सलगरा,दि.५ (प्रतिक भोसले)
घटनात्मक ५०% च्या आतील ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने तुळजापूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत ‘मराठा वनवास यात्रा’ काढण्यात येणार आहे. या वनवास यात्रेस सलगरा (दि.) ग्रामपंचायतच्या पाठोपाठ आता गंधोरा, किलज आणि कनगरा ग्रामपंचायतने पण जाहीर पाठिंबा दिला आहे. या मध्ये श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाने पण जाहीर पाठिंबा देऊन श्रीक्षेत्र तुळजापूरातील सर्व जातीधर्मातील मित्रपरिवार तसेच देविचे मुख्य भोपे पुजारी सदस्य हे मराठा जातीला आरक्षण मिळविण्यासाठी आयोजकास सर्वतोपरी सहकार्य करतील असे म्हणाले.
सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या ६ मे २०२३ रोजी तुळजापूर येथून ‘मराठा वनवास यात्रा’ निघणार आहे. मराठा समाजाला ५०% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी या वनवास यात्रेचे नियोजन केले गेले आहे. ही यात्रा तुळजापूर ते मुंबई मंत्रालय अशी पायी चालत जाणार आहे. ६ जून २०२३ रोजी सर्व मराठा बांधव मुंबई मध्ये पोचतील असे नियोजन ठरले आहे. आणि त्यात हजारो बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
या मराठा वनवास यात्रेला आणि मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला गंधोरा, किलज आणि कनगरा या ग्रामपंचायतींनी एकमताने मंजूर केले आहे. आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने व तसेच गावातील सर्व जातीपातीच्या नागरिकांच्या वतीने मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सर्व ते सहकार्य यापुढेही करण्यात येईल. असे गंधोरा, किलज आणि कनगरा ग्रामपंचायतने काढलेल्या पत्रात म्हटले आहे.
ग्रामपंचयतींच्या पाठिंब्या नंतर पाठोपाठ श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाने पण जाहीर पाठिंबा दिला आहे. मंडळाने असे म्हंटले आहे की, मराठा समाजास ५०% मधील ओबीसी मधून आरक्षण मिळविण्याकरीता वनवास यात्रेचे सकल मराठा समाजातर्फे आयोजन करण्यात आलेले आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर ते मुंबई ही यात्रा संपुर्ण महिनाभर मराठा समाजात जनजागृती करत निघणार आहे. या यात्रेची सुरूवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची पुजाअर्चा करून सर्व भोपे पुजारी हे आयोजकांना शुभार्शिवाद देऊन यात्रेची सुरूवात करणार आहेत. तरी सर्व भोपे पुजारी यांनी सकाळी ०९ वा.सु. श्री तुळजा भवानी मंदिरात वेळेवरती उपस्थित राहावे हि विनंती. श्रीक्षेत्र तुळजापूरातील सर्व जातीधर्मातील मित्रपरिवार तसेच देविचे मुख्य भोपे पुजारी सदस्य हे मराठा जातीला आरक्षण मिळविण्यासाठी आयोजकास सर्वतोपरी सहकार्य करतील.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच दि.६ मे रोजी तुळजापूर येथून वनवास यात्रेस सुरुवात होईल. ही यात्रा गावागावात मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करीत दि.६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळादिनी जवळपास ५०० किलोमीटर पायी चालत जात मुंबई मध्ये पोहोचणार आहे. ५०% च्या आतले ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, यंदाचा छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा आपले मराठा बांधव आझाद मैदानावरच साजरा करतील. त्या नंतर मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षणात होत नाही, अधिकृत ‘जी आर’ निघत नाही, तोपर्यंत मुंबईतच ठाण मांडून बसणार, कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही. आता पर्यंत लेखी आश्वासने फार झाली, आता प्रत्यक्ष आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही. असे पदाधिकारी एका आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.
येत्या ६ तारखेला मराठा वनवास यात्रा तुळजापूर येथून निघणार आहे. चळवळीतील शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पहाडी आवाजात जंगी पोवाड्यांचा कार्यक्रम सकाळी ०९ वा.सु. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर होईल. अनेक गावांतील भजनी मंडळे, हलगी पथक, संभळ वादक, वासुदेव, ढोल पथक देखील सर्व आम्हाला सोडण्यासाठी येणार आहेत. वनवासाला निघालेल्या लोकांना पाठवण्याची ती सुद्धा एक पद्धत आहे. ज्या प्रमाणे प्रभू श्री राम वनवासाला निघाल्या नंतर त्यांना सोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने अयोध्या वासिय उपस्थित होते. अगदी त्याच प्रमाणे वनवासाला निघालेल्या मराठा समाजातील बांधवांना, तरुणांना सोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने समाज उपस्थित राहील. वाटेत देखील प्रत्येक गावातील ग्रामस्थ आमच्या राहण्याची – जेवणाची सोय करत आहेत. अशा प्रकारे जागोजागी जनजागृती करत ही वनवास यात्रा मुंबईत पोचेल.