Home Blog Page 93

आठ फुट लांब धामीणीवर दवाखान्यात केले उपचार

दहिफळ (योगराज पांचाळ)
      कळंब तालुक्यातील सापनाई येथे सुरेश पाटील यांच्या शेतात नांगरणी चालू असताना आठ फुट लांब धामीण नांगराच्या फाळाला आडकली ती गंभीर जखमी झाली.शेतकरी पाटील यांनी सर्पमित्र अनंत माने यांना फोन करून सांगितले.घटनास्थळी येऊन धामीण पकडून तीला दहिफळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेहण्यात  आले.आठ फुट लांब असणाऱ्या धामीणीवर प्रथमोपचार सेवक जगताप यांनी केले.
     एका सापावर पहिल्यांदाच उपचार करण्यात आले आहेत.साप माणसाचा शत्रू नसुन मित्र आहे.शेतातील पिकाचे उंदरापासुन साप संरक्षण करतो.विनाकारण तो माणसाला चावत नाही.साप दिसला तर संपर्क करा असे आवाहन सर्पमित्र अनंत माने यांनी केले आहे.  ९४०३७३४९२४ या नंबरवर संपर्क साधावा.

धाराशिव जिल्ह्याकरिता दिनांक ०५ ते ०९ मे, २०२३ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश स्वछ ते अंशतः ढगाळ राहून दिनांक ०५ व ०६ मे, २०२३ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास) व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. 

मराठा वनवास‎ यात्रेला सलगरा ग्रामपंचायतचा जाहीर पाठिंबा

 


सलगरा,दि.४ (प्रतिक भोसले) 

घटनात्मक ५०% च्या आतील ओबीसीमधूनच‎ मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या‎ मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने‎ तुळजापूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत ‘मराठा वनवास‎ यात्रा’ काढण्यात येणार आहे. या वनवास यात्रेस सलगरा (दि.) ग्रामपंचायतने जाहीर पाठिंबा दिला आहे. 

सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या ६ मे २०२३ रोजी तुळजापूर येथून ‘मराठा वनवास यात्रा’ निघणार आहे. मराठा समाजाला ५०% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी या वनवास यात्रेचे नियोजन केले गेले आहे. ही यात्रा तुळजापूर ते मुंबई मंत्रालय अशी पायी चालत जाणार आहे. ६ जून २०२३ रोजी सर्व मराठा बांधव मुंबई मध्ये पोचतील असे नियोजन ठरले आहे. आणि त्यात हजारो बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.


या मराठा वनवास यात्रेला आणि मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला मौजे सलगरा दिवटी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव यांनी एकमताने मंजूर केले आहे. आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने व तसेच गावातील सर्व जातीपातीच्या नागरिकांच्या वतीने मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सर्व ते सहकार्य यापुढेही करण्यात येईल. असे ग्रामपंचायतने काढलेल्या पत्रात म्हटले आहे. 


 राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच दि.६ मे रोजी तुळजापूर येथून वनवास यात्रेस सुरुवात होईल. ही यात्रा गावागावात मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करीत दि.६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळादिनी जवळपास ५०० किलोमीटर पायी चालत जात मुंबई मध्ये पोहोचणार आहे. ५०% च्या आतले ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, यंदाचा छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा आपले मराठा बांधव आझाद मैदानावरच साजरा करतील. त्या नंतर मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत‎ हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षणात होत नाही, अधिकृत ‘जी आर’ निघत नाही, तोपर्यंत मुंबईतच ठाण मांडून बसणार, कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही. आता पर्यंत लेखी आश्वासने फार झाली, आता प्रत्यक्ष‎ आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही. असे पदाधिकारी एका आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.

येत्या ६ तारखेला मराठा वनवास यात्रा तुळजापूर येथून निघणार आहे. चळवळीतील शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पहाडी आवाजात जंगी पोवाड्यांचा कार्यक्रम सकाळी ०९ वा.सु. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर होईल. अनेक गावांतील भजनी मंडळे, हलगी पथक, संभळ वादक, वासुदेव, ढोल पथक देखील सर्व आम्हाला सोडण्यासाठी येणार आहेत. वनवासाला निघालेल्या लोकांना पाठवण्याची ती सुद्धा एक पद्धत आहे. ज्या प्रमाणे प्रभू श्री राम वनवासाला निघाल्या नंतर त्यांना सोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने अयोध्या वासिय उपस्थित होते. अगदी त्याच प्रमाणे वनवासाला निघालेल्या मराठा समाजातील बांधवांना, तरुणांना सोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने समाज उपस्थित राहील. वाटेत देखील प्रत्येक गावातील ग्रामस्थ आमच्या राहण्याची – जेवणाची सोय करत आहेत. जागोजागी जनजागृती करत ही वनवास यात्रा मुंबईत पोचेल. पहिल्यांदाच निघालेल्या या वनवास यात्रेमुळे महाराष्ट्राला एका वैभवशाली परंपरेची प्रत्यक्ष माहिती होऊन जाईल. असे सुध्दा पदाधिकारी बोलताना म्हणाले.

कर्नाटकातील मतदानासाठी महाराष्ट्रातील सिमेलगतच्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत


कर्नाटकातील मतदानासाठी महाराष्ट्रातील सिमेलगतच्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत

 


धाराशिव –

आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्वीकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये १०० टक्के मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ ( भाग – २) मधील नियम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था/ आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.

 भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे कर्नाटक विधानसभा क्षेत्रांमध्ये दिनांक १० मे, २०२३ रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणूकीमध्ये कर्नाटक राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या (सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड) जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. तथापि, त्यांची नावे कर्नाटक राज्यांतील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने आदेश दिले आहेत.


1) निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार / अधिकारी / कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.


1) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)


II) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.

(IV) वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत.

धाराशिवमध्ये राज्यस्तरीय वकिल परिषद; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई यांची उपस्थिती


‘गतिमान न्यायासाठी न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण’ विषयावर मंथन


 धाराशिव, दि. 3 – महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषद, जिल्हा विधीज्ञ मंडळ व सर्व तालुका विधीज्ञ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय वकिल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, 5 मे रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार्‍या या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. राज्यस्तरीय वकिल परिषदेसाठी राज्यभरातील तीन हजार वकिल बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलींद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील जिल्हा न्यायालय परिसरात असलेल्या मधुकर मोरे विधीज्ञ ग्रंथालयात बुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधाकर मुंडे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले, ज्येष्ठ विधीज्ञ राम गरड, अ‍ॅड. ललीत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना अ‍ॅड. मिलींद पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील दिवंगत विधीज्ञ व्यंकटराव नळदुर्ग, अ‍ॅड. नरसिंगराव काटीकर, कलिमोद्दीन सिद्दीकी, मल्लिकार्जून तोडकरी आदींनी विविध क्षेत्रात काम करून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. अशा धाराशिव जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या उपस्थितीत पहिल्यांदाच राज्यस्तरीय वकिल परिषद आयोजनाचा मान जिल्ह्याला मिळाला आहे. आधुनिक काळात न्यायव्यवस्थाही आधुनिक आणि गतिमान होत आहे. त्यामुळे लोकांना कमी कालावधीत न्याय मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे राज्यस्तरीय वकिल परिषदेतील चर्चासत्रासाठी ‘गतिमान न्यायासाठी न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी 10 वाजता परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, न्यायमूर्ती नितीन सांबरे, पालक न्यायमूर्ती अरूण पेडनेकर, ई-कमिटीचे माजी उपाध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाणा, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग, राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल डॉ. बिरेंद्र सराफ, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन मनन कुमार मिश्रा, माजी न्यायमूर्ती व्ही. के. जाधव, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दुपारच्या सत्रात  कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘गतिमान न्यायासाठी न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण’ या विषयावर चर्चा सत्र होणार आहे. यात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती अरूण पेडनेकर, सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीचे माजी उपाध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण, सायबर सुरक्षा संस्थेचे अध्यक्ष डॉ. हारॉल्ड डी.कास्टा, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. संग्राम देसाई हे चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर 3.15 ते 4.30 या वेळेत खुले चर्चासत्र व ज्येष्ठ विधीज्ञांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अनिल सिंग व अ‍ॅडव्होकेट ऑफ जनरल डॉ. बिरेंद्र सराफ व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील वकिल बांधव सहभागी असणार आहेत. या परिषदेस वकिल बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलींद पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड. संग्राम देसाई, सदस्य अ‍ॅड. जयंत जायभावे, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मुंडे यांच्यासह वकिल परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप आघाडीला १४ जागा जिंकत पुन्हा सत्ता राखण्यात यश

 खासदार संजय काका पाटील यांच्या भाजप सह काँग्रेस, शिवसेना, आघाडीला फक्त चार जागा


राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील युवा नेते रोहित दादा पाटील व सुरेश भाऊ पाटील  यांचा करिष्मा कायम

तासगाव (राहुल कांबळे)

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार सुमनताई पाटील व रोहित दादा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकत बाजार समितीवर सत्ता कायम करण्यात यश मिळवले आहे तर खासदार संजय काका पाटील यांच्या भाजप काँग्रेस व शिवसेना या आघाडीला चार जागांवर समाधान मानावे लागले, यामध्ये भाजपला तीन जागा तर काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी बाजी मारली आहे.

रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक हे पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय येथे मतदान अत्यंत चुरशीने पार पडले चार वाजता मतदान पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता मुख्य प्रशासकीय इमारती येथे मतमोजणी प्रारंभ झाला सुरुवातीला तोलाईदार गटातून भाजपने आपले खाते खोलले होते सुरेश बेले ४२ मते मिळवून विजय झाले त्या पाठोपाठ व्यापारी गटाचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुचर्चित उमेदवार सुदाम शेठ लक्ष्मण माळी हे १२५ मते व विद्यमान संचालक भाजपचे कुमार शेठ रामचंद्र शेटे हे ९६ मते घेऊन विजय झाले, नंतर ग्रामपंचायत विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार उमेदवार विजयी झाले. महिला राखीव जागेवर फेर मतमोजणी घेण्यात आली त्यामध्ये रेखा रवींद्र पाटील या एकमताने विजय घोषित करण्यात आल्या, आर्थिक दुर्बल गट,ओबीसी गट,भटक्या विमुक्त गट,  व अनुसूचित जाती जमाती गट यातून चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले नंतर सोसायटी गटामध्ये मात्र चुरस पाहायला मिळाली यामध्ये काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष यांनी या निवडणुकीमध्ये आक्रमक प्रचार केला होता त्यांनी ४४२ मते घेत विजयश्री खेचण्यात यश मिळवले आहे. मतमोजणी अत्यंत चुरशीने सुरू असल्याने याकडे सर्व जिल्ह्यासहित मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले होते. मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप तसेच भाजप,काँग्रेस शिवसेना समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष करीत गुलालाची प्रचंड उधळण केली व फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला होता स्वामी रामानंद भारती सुतगिरणी येथे आमदार सुमनताईपाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा विजयाचे प्रमुख शिल्पकार सुरेश भाऊ पाटील हे देखील कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी झाले हे विशेष होय सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार तसेच आमदार सुमनताई पाटील,सुरेश भाऊ पाटील यांनी श्री गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या पुतळ्याचा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, गेल्या निवडणुकीत बाजार समितीमध्ये भाजपला एक जागा मिळाली होती यावेळी तीन जागा तर काँग्रेसला महादेव नाना पाटील यांच्या रूपाने एक जागा मिळाली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वास तात्या पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन भैया तांबोळी, तासगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे, गटनेते बाळासाहेब सावंत, शहराध्यक्ष गजानन खुजट, प्रा. बटू पवार सर, माजी चेअरमन अमोल आबा पाटील, पतंग बापू पाटील, मोहन अण्णा पाटील, माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील, जि प सदस्य बंडूभाऊ पवार, संजय दादा पाटील, अभिजीत पाटील, खंडू कदम इत्यादी उपस्थित होते

गटनिहाय विजयी उमेदवार (कंसात त्यांना पडलेली मते आणि गट) :

सहकारी संस्था गट – 

संग्राम पाटील ४७६ (राष्ट्रवादी)

रवींद्र पाटील  ४७२ (राष्ट्रवादी)

दत्तात्रय थोरबोले ४६१ (शेकाप)

रामचंद्र जाधव ४६० (राष्ट्रवादी)

रामचंद्र पवार ४६० (राष्ट्रवादी)

अनिल पाटील ४६० (राष्ट्रवादी)

महादेव पाटील ४४२ (काँग्रेस,सर्वपक्षीय आघाडी-खासदार गट)

संस्था गट महिला राखीव-

विजया पाटील ४८१ (राष्ट्रवादी)

रेखा पाटील ४६३ (सर्वपक्षीय आघाडी/खासदार गट) (फेर मतमोजणी मध्ये १ मताने विजयी)

संस्था गट इतर मागास प्रवर्ग-

अंकुश माळी ४९६ (राष्ट्रवादी)

संस्था गट भटक्या विमुक्त जाती जमाती- 

मुकुंद ठोंबरे ४८५ (राष्ट्रवादी)

ग्रामपंचायत गट सर्वसाधारण –

सुनील(युवराज) पाटील ४२३ (राष्ट्रवादी)

अवधूत शिंदे ३९९ (राष्ट्रवादी)

ग्रामपंचायत गट अनुसूचित जाती जमाती- राजाराम पाखरे ३९८(राष्ट्रवादी)

ग्रामपंचायत गट आर्थिक दृष्ट्या दुर्बल- 

धनाजी पाटील ३९९ (राष्ट्रवादी)

अडते व्यापारी गट-

सुदामशेठ माळी १२५ (राष्ट्रवादी)

कुमारशेठ शेटे ९६ (खासदार गट )

हमाल तोलाईदार गट- 

सुरेश बेले ४२ (खासदार गट)

सर्व विजयी उमेदवारांचे आमदार सुमनताई पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील व युवा नेते रोहित दादा पाटील यांनी अभिनंदन केले

०३ मे रोजी धाराशिव येथे रोजगार मेळावा

 



धाराशिव –  जिल्हामधील  सुशिक्षित आणि तरुण, तरुणी व इच्छुक  बेरोजगार यांना रोजगार मिळावा या हेतूने युवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) सहसचिव कु. मनीषा  वाघमारे याच्या प्रयत्नाने धाराशिव मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे  (JOB FAIR) आयोजन केले आहे . तरी या रोजगार मेळाव्यात पुणे ,लातूर ,सोलापूर ,आणि छत्रपती  संभाजी नगर मधील नामांकित कंपन्यांना आमंत्रण  दिलेले आहे. तरी धाराशिव जिल्हातील सर्व इच्छुक उमेदवारांना हि एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी या रोजगार मेळाव्याचे ठिकाण हे     वि. जे. शिंदे  पॉलिटेनिक कॉलेज,वरुडा रोड , धाराशिव.        येथे सकाळी ९ ते ३ वाजे पर्यंत केले आहे .तरी जिल्हातील सर्व उमेदवारांनी  या संधीचा लाभ  घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.