Home Blog Page 105

दैनिक जनमत १३ फेब्रुवारी २०२३ E paper

आयान-बाणगंगा कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्याशिवाय हंगामाची सांगता होणार नाही

शेतकऱ्यांनी कारखाना बंद बाबतच्या अफवावर विश्वास ठेवू नये- चेअरमन राहूल मोटे

परांडा (भजनदास गुडे)  मराठवाड्यातील अग्रगण्य ईडा-जवळा येथील परंडा, भूम,वाशी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्या-साठी आधारवड असलेल्या “आयान मल्टीट्रेड एल.एल.पी”संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखाना लि.ईडा-जवळा या कारखान्याचा चालु गाळप हंगाम २०२२-२०२३ हा यशस्वीरित्या सुरळीतपणे सुरु असुन प्रति दिन ४००० मे.टन ऊसाचे गाळप कारखाना करीत आहे.शिवाय कारखान्याकडे ऊसतोड-वहातुक यंत्रणा सुध्दा भरपूर प्रमाणात ऊपलब्ध आहे.तसेच आयान- बाणगंगा साखर कारखान्याने हंगाम २०२२-२०२३ मध्ये आजपर्यंत ३७४२९१.५९९ मे.टन ऊसाचे गाळप केलेले असुन कारखान्याची दैनंदिन व सरासरी रिकव्हरी सुध्दा उस्मानाबाद जिल्ह्यात २ नंबर वर आहे.त्या अनुषंगाने कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना हंगामाची सांगता होणार नाही. अशी माहिती बाणगंगा कारखान्याचे चेअरमन मा.आ.राहुल भैय्या मोटे व आयान चे संचालक सचिन सिनगारे यांनी दिली आहे. 

        आयान-बाणगंगा साखर कारखानाने गाळपास येणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रक्कम रु. २३५०/- प्रमाणे पहिला हप्ता दिला असुन त्यानुसार ऊस उत्पादक शेतकरी यांच्या खात्यावर ऊस बिले वेळेत जमा केलेली आहेत व करीत आहोत. तसेच तोड-वहातुक बिले सुध्दा वेळेवर दिली जात आहेत. आयान-बाणगंगा साखर कारखान्याकडे गेल्या चार वर्षापासुन असणाऱ्यां वजन काटयाबाबत वाहतुकदार व ऊस उत्पादक शेतकरी यांच्याकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असुन कारखान्याच्या काट्याबाबत वाहतुकदार व शेतकरी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका नाही. कारखान्याने गेल्या चार वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार व कर्मचारी तसेच इतर देणी वेळेत दिलेली आहेत. 

        याही वर्षी ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतुक ठेकेदार यांचे पेमेंटचे वेळेत वाटप चालु आहे.आयान-बाणगंगा साखर कारखान्याने गेल्या ५ वर्षात सामान्यातील सामान्य शेतकऱ्याला आधार देण्याचे काम केले आहे.कारखान्याकडे ऊसाची नोंद केलेल्या सर्व शेतकऱ्याच्या ऊसाचे गाळप करण्यास कारखाना कटीबध्द आहे.तरी भागातील संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्यावरच गाळप हंगामाची सांगता होणार आहे. 

       तरी कारखाना बंद बाबत कुठल्याही अफवावर ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदार यांनी विश्वास ठेवू नये व चालु गळीत हंगामासाठी चांगल्या रिकव्हरीच्या दृष्टीने चांगल्या प्रतीचा ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे,असे आवाहन बाणगंगा कारखान्याचे चेअरमन मा.आ.राहुल भैय्या मोटे व आयानचे संचालक सचिन सिनगारे यांनी केले आहे.

   यावेळी बाणगंगा कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर संतोष तोंडले,मुख्यशेती अधिकारी विठ्ठल मोरे,चीफ इंजिनियर जेशकुमार शिंदे,चीफ अकौंटंट विशाल सरवदे,स्टोअर किपर नानासाहेब जाधव यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

दैनिक जनमत ११ फेब्रुवारी २०२३ E paper

 

प्रशासनाचा सावळा गोंधळ, उरुसामध्ये प्रथमोपचार केंद्रच नाही

 

उस्मानाबाद – उस्मानाबाद येथे हजरत ख्वाजा शमशोद्दिन गाजी रहे यांचा उरूस सुरू असून यातील चिरागा या धार्मिक विधी दरम्यान आज पहाटे अडीच च्या दरम्यान वळू घुसल्याने गोंधळ होऊन १४ भाविक जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.  कोणतीही यात्रा असेल तर भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रथमोपचार केंद्र सुरू करणे अपेक्षित असते मात्र उरुसामध्ये कोठेच प्रथमापोचार केंद्र आढळून आले नाही. उस्मानाबाद येथील हा दर्गाह भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा दर्गाह असून लाखो भाविक या ऊरुसासाठी येत असतात. यात अबालवृद्धांचा समावेश असतो. आरोग्याबाबत काही समस्या निर्माण झाल्यास उरुसाच्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र असणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी यावेळी बोलून दाखवली. याबाबत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 


ही अनपेक्षित घटना 

उरुसामध्ये घडलेली घटना ही अनपेक्षित आहे. उरूस होणाऱ्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजना बाबत सूचना केलेल्या आहेत. आमची एक टीम सायंकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत उरुसामध्ये भेट देऊन देखरेख करत असते.

 वृषाली तेलोरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

2022 च्या पिकविम्याची उर्वरीत पन्नास टक्के रक्कम देण्याचे विभागीय आयुक्ताचे आदेश

 


आमदार कैलास पाटील यांची माहिती

उस्मानाबाद (प्रतिनिधी):-पिकविम्याची उर्वरीत पन्नास टक्के रक्कम देण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दिल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यानी दिली आहे. पिकविमा रक्कम असमान असल्याच्या आमदार घाडगे पाटील यांच्या तक्रारीवरुन खरीप 2022 पिकविमासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली.

खरीप 2022 मध्ये केंद्राच्या अधिसुचनेचा चुकीच्या आधार घेऊन केंद्र सरकारच्या कृषी आयुर्विमा कंपनीने पन्नास टक्केच रक्कम दिली आहे. पिककापणी प्रयोग व नुकसानीचे प्रमाण गृहित धरुन ही पन्नास टक्केच रक्कम वाटप झाली आहे.एक ते 30 नोव्हेंबर हा जिल्ह्याच्या कापणी प्रयोगाचा काळ करारामध्ये नमुद आहे.शेतकऱ्यांच्या पुर्वसुचना ऑक्टोबर महिन्यातील असुन कंपनीने पंचनामे देखील त्यादरम्यान केले आहेत. हा निकष जिल्ह्यामध्ये कसा लागु होणार ? यावर आमदार घाडगे पाटील यानी आक्षेप घेतला होता.पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पंचनामे  करण्यात आले मात्र केंद्र सरकारच्या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणुक केली.विमा रक्कमेचे असमान वाटप केले. बांधाशेजारीच दोन शेतकऱ्यांच्या वाटपामध्ये मोठी तफावत दिसुन आल्याने शेतकऱ्यांतुन संताप व्यक्त होत आहे.प्रशासन स्तरावरुन कंपनीला अनेकदा सुचना करुनही कंपनी पंचनामे देण्यास टाळाटाळ केली.यासाठी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे १४ जानेवारीला रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी (ता.आठ) विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी विभागीय तक्रार निवारण समितीची बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये श्री.केंद्रेकर यानी केंद्राच्या अधिसुचना जिल्ह्यात लागु होत नसल्याची ठाम भुमिका घेत कंपनीस उर्वरीत ५०% टक्के रक्कम देण्याचे आदेश दिले. शिवाय पंचनाम्याच्या प्रती एक महिन्याच्या आत (आठ मार्चपर्यंत) देण्यास कंपनीने मान्यता दर्शविली आहे. कंपनीकडुन या आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देत फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्याचे आदेश श्री. केंद्रेकर यानी दिल्याचे घाडगे पाटील यानी सांगितले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या विमा रक्कमे एवढी म्हणजे जवळपास 259 कोटी रुपये  इतकी रक्कम मिळणार आहे.

एक लाख 44 हजार पूर्वसूचना चुकीच्या पध्दतीने रद्द करण्यात आल्याचा आक्षेप आमदार घाडगे पाटील यांनी घेतल्यानंतर दिसत आहे, दोन आठवड्यात प्रत्येक शेतकऱ्यांच्या पुर्वसुचनेचा आढावा घेतला जाणार आहे. या आढाव्यात नाकारण्यात आलेल्या पूर्वसूचना कोणत्या कारणाने नाकारल्या याची पूर्वसूचना निहाय माहिती केंद्र सरकारच्या विमा कंपनीने द्यावी असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. 

केंद्र सरकारच्या विमा कंपनीने २३ नोव्हेंबर २०२२ ला प्राप्त झालेल्या पूर्वसूचने पैकी ४०९५२ सर्वे करणे प्रलंबित असल्याचे कळविले होते. तर ११  जानेवारी २०२३ ला हे सर्व सर्वे पूर्ण केल्याचे कंपनीने कळविले आहे. नोव्हेंबर नंतर हे सर्वे कधी व कसे पूर्ण केले याचे पुरावे ही केंद्र सरकारच्या विमा कंपनीने द्यावे असे आदेश दिले आहेत. 

आयुक्तांनी दिलेल्या या तिन्ही आदेशाचे पालन झाल्यास ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.  हे तीन महत्वाचे आदेश तात्काळ  पारीत करून दिल्याने कंपनीची  मुजोरी आतातरी कमी होईल अशी अपेक्षा आमदार घाडगे पाटील यांनी व्यक्त केली. शिवाय शेतकऱ्यांसाठीचा हा लढा असाच सुरु राहणार असल्याचा विश्वास यावेळी घाडगे पाटील यांनी दिला आहे. 

यावेळी शेतकरी प्रतिनिधी अनिल जगताप, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी विभागीय कृषी अधीक्षक  रविंद्र पाटील, कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा व्यवस्थापक भारतीय कृषी विमा कंपनी बी. बी. इनकर, शेतकरी प्रतिनिधी सुधीर सुपनार तर  दुरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पीकविमा कंपनी विभागीय व्यवस्थापक शंकूतला शेट्टी आदि बैठकीला उपस्थित होते.

गुरुजी तुम्हीही? ३०० रुपयांसाठी लाच घेऊन लाज घालवली!

 

उस्मानाबाद – लाचखोरीची अनेक प्रकरणे घडतात मात्र ज्यांच्याकडून नैतिक मूल्यांची जडघडण करण्याची जबाबदारी असते असे गुरुजीच लाचखोरी करीत असतील तर विद्यार्थी अन् भावी पिढी कोण घडवणार?

खात्यात जमा झालेल्या वेतनाचे व अनुदानाचे ऑडिट करण्यासाठी जि.प. केंद्रीय शाळा मुलांची तेरखेडा ता. वाशी ,जि.उस्मानाबाद (वर्ग-3 ) चे मुख्याध्यापक भारत रामभाऊ भालेकर वय 58 वर्ष, जि. प. केंद्रीय शाळा, तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद येथील मुख्याध्यापकास बुधवार (दि.08) रोजी 300 रूपये ची लाच घेताना उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले

तक्रारदार ह्या मुख्याध्यापिका असून मुख्याध्यापकाच्या खात्यावर जमा झालेल्या वेतनाचे व अनुदानाचे ऑडिटर कडून लेखापरीक्षण करून देण्यासाठी वर नमूद आलोसे यांनी 300 रुपये लाचेची मागणी करून लागली स्वीकारण्याचे मान्य केले व स्वतः 300 रुपये लाच रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्विकारताना उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले सदर कार्यवाही ही औरंगाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे अधिक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक विकास राठोड, पोलिस अंमलदार इफ्तेकार शेख, मधुकर जाधव, सचिन शेवाळे यांनी केली.