Home Blog Page 133

अखेर जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण सोडत जाहीर

सर्वसाधारण १८, ओबीसी ८ व अनु. जाती ५ महिलांसाठी संधी तर

अनु. जाती ५ पुरुष, १ अनु. जमाती व १७ प्रवर्ग खुले

उस्मानाबाद दि.२८ (प्रतिनिधी) – ओबीसी आरक्षणाची टांगती तलवार न्यायालयात लटकल्याने राज्यातील महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे मार्चमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील आजपर्यंत घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या निवडणुका व त्यांचे आरक्षण केव्हा घोषित होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले यांनी दि.२८ जुलै रोजी या आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ५ तर  पुरुषांसाठी ५ तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी ८ तसेच सर्वसाधारण महिलांसाठी १८ व खुल्या प्रवर्गासाठी १६ व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १ अशा एकूण ६१ गटांचा समावेश आहे. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. प्रथम ६१ गटांपैकी प्राधान्य क्रमाने अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणासाठी वाशी तालुक्यातील पारगाव, लोहारा तालुक्यातील आष्टा कासार, तुळजापूर तालुक्यातील जळकोट, काटी, भूम तालुक्यातील देवळाली, वालवड व ईट, उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी, केशेगाव व बेंबळी या गटांसाठी चिट्टया काढण्यात आल्या. यापैकी देवळाली, ईट, काटी, पारगाव व केशेगाव हे गट अनुसूचित जातीच्या महिलांसाठी तर उर्वरित आष्टा कासार, जळकोट, कोंड, बेंबळी व वालवड हे अनुसूचित जातीच्या पुरुषासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, महसूलचे तहसिलदार प्रवीण पांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ व नायब तहसिलदार पंकज मंदाडे यांनी सहाय्य केले. 

_______________________________

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी कळंब तालुक्यातील खामसवाडी तर परंडा तालुक्यातील डोण्जा, जवळा (नि) व आसू तसेच तुळजापूर तालुक्यातील नंदगाव तर लोहारा तालुक्यातील कानेगाव तसेच उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बु.) व करजखेडा हे ८ गट महिलांसाठी तर 

पुरुषांसाठी वाशी तालुक्यातील पारा तसेच परंडा तालुक्यातील आनाळा व खासापुरी तर तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा व तामलवाडी तसेच लोहारा तालुक्यातील माकणी व उमरगा तालुक्यातील तलमोड व तुरोरी हे ८ गट राखीव ठेवण्यात आले आहेत.


______________________________


सर्वसाधारण गटांसाठी भूम तालुक्यातील पाथरूड‌तर कळंब तालुक्यातील मंगरूळ, डिकसळ, शिराढोण, नायगाव, देवळाली व येरमाळा तसेच उस्मानाबाद तालुक्यातील जागजी व सांजा तर परंडा तालुक्यातील शेळगाव तर लोहारा तालुक्यातील सास्तुर व जेवळी तसेच उमरगा तालुक्यातील पेठ सांगवी, येणेगुर, दाळिंब व आलूर हे गट सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.


_______________________________


 भूम तालुक्यातील माणकेश्वर वाशी तालुक्यातील तेरखेडा व ईटकुर कळंब तालुक्यातील मोहा उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, आळणी, येडशी, उपळा (मा), पाडोळी (आ) व कारी तर तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ, अणदूर, मंगळूर, काटगाव, खुदावाडी तर उमरगा तालुक्यातील बलसूर, गुंजोटी व कदेर हे गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, महसूलचे तहसिलदार प्रवीण पांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, नायब तहसिलदार पंकज मंदाडे यांनी कामकाज पाहिले. 


______________________________


प्रत्येक प्रवर्गासाठी १ व २ अशा प्राधान्य क्रमाने आरक्षण जाहीर करण्यात आले. तर जास्ती लोकसंख्या असलेल्या व यापूर्वी आरक्षणाचा लाभ लाभ देण्यात आलेल्या गटांना पुन्हा आरक्षण देण्यासाठी तिसरा क्रमांक देण्यात आला. तिसरा क्रमांक देण्यात आलेल्या गटांच्या नावाच्या चिट्टया एका काचेच्या बरणीत सभागृहात सर्वासमोर बंद करण्यात आल्या. त्या चिट्टया येथील जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेतील इयत्ता चौथी ते सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या अपेक्षा प्रताप कदम चैत्राली नेताजी कदम ऐश्वर्या नारायण बनसोडे व तनया बालाजी पवार या विद्यार्थिनींच्या हस्ते काढण्यात आल्या. या विद्यार्थिनींनी काढलेल्या चिट्टीच्या आधारेच नागरिकांचा मागास (ओबीसी), अनुसूचित जाती व महिला या प्रवर्गाचे आरक्षण घोषित करून ते निश्चित करण्यात आले. 


_____________________________


हे आरक्षण घोषित होण्यापूर्वी अनेक दिग्गज आणि आपापल्या ठराविक मतदारसंघात जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर ते मतदार संघ नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), अनुसूचित जाती व महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचे भ्रमाचे भोपळे हवेत विरले आहेत. त्यांना दुसऱ्या मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार असून पुन्हा नव्याने मतदार संघाची बांधणी करायची कशी ? या विचाराने त्यांची निराशा झाली असून ते निवडणूक लढवावी किंवा नाही ?अशा द्वंद्वात अडले आहेत. 


_______________________________


एकीकडे सर्व राजकीय समीकरणे बदललेली आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून तिकीट घ्यावे ? अशी संभ्रमावस्था सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांच्यासमोर निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे कोणाबरोबर युती व आघाडी करावी असा पेज जिल्ह्यातील पक्ष प्रमुखासमोर निर्माण झाला आहे.

दैनिक जनमत २८ जुलै २०२२ E paper

मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय थोडक्यात

मुंबई –

👉 राज्यात वीज वितरण यंत्रणा सुधारणार. ग्राहकांना स्मार्ट व प्रिपेड मीटर्स. महावितरण व बेस्ट उपक्रमामार्फत सुधारित वितरण क्षेत्र योजना- सुधारणा अधिष्ठित आणि निष्पत्ती आधारित योजना

👉 अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देणार

👉 लोणार सरोवर जतन, संवर्धन व विकास आराखड्यास मान्यता

👉 १५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढलेल्या ५० अतिरिक्त जागांसाठी राज्याचा हिस्सा देणार

👉 हिंगोली जिल्ह्यात ‘मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र’

👉 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान. पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा लाभ देणार 

👉 ग्रामीण भागातील भूमीहीन लाभार्थ्यांना जागा देण्याबाबत विविध सवलती

👉 राज्यात कायमस्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर ३ नवीन समाजकार्य महाविद्यालये स्थापणार

 👉 ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास ८९०.६४ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता. 

👉 जळगाव जिल्ह्यातील वाघुर प्रकल्पास २२८८.३१ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता

👉 ठाणे जिल्ह्यातील भातसा पाटबंधारे प्रकल्पास १४९१.९५ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता.

👉 राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च २०२२ पर्यंतचे खटले मागे घेण्याबाबत कार्यवाही

👉 दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती

👉 विधि व न्याय विभागात सह सचिव (विधि) (गट-अ) पद नव्याने निर्माण करणार

एका दिवसाच्या बाळाचे अपहरण! दहा तासात आरोपीला पोलिसांनी पकडले

 

एलसीबी, विटा, तासगाव पोलिसांची संयुक्त दमदार कामगिरी: शेणोली स्टेशन ता.कराड येथे’त्या’ महिलेसह बाळ ताब्यात : आई – वडिलांनी सोडला सुटकेचा निःश्वास

तासगाव ( प्रतिनिधी)

      तासगाव येथील मध्यवस्तीत असणाऱ्या डॉ. अंजली पाटील यांच्या हॉस्पिटलमधून रविवारी आज सकाळी एक दिवसाच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. या हॉस्पिटलमध्ये दोनच दिवसांपूर्वी परिचारिका म्हणून रुजू झालेल्या एका महिलेने हे निंदनीय कृत्य केले होते. दरम्यान, संबंधित महिला व त्या बाळाला शेनोली स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले आहे. बाळाची तब्येत सुखरूप असून आई-वडिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. एलसीबी, विटा व तासगावच्या पोलिसांनी संयुक्तिकरित्या ही कारवाई केली.

       याबाबत माहिती अशी :  तासगाव येथील सिद्धेश्वर मंदिर चौकात डॉ. अंजली पाटील यांचा दवाखाना आहे. या दवाखान्यात चिंचणी येथील एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. एकच दिवसापूर्वी या महिलेचे सिझर करण्यात आले होते. दरम्यान, याच दवाखान्यात दोनच दिवसांपूर्वी एक महिला परिचारिका म्हणून रुजू झाली होती. या महिलेने आपण जुळेवाडी (ता. तासगाव) येथील असून रहायला तासगावातच असल्याचे संबंधित डॉक्टरांना सांगितले होते. सदर महिलेचे नाव स्वाती थोरात आहे  अशी माहिती प्राप्त झाले


      माझी सर्व कागदपत्रे जुळेवाडी येथे असून एक-दोन दिवसात तुम्हाला सर्व कागदपत्रे देतो, असेही या महिलेने डॉक्टरांना सांगितले होते. डॉक्टरांनी महिलेच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तिला परिचारिका म्हणून कामावर घेतले होते. दरम्यान, आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ही महिला चिंचणी येथील सिझर झालेल्या ‘त्या’ महिलेच्या वार्डमध्ये गेली. तेथील एक दिवसाच्या बाळाला ताब्यात घेऊन ही महिला हॉस्पिटलमधून खाली आली. या बाळाला आपल्या काखेतील मोठ्या पर्समध्ये टाकून क्षणार्धात तिने बाळासह पोबारा केला. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. 

     हॉस्पिटलमधून एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरण झाल्याची बातमी तासगाव शहरासह जिल्हाभरात वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर सीसीटीव्ही फुटेज ‘व्हायरल’ झाले. या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली. मुलाच्या मातेचे अश्रू थांबत नव्हते. दरम्यान, तासगावचे डीबी पथक तातडीने दवाखान्यात दाखल झाले. त्याठिकाणी ‘त्या’ मुलाचे आई-वडील, डॉक्टर व दवाखान्यातील स्टाफची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. जिल्हाभरात वायरलेसद्वारे मेसेज देण्यात आला. सर्वांनी गोपनीय खबऱ्या कामाला लावले.

     दरम्यान, एलसीबीचे सागर टिंगरे यांना संबंधित महिला बाळासह शेनोली स्टेशनवर असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली. त्यांनी याबाबत तातडीने विटा येथील वाहतूक पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच विट्याचे वाहतूक पोलीस प्रसाद सुतार,(रा तासगाव)अमोल जाधव व अन्य काहीजण तातडीने शेनोली स्टेशनकडे रवाना झाले. या पोलिसांनी संबंधित महिला व बाळाला ताब्यात घेतले. दरम्यान तासगावचे डीबी पथकही शेणोली स्टेशनवर पोहोचले.

     सायंकाळी बाळासह सबंधित महिलेला तासगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिचे गाव खानापूर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. तीने हे कृत्य का व कोणासाठी केले, याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, अवघ्या आठ-नऊ तासात या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


जुगार खेळणाऱ्या १९ जणांवर पोलीसांची कारवाई, १० लाखाचा मुद्देमाल जप्त

उस्मानाबाद जुगार खेळणाऱ्या १९ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेने  कारवाई केली असून १० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत माहिती अशी की दि.२१ जुलै रोजी उमरगा उपविभागात पोलीस गस्तीस होते. दरम्यान सपोनि शैलेश पवार यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली कि, मनोहरनगर, होळी तांडा ग्रामस्थ- दत्ता चव्हाण यांचे शेतात एका पत्राचे शेडमध्ये काही इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. यावर पथकाने त्या ठिकाणी १७.०० वा. सु. छापा टाकला असता तेथे दत्ता चव्हाण,राजेंद्र चव्हाण,बबन चव्हाण,विकास राठोड,संतोष राठोड,अजित जाधव,गुलाब चव्हाण,बाबु चव्हाण,विजय चव्हाण, सर्व रा. होळी तांडा, ता. लोहारा, खंडु खराटे ,अरुण गायकवाड,विश्वनाथ क्षिरसागर,महावीर सुरवसे,रफीक शेख,सचिन मुनाळे,शकील शिरगापुरे,बाबुराव दुधभाते, सर्व रा. किल्लारी, ता. औसा, जि. लातूर रोहन पवार, रा. माकणी अजय चव्हाण, रा. राजेगाव, ता. लोहारा हे सर्व लोक तिर्रट जुगार खेळताना मिळुन आले. त्यांचेकडे जुगाराबाबत विचारणा केली असता सदर पत्रा शेडचे मालक दत्ता चव्हाण हेच जुगाराचा अड्डा चालवित असल्याचे समजले. त्या ठिकाणाहून जुगाराचे साहित्यासह 05 मोटारसायकल, 01 कार, 17 भ्रमणध्वनी व 29,300 रु. रोख रक्कम असा एकुण 10,31,880 रु चा मुददेमाल पोलीसांनी जप्त केला असुन त्यांचेविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4,5 प्रमाणे लेाहारा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि-रामेश्वर खनाळ, सपोनि- शैलेश पवार, पोहेकॉ- प्रकाश औताडे, जावेद काझी, हुसेन सय्य्द, मेहबुब अरब, धनंजय कवडे, पोना- शौकत पठाण, अमोल चव्हाण, अशोक ढगारे या पथकाने केली आहे.