धाराशिव – तालुक्यातील करजखेडा येथे जमिनीच्या वादातून पती-पत्नीची निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज, बुधवार (दि. 13 ऑगस्ट) दुपारी दोनच्या सुमारास घडली. मृतांमध्ये सहदेव पवार आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार यांचा समावेश असून, या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जमिनीचा वाद ठरला कारणीभूत
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सहदेव पवार आणि आरोपी जीवन हरिबा चव्हाण हे करजखेडा येथे शेजारील शेतकरी आहेत. पवार यांच्या नावे सुमारे 36 एकर जमीन तर चव्हाण यांच्या नावे फक्त 2 एकर जमीन असल्याचे समजते. या जमिनीवरून दोघांमध्ये गेल्या काही काळापासून तीव्र वाद सुरू होता.
काही वर्षांपूर्वी सहदेव पवार यांनी जीवन चव्हाण याला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने पवार यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती, मात्र उच्च न्यायालयातून ते जामिनावर बाहेर आले होते. तेव्हापासून आरोपीच्या मनात तीव्र राग होता.
गाडीने धडक, नंतर कोयत्याने वार
आज दुपारी आरोपी जीवन चव्हाण याने करंजखेडा येथील लोहारा रस्त्यावर पती-पत्नीवर गाडी चढवली. अपघातासारखी घटना घडवून दोघेही जमिनीवर पडताच त्याने कोयत्याने वार करत त्यांची जागीच हत्या केली.
पोलीसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यावेळी आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चढाओढ सुरू केली आहे.
या दुहेरी हत्याकांडामुळे करजखेडा गावात भीतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
- शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
