Home Blog Page 7

रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ; सरकारचा निर्णय तत्काळ लागू

मुंबई – राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून (PDS) अन्नधान्याचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंगळवारी (दि. २६ ऑगस्ट २०२५) जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, दुकानदारांना मिळणारे सध्याचे ₹१५०/- प्रति क्विंटल (₹१५००/- प्रति मेट्रिक टन) मार्जिन आता वाढवून ₹१७०/- प्रति क्विंटल (₹१७००/- प्रति मेट्रिक टन) करण्यात आले आहे.

२०१७ मध्ये निश्चित करण्यात आलेल्या जुन्या दरानुसार दुकानदारांना केंद्र शासनाचा ₹४५/- व राज्य शासनाचा ₹१०५/- असा मिळून एकूण ₹१५०/- मार्जिन मिळत होते. वाढीव खर्च लक्षात घेऊन रास्त भाव दुकानदार संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात होती. त्यानंतर १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या वाढीला मंजुरी देण्यात आली.

सुमारे ५३,९१० रास्त भाव दुकानदारांना या निर्णयाचा थेट लाभ होणार असून वाढीव खर्चाची तरतूद संबंधित अर्थसंकल्पीय शिर्षाखाली करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार ही वाढ तत्काळ लागू होणार आहे.

 

मोहा येथे दोन समाजामध्ये तणाव, तणावाचे रूपांतर दंगलीत व दगडफेकीत

दगडफेकीत अनेक पोलीस व ग्रामस्थ जखमी,  वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सतर्कतेने तणावपूर्ण शांतता


मोहा – दिनांक 25 ऑगस्ट रोजी सोमवारच्या सांयंकाळी
पारधी समाजातील व्यक्तीचे निधन झाले असता. दफन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्मशान भूमिमध्ये घेऊन गेले परंतु वनविभागाने रेकॉर्डली स्मशानभूमीसाठी दिलेली पाच गुंठे जागा सोडून इतर जागेत दफन केले. आणि त्याच जागेत मोहा गावाचा सिमोलंघनाचा कार्यक्रम होत असतो. पारधी समाजाने स्मशानभूमीची जागा सोडून ज्याठिकाणी कार्यक्रम होतो त्याच ठिकाणी दफन केले. आणि इथेच दोन समाजातील तेढ निर्माण होण्याचे कारण बनले.
  
  

दंगलीचे कारण ठरले स्मशानभूमीची जमीन

वनविभागाच्या आखत्यारीत असलेली जमीनी पैकी कागदोपत्री पाच गुंढे जमीन ही पारधी समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्यात आलेली असताना. पारधी समाजाने उर्वरित जागा अतिक्रमित करण्याचा घाट घातल्याचे दिसून आल्याने गावातील नागरिकांनी त्यांना अटकावं केला. त्याला कारणही तसेच आहे. गेली अनेक वर्षांपासून मोहा गावातील सिमोलंघांनाचा कार्यक्रम त्या जागेत होत आहे. आणि त्याच जागेत मयत व्यक्तीचा अंत्यविधी केला त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या.
त्यावेळी दोन्ही समाजाने चर्चेअंती नियमानुसार तोडगा काढू असे ठरवून सोमवारची रात्र घालवली. परंतु सोमवारची शांतता ही मंगळवारच्या वादळपूर्वीची शांतता ठरली.

कायदा सुव्यवस्थेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त

मंगळवारी सकाळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त केला व दोन्ही समाजातील वातावरण निवळण्याचा चांगला प्रयत्न झाला. पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
रेकॉर्डनुसार सर्वकाही चालू असताना अचानक पारधी समाजातील काही लोकांनी दगडफेक सुरु केली.
जवळच असलेल्या गलोलीने दगडाचा वर्षाव सुरु केला.
दरम्यान पोलीस प्रशानाने थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु
दगडाचा वर्षाव व वेग भयानक असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. यामध्ये पोलीस प्रशासनाचे अधिकारी व शिपायी
जखमी झाले. तर गावातील नागरिकांची डोकी फुटली, काहींच्या हातांना, पायांना, इजा झाल्या. जखमीवर गावातीलच आरोग्य केंद्रात उपचार केले.
    

सध्या मोहा येथे तणावपूर्ण शांतता


दुपारी मोहा गावात दंगलीचे स्वरूप आले होते. परंतु सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने अधिकची कुमक मागवून घेतली. व परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सद्या मोहा गावात तणावपूर्ण शांतता आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ भूम तालुक्यामधून हजारो मराठा बांधवांची मुंबईकडे कूच

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

भूम प्रतिनिधी :- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भूम तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव वाहनांसह मुंबईकडे रवाना होत आहेत. समाज बांधव तालुक्यातील गाव, वाडी, वस्ती वरुन साधारण ११३५ चारचाकी वाहनाने. नागरिक जरांगेना साथ देण्यासाठी एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापच, कोण म्हणतंय देत नाय घेतल्याशिवाय रहात नाय, आता कुठे जायचं मुंबईला जायचं, अशी जोरदार घोषणाबाजी करत आले. यावेळी सकल मराठा बांधवांना मार्गदर्शन करताना अनिल शेंडगे म्हणाले की आंदोलनातील सर्व चारचाकी वाहने वाहतुकीला अडथळा होणार नाहीत ,अशी ओळीत चालवाव्यात. तसेच तानाजी पाटील म्हणाले की आत्तापर्यंत सुसंस्कृतपणा दाखवत शांततेत ज्या पद्धतीने मोर्चे झाले त्याच पद्धतीने शांततेचे व शिस्तीचे प्रदर्शन करत मुंबईला पोहोचावे व आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेत मुंबई पोहोचावे. तर ऍड. रामराजे साळुंके म्हणाले की कोर्टाने कुठलाही आदेश काढून मुंबईला येण्यास मज्जाव केलेलानाही त्यामुळे कुठल्याही संकोच न बाळगता सकल मराठा बांधवांनी मुंबईस निघावे. तसेच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की यावेळी सहभागी आंदोलनाला येणाऱ्या सर्व समाज बांधवांची सर्व सोय ठीक ठिकाणी असेलच पन येणाऱ्यांनी देखील आपआपली तयारी ठेवावी जेणे करून कुठलीही गैर सोय होणार नाही. मनोज जरांगे यांच्या सूचने नुसारच आंदोलनाची रूपरेषा असेल असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले .

सणासुदीत खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी; छावा संघटनेची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे तक्रार

धाराशिव – सणासुदीच्या आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने अवाजवी तिकीट दर आकारले जात असल्याचा गंभीर आरोप छावा संघटनेने केला आहे. या अन्यायकारक लुटीविरोधात छावा संघटनेतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. राकेश पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र मोटर वाहन कायद्याने व परिवहन विभागाने ठरवलेले अधिकृत दर न पाळता काही खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांची आर्थिक लूट करीत आहेत. प्रवाशांकडून आकारले जाणारे अवाजवी दर पाहता सामान्य जनतेत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :

  • सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांवर काटेकोर नियंत्रण ठेवावे.
  • जास्तीचे भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाई करावी.
  • अधिकृत भाडेदरांची यादी बसस्थानकांवर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात व संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.
  • विशेष तपासणी पथक नेमून अवाजवी दर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सविरुद्ध कार्यवाही करावी.
  • प्रवाशांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सक्रिय ठेवावी व त्यावर तत्काळ कारवाई करावी.
  • काही ट्रॅव्हल्स परमिटशिवाय वाहने चालवत असून, फिटनेस, विमा व चालक परवाना नियमांचे पालन होत नाही.

प्रवाशांच्या आर्थिक व शारीरिक सुरक्षेच्या दृष्टीने या मागण्या तातडीने मान्य करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका छावा संघटनेने घेतली आहे.

धाराशिव शहर काँग्रेसकडून नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन

धाराशिव | दि. 26 ऑगस्ट 2025

धाराशिव शहरातील वाढत्या नागरी समस्यांबाबत नगर परिषद प्रशासन व राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत शहर काँग्रेसतर्फे आज नगर परिषद कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नागरिकांना मुलभूत सुविधा न मिळाल्याने त्रस्त जनतेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही विविध निवेदने, आंदोलने तसेच दिनांक 09 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या चर्चेत हे मुद्दे मांडण्यात आले होते. परंतु समस्यांचे निराकरण न झाल्यामुळे आज पुन्हा आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या :

  1. शहरातील अस्वच्छता व दुर्गंधी दूर करून नियमित व योग्य स्वच्छता व्यवस्था करावी.
  2. भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.
  3. धिम्या गतीने सुरू असलेली भुयारी गटार योजना दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावी.
  4. मंजूर 140 कोटी रुपयांच्या 59 रस्ते व नाल्यांच्या कामांना तातडीने सुरुवात करावी.
  5. शहरात नागरिकांसाठी उद्यानांची निर्मिती व सुशोभीकरण करावे.
  6. आठवडी व दररोजच्या बाजारातील सोयीसुविधा वाढवाव्यात.
  7. बंद पडलेले पथदिवे कार्यान्वित करावेत.
  8. पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक प्रमाणात करावा.
  9. कचरा डेपोचे स्थलांतर करून रहिवाशांना दिलासा द्यावा.
  10. भोगावती नदी स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी ठोस नियोजन करावे.
  11. रस्त्यांवरील धुळीवर नियंत्रण ठेवून आरोग्य धोक्यांपासून नागरिकांना वाचवावे.
  12. वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी.
  13. जुन्या तात्पुरत्या मंजूर रेखांकनांना अंतिम मंजुरी द्यावी.

आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती

या आंदोलनात विश्वास शिंदे, राजाभाऊ शेरखाने, खलील सय्यद, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, ॲड. जावेद काझी, डॉ. स्मिता शहापूरकर, सय्यद नादेरुल्लाह, विजय मुद्दे, उस्मान कुरेशी, मिलिंद बनसोडे, प्रेमानंद सपकाळ, अशोक बनसोडे, प्रभाकर लोंढे, मन्सूर कुरेशी, एक्बाल कुरेशी, यासेर काजी, सरफराज काजी, धवलसिंह लावंड, सागर गायकवाड, अलीम एल.डी., हरिदास शिंदे, कपिल सय्यद, सय्यद काजी, शेख मुद्दिक, महादेव पेठे, संतोष पाटील, अब्दुल लतीफ, शहानवाज सय्यद, प्रशांत पाटील, संजय गजधने, आनंद बनसोडे, सय्यद मन्सूर, जयसिंग पवार, शिंदे विश्वासराव, उमेश राजेनिंबाळकर, अजहर पठाण, शेख हज्जू, शेख नूर, ऋषिकेश बनसोडे, अभिषेक बनसोडे, नंदकुमार पडवळ, राजेंद्र कुराडे, ॲड. राजुदास आडे आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसने इशारा दिला आहे की, जर वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक पाऊले उचलली नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.

तुळजापूरमध्ये ऑनलाइन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: पिता-पुत्राची १६ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक

धाराशिव, २४ ऑगस्ट २०२५: डिजिटल युगात वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. तुळजापूर तालुक्यातील एका ५४ वर्षीय व्यक्ती आणि त्यांच्या मुलाची अज्ञात आरोपींनी जास्त पैशांच्या आमिषाने फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

घटनेच्या तपशीलानुसार, फिर्यादी कालीदास लिंबाजी गवळी (वय ५४ वर्षे, रा. शुक्रवार पेठ, कणे गल्ली, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्या मुलाला कृष्णा याला आरोपींनी जास्त पैशांचे आमिष दाखवले. शासनाने ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातलेली असतानाही, आरोपींनी ‘exchange.com’ नावाची एक बनावट लिंक तयार करून ती व्हॉट्सअॅपवर पाठवली. या लिंकद्वारे फिर्यादी आणि त्यांच्या मुलाची एकूण १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.

फिर्यादीनुसार, आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल नंबरांवरून संपर्क साधला. यात ९०९१९१५८९१, ९५६१४६३८०८, ८४८५०१७४९०, ८७६६४०६५०७, ८४४६२२३५८४, ८०१०७८१८३९, ८४४६९६४५५४ आणि ७३९१८२२००८८ या नंबरांचा समावेश आहे. हे नंबर वापरून आरोपींनी विश्वास संपादन करत फिर्यादींना बनावट योजनेत गुंतवले आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली.

या घटनेची फिर्याद कालीदास गवळी यांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायबर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार, पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ७८, ३५६(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपींच्या मोबाइल नंबर आणि बनावट लिंकचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.

धान्याचे गोडाऊन फोडून हरभरा चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद

धाराशिव, दि. 23 ऑगस्ट –
धान्याचे गोडाऊन फोडून हरभऱ्याचे कट्टे चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल 6 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांचे पथक पेट्रोलिंगदरम्यान कार्यरत होते. यावेळी संशयित आरोपी गौस वहीद पठाण (वय 50, रा. एकता नगर, धाराशिव) याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदारासह ‘विनायक ॲग्रो’ गोडाऊन (मौजे किनी, जि. धाराशिव) येथून हरभऱ्याचे 43 कट्टे (एकूण वजन 2,559 किलो) चोरी केल्याची कबुली दिली.

पोलीस तपासात उघडकीस आले की, आरोपींनी चोरलेला मुद्देमाल धाराशिव अडत लाईन येथे विकला होता. पोलिसांनी कारवाई करून चोरीस गेलेला हरभरा व गुन्ह्यात वापरलेले अशोक लेलँड वाहन असा एकूण 6.29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

तपासादरम्यान आरोपींनी इतर साथीदारांची नावे देखील सांगितली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फराहान पठाण, रत्नदीप डोंगरे व नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.


जंगल सफारी ट्रॅक, तीन महिन्याचे आश्वासन, पण पीपीपी मॉडेलमुळे प्रश्नचिन्ह

धाराशिव – येडशी रामलिंग अभयारण्यात १५ किलोमीटरचा जंगल सफारी ट्रॅक उभारण्यात येणार असल्याची घोषणा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, सुमारे तीन महिन्यांत म्हणजे डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला काही जिप्सी किंवा तत्सम वाहने भाड्याने घेऊन प्रशिक्षित गाईड आणि ड्रायव्हरमार्फत पर्यटकांना सफारीचा अनुभव दिला जाणार आहे.

निधीचा प्रश्न

या प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र हा खर्च नेमका कुठून भागवला जाणार, यावर अद्याप स्पष्टता नाही. आ.पाटील यांनी हा प्रकल्प पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलमध्ये उभारला जाणार असल्याचे सांगितले. मात्र, बीओटी (Build-Operate-Transfer), जॉइंट व्हेंचर की इतर कोणत्या पद्धतीने हे काम होणार याबाबत त्यांनी खुलासा केलेला नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.

जमीन मिळण्याची अडचण

या सफारी ट्रॅकसाठी लागणारी काही जमीन वन विभागाची तर काही रेल्वे विभागाची असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही विभागांकडून परवानगी मिळवण्यासाठी वेळ लागणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे केवळ तीन महिन्यांत ट्रॅक तयार होईल का, हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा मुद्दा ठरत आहे.

पीपीपी मॉडेलचे धोके

पीपीपी मॉडेलमुळे प्रकल्प उभारणीसाठी निधी उपलब्ध होतो, पण त्याचे काही तोटेही आहेत.

  • खाजगी कंपन्या नफ्यावर भर देतात, त्यामुळे प्रवेश फी किंवा सेवा शुल्क जास्त आकारले जाण्याची शक्यता असते.
  • जर खाजगी भागीदार अडचणीत आला तर नुकसान सरकारलाच सहन करावे लागते.
  • पारदर्शकतेचा अभाव राहतो; करारातील अटी, खर्च आणि उत्पन्नाचे गणित लोकांसमोर उघड केले जात नाही.
  • गरीब वर्गासाठी ही सेवा महागडी ठरू शकते, ज्यामुळे सामाजिक असमानता वाढू शकते.

निवडणूक डोळ्यासमोर?

दरम्यान, येत्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. येडशी आणि रामलिंग परिसर हा पर्यटनाच्या दृष्टीने संवेदनशील व महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे हा प्रकल्प जाहीर करून तो निवडणूकपूर्व आश्वासन म्हणून वापरला जात असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

धाराशिवकरांचा अपेक्षाभंग?

रामलिंग अभयारण्यात सफारी हा जिल्ह्यातील पर्यटनासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. पण जमीन, निधी व पीपीपी मॉडेलमधील अनिश्चितता लक्षात घेता हा प्रकल्प ‘दिवास्वप्न’ ठरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिकांना रोजगार, पर्यटनातून जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना अश्या अनेक अपेक्षा आहेत. मात्र, अडथळे दूर न केल्यास प्रकल्प अर्धवट राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.


तुळजाभवानी मंदिर शिखर प्रकरणात गोंधळ कायम; एएसआयची भूमिका अस्पष्ट – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा नवा खुलासा

धाराशिव –

तुळजाभवानी मंदिराचे शिखर उतरवले जाणार का? गाभाऱ्यात बदल होणार का? या प्रश्नांवर गेल्या काही दिवसांत आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उठले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य पुरातत्व विभाग व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) यांची भूमिका मांडण्यात आली. मात्र एएसआयची भूमिका  स्पष्ट नव्हती, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता आयआयटीसारख्या नामांकित तज्ज्ञ संस्थांची मदत घेऊन नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची भूमिका स्पष्ट नसताना मंदिराची कामे सुरू झाली असल्याने अहवाल कोणाचा ग्राह्य धरला? हा प्रश्न पुन्हा अनुत्तरित आहे. तुळजाभवानी मंदिर हे राष्ट्रीय संरक्षित वास्तू असून त्या मंदिराच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून ए एस आयची भूमिका स्पष्ट नसताना कामांचा खटाटोप कोणासाठी हा प्रश्न पुन्हा नव्याने चर्चिला जात आहे.

राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल चर्चेत

दरम्यान, तुळजाभवानी मंदिरातील कामे राज्य पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी ७ मार्च २०२५ पासून आजतागायत हा अहवाल पत्रकारांना उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे मंदिरात सुरू असलेल्या कामांबाबतची साशंकता अधिकच वाढली आहे. पत्रकारांनी थेट विचारले असता देखील आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी “राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल उपलब्ध आहे की नाही” याबाबत थेट उत्तर दिले नाही.

जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी विचारणा करा – आ.पाटील

अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे का नाही, या संदर्भात विचारले असता पाटील म्हणाले, “गोंधळ तोंडी बोलण्यातून निर्माण होतो. कुणालाही प्रश्न असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात विचारणा करावी. जिल्हाधिकारी हे मंदिर ट्रस्टचे अध्यक्षही आहेत, ते निश्चितच स्पष्ट लेखी उत्तर देतील.”

अंतिम निर्णय ३० दिवसांत

बैठकीत ठरल्याप्रमाणे ३० दिवसांच्या आत नव्याने स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तयार होईल. त्यानंतर पुन्हा मंत्रीस्तरीय बैठक घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्तरावर अंतिम निर्णय घेतला जाईल.


👉 ठळक मुद्दे:

  • एएसआयची भूमिका अस्पष्ट, आयआयटीसारख्या संस्थांकडून नवा अहवाल
  • राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल अद्याप पत्रकारांना उपलब्ध नाही
  • जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी विचारणा करण्याचे आ. पाटील यांचे आवाहन
  • ३० दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतिम अहवाल अपेक्षित

महावितरण सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक पाऊल


ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई – महावितरणमधील सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत तीन वर्षांचा सेवाकाल ग्राह्य धरण्याबाबत महत्त्वपूर्ण घडामोड झाली आहे. २१ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील एचएसबीसी बिल्डिंग, फोर्ट येथे ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली.

या बैठकीस धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांची विशेष उपस्थिती होती. महावितरणचे संचालक (मा.सं.) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक (प्रकल्प) औंढेकर तसेच मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले.

बैठकीत आमदार कैलास पाटील यांनी इतर शासकीय विभागांप्रमाणेच महावितरण सहाय्यकांचा तीन वर्षांचा सेवाकाल नियमित सेवेत गणला जावा, या मागणीसाठी ठामपणे पाठपुरावा केला. यावर समिती नेमून ४५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ऊर्जा राज्यमंत्रींनी महावितरण प्रशासनाला दिले.

कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रतिनिधी ओंकार केसकर यांनी शासन निर्णय, परिपत्रके व उपदान सेवानियमांचा दाखला देत सहाय्यक पदाचा सेवाकाल ग्राह्य धरण्याची मागणी मांडली. प्रशासनाच्या वतीने सकारात्मक निर्णयाचा शब्द देण्यात आला.

या बैठकीस निलेश भिरंगे, प्रदीप घुले, ज्ञानेश्वर राऊत, समाधान सानप व सोमनाथ टाळकुटे आदी कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.

सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करून ऊर्जा राज्यमंत्री स्तरावर बैठक घेण्याची पुढाकार घेतल्याबद्दल आमदार कैलास पाटील यांचे कर्मचारी वर्गातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.