धाराशिव | प्रतिनिधी
शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, आणि कृषी धोरणांतील सरकारच्या निष्क्रियतेविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, ११ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता धाराशिव जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या निवासस्थानांवर मशाल आंदोलन करण्यात येणार आहे. माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे राज्यव्यापी आंदोलन होत असून, धाराशिव जिल्ह्यातील आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मयुर ज्ञानेश्वर काकडे व वर्षद शिंदे करणार आहेत.
धाराशिव, वाशी, भूम, परंडा, तुळजापूर, कळंब आणि उमरगा या सातही तालुक्यांतील आमदारांच्या निवासस्थानांसमोर हे मशाल आंदोलन होणार असून, “जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आता दुर्लक्ष करत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प बसू नये म्हणून आम्ही त्यांच्या दरवाज्यापर्यंत मशाल घेऊन जात आहोत,” असा स्पष्ट इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे.
प्रहारच्या निवेदनात म्हटले आहे की, “निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व उत्पन्न हमी याबाबत घोषणा केल्या, पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. शासन मौन धारण करून बसले आहे आणि आमदारही या प्रश्नांवर कुठलाही आवाज उठवत नाहीत.”
या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाने आंदोलनाच्या अनुषंगाने कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ७ एप्रिल रोजी निवेदन स्वीकारले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी म्हणतात की, “आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन करणार आहोत. मात्र हे आंदोलन म्हणजे एक इशारा आहे – शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.”
राज्य शासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन केवळ सुरुवात असल्याचे संकेतही प्रहारने दिले आहेत. जिल्ह्यातील राजकीय वातावरण या आंदोलनामुळे ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!
- महिलांचे मंगळसूत्र चोरणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह ८.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटोच्या जोरावर ब्लॅकमेल; लव्ह जिहादचा आरोप, नराधम पोलिसांच्या ताब्यात
- धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत छुप्या युतीत ठिणगी? भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत गोंधळ!
