Home Blog Page 9

मराठा समाजाच्या कल्याणासाठी फडणवीस-शिंदेंचे सर्वाधिक योगदान : नरेंद्र पाटील

मुंबई : मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक काम केले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही पुढाकाराने मराठा तरुणांसाठी विविध योजना राबवल्या गेल्या. मात्र, सध्याचे आंदोलन हे काही विरोधकांनी माथी भडकावल्यामुळे केवळ व्यक्तिविरोधी झाले आहे, अशी टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोमवारी येथे केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.

नरेंद्र पाटील म्हणाले, “शरद पवारांनी बंद केलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुनर्स्थापना फडणवीस सरकारने 2014-19 मध्ये केली. याच काळात मराठा समाजातील दीड लाख तरुण उद्योजक घडवले गेले. तब्बल 13 हजार कोटींचे कर्ज, 1300 कोटींचा व्याज परतावा या महामंडळामार्फत दिला गेला. हे यश महायुती सरकारचे आहे.”

मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी या हेतूने ‘सारथी’ महामंडळाची स्थापना करण्यात आली. बार्टीच्या धर्तीवर उभारलेल्या या संस्थेमुळे मराठा तरुणांना शिक्षण आणि करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या, असेही ते म्हणाले.

चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 750 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी 350 कोटींचा निधी देण्यात आला होता. यंदा पहिल्याच टप्प्यात 300 कोटींचा निधी वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यात निजामाच्या काळापासून मराठा समाजाला ओबीसी अथवा कुणबी हा दर्जा मिळत होता. तो अबाधित राहावा तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासाठी कायदेशीर तपास आवश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

“महाराष्ट्रात 12 मराठा मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांनी समाजासाठी काहीही केले नाही. मराठवाड्यात सर्वाधिक मुख्यमंत्री होऊनही गरीबी दूर झाली नाही, याचा आत्मपरीक्षण काँग्रेसने करायला हवे,” असा टोला त्यांनी लगावला.

आंदोलनाबाबत बोलताना पाटील म्हणाले, “शांततेने आंदोलन करणे हा सर्वांचा अधिकार आहे. पण सर्वसामान्यांना त्रास देऊन आंदोलन बदनाम करू नका. 2016 मध्ये मूकमोर्चे निघाले तरी कुणालाही त्रास झाला नव्हता. तसाच संयम ठेवावा. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महायुती सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर न्याय्य तोडगा काढेल, यावर विश्वास ठेवावा.”

धाराशिव जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

मेडसिंगा ग्रामपंचायतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

धाराशिव : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला आता धाराशिव जिल्ह्यातूनही मोठा पाठिंबा मिळू लागला आहे.

मेडसिंगा ग्रामपंचायत कार्यालयाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. सततच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडत असल्याने शासनाने तातडीने मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा उद्भवणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल, असा इशारा ग्रामपंचायतीने पत्राद्वारे दिला आहे.

ग्रामपंचायतीने स्पष्ट केले की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मात्र शासनाने सकारात्मक भूमिका घेतली नसल्यामुळे संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर मेडसिंगा ग्रामपंचायत ठामपणे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील इतर गावांमधूनही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत असून आगामी काळात हा जनसमर्थनाचा आवाज आणखी मोठा होण्याची चिन्हे आहेत.

समुद्रवाणी गावात मराठा आरक्षणासाठी मुंबईतील उपोषणाला पाठिंबा

धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी गावात आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी साखळी पद्धतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे.

आजच्या उपोषणात सहभागी झालेले आहेत:

  • संतोष महादेव घुले
  • सोमनाथ चंद्रसेन पाटील
  • सूर्योदय सतीश कदम

समुद्रवाणी गावातील गावकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून स्थानिक पातळीवरही आरक्षणाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरंगे पाटील उपोषण करत असताना गावगावातील मराठा समाजाने देखील आपली भूमिका ठाम पद्धतीने मांडली आहे.

उपोषणाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी समाजाची एकजूट आणि इच्छाशक्ती स्पष्ट होते. ग्रामीण भागातील या कृतीमुळे आरक्षणाच्या मागण्यांबाबत स्थानिक आणि राज्य प्रशासनाच्या लक्षात पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे.

  

धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी घरफोडी व चोरीच्या घटना

धाराशिव : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी व चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

परंडा तालुका :
फिर्यादी धनाजी रामचंद्र यादव (वय 53, रा. आसु, ता. परंडा) यांच्या घरी 30 ऑगस्ट रोजी रात्री 1.00 ते 3.00 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कडी–कोंडा तोडून प्रवेश केला. या वेळी त्यांच्या घरासह सोमनाथ जाधव, कुसुम जाधव, बळीराम बुरुंगे, हरिदास बुरुंगे व बजरंग जाधव यांच्या घरातून रोख रक्कम व सोन्या–चांदीचे दागिने, साड्या असा एकूण 88 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 331 (4), 305, 62 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा तालुका :
दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता उमरगा बसस्थानक येथे कदेर (ता. उमरगा) येथील प्रणिता विलास जाधव (वय 27) या उमरगा–लातूर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत पर्स मधून 40 ग्रॅम सोन्याचे दागिने व ओपो मोबाईल फोन, एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

दोन्ही प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस ठाण्याचे पथक करीत असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

कळंबमध्ये खंडणी प्रकरणी गुन्हा नोंद

कळंब (जि. धाराशिव) : कळंब शहरातील मयुर साडी सेंटर येथे दुकान चालवण्यासाठी दरमहा दोन लाख रुपये खंडणीची मागणी केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मयुर जयप्रकाश रुणवाल (वय 39, रा. कळंब) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी लखन विजय गायकवाड, अमर विजय गायकवाड, अमित भारत जाधव, रोहीत हौसलमल (रा. कळंब) तसेच शितल बलदोटा, पंकज काटे, शितल काटे (रा. लातूर) यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8.15 वा. ते 30 ऑगस्ट रोजी पहाटे 1 वा. या कालावधीत बेकायदेशीरपणे जमाव जमवून फिर्यादीकडे खंडणीची मागणी केली.

दुकान सुरू ठेवायचे असेल तर दरमहा दोन लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा दुकान चालू देणार नाही, अशा धमक्या आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय दुकानाच्या शटरवर पोस्टर लावून “दुकान उघडले तर सोडणार नाही आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करू” अशीही धमकी दिली गेली.

या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 308(2), 189(2), 191(2), 190(2), 329(3), 351(2) अन्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रिया मराठेचे निधन – कॅन्सरशी झुंज देत ३८व्या वर्षी अखेरचा श्वास

मुंबई – मराठी तसेच हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी, सकाळी चार वाजता निधन झाले. त्या अवघ्या ३८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या कॅन्सरशी लढा देत होत्या, मात्र अखेरीस आजारावर मात करता आली नाही.

अभिनय प्रवास

प्रिया मराठे यांनी २००६ मध्ये या सुखांनो या या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मराठी मालिकांमध्ये चार दिवस सासूचे, तू तिथे मी, तुझेच मी गीत गात आहे यांसारख्या मालिकांमध्ये प्रभावी भूमिका केल्या. हिंदी मालिकांमध्ये कसम से, पवित्र रिश्ता आणि बडे अच्छे लगते है या लोकप्रिय कार्यक्रमांमधून त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या.

चित्रपटसृष्टीतदेखील त्यांनी आपले स्थान निर्माण केले. विघ्नहर्ता महागणपती (२०१६) आणि किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी (२०१६) या मराठी चित्रपटांत त्यांच्या भूमिका प्रेक्षकांनी आवडल्या.

वैयक्तिक आयुष्य

२३ एप्रिल १९८७ रोजी ठाण्यात जन्मलेल्या प्रियाने २४ एप्रिल २०१२ रोजी अभिनेता शंतनु मोघे (अभिनेता श्रीकांत मोघे यांचा मुलगा) याच्यासोबत विवाह केला. लग्नानंतरही त्यांनी अभिनय क्षेत्रात सक्रिय राहून अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या.

आजाराशी संघर्ष

काही वर्षांपूर्वी प्रियाला कॅन्सरचे निदान झाले होते. उपचार सुरू असतानाही त्यांनी धैर्याने आजाराशी सामना केला. मात्र आजाराने अखेरीस पुन्हा जोर धरला आणि मीरारोड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कलाविश्वातील प्रतिक्रिया

प्रिया मराठे यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. चाहत्यांनी व सहकलाकारांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. अभिनेता सुबोध भावे यांनी भावनिक शब्दांत त्यांना आठवत लिहिले की, “माझी बहीण लढवय्या होती, पण कॅन्सरच्या लढाईत ती हरली.”

प्रिया मराठे या मराठी-हिंदी मालिकांतून प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेल्या. त्यांचा अभिनय प्रवास, त्यांची जिद्द आणि कलेप्रती असलेलं प्रेम हे नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या अकाली निधनाने कलाविश्वातील एक उज्वल तारा हरपला आहे.

“मराठा आरक्षण आंदोलन: उपसमिती जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार – विखे पाटील”

मुंबई, ३० ऑगस्ट २०२५: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज उपसमितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत सर्व सदस्य उपस्थित होते, तर काही नेते ऑनलाइन सहभागी झाले. याबाबत बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आणि आंदोलन सोडवण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्यासह समितीचे सदस्य आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती दिली.

विखे पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “आज उपसमितीच्या बैठकीमध्ये आम्ही सर्व सदस्य उपस्थित होतो. सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय आशिष शेलारजी, शिवेंद्रजी आणि शंभूराजे ऑनलाइन होते. उदय सामंत होते. आम्ही सगळ्या सदस्यांनी आणि समितीच्या बरोबर आमचे समवेत न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि बाकी सर्व अधिकारी होते. सविस्तर चर्चा झाली सगळ्या मुद्द्यांवर आणि अतिशय एक सकारात्मक भूमिका आमची सर्वांची आहे आणि सरकारची सुद्धा या बाबतीमध्ये या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे हीच भूमिका आहे.”

आंदोलकांच्या गैरसोयीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुंबईत आलेल्या आंदोलकांसाठी प्रशासनाने योग्य व्यवस्था केली आहे. “आता पाऊस जास्त होता तरी नंतर रात्री माननीय मुख्यमंत्र्यांच्या चर्चा झाली आणि मग मला वाटत आता बऱ्यापैकी तिथे लाईटची, पाण्याची सोय करण्यात आली. त्या ठिकाणी सॅनिटेशन वाढवण्यात आलय. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे मग तिथे खड्डे भरावेत त्यामुळे आंदोलन जे आहे त्यांना त्रास होणार नाही,” असे ते म्हणाले. महापालिका आयुक्तांना याबाबत सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले, “न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे विभागीय आयुक्त त्यांच्याशी चर्चा करायला जाणार आहे आणि त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यां संदर्भात आम्ही जी आज चर्चा केली आणि काही निर्णय केलेत त्याची माहिती त्यांना देतील.” ते पुढे म्हणाले की, चर्चेनंतर आणखी मुद्दे उपस्थित झाल्यास समिती पुन्हा बसणार आहे.

महायुतीच्या एकतेसंदर्भात बोलताना त्यांनी विरोधाभास नाकारला. “महायुती म्हणून आमची भूमिका एकत्रच आहे. आम्ही सगळे एकत्रच आहोत. आता काही बाबतीमध्ये काही त्या स्थानिक परिस्थितीरूप काही मंडळी त्यांच्या स्टेजवर गेले त्यांना त्यांच्याशी चर्चा केली. आणि शेवटी सर्वांचा एकच भूमिका आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे,” असे ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भूमिकेबाबतही ते म्हणाले की, सर्वजण एकत्र आहेत आणि राजकारण करण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर आहे.

विरोधी पक्षाच्या टीकेबाबत विखे पाटील यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत म्हटले, “संजय रावतांच्या शिफारशीची काय सूचनांची आम्हाला आवश्यकता नाहीये. आमची कमिटी त्या समितीसाठी सक्षम आहे.” तसेच महाविकास आघाडीच्या काळात हा प्रश्न का सोडवला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. रोहित पवार यांच्या आरोपांबाबत ते म्हणाले, “अशी कुठे वीज तोडलेली नाहीय. मागे माननीय हायकोर्टाचा एक निर्णय आहे की आझाद मैदाना सहा नंतर देऊ नये तिथं लाईटची व्यवस्था होत नाही. तरी आपण पर्याय व्यवस्था म्हणून तिथ त्या ठिकाणी विजेची रात्र केली.”

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक आणि आर्थिक प्रभावाबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, आंदोलन हा प्रत्येकाचा लोकशाही अधिकार आहे आणि मराठा समाजाच्या भावनांचा आदर करणे गरजेचे आहे. “प्रत्येकाचा अधिकार आहे लोकशाही त्यांना दिलेला अधिकार आहे ते आंदोलन करतायत. मला वाटतं त्यांची भूमिका आहे शासन ऐकून घेत त्यापेक्षा त्यांच्या भावनेचा आदर करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. तसेच आंदोलन शांततेने चालू राहावे आणि समाजकंटकांनी त्यात हस्तक्षेप करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

या चर्चेनंतर न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी भेट घेऊन मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसीमधून आरक्षण देण्याबाबत विखे पाटील यांनी सविस्तर चर्चेनंतरच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

ऊर्जा मंत्रालयाने प्रसिद्ध केला ‘राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2024’: महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम आणि त्रिपुरा अव्वल

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2025

ऊर्जा मंत्रालयाने ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) आणि अलायन्स फॉर एनर्जी एफिशियन्सी इकॉनॉमी (AEEE) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक (SEEI) 2024’ प्रसिद्ध केला आहे. या निर्देशांकात आर्थिक वर्ष 2023-24 मधील भारतातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ऊर्जा कार्यक्षमता कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यंदाच्या सहाव्या आवृत्तीत सात प्रमुख मागणी क्षेत्रांवर आधारित 66 निर्देशकांसह एक विस्तृत आणि अंमलबजावणी-केंद्रित चौकट तयार करण्यात आली आहे. यामुळे ऊर्जा कार्यक्षमता क्षेत्रात राज्य-स्तरीय डेटा संकलन, व्यवस्थापन आणि सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन देण्यास चालना मिळणार आहे.

प्रकाशन समारंभ आणि महत्त्व

ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि BEE चे महासंचालक आकाश त्रिपाठी यांनी नवी दिल्लीत आयोजित एका समारंभात SEEI 2024 चे प्रकाशन केले. यावेळी बोलताना त्रिपाठी म्हणाले, “भारताचे ऊर्जा संक्रमण हे केवळ हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्याचे साधन नसून, नवोन्मेष, लवचिकता आणि समावेशक विकासाला चालना देणारी एक संधी आहे. 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन आणि 2030 पर्यंत उत्सर्जन तीव्रतेत 45% कपात करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल करताना ऊर्जा कार्यक्षमता हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. SEEI 2024 हा या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि मोजता येण्याजोग्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतो.”

निर्देशांकाची रचना आणि वर्गीकरण

SEEI 2024 मध्ये इमारती, उद्योग, नगरपालिका सेवा, वाहतूक, शेती, वीज वितरण कंपन्या आणि विविध क्षेत्रातील उपक्रम या सात मागणी क्षेत्रांचा समावेश आहे. राज्यांचे त्यांच्या एकूण अंतिम ऊर्जा वापर (Total Final Energy Consumption – TFEC) नुसार चार गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे:

  • गट 1: > 15 MToE (मिलियन टन ऑफ ऑइल इक्विव्हॅलेंट)
  • गट 2: 5-15 MToE
  • गट 3: 1-5 MToE
  • गट 4: < 1 MToE

प्रत्येक गटातील सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • गट 1: महाराष्ट्र
  • गट 2: आंध्र प्रदेश
  • गट 3: आसाम
  • गट 4: त्रिपुरा

राज्यांचे मूल्यांकन गुणांच्या आधारे चार श्रेणींमध्ये विभागण्यात आले:

  • फ्रंट रनर्स (60% पेक्षा जास्त गुण)
  • अचिव्हर्स (50-60% गुण)
  • कन्टेंडर्स (30-50% गुण)
  • एस्पायरन्टस (30% पेक्षा कमी गुण)

SEEI 2023 च्या तुलनेत यंदा फ्रंट रनर राज्यांची संख्या सातवरून पाचवर घसरली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. आसाम आणि केरळ यांनी अचिव्हर्स श्रेणीत स्थान मिळवले, तर हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओडिशा आणि उत्तर प्रदेश यांना कन्टेंडर्स श्रेणीत स्थान मिळाले.

क्षेत्रनिहाय प्रगती

SEEI 2024 मध्ये विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय प्रगती अधोरेखित करण्यात आली आहे:

  1. इमारती:
  • 24 राज्यांनी ऊर्जा संवर्धन इमारत संहिता (ECBC) 2017 अधिसूचित केली आहे.
  • 20 राज्यांनी ही संहिता नगरपालिका उपनियमांमध्ये समाविष्ट केली आहे, ज्यामुळे ऊर्जा-कार्यक्षम इमारतींच्या बांधकामाला चालना मिळाली आहे.
  1. उद्योग:
  • 10 राज्यांनी लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) ऊर्जा कार्यक्षमता धोरणे स्वीकारली आहेत.
  • यामुळे औद्योगिक क्षेत्रात ऊर्जा वापर कमी करणे आणि शाश्वत उत्पादन पद्धतींना प्रोत्साहन मिळाले आहे.
  1. नगरपालिका सेवा:
  • 25 राज्यांनी हवामान कृती योजना किंवा उष्णता कृती योजना विकसित केल्या आहेत.
  • 12 राज्यांनी राज्य नियुक्त संस्था आणि शहरी स्थानिक संस्थांमधील सहकार्याला प्रोत्साहन दिले आहे, ज्यामुळे शहरी भागात शाश्वत पायाभूत सुविधांचा विकास होत आहे.
  1. वाहतूक:
  • 31 राज्यांनी विद्युत गतिशीलता धोरणे लागू केली आहेत, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) अवलंब वाढला आहे.
  • 14 राज्यांनी इमारतींमध्ये EV चार्जिंग पायाभूत सुविधा अनिवार्य केल्या आहेत, ज्यामुळे हरित वाहतुकीला चालना मिळाली आहे.
  1. शेती:
  • 13 राज्यांनी एकात्मिक शीतगृह साखळी आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांना प्रोत्साहन दिले आहे.
  • केरळने विशेष उल्लेखनीय कामगिरी केली असून, 74% ऊर्जा-कार्यक्षम किंवा सौरऊर्जेवर चालणारे कृषी पंप स्वीकारले आहेत.

महाराष्ट्राचे यश

महाराष्ट्राने गट 1 मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे, जे राज्याच्या ऊर्जा कार्यक्षमता क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक आहे. इमारती, उद्योग आणि वाहतूक क्षेत्रातील धोरणात्मक उपाययोजनांमुळे महाराष्ट्राने ऊर्जा वापर व्यवस्थापन आणि शाश्वत विकासात आघाडी घेतली आहे.

निर्देशांकाचे महत्त्व

SEEI 2024 हा केवळ राज्यांची कामगिरी मोजण्याचे साधन नसून, ऊर्जा कार्यक्षमतेसाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणारा एक उपक्रम आहे. यामुळे राज्यांना त्यांच्या धोरणांचे मूल्यांकन करणे, कमतरता ओळखणे आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करणे शक्य होते. तसेच, भारताच्या निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या उद्दिष्टाला गती देण्यासाठी हा निर्देशांक महत्त्वाची भूमिका बजावतो.

पुढील दिशा

SEEI 2024 च्या प्रकाशनाने ऊर्जा कार्यक्षमता क्षेत्रात भारताच्या प्रगतीचा एक स्पष्ट आराखडा मांडला आहे. भविष्यात, अधिक राज्यांनी फ्रंट रनर श्रेणीत स्थान मिळवण्यासाठी आणि ऊर्जा कार्यक्षम धोरणांचा अवलंब वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामुळे भारताच्या हरित भविष्याला बळकटी मिळेल आणि जागतिक हवामान उद्दिष्टांमध्ये देशाचे योगदान वाढेल.

अंगणवाडी पाडली; दोघांवर गुन्हा दाखल

येरमाळा (ता. कळंब) :
येरमाळा येथील अंगणवाडीची खोली कोणतीही शासकीय परवानगी किंवा निर्लेखन मंजुरी न घेता पाडल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी आणि आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 09 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता येरमाळा गावातील गट क्रमांक 377/254 मधील अंगणवाडीची खोली पाडण्यात आली. सदर अंगणवाडी ही शासनाच्या नावावर चालू असून, कोणतीही प्रक्रिया न राबविता खोली पाडल्यामुळे शासनाचे तब्बल 1,50,000 रुपये इतके नुकसान झाले आहे.

या संदर्भात विस्तार अधिकारी पंचायत समिती कळंब दत्तात्रय त्रंबक साळुंके (वय 55, रा. गौर-वाघोली, ता. कळंब) यांनी 28 ऑगस्ट 2025 रोजी येरमाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपी सौ. मंदाकिनी आबासाहेब बारकुल (रा. येरमाळा) आणि राजेंद्र एकनाथ हांडे (ग्रामपंचायत अधिकारी, येरमाळा) यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 324(3), 324(5), भूमी महसूल कायदा कलम 50, 52 तसेच सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंध कायदा कलम 3 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.

ताकविकी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी : शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरमागे 50 हजार रुपये मदत द्यावी

धाराशिव तालुका │ धाराशिव तालुक्यातील ताकविकी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदाच्या अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड शेती नुकसान लक्षात घेऊन हेक्टरमागे 50 हजार रुपये मदतीची मागणी केली आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची विनंती सरपंच व ग्रामसेवकांकडे केली आहे.

मे महिन्यापासून ताकविकी परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने औषधोपचार, खते, बियाणे यावर खर्च केला; तरीही सततच्या पावसामुळे पिके उभे राहिले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती काहीही न लागण्याची वेळ आली आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “आम्ही कर्ज काढून शेती केली, परंतु अतिवृष्टीमुळे सर्व पिके हातची गेली. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत जाहीर करून प्रत्यक्ष मदत पोहोचवावी. अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल.”

या मागणीसाठी ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. यात शासनाकडे ठराव पाठवावा अशी विनंती करण्यात आली आहे.

या निवेदनावर जेष्ठ नागरिक नागनाथ सिंगठाकूर, बलुसिंग अरणकर, सुखसिंग बायस, महादेव यादव, प्रतापसिंग राजपूत, श्रीधर तरंगे, कोंडीबा तरंगे, सोपान यादव, जनता सिंग ठाकूर, श्रीदेवी ठाकूर, दिलीपसिंग ठाकूर, छानू ढेपे, गुलाब शेख, गणूसिंग बायस, वैभव बायस, संभाजी सूर्यवंशी, विमल सूर्यवंशी, बालाजी बायस, मारुती जाधव, रोहित सूर्यवंशी, सोहेल तांबोळी, महेश बीटलकर, हनुमंतसिंग सुरतबन्सी, फारुक शेख, नारायण यादव, लिंबराज यादव, शैलेश प्रकाशसिंग ठाकूर, सुलोचना ठाकूर, नसरुद्दीन वाडकर, गिरीधरसिंह बायस, मारुती यादव, शंकर देवकर, शिवचरण ठाकूर, धरमसिंग ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

ग्रामस्थांच्या या ठरावाकडे शासनाने सकारात्मक दृष्टीने पाहून तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे.