उस्मानाबाद शहराला 2013 पासुन उजनी धरनातुन पिण्यासाठी पाणी आणले जाते. उजनी योजने अंतर्गत आनलेले पाणी शहराला पुरेशा प्रमाणात पुरत नव्हते शहराला या पुर्वी तेरणा व रुईभर धरनातुन पिण्यासाठी पाणी आनले जायचे पुरंतू आपल्या जिल्हयात कायम पडत असलेला दुष्काळ पाहता सदर दोन्ही धरणातुन पाणी मिळत नव्हते. 2016 साली अटल अमृत योजने  अंतर्गत उजनी धरणावरून दुप्पट क्षमतेने पाणी आणुण 8 एम एल डी ची पुर्वीची योजना दुप्पट क्षमतेने मंजुर करून 16 एम एल डी प्रमाने पाणी आणणे साठी उजनी योजनचे (upgradation) करून सदर योजना पुर्ण करुन  घेतली.  परंतु अटल अमृत योजना मंजुर करत असताना तत्कालीन सरकार ने शहरासाठी 2021 ची लोकसंख्या गृहीत धरुन एकुण 26 एम एल डी पाण्याचे नियोजन केले होते.  त्यामध्ये उजनी धराणातुन 16 एम एल डी तेरण धरणातुन 5 एम एल डी व रूईभर धरणातुन 5 एम एल डी असे  एकुण 26 एम एल डी पाणी 2021  पर्यंत शहराला  मिळणेसाठी सदर अटल अमृत योजना शहराला मिळाली.  परंतु तेरणा धरण व रूईभर धरणामध्ये दुष्काळामुळे पाणी नसल्याने शहराला पुर्ण क्षमतेने पाणी मिळत नव्हते म्हणजेच शहराच्या 2021  च्या लोकसंख्येप्रमाणे 10 एम एल डी पाणी कमी मिळत होते. व उजनी धरणावरुन जास्तीचे पाणी आनण्यासाठी उजनी धरणावरील पुर्वीचे असलेले 6.5 द.ल.घ.मी. पाणी आरक्षणामुळे मर्यादा येत होती.  हि बाब आमच्या लक्षात आल्या नंतर शिवसेना पक्षप्रमुख  मा.उध्दवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्या नंतर औरंगाबाद येथे मराठवाडयाच्या विविध प्रश्नावर आढावा बैठक घेण्यात आली होती त्यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व तत्कालीन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी   उध्दवजी ठाकरे  यांना उजनी धरणा वरून आरक्षणात वाढवून देणे याबाबत मागणी केली त्याप्रमाणे लागलीच  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांनी संबंधितांना आदेश देऊन उस्मानाबादकरांची पिण्याच्या पाण्याची अडचण कायम स्वरूपी दूर करण्यासाठी पुढील 30 वर्ष पुरेल एवढे पाणी उजनी धरणातून घेण्यासाठी पाणी आरक्षणात वाढ करण्याच्या सूचना दिल्या. 

 त्यानंतर नगरपरिषदेने 29 डिसेंबर 2020 रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये उजनी धरानातुन वाढीव पाणी आरक्षणाचा ठराव घेतला होता त्यानुसार कृष्णा-खोरे महामंडळ यांच्याकडे रीतसर प्रस्ताव सादर करून त्याअनुषंगाने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व तत्कालीन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पाठपुरावा केल्याने अखेर उस्मानाबाद शहराला 2052 सालापर्यंत पुरेल एवढे पाणी आरक्षण पूर्वीचे 6.622 द.ल.घ.मी. व  नवीन 15.558 द.ल.घ.मी. एकूण 20.390 द.ल.घ.मी. पाणी आरक्षण मंजूर झाले आहे.  सदर आरक्षणाच्या अनुषंगाने उजनी धरणावरून  अतीरिक्त पाणी आणण्यासाठी धरणावरून समांतर पाणीपुरवठा योजना करण्यासाठी 300 कोटींचा डी पी आर देखील नगर परिषदेने तयार करून ठेवला आहे. सदर आरक्षण मिळाल्याने सदर डी पी आर ला तांत्रिक मान्यता घेऊन अटल अमृत योजना टप्पा-2  किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून प्रशासकीय मान्यता घेता येईल व तात्काळ काम सुरु करुन 2052 सालापर्यंत उस्मानाबाद शहराला लागणारे पाणी आणण्यासाठी चा मार्ग मोकळा झाला आहे.

चोरांच्या संशयास्पद हालचाली नागरीक,पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्यांचा डाव फसला

 




खबरदारी घेण्याचे पोलिसांचे आवाहन


उस्मानाबाद – शहरातील जुना उपळा रोड, शिवसृष्टी नगर भागात रात्री चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी तत्परता दाखवत पोलिसांना फोन केला शेजारच्या नागरिकांना जागे केले त्यामुळे चोरटे तेथून पसार झाले. यापूर्वी देखील याच परिसरात गेल्या महिन्यात चोरीच्या घटना घडल्या होत्या तेव्हा देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी पुढाकार घेत दरवाज्याना लोखंडी गेट, घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले होते. पोलिसांनी देखील गस्त मोठ्या प्रमाणात वाढवली होती. आता देखील ग्रामसुरक्षा दल गस्त घालत असून  पोलीस योग्य खबरदारी घेत असल्याची प्रतिक्रिया आनंद नगरचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी दिली.

२५ हजाराची लाच घेताना सापळ्यात अडकले तलाठी आणि कोतवाल

 


उस्मानाबाद – शेतीचा फेरफार मंजूर करुन घेण्यासाठी ३० हजारांची लाचेची मागणी करून त्यापैकी २५ हजार घेताना लोहारा तालुक्यातील अचलेर येथील लाचखोर तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. सोमवार दि. २३ मे रोजी एसबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडिलांनी सन २००५ मध्ये घेतलेल्या शेतीचा फेर फार वरिष्ठकडून मंजूर करून देण्यासाठी यापूर्वी १० हजार रुपये लाच रक्कम स्विकारल्याचे मान्य करून तसेच आज रोजी सदर कामासाठीच वरिष्ठकडून फेर फार मंजूर करून देण्यासाठी आणि ऑनलाईन नमुना नंबर ९ ची नोटीस काढण्यासाठी तक्रारदारास अचलेर येथील आरोपी लोकसेवक तलाठी युवराज नामदेव पवार(३६) व कोतवाल प्रभाकर रुपनर (३७) यांनी सोमवारी ३० हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी २५ हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारली. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.


सदरील सापळा लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोअ/ इफ्तेकर शेख, सिध्देश्वर तावसकर, विष्णु बेळे, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांनी केली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.