जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी ई-केवायसी करण्यासह आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे
उस्मानाबाद दि.११ (प्रतिनिधी) – जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकरी लाभार्थ्यांनी आपली ऑनलाईन ई- केवायसी केलेली नाही. खास त्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी आपली कार्ड काढण्यासाठी नोंदणी केलेली नाही. त्यांच्यासाठी दि.१२ ते १३ ऑक्टोबर असे सलग ३ दिवस ई-केवायसी व नोंदणीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केलेली नाही अशा सर्वांनी आपली गाव स्तरावर शिबीरामध्ये नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन नूतन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.११ ऑक्टोबर रोजी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ ओंबासे म्हणाले की, जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे २ लाख ७७ हजार शेतकरी लाभार्थी असून त्यापैकी २ लाख २३ हजार शेतकऱ्यांनी ई- केवायसी केलेली आहे. तर ५४ हजार ४१९ शेतकऱ्यांनी केलेली नाही. तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यामध्ये १ लाख ३२ हजार ८४ कुटूंब पात्र आहेत. तर या कुटुंबातील ४ लाख ६८ हजार १७४ लाभार्थी पात्र असून त्यापैकी आतापर्यंत केवळ ७७ हजार ६५४ लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड तयार करून घेतले आहे. विशेष म्हणजे यापैकी १७ हजार ४७ लाभार्थी रुग्णांना या योजनेच्या अंगीकृत रुग्णालयाद्वारे उपचार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी आपले मूळ शिधापत्रिका किंवा प्रधानमंत्री यांचे पत्र व आधार कार्ड अथवा अन्य कोणतेही शासनमान्य ओळखपत्र सोबत घेऊन जवळच्या सीएससी केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधून आयुष्यमान कार्ड साठी आवश्यक असणारी ई-केवायसी करून घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक गावातील लाभार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी ठिकाण व वेळेची यादी ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या प्रभागात दर्शविण्यात आलेल्या आहेत.
————————————————-
जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय उमरगा उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय परंडा स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर ग्रामीण रुग्णालय भूम व ग्रामीण रुग्णालय वाशी ही शासकीय रुग्णालय आहेत. तर सुविधा हॉस्पिटल, चिरायू हॉस्पिटल, वात्सल्य हॉस्पिटल व नवोदय हॉस्पिटल उस्मानाबाद तर श्री विठ्ठल हॉस्पिटल वाशी, कृष्णा हॉस्पिटल कळंब तसेच साई हॉस्पिटल, चिंचोली हॉस्पिटल, हॉस्पिटल, डिजिटल हॉस्पिटल व डॉ. के.डी. शेंडगे हॉस्पिटल, उमरगा या १८ हॉस्पिटलमध्ये या योजने अंतर्गत उपचार केले जातात.
————————————————-
विशेष सेवा प्रकार १ मध्ये जळीत, हृदयरोग शस्त्रक्रिया व उपचार, त्वचारोग, कानाक व घसा रोग, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, संसर्गजन्य आजार, जठरांत्र मार्गाचे रोग, नवजात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन, मज्जातंतूचे विकार, स्त्री रोग व प्रसूती शास्त्र, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया बालरोग कर्करोग, आकस्मित वैद्यकीय उपचार फुफ्फुसाच्या आजारावरील उपचार, संधिवात संबंधी उपचार, कर्करोगाच्या शस्त्रक्रिया व मानसिक आजारांचा समावेश आहे.
————————————————-
विशेष सेवा प्रकार २ मध्ये हृदयरोग आकस्मित सेवा, अंतःस्त्राव संस्थेचे विकार, सर्वसाधारण औषध शास्त्रचिकित्सा, व्याधी चिकित्सा, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, कर्करोगावरील औषधोपचार, मूत्रपिंड विकार, मज्जा तंतूच्या विकारावरील शस्त्रक्रिया, नेत्ररोग शस्त्रक्रिया बालरोग शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरी कृत्रिम अवयव व उपचार किरणोत्सवर्गाद्वारे कर्करोग चिकित्सा, जठर व आंत्रविकाराच्या शस्त्रक्रिया, मुत्रवह संस्थेच्या विकारावर शस्त्रक्रिया व जबडा व चेहऱ्याच्या अस्थिवरील शस्त्रक्रियांचा समावेश.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीस उपस्थित होते.
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट
▪️ शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय
▪️ या संचामध्ये प्रत्येकी १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश
▪️ १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार
▪️ यासाठी येणाऱ्या ५१३ कोटी २४ लाख खर्चास मान्यता
✅आपत्ती व्यवस्थापनातील कामांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र, राज्य सरकारच्या कंपन्यांना नेमणार
▪️ आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचा निर्णय
▪️ या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून ‘टर्न की’ तत्त्वावर नेमणार
▪️ सामजंस्य करार करण्यात येऊन कंपन्यांना थेट नियुक्तीने कामे देणार
✅राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज मिळणार
✅नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता
▪️ या प्रकल्पाचा पूर्णत्व खर्च ८६८० कोटी रुपयांमध्ये वाढ झाल्याने ९२७९.०६ कोटींच्या सुधारित प्रकल्प खर्चास सुधारित मान्यता
▪️ या प्रकल्पासाठी ६२२ कोटी रुपये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला बिनव्याजी दुय्यम कर्ज देण्यास मान्यता
▪️ या प्रकल्पामध्ये ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान मार्गिका क्र.१ व प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर ही मार्गिका क्र.२ अशा एकूण ३८.२१५ कि.मी. लांबीच्या दोन मार्गिकांचा व ३८ स्थानकांचा समावेश
✅ सुरेवाडा उपसा सिंचन योजनेला ३३६.२२ कोटींची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता
▪️ भंडारा तालुक्यातील सुरेवाडा गावाजवळ वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर होणार ही योजना
▪️ भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील २८ गावांना या योजनेचा होणार फायदा
▪️ या उपसा सिंचन योजनेतून ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
✅ उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता
▪️ उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना संजीवनी मिळणार
▪️ प्रकल्पाच्या सुमारे ११७३६.९१ कोटी रुपये इतक्या किंमतीस मान्यता
▪️ मराठवाड्यातील २ जिल्ह्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील १३३ गावांतील १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार
▪️ प्रथम टप्प्यात ७ अ.घ.फू. व दुसऱ्या टप्प्यात १६.६६ अ.घ.फू. असे एकूण २३.६६ अ.घ.फू. पाणी वापर.
▪️ उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा व उमरगा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला लाभ होणार.
कोरोना काळात घरी बसणारे आज दररोज सभा, आक्रोश मेळावे घेताहेत
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांची विरोधकांवर टीका
सांगोला (तालुका प्रतिनिधी): पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीनंतर राज्यात सत्तातंराला सुरुवात झाली. अडीच वर्षे सत्तेत नसल्याने आघाडी सरकारने भाजपच्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले. प्रशासकीय बदल्या, गुन्हे दाखल होत असल्याने कार्यकर्ते दबावात होते. पालकमंत्री कामे करण्यासाठी सक्षम आहेत. कामे कशी करावीत हे कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडून शिकावे. दररोज अजित पवार, जयंत पाटील घोषणा करत आहेत. कोरोना काळात घरी बसणारे आज दररोज सभा, आक्रोश मेळावे घेत आहेत अशी विरोधकांवर जोरदार टीका राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकात पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. ते सांगोल्यात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकात पाटील हे सांगोल्यात भाजपचे पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, जिल्हाध्यक्ष आ.सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते-पाटील, शशिकांत चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, माजी सभापती संभाजी आलदर, शिवाजीराव गायकवाड, बंडू केदार, राजश्री नागणे, माजी पंचायत समिती सदस्य सीताराम सरगर, गजानन भाकरे, जगदीश बाबर, एन. वाय. भोसले, शीतल लादे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकात पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी काळात सांगोला तालुक्यात भाजपचे संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा असे आवाहन केले. दरम्यान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी बैठकीत लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न, अडीअडचणी जाणून घेत बैठकीतूनच अधिकाऱ्यांशी दूरध्वनीकरून संपर्क साधत गावांच्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच लवकरच सांगोला तालुक्याची आढावा बैठक घेवून प्रत्येक गावांचा गावभेट दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
—–———————————–
तालुक्यात भाजपची यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. शेतकऱ्यांसाठी देशातील पहिली किसान रेल्वे सांगोल्यातून सुरू झाली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेना युतीचा उमेदवार नक्कीच विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केला.
—————————————-
कोरोनामुळे अडीच वर्षे खासदार फंड मिळाला नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. मोदी सरकारने कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली. आता गावोगावी जनतेच्या अडीअडचणी जाऊन अडचणी जाणून घेणार आहे. चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवू असा इशारा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिला.








































































