Home Blog Page 17

तुळजापूर : मंदिर रक्षणाच्या भूमिकेवर ठाम – आ. जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर जोरदार हल्ला

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या बाबतही बोलले आ. आव्हाड

तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिराची पाहणी करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना भाजप कार्यकर्त्यांनी गाडी अडवून रोखण्याचा प्रयत्न करत मोठा गोंधळ घातला. यानंतर आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत मंदिराच्या संवर्धनाबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आणि राज्य सरकार तसेच मंदिर प्रशासनावर जोरदार टीका केली.

“प्रत्येक दगड बोलका आहे”
आव्हाड म्हणाले, “तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्राच्या पुरातन इतिहासाचे जिवंत स्मारक आहे. गाभाऱ्यात उभे राहून छत्रपती शिवाजी महाराज कसे देवीसमोर नतमस्तक झाले असतील, हे मी डोळे मिटून अनुभवतो. या मंदिरातील प्रत्येक दगडाने हा इतिहास पाहिलेला आहे. जर हे दगड बोलू लागले, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू येतील. आज हेच दगड तोडून टाकण्याचा, फेकून देण्याचा प्रकार सुरू आहे. जे अफजलखान आणि औरंगजेबाला जमले नाही, ते आजच्या काळातील त्यांच्या विचारसरणीचे वारस करणार आहेत.”

केंद्रीय व राज्य पुरातत्त्व अहवालांवर प्रश्नचिन्ह
केंद्रीय व राज्य पुरातत्त्व खात्यांच्या अहवालांमध्ये मतभेद असल्याच्या प्रश्नावर आव्हाड यांनी माजी आर्किओलॉजिकल डायरेक्टर ए. के. सिन्हा यांच्या अहवालाचा हवाला दिला. “सिन्हा यांनी स्पष्ट लिहिले आहे की मंदिराला स्पर्श करण्याची गरज नव्हती. दगडालाही श्वास असतो, त्याला ऑक्सिजन मिळतो. चुकीच्या पद्धतीने भेगा भरण्याचे काम केल्याने मंदिराचे आयुष्य कमी होईल,” असे ते म्हणाले.

बहुजनांचा सहभाग संपवण्याचा आरोप
मंदिरातील पूजापद्धतीत बदल आणि बहुजन पुजार्‍यांचा सहभाग कमी करण्याच्या आरोपांवर आव्हाड म्हणाले, “आजपर्यंत इथले सर्व पुजारी बहुजन समाजातील होते. आता नवीन पद्धती, तलवारीचे विधी आणून हा वारसा संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भक्तीस्थळाचा वापर राजकारणासाठी करणे योग्य नाही. बहुजनांचा सहभाग संपवून, त्याच बहुजनांना पुढे करून मनोविकास साधण्याचा डाव आहे.”

विचारांवर ठाम
माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्याशी वैयक्तिक स्नेह असल्याबाबत विचारले असता ते माझ्या बापासारखे आहेत असे आव्हाड म्हणले तसेच आमदार राणा पाटील हे मंदिराचे विश्वस्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असल्याच्या प्रश्नाबाबत आव्हाड म्हणाले, “विचारांपुढे कुणी चालत नाही – मग तो मित्र, बहीण, आई-वडील का असेना. शाहू, फुले, आंबेडकर यांनी कधीच तडजोड केली नाही. तसंच मीही विचारधारेत तडजोड करणार नाही.”

“देवीचा शाप लागेल” – इशारा
पुढील भूमिकेबाबत आव्हाड म्हणाले, “विकासाला विरोध नाही, पण चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामाला मी विरोध करणारच. पारंब्यांची निर्दयी तोड झाली आहे. अशाच पद्धतीने दगड तोडले गेले, तर देवीचा शाप यांना लागेल. मंदिराचे अयोग्य काम मी होऊ देणार नाही.”

धाराशिवसह राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचा लाभ; 28.32 कोटींचे वितरण मंजूर

मुंबई, 12 ऑगस्ट 2025: महाराष्ट्र शासनाने सन 2022-23 च्या कांदा अनुदान योजने अंतर्गत फेरछाननीनंतर पात्र ठरलेल्या 14,661 शेतकऱ्यांना 28,32,30,507 रुपयांचे अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने 12 ऑगस्ट 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये, जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील 272 शेतकऱ्यांना 1.20 कोटी रुपये (12,098,705.50 रुपये) मिळणार आहेत.

योजनेचा तपशील
27 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक आणि नाफेड केंद्रांमार्फत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही शेतकऱ्यांचे प्रस्ताव 7/12 उताऱ्यावरील नोंदींमुळे अपात्र ठरले होते. त्यांची फेरछाननी करून पणन संचालक, पुणे यांनी पात्र शेतकऱ्यांचा अहवाल सादर केला. त्यानुसार, जुलै 2025 च्या पावसाळी अधिवेशनात 28.32 कोटींची पुरवणी मागणी मंजूर झाली.

जिल्हानिहाय लाभार्थी आणि अनुदान
शासन निर्णयानुसार, खालील जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे:

  • नाशिक: 9,988 लाभार्थी, 18.58 कोटी रुपये
  • धाराशिव: 272 लाभार्थी, 1.20 कोटी रुपये (कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत)
  • पुणे ग्रामीण: 277 लाभार्थी, 78.24 लाख रुपये
  • सांगली: 22 लाभार्थी, 8.07 लाख रुपये
  • सातारा: 2,002 लाभार्थी, 3.03 कोटी रुपये
  • धुळे: 43 लाभार्थी, 5.71 लाख रुपये
  • जळगाव: 387 लाभार्थी, 1.06 कोटी रुपये
  • अहमदनगर: 1,407 लाभार्थी, 2.81 कोटी रुपये
  • नागपूर: 2 लाभार्थी, 26,800 रुपये
  • रायगड: 261 लाभार्थी, 68.76 लाख रुपये

एकूण: 14,661 लाभार्थी, 28.32 कोटी रुपये

यामध्ये बहुतांश अनुदान कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत विक्री केलेल्या शेतकऱ्यांना मिळेल, तर खाजगी बाजारातून विक्री केलेल्या 354 शेतकऱ्यांना 52.52 लाख रुपये मिळतील. थेट पणन परवानाधारक आणि नाफेड केंद्रांमार्फत कोणतेही अनुदान पात्र ठरले नाही.

धाराशिव जिल्ह्याचा विशेष उल्लेख
धाराशिव जिल्ह्यातील 272 शेतकऱ्यांना 1,20,98,705.50 रुपये अनुदान मिळणार आहे, जे पूर्णपणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत विक्री केलेल्या कांद्यावर आधारित आहे. यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल.

अंमलबजावणी आणि अहवाल
हे अनुदान 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक व्ही-2, लेखाशीर्ष 2425 अंतर्गत खर्ची टाकले जाईल. पणन संचालनालय, पुणे यांना आहरण आणि संवितरण अधिकारी, तर पणन संचालक, महाराष्ट्र राज्य यांना नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अनुदान वितरित केल्यानंतर एका महिन्याच्या आत पणन संचालकांना शासनाला अहवाल सादर करावा लागेल.

धाराशिव तहसीलदारांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप; चौकशीसाठी तुकाराम मुंढे किंवा प्रवीण गेडाम यांची नेमणूक करण्याची मागणी

धाराशिव – धाराशिव तहसीलदार सौ. मृणाल जाधव यांच्यावर एनए लेआउट प्रकरणात गंभीर भ्रष्टाचार व अनियमिततेचे आरोप होत असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे किंवा प्रवीण गेडाम यांची नेमणूक करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

धाराशिव तालुक्यातील मनोज दगडू जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार मृणाल जाधव यांनी पदाचा गैरवापर करून एनए लेआउट करताना नियमबाह्य पद्धतीने कामकाज केले, शासनाची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचे महसुली नुकसान केले. या प्रकरणावर विधिमंडळात विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न उपस्थित केला असता महसूलमंत्री यांनी चौकशीसाठी समिती नेमण्याची घोषणा केली.

या चौकशीसाठी नांदेड येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असली, तरी संबंधित अधिकाऱ्यांची धाराशिवच्या तहसीलदारांशी आधीच्या कार्यकाळातील जवळीक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे चौकशी निष्पक्ष न होण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, तपास दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

याशिवाय, एका सामाजिक कार्यकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीत मृणाल जाधव यांच्या नावे 100 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा दावा केला असून, या प्रकरणातील कार्यवाहीही प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

धाराशिव तहसीलदारांवरील भ्रष्टाचार, मालमत्ता अनियमितता आणि एनए लेआउटमधील गैरव्यवहाराची चौकशी तुकाराम मुंढे किंवा प्रवीण गेडाम यांच्यासारख्या निडर व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडे देण्यात यावी, अशी धाराशिव तालुक्यातील जनतेची मागणी आहे.

निवेदनाची प्रत महसूलमंत्री, माजी मंत्री बच्चू कडू, लोकायुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, विरोधी पक्षनेते, गुप्त वसुली संचालनालय (ईडी), विभागीय आयुक्त तसेच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनाही देण्यात आली आहे.

मंत्रालयात अभ्यागत आणि वाहन प्रवेशासाठी नव्या सुधारित मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२५: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय भवनात अभ्यागत आणि वाहनांना प्रवेश देण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. शासन निर्णय क्रमांक पीईएस-४२१/प्र.क्र.१०८/विशा-४, दि. १२ ऑगस्ट २०२५ अन्वये या सूचना लागू करण्यात आल्या आहेत. मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या आणि वाहनांच्या प्रवेश प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी या सूचना तयार करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येण्यासह सुरक्षेचे मानके उंचावतील, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.
मंत्रालयात अभ्यागत आणि वाहन प्रवेशासंदर्भात शासनाला प्राप्त झालेल्या सूचना, निवेदने आणि यापूर्वीच्या शासन निर्णयांनुसार (दि. २४.१२.२०२१, २४.०३.२०२५ आणि ११.०८.२०२५) आलेले अनुभव विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालय सुरक्षा प्रकल्प फेज-२ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या Visitor Management System (VMS) प्रणालीचा विचार करून या मार्गदर्शक सूचना सुधारित करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या शासन निर्णय क्रमांक १ ला अधिक्रमित करून नव्या सूचना लागू करण्यात आल्या असून, यामुळे प्रवेश प्रक्रिया अधिक तंत्रस्नेही आणि सुरक्षित होईल.

सुधारित मार्गदर्शक सूचनांचा तपशील:

१. वाहनांना “पार्किंग पास” देण्याबाबत:

खालील ३२ श्रेणींतील व्यक्तींच्या प्रत्येकी एका वाहनाला मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश आणि आवारात पार्किंगसाठी “पार्किंग पास” अनुज्ञेय असेल:

  • मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री.
  • मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य व इतर न्यायाधीश.
  • महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते (दोन्ही सभागृहे).
  • सर्व विद्यमान मंत्री, राज्यमंत्री, उपसभापती, उपाध्यक्ष.
  • मा. महापौर (बृहन्मुंबई), नगरपाल, महामंडळांचे अध्यक्ष (मंत्री दर्जाचे), वैधानिक विकास मंडळांचे अध्यक्ष.
  • मा. महाअधिवक्ता, लोकआयुक्त, उप लोकआयुक्त, राज्य माहिती आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त, बृहन्मुंबई माहिती आयुक्त, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष.
  • मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मुख्य निवडणूक अधिकारी, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव, अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी.
  • मंत्रालयातील दिव्यांग अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या दुचाकी वाहनांना विशेष परवानगी.

२. वाहनांना “ड्रॉपिंग पास” देण्याबाबत:

खालील व्यक्ती/संस्थांच्या शासकीय/कार्यालयीन वाहनांना (प्रत्येकी एक) मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारातून प्रवेशासाठी “ड्रॉपिंग पास” मिळेल, परंतु या वाहनांना आवारात पार्किंगची परवानगी नसेल:

  • सर्व विद्यमान खासदार आणि आमदार.
  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्र्यांचे कार्यालयीन/शासकीय वाहने.
  • मंत्रालयीन विभागांची कार्यालयीन वाहने.
  • भा.प्र.से./भा.पो.से./भा.व.से. संवर्गातील अधिकाऱ्यांची कार्यालयीन वाहने.
  • मंत्रालयातील उपसचिव, सहसचिव आणि दिव्यांग अधिकारी/कर्मचाऱ्यांची चारचाकी वाहने.

३. प्रवेशासाठी अटी आणि शर्ती:

  • अर्ज प्रक्रिया: पार्किंग आणि ड्रॉपिंग पाससाठी संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या कार्यालयाने विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक.
  • खासगी वाहनांचे प्रमाणीकरण: शासकीय कार्यालयांना वाहन पुरवठा करणाऱ्या खासगी पुरवठादारांकडून भाड्याने घेतलेल्या वाहनांना पास मिळण्यासाठी संबंधित व्यक्ती किंवा कार्यालयाने वाहनाचा वापर प्रमाणित करणे आवश्यक.
  • दिव्यांग वाहने: दिव्यांग व्यक्तींच्या वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागाचे “Adapted Vehicle” प्रमाणपत्र आवश्यक.
  • प्रवेश प्रतिबंध: पासधारक व्यक्तीशिवाय इतर कोणालाही वाहनातून मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही.
  • पासची वैधता: सर्व वाहन प्रवेशपास ३१ डिसेंबरपर्यंत वैध असतील, त्यानंतर नूतनीकरण आवश्यक.

४. शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि अभ्यागतांना प्रवेश:

  • माजी खासदार/आमदार: विधानमंडळाच्या ओळखपत्राद्वारे थेट प्रवेश, परंतु माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे नोंदणी आणि RFID कार्डद्वारे चेहरा ओळख प्रणाली (Facial Recognition) बंधनकारक.
  • विधानमंडळ कर्मचारी: ओळखपत्र दर्शनी भागावर लावून प्रवेश, परंतु RFID कार्ड आणि चेहरा ओळख प्रणालीद्वारे प्रवेश आवश्यक.
  • इतर शासकीय कर्मचारी: DigiPravesh अॅपद्वारे प्रवेशपास घेऊन प्रवेश. मंत्रालयाबाहेर RFID कार्ड वितरणासाठी खिडकी उपलब्ध. प्रवेशपास परत करणे बंधनकारक.
  • बैठकीसाठी येणारे अधिकारी/अभ्यागत: DigiPravesh अॅपद्वारे प्रवेशपास आवश्यक. संबंधित विभागाने बैठक पत्र किमान एक दिवस अगोदर सायंकाळी ५:३० पर्यंत अॅपवर अपलोड करणे बंधनकारक. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी दृकश्राव्य माध्यमांचा (VC) वापर सुचविला आहे.

५. सर्वसाधारण अभ्यागतांसाठी नियम:

  • सर्वसाधारण अभ्यागतांना दुपारी २:०० नंतर DigiPravesh अॅपद्वारे प्रवेशपास घेऊन प्रवेश मिळेल.
  • ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग: दुपारी १२:०० पासून प्रवेश आणि स्वतंत्र रांगेची व्यवस्था. वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक.
  • वकील आणि लिपिक: न्यायालयीन कामकाजासाठी वैध दस्तऐवज तपासून सकाळी १०:०० नंतर प्रवेश.
  • ओळखपत्र आवश्यक: आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड यापैकी एक शासकीय ओळखपत्र सादर करणे बंधनकारक.

६. सामान्य नियम आणि अंमलबजावणी:

  • ओळखपत्र/प्रवेशपास: सर्व शासकीय कर्मचारी आणि अभ्यागतांनी मंत्रालयात वावरताना ओळखपत्र/प्रवेशपास दर्शनी भागावर लावणे बंधनकारक.
  • वाहन पास: पार्किंग/ड्रॉपिंग पास वाहनाच्या पुढील काचेवर चिकटवणे आवश्यक.
  • अधिकार: प्रवेशपास मंजुरीचे अधिकार प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग आणि अपवादात्मक प्रकरणात अपर मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे.
  • प्रतिबंध: वॉकीटॉकी किंवा इतर सूचनांवरून प्रवेश देण्यास मनाई. नियमभंग गंभीर बाब मानली जाईल.
  • लागू क्षेत्र: या सूचना मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय भवनासाठी लागू.महाराष्ट्र शासनाने या निर्णयाद्वारे मंत्रालयातील प्रवेश व्यवस्थेत सुधारणा करून प्रशासकीय कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास मंत्रालयातील कामकाज अधिक सुसूत्र आणि गतिमान होईल, असा विश्वास गृह विभागाने व्यक्त केला आहे.
  • महाराष्ट्र शासनाने या निर्णयाद्वारे मंत्रालयातील प्रवेश व्यवस्थेत सुधारणा करून प्रशासकीय कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास मंत्रालयातील कामकाज अधिक सुसूत्र आणि गतिमान होईल, असा विश्वास गृह विभागाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : पोलीस भरती, पीडीएस दुकानदारांना दिलासा, सोलापूर विमानप्रवासाला गती, कर्ज योजनांतील सवलती

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (१२ ऑगस्ट) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पोलीस भरती, सार्वजनिक वितरण प्रणालीतील दुकानदारांच्या मार्जिनवाढ, सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गाला अनुदान, तसेच मागासवर्ग विकास महामंडळांच्या कर्ज योजनांतील सवलतींचा समावेश आहे.

🔹 १५ हजार पोलीस भरतीला हिरवा कंदील
महाराष्ट्र पोलिस दलातील सुमारे १५,००० शिपाई पदांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ही भरती प्रक्रिया होणार आहे. विशेष बाब म्हणून २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवारही यामध्ये अर्ज करू शकणार आहेत.

🔹 रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अन्नधान्य व साखर वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांचे क्विंटलमागील मार्जिन १५० रुपयांवरून १७० रुपये करण्यात आले. त्यामुळे दुकानदारांना प्रती क्विंटल २० रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे.

🔹 सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासासाठी व्हायअबिलिटी गॅप फंडिंग
सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी एक वर्षासाठी प्रति आसन ३,२४० रुपये व्हायअबिलिटी गॅप फंडिंग (१०० टक्के अनुदान) देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना उडान योजनेच्या धर्तीवर असून, त्यामुळे प्रवासखर्च कमी होऊन सामान्य प्रवाशांना विमानप्रवास परवडणारा होणार आहे.

🔹 कर्ज योजनांतील जामीनदार अटी शिथिल व शासन हमीस मुदतवाढ
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध कर्ज योजनांतील जामीनदारांच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. तसेच शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ मिळणार आहे. यामुळे लघुउद्योजकांना कर्ज मिळविणे सुलभ होणार असून प्रलंबित प्रकरणांना गती मिळेल.

या निर्णयांमुळे रोजगार निर्मिती, जनसामान्यांना दिलासा आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या हरित ऊर्जा प्रकल्पासाठी निविदा सादर करण्याचा आज शेवटचा दिवस

१,२०० एकर जमिनीवर ३० वर्षांचा भाडेपट्टा; स्थानिकांना किमान १०० जणांना रोजगार बंधनकारक

तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे हाती घेण्यात येणाऱ्या १,२०० एकर क्षेत्रफळाच्या हरित ऊर्जा प्रकल्पासाठी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत आज, १२ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. इच्छुक कंपन्यांना आजच आपला प्रस्ताव संस्थानकडे प्रत्यक्ष, टपाल किंवा कुरिअरद्वारे पोहोचवावा लागेल. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत.


प्रकल्पाचा तपशील

हा प्रकल्प माळुंब्रा व मसला (खु.) गावांमधील श्री जगदंबा देवस्थान, भारतीबुवा मठ, सिंदफळ यांच्या ताब्यातील जमिनीवर उभारला जाणार आहे. यामध्ये –

  • सौर, पवन, हायब्रिड किंवा CBG अशा तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छ ऊर्जा निर्मिती केली जाईल.
  • प्रकल्पाच्या संचालनातून किमान १०० स्थानिकांना रोजगार मिळणे अनिवार्य आहे.
  • भाडेपट्ट्याचा कालावधी ३० वर्षे असेल, त्यानंतर जमीन व प्रकल्प ट्रस्टकडे हस्तांतरित केला जाईल.

निविदेच्या प्रमुख अटी

  • बोली लावणारी कंपनी कंपनी अधिनियम १९५६/२०१३ अंतर्गत नोंदणीकृत असावी.
  • हरित ऊर्जा प्रकल्पांचा अनुभव आणि किमान ₹१०० कोटी वार्षिक उलाढाल असणे आवश्यक.
  • भाडेपट्टीचे दर प्रति एकर प्रति वर्ष सर्वाधिक कोट करणाऱ्या कंपनीला प्रकल्प देण्यात येईल.
  • वार्षिक भाड्यात दरवर्षी ३% वाढ होईल.
  • विजेत्या कंपनीने तीन वर्षांच्या भाडेपट्टीएवढी सुरक्षा ठेव जमा करावी.

स्थानिकांसाठी रोजगाराची संधी

संस्थानने स्पष्ट केले आहे की या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार प्राधान्याने दिला जाईल. यामुळे तुळजापूर तालुक्यातील आर्थिक घडामोडींना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

तुळजापूरात १०८ फुटी शिल्पाच्या फायबर मॉडेलसाठी १० लाखाचे मानधन

३१ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया

वंचित बहुजन आघाडीचा विरोध

तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान व जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत असतानाच्या प्रसंगावर आधारित 108 फुट उंचीच्या ब्रॉन्झ धातूच्या शिल्पासाठी फायबर मॉडेल तयार करण्यासाठी नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत शिल्पकारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

निविदा व मानधनाचे स्वरूप

  • प्रस्तावित फायबर मॉडेलची उंची 2.5 ते 3 फूट असावी.
  • मॉडेल धार्मिक व ऐतिहासिक मार्गदर्शनानुसार तयार करणे आवश्यक.
  • मॉडेल तयार करणाऱ्या शिल्पकाराकडे शिल्पकलेतील पदविका/पदवी व किमान १५ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक.
  • सर्व फायबर मॉडेल मुंबई येथील कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य येथे सादर करावेत.
  • मॉडेल सादर करण्याची मुदत १ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५.

निवड प्रक्रिया व बक्षीस

  • प्राप्त सर्व मॉडेलपैकी ५ मॉडेल निवडले जातील; निवडलेल्या प्रत्येक शिल्पकाराला ₹१.५ लाख मानधन.
  • अंतिम निवड झालेल्या फायबर मॉडेलच्या शिल्पकाराला ₹१० लाखांचे मानधन.
  • निवड समितीची बैठक कला संचालनालय, मुंबई येथे होईल.

वंचित बहुजन आघाडीचा विरोध

“जिजाऊ-शिवराय दाखवा, चुकीचा इतिहास नको” – अनुराधा लोखंडे

वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा लोखंडे यांनी या शिल्प संकल्पनेला तीव्र विरोध दर्शविला आहे.
त्यांचे म्हणणे आहे की, इतिहासात माँसाहेब जिजाऊ यांनीच शिवरायांना तलवार देऊन लढाईचे शिक्षण दिले, तर तुळजाभवानी देवीने तलवार दिल्याचा ठोस पुरावा नाही.
“देवीने तलवार दिल्याचे शिल्प उभारल्यास खऱ्या इतिहासाला तडा जाईल. त्यामुळे 108 फुटी शिल्पात जिजाऊ व शिवराय यांचेच दर्शन घडावे,” अशी मागणी त्यांनी आंदोलनातून केली.

रस्ता अपघातात चालकासह दोघे जखमी, एकाचा मृत्यू – ९० जनावरे मृत

येडशी – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील रेल्वे ब्रिजजवळ झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, वाहनचालक व त्याचा सहकारी जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनातील तब्बल ९० जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. ही घटना गुरुवार, दि. ७ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

धाराशिव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व जखमी बाकर आयुब (रा. चोदपूर, ता. पुखरायान, जि. कानपूर, उत्तर प्रदेश) हा आपले युपी ७७ बीएन ३२१३ क्रमांकाचे वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालवत होता. येडशीजवळील एनएच ५२ वरील रेल्वे ब्रिजवर त्याने समोरील ट्रेलर (क्र. केए ४१ डी ७०७३) व कंटेनर (क्र. केए ४१ डी ६६४५) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात वाहनातील सोनवीर राम सनेही (रा. बिछौली, पोस्ट ऐतहार, जि. भिंड, मध्य प्रदेश) गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाले. तर फिर्यादी अरशद इस्तीखार (वय १९, रा. चांदोपुर, पोस्ट अमरोधा, जि. कानपूर, उत्तर प्रदेश – व्यवसाय: क्लिनर) आणि चालक बाकर आयुब हे जखमी झाले.

धडकेनंतर वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, त्यामध्ये प्रवास करणाऱ्या ७१ शेळ्या व १९ मेंढ्या जागीच मृत्युमुखी पडल्या. यामुळे जनावरांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या प्रकरणी फिर्यादी अरशद इस्तीखार यांनी १० ऑगस्ट रोजी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भा.न्या.सं. कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३२५ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.


दारूच्या नशेत पोलीस ठाण्याच्या काचेवर दगडफेक

धाराशिव – धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत एका इसमाने काचेवर दगडफेक करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी पोलीस हवालदार संतोष रामराजे पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ९ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत ते पोलीस ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. त्यांच्यासोबत मदतनीस म्हणून पोअं/९१९ डी.बी. झोरी व वायरलेस ड्युटीसाठी पोअं/६६८ चव्हाण हेही ड्युटीवर होते.

रात्री १०.५२ वाजता तक्रारदार सुलताना हबीब निचलकर यांची तक्रार नोंदवित असताना, एक इसम दारूच्या नशेत येऊन अंमलदार कक्षाच्या काचेवर दगड मारून काच फोडली. बाहेर येऊन पाहणी केली असता, त्याचे नाव प्रदीप श्रीमंत लोखंडे (वय ४२, रा. तुळजापुरनाका, धाराशिव) असे समजले. आरोपीच्या तोंडाला दारूचा तीव्र वास येत होता. चौकशीत त्याने आपल्या गल्लीत भांडण झाल्याचे व लोकांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्याच्या डोक्याला व हातापायावर किरकोळ जखमा होत्या.

घटनेची माहिती बीट मार्शल पोलिसांना दिल्यानंतर पोअं/११०१ भोसले व पोअं/१७०० घुगे घटनास्थळी आले. लोखंडे याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने त्याच्यावर महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ कलम ३(१) व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जिल्हाधिकारी कार्यालयाचीच केराची टोपली; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच लावले अवैध बॅनर

धाराशिव – जिल्हाधिकाऱ्यांनी एखादा आदेश अथवा सूचना काढल्यास त्याचे पालन सर्व शासकीय यंत्रणांनी करणे अपेक्षित असते. मात्र, धाराशिव जिल्ह्यात उलट चित्र दिसून आले आहे. स्वतःच्या आदेशाचे पालन खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयानेच न केल्याची घटना उघड झाली आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना व नगरपंचायतींना अवैध बॅनरांवर लगाम घालण्यासाठी कठोर सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांनुसार, शहरातील प्रत्येक बॅनरवर QR कोड असणे बंधनकारक करण्यात आले होते, ज्यामुळे बॅनर लावणाऱ्यांची ओळख व वैधता त्वरित तपासता येईल.

परंतु, गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच लावण्यात आलेल्या एका बॅनरवर QR कोड नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हा बॅनर वैध आहे की अवैध, हा प्रश्न निर्माण झाला असून, नियमभंगाचे हे उदाहरण खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शहरात बॅनर आणि होर्डिंग लावण्यासाठी ठराविक वेळ, ठिकाण आणि आकारमानाचे निकष निश्चित आहेत. त्याबाबत कर आकारणीची स्पष्ट तरतूद असून, या माध्यमातून नगरपालिकेला लाखो रुपयांचा महसूल मिळतो. परंतु, प्रत्यक्षात हे निकष पाळणे टाळले जात असल्याने अवैध बॅनर लावण्याचे प्रकार वाढले आहेत. धाराशिव शहरात, विशेषतः राष्ट्रीय महामार्गालगत, बॅनर सर्रासपणे लावले जातात. यामुळे केवळ शहराचे सौंदर्य बिघडत नाही, तर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. काही वेळा बॅनरमुळे दृष्टी आड झाल्याने किरकोळ अपघातांच्याही घटना घडल्या आहेत.

नगरपालिकेने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत गंभीर पावले उचलणे आवश्यक असतानाच, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच नियमभंग करणारा बॅनर लावला जाणे, ही बाब दुर्दैवी आणि लाजिरवाणी मानली जात आहे. नागरिकांचा प्रश्न आहे की, या बॅनरच्या वैधतेबाबत नगरपालिका स्पष्ट भूमिका घेणार का? की नेहमीप्रमाणेच चुकीकडे दुर्लक्ष करून ‘मूकसंमती’ दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.