Home Blog Page 27

मंदिर संस्थान कार्यालयात पुजाऱ्याचा धुडगुस; मद्यधुंद अवस्थेत तोडफोड – गुन्हा दाखल

तुळजापूर, ता. 14 (प्रतिनिधी): श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर संतप्त झालेल्या पुजारी अनुप कदम यांनी मद्यधुंद अवस्थेत मंदिर संस्थान कार्यालयात येऊन तहसीलदार तथा संस्थान व्यवस्थापकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गोंधळ घालून तोडफोड केली. या प्रकारामुळे संस्थान प्रशासनाने तुळजापूर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 13 एप्रिल रोजी अनुप कदम यांनी मंदिराच्या व्हीआयपी गेटवर सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आणि जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर 15 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी तथा संस्थान अध्यक्ष यांच्या कार्यालयीन दालनात अप्पर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी हुज्जत घालून वाद निर्माण केला. याच दिवशी त्यांनी सुरक्षा नियम धाब्यावर बसवत, संस्थानच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमचा दरवाजा लाथ मारून उघडल्याची घटना घडली.

ही सर्व प्रकरणे सुरक्षा रक्षक पुरवठादार कंपनी SISPL Pvt. Ltd. कडून प्राप्त अहवालाद्वारे स्पष्ट झाली असून, त्याची पुष्टी संस्थान प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजद्वारे केली आहे. यानंतर प्रशासनाने 12 मे रोजी अनुप कदम यांना देऊळ कवायत कायदा 1954 च्या कलम 24 व 25 अंतर्गत तीन महिन्यांच्या मंदिर प्रवेश बंदीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

मात्र याचा राग मनात धरून, दिनांक 13 मे रोजी अनुप कदम यांनी पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत मंदिर संस्थान कार्यालयात येत तहसीलदारांना उद्देशून अश्लील भाषेचा वापर केला. यावेळी त्यांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची काच हाताने फोडली.

या प्रकारानंतर मंदिर संस्थान प्रशासनाने तात्काळ कारवाई करत तुळजापूर पोलिस ठाण्यात अनुप कदम यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 221 (सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन), 352 (दमदाटी), आणि 324(4) (सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे संस्थान परिसरात खळबळ उडाली असून, भाविकांमध्ये संतापाची भावना आहे.

मुरुमायण चा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात — ढिम्म प्रशासन आता तरी हालेल का?

भाग ४

धाराशिव – तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणाऱ्या मुरुमाच्या अवैध उत्खननाचे प्रकरण ‘मुरुमायण’ या नावाने जिल्ह्यात चांगलेच गाजू लागले असतानाच, आता या चेंडूची उंच फेक थेट पालकमंत्र्यांच्या कोर्टात झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत झोपलेले प्रशासन जागे होईल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

मुंबईत नुकतीच धाराशिव जिल्ह्यातील विविध विकासकामांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीस जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान काक्रंबा उड्डाणपुलासाठी सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खननाचा मुद्दा समोर आला आणि सूत्रांच्या माहितीनुसार, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

हे प्रकरण बाहेर आल्यावरही अद्याप कंत्राटदारावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे सामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. उलटपक्षी, महसूल प्रशासनाचा मूक पाठिंबा असल्याची शंका अधिकच बळावली आहे. या सगळ्या प्रकारातून शासनाचा लाखोंचा महसूल गमावला जात आहे आणि याला जबाबदार ठरणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.

तहसीलदार ज्योती चव्हाण यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, “उत्खनन खरंच अवैध पद्धतीने झाले आहे का, यासाठी ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करून चौकशी केली जाणार आहे. कंत्राटदाराने दोन गटातून परवानग्या घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणात तहसीलदार अरविंद बोळंगे व संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी यांना वस्तुस्थिती तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.

मात्र याआधी जे काही घडले, ते प्रशासनाच्या थंडपणामुळेच घडले असल्याचा आरोप आता जनतेकडून केला जात आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांच्या निर्देशांनंतर जिल्हा प्रशासन खरेच हालते का, की पुन्हा एखाद्या नव्या मुरुमायणची वाट पाहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

धाराशिव भाजप जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची पुनर्नियुक्ती

धाराशिव : भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवला असून, त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातील यशस्वी नेतृत्वाची दखल घेत जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा त्यांच्या हाती सोपवण्यात आली आहे.

दत्ता कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मागील कार्यकाळात नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा अशा महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला धाराशिव जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळाले होते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या विश्वासामुळे भाजपाची घडी जिल्ह्यात अधिक बळकट झाली होती.

नव्या कार्यकाळातही पक्ष संघटन मजबूत करण्यासोबत आगामी निवडणुकांची तयारी, स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका आणि जनसंपर्क वाढवणे या दिशेने ते काम करतील, असा विश्वास भाजपाच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त केला जात आहे.

भूमी अभिलेख कार्यालयातील निमतनदार लाच घेताना रंगेहाथ अडकला

धाराशिव, दि. 10 मे 2025 – शेतजमिनीची हद्द कायम मोजणी करून खुणा करण्यासाठी 5000 रुपयांची लाच मागणारा भूमी अभिलेख विभागातील निमतनदार राजू गंगाराम काळे (वय 54) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराने आपल्या शेतजमिनीची (गट क्र. 239) हद्द कायम मोजणीसाठी उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, कळंब येथे अर्ज केला होता. त्यानुसार 8 मे रोजी मोजणी करण्यात आली. त्यानंतर खुणा करण्याच्या मोबदल्यात काळे यांनी तक्रारदाराकडे 5000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती.

त्यानुसार 9 मे रोजी शिवाजी चौक, कळंब येथे पंचासमक्ष पडताळणी केली असता काळे यांनी लाच मागणी पुन्हा स्पष्ट केली. त्यानंतर सापळा रचून पहिल्या हप्त्यापोटी 3000 रुपये घेत असताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.

अंगझडतीमध्ये 3000 रुपयांची लाच रक्कम, त्याव्यतिरिक्त 7620 रुपये रोख, एक सोन्याची अंगठी, मोजणीसंबंधी कागदपत्रांची फाईल, Vivo मोबाईल आणि Asus लॅपटॉप आढळून आले. तसेच आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याच्या घरी झडती सुरू आहे.

या प्रकरणी भ्र.प्र. अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली सिध्दाराम म्हेत्रे (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस अंमलदार सिद्धेश्वर तावसकर, शशिकांत हजारे, आशिष पाटील व जाकेर काझी यांचा समावेश होता.

भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार देण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064 किंवा 9923023361 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अवैध गावठी कट्ट्यासह एक बालक ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ढोकी : तेरणा साखर कारखाना (ढोकी) समोरील पारधी पेढी परिसरात एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर पथकाने शुक्रवारी (दि. ९ मे) सकाळी १०.४५ वाजता छापा टाकत कारवाई केली.

कारवाईदरम्यान संशयित बालकाला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे मिळाली. मात्र अधिक विश्वासात घेतल्यानंतर त्याने गावठी कट्टा घरातील लाकडी कपाटात लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार दोन पंचांच्या उपस्थितीत घराची झडती घेण्यात आली असता, गावठी कट्टा सापडला. पोलिसांनी पंचनामा करून सुमारे १५ हजार रुपये किमतीचा कट्टा जप्त केला.

जप्त शस्त्रासह संबंधित बालकाला ढोकी पोलिस ठाण्यात पुढील कारवाईसाठी दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण व चालक पो.कॉ. भोसले यांच्या पथकाने केली.

अवैध मुरुम उत्खनन प्रशासनाची कासवगती कंत्राटदाराला धार्जिण

प्रशासन गप्प, कारवाई शून्य; ‘मुरुमायण’ प्रकरणात कोणाचे संरक्षण?

भाग 3

धाराशिव, प्रतिनिधी |
तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणारा मुरुम बेकायदेशीर पद्धतीने, परवानगीशिवाय किंवा चुकीच्या परवानग्यांद्वारे उत्खनन करून आणल्याचा प्रकार आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. या प्रकरणावर कारवाई करणे तर दूरच, पण जिल्हा प्रशासनाची संपूर्ण भूमिका संशयास्पद व एकतर्फी असल्याने, कंत्राटदाराला मोकळे रान मिळत आहे.

कंत्राटदाराचा आडमुठेपणा की प्रशासनाचा पाठिंबा?
प्रशासनाला उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या मुरुमाचे प्रमाण माहित असताना, प्रत्यक्षात ज्या ठिकाणांहून मुरुम नेण्यात आला आहे, त्या जागांसाठी ना परवानगी, ना लेखी नोंद — मग इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन चालू राहते तरी कसे? हे चित्र पाहता, कारवाई करण्याऐवजी प्रशासन कंत्राटदाराच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट होते.

‘मुरुमायण’च्या पाठीमागे कोण?
सध्या ‘काक्रंबा उड्डाणपुल मुरुम घोटाळा’ हे संपूर्ण प्रकरण जणू एखाद्या नाट्यपूर्ण कथानकासारखे वाटत आहे. जिल्ह्यातच परवानग्या घेतल्या गेल्या असल्या तरी प्रत्यक्ष उत्खनन दुसऱ्याच गावांतून, रात्रीच्या वेळेस, डंपर व जेसीबीच्या सहाय्याने सुरू असल्याचे पुरावे मिळत आहेत.

यात प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग आहे का? का काही ‘वरच्या’ पातळीवरील मूकसंमतीमुळे हा प्रकार उघड उघड सुरू आहे? हे प्रश्न आता सार्वजनिक चर्चेचा विषय झाले आहेत.

कोणाची संमती? कोणाचा फायदा?
या अवैध उत्खननातून शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. मोजक्याच परवानग्यांवर लाखो घनमीटर मुरुम उचलला जात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून ना जागेची पाहणी, ना पंचनामा, ना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

अधिकाऱ्यांची यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय आता पक्काच होत आहे. त्यामुळे या ‘मुरुमायण’चे दिग्दर्शक कोण? आणि हे घोटाळ्याचे ‘निर्माते’ कोण? हे देखील आता शोधण्याची वेळ आली आहे.

प्रशासनाची भूमिका अजूनही ‘क्लीन स्लेट’
या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत असून, जिल्ह्यातील सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी, आणि पत्रकार या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता पुढाकार घेत आहेत.

त्वरित कारवाईची गरज
उड्डाणपूलासारखी अत्यावश्यक सार्वजनिक कामे योग्य मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून व्हायला हवीत. अन्यथा त्यातून निर्माण होणारे अवैध व्यवहार, पर्यावरणीय नुकसान आणि महसूल बुडवणूक यांचा परिणाम दीर्घकालीन असेल.

प्रशासनाने या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, आणि पुढील मुरुम पुरवठा कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने होईल, याची शाश्वती द्यावी, अशी मागणी आता बुलंद होऊ लागली आहे.

कंत्राटदाराचा महसूल प्रशासनाला ‘गुलिगत धोका’, परवानगी एका ठिकाणची, मुरुम उचलला दुसरीकडून

भाग २

धाराशिव – तुळजापूर–लातूर महामार्गावरील काक्रंबा येथील बहुप्रतीक्षित उड्डाणपूलाचे काम सुरू झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला असतानाच, या कामाशी संबंधित गोंधळत आणखी गंभीर माहिती समोर येत आहे. कंत्राटदार कंपनीने बांधकामासाठी लागणाऱ्या मुरुमासाठी महसूल प्रशासनाला ‘गुलिगत धोका’ देत सरकारी यंत्रणांची दिशाभूल केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

पहिल्या टप्प्यात समोर आलेल्या माहितीप्रमाणे, मुरुमाचे उत्खनन अनधिकृत पद्धतीने काक्रंबा आणि आजूबाजूच्या गावांमधून रात्रीच्या वेळी जेसीबी व डंपरच्या सहाय्याने सुरू असल्याचे निदर्शनास आले. आता या घडामोडींना आणखी गंभीर वळण मिळाले असून, संबंधित कंत्राटदाराने केवळ नाममात्र परवानग्या घेतल्या असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ज्या भूखंडासाठी परवानगी घेतली गेली होती, त्यासोबत परवानगी न घेतलेल्या ठिकाणांहून मुरुम उत्खनन केले आहे.
या प्रकारामुळे महसूल विभागाला लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता असून, सरकारच्या महसुलावर टाच आली आहे. चिल्लर परवानग्या घेऊन मोठ्या प्रमाणावर मुरुम उपसा केला गेला आहे, हे निदर्शनास येत आहे. कामाचे खरे गणित पाहता ज्या प्रमाणात मुरुम लागत आहे आणि ज्या प्रमाणात परवानगी घेतली गेली आहे, त्या आकड्यांमध्ये फारकत स्पष्ट आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांनी कंत्राटदाराविरोधात सखोल चौकशीची मागणी केली आहे.उड्डाणपूलाच्या कामात जर अशा पद्धतीने अपारदर्शकता आणि फसवणूक होत असेल, तर हा विकास नव्हे, तर लुबाडणूक ठरेल, अशी तीव्र भावना लोकांमध्ये आहे.

प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तत्काळ दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करत शासकीय महसूल वाचवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

धाराशिवमध्ये तलाठी आणि खाजगी लिपीक लाच घेताना रंगेहाथ अटकेत – लाचलुचपत विभागाची यशस्वी सापळा कारवाई

धाराशिव | 5 मे 2025
धाराशिव जिल्ह्यातील वाघोली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून तलाठी भूषण चोबे व त्यांचे खाजगी लिपीक भारत मगर यांना 4000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या धाराशिव युनिटने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

प्रकरणाचा तपशील:
तक्रारदाराने त्यांच्या वडिलांच्या नावावरील गट क्रमांक १५/१० या शेतजमिनीवरील कुळाचे नाव कमी करण्यासाठी तहसील कार्यालय, धाराशिव येथे अर्ज केला होता. यावर तहसीलदार धाराशिव यांनी मंडळ अधिकारी तेर यांना स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या अहवालासाठी तलाठी भूषण चोबे व त्यांचा खाजगी लिपीक भारत मगर यांनी तक्रारदाराकडे 5000 रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यात आरोपींनी 4000 रुपयांवर तडजोड करून लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज दुपारी सापळा रचण्यात आला.

सापळा कारवाई आणि अटक:
तलाठी भूषण चोबे यांनी खाजगी लिपीक भारत मगर यांच्यामार्फत तक्रारदाराकडून 4000 रुपये लाच घेतली. त्याचवेळी सापळा पथकाने कारवाई करून दोघांनाही रंगेहाथ पकडले. आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

जप्त सामग्री:
तलाठी भूषण चोबे यांच्याकडून:

  • 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
  • 30 ग्रॅम वजनाचा चांदीचा कडा
  • सॅमसंग मोबाईल
  • पार्कर कंपनीचे पेन
  • डेल कंपनीचा शासकीय लॅपटॉप

भारत मगर यांच्याकडून:

  • 4000 रुपये लाच रक्कम
  • अतिरिक्त 1090 रुपये रोख
  • सॅमसंग कीपॅड मोबाईल

आरोपींच्या घरी झडती सुरू असून, मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

गुन्हा दाखल आणि कायदेशीर प्रक्रिया:
भूषण चोबे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कलम 12 तर भारत मगर यांच्याविरुद्ध कलम 7A नुसार धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पुढील तपास लाचलुचपत विभाग करत आहे.

कारवाई करणारे अधिकारी व पथक:
या कारवाईचे नेतृत्व पोलीस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले. सापळा पथकात पोलीस अंमलदार नेताजी अनपट, आशीष पाटील आणि नागेश शेरकर यांचा समावेश होता. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांनी केले.

तक्रार करण्यासाठी संपर्क:
भ्रष्टाचाराची तक्रार टोल फ्री क्रमांक 1064 वर करता येईल. तसेच पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (मो. 9923023361) किंवा पोलीस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे (मो. 9594658686) यांच्याशी संपर्क साधावा.
या कारवाईमुळे महसूल प्रशासनातील भ्रष्टाचार उघड झाला असून, लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत मिळाले आहेत. नागरिकांनी अशा प्रकारांचा विरोध करताना लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणला मुरुम कुठून? – काक्रंबा उड्डाणपूलासाठी मुरुमाचा स्रोत संशयास्पद; प्रशासनाची डोळस भूमिका गरजेची

तुळजापूर–लातूर महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपूलाचे काम अखेर सुरू झाले असले, तरी या कामासाठी लागणाऱ्या मुरुमाचा उगमच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुरुम उत्खनन करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार कंपनीने बांधकामासाठी लागणारा मुरुम काक्रंबा परिसरातील शेतजमिनी व ओसाड भूखंडांमधून बेकायदेशीरपणे उचलण्यास सुरुवात केली आहे. रात्रीच्या वेळी जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने चालणाऱ्या या उत्खननामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल ढासळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतजमिनींचे नुकसान, धुळीचे साम्राज्य, आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम हे या प्रकाराचे गंभीर दुष्परिणाम ठरत आहेत.

शासनाचा महसूल बुडवून विकासकामे केली जात असतील तर ती टिकाऊ व कायदेशीर कशी राहतील, असा सवाल उपस्थित होत आहे.

या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने संबंधित मुरुमाचा मूळ स्रोत शोधून, उत्खननास परवानगी आहे का याची चौकशी करणे गरजेचे ठरत आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि बांधकाम साहित्य कायदेशीर व पर्यावरणपूरक मार्गानेच प्राप्त करण्यात यावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा उड्डाणपूल गरजेचा आहेच, पण तो पर्यावरण व नियमांचे उल्लंघन करून झाला, तर तो विकास न ठरता विनाश ठरू शकतो.

परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा असा आहे  धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचा दौरा

धाराशिव, 26 एप्रिल 2025 –प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, येत्या 30 एप्रिल ते 1 मे 2025 या कालावधीत धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत दस्तऐवजानुसार, या दौऱ्यात महत्वाचे शासकीय कार्यक्रम, पायाभूत सुविधांचे उद्घाटन, स्थानिक नेत्यांसह बैठका आणि नागरिकांशी संवाद यांचा समावेश आहे. हा दौरा या भागातील विकासाला चालना देण्यासाठी महत्वाचा आहे.

पहिला दिवस: बुधवार, 30 एप्रिल 2025

ठाण्याहून प्रस्थान आणि धाराशिव येथे आगमन

  • दुपारी 12:00 वा. : मा. मंत्री सरनाईक ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानाहून खाजगी वाहनाने (MH 04 LL-7578) मुंबईतील सांताक्रुझ (पूर्व) विमानतळावरील कालिना गेट क्र. 8 कडे प्रस्थान करतील.
  • दुपारी 12:45 वा. : कालिना गेट क्र. 8, सांताक्रुझ (पूर्व) विमानतळ येथे आगमन.
  • दुपारी 1:00 वा. : खाजगी विमानाने धाराशिवकडे प्रस्थान.
  • दुपारी 2:30 वा. : धाराशिव विमानतळावर आगमन आणि नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिवकडे प्रयाण.

धाराशिवमधील महत्वाचे कार्यक्रम

  • दुपारी 2:40 वा. : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” या शासकीय कार्यक्रमास उपस्थिती. हा कार्यक्रम पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनावर केंद्रित आहे. समन्वयक: श्री. विजयकुमार थोरात, अधीक्षक अभियंता, जलसंपदा (संपर्क: 9420499421).
  • दुपारी 3:20 वा. : धारूर गावाकडे (जि. धाराशिव) प्रस्थान.
  • दुपारी 3:40 वा. : धारूर येथे शिवसेनेच्या युवासेना शाखेचे उद्घाटन आणि नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ. समन्वयक: श्री. गणेश ज्ञानदेव जगताप (संपर्क: 8080307109).
  • दुपारी 3:50 वा. : तुळजापूर (जि. धाराशिव) कडे प्रस्थान.
  • सायंकाळी 4:25 वा. : तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) नूतनीकृत बस डेपोचे उद्घाटन. समन्वयक: श्री. भालेराव, विभाग नियंत्रक, धाराशिव (संपर्क: 9021893704).
  • सायंकाळी 4:55 वा. : नळदुर्ग, ता. तुळजापूर येथे प्रस्थान.
  • सायंकाळी 5:00 वा. : नळदुर्ग येथे दोन कार्यक्रम:
  1. नळदुर्ग किल्ल्याची पाहणी. समन्वयक: श्री. लक्ष्मण कुंभार, मुख्याधिकारी, नळदुर्ग (संपर्क: 9604702029, 8208391739).
  2. युवासेना शाखेचे उद्घाटन. समन्वयक: श्री. निखिल घोडके (संपर्क: 9311758438).

सोलापूर येथील सायंकाळ

  • सायंकाळी 5:45 वा. : नळदुर्ग येथून सोलापूरकडे प्रस्थान.
  • सायंकाळी 6:45 वा. : सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहावर आगमन (राखीव वेळ).
  • सायंकाळी 7:00 वा. : सोलापूर येथील शिवस्मारक सभागृह, बाजीराव चौक येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांसह बैठक आणि विविध कार्यक्रमांना उपस्थिती.
  • रात्री 9:30 वा. : सोलापूर येथून धाराशिवकडे प्रस्थान.
  • रात्री 10:40 वा. : धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहावर आगमन आणि रात्रीचा मुक्काम.

दुसरा दिवस: गुरुवार, 1 मे 2025

धाराशिव येथील सकाळचे कार्यक्रम

  • सकाळी 7:40 वा. : शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान.
  • सकाळी 7:50 वा. : जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आगमन.
  • सकाळी 8:00 वा. : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दोन महत्वाचे कार्यक्रम:
  1. महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ.
  2. कसबे तडवले येथील जि.प. कन्या प्राथमिक शाळा आणि जि.प. केंद्र शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा 365 दिवस शाळा उपक्रमासाठी सत्कार समारंभ. समन्वयक: श्री. अशोक पाटील, शिक्षण अधिकारी, धाराशिव (संपर्क: 9049318035).
  • सकाळी 9:00 वा. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ भोगावती नदीतील गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ. समन्वयक: श्रीम. वसुधा फड, मुख्याधिकारी, धाराशिव (संपर्क: 8888847092).
  • सकाळी 9:30 वा. : नियोजन भवनातील पालकमंत्री कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी राखीव वेळ.
  • सकाळी 10:00 वा. : धाराशिव जिल्हा वार्षिक योजना (2025-26) संदर्भातील बैठक, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय.
  • दुपारी 12:00 वा. : धाराशिव जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक (2025-26). समन्वयक: श्री. रविंद्र माने, जिल्हा कृषी अधिकारी (संपर्क: 982201881).
  • दुपारी 12:30 वा. : स्वयंवर मंगलकार्यालय, बार्शी नाका येथे धाराशिव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ. समन्वयक: श्री. अशोक पाटील (संपर्क: 9049318035).
  • दुपारी 1:00 वा. : धाराशिव बस डेपोच्या नूतनीकरणाचे उद्घाटन. समन्वयक: श्री. भालेराव (संपर्क: 9021893704).

मुंबईला परतणे

  • दुपारी 2:00 वा. : धाराशिव विमानतळाकडे प्रस्थान.
  • दुपारी 2:30 वा. : धाराशिव विमानतळावर आगमन.
  • दुपारी 3:00 वा. : खाजगी विमानाने सांताक्रुझ (पूर्व), मुंबईकडे प्रस्थान.
  • सायंकाळी 4:15 वा. : कालिना गेट क्र. 8, सांताक्रुझ (पूर्व) विमानतळ, मुंबई येथे आगमन.
  • सायंकाळी 4:45 वा. : ठाण्यातील निवासस्थानाकडे प्रस्थान, आगमन आणि मुक्काम.