बारामती | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.
मुंबईहून आज सकाळी प्रचार दौऱ्यासाठी अजित पवार हे विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती एअरपोर्टवर लँडिंग करत असतानाच विमानाचा तोल गेला आणि ते विमानतळ परिसरातच कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानाला आगीने वेढले गेले आणि काही वेळ परिसरात धुराचे लोट पसरले होते.
प्राथमिक माहितीनुसार, या विमानात अजित पवार यांच्यासह त्यांचे चार सुरक्षारक्षक व अन्य कर्मचारी होते. अपघातानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. मात्र आगीमुळे आणि तीव्र धडकेमुळे सहा जणांचा मृत्यू झाला असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
चार प्रचारसभा नियोजित होत्या
आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकूण चार प्रचारसभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुपे जिल्हा परिषद गटासाठी स्वतंत्र सभा देखील नियोजित होती. या सभांमधून अजित पवार हे थेट कार्यकर्ते, उमेदवार आणि मतदारांशी संवाद साधणार होते. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे सर्व प्रचार कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
या भीषण अपघाताचे काही व्हिडिओही समोर आले असून त्यामध्ये विमान पूर्णतः जळालेल्या अवस्थेत दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे दिल्लीहून तातडीने महाराष्ट्राकडे रवाना झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
- शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
