तुळजापूर विकास आराखड्याची बैठक आता 17 सप्टेंबरला
धाराशिव – तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात आक्षेपांची सुनावणी न घेणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग असल्याची खंत पालकमंत्री तथा तुळजापूर विकास आराखडा समितीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी तुळजापूरचे स्थानिक नागरिक व पालकमंत्री यांच्यात बैठक झाली.
विकास आराखड्याचे प्रेझेंटेशन स्थानिक नागरिकांना दाखवले गेले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना दिली. तसेच या विकास आराखड्यास किती लोकांची संमती आहे, याची माहिती लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देशही दिले.
स्थानिकांच्या घरांवर बुलडोझर फिरवला जाणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिला.
पूर्वीही दिली जागा
तुळजापूर मंदिर विकासासाठी 1988 आणि 2012 मध्ये जागा दिली असून, त्यावेळी विरोध झाला नव्हता. मात्र आता आणखी किती जागा द्यायची, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. मंदिराजवळील घरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याने त्यांना हेरिटेज दर्जा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

एकच आर्किटेक्ट का?
या आराखड्यासाठी हेमंत पाटील हेच आर्किटेक्ट असल्याचे, आणि ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे ऐकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पहिल्या आराखड्यात आमची घरे नव्हती, मात्र दुसऱ्या व तिसऱ्या आराखड्यात ती दाखवली गेली, हे संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बैठकीचे निरोप मिळाले नाहीत
पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्याचे आठवडाभर आधी ठरले होते. मात्र बाधित नागरिकांना त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याबाबत तहसीलदार उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आता 17 सप्टेंबरला बैठक
तुळजापूर विकास आराखड्याबाबत आता 17 सप्टेंबर रोजी पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत मार्ग निघतो की नागरिकांचा विरोध कायम राहतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.