१५ व्या वित्त आयोगाचा निधी न मिळाल्याने पाणीबाणी?
उस्मानाबाद – शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीबाणी सुरू असून आठ आठ दिवस पाणी मिळत नाही. पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला मात्र वीज पुरवठा खंडित होण्यामागे केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी न मिळणे हे कारण असल्याचे बोलले जात आहे. मार्च २०२२ पासून आजपर्यंत हा निधी अद्याप अप्राप्त आहे. जवळ पास १५ कोटीची ही रक्कम असल्याचे देखील बोलले जात असून येत्या कालावधीत हा निधी न मिळाल्यास पाणी पुरवठा खंडित होणार आहे. नगर पालिकेच्या न. प. फंडात संपूर्ण बिल भरले जाईल एवढा निधी नाही. कराच्या माध्यमातून जी वसुली होते तीच न. प. फंडात जमा होत असते. त्यामुळे वित्त आयोगाच्या निधीची पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी मदत होत असते.
साडे आठ कोटी बिल थकीत
उजनी येथून पाणी पुरवठा होणाऱ्या योजनेसाठी दरमहा ८० लाखांच्या आस पास देयक असते. सोलापूर जिल्ह्यातील दोन पंपिंग स्टेशन चे बिल ५ कोटी ६५ लाख तर उस्मानाबाद जिल्ह्यातील पंपिंग स्टेशन चे २ कोटी ५८ लाख रुपये बिल थकीत आहे.
तब्बल तेरा दिवसांपासून वीज पुरवठा खंडित
९ फेब्रुवारी रोजी पाणी पुरवठ्याच्या योजनेचा वीजपुरवठा खंडित झाला होता तो २२ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला मात्र केवळ १० लाख रुपये भरून हा वीज पुरवठा सुरू करण्यात आला असल्याने लवकरात लवकर बिल न भरल्यास पुन्हा वीज पुरवठा खंडित होणार असल्याचे बोलले जात आहे.
आलेले पाणी दूषित?
शहरातील जनतेत रोष वाढत असल्याचे पाहून प्रशासनाने हातला देवी तलावातून पाणी पुरवठा सुरू केला मात्र शहरात होणारा पाणीपुरवठा दूषित असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात असून हातला देवी तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे का याची तपासणी करण्याचीही मागणी नागरिकांमधून होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची हत्या
मगरवाडी ( विठ्ठल जाधव )
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची दुपारी दरम्यान निर्गुणरित्या हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.
एकाच घरातील तीन महिलांच्या खून सत्रामुळे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेसह अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वरात दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून
दिपाली बाळू माळी (वय-25), संगीता महादेव माळी (वय-50), पाराबाई बाबाजी माळी (वय-45) या तीन महिलांचा राहत्या घरासमोर हत्याराच्या सहायाने खून करण्यात आला. तिन्ही महिलाची प्रेते घरासमोर अत्यावस्थ पडली होती.
या घटनेने नंदेश्वरात खळबळ उडाली असून, पोलीस निरीक्षक रणजीत माने,एपीआय वाघमोडे,सपोनी आवटे,पोसई धापटे,पोसई शेट्टे तसेच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे सर्व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. हत्येच्या कारणामागील शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.
या तीन महिलाच्या खुनामुळे नंदेश्वर गावावर शोककळा पसरली असून, अचानक झालेल्या खून सत्रामुळे गावात भितीचे वातावरण पसरले.
त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत एका संशयितास ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तपासाअंती या खुणाचे कारण स्पष्ट होणार आहे


















































































