दुध भेसळ प्रकरणी ९ ठिकाणी कारवाई,१९ नमुने पाठविले प्रयोगशाळेत
दुध भेसळ प्रकरणी ९ ठिकाणी कारवाई,१९ नमुने पाठविले प्रयोगशाळेत
उस्मानाबाद,दि.७ (प्रतिनिधी)
ग्राहकांना स्वच्छ,ताजे,निर्भेळ,दुध व दुग्धजन्य पदार्थ मिळावे याकरिता अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयात दुध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी (समिती सचिव),वजन मापे विभाग यांच्यासमवेत जिल्हातील विविध दुध डेअरी/दुध संकलन केंद्राच्या तपासण्या करून नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येत असून आजपर्यंत ९ आस्थापनामधून दुध, खवा,पनीर,रबडीचे एकूण १९ नमुने विश्लेषणासाठी घेतले.हे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.त्यांचा अहवाल मिळणे बाकी आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधिताविरुद्ध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित पेढीना तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रूटीची पूर्तता व सुधारणा करण्यास नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.
मे.दत्तसाई मल्टीस्टेट को. ऑप.लि. उस्मानाबाद या आस्थापनामध्ये अस्वच्छ ठिकाणी अन्न पदार्थ उत्पादन/साठा करीत असल्यामुळे तपासणीवेळी या पेढीस उत्पादन व विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.आढळून आलेल्या अस्वच्छतेबाबत या पेढीविरुद्ध न्यायनिर्णयसाठी खटला दाखल करण्यात येत आहे.ही पेढी बंद करण्यात आली आहे.
ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी श्री.शिंदे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी श्री.ठोंबरे,सहाय्यक आयुक्त शि.बा.कोडगिरे,अन्न सुरक्षा अधिकारी न.त.मुजावर व इतर कर्मचारी यांनी केली आहे.
दुध व दुग्धजन्य पदार्थाबाबत काही तक्रार असल्यास कार्यालयास व टोल फ्री क्रमांक. १८००२२२३६५ यावर तक्रार नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालयाने जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
तासगाव शहरासह तालुका,आज बंद
तासगाव शहरासह तालुका,आज बंद
आठवडा बाजार ब़ंद ठेवून व्यापारी व भाजीपाला विक्रेते यांनी सहकार्य करण्याचे आवाहन
हजारो मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी होणार
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा बांधवांवरील लाठीमार हल्ल्याचा निषेध
तासगाव ( राहुल कांबळे)
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला चढवला. या निर्दयी हल्ल्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या हल्ल्याचा निषेध म्हणून आज (गुरुवार) तासगाव शहरासह तालुका बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी तासगाव येथे भरणारा आठवडा बाजारही बंद राहणार आहे, अशी माहिती मराठा बांधवांच्या वतीने देण्यात आली.
तासगाव येथील समृद्धी मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे – पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणास जालना जिल्ह्यासह राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून सरकार हादरले आहे.
त्यामुळे येनकेन प्रकारे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारने उचल खाल्ली आहे. त्याचाच भाग म्हणून चार दिवसांपूर्वी या आंदोलनकर्त्यांवर जालना पोलिसांकरवी लाठीहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेकडो आंदोलनकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. या निर्दयी हल्ल्यामुळे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. या हल्ल्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलनाची ठिणगी राज्यभर पोहोचली आहे.
राज्यभर रास्ता रोको, बंद, आमरण उपोषणाची मालिका सुरू झाली आहे. याचाच भाग म्हणून उद्या तासगाव तालुका बंद ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय मराठी बांधवांनी घेतला आहे. मराठा बांधवांना कुणबी या कॅटेगरीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सर्व मराठा बांधवांनी उद्याचा बंद यशस्वी करून सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या तासगाव येथे होणारा आठवडा बाजारही रद्द करण्यात आला आहे. शिवाय शाळा महाविद्यालयाला उद्या गोकुळाष्टमीची सुट्टी असली तरी विद्यार्थ्यांनी ज्यादा क्लासेसच्या निमित्ताने तासगावला येऊ नये. जेणेकरून विद्यार्थ्यांचे हाल होणार नाही, असे आवाहन मराठा बांधवांनी केले आहे.
गुरुवारी आज सकाळी नऊ वाजता जिजाऊ चौकात सर्व मराठा बांधव एकत्रित येणार आहेत. त्यानंतर रॅलीने सर्व मराठा बांधव एसटी स्टँड चौकाकडे जाणार आहेत. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एसटी स्टँड चौकात रास्ता रोको करण्यात येणार आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी ऍड. कृष्णा पाटील, अजय पाटील,अमोल शिंदे, अविनाश पाटील, महादेव पाटील, बाबुराव जाधव, सुनील जाधव, प्रदीप थोरबोले, सचिन चव्हाण, बाळासाहेब सावंत,अभिजीत पवार, शरद शेळके, शशिकांत डांगे, अभिजीत पाटील, ज्योतीराम जाधव,खंडू कदम, सुदर्शन पवार, बाबुराव जाधव, पांडुरंग जाधव, लालासाहेब पाटील ,अमोल कदम,यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…तर आमदार – खासदारांच्या घरावर मोर्चा काढू : अमोल शिंदे यांचा इशारा
राज्यातील मराठा आमदार खासदारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अपेक्षित प्रयत्न केले नाहीत. राज्यात मराठा आमदार, खासदारांची संख्या अधिक असतानाही आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, ही शोकांतिका आहे. जर या पुढील काळात लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर त्यांच्या घरांवर मोर्चा काढून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा अमोल शिंदे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला आहे.
कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती
कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई, दि. ६ :- मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.
आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे – पाटील यांनी ‘निजामकालीन महसुली रेकॉर्ड तपासून याठिकाणी पूर्वी जे कुणबी म्हणून नोंदणीकृत होते त्यांना मान्यता’ देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने ही समिती स्थापन करण्यात येत आहे.
ही समिती महसुली, शैक्षणिक व संबंधित नोंदी तपासून मागणीनुसार निजामकालीन ‘कुणबी’ नोंद असणाऱ्या मराठा समाजास ‘कुणबी’ दाखले देण्याकरिता अशा प्रकरणांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे व त्याबाबतची कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करेल. याबाबत समिती अहवाल तयार करून तो एक महिन्यात शासनास सादर करेल. निवृत्त न्यायाधीश न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, तसेच संबंधित सर्व जिल्हयांचे जिल्हाधिकारी सदस्य म्हणून काम पाहतील. तसेच औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)चे विभागीय आयुक्त समितीचे सदस्य सचिव असतील. यापुर्वीची महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समिती देखील या समितीस पूरक माहिती देण्याचे काम करेल.
जालना लाठीचार्ज निषेधार्थ गंधोरा पाटी येथे उद्या रास्ता रोको
सलगरा,दि.४ (प्रतिक भोसले) – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये संविधानिक मार्गाने उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज / लाठीमार करणाऱ्या प्रशासन व राज्यशासनाचा राज्यभर सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. म्हणुन त्याच अनुषंगाने सकल मराठा समाजाच्यावतीने तुळजापूर – नळदुर्ग महामार्गावर गंधोरा पाटी येथे उद्या मंगळवार (दि.५ सप्टेंबर) रोजी सकाळी ०९ वा.सु. रास्तारोको करण्यात येणार आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी, लहान मुले, वृद्ध महिला यांना तेथील पोलीस प्रशासनाने अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेच्या निषेधार्थ गंधोरा पाटी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनाचे पालन करून रास्ता रोको करण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांना पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, धाराशिव जिल्हा हा शांतता प्रिय असून, याची शांतता भंग होता कामा नये. या करिता आपण सर्व मराठा बांधवांनी शांततेचा मार्ग अवलंबवावा पोलिस प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे. रास्ता रोको करताना कुठल्याही प्रकारच्या शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे, जीवित अथवा वित्त हानी होता कामा नये. याची सकल मराठा बांधवांनी दखल घ्यावी व आपला जिल्हा शांतता प्रिय आहे. हे सर्वांना दाखवून द्यावे ही विनंती.
पोलिस अधीक्षक – अतुल कुलकर्णी
रा.गे शिंदे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रा. गे.शिंदे गुरुजी यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
परांडा (दि.२ सप्टेंबर) परंडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे संस्थापक अध्यक्ष कै.रा गे शिंदे गुरुजी यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
जयंतीनिमित्त दि३सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान बुद्धिबळ स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन,ग्रंथ प्रदर्शन, रक्तदान शिबिर,वैज्ञानिक जाणीव व दृष्टीकोण आणि दि ७ सप्टेंबर रोजी शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे .या रॅलीमध्ये बैलगाडी मध्ये मिरवणूक काढण्यात येत आहे. झांज पथक लेझीम पथक या रॅलीचे खास आकर्षण असणार आहे.
या कार्यक्रमासाठी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील शिंदे,संस्थेच्या सहसचिव मंगल उर्फ शीलाताई देठे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.जयंतीनिमित्त कार्यक्रमांमध्ये आयोजीत केलेल्या विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी केले आहे.























































