Home Blog Page 29

१५ एप्रिल २०२५ पासून ‘Farmer ID’ अनिवार्य – महाराष्ट्र शासनाचा निर्णय

मुंबई, ११ एप्रिल २०२५: महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ अधिक पारदर्शक, जलद व प्रभावी पद्धतीने मिळावा यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘शेतकरी ओळख क्रमांक’ म्हणजेच Farmer ID अनिवार्य करण्यात येणार आहे.

शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने आज (११ एप्रिल २०२५) यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (क्र. अॅग्रिस्टॅ-२०२५/प्र.क्र.६७) जाहीर केला.

काय आहे ‘Farmer ID’?

शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) हा एक डिजिटल क्रमांक असून, तो शेतकऱ्याच्या आधार क्रमांक, जमिनीच्या अभिलेखातील माहिती, हंगामी पिकांचे डेटा आणि जमिनीच्या जिओ-रेफरन्ससह (भू-संदर्भिकृत) तयार केला जातो. हे संपूर्ण डेटा संकलन AgriStack योजनेअंतर्गत एकत्रित केले जात आहे.

मुख्य निर्णय व अंमलबजावणी:

  1. १५ एप्रिल २०२५ पासून Farmer ID अनिवार्य:
    या तारखेपासून कोणत्याही कृषी योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी Farmer ID बंधनकारक असेल.
  2. तांत्रिक सुधारणा व समन्वय:
    संबंधित सर्व पोर्टल्स, संकेतस्थळे व ऑनलाइन प्रणालींमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश कृषि आयुक्तांना देण्यात आले आहेत.
  3. API द्वारे प्रणाली जोडणी:
    AgriStack प्रणालीशी भूमिअभिलेखातील डेटा आणि पिकांची माहिती जोडण्यासाठी API वापरून तांत्रिक समन्वय केला जाईल.
  4. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे:
    ज्यांनी अद्याप Farmer ID साठी नोंदणी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना ग्राम कृषी विकास समिती, CSC केंद्रे आणि क्षेत्रीय यंत्रणांच्या माध्यमातून प्रवृत्त केले जाईल.
  5. प्रसिद्धी व जनजागृती:
    Farmer ID अनिवार्य असल्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश आयुक्त (कृषि) यांना देण्यात आले आहेत.

Farmer ID नोंदणी का गरजेची आहे?

  • योजनांचा लाभ मिळवताना अचूक ओळख पटते
  • माहितीच्या आधारे लाभ प्रक्रिया जलद होते
  • शेतकऱ्याच्या जमिनीचा व पिकांचा ट्रॅकिंग सुलभ होतो
  • डिजिटल प्रणालीद्वारे शासकीय कामकाज अधिक पारदर्शक बनते

शेतकऱ्यांसाठी सूचना:

  • अद्याप Farmer ID साठी नोंदणी न केलेल्यांनी तातडीने AgriStack पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी.
  • नोंदणीसाठी आपला आधार क्रमांक, सातबारा उतारा, शेतीविषयक दस्तावेज तयार ठेवावेत.
  • आवश्यक असल्यास नजीकच्या CSC केंद्रात जाऊन सहाय्य घ्यावे.

शस्त्र परवान्याची तक्रार ; तत्कालीन जिल्हाधिकारी, तत्कालीन पोलिस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार यांची नावे

सात दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे आदेश

धाराशिव – ॲट्रॉसिटी चा गुन्हा असताना शस्त्र परवाना रद्द न केल्याचा गंभीर आरोप करणारी तक्रार लहू खंडागळे यांनी राज्यपाल यांच्याकडे केली होती तीच तक्रार त्यांनी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे १८ मार्च रोजी केली होती त्यात धाराशिव चे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, तत्कालीन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड, तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या नावाचा समावेश असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच त्याच तक्रारीच्या स्मरणपत्र कार्यरत पोलिस अधीक्षक यांची देखील चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत अनुसूचित जाती जमाती आयोगाने विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, पोलिस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांना प्रकरणाची चौकशी करून ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ॲड. शरद जाधवर सरकारी वकील होते ३१ ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला होता. त्यांच्यावर यांच्यावर १७ मार्च २०२३ रोजी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. ०१ सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी नवीन शस्त्र खरेदी केले ते केल्यानंतर त्याची पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांनी करून घेतली मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्यावर दाखल असलेला गुन्ह्याची पडताळणी न करता ॲड. जाधवर यांना खरेदी केलेल्या नव्या शस्त्राचा परवाना देऊन टाकला आणि त्याची नोंद देखील घेतली. पोलिस विभागाने देखील गुन्ह्याची पडताळणी न केल्याचा गंभीर आरोप तक्रारी मध्ये करण्यात आला आहे. तसेच या सर्व अधिकाऱ्यांनी संगनमताने हा शस्त्र परवाना ॲड. शरद जाधवर यांना दिल्याचे तक्रारीत म्हणले होते.

जिल्ह्यात नुकत्याच दहा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिले होते ते प्रकरण तापलेले असतानाच प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याने प्रशासनात खळबळ माजली असून आयोगाच्या धडाक्यामुळे खाबूगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.

तक्रारदार – लहू खंडागळे

श्री येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रा: वाहतुकीत मोठा बदल; 11 ते 13 एप्रिल दरम्यान अवजड वाहनांना मार्गावर बंदी

धाराशिव, ता. 9 एप्रिल 2025:
श्री येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रा 9 एप्रिलपासून 18 एप्रिल 2025 पर्यंत मोठ्या भक्तिभावाने साजरी होणार आहे. येरमाळा (ता. कळंब) येथे होणाऱ्या या धार्मिक यात्रेमध्ये हजारो भाविक महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता, वाहतुकीचा सुरळीत प्रवाह व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासनाने वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांच्या अहवालावरून जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) व पोलीस अधीक्षक संजय जाधव (भा.पो.से.) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ब) अंतर्गत अधिकार वापरत 11 एप्रिल रोजी 00:01 पासून ते 13 एप्रिल रोजी 24:00 पर्यंत येरमाळा परिसरातील विविध मार्गांवरून अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

वाहतूक बंद राहणारे मार्ग (अवजड वाहनांसाठी):

  1. छत्रपती संभाजीनगर → येरमाळा → कुसळंब → बार्शी
  2. बार्शी → कुसळंब → येरमाळा → छत्रपती संभाजीनगर
  3. कळंब → येरमाळा → कुसळंब → बार्शी
  4. बार्शी → कुसळंब → येरमाळा → कळंब
  5. बार्शी → कुसळंब → येरमाळा → परळी / परभणी
  6. परळी / परभणी → येरमाळा → कुसळंब → बार्शी
  7. कळंब → येरमाळा → छत्रपती संभाजीनगर
  8. छत्रपती संभाजीनगर → येरमाळा → कळंब

पर्यायी मार्ग (अवजड वाहनांसाठी):

  • छत्रपती संभाजीनगर → येरमाळा उड्डाणपूल → येडशी → बार्शी
  • बार्शी → कुसळंब → पांगरी → येडशी → येरमाळा उड्डाणपूल → छत्रपती संभाजीनगर
  • कळंब → मोहा फाटा → दहीफळ → येडशी → पांगरी → कुसळंब → बार्शी
  • बार्शी → कुसळंब → पांगरी → येडशी → दहीफळ → मोहा फाटा → कळंब
  • बार्शी → कुसळंब → पांगरी → येडशी → ढोकी → कळंब → परळी → परभणी
  • परभणी → परळी → कळंब → ढोकी → येडशी → पांगरी → कुसळंब → बार्शी
  • कळंब → मनुष्यबळपाटी → मांडवा → वाशीफाटा → छत्रपती संभाजीनगर
  • छत्रपती संभाजीनगर → वाशीफाटा → मांडवा → मनुष्यबळपाटी → कळंब

सूट असलेली वाहने:

  • पोलीस, रूग्णवाहिका, अग्निशमन दल
  • अत्यावश्यक सेवेतील वाहने
  • हलकी वाहने व एस.टी. बसेस
  • श्री येडेश्वरी देवी यात्रेदरम्यान भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता प्रशासनाने ही वाहतूक योजना तयार केली आहे. वाहनचालक व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; धाराशिव जिल्ह्यातील ७ गुन्हे उघडकीस

धाराशिव

दि. १९ मार्च २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे गंधोरा पाटी येथे रिन्यू कंपनीच्या पवनचक्कीवर गंभीर स्वरूपाचा दरोडा घालण्यात आला होता. काही अज्ञात चोरट्यांनी पवनचक्कीचे रखवालदारांना बांधून ठेवून त्यांना मारहाण केली आणि पवनचक्कीच्या आतील वायरमधून तांब्याच्या तारा जबरदस्तीने चोरी करून नेल्या. या घटनेबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा क्रमांक ८८/२५ नोंदवून भारतीय भान्या संहितेच्या कलम ३०९(६), ३२४(५), ३(५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ आणि परिसराची पाहणी केली. तांत्रिक साधने आणि पारंपरिक गोपनीय माहितीच्या आधारे काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले.

याच अनुषंगाने मिळालेल्या माहितीच्या आधारे १) सुनिल कालीदास शिंदे (वय ३६, रा. दत्तनगर पारधी पिढी, ढोकी, ता. धाराशिव), २) सरदार उर्फ गणेश शंकर काळे (रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव, सध्या रा. येळंब घाट, ता. जि. बीड), ३) राहुल लाला शिंदे (वय २९, रा. दत्तनगर पारधी पिढी, ढोकी, ता. धाराशिव) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान तिन्ही आरोपींनी सदर गुन्हा स्वतःसह आणखी आठ आरोपींनी मिळून केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी याआधी धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या अशाच स्वरूपाच्या आणखी सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण ७२१ फूट लांबीची तांब्याची तार आणि गुन्ह्यात वापरलेले टाटा सुमो वाहन असा एकूण १२,२३,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे पवनचक्की कंपन्यांनी समाधान व्यक्त केले असून, या लुटमार करणाऱ्या टोळीचा बंदोबस्त झाल्यामुळे जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकातील सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फहरान पठाण, दयानंद गादेकर, पोअं योगेश कोळी, चालक नितीन भोसले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

अनुसूचित जाती जमाती आयोगाचा जमीन हस्तांतरण प्रकरणात दणका

अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, दोन तहसीलदार, दोन नायब तहसीलदार, दोन मंडळ अधिकाऱ्यांसह दोन तलाठ्याची होणार विभागीय चौकशी

धाराशिव, -राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाने धाराशिव जिल्ह्यातील जमीन हस्तांतरण प्रकरणात मोठा दणका देत दहा शासकीय अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीचे निर्देश दिले आहेत. आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ (मंत्री दर्जा), उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम आणि सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे यांच्यासमोर आज झालेल्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला. प्रकरण क्रमांक २२०/२०२४ अंतर्गत तक्रारदार स्वप्नील कालिदास व्हटकर आणि नितीन कालिदास व्हटकर यांनी मागासवर्गीय कुटुंबाची शेतजमीन बनावट कागदपत्रांद्वारे हस्तगत करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. तक्रारीत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.सुनावणीत तक्रारदारांनी सांगितले की, पंकज शिवाजी पडवळ, शुभांगी पंकज पडवळ आणि मेघराज पंकज पडवळ यांनी तत्कालीन तलाठी रेश्मा बी. पाटील आणि सह दुय्यम निबंधक अधिकारी, वर्ग-२, धाराशिव यांच्या संगनमताने खडकाळ पडीक जमिनीला कागदोपत्री बागायत क्षेत्र दाखवले. संगणीकृत ७/१२ उताऱ्यावर हस्तलिखित ऊस पिकाची नोंद करून चुकीच्या चतुःसीमांसह बनावट दस्त क्र. ४८३६/२२ आणि ४८३७/२२ (दि. १८/०८/२०२२) नोंदणीकृत करण्यात आले. तत्कालीन मंडळ अधिकारी एन. डी. नागटिळक यांनी दि. ०२/०१/२०२४ रोजी केलेल्या पंचनाम्यात गट नं. ७२४ खडकाळ आणि पडीक असल्याचे नमूद केले होते, परंतु त्यांनीच खरेदीदारांना फायदा होईल असा अहवाल सादर केला. तक्रारदारांनी यात शासकीय अधिकाऱ्यांनी खरेदीदारांना मदत केल्याचा ठपका ठेवला.सुनावणीस तक्रारदार उपस्थित होते, तर जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यावतीने तहसीलदार डॉ. मृणाल जाधव आणि सह जिल्हा निबंधक रामहरी जानकर हजर होते. विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने कोणीही उपस्थित राहिले नाही. रेश्मा बी. पाटील यांनी कामाचा ताण आणि स्वयंघोषणापत्रावरून पिकाची नोंद केल्याचे सांगितले, तर सह दुय्यम निबंधकाने दस्त नोंदणी कायदेशीर असल्याचा दावा केला. एन. डी. नागटिळक यांनी फेरफार नियमानुसार मंजूर झाल्याचे स्पष्ट केले, तर अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी नोंदणीकृत दस्तावर फेरफार मंजूर केल्याचे सांगितले.तक्रारदारांनी तहसीलदार प्रवीण पांडे, अभिजित जगताप, अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, तलाठी प्रवीण भातलवंडे, मंडळ अधिकारी डी. डी. मुळुक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर शासकीय पदाचा गैरवापर करून खरेदीदारांना पाठबळ दिल्याचा आरोप केला. विभागीय आयुक्तांचे स्थगिती आदेश असतानाही फेरफार नोंद (क्र. ६१४० आणि ६१३३) बेकायदेशीरपणे मंजूर झाल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रकरणी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.आयोगाने सविस्तर चर्चेनंतर विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना खालील दहा अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले: रेश्मा बी. पाटील (तत्कालीन तलाठी), एन. डी. नागटिळक (तत्कालीन मंडळ अधिकारी), प्रवीण भातलवंडे (तलाठी), डी. डी. मुळुक (मंडळ अधिकारी), शिरीष यादव (अपर जिल्हाधिकारी), योगेश खरमाटे (तत्कालीन उपविभागीय अधिकारी), प्रवीण पांडे (तत्कालीन तहसीलदार), अभिजित जगताप (तहसीलदार), श्रीमती. प्रियांका लोखंडे-काळे (नायब तहसीलदार). अर्चना मैंदर्गी(तत्कालीन तहसीलदार महसूल शाखा)याशिवाय, सह दुय्यम निबंधक, वर्ग-१ यांना दस्त लिहून देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर कारवाई, बेकायदेशीर फेरफार नोंद रद्द करून पूर्ववत करण्याचे आणि कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.या कारवाईने शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मागासवर्गीय कुटुंबाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या तक्रारदारांना न्याय मिळण्याची आशा आहे. विभागीय चौकशीतून सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आरोपी एक, व्यक्ती तीन, 200 कोटींचा घोटाळा करणारे निर्माते रचताहेत वेगवेगळी कहाणी

जिल्हा पुरवठा विभागाच्या कारनाम्यापुढे क्राईम वेब सिरीज सुद्धा फिकी पडेल !


भाग १०

आकाश नरोटे
८४२१५३१९७६

धाराशिव – सध्या मनोरंजन म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म वर वेब सीरिज मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात. हर्षद मेहता, तेलगी घोटाळा या वेब सिरीज प्रचंड गाजल्या. धाराशिव जिल्ह्यात पुरवठा विभागात देखील प्रचंड मोठा घोटाळा आहे त्यासमोर ओटीटी वर प्रसारीत झालेल्या वेब सिरीज देखील फिक्या पडतील. गोर गरिबांचे धान्य काळाबाजारात विकले जाते हे केवळ ऐकीवात आहे मात्र दैनिक जनमत ने लावून धरलेली वृत्तमालिका हा घोटाळा कसा होतो, कोणते अधिकारी यात सामील असू शकतात, त्यात कंत्राटदाराला हाताशी धरून, शासकीय नियम अक्षरशः पायदळी तुडवून हा घोटाळा केला जात आहे यावर भाष्य केले गेले आहे. सध्या तरी घोटाळ्याची ही वेब सिरीज मध्यंतरापर्यंत येऊन पोहचली असून कारवाई करून जिल्हाधिकारी नायक ठरतात की नाही हे मध्यांतरानंतर समजणार आहे.
सध्या तांदूळ अफरातफर प्रकरणातील आरोपी पकडला गेला असल्याचे सर्वांना माहिती आहे. पोलिसांनी पकडलेला आरोपी अखिल शेख आहे, ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला तो अलीम शेख आहे.आणि पुरवठा विभागाच्या ट्रान्सपोर्ट पासवर आणखी एक नाव समोर आले ते म्हणजे सलीम शेख. पोलिस अखिलच अलीम आहे आणि पकडलेल्या आरोपीने हा गुन्हा केला आहे असे सांगतात. मात्र मिळालेल्या माहितीनुसार ज्याने गुन्हा केला आणि जो १४ फेब्रुवारी रोजी ट्रक चालवत होता तो अलीम शेख हा अल्पवयीन असून त्याचे वय समोर येऊ नये म्हणून एका बड्या व्यक्तीच्या खडी क्रशरच्या वाहनावर चालक म्हणून अखिल शेख कामाला आहे अशी कुजबुज झाली सुरू असून नेमके सत्य काय आहे हे पोलीस तपासातून समोर येणार आहे. तर सलीम शेख हा अलीम शेखचा जवळचा नातलग आहे अशी देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. ढोकी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विलास हजारे यांना आरोपी हा अल्पवयीन आहे का याबाबत विचारले असता त्यांनी तो अल्पवयीन नसल्याचे सांगितले मात्र पोलिसांना संभ्रमित करण्यासाठी कंत्राटदार आणि पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी वेगळेच कुंभाड रचले असून अखिल शेख हा आरोपी सांगितला तसा पुरवणी जबाब देखील दिल्याची माहिती आहे. मात्र आरोपी नेमका कोण आहे हे याची शहानिशा पोलिसांनाच करावी लागणार आहे.तत्पूर्वी पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज, अधिकाऱ्यांचे सीडीआर घेतला तरच हा तपास पूर्ण होणार आहे. अन्यथा घोटाळ्याच्या वेब सिरीज मधील ८.९४ क्विंटल तांदूळ अफरातफरचा भाग कायमचा आणि अर्धवट रित्या बंद झालेला असेल.

घोटाळा नेमका कसा?

अनेकांना प्रश्न पडला की हा घोटाळा नेमका कसा होत आहे तर यात महत्वाची गोष्ट आहे ती ट्रक आणि त्यात बसवलेली जीपीएस सिस्टिम. कंत्राटदाराने आतापर्यंत जीपीएस नसलेल्या गाड्या वापरल्याचे बोलले जात आहे. जीपीएस संनियंत्रण कक्षात देखरेखीचे कामकाज होत नसल्याने कंत्राटदार अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून अवैध वाहतुकीच्या माध्यमातून हे धान्य काळ्या बाजारात विकायला नेतो अशी चर्चा आहे. तसेच कंत्राटामध्ये ज्या गाड्या आहेत त्याच्या ऐवजी खाजगी गाड्या अगदी नाममात्र भाड्याने लावून बक्कळ नफा यातून कमाई केली जाते आणि हाच तो रू.२०० कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका गुलदस्त्यात

अफरातफर प्रकरणी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या कार्यकाळात त्यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले मात्र त्यानंतर त्यांची बदली झाली. नवे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले तेव्हा त्यांच्या समोर हा विषय गेल्यानंतर पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांना संभ्रमात ठेवले तरी देखील त्यांनी गोदामाची पाहणी केली, काही बैठका देखील घेतल्या मात्र कारवाईचं पान त्यांनी अद्याप न हलवल्याने ते हिरो ठरतात की नाही याचा अंदाज कोणालाच नाही. मात्र त्यांची गुलदस्त्यातील भूमिका देखील उलट सुलट चर्चा घडवून आणत आहे.

….तर घोटाळ्याची व्याप्ती वाढणार

दैनिक जनमत ने लावून धरलेल्या वृत्त मालिकेतून जिल्हा पुरवठा विभागाची दैना उडाली असून कारवाई न झाल्याने वेगवेगळी माहिती समोर येत आहे. जिल्ह्यात रेशन दुकानांचे रेकॉर्ड मेन्टेन नसल्याची चर्चा आहे विशेषतः अनेक दुकानांचे युनिट रजिस्टर मेन्टेन नाही हा देखील मोठा घोटाळा बाहेर निघू शकतो याची सखोल चौकशी झाली तर घोटाळ्याचा आकडा १ हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. युनिट रजिस्टर संदर्भात देखील उलट सुलट चर्चा असून पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने ते मेन्टेन न ठेवता काळ्या बाजारात धान्य पाठवण्याची सोय केली जात असून गेल्या अनेक महिन्यांपासून हे सुरू असल्याचे बोलले जात असल्याने घोटाळ्याचा आकडा वाढला तर नवल वाटायला नको.

आज आरोपीला न्यायालयात हजर करणार !

३० मार्च रोजी आरोपीला कर्जत येथून पकडले. दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर देखील केले मात्र आरोपीचे आधार कार्ड नसल्याने त्याला अद्याप जामीन मिळाला नाही. आज ७ एप्रिल रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याने न्यायालय या प्रकरणाकडे कसे पाहते, पोलिसांना कोणते आदेश देते? पुरवठा विभागाच्या कारभाराकडे कसे पाहते? त्यावरच या प्रकरणाची दिशा ठरणार आहे.

विद्यार्थिनीचा अखेरचा निरोप मनोगतातच… ऱ्हदय विकाराच्या धक्क्याने B.Sc. तृतीय वर्षातील वर्षा खरात हिचे निधन

परंडा, दि. ५ एप्रिल – शिक्षण महर्षी रा.गे. शिंदे महाविद्यालय, परंडा येथे निरोप समारंभाच्या कार्यक्रमात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. B.Sc. च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या कु. वर्षा भारत खरात या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करत असताना अचानक स्टेजवर कोसळून अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे जागीच मृत्यू झाला. ही अत्यंत दुःखद घटना शुक्रवार, दिनांक ४ एप्रिल रोजी दुपारी घडली.

कु. वर्षा खरात ही मूळची माढा तालुक्यातील नाडी गावच्या रहिवासी होती. १० वी नंतर त्यांनी परंडा येथील शिक्षण महर्षी रा.गे. शिंदे महाविद्यालयात B.Sc. च्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला होता. गेली तीन वर्षे त्या अत्यंत मन लावून शिक्षण घेत होती. ५ एप्रिलपासून B.Sc. तृतीय वर्षाच्या परीक्षेला सुरुवात होणार होती. त्याआधी कॉलेजकडून विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात सहभागी होत वर्षा खरात आपले मनोगत व्यक्त करत होती. तिने बोलण्यास सुरुवात केल्यानंतर काही क्षणातच त्या अचानक स्टेजवर कोसळली. कार्यक्रमात उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

वर्षा हिला बालपणापासूनच हृदयाचा त्रास होता. तिच्यावर सुमारे १५ वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, अशी माहिती तिचे वडील भारत खरात यांनी दिली. शिक्षणात प्रगतीशील, मित्रमैत्रिणींसोबत मनमिळावू स्वभाव असलेल्या वर्षा यांच्या अकस्मात निधनाने महाविद्यालयात आणि नाडी गावात शोककळा पसरली आहे.

कॉलेज प्रशासनाच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जड अंतःकरणाने कु. वर्षा खरात यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विद्यार्थिनींच्या अशा आकस्मिक निधनाने महाविद्यालयात एक वेगळेच शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

या दुःखद घटनेमुळे वर्षाच्या शिक्षक, वर्गमित्र, मैत्रिणी आणि संपूर्ण महाविद्यालय कुटुंबाने हळहळ व्यक्त केली आहे. तिच्या आठवणी आणि चेहऱ्यावरचं हसू कायम लक्षात राहील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

धर्मादाय रुग्णालयांनी नियम पाळले नाहीत, तर शिवसेना स्टाईलने कारवाई केली जाईल – शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांचा इशारा

सोलापूर, ५ एप्रिल – सोलापूर शहर व जिल्ह्यातील धर्मादाय कायद्यांतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार न दिल्यास शिवसेना स्टाईलने कारवाई केली जाईल, असा कडक इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी दिला आहे. धर्मादाय रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट आणि उपचारास टाळाटाळ हे प्रकार आता सहन केले जाणार नाहीत, असा सज्जड दम त्यांनी दिला.

शहरातील अनेक रुग्णालये धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असून शासनाने निश्चित केलेल्या सवलतीच्या दरानुसार रुग्णांना उपचार देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. या रुग्णालयांनी गरजू रुग्णांसाठी ठरवलेला कोटा राखीव ठेवणेही आवश्यक आहे. मात्र, अनेक रुग्णालये या नियमांकडे दुर्लक्ष करून वैद्यकीय सेवेचा व्यवसाय करत आहेत. गरिबांपासून लाखो रुपये उकळणे, उपचार न देणे यासारखे प्रकार वाढीस लागले आहेत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मनिष काळजे यांनी सोलापुरात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस भूमिका घेतली आहे.

मनिष काळजे यांनी सांगितले की, “रुग्णसेवा ही ईश्वरसेवा आहे, हे विसरून अनेक रुग्णालये लुटीचे साधन बनली आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागणार आहे. धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर उपचाराच्या दरांचे डिजिटल फलक किंवा डॅशबोर्ड लावणे बंधनकारक आहे. जे रुग्णालये हे पालन करणार नाहीत त्यांना थेट शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल.”

शिवसेनेने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, धर्मादाय रुग्णालयांमध्ये जर कोणालाही सवलतीच्या दरात किंवा मोफत उपचार नाकारण्यात आले, तर त्यांनी त्वरित सात रस्ता परिसरातील शिवसेना भवन येथे संपर्क साधावा. अशा हॉस्पिटलविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“धर्मादाय कायद्याचा अवमान करणाऱ्या कोणत्याही रुग्णालयाची गय केली जाणार नाही,” असे ठाम शब्दांत सांगत मनिष काळजे यांनी सोलापूरमधील सर्व रुग्णालयांना सजग राहण्याचा इशाराच दिला आहे.

सोलापुरात दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू, एक गंभीर – नागरिकांमध्ये संतापाची लाट

सोलापूर, प्रतिनिधी: राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच सोलापुरातील मोदी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले आहे. बाबू जगजीवनराम झोपडपट्टी भागात दूषित पाणी प्याल्याने दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहे.

मृत्यू झालेल्या मुलींची नावे भाग्यश्री म्हेत्रे (वय १६) आणि जिया महादेव म्हेत्रे (वय १६) अशी आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघींनी झोपडपट्टीतील नळाद्वारे मिळालेलं पाणी प्यायलं होतं. त्यानंतर त्यांच्या तब्येती अचानक बिघडल्या. तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन मुलींचा मृत्यू झाला. तिसरी विद्यार्थिनी गंभीर अवस्थेत उपचार घेत असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

दूषित पाणीपुरवठ्यावर संतप्त प्रतिक्रिया

स्थानिक रहिवाशांनी महापालिकेवर आणि प्रशासनावर थेट आरोप करत, गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू असल्याचे सांगितले. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. या भागात राहणाऱ्या महिलांनी उद्विग्नतेने सांगितले, “आम्ही झोपडपट्टीत राहतो, काम करून पोट भरतो. विकत पाणी घेण्याची ऐपत नाही, खासगी रुग्णालयात उपचार घेणेही शक्य नाही. तरीही आम्हाला चांगलं, सुरक्षित पाणी मिळालं पाहिजे, हा आमचा मूलभूत अधिकार आहे.”

राजकीय प्रतिक्रिया आणि प्रशासनाची दखल

घटनेची माहिती मिळताच भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आमदार कोठे यांनी माध्यमांशी बोलताना दूषित पाणीपुरवठ्याच्या स्थानिकांच्या आरोपांना दुजोरा दिला आणि महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.

दोन निरागस मुलींच्या मृत्यूमुळे महापालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहितीही प्रशासनाने दिली आहे.

प्रणिती शिंदेंची कुटुंबीयांना भेट

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी मृत मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी तेथील वातावरण अत्यंत हृदयद्रावक होते. कुटुंबीयांचा आक्रोश आणि दुःख काळीज हेलावून टाकणारे होते. शिंदे यांनी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

सार्वजनिक आरोग्यावर धोका

ही घटना केवळ एक अपवाद नाही, तर संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दुरवस्थेचं उदाहरण आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, लहान मुलांचे प्राण जाणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षित आणि शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

शासन आणि प्रशासन यांना जागे होण्याची गरज

सोलापूरसारख्या मोठ्या शहरात अशा प्रकारच्या घटनांमुळे शासन व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ आश्वासनांनी नव्हे, तर ठोस कृतीनेच अशा दुर्घटनांना आळा बसू शकतो. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष देणे ही काळाची गरज आहे.

रानडुकराच्या हल्ल्यात 63 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी

माळकरांजा (ता. कळंब) : गावातील 63 वर्षीय आगतराव दत्तात्रय लोमटे हे शेळ्या राखण्यासाठी शेतात गेले असता त्यांच्यावर अचानक भल्या मोठ्या रानडुकराने जीवघेणा हल्ला केला. या धक्कादायक घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली असून, एका तासाहून अधिक काळ त्यांनी रानडुकराशी झटापट करत स्वतःचा जीव वाचवला.

ही घटना शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. रानडुकराच्या हल्ल्यात लोमटे यांच्या उजव्या हाताची दोन बोटे आणि डाव्या हाताची एक बोट तुटली आहे. तसेच डोळ्याच्या वर डुकराने जोरदार पकडल्याने मोठी जखम झाली आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे रक्तबंबाळ झाला असून, अधिक दुखापत झाली आहे.

लोमटे यांनी खचून न जाता धाडसाने प्रतिकार केला आणि अखेर कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ मदतीला धाव घेतली. प्राथमिक उपचार ढोकी येथील आरोग्य केंद्रात करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी त्यांना धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी आणि जनावरे यांची सुरक्षा धोक्यात येत असल्याने वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे