नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025 (प्रतिनिधी):
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशभरातील सुमारे 1,150 टोल प्लाझांवर आजपासून फास्टॅग वार्षिक पास योजना लागू केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या योजनेला वाहनधारकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, ही योजना महामार्ग प्रवास अधिक किफायतशीर, वेगवान व सुलभ करणारी ठरणार आहे.
पहिल्याच दिवशी 1.4 लाख वाहनधारकांनी घेतला पास
योजना सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जवळपास 1.4 लाख वापरकर्त्यांनी वार्षिक पास खरेदी केला. या कालावधीत 1.39 लाख व्यवहारांची नोंद झाली आहे. सध्या 20,000 ते 25,000 वापरकर्ते ‘राजमार्गयात्रा’ ॲपचा वापर करत असून, पास वापरल्यानंतर टोल शुल्क शून्य कापल्याची माहिती वाहनधारकांना एसएमएसद्वारे पाठवली जात आहे.
कोणासाठी लागू आहे ही योजना?
फास्टॅग वार्षिक पास योजना सर्व बिगर-व्यावसायिक (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी उपलब्ध आहे. वैध फास्टॅग असलेल्या वाहनधारकांना NHAI चे अधिकृत संकेतस्थळ किंवा राजमार्गयात्रा ॲपवरून वार्षिक शुल्क भरता येते.
- शुल्क भरल्यानंतर 2 तासांच्या आत पास सक्रिय होतो.
- त्यानंतर वाहनधारकांना वर्षभर देशातील राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्गांवर प्रवास करताना टोल शुल्क आकारले जाणार नाही.
फास्टॅग क्रांती आणि वाढती लोकप्रियता
देशातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीत क्रांती घडवणाऱ्या फास्टॅगचा वापराचा दर सध्या तब्बल 98% आहे. आजघडीला 8 कोटींपेक्षा जास्त फास्टॅग वापरकर्ते आहेत.
वार्षिक पास सुविधा सुरू झाल्यामुळे महामार्ग वापरकर्त्यांचा प्रवासाचा अनुभव अधिक सहज, सुलभ आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर होणार आहे.
पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा भाग
ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया आणि ‘ईज ऑफ लिव्हिंग’ धोरणाचा एक भाग असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान अधिक सुलभ करण्याचा उद्देश आहे.
- धाराशिव जिल्ह्यात महायुतीत समन्वय नाहीच! एकमेकांच्या मंत्र्यांच्या दौऱ्यात पाठ फिरवण्याकडे भर
- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागातील पीक नुकसानीची पाहणी
- फास्टॅग वार्षिक पास योजना देशभरात लागू; पहिल्याच दिवशी 1.4 लाख वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे करणार पाहणी
- ईटकुर येथील वाशीरा नदीला महापूर मुसळधार पावसात ऊस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान,नुकसानीचे पंचनामे करा शेतकऱ्यांची मागणी