Home Blog Page 39

जोतिबाचीवाडी येथे श्रावण महोत्सवानिमित्त रविवारी विनोदाचार्य पांडुरंग महाराज उगले यांच्या किर्तनाचे आयोजन

ईट सोमेश्वर स्वामी:
भुम तालुक्यातील जोतिबाचीवाडी येथे तिसऱ्या श्रावण रविवारच्या निमित्ताने विनोदाचार्य हभप पांडुरंग महाराज उगले यांच्या किर्तनाचे आयोजन दि.२५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जोतिबा मंदिर परिसरात करण्यात आले आहे.
किर्तनाच्या माध्यमातून जनमानसांत प्रबोधनाचा वारसा रुजवण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून जोतिबाचीवाडी येथील गावकऱ्यांच्या वतीने लोकवर्गणीतुन जोतिबाचीवाडी येथे श्रावण महोत्सवात
अखंड हरिनाम सप्ताह तसेच तिसऱ्या श्रावण रविवारी जोतिबा मंदिर परिसरात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
पंचक्रोशीतील हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होतात.
किर्तन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी ही जास्तीत जास्त भाविकांनी किर्तन सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जोतिबाचीवाडी भजनी मंडळ तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

बालाघाटच्या डोंगर रांगेत सौंदर्याने खुललेलं निसर्गाच्या कुशीत वसलेलं ज्योतिबा मंदिर भाविकांना आकर्षित करत आहे.विलोभनीय निसर्गाचा आविष्कार लाभलेलं भुम तालुक्यातील जोतिबाचीवाडी येथील हे जोतिबा मंदिर कोल्हापूरच्या जोतिबाच अधिष्ठान म्हणून ओळखले जाते.
चैत्र महिन्यात मोठ्या स्वरूपात जोतिबा याञा भरते तेव्हा मोठ्या प्रमाणात येथे भाविकांची गर्दी पहावयास मिळते.
या गावात मांसाहार करण्यास वर्ज आहे.
वारकरी संप्रदायाची संस्कृती जपणार आणि शुद्ध शाकाहारी गाव म्हणून या गावाची एक विशेष ओळख आहे.

गेली अनेक वर्षापासून श्रावण रविवार हा जोतिबाचीवाडी आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक पर्वणीच ठरत आहे बहरलेला निसर्ग आणि प्रबोधनात्मक विचारांची मांदीआळी या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. नोकरी, व्यवसायासाठी बाहेरगावी असलेले गावकरी श्रावण महोत्सवा निमित्ताने जोतिबा दरबारी एकत्रित येतात. अनेक अन्नदाते समाजाप्रती सामाजिक दायित्व भावनेतून अन्नदान करतात.
हजारो भाविक तिसरा श्रावण रविवारच्या सोहळ्यात आनंदाने सहभागी होतात.

लक्ष्मण जाधव
(जोतिबाचीवाडी)

श्री. तुळजाभवानी सैनिकी विद्यालय हे CBSE दर्जा प्राप्त करणारे राज्यातील पहिले विद्यालय

धाराशिव :- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास केंद्रीय शिक्षा माध्यमिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी अभ्यासक्रम चालू करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी यांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे असा मानस होता. त्यासाठी त्यांनी स्वतः राज्य व केंद्र पातळीवरती विशेष प्रयत्न केल्याने CBSE बोर्डाची मान्यता मिळालेली आहे. राज्य शासनाच्या अनुदानित शाळेस CBSE अभ्यासक्रम चालू करणारी महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा ठरली आहे.

महाराष्ट्रातील सैनिकी विद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी सैन्य दलात दाखल व्हावेत व देशसेवा करावी, या उद्देशाने सन 1996 पासून सैनिकी शाळा सुरु झाल्या. तेव्हा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान या संस्थेस महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सुरु करण्याचा मान मिळाला होता. परंतु सदरील सैनिकी शाळामध्ये राज्य शासनाचा अभ्यासक्रम चालू असल्याने सैन्य दलामध्ये समाविष्ट होण्याचे प्रमाण कमी असल्याने डॉ.सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात CBSE अभ्यासक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला व विद्यालयामार्फत CBSE अभ्यासक्रम चालू करण्याकरीतेची प्रक्रिया सप्टेंबर 2023 पासून सुरु करण्यात आली. या मध्ये विद्यालयाने सर्व बाबींची पूर्तता केल्याने CBSE बोर्डाकडुन (दि.19ऑगस्ट) रोजी विद्यालयास मान्यता मिळाली आहे.

जिल्हाधिकारी यांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे असा मानस होता. त्यासाठी त्यांनी स्वतः राज्य व केंद्र पातळीवरती विशेष प्रयत्न केल्याने CBSE बोर्डाची मान्यता मिळालेली आहे.

या साठी डॉ.सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचे फेटा बांधुन पुस्तक देऊन विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके यांनी सत्कार केला. त्याचबरोबर अरविंद बोळंगे तहसिलदार तथा विश्वस्त, श्रीमती माया माने तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचाही पुस्तक भेट देवून सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे CBSE अभ्यासक्रम सुरु झाल्याबद्दल अभिनंदन करुन मार्गदर्शन केले. CBSE अभ्यासक्रमाच्या प्रक्रियेमध्ये प्राध्यापक गणेश मोटे अभियांत्रिकी महाविद्यालय, व विद्यालयातील सहशिक्षक श्रीनिवास कदम, संगणक निदेशक श्रीमती ज्योती नाशे यांचा पुष्पगुच्छ देवुन जिल्हाधिकारी यांनी अभिनंदन केले. तसेच जिल्हाधिकारी महोदयांनी विद्यालयाचे प्राचार्यांना पेढा भरवुन विशेष अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या व त्याचबरोबर विद्यालयातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

दोन हजाराची लाच स्वीकारली कंत्राटी लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

धाराशिव – अडीच हजाराची लाच मागणी करून दोन हजार स्वीकारल्याने परांडा पंचायत समितीतील विकास विजयकुमार बनसोडे, वय-35 वर्षे, क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर (कंत्राटी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार यांचे भावाचे नावे महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत मौजे सोनारी येथे शेत गट नंबर 92 मध्ये लागवड केलेल्या केळी या फळबागेचे 39,852/- रुपयाचे कुशल बिल ऑनलाईन अपलोड करण्यासाठी व तक्रारदार यांचे पुढील महिन्यात निघणारे दोन मस्टरचे बिल ऑनलाईन अपलोड करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 2500/-रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती 2000/-रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून 2000/- हजार रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वतः स्विकारली असता आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे परंडा येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी म्हणून विकास राठोड पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिले तर सापळा पथकात
पोलीस अमलदार इप्तिकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके, चालक -दत्तात्रेय करडे यांचा समावेश होता.

मागास भागात नाट्य चळवळ वाढीसाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत – नरेश गडेकर

धाराशिव – महाराष्ट्राच्या नाट्यभूमीला ऐतिहासिक वारसा आणि परंपरा आहे.महाराष्ट्रात नाट्य चळवळ ही मोठ्या शहरातच अधिक वाढत आहे. मागास भागात नाट्य चळवळ, नाट्यगृह,आणि नाट्य रसिक वाढीसाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत  असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष  नरेश गडेकर यांनी केले.

ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक महोत्सवात बोलत होते. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रविवार, 18 ऑगस्ट रोजी समारोप  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करून व सिने अभिनेते दिवंगत विजय कदम यांना श्रध्दांजली वाहून उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष धनंजय शिंगाडे,नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारिणी सदस्य विशाल शिंगाडे, दादा साळुंके, सुमित फुलमागडे, माजी  नियामक मंडळ सदस्य घाणेकर सर, किरण फडके, सुशांत कुलकर्णी,उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवलेल्या सहभागी धाराशिव नाट्य परिषद शाखेच्या कलावंतांचा सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना गडेकर म्हणाले की, शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाटक हे मनोरंजना सोबतच समाज प्रबोधनाचे काम ही मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक करताना स्वागताध्यक्ष धनंजय (नाना)शिंगाडे म्हणाले की,97 वे अखिल भारतीय मराठी  नाट्य संमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले. मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये नाट्य चळवळ वाढत आहे. जिल्ह्यातील कलावंतांना वाव  मिळत आहे.परंतु शहरात अधिक नाटक व्हावेत यासाठी नाट्य शाखा प्रयत्न करीत आहे.  धाराशिव शहरामध्ये नाट्य परिषदेसाठी जागा शासनाने द्यावी अशी मागणी यावेळी शिंगाडे यांनी केली.

या कार्यक्रमाचे विशाल शिंगाडे यांनी तर आभार सतीश ओहळ  यांनी मानले.यावेळी शहरातील नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सांस्कृतिक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी  अर्चना टिळक, सुगत सोनवणे,सागर चव्हाण उपाध्यक्ष (उपक्रम),शरणम शिंगाडे सल्लागार राजेंद्र अत्रे, डॉ. अभय शहापूरकर, सदस्य धनंजय कुलकर्णी, दयानंद साबळे, सुरेश देवकुळे, प्रमोद जोगदंड, श्रीकांत साठे, अर्जुन धावारे, विशाल टोले, भैरू कदम,प्रसेनजित शिंगाडे, ताहेर शेख, दिग्विजय शिंगाडे, शुभम खोत, विजय उंबरे, सुमित शिंगाडे, विश्वनाथ काळे, सुमेध चिलवंत, ऋषीकेश गवळी, यशवंत शिंगाडे, संकेत नागणे, अक्षय दिवटे, सौरभ शिंगाडे, प्रविण सोनवणे, प्रसाद वाघमारे, प्रज्ञावंत ओहाळ, प्रशांत कांबळे, सारिपुत शिंगाडे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

यावेळी झाडीपट्टी तील गद्दार हे नाटक सादर करण्यात आले.  या नाटकाचे लेखक- आनंद भिमटे, दिग्दर्शक नरेश गडेकर,  निर्माता नितू बुध्दे पाटील, नेपथ्य प्रमोद ढोंगे,संगीत राकेश राऊत यांनी दिले आहे.या नाटकातआसावरी तिडके,  सुनिल अष्टकर,अरविंद झाडे, रत्नदीप रंगारी,  शुभम मसराम, चैतन्य दुबे, सोनाली निस्ताने,या कलाकारांनी अभिनय केला.

मराठा सेवा संघाची कार्यकारणी जाहीर,जिल्हाध्यक्ष पदी महेश भगत यांची निवड

धाराशिव – 

मराठा सेवा संघाची जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून जिल्हाध्यक्षपदी महेश भगत यांची निवड करण्यात आली. 

मराठा सेवा संघाची प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ सदस्यांच्या उपस्थित बैठक पार पडली. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक नेताजी गोरे,प्रदेश उपाध्यक्ष संदिपान जाधव,माजी जिल्हाध्यक्ष डी आर कदम,विभागाचे अध्यक्ष ठाकरे साहेब,इंजी राजकुमार भुतेकर, माजी जिल्हाध्यक्ष तुषार पाटील ॲड. तानाजी चौधरी,  बलराज रणदिवे, रोहित पडवळ, अतुल गायकवाड,प्रशांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाध्यक्ष पदी महेश चंद्रकांत भगत, विभागीय कार्याध्यक्ष पदी सतीशकुमार पाटील,विजयकुमार शिवाजीराव पवार यांची जिल्हा कार्याध्यक्ष,रोहीत हरिदास यादव यांची जिल्हा उपाध्यक्ष तर महेश इंगळे यांची शहरप्रमुख पदी निवड करण्यात आली.यावेळी इंजि. प्रदीप धस, इंजि. दंडनाईक, अजय माने, हनुमंत हुंबे, महादेव सावंत, अजय भोसले, जावेद सौदागर, पी एन देशमुख, विजयसिंह देशमुख इत्यादी उपस्थित होते 

 बैठकीत मराठा सेवा संघाची कार्यपध्दती भविष्य काळात काम करण्याचे नियोजन समजावून सांगण्यात आले.सेवा संघाची विचारधारा तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी ताकदीने काम करण्याचे उपस्थितांनी सांगितले.

यंदा दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट – मधुकरराव तावडे 

कुलस्वामिनी नॅचरल शुगर्स प्रा.लि. चे मिल रोलर पुजन उत्साहात संपन्न

धाराशिव-

धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील कुलस्वामिनी नॅचरल शुगर्स चे गळीत हंगाम 2024-25 साठीचे मिल रोलर पुजन कारखान्याचे संस्थापक धाराशिवचे माजी नगराध्यक्ष श्री. मधुकररावजी तावडे, चेअरमन आकाश मधुकरराव तावडे  यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाले.

या कार्यक्रमास जनरल मॅनेजर शरद गुंड, चिफ इंजिनीयर  साळुंके, चिफ केमिस्ट मोळे, मुख्य शेतकी अधिकारी तवले, चिफ अकौंटंट तौर, राजाभाऊ गुंड व इतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संस्थापक मधुकरराव तावडे  यांनी यंदाच्या हंगामात दिड लाख में टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगीतले, यासाठी तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज असुन यंत्र सामग्रीच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करुन कारखाना आक्टोंबर महिन्यात चालु करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य करण्याचे अवाहन यावेळी केले.

दोन धर्मात जाणूनबुजून तेढ निर्माण करणार्‍या रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करा

धाराशिव येथील मुस्लिम समाजाचे जिल्हा पोलीस अधीक्षक, शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन

धाराशिव-

दोन धर्मात जाणूनबुजून तेढ निर्माण करणारे प्रवचन देऊन धार्मिक कलह पसरविण्याचा प्रयत्न करणारे रामगिरी गुरु नारायण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शहर पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सरला बेट येथील रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांनी पंचाळे (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथे सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलिन होईल असे वक्तव्य केले. भारतात एक कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे. दहा-वीस वर्षे ज्यांनी मौलाना म्हणून काम केलेे आहे त्यांनी इस्लामचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय-अत्याचाराशिववाय काहीही आढळून न आल्यामुळे त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे. मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला. ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत, त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे? अशा शब्दात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मीयांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्ये रामगिरी गुरु नारायण महाराज यांनी केली आहेत. या वक्तव्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजाची मने कलुषित करुन जातीय तणाव व धार्मिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची पाठराखण केलेली आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य ओळखून रामगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

निवेदनावर मसूद शेख, खलील सय्यद, कलीम कुरेशी, मौलाना जाफरअली खान, सय्यद नादेरुल्लाह हूसेनी, कफिल सय्यद, मुजीब काझी, वाजीद पठाण, मैनोद्दीन पठाण मौलाना इस्माईल खारी, मोहम्मद इर्शाद कुरेशी, शहानवाज सय्यद, मोहम्मद खान, शेख हाफीज अख्तर  मोहंमद झुलखरनैन, मुख्तार शेख, बिलाल रजवी, इस्माईल काझी, अजीज शेख, रिजवान रजा, बिलाल रजा, हाफीज असलम, हाफीज अस्लम शब्बीर,हाफिज तौफिक पठाण,एजाज काझी ,मौलाना अफजल निजामी, गफार शेख, इरशाद बरकाती, मुस्तफा खान, निहाल शेख, जमीर शेख, ईश्तीयाक कुरेशी जमीर पठाण , अझीझ शेख व इतर मुस्लिम बांधवांची स्वाक्षरी आहे.

आर्थिक ताळेबंद दर्शवणारा माहिती फलक

विश्वासाहर्ता, पारदर्शकतेसाठी
श्री सिध्दीविनायक परिवाराचा अभिनव उपक्रम

धाराशिव – श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. धाराशिव संस्थेच्या दैनंदिन आर्थिक माहितीच्या माहिती फलक उदघाटन मा. आ. सुजितसिंह ठाकुर सो. यांच्या हस्ते संपन्न झाले.
दि. १४ ऑगस्ट रोजी धाराशिव येथील श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट सोसायटीच्या मुख्य शाखा येथे संस्थेच्या दैनंदिन आर्थिक ताळेबंद दर्शवनारी माहिती फलक चे उदघाटन मा.आ.सुजितसिंह ठाकुर साहेब यांच्या शुभहस्ते व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धनाजी काळे, तसेच सहकार अधिकारी बालाजी सावतर, सहकार बोर्ड मधुकर जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट मागील दशकांपासून धाराशिवकरांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था असून २६००० पेक्षा जास्त खातेदारांनी या संस्थेच्या माध्यमातून आपले समाधानी आर्थिक व्यवहार केलेले आहेत.
संस्थेने आपल्या सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार यांना आपली दैनंदिन आर्थिक स्थिती माहिती करून देण्यासाठी एक अभिनव उपक्रमाद्वारे दैनंदिन आर्थिक माहितीचा फलक संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर लाऊन एक आदर्श पारदर्शक व्यवहाराचा पायंडा निर्माण केला आहे. असे मा.श्री. सुजितसिंह ठाकुर साहेब यावेळी म्हणाले.
श्री सिध्दीविनायक पारिवारची समाजातील विश्वासाहर्ता पारदर्शकता व नाविन्यपूर्ण उपक्रम या संपूर्ण परिवारासाठीच्या महत्वाच्या बाबी आहेत असे धनाजी काळे यावेळी म्हणाले.
या कौतुकास्पद उपक्रमाचे स्वागत संस्थेच्या सर्व ठेवीदार सभासदांच्या माध्यमातून होत आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी, राजेश जाधव, प्रतिक देवळे, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, अॅड. नितीन भोसले, अरविंद गोरे, जहीर चौधरी, किशोर तिवारी, देविदास कुलकर्णी, नितीन हुंबे,लक्ष्मण शिंदे, प्रशांत वाघमारे, योगेश कुलकर्णी, रणजित भोरे,नितीन भोसले, व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

घरकुलासाठी २ हजाराची लाच स्वीकारून ३ हजाराची मागणी, ग्रामसेवकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

धाराशिव – घरकुलासाठी २ हजाराची लाच स्वीकारून ३ हजाराची मागणी केल्याने ग्रामसेवकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सुभाष सिद्राम चौगुले वय 54 वर्ष पद- ग्रामसेवक, मौजे वडगाव (काटी) ता.तुळजापूर जि. धाराशिव.तुळजापूर रा. बीबी दारफळ ता. उत्तर सोलापूर जि.सोलापूर. यांनी 

तक्रारदार यांना शासनाकडून घरकुल मिळणेसाठीचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालय, तुळजापूर येथे पाठवण्यासाठी यातील आलोसे यांनी लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचा समक्ष यापूर्वी 2000/- रुपये स्वीकारल्याचे मान्य करून आणखी 3000/- रुपये  लाचेची मागणी करुन स्विकारण्याची तयारी दर्शविली यावरून आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन तुळजापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

सापळा अधिकारी म्हणून – नानासाहेब कदम, पोलिस निरीक्षक यांनी तर सापळा पथकात 

पोलीस अंमलदार-आशिष पाटील, सिद्धेश्वर तावसकर यांनी काम पाहिले.

राष्ट्रीय महामार्गावर 1 कोटी 5 लाख 78 हजार 800 गांजा पकडला, नळदुर्ग पोलिसांची मोठी कारवाई

नळदुर्ग :- उमरग्याहुन सोलापुरकडे जाणाऱ्या स्कार्पिओ गाडीतुन 1 कोटी 5 लाख 78 हजार 800 रुपयाचा गांजा नळदुर्ग येथील राजा बागसवार दर्गाहसमोर राष्ट्रीय महामार्गवर नळदुर्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडला आहे. नळदुर्ग पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे.
सोलापुर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरून नेहमीच गांजासाह गुटख्याची कायम तस्करी सुरु असते. 30 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग पोलिसांची रात्री राष्ट्रीय महामार्गवर गस्त सुरु होती यावेळी उमरग्याहुन सोलापुरकडे भरधाव वेगात स्कार्पिओ गाडी क्र. एम. एच. 08 झेड 5684 ही जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गवर ही गाडी अडविली. गाडी थांबल्यानंतर गाडीची तपासणी केल्यानंतर गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. यावेळी अतिष राजकुमार माने याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हा गांजा आपण सोलापुरला घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यांचबरोबर त्याच्याकडे चौकशी केले असता यामध्ये भीमराव दिलीप खडसुळे, राम दिलीप खडसुळे, डी. जे. चहाविक्रेता, कळवे, रवी सर्व रा. सोलापुर व राहुल रा. अहमदनगर हे यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.या सर्व आरोपीवर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील अतिष राजकुमार माने याला अटक करण्यात आली आहे. स्कार्पिओ गाडीतुन पोलिसांनी एकुण 528 किलो गांजा जप्त केला आहे त्याची किमत 1 कोटी 5 लाख 78 हजार 800 रुपये इतकी किमत आहे. गांजा व स्काकर्पिओ गाडी असा एकुण 1 कोटी 15 लाख 78 हजार 800 रु्पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अलीकडच्या काळात राष्ट्रीय महामार्गवर इतक्या मोठ्या किमतीचा गांजा पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे.याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुने हे करीत आहेत.सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुने, सुरज देवकर,विजय आटोळे, पोलिस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे,संतोष गिते, विजय थोटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाजी गायकवाड, सुरेश सगर, अमर जाधव, सूर्यकुमार फुलसुंदर, बालाजी शिंदे ,दत्ता हिंगे, दत्ता कुंभार, शंकर कांबळे यांच्यासह इत्यादी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.पोलिसांच्या या कारवाईचे सर्वस्तरातुन स्वागत होत आहे.