Home Blog Page 23

दरोड्याच्या तयारीत असलेले तीन आरोपी अटकेत; गावठी पिस्तूल व पाच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात दरोड्याच्या तयारीत असलेले तीन संशयित इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईत अटकेत आले. त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल, कोयता, जिवंत काडतुसे, चारचाकी व दुचाकी वाहनांसह सुमारे ५ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दि. १७ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पथक पेट्रोलिंग करीत असताना तेरणा कॉलेजजवळील विमानतळ रस्त्यावर काही संशयित इसम एका कार व तीन दुचाक्यांसह थांबले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन शासकीय वाहन काही अंतरावर थांबवून पायी तपासणी सुरू केली. पोलिसांना पाहताच दोघे इसम दुचाकीवरून पळून गेले. मात्र, उरलेले तीन संशयित ताब्यात घेतले.

त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

  1. धुपकिरण उर्फ अनिलशेट रामलगन चौधरी (वय 47, रा. अरिवला, ता. भानपुर, जि. बस्ती, उत्तर प्रदेश)
  2. निलेश उर्फ कांचन संभाजी चव्हाण (वय 32, रा. काकानगर, धाराशिव)
  3. मुकेश शाम शिंदे (वय 24, रा. शिंगोली, धाराशिव)

त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, २.३० लाख किमतीची ह्युंडाई सॅंट्रो कार, १.५५ लाख किमतीची बुलेट मोटरसायकल आणि ४५ हजार किमतीची होंडा ॲक्टीवा स्कूटर असा एकूण ५ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक केलेल्या तिघांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोहेकॉ महेबुब अरब, पोलीस का. विनायक दहीहांडे व प्रकाश बोईनवाड यांच्या सहभागातून पार पडली.

येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विकास आराखड्याच्या संदर्भात अधिकृत माहिती अध्यक्षांच्या अनुमतीने देण्याच्या सूचना

मुंबई :या श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री .अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले .ते या अनुषंगाने मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला छ.संभाजीनगर विभागाचे विभागिय आयुक्त जितेंद्र पापळकर,आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्या सह धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉ मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना व संबंधित अधिकारी वृंद उपस्थित होते.
या वेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठां पैकी श्री. तुळजाभवानी देवी, तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. तसेच आई तुळजाभवानी क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलस्वामिनी आहे. देशभरातून दरवर्षी सुमारे १ ते १.५ कोटी भाविक श्रीक्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुख- सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १८६५ कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.
हा प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या तिन्ही गोष्टी समांतर पातळीवर करण्यात याव्यात अशा सूचना यावेळी मंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिल्या. तसेच प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भक्तगण व पुजारी मंडळ यांच्याकडून तेथील धार्मिक प्रथा -परंपरांचा आदर राखत त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अष्टभुजा प्रतिमेला भक्तगणांचा विरोध

श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत १०८ फुटाचे शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पामध्ये श्री. तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु हे दाखवत असताना श्री. तुळजाभवानी मातेची प्रतिमा ही अष्टभुजाकृती दाखवण्यात आलेली आहे. याला अनेक भक्तगण व पुजारी मंडळांनी आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांच्या भावनांचा आदर राखत संकेतस्थळावरील विकास आराखड्याच्या संकल्प चित्रातून ही प्रतिमा काढून टाकण्यात यावी, तसेच शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहास तज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश पालकमंत्री व तुळजापूर विकास प्रकल्पाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना दिले. याबरोबरच यापुढे विकास आराखडा संदर्भात प्रसिद्धी साठी द्यावयाची पत्रे , परिपत्रके ही परस्पर न देता अध्यक्षांच्या अनुमतीनेच देण्यात यावीत ,असे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिले.

महाळुंग येथील अपघातात हुंडाई कंपनीच्या वेणीव गाडीचा चक्काचूर

अपुर्ण कामामुळे पालखी महामार्गावरती अपघात सत्र सुरूच प्रवाशांचा जीव धोक्यात

संग्रामनगर दि.१५ (प्रतिनिधी)
महाळुंग (ता.माळशिरस) येथून जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरती आज मोठा अपघात घडलेला आहे. हुंडाई कंपनीची वेणू चार चाकीगाडी पालखी महामार्गावरील अपुर्ण कामामुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या लाईटच्या ट्रान्सफार्मरवरती जाऊन आदळली आहे.गाडी समोरून चक्काचूर झालेली आहे.सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
या गाडीमध्ये सांगोला तालुक्यातील कोळागाव मधील पाच प्रवासी होते.तीन प्रवासी किरकोळ जखमी आहेत. तात्काळ स्थानिकांनी लाईटचा ट्रांन्सफार्मर बंद केल्यामुळे व प्रवाशांना बाहेर काढून स्थानिक दवाखान्यामध्ये नेऊन प्रथम उपचार करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सांगोला तालुक्यातील दहा ते बारा एलआयसी काम करणारे अधिकारी कर्मचारी मनाली या ठिकाणी दहा दिवसांपूर्वी फिरण्यासाठी गेले होते.रात्री दिल्लीहून पहाटे पुण्याच्या दिशेने विमानाने प्रवास करून पुणे एअरपोर्टवरती सर्व प्रवासी सकाळी सात वाजता पोहोचले. त्या ठिकाणी तीन फोर व्हीलर गाड्या त्यांनी पार्किंग केल्या होत्या.दुपारचे जेवण रस्त्यामध्येच उरकून ते सर्वजण आपल्या घरी सांगोल्याच्या दिशेने येत असताना इंदापूर-माळीनगर मार्गे महाळुंगमधील डांगे वस्ती या ठिकाणी दुपारी तीनच्या दरम्याने रस्त्याचे काम अपुर्ण राहिल्यामुळे व डाव्या साईडची एक लेन्थचे काम पूर्ण नसल्यामुळे सदर गाडी बाजूच्या लाईटच्या ट्रान्सफरवरती जाऊन आदळली आणि भला मोठा आवाज झाला.एकंदरीत गेले तीन वर्षापासून या ठिकाणी पालखी महामार्गाचे काम अपुरे राहिल्यामुळे आणि वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे अशा प्रकारचे अनेक अपघात महाळुंगमधील डांगे वस्ती या ठिकाणी होत आहेत.संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग इंदापूर, माळीनगर,महाळुंग,श्रीपूर, तोंडले-बोंडले मार्गे पंढरपूरच्या दिशेने जातो.परंतु माळीनगर- महाळुंग-श्रीपूर तोंडले-बोंडले पर्यंत अनेक ठिकाणी या महामार्गाची कामे अपुर्ण असल्यामुळे या रोडवरती अनेक अपघात होत आहेत.मागच्याच आठवड्यामध्ये एकाला जीव गमवावा लागला आहे.
येत्या १८ जूनला तुकाराम महाराज पालखीचे देहू येथून प्रस्थान होणार आहे आणि २ जून रोजी लाखोच्या संख्येने वारकरी आणि त्यांचे वाहने याच महामार्गावरून प्रवास करणार आहेत.या वेळेत हे काम पूर्ण न झाल्यास स्थानिक नागरिकांना वारकऱ्यांना या ठिकाणी अपघाताला सामोरे जावे लागणार आहे असे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.

बोंबला!! लोकसेवक बनले मालक

कारवाईचे आदेश नाही, स्वामित्वधन बुडाले तरी अवैध मुरुम उत्खननावर कारवाई करण्यासाठी प्रशासन धजेना

धाराशिव – तुळजापूर – लातूर महामार्गावर असणाऱ्या काक्रंबा येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरात येणाऱ्या मुरुमाचे अवैध उत्खननाबत जियो टॅगिंग च्या फोटोसहीत बातम्या छापून देखील प्रशासन केवळ झोपलेले नसून प्रशासनातील लोकसेवक मालक बनले असल्याने करदात्यांकडे म्हणजेच सामान्य जनतेकडे बोंबलण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नाही.

तुळजापूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथे सध्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र या विकासकामाच्या आड लाखो रुपयांचा मुरुम घोटाळा उघडकीस आला असून प्रशासनाची ढिसाळ भूमिका आणि दुर्लक्ष यामुळे जनतेच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणावर आतापर्यंत पाच भाग प्रकाशित झालेले असतानाही अद्याप कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची तसदी घेतलेली नाही, ही बाब अधिकच धक्कादायक ठरत आहे. विशेष म्हणजे चौकशी करा किंवा कारवाई करा असे कुठलेच लेखी आदेश तलाठ्यांना देण्यात आले नसल्याने आदेश देण्याची जबाबदारी असणारे अधिकारी कोण? त्यांनी आदेश का दिले नाहीत? त्यांचे कंत्राटदारासोबत लागेबांधे आहेत का? हा निःपक्ष चौकशीचा भाग असून चौकशीच होत नसल्याने शासनाच्या उत्पन्नाचा भाग असणारे स्वामित्वधन बुडाले आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, संबंधित ठेकेदाराला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ८,००० ब्रास मुरुम उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणीअंती हे स्पष्ट दिसत आहे की, ८,००० ब्रासच्या मर्यादेपेक्षा खूप अधिक मुरुम उत्खनन केले गेले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असतानाही प्रशासनाने डोळेझाक का केली? हा प्रश्न उपस्थित होतो. तसेच संबंधित गुत्तेदारांना देण्यात आलेली मुरूम उत्खननाची परवानगी सुद्धा संपली आहे तरीपण अजून कोणतीही दुसरी पूर्वकल्पना किंवा परवानगी न घेता उत्खनन सुरूच आहे यावरही अधिकाऱ्यांना संपर्क केला असता अधिकाऱ्याकडून कोणतेही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही असे सांगण्यात येत आहे.
अजून एक गंभीर बाब म्हणजे, परवानगी मिळवण्यासाठी अहवाल सादर करण्यात आले होते, ते प्रत्यक्षात २-३ वर्षांपूर्वीचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच अहवालावर आधारित परवानग्या दिल्या गेल्या आहेत, हे लक्षात घेता नियमांची उघडपणे पायमल्ली करण्यात आल्याचे स्पष्ट होते.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, परवानगी असलेल्या क्षेत्राच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन करण्यात आले आहे. कोणतीही पूर्वकल्पना, नोटीस किंवा परवानगी न घेता केलेले हे उत्खनन म्हणजे थेट कायद्याचा आणि पर्यावरण नियमांचा अपमान आहे. या प्रकरणावर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.
या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी जेव्हा माध्यम प्रतिनिधीने जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली, तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आले की, त्यांनी पंचनामा करण्यासाठी तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. मात्र जेव्हा तहसीलदार व काक्रंबा तलाठी यांच्याशी संपर्क साधण्यात आला, तेव्हा त्यांनी असे कोणतेही आदेश आमच्याकडे आलेले नाहीत, असे सांगून हात झटकले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते — माहिती लपवून गुत्तेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार घडतो आहे.
हा संपूर्ण प्रकार जिल्हा प्रशासनाच्या नजरेआड झाला असण्याची शक्यता कमीच आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध उत्खननासमोर प्रशासनाचे मौन संशयास्पद ठरत आहे. ठेकेदारांच्या मदतीला काही अधिकारी पुढे आले आहेत का? त्यांना आर्थिक फायदा झाला आहे का? हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत.
या संपूर्ण प्रकारामुळे तुळजापूर व परिसरातील जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. मुरुम घोटाळ्याच्या या प्रकाराला मुरुमायण म्हटले जात असून आता त्यात कारवाई कधी होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईकडे नेत असलेला ८.२७ किलो गांजा येडशी येथे जप्त

धाराशिव – मुंबईकडे विक्रीसाठी नेत असलेला गांजाचा साठा स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी सापळा रचून जप्त केला. येडशी येथे ट्रॅव्हल पॉईंटजवळ एका इसमाला अटक करून ८.२७ किलो वजनाचा, १ लाख ६५ हजार ४०० रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार व पथक १२ जून रोजी रात्री १२.०५ च्या सुमारास गस्त घालत असताना, हॉटेल समाधान समोर संशयास्पदरीत्या थांबलेला एक इसम काळ्या बॅगसह आढळून आला. पथकाने त्याला थांबवून बॅगबाबत विचारणा केली असता, त्याने त्यामध्ये गांजा असल्याचे कबूल केले.

त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पंचनामा करून ८.२७ किलो गांजा जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव वसंत भालचंद्र शिंदे (रा. वाखरवाडी, ता. जि. धाराशिव) असे असून, तो हा गांजा ढोकी येथून मुंबईकडे विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पुढील तपासात उघड झाली आहे.

सदर गुन्ह्याची नोंद धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र. नं. १२५/२५ कलम ८ (क), २०(ब)(२)(ब) एनडीपीएस कायद्यानुसार करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोनि मारुती शेळके, सपोनि सुदर्शन कासार, उपनिरीक्षक उद्धव हाके, हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, पोना राजकुमार वाघमारे, पोका सुधीर भांतलवंडे, चपोअ रत्नदीप डोंगरे, रामलिंग बनाळे आणि डॉग स्कॉडचे सुजित वडणे व संतोष शाहीर यांनी संयुक्तपणे पार पाडली.

पहिली शादी हुइ नहीं तब तक तिसरी शादी मुबारक, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याची अवस्था, काल्पनिक पात्रांची चर्चा…

धाराशिव जिल्ह्यातल्या एका खेडेगावात सध्या सुरू असलेल्या राजकारावरून दोन मित्र गप्पा मारत आहेत. गावांचं देखील शहरीकरण झालं असल्याने चावडी, पार, अशी जुनी ठिकाणं आता राहिली नाहीत तिथं सध्या कोणीच बसत नाही. बाभळीच्या झाडाखाली एक टपरी असून तिथं गुटखा मिळत असला तरी रावसाहेब आणि आबासाहेब हे दोन दोस्त पान खात खात चर्चा करत आहेत. खेडेगाव म्हणाल्यावर मोठं नाव घ्यायला जड जातं त्यामुळे गावातल्या लोकांनी त्याचे संक्षिप्त नाव दिले असून  रावश्या आणि आबाश्या अशी त्यांची नावं आहेत.

रावश्या  – काय रं आबाश्या असा एक टक बघत कशाचा विचार करायलास

आबाश्या – (कोणी तरी आपल्याला बोलतंय पण त्याला उत्तर द्यायचं म्हणून स्वर काढत) हम्म्म

रावश्या – अरे मी तुला बोलतोय ( आबाश्या च्या पाठीवर थाप मारत)

आबाश्या – दचकून, काही नाही जरा वंगाळ स्वप्न पडलं

रावश्या –  कसलं स्वप्न?

आबाश्या – लगा आपण आणखी पेरणी केली नाही अन् मला स्वप्न पडलं की सोयाबीनचा भाव पडला, शेतात केलेला खर्च बी निगाला नाय

रावश्या – आरं आत्ताच त्याचा इचार कशाला करायचा, इमा हाय, इमा आणणारं स्पेशालिस्ट आमदार आपल्या जिल्ह्यात हायत

आबाश्या – इम्याचं कशाला घेऊन बसला एक रुपयात इमा उतरवीत होते ते बंद केलंय आन आपत्ती आल्यावर मिळणाऱ्या मदतीच्या घटकासह काही तरी बदल केलेत त्यामुळं इमा भरून बी मिळल की नाही याची ग्यारंटी नाय

रावश्या – पुढचं पुढं बघू ताण नगस घेऊ

आबाश्या – इम्याच कवच राहिलं नाही पाऊस जरा बरा हाय पण पुढं पावसानं वढ दिली तर पाणी नाय

रावश्या – आरं ते आपल्या हातात नाय

आबाश्या – खरं हाय पण, ते पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आपल्या जिल्ह्यात येणार होतं, आपल्या तळ्यात ते पाणी येणार होतं ते आलं असतं तर पिकाला अडचण आली नसती

रावश्या – ती दि सोडून त्याचा इचार करू नग

आबाश्या – का नाय करायचा आपल्या हक्काचा इशय हाय

रावश्या – व्हय हक्काचा हाय पण येऊस्तर काय खरं नाय

आबाश्या – कसं खरं नाय काल दादानी प्रेस घेतली त्यात प्रयत्न चालू हायत, ईश्वास असून सकारात्मकतेने घ्या असं म्हणालेत

रावश्या – आरं त्याचा जी आर निघाला, 7 टी एम सी पाण्याच्या बाबतीत काम सुरू आहे, १६ टी एम सी साठी प्रयत्न सुरू हायत त्यांचं

आबाश्या – (दाढी खाजवत) 39 टी एम सी चा काय विषय होता

रावश्या – लगा मला पण नाही समजला

आबाश्या – इलेक्शन च्या अगुदर दोनदा पाणी येईल म्हणून सांगितलं व्हतं, ते तर नाहीच आलं पण ही 16 टी एम सी अन् 39 टी एम सी चा विषय समोर आल्यानं कायच घोळ कळना गेलाय

रावश्या – लय ताण नको घेऊ जरा पेपरवाल्यसनी, यूटुब वाल्यासनी इशय समजू दी मग, इरोधातल्या दोन दादासनी इशय समजू दी कुणी तरी सांगलच की

आबाश्या – कुणी सांगणार नाहीत जे ते त्याच्या राड्यात हायती, पण इतका वेळ इचार करून एक वळ आठवली

रावश्या – कसली वळ?

आबाश्या – पहिलं पाणी आलं नाही, दुसरं कागदावर हाय त्याचं बी काय खरं नाय, तवर तिसरा इशय आणलाय

रावश्या – ही कसली वळ?

आबाश्या – वेगळी वळ हाय, हिंदीत हाय

रावश्या – मग सांग की लगा लवकर

आबाश्या – पहिली शादी हुइ नहीं तब तक तिसरी शादी मुबारक

रावश्या – आर मला कायच समजलं नाय

आबाश्या – कर अभ्यास याच्यावर…

कळंब तालुक्यातील पिंपळगाव (को)येथे किराणा दुकानावर वीज पडून अंदाजे पाच लाखाचे नुकसान.

वाशी( राहुल शेळके): कळंब तालुक्यातील पिंपळगाव (को)येथे दि.8 जून रोजी सायंकाळी आठ वाजता अचानक मुसळधार पाऊस चालू झाला. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरू होता. पिंपळगाव (को) येथील कल्याण अंबादास चौधरी यांचे मेन रोडवर कुंदन किराणा स्टोअर्स छोटेसे दुकान आहे. पाऊस सुरू झाला म्हणून चौधरी यांनी दुकानाला कुलूप लावून आपल्या घरी गेले. तोच सायंकाळी 8:32 मिनिटांनी विजांचा कडकडाट झाला. एक वीज किराणा दुकानाला धडकून दरवाज्यातून आत गेली. त्यामुळे तेथे मोठा आगीचा लोळ निर्माण झाला. किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवलेले सर्व साहित्य तसेच चौधरी यांच्या मुलाचे गेल्या सहा महिन्यापूर्वी लग्न झाल्यामुळे त्यांच्या लग्नात आलेले सर्व संसार उपयोगी साहित्य, कपाट ,दिवाण ,गादी, भांडे सर्व या आगीत भस्म झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.ही घटना झाल्याबरोबर गावचे सरपंच ज्ञानेश्वर सुंदर तांबडे आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी तेथे जाऊन आग वीजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न फसला. या झालेल्या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रशासनाने त्यांना लवकरात लवकर पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

धाराशिव : कुख्यात घरफोड्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; १५ गुन्हे उघड, ३.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव, दि. ८ जून २०२५ : धाराशिव जिल्ह्यातील घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठे यश मिळवले आहे. कुख्यात आरोपी कृष्णा ऊर्फ पिंटू खडेल शिंदे (रा. मुरुड) याला अटक करून त्याच्याकडून साडेआठ तोळे (८४ ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण ३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत जिल्ह्यातील १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कराळे (अंगुलीमुद्रा शाखा), पोलीस हवालदार विनोद जानराव, पोलीस हवालदार प्रदीप वाघमारे, पोलीस हवालदार नितीन जाधव, पोलीस हवालदार मनोज जगताप (अंगुलीमुद्रा शाखा), पोलीस नाईक बबन जाधव, पोलीस नाईक योगेश कोळी, चालक पोलीस हवालदार महेबुब अरब, चालक पोलीस हवालदार प्रकाश बोईनवाड आणि चालक पोलीस हवालदार विनायक दहीहंडे यांचा समावेश होता.

पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर वाठवडा शिवारातील एका हॉटेलजवळ आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले. चौकशीत आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह धाराशिव शहर, ढोकी, वाशी, परंडा, लोहारा, आनंदनगर आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील एका वर्षात अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली. चोरलेले सोन्याचे दागिने आणि पैसे याची वाटणी करून त्याने स्वतःच्या वाट्याचे दागिने मुरुड येथील घरी ठेवल्याचे सांगितले, ज्याचा उपयोग प्लॉट खरेदी आणि घर बांधण्यासाठी करणार होता. पोलिसांनी त्याच्या घरातून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

जप्त मुद्देमाल आणि आरोपीला पुढील कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

तामलवाडी एम.आय.डी.सी.,३० लाख एकरीच्या अमिषाला शेतकरी बधले नाहीत नाही, जमीन न देण्याच्या निर्णयावर ठाम

जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक नजरअंदाज अधिकृत की अनधिकृत?

धाराशिव – तुळजापूर तालुक्यात तामलवाडी येथे प्रस्तावित एम. आय. डी. सी. ला शेतकरी जमीन न देण्याच्या निर्णयावर ठाम असून आम्हाला कोणत्याही बैठकीला बोलवू नका असे स्पष्ट निवेदन देत त्यांनी प्रशासनाला त्यांची भूमिका खदखद कळवली, मात्र यात एक झाले तामलवाडीच्या शेतकऱ्यांना एम आय डी सी जमिनीसाठी २५ ते ३० लाख मिळणार असे सांगण्यात आले होते ते खोटे ठरले आहे. २५ ते ३० लाख रुपये एकरी मिळणार असे प्रशासनाने लेखी कळवले नसल्याने हा आकडा कोणी आणला? का आणला? त्यात कोणाचा फायदा? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने कुठेही एकरी ३० लाख मिळणार असल्याचा प्राथमिक नजर अंदाज असल्याचे अधिकृत रित्या सांगितले नसताना तुळजापूरच्या लोकप्रतिनिधींनी माध्यमांना सांगितलेली माहिती खरी आहे की खोटी याबाबत साशंकता आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, वारंवार (आम्हाला आधी सूचनेतील अधिनियमच्या कलम ३२ (२) च्या व्यक्तिगत नोटीसला दिनांक २०/८/२०२४ रोजी लेखी व दिनांक २३/१/२०२५ रोजी व दिनांक २२/५/२०२५ रोजी मा. उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव यांना समक्ष लेखी व तोंडी कळवले आहे.) तामलवाडी येथील नियोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी जमीन संपादित करण्यासाठी शासकीय व निमशासकीय बैठकीस बोलले जाते.

परंतु आम्ही सर्व शेतकरी सरकारी कोणत्याही मोबदल्याचा विचार न करता आमच्या जमिनी वडिलोपार्जित व आम्ही सर्व भूमिहीन होणार असल्यामुळे आम्हाला मोबदल्याची कोणतेही अपेक्षा नाही. त्यामुळे आमच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीमध्ये औद्योगिक महामंडळासाठी भूसंपादित होऊ देणार नाहीत. त्यामुळे आमच्या खालील सही करणार सर्व शेतकरी यांची कोणत्याही प्रकारचे सहमती नसल्यामुळे येथून पुढील कोणत्याही बैठकीसाठी बोलवण्यात येऊ नये. निवेदनावर निवेदनावर नागेश भाकरे, सचिन शिंदे, राधा भोसले, दत्ता घोटकर, दत्तात्रय जाधव, बाबासाहेब जगताप, उषा जगताप, समाधान घोटकर महादेव घोटकर, मोईन बेगडे, शिवाजी रणसुरे सुरेश जाधव ,शारदाबाई जाधव, लक्ष्मीबाई मर्ढेकर तुकाराम सगर यांच्या सह्या आहेत.

आरडीसींच्या दालनाचे बांधकाम अवैध, अनधिकृत वातानुकूलित यंत्रणा बसवल्याची तक्रार

धाराशिव, दि. 05 ऑगस्ट 2025: धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) यांच्या दालनात अवैध बांधकाम आणि अनधिकृत वातानुकूलित यंत्रणा बसवल्याचा गंभीर आरोप करणारा तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. केशेगाव (ता. व जि. धाराशिव) येथील रहिवासी श्री. लहू रामा खंडागळे यांनी हा अर्ज दाखल करून याप्रकरणी सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

अर्जानुसार, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात खिडकीच्या आत एक भिंत बांधून बांधकाम मानांकन नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. हे बांधकाम केव्हा, कोणाच्या परवानगीने आणि वैध आहे की अवैध, याची तपासणी करण्याची मागणी अर्जदाराने केली आहे. तसेच, दालनात परवानगीशिवाय वातानुकूलित यंत्रणा बसवल्याचा दावा करत, याची परवानगी वरिष्ठांकडून घेतली आहे की नाही, याचीही चौकशी व्हावी, असे अर्जात नमूद आहे.

श्री. खंडागळे यांनी पुढे मागणी केली आहे की, जर हे बांधकाम अवैध ठरले, तर बांधकामाचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावा. तसेच, अवैध बांधकाम पाडून आणि अनधिकृत वातानुकूलित यंत्रणा तात्काळ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय हे प्रशासनाचे केंद्रीय कार्यालय असून, येथील बांधकामे कायदेशीर आणि नियमानुसार असणे अपेक्षित आहे. या तक्रारीने कार्यालयातील पारदर्शकता आणि नियमांचे पालन यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.