Home Blog Page 173

दैनिक जनमत ०१ फेब्रुवारी २०२२ E paper

सावरगावात कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

सावरगाव प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील तात्यासाहेब हनुमंत वायकर (वय,३०)यांनी कर्जबाजारीपणा आणि सततची नापिकी व गेल्यावर्षी कोरोना संसर्गजन्य रोगामुळे द्राक्ष बागेचे झालेले नुकसान या विवंचनेतून त्यांनी दहिवडी रोड नजीक असलेल्या त्यांच्या शेताजवळील तलावाजवळ विषप्राशन करून आत्महत्या केली.या घटनेची माहिती मिळताच तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घुले यांनी घटनास्थळी  पंचनामा केला,आत्महत्याग्रस्त तरुण शेतकरी तात्यासाहेब वायकर यांनी अतिशय कष्टाने दोन एकर द्राक्ष बाग जोपासली होती ,परंतु गेल्या वर्षी कोरोना संसर्गजन्य रोगांमुळे बाजारपेठा बंद राहिल्या यामुळे द्राक्ष बांधावर टाकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली होती, यातूनच त्यांना आर्थिक फटका बसला होता, यामुळे बँकांचे सावकारांचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलून विषप्राशन  करून आत्महत्या केली,सर्वांशी आपुलकीने बोलणारा प्रामाणिक, कष्टाळू तरुणाच्या मृत्यू मुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, त्यांच्या पश्चात आई, वडील ,पत्नी, लहान मुलगी, भाऊ असा परिवार आहे

डोंजा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड रद्द

 डोंजा गावासह तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ 

डोंजा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड रद्द

बेकायदेशीर नामनिर्देशन पत्र, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश



परंडा (भजनदास गुडे) तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जाणार्‍या डोंजा ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष ढेंबरे,उपसरपंच स्वाती सुर्यवंशी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरोधात ९ ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या प्रकरणीची सुनावणी घेऊन सरपंच व उपसरपंच यांची निवड रद्द केल्याने संतोष ढेंबरे यांचे सरपंच पद , तर स्वाती सुर्यवंशी यांचे उप

सपंचपद रद्द केल्याने डोंजा गावा सह तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

     डोंजा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडनुक स.न.२०२१ मध्ये संपन्न झाली.ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी यांनी विशेष सभेची नोटीस सर्व सदस्यांना कायदेशीर रित्या बजावली नाही. सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक दि.९ फेब्रुवारी २०२१ रोजी ठेवण्यात आली होती परंतु सभेचा कोरम पूर्ण न होऊ शकल्यामुळे सदर निवडणूक दि.१० फेब्रुवारी २०२१ रोजी घेतली.सदर सरपंच पदाच्या निवडनुकी साठी संतोष ढेंबरे यांचे तर उपसरपंच पदाच्या निवडणूकी साठी स्वाती सुर्यवंशी यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते.सदर नामनिर्देशन पत्र हे बेकायदेशीर आहे.नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून पांडुरंग सुर्यवंशी यांची स्वाक्षरी दिसून येते परंतु सदर स्वाक्षरी ही पांडुरंग सुर्यवंशी यांनी केलेली नव्हती. यांची बनावट स्वाक्षरी करून नामनिर्देशन पत्र ढेंबरे यांनी भरले होते.निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी यांनी सदर स्वाक्षरी ची शहानिशा न करता संतोष ढेंबरे यांचे नामनिर्देशन पत्र बेकायदेशीर रित्या स्विकारले.म्हणून सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक प्रक्रिया रद्द करावी अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कुंडलिक सुर्यवंशी,मैना हनुमंत शिंदे,आप्पासाहेब खेमचंद पोळ, रणजित आबासाहेब सुर्यवंशी, अमोल श्रीकृष्ण पाटील,अश्विनी अरुण काळे,तारामती संतोष सिरसट, काशीबाई पोपट यशवंत, शिल्पा रामचंद्र घोगरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

   डोंजा ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यानी दिलेल्या तक्ररारी अर्जावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सुनावणी घेतली.या सुनावणीत डोंजा ग्रामपंचायतीच्या ११ ग्रामपंचायत सदस्यां पैकी एकूण ९ सदस्यांनी एकत्रितरित्या तक्रारी अर्ज करत डोंजा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक २०२१च्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ग्रामपंचायत डोंजा येथील सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक ही तणावमुक्त वातावरणात लोकशाही पध्दतीने झाली नाही असे निष्कर्ष नोंदवलं.यावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले.डोंजा ग्रामपंचायत सरपंच पदांची निवडणूक २०२१ मध्ये संतोष ढेंबरे यांची सरपंच पदी तर स्वाती सुर्यवंशी यांची उपसरपंच पदी झालेली निवड वैध नसल्याने रद्द करण्यात आली,असा निर्णय दिला.

     या जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे डोंजा गावासह तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

काक्रंबावाडी येथे हरभरा कीड – आळी नियंत्रण कार्यशाळा संपन्न

सलगरा,दि.३०(प्रतिनिधी)

 तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथे हरभरा कीड, आळी नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी पवन कणसे आणि दुलानगे शेतीशाळा प्रमुख यांनी हरभरा व कीड आळी नियंत्रित कशाप्रकारे करता येईल यावर मार्गदर्शन केले, हरभऱ्यावर कोणकोणते रोग पडतात त्यावर कोणती औषध फवारणी करायला हवी. फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले.

    या वेळी गावातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच पोलीस जाणीव सेवा संघ चे काक्रंबावाडी येथील प्रमुख महेश बजरंग कोळेकर व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कळंब तालुक्यातील 28 गावांतील शेत, पाणंद रस्त्यांच्या कामांना मान्यता

 


30 किलोमीटर लांबीचे होणार रस्ते; आमदार कैलास पाटील यांची माहिती


उस्मानाबाद ः मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्ते योजनेअंतर्गत कळंब तालुक्यातील 28 गावांतील शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारच्या नियोजन विभागाने (रोहयो प्रभाग) मंजुरी दिली आहे.त्याबद्दल रोहयो मंत्री श्री संदीपानजी भुमरे साहेब,शिवसेना संपर्कप्रमुख माजी मंत्री डॉ. प्रा. आ. तानाजीराव सावंत साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा. ना.श्री शंकररावजी गडाख-पाटील साहेब, खासदार श्री ओमप्रकाशजी राजेनिंबाळकर यांच्या प्रयत्नातून या गावांतील 30 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश करण्यात आल्याचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सांगितले.

मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या अभिसरणातून मातोश्री गामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते ही योजना राबविण्यात येणार आहे. शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांकरिता पूरक कुशल निधी राज्य रोहयोअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानुसार कळंब तालुक्यातील 28 गावांतील शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना नियोजन विभागाने (रोहयो प्रभाग) मान्यता दिली आहे. या 28 गावांमध्ये 30 किलोमीटर लांबीचे शेत/ पाणंद रस्ते होणार आहेत. अनेक गावांतील शेतकऱ्यांकडून शेतरस्त्यांची तर ग्रामस्थांकडून पाणंद रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी वारंवार केली जात होती. शेतरस्ते, पाणंद रस्ते सुस्थितीत नसल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शेतकरी व ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी अशा गावांतील शेतरस्ते, पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार नियोजन विभागाने मान्यता दिली आहे. त्यामध्ये कळंब तालुक्यातील 28 गावांतील शेत/ पाणंद रस्त्यांना सरकारने मंजुरी दिली आहे. यातून 30 किलोमीटरचे रस्ते होणार आहेत, अशी माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली.