उस्मानाबाद – आठवड्यातील तीन दिवस भाजीपाला आणि किराणा समान खरेदीचा जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाने उस्मानाबाद करांच्या संयमाचा बांध फुटला असल्याची चर्चा आहे.
कोरोना च्या संकटामुळे सर्वत्र टाळेबंदी आहे. केंद्र सरकारने रुग्ण संख्येवर रेड , ऑरेंज, आणि ग्रीन झोन तयार केले आहेत. त्यानुसार उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे. ग्रीन झोन चे श्रेय उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी पाळलेल्या नियम आणि संयम दोन्ही मुळे आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने बाजारपेठ चालू ठेवण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस ठरवले या निर्णयामुळे उस्मानाबाद शहरातील नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि बाजारात खरेदीसाठी एकच गर्दी उसळली. यात दोन व्यक्ती मध्ये अंतर ठेवण्याबाबत असणारा नियम पायदळी तुडवला गेला. शहरातील काळा मारुती परिसरात काही काळ वाहतूक कोंडीही झाली. हा सारा प्रकार एका निर्णयामुळे होत असेल तर जिल्हा प्रशासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
जिल्हा प्रशासनाने तीन दिवस भाजी पाला विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी दररोज भाजीपाला बाजारात विक्री करू शकत नाहीत परिणामी भाजी नाशवंत माल असल्याने ती खराब होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नियमांचे पालन व्हावे
कोरोना चा मुकाबला करण्यासाठी सरकार ज्या सूचना सांगत आहे त्याचे पालन करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. आज उस्मानाबाद मध्ये झालेली गर्दी अनाठायी आहे. शासनाने आखून दिलेले नियम नागरिकांनी पाळावे असे आवाहन दैनिक जनमत च्या वतीने करण्यात येत आहे.