किरण बकालेंच्या विरोधात जोरदार निदर्शने, मोर्चा काढून निषेध
उस्मानाबाद –
जळगाव येथील पोलीस निरीक्षक किरण बकाले याने मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याबद्दल शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पोलिस निरीक्षक किरण बकाले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून मोर्चा काढत विरोधात घोषणाबाजी केली.
जळगाव जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांना शासकीय सेवेतून,पोलीस खात्यातून कायमचे बडतर्फ करून, गुन्हा दाखल करून, अटक करून, महाराष्ट्रातून हद्दपार करण्याबाबत शिवराज्याभिषेक सोहळा समिती च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा येथील जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी एका पोलीस कर्मचाऱ्या बरोबर मोबाईलवर बोलत असताना मराठा समाजाबद्दल अत्यंत खालच्या पातळीतील हिण,अपमानस्पद, लज्जास्पद, शर्मेने मान खाली घालण्यासारखे बोलून समस्त मराठा समाजाचा व संपूर्ण महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा अपमान केलेला आहे. पोलीस खात्यासारख्या शिस्तबद्ध खात्यात राहून जात धर्माबद्दल मनात आकस ठेवून वैरभाव, आकस निर्माण करण्याच्या उद्देशाने एका विशिष्ट जात समुदायाचा अपमान करण्याच्या उद्देशाने या पोलीस अधिकाऱ्याने हे वर्तन देशासाठी अशोभनीय आहे. किरण बकाले सारखे अधिकारी जर पोलीस खात्यात राहिले तर समाजात अशांतता निर्माण होऊन समाजात जातीय अशांतता निर्माण होऊ शकते. तरी पोलीस निरीक्षक किरण बकाले व संबंधित पोलीस कर्मचारी याच्यावर महाराष्ट्र शासनाने व पोलीस प्रशासनाने बडतर्फीची कारवाई करावी.तसेच त्यांच्या गुन्हा दाखल करून त्याला अटक करून सदर अधिकाऱ्याला महाराष्ट्रातून हडपार करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर शिवराज्याभिषेक सोहळा समिती अध्यक्ष शशिकांत खुने, धर्मराज सूर्यवंशी, दत्तात्रय साळुंखे, रवी मुंडे, सदानंद दहीहटणीकर, कंचेश्वर डोंगरे, निशिकांत खोतरे, अमोल पवार, अच्युत थोरात, एडवोकेट प्रशांत, जगदाळे सुनील मिसाळ विकास जाधव गणेश नलवडे आनंद जाधव रियाज शेख धनंजय साळुंखे अशोक गुरव संतोष घोरपडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
एनएमसीच्या तपासणी अगोदर प्रलंबित खरेदीला प्रशासकीय मान्यता द्यावी
आमदार कैलास घाडगे पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्याकडे केली मागणी
उस्मानाबाद (१४ प्रतिनिधी) – राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) परिक्षणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडुन फेरप्रस्ताव पाठविण्यात आला आहे. फेरतपासणीत फर्निचर व उपकरणांची त्रुटी राहु नये यासाठी उर्वरित रक्कमेच्या प्रलंबित असलेल्या फर्निचर व उपकरणाच्या खरेदीस तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यानी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे.चार महिन्यापासुन अत्यंत महत्वाच्या खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित का राहिला असा सवाल त्यानी पत्राद्वारे केला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामार्फत प्रलंबित असलेल्या फर्निचर व उपकरणे खरेदीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत वैद्यकिय शिक्षण संचालक व वैद्यकिय सचिव यांच्याकडे प्रस्ताव पाठवुन चार महिने झाले आहेत.अद्यापपर्यंत त्यास मंजुरी देण्यात आलेली नाही.२०२२ च्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी एनएमसी परिक्षण होणार आहे,त्यात या बाबींची पुर्तता होणे आवश्यक असल्याचे आमदार घाडगे पाटील यानी म्हटले आहे.या अगोदर याविषयासाठी दहा जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.दहा ऑगस्ट रोजी वैद्यकिय शिक्षण संचालक याना व सचिव वैद्यकीय शिक्षण यांच्याकडे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत तसेच पत्रव्यवहार केला होता.शिवाय दहा ऑगस्ट रोजी सचिव वैद्यकीय शिक्षण व संचालक यांना समक्ष भेटून यंत्रसामग्री व फर्निचरच्या खरेदीसाठी प्रस्तावित असलेले प्रशासकीय मान्यता प्रदान करावी अशी मागणी केल्याचेही आमदार घाडगे पाटील यानी सांगितले आहे.सहा कोटी रुपयाची तरतुन असताना त्यातील फक्त एक कोटी 23 लाखाच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली मग इतर रक्कमेच्या प्रलंबित असलेल्या फर्निचर व उपकरणे खरेदीस प्रशासकीय मान्यता का करण्यात आली नाही?असा सवाल आमदार घाडगे पाटील यानी विचारला आहे.
गेल्या कित्येक दशकापासुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होती.तत्कालीन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने १३ जानेवारी २०२१ रोजी मंत्रीमंडळ निर्णयाव्दारे शंभर प्रवेश क्षमतेचे व ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्यास मंजुरी दिली.२७ जानेवारी २०२१ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शासन निर्णय झाला.एनएमसी परिक्षणासाठी फेर प्रस्ताव पाठविण्यात आला असुन तपासणीत फर्निचर व उपकरणांची त्रुटी राहु नयेत यासाठी उर्वरित रक्कमेच्या प्रलंबित असलेल्या फर्निचर व उपकरणाच्या खरेदीस तात्काळ प्रशासकीय मान्यता मिळावी अशी मागणी आमदार घाडगे पाटील यानी केली आहे.
तासगाव अर्बन बँकेच्या सभासदांना १५% डिव्हीडंड देणार – चेअरमन महेश्वर हिंगमिरे
तासगाव अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव
बँकेची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभाखेळीमेळीच्या वातावरणात व शांततेत पार पडली
तासगाव (प्रतिनिधी)
तासगाव नगरीतील सहकाराचा मानबिंदू ठरलेल्या तसेच शून्य टक्के एनपीए व सतत ऑडीट वर्ग ‘अ’ असणाऱ्या सर्व सभासद व ठेवीदार यांच्या प्रगतीमध्ये साथ देणारी दि.तासगाव अर्बन बँक सामाजिक बांधिलकी जपत बँकेच्या संचालक मंडळाकडून विविध उपक्रम राबविणेत येतात. याच सामाजिक बांधिलकीचा विचार करून बँकेच्या ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बँकेच्या संचालक मंडळाचे वतीने विधवा प्रथा बंदी उपक्रमास अनुसरून विधवा महिला ठेवीदारांना जेष्ट नागरिकाना ठेवीवर देण्यात येणाऱ्या जादा व्याज दराच्या सुविधेप्रमाणे अर्धा टक्का जादा व्याज दर देणेचा ठराव बँकेच्या ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. या वेळी सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन महेश्वर हिंगमिरे होते.
प्रथम बँकेचे उपाध्यक्ष श्री कुमार शेटे यांनी उपस्थित सर्व सभासद बंधू भगिनींचे स्वागत केले. तद् नंतर बँकेचे अध्यक्ष श्री महेश्वर हिंगमिरे यांनी बँकेच्या सांपत्तिक स्थितची माहिती देताना सांगितले की, गेल्या सहा वर्षात बँकेच्या व्यवसायामध्ये दुप्पटीपेक्षा जास्त रक्कमेने वाढ झालेली आहे. बँकेचे वसूल भाग भांडवल रु. २७५.१६ लाख इतके आहे. पुढील काळात बँकेच्या भागभांडवलामध्ये वाढ करणेचा मानस असून त्यासाठी सर्व सभासदांनी आपली शेअर्स रक्कम रु.५०००/- पूर्ण करून घ्यावेत. बँकेचे राखीव निधी २१११.९९ लाख, ठेवी रु.२१२६०.७५ लाख, कर्जे रु. १४४८१.१९ लाख तर बँकेची एकून गुंतवणूक रु. ८०६८.३४ लाख इतकी आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये बँकेस रु. २७५.७० लाख इतका नफा झालेला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे अर्धे वर्ष लॉकडाऊन मध्ये जावूनही बँकेने आपली टक्के एन.पी.ए. ची परंपरा कायम ठेवलेली आहे. पुढील काळामध्ये बँकेच्या शाखा विस्तार करणेचा मानस असून नवीन पाच शाखा उघडण्याचे आमचे संचालक मंडळाचा मनोदय आहे. सभासदांना १५ टक्के डिव्हीडंड ची तरतूद करण्यात आलेली असून लवकरच सभासदांच्या खात्यामध्ये डिव्हीडंड ची
रक्कम जमा करणेत येईल. दि.३१/०३/२०२३ पर्यंत बँकेच्या ऐकून ठेवी रु.३००,०० कोटी तर कर्जे रु.२१०.००
कोटी करणेचा बँकेचा मानस असून त्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे व आपल्या बँकेच्या ठेवीमध्ये वाढ करावी.
तदनंतर बँकेचे सी.ई.ओ. श्री. श्रीकांत कुलकर्णी यांनी सभेपुढील विषय मांडले व त्यास
सभासदांनी एकमताने सूचक व अनुमोदन करून सर्व विषयास मंजुरी दिली. यावेळी बँकेचे जेष्ट सभासदांचा सत्कार मान्यवर सभासदांच्या हस्ते करण्यात आला तसेच १० वी च्या परीक्षेत तासगाव केंद्रामध्ये पहिल्या आलेल्या २ गुणवंत विद्यार्थ्यांचा
सत्कारही यावेळी करण्यात आला.
उपस्थित सभासदांचे स्वागत बँकेचे उपाध्यक्ष कुमार शेटे यांनी केले तर सभेचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन बँकेचे संचालक श्री विनय शेटे यांनी केले. श्रद्धांजलीचा ठराव संचालक राजेंद्र माळी यांनी मांडला. अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी केले. यावेळी सभासदांनी शाखा जत साठी जागा खरेदी करणे तसेच इमारत बांधणे, शाखा कुपवाड साठी बँकेचे अद्ययावत डेटा सेंटर उभारणे व शाखेसाठी इमारत बांधणे साठी तसेच बँकेच्या शाखांसाठी आवश्यक त्या ठिकाणी जागा खरेदी करणे इमारत बांधणे साठी सभासदानी एकमताने मंजुरी दिली.
बँकेने जेष्ट सभासदांचा सत्कार करण्याचे वय ७५ वरून ७१ केले बद्दल कमलाकर कुत्ते यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून श्री अनिल पिसे तासगाव यांचे गॅस सिलिंडर स्फोटांमध्ये घराचे व प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले त्याना बँकेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी विविध संस्थामध्ये पदाधिकारी म्हणून निवड झाले बद्दल श्री रवींद्र देवधर, सिदगोंड पाटील, मिलिंद सुतार यांचा सत्कार करणेत आला.
तसेच मिटिंग साठी हॉल उपलब्ध करून दिले बद्दल शाबाद म्हेतर यांचा सत्कार करणेत आला. यावेळी बँकेचे चेअरमन महेश्वर हिंगमिरे, व्हा. चेअरमन कुमार शेटे, संचालक श्री. सदाशिव उर्फ बंडोपंत शेटे, अरुण पाटील, श्री विनय शेटे, अनिल कुत्ते, श्री उदय वाटकर, धोंडीरामबापू सावंत, रामशेठ शेटे, राजेंद्र माळी, सौरभ हिंगमिरे, तज्ञ संचालक सिए.. उदय डफळापूरकर, सिए. अमित शिंत्रे, संचालिका सौ. सविता पैलवान, सौ. उमा हिंगमिरे, सीईओ श्रीकांत कुलकर्णी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य रवींद्र देवधर, अवधुत गडकर, प्रदीप पवार बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे, पत्रकार तथा स्वामी रामानंद भारती सह. सुतगिरणीचे संचालक राहुल कांबळे, द्राक्ष बागातदार उदय अण्णा शेटे, माजी नगरसेवक सोमनाथ मिठारी, सूर्यकांत पेटकर, सुनील चव्हाण,विलास शिंदे सर, रशिदभाई मुल्ला,माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील,माजी नगरसेवक गजानन खुजट अँड. आर. एम. टिंगरे.जगदीश कालगावकर, सुनील जोशी कवठेमहांकाळचे नगरसेवक अजित माने, रणजीत घाटगे, जत येथील प्रसिद्ध व्यापारी शशिकांत शेठ काळगी, मनोज जेऊर, श्री दस्तगीर नदाफ इत्यादी उपस्थित होते.
मध्यरात्रीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
मद्यसाठ्यासह सहा लाखाचा मुद्देमाल जप्त
उस्मानाबाद – जिल्हयात अवैध मद्य / मद्यार्क, मळी आयात, निर्यात, वाहतुक व विक्री करणाऱ्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कार्यवाही करुन गुन्हे नोंदविण्याची मोहिम चालु आहे. त्याअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असून ६,११,२८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश उत्सावाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी सामुहीक धाड सत्र आयोजीत करुन अवैध मद्य निर्मीती केंद्रावार कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्हयातील अधिकारी सतर्क राहुन सदर मोहिमेत भरीव कामगीरी करीत आहेत. यातच मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 09 सप्टेंबर रोजी दिपकनगर तांडा ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद येथील सुनिल नारायण चव्हाण वय 27 वर्षे हा उस्मानाबाद- बार्शीरोडवर कौडगांव ता. जि. उस्मानाबाद येथे त्यांचे फायदेसाठी अवैध रित्या गोवाराज्यनिर्मीत उत्पादन शुल्क चुकविलेले विदेशी दारुची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करीत असल्याची खात्रीलायक बातमी मीळाली नुसार टि.एस. कदम. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक उस्मानाबाद / लातुर एस.के.शेटे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद आर. आर. गिरी, व्ही. आय. चव्हाण, जवान ए. आर. शेख, जवान-नि-वाहनचालक यांचेसह गुप्त माहिती मिळालेल्या उस्मानाबाद- बार्शीरोडवर कौडगांव ता. जि. उस्मानाबाद येथे प्रो. गुन्हेकामी रात्री १ वाजता छापा मारला असता सदर आरोपी हा गुन्हयाच्या ठिकाणावरुन फरार झाला असुन सदर ठिकाणावरुन प्रो. गुन्हयाचा नमुद एकुण रु.6,11,280/- रुपये किंमतीचा गोवाराज्यनिर्मीत उत्पादन शुल्क चुकविलेले विदेशी दारुची मद्याचा मुद्देमाल व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
सदर गुन्हयातील आरोपी व इतर यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65-(a)(e), 81, 108 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरचा मद्यसाठा तो कोणाला विक्री करणार होतो याचा तपास केला जात आहे.
परंडा शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग बनला मृत्युचा सापळा !
गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी शहरातील चिखलमय मुख्य मार्ग दुरुस्त करा
शहरातील गणेश भक्ता सह गणेश मंडळ अध्यक्षांची तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
परंडा (भजनदास गुडे) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक रोडवरील खड्ड्यात मातीमिश्रित मुरूम टाकल्याने चिखलामुळे श्री गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीतील वाहने व गणेशमूर्तीला घसरुन अपघात होण्याची शक्यतानिर्माण झाल्याने यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहरातील गणेश मंडाळातील गणेशभक्तांनी नायब तहसीलदार सुजित वाबळे यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मुख्य मंडई पेठ,गोल्डन चौक,बसस्थानक, करमाळा डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मातीमिश्रीत मुरूम टाकण्याचा अभिनव प्रयोग नगरपरिषद मार्फत सुरू करण्यात आला आहे.या ‘अर्थ’पूर्ण मलमपट्टीमुळे सर्वच अचंबित झाले आहेत.रस्त्यावरील खड्ड्याांमुळे दि. ८ व ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीतील गणेशमूर्ती व वाहनांना अपघातासह हानी होण्याची शक्यता आहे. मुख्य विसर्जन मिरवणूक रस्त्यावरील खड्ड्यात मातीमिश्रित मुरूम टाकल्याने चिखलामुळे गणेशभक्तांना घसरण्याचा धोका निर्माण होणार आहे. ‘आगीतून उठून फुफाट्यात पडण्या’सारखा हा प्रकार घडला आहे.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक या मार्गावर हा मातीमिश्रित मुरमाचा अभिनव प्रयोग परंडा नगरपरिषदेने खड्डे बुजविण्यासाठी राबवत आहेत.हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असून या खड्ड्यांचा आणि त्यानंतर ते ज्या अभिनव पध्दतीने बुजविले जात आहेत, त्याचा त्रास वाहनांपेक्षा जास्त दुचाकी आणि हलक्या वाहनांना होत आहे.नगरपरिषदने खड्डे मातीमिश्रित मुरमाने बुजविल्याने या माती मुरमाचे चिखलांत रुपांतर झाले आहे.सध्या पाऊस असल्याने खड्डे पूर्वी पाण्याने भरलेले असायचे. ते आता चिखलाने भरले आहेत. हा चिखल दुचाकी घसरून पडण्यास पुरेसा आहे. यामुळे आज व उद्या होणाऱ्या श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीतील गणेशमूर्ती व वाहनांना धोका निर्माण होत आहे. यावर तात्काळ कच खड्डी टाकून दुरुस्ती करण्यात यावी.अन्यथा श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीत गणेशमूर्ती व वाहनांना धोका निर्माण झाल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद मुख्याधिकारी यांची राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर संकेत ठाकूर, प्रशांत गायकवाड, विकास साळुंखे,प्रितम डाके,पृथ्वीराज पाटील,सुरज मुसळे,आदित्य जमदाडे,सोहेल पटेल,सोहम परदेशी, आदर्श जमदाडे,अमर जमदाडे,रोहित काळे,लखन जमदाडे,कृष्णा जमदाडे,रोहित शेळके,योगेश बुरुंगे,अजय शिंदे, सागर गोफणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच जय हनूमान टेंबे गणेश मंडळ,शिवछत्रपती गणेश मंडळ, नरवीर गणेश मंडळ, मोरया गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.























































