Home Blog Page 143

तेरणा साखर कारखान्याचा ताबा तात्काळ भैरवनाथ शुगरला द्यावा, अन्यथा आंदोलन

 आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

उस्मानाबाद, दि. 20 जून –

कर्ज वसुली न्यायाधिकरणाने (डीआरटी कोर्ट) ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासंदर्भातील जिल्हा बँकेने राबवलेली निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. त्यामुळे आता विलंब न करता तेरणा साखर कारखान्याचा ताबा तात्काळ भैरवनाथ शुगरला देण्यात यावा, येत्या 5 दिवसामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने तातडीची बैठक घेऊन तेरणा कारखान्याचा ताबा भैरवनाथ शुगर यांना देऊन तात्काळ कारखाना सुरू करण्याची कार्यवाही करावी, अन्यथा आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अजित खोत यांनी दिला आहे.


आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने आज 20 जून रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 9 ते 10 वर्षापासून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांनी केलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने निविदा प्रक्रिया राबवून भैरवनाथ शुगर यांना भाडेतत्वावर देण्याचा ठराव पारीत केला. या प्रक्रियेला ट्वेन्टीवन शुगर लातूर यांनी न्यायालयात आव्हान दिल्यामुळे मागील सात ते आठ महिन्यामध्ये 36 हजार शेतकरी सभासदांच्या ऊसाचा प्रश्न गंभीर झाला व कर्मचार्‍याच्या हाताला मिळणार्‍या रोजगाराची आशाही संपुष्टात आली. कारखान्याच्या मशिनरीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. कारखाना सुरू झाला असता तर कारखान्याचे उत्पन्न सुरू होऊन बँकेचा कारखान्यावरील बोजा कमी झाला असता. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा संपूर्ण तोटा परिसरातील ऊस उत्पादक सभासदांना सोसावा लागला. दि. 17/06/2022 रोजी डीआरटी कोर्ट औरंगाबाद यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेने राबवलेली निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा निर्णय दिल्यामुळे भैरवनाथ शुगर यांना कारखाना सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला. मागील काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अकार्यक्षम कारभारामुळे नऊ वर्ष तेरणा कारखाना बंद अवस्थेत होता. पुढील काळामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रलंबीत न ठेवण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा मध्यवर्ती बँकेने तातडीची बैठक लावून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ताबा भैरवनाथ शुगर यांना देणे गरजेचे आहे. येत्या पाच दिवसामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने तातडीची बैठक घेऊन तेरणा कारखान्याचा ताबा भैरवनाथ शुगर यांना द्यावा व तात्काळ कारखाना सुरू करण्याची कार्यवाही करावी, अन्यथा आम आदमी पार्टी तीव्र आंदोन छेडेल असा इशाराही जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अजित खोत यांनी दिला आहे.

निवेदनावर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अजित खोत, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत भुतेकर, संजय दणाणे, जिल्हा कोषाध्यक्ष विकास वाघमारे, युवक उपाध्यक्ष मोहसीन मिर्झा, मीडिया विभागप्रमुख प्रा.चाँदपाशा शेख, शहराध्यक्ष बिलाल रजवी, शहर सचिव नामदेव वाघमारे, शहाजी पवार, अंकुश चौघुले, नितीन अलकुंटे, राजपाल देशमख, महेबुब शेख यांची स्वाक्षरी आहे.


दैनिक जनमत २० जून २०२२ E paper

अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल


उस्मानाबाद –पारधी पिढी, उस्मानाबाद येथील अशोक रामा काळे उर्फ शाकाल, वय 40 वर्षे हे मालाविषयी गुन्हा करण्याच्या उद्देशाने तसेच दहशत पसरविण्याच्या उद्देशाने आपल्या घरात एक तलवार बाळगुन असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पथकास मिळाली. यावर स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. खनाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पोना- सय्यद, चव्हाण, पोकॉ- आरसेवाड, सहाणे यांच्या पथकाने दि. 18 जून रोजी अशोक काळे यांस त्यांच्या घरुन ताब्यात घेउन तलवार जप्त केली आहे

राष्ट्रवादी युवक काँग्रेस उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष नितीन बिक्कड यांच्या गाडीवर गोळीबार

 



 पारा (राहुल शेळके ): उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या गाडीवर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाशी तालुक्यात घडली.

        याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा वाशी तालुक्यातील फक्राबाद गावचे सरपंच नितीन बिक्कड हे दिनांक 17 जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या mh25 a w 6868 या स्वतःच्या खाजगी चारचाकी गाडीतून फक्राबाद येथून पारा गावाकडे एकटेच निघाले होते. ते येताळ वस्ती नजिक येताच दोन व्यक्तींनी त्यांच्या गाडीला हात केला.  ओळखीचे कोणी असेल म्हणून बिक्कड यांनी वाहनाचा वेग कमी केला. याचवेळी चेहरा झाकलेल्या एकाने जीपच्या समोरून बंदुकीने एक गोळी  जीपच्या दिशेने चालवली. अंदाज येताच बिक्कड यांनी गोळी चुकवली. यात जीपची काच फुटली. मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी लागलीच जीपचा वेग वाढवला. तेव्हा मागच्या बाजूने ही एक गोळी जीपवर झाडण्यात आली. अत्यंत गतीने  बिक्कड यांनी जीप तसेच पुढे नेली व वाशी पोलिसांना फोनवर माहिती दिली.  त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना पारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुरेश दवळे यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन माहिती घेतली.

           यानंतर नितीन बिक्कड यांच्या तक्रारीवरून वाशी पोलिसात अज्ञात दोघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर हे करत आहेत.

          शनिवारी सकाळी घटनास्थळावर पोलिसांना बुलेटचे रिकामी पुंगळी सापडली. घटनास्थळावर फॉरेन्सिक कार,डॉग स्कॉड, आय बाईक ,आय कार,सायबर एक्स्पर्ट, बॉम्ब शोधक पथक  यांना पाचारण करण्यात आले होते.  घटनास्थळास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी डंबाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक खणाळ यांनी भेट देऊन तपास कार्यास योग्य सूचना दिल्या.

उस्मानाबादला विकसित जिल्हा करण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार : डॉ.भागवत कराड

 


उस्मानाबाद , दि,18 (प्रतिनिधी): उस्मानाबाद जिल्हयाची आकांक्षित जिल्हा असल्याची ओळख पुसून विकसित व जिल्हा करण्याच्या उद्देश्याने सर्व यंत्रणांनी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी आरोग्य, जलसंधारण, शिक्षण आणि कृषी क्षेत्रास केंद्र सरकारकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  “आकांक्षित जिल्हा कार्यक्रम” अंतर्गत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगाकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, दिल्ली येथील  निती आयोगाचे वरिष्ठ सल्लागार रामा कामकाजू ,शिक्षणाधिकारी माध्यमिक गजानन सुसर , वरिष्ठ भूवैज्ञनिक एल.जी. गायकवाड, सी.के कलसेट्टी,  सी. आर. राऊत ,  आर. एन. ठोंबरे,  जिल्हा उद्योग केंद्रचे महाव्यवस्थापक एन. बी. जावळीकर , डॉ. डी. के. ललीत,  उप कार्यकारी अभियंता ए.एन. जाधव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच, निपाणीकर , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  एम.डी. तिर्थकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक,  ग्राम विकास प्रकल्पाच्या संचालक प्राजंल शिंदे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा अर्जून नाडगौडा ,  महावितरणचे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संजय गुरव,पशुसंवर्धन  अधिकारी सुनिल पगारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी. के. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालकुडे ,  डॉ. शिवकुमार धनकुटे, डॉ . कुलदिप मिटकरी, आदी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर, जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . गुप्ता यांनी डॉ.कराड यांना जिल्ह्यातील आरोग्य, जलसंधारण, शिक्षण आणि कृषी तसेच केंद पुरस्कृत योजनांबाबत माहिती दिली.

डॉ.कराड म्हणाले की , महिला आणि बालकांच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील मुलींचे शिक्षण आणि आरोग्याबाबत जिल्हा परिषद आणि प्रशासनाने आरोग्य यंत्रणेकडून काम करून घ्यावे. जिल्ह्यातील महिलांमध्ये ॲनीमिया आणि बालकांमधील कुपोषणावर नियंत्रण आण्ण्यासाठी उपययोजना कराव्यात .यासाठी प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला खासगी डॉक्टरांची मोफत सेवा उपलब्ध करून द्यावी.जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढवण्यासाठी अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदानावर आरोग्य यत्रंणेने आळा घालण्यासाठी जनजागृती करावी. लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय बांधण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सकांनी प्रस्ताव पाठवावा.तसेच जिल्हा रुग्णालयास 236 खाटानुसार डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध आहेत. गेल्या दोन वर्षात कोव्हिडमुळे रुग्णालयाचा विस्तार झाला आहे. आणि आणखी 400 खाटा वाढविण्यात आल्याने अधिक वैद्यकीय स्टाफ मागणीसाठीही प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्याचे निर्देशही डॉ. कराड यांनी यावेळी दिले.

ग्रामीन भागात जलसंधारणांची कामे आणि जल जीवन मिशन या योजनेची प्रभावी अंमल बजावणी करण्याबाबत डॉ.कराड यांनी सूचना दिल्या.ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याची सुरू असलेली कामे दर्जेदार आणि विहीत मुदतीत पूर्ण करा.पाण्याचे चांगले स्त्रोत असेल त्या ठिकाणी वॉटर ग्रिड तयार करावेत.पाण्याचे सुनियोजित व्यवस्थापन केल्याने शेतकरी आणि नागरिकांना कायमचा दिलासा होईल. उस्मानाबाद जिल्ह्याने जलसंधारणांची कामे अतिशय चांगली केली आहेत.आता पाणी व्यवस्थापनाला आधुनिकतेची जोड द्या  त्यामुळे नागरिक आणि शेतकरी बांधवांना याचा नक्कीच फायदा होईल असेही ते यावेळी म्हणाले.

श्री.दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील कौशल्य विकास आणि आर्थिक समावेशनाबाबत माहिती दिली . उस्मानाबाद जिल्हा डोमेन विशिष्ट डेल्टा रॅंकिंग मध्ये राज्यात दुस-या क्रमांकावर आहे. मुद्रा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, अटल पेनशन योजना आणि प्रधान मंत्री जनधन योजनेबाबत जिल्ह्यात झालेल्या कामांची माहिती सांगितली. जिल्ह्यातील 99.42 टक्के घरांना वीज,54.59 टक्के ग्रांपंचायतींना इंटरनेट चा सेवा देण्यात येत आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील मंजूर असलेली  कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहे.तसेच जिल्ह्याती सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य विकास विभागाकडून देण्यात आलेल्या प्रशिक्षण आणि त्यात मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी रोजगार निर्मितीबाबत केल्या जाणा-या प्रयत्नांबाबत माहिती दिली.

  नीती आयोगाच्या अहवालानुसार उस्मानाबाद जिल्हा शिक्षण क्षेत्रात देशात अग्रगण्य आहे. येथील शिक्षण व्यवस्थेला  अधिक दर्जेदार करण्यासाठी मुलींना उच्च शिक्षण देण्याचुआ अनुषंगाने शिक्षण विभागाने पावले उचलावीत.असेही डॉ. कराड म्हणाले. यावेळी श्री.गुप्ता यांनी जिल्ह्यातील 1400 वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि 636 नवीन वर्ग खोल्या बांधण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील शाळांमध्ये मिनी सायंस सेंटर, वर्चुवल लर्निंग क्लासरूम, बाला(BALA the happy school project), इनोव्हेटीव सायंस सेंटर्स,ॲस्ट्रोनॉमी क्लब इत्यादी सुविधा सुरु करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

जिल्ह्यात मुलींच्या साक्षरता दरात वाढ करण्यासाठी साक्षर भारत अभियान राबविण्यात येत आहे.जिल्ह्याचा साक्षरता दर 78.44 टक्के आहे. यामध्ये मुलांचे दर 85.84 टक्के इतका असून मुलींचा साक्षरता दर 70.51 टक्के आहे. महिलांमध्ये साक्षरता वाढवण्यासाठि शिक्षण विभागाकडून जागरुकतापर अभियान आणि घरोघरी जाऊन प्रबोधन केला जात असल्याचेही श्री .गुप्ता यावेळी म्हणाले. मुलींसाठी शाळांमध्ये स्वच्छता गृह आणि सॅनेटरी नॅपकिनही उपलब्ध करून देण्यात येत आहे,तसेच पिण्याचे पाणी आणि इतर पायाभूत सुविधाही देण्यात येत आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी डॉ. कराड यांनी कोव्हिड लसीकरणाचाही संक्षिप्त आढावा घेतला. लसीकरणामुळे आपण कोरोनाशी दोन हात करू शकलो,तेंव्हा जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करण्यावर भर द्यावा अशी सूचनाही त्यांनी दिली.

*****

तेरणा साखर कारखान्याची न्यायालयीन लढाई भैरवनाथ शुगरने जिंकली

 परंडा येथे फटाके फोडुन शिवसैनिकांनी केला जल्लोष

परंडा ( दि. १८ जून)

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर घेण्याची न्यायालयीन लढाई आ. तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ साखर समूहाने जिंकली आहे.डीआरटी कोर्टाने (कर्ज वसुली न्यायाधिकरण) ने तेरणा कारखानाबाबत ट्वेंटीवन शुगरची याचिका फेटाळली असून उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबविलेली निविदा प्रक्रिया कायदेशीर ठरवत भैरवनाथ उद्योग समूहाला दिलेले टेंडर योग्य असल्याचा निकाल दिलयाने परंडा येथे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यानी दि.१८ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडुन जल्लोष केला.

      यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, आणिल देशमुख,दत्ता रणभोर, सतीश दैन,गुलाब शिंदे,पोपट चोबे, शम मोरे,सतीष मेहेर, नवनाथ बुरंगे,उमेश परदेशी,शाहू खैरे,कुणाल जाधव,रमेश गरड, शुक्राचार्य ठोरे,तानाजी कोलते, पिंटु सांगडे,आप्पा बकाल, दिगंबर गुडे,विष्णु गुडे,विनोद जगताप,बापु डबडे,अमोल जगताप, बाळासाहेब चतूर, मिलींद लिमकर,विकास देवकते, धर्मा जगदाळे आदी उपस्थित होते.

           या निकालामुळे भैरवनाथ समूहाला तेरणा कारखान्याचा ताबा देणे शक्य होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने २५ नोव्हेंबर २०२१ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव घेत आगामी २५ वर्षासाठी तेरणा कारखाना भैरवनाथ समूहाला

भाडेतत्वावर दिला आहे.उच्च न्यायालय नंतर डीआरटी कोर्टात त्यानंतर पुन्हा उच्च न्यायालय व डीआरटी कोर्ट असा कायदेशीर लढा भैरवनाथने जिंकला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाचा चेंडू डीआरटी कोर्टात गेला होता त्यावर निकाल देण्यात आला आहे. 

  औरंगाबाद उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरु असताना तेरणाची पुन्हा निविदा काढण्याचा व भैरवनाथ यांना त्यांनी भरलेली ५ कोटी रुपयांची रक्कम ८ टक्के दराने परत करण्याचा डीआरटी कोर्टचा आदेश उच्च न्यायलयाने रद्द केला होता.    

    उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला तेरणा साखर कारखाना आगामी २५ वर्षासाठी आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ शुगरला देण्यात आल्याने तेरणा साखर कारखाणा आ.तानाजीराव सावंत आगामी गळीत हंगामात सुरु करतील. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व कारखाना कर्मचारी अनंद व्याक्त करीत आहेत.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा उस्मानाबाद दौरा

 


उस्मानाबाद,दि.17(प्रतिनिधी): केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड हे दि.18 जून 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौ-यावर येत आहेत.त्यांच्या दौ-यातील कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.

          सकाळी 6 वाजता औरंगाबाद येथून मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण.सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यलय येथे आगमन व “आकांक्षित जिल्हा कार्यक्रम” अंतर्गत आयोजित आढावा बैठकीस उपस्थिती.दुपारी 12 वाजता मराठवाडा विभागातील रिजनल बॅंक अधिका-यांसोबत आढावा बैठकीस उपस्थिती.दुपारी 1:30 वा. वेगवेगळ्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या आढावा बैठकीस उपस्थिती.दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव.दुपारी 3 वा. क्रेडिट आउटरीच प्रोग्राम आणि एफ़. आय स्कीमच्या लाभार्थ्यांशी चर्चा.

दुपारी 4 वा. भारतीय जनता पार्टीच्या प्रतिष्ठान भवन येथे मिडियासोबत बैठक.दुपारी 4:30 वा. जिल्हा बार असोसिएशन यांच्यासोबत चर्चा. संध्याकाळी 5:30 वा. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. संध्याकाळी 6:30 वा. श्री. सिध्दीविनायक मल्टीस्टेट को.ऑप.सोसायटी,सेंट्रल बिल्डिंगच्या समोर येथे भेट. संध्याकाळी 7:30 वा.यशवंत नागरी पतसंस्था येथे बैठकीस उपस्थिती. रात्री 8:30 वा. आदर्श शिक्षण संस्था येथे बैठक. रात्री 9:30 वा. उस्मानाबाद येथून औरंगाबदकडे प्रयाण.