Home Blog Page 23

मुख्याधिकारी वसुधा फड यांना बडतर्फ करण्याची RPI (डे) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धाराशिव नगरपरिषदेच्या कारभारावर तीव्र संताप; विभागीय चौकशीची मागणी, आंदोलनाचा इशारा

धाराशिव : धाराशिव शहरातील नागरी समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून, नगरपरिषदेचा कारभार पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. RPI (डे) चे जिल्हा संपर्क प्रमुख राज धज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर करत, विभागीय आयुक्त स्तरावर चौकशी करून फड यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली.

राज धज, अनिल वाघमारे, भोसले कृष्णा, कौतुक माने, अजय माने यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी हस्ताक्षरित केलेल्या निवेदनात धाराशिव शहरात गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासक प्रणाली लागू असल्याने नगरपालिकेचा कारभार मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याकडे आहे. मात्र, त्यांच्या निष्क्रीय आणि बेफिकीर कारभारामुळे शहरातील रस्ते, नाल्या, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, उद्याने, स्वच्छतागृहे आदी नागरी सुविधा पूर्णतः ठप्प झाल्या आहेत. परिणामी, नागरिकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

रस्ते खड्डेमय, सांडपाणी रस्त्यावर

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय असून वारंवार निवेदन देऊनही त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी वाहतूक कोंडी, अपघात, किरकोळ वाद-भांडणे सतत घडत आहेत. याशिवाय, शहरातील नाल्यांची दुरुस्तीही न केल्याने अनेक भागांमध्ये सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अंधारात शहर, वाढलेले गुन्हे

शहरातील पथदिवे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असून, रस्ते अंधारात गेल्यामुळे चोरी, दरोडे यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच कचरा व्यवस्थापनही पूर्णतः कोलमडले असून विविध भागांमध्ये कचराकुंड्या भरून वाहत आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा त्रास वाढला असून नागरिक वारंवार जखमी होत आहेत.

उद्याने आणि स्वच्छतागृहे दयनीय अवस्थेत

शहरातील सार्वजनिक उद्याने झुडपांनी झाकली गेली असून खेळणी तुटलेली, कुंपण पडलेली आहेत. त्यामुळे लहान मुलांसह नागरिकांच्या करमणुकीचा हक्क हिरावून घेतला गेला आहे. तसेच शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ असून देखभाल व्यवस्थाच ठप्प झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

धज यांच्या म्हणण्यानुसार, मुख्याधिकारी फड यांच्या कार्यकाळात विविध भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न करता दोषींना पाठीशी घालण्यात आले आहे. याशिवाय, शासन आदेशांचे पालनही त्यांनी केलेले नाही.

आंदोलनाचा इशारा

मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या निष्क्रीयतेमुळे संपूर्ण नगरपरिषदेचा कारभार धोक्यात आला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ बडतर्फ करून विभागीय आयुक्त स्तरावर चौकशी व्हावी आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आरपीआय (डे) कडून करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.


दारूच्या नशेत शिक्षक शाळेत हजर; चिंचपूर (बु) ग्रामस्थांत संताप, शिक्षण खात्याकडे तक्रार,

परंडा, २८ जून (प्रतिनिधी) – परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शनिवारी (२८ जून) सकाळी एक शिक्षक दारूच्या नशेत शाळेत हजर झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. सदर प्रकारामुळे पालक, शाळा समिती सदस्य आणि ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत असून शाळेच्या मुख्याध्यापक व व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेची घंटा वाजली. मात्र, ८ वाजून ५ मिनिटांनी वर्गात प्रवेश करणारे शिक्षक पी. एम. मोहळकर हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे मुख्याध्यापकांच्या लक्षात आले. त्यांच्या हालचाली, वाणी आणि शरीरावरून स्पष्ट दिसत होते की ते पूर्णपणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शिकवण्याच्या अवस्थेत नव्हते.

मुख्याध्यापकांची तत्काळ कारवाई

मुख्याध्यापकांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन तात्काळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना फोनद्वारे माहिती दिली. काही वेळातच समिती अध्यक्षांसोबत गावचे सरपंच महेश देवकर, इतर सदस्य आणि काही पालक शाळेत पोहोचले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता शिक्षक मोहळकर हे स्पष्टपणे नशेच्या अवस्थेत असल्याची खात्री पटली.

या घटनेचे व्हिडीओ चित्रण काही पालकांनी आपल्या मोबाईलद्वारे केले असून यासंदर्भात गटविकास अधिकारी यांना देखील तातडीने फोनवरून माहिती देण्यात आली. मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे.

पूर्वीही वर्तणुकीविषयी तक्रारी

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वीही संबंधित शिक्षकाच्या वर्तनासंबंधी तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, शिक्षक मोहळकर यांनी वारंवार विनयभंगासारख्या असमर्थनीय कृती, विद्यार्थ्यांवर हलगर्जीपणा व शिकवण्यामधील उदासीनता दाखवली होती, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शिक्षण खात्याकडून कठोर कारवाईची मागणी

या प्रकारामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरणावर नकारात्मक परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे मनोबल खच्ची झाले असून पालकांत अस्वस्थता पसरली आहे. शाळेतील बाकी शिक्षक व शिक्षिका या घटनेमुळे नाराज असून शिक्षण खात्याने संबंधित शिक्षकावर त्वरित निलंबन किंवा बदलीसारखी कार्यवाही करावी, अशी मागणी शाळा समितीने केली आहे.

तालुक्याचे लक्ष गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे

सध्या संपूर्ण परंडा तालुक्यात या घटनेची चर्चा असून गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून या शिक्षकावर काय कार्यवाही केली जाते, याकडे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींकडून तीव्र लक्ष लागले आहे. याप्रकारे नशेत शिक्षक शाळेत हजर राहणं हे केवळ शिस्तभंग नाही, तर मुलांच्या भविष्यासाठी धोका आहे, असं पालकांचं म्हणणं आहे.



शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांचं एकत्रितपणे केलेलं पाऊल ही एक सकारात्मक बाब आहे. शिक्षण क्षेत्रातील शिस्त आणि दर्जा टिकवण्यासाठी अशा घटनांवर तात्काळ आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.


धाराशिव पोलिसांची मोठी कामगिरी : १७ गुन्ह्यांतील कुख्यात आरोपी ‘कुक्या’ अखेर गजाआड

धाराशिव | २५ जून २०२५ :
दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात गुन्हेगार मोतीराम उर्फ कुक्या बादल शिंदे (रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तब्बल १७ गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला ‘कुक्या’ हा पोलिसांच्या रडारवर असूनही अनेक महिन्यांपासून फरार होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने २५ जून रोजी शहरातील वरुडा पुलाजवळ सापळा रचून ही कारवाई केली. गस्तीदरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर हे धाडस केले गेले. कुक्या काही कामानिमित्त धाराशिव शहरात येणार असल्याची माहिती खात्रीशीर ठरली आणि पथकाने क्षणाचाही विलंब न करता अचूक नियोजनाने आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

कुक्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे पाहता तो धाराशिव, लातूर, बीड, तसेच नवनिर्मित अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये प्रमुख आरोपी आहे. त्याच्यावर तब्बल पाच दरोडे, एक जबरी चोरी, एक दरोड्याचा प्रयत्न आणि दहा मोटरसायकल व डिझेल चोरीचे गुन्हे नोंद आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये तपास अधिकाऱ्यांना गुंगारा देत असलेल्या कुक्याचा अखेर पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोहेका शौकत पठाण (ब.क्र. ५७६), जावेद काझी (२८९), प्रकाश औताडे (९२९), फरहान पठाण (१२७५), चापोका नितीन भोसले (४८४), रत्नदीप डोंगरे (५३९) यांनी मिळून ही धडक कारवाई केली.

सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, पोलिस दलाच्या गुप्त माहिती संकलन व अंमलबजावणी क्षमतेचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.

ट्रॅप मध्ये अडकलेल्या पोलिस निरीक्षकाचे पलायन

नावात ‘मारुती’ असल्यानं कोणी उड्डाण घेतलं, तर त्यात नवल नाही! पण वर्दीतला माणूस जर खाकीच्या शपथेऐवजी लाचखोरीच्या वाटेवर निघाला, तर तो दिवस दूर नसतो, जेव्हा त्याच्या मागे हातात बडगा घेऊन आपलेच सहकारी धावत असतात! धाराशिव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं, पण पकडलं तरी काय झालं? शेळके साहेबांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी थेट पळ काढला! मात्र पळून सुटावं तर शप्पथ! खाकीवाल्यांनी पाठलाग करत शेवटी लेडीज क्लबपर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलंच!

खरं तर प्रकरण काही साधं नव्हतं. आत्महत्या प्रकरणात आरोपीवर कारवाई न करण्यासाठी १ लाखाची लाच मागितल्याचा आरोप होता. पैशांची डील झाली – थेट ९५ हजारांवर! आणि त्यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे, ही लाच घेतली गेली एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हस्ते! हो, सहकारी महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांचाही यात सहभाग होता. एकीकडे आत्महत्येसारखा संवेदनशील गुन्हा, दुसरीकडे त्यात लाचखोरीचा काळा हात – हे सगळं ऐकूनच सामान्य माणसाच्या अंगावर शहारे यायला हवेत!

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. मारोती शेळके आणि मुक्ता लोखंडे या दोघांना रंगेहात पकडून त्यांना कार्यालयात आणण्यात आलं. इथवर सगळं ठिक होतं. पण खरी ड्रामा सुरुवात झाली त्यानंतर! लाचलुचपत कार्यालयात आणल्यानंतर काही क्षणातच शेळके यांनी संधी साधली आणि नजर चुकवत थेट पळ काढला. छत्रपती संभाजी महाराज चौक, आर. पी. कॉलेज रोड, अगदी लेडीज क्लबपर्यंत – धावपळ सुरू झाली. आरडाओरड, सायरन, आणि लोकांची गर्दी… संपूर्ण परिसरात गोष्टी एखाद्या मराठी सिनेमातल्या क्लायमॅक्स सीनसारख्या घडत होत्या!

शेवटी पोलिसांनी त्याला पकडलं आणि दुचाकीवरून पुन्हा कार्यालयात आणलं. भररस्त्यात, सगळ्या शहराच्या नजरेसमोर खाकीचा माज उतरलेला दिसला! ‘उतनार नाही, मातनार नाही’ म्हणणाऱ्याने, शपथ विसरली की काय, असाच प्रश्न शहरवासीयांना पडलाय. सध्या या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलाय आणि सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

ट्रॅप मध्ये अडकलेल्या पोलिस निरीक्षकाचे पलायन, सिने स्टाईल पाठलाग करत पकडले

नावात ‘मारुती’ असल्यानं कोणी उड्डाण घेतलं, तर त्यात नवल नाही! पण वर्दीतला माणूस जर खाकीच्या शपथेऐवजी लाचखोरीच्या वाटेवर निघाला, तर तो दिवस दूर नसतो, जेव्हा त्याच्या मागे हातात बडगा घेऊन आपलेच सहकारी धावत असतात! धाराशिव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं, पण पकडलं तरी काय झालं? शेळके साहेबांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी थेट पळ काढला! मात्र पळून सुटावं तर शप्पथ! खाकीवाल्यांनी पाठलाग करत शेवटी लेडीज क्लबपर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलंच!

खरं तर प्रकरण काही साधं नव्हतं. आत्महत्या प्रकरणात आरोपीवर कारवाई न करण्यासाठी १ लाखाची लाच मागितल्याचा आरोप होता. पैशांची डील झाली – थेट ९५ हजारांवर! आणि त्यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे, ही लाच घेतली गेली एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हस्ते! हो, सहकारी महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांचाही यात सहभाग होता. एकीकडे आत्महत्येसारखा संवेदनशील गुन्हा, दुसरीकडे त्यात लाचखोरीचा काळा हात – हे सगळं ऐकूनच सामान्य माणसाच्या अंगावर शहारे यायला हवेत!

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. मारोती शेळके आणि मुक्ता लोखंडे या दोघांना रंगेहात पकडून त्यांना कार्यालयात आणण्यात आलं. इथवर सगळं ठिक होतं. पण खरी ड्रामा सुरुवात झाली त्यानंतर! लाचलुचपत कार्यालयात आणल्यानंतर काही क्षणातच शेळके यांनी संधी साधली आणि नजर चुकवत थेट पळ काढला. छत्रपती संभाजी महाराज चौक, आर. पी. कॉलेज रोड, अगदी लेडीज क्लबपर्यंत – धावपळ सुरू झाली. आरडाओरड, सायरन, आणि लोकांची गर्दी… संपूर्ण परिसरात गोष्टी एखाद्या मराठी सिनेमातल्या क्लायमॅक्स सीनसारख्या घडत होत्या!

शेवटी पोलिसांनी त्याला पकडलं आणि दुचाकीवरून पुन्हा कार्यालयात आणलं. भररस्त्यात, सगळ्या शहराच्या नजरेसमोर खाकीचा माज उतरलेला दिसला! ‘उतनार नाही, मातनार नाही’ म्हणणाऱ्याने, शपथ विसरली की काय, असाच प्रश्न शहरवासीयांना पडलाय. सध्या या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलाय आणि सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

श्री तुळजाभवानी सैनिक शाळेतील भ्रष्टाचार व मारहाणीप्रकरणी चौकशी करा – शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांची मागणी

तुळजापूर – श्री तुळजाभवानी सैनिक शाळेमध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांवरील अमानुष मारहाणीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.

श्री जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विविध वस्तू व सोयी-सुविधांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर – ३५,०००, १५,००० आणि ८,५०० रुपये – रक्कम वसूल करण्यात आली आहे. या वसुलीबाबत कोणतीही अधिकृत पावती देण्यात आलेली नाही, तसेच ती रक्कम शाळेच्या अधिकृत खात्यात जमा झाल्याचा पुरावा उपलब्ध नाही. काही पालकांनी प्रत्यक्षरित्या ही रक्कम दिल्याचे कबूल केले असल्याने हा गंभीर आर्थिक भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच, शाळेत शिकणाऱ्या इयत्ता आठवीच्या एका विद्यार्थ्यावर शिक्षकाने बेदम मारहाण केल्याने तो बेशुद्ध पडल्याची घटना घडली असून, संबंधित पालकांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे श्री जाधव यांनी स्पष्ट केले.

या दोन्ही प्रकारांची तातडीने व पारदर्शक चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, शिवसेना या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडेल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या या मागणीनंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास जनआंदोलन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी – पोलिस निरीक्षक व महिला पोलीस कर्मचाऱ्या विरोधात ए.सी.बी.ची कारवाई

धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याविरोधात लाच मागणीप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (लाप्रवि) सापळा कारवाई करत ठोस पावले उचलली आहेत. एका ४८ वर्षीय महिलेकडून त्यांच्या मुलाच्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात एकूण १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी आरोपींमध्ये

  1. मारोती निवृत्ती शेळके (वय ५४ वर्षे), पोलीस निरीक्षक, पो.स्टे. धाराशिव ग्रामीण
  2. मुक्ता प्रकाश लोखंडे (वय ३४ वर्षे), महिला पोलीस नाईक, पो.स्टे. धाराशिव ग्रामीण
    यांचा समावेश आहे.

तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांनी पोलीस उपअधीक्षक श्री. योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २५ जून २०२५ रोजी शासकीय विश्रामगृहाजवळ सापळा कारवाई केली.

तक्रारदाराने सुमारे ९५,००० रुपयांची रक्कम दिली असता, ती महिला पोलीस नाईक मुक्ता लोखंडे हिने स्वीकारली. पंचासमक्ष झालेल्या या कारवाईत ती रंगेहाथ पकडली गेली. यानंतर दोघा आरोपींची अंगझडती घेण्यात आली असून, त्यांच्याकडून मोबाईल फोन्स, मोटारसायकल, ओळखपत्र इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या सापळ्यात अद्याप कोणतीही अटक करण्यात आलेली नसून, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत

  • मुक्ता लोखंडे यांच्याविरोधात कलम ७ व ७अ
  • तर मारोती शेळके यांच्याविरोधात कलम १२ नुसार कारवाई प्रस्तावित आहे.

सदर कारवाईत सहाय्यक सापळा अधिकारी पो.नि. बाळासाहेब नरवटे, मार्गदर्शक पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सापळा पथकात पोलीस अंमलदार नागेश शेरकर आणि शशीकांत हजारे सहभागी होते.

नागरिकांना आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा:
📞 टोल फ्री क्रमांक: 1064
📞 पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, धाराशिव: 02472-222879

पारगाव हायवेवरील सोनसाखळी चोरी उघडकीस — वाशी पोलिसांचा आठ तासांत तपास, दोन आरोपी अटकेत

वाशी (प्रतिनिधी – राहुल शेळके):
पारगाव (ता. वाशी) हायवेवर झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात वाशी पोलिसांनी अवघ्या आठ तासांत तपास पूर्ण करून दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चार तोळ्यांची सोन्याची चैन (किंमत सुमारे २.८० लाख रुपये) हस्तगत करण्यात आली आहे.

ही घटना २० जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी दीपक भारत यादव (वय. ३५, व्यवसाय – शेती, रा. धनकवडी, ता. धारूर, जि. बीड) हे आपल्या दोन मित्रांसह तुळजापूर-येरमाळा येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून बीडकडे परतताना, पारगाव टोलनाका ओलांडल्यावर सुमारे ५०० मीटर अंतरावर लघुशंकेसाठी थांबले असता, दोन अनोळखी इसमांनी “दादा, कुठले आहात?” असे विचारत त्यांच्या गळ्यातील चार तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला.

या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. २०८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) अंतर्गत २१ जून रोजी पहाटे १:१६ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पो.हे.कॉ. १५२९ आर.बी. लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक (धाराशिव), अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी  स्वप्नील राठोड (भूम चार्ज) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.आर. थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही. सावंत, परि. पो.नि. ए.वी. भाळे तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला.

गुप्त माहितीदाराच्या सहाय्याने व आरसीपी प्लाटूनच्या मदतीने वाशी पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये नवनाथ ऊर्फ बाळू कल्याण पवारनिमा छन्नू पवार, (दोघे रा. लोनखस पारधी पिढी, ता. वाशी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली चार तोळ्यांची सोन्याची चैन (किंमत ₹२.८० लाख) जप्त केली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.

पोलीस पथक:
पो.हे.कॉ. लाटे (१५२९), यादव (१५१६), पो.ना. औताडे (१५९८), पो.कॉ. सय्यद (१७०२), मलंगनेर (१७८१), साठे (४२८), गिराम (२६४), नरवडे (३५९), पवार (१६१६) यांचा तपासात सक्रिय सहभाग होता.


टोकण यंत्र, बीजप्रक्रिया ड्रमसाठी अर्ज ; २३ जून अंतिम मुदत,परंडा तालुक्यात ‘ONGC’ च्या CSR निधीतून शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

परंडा (दि. २२ जून) – ONGC कंपनीच्या सीएसआर (CSR) निधीतून परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी टोकण यंत्र, मानवचलीत बीजप्रक्रिया ड्रम आणि मोटारचलीत बीजप्रक्रिया ड्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी दिनांक २३ जून २०२५ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत टोकण यंत्र – १३, मानवचलीत बीजप्रक्रिया ड्रम – १३ आणि मोटारचलीत बीजप्रक्रिया ड्रम – ३ असे एकूण लक्षांक ठरविण्यात आले आहेत. अर्जांची संख्या लक्षांकाशी जास्त झाल्यास २४ जून रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येईल, असेही लांडगे यांनी स्पष्ट केले.

अनुदानाचे स्वरूप खालील प्रमाणे आहे:

  • टोकण यंत्रासाठी ९०% अनुदान किंवा कमाल ₹९,००० (यापैकी जे कमी असेल)
  • मानवचलीत बीजप्रक्रिया ड्रमसाठी ९०% अनुदान किंवा कमाल ₹९,०००
  • मोटारचलीत बीजप्रक्रिया ड्रमसाठी ९०% अनुदान किंवा कमाल ₹३५,५५०

टोकण यंत्राच्या वापरामुळे बियाण्यांची बचत आणि उत्पादनक्षमता वाढते, तर बीजप्रक्रिया ड्रमद्वारे अल्प कालावधीत कीटकनाशके व बुरशीनाशके मिसळून बीजप्रक्रिया करणे शक्य होते. त्यामुळे ही साधने शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

अर्ज सादर करताना तालुका कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टेक्निकल टेक्सटाइल पार्क, नजरेआड गेलेल्या विषयावर काल्पनिक पात्रांची चर्चा

धाराशिव जिल्ह्यात शेतीचा हंगाम सुरु असल्याने शेतीची कामे जोरात सुरू आहेत, पेरणीसारखा पाऊस झाल्याने समाधान व्यक्त केले जात असून शेतीच्या कामातून वेळ मिळाला की एका खेडेगावातील दोन मित्र रावसाहेब आणि आबासाहेब त्याच टपरीवर भेटतात आणि त्यांची चर्चा सुरू होते.

रावश्या – (गाणं गुणगुणत असलेल्या आबाश्याच्या गाण्याकडे कान टवकारून बोलतो) जरा मोठ्यानं तरी म्हण आमाला बी कळू दे कोणत गाणं हाय ते

आबाश्या – (जरा उच्च स्वरात ) गं कुणी तरी येणार येणार गं

रावश्या – (आबाश्याला थांबवत) आरे ही डोहाळजेवणात ल गाणं, ते बी बायाचं अन् तू म्हणायलास व्हय

आबाश्या – सकाळ सकाळी बनवाबनवी पाहिला, लक्ष्या अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांचा

रावश्या –  झोपेतून उठल्या उठल्या टीव्ही नको लावत जाऊ, कामं धंद्याचं बघ जरा

आबाश्या –  जित्राबाचं आई आणि तात्या बघत्यात,शेतातली थोडी कामं असत्यात ती झाली की मोकळा असतो

रावश्या – कुठं तर कामाला जा, मोकळ्या येळेत टग्यागत फिरू नको

आबाश्या – (दुर्लक्ष करत पुन्हा तेच बनवाबनवी चित्रपटामधलं गाणं गुणगुणायला सुरू करतो) गं कुणी तरी….

रावश्या – (थोडं गंभीर होत) लेका तुला काय कळतं का मी कशाबद्दल बोलतोय, तू कुठलं गाणं म्हणतोय

आबाश्या – व्हय कळतंय म्हणूनच हे गाणं म्हणतोय

रावश्या – याला काय अर्थ हाय जरा इस्कटून सांग

आबाश्या – आपली परिस्थिती बनवाबनवितल्या कथेपेक्षा वाईट झालीय जिल्ह्याला परिवर्तनाचे डोहाळे तर लागलेत पण विकास होईल की भकास होईल हेच कळना झालंय, म्हणून हे गाणं गुणगुणत होतो

रावश्या – जरा स्पष्ट बोल अन् नीट सांग

आबाश्या – ते कौडगाव एम.आय.डी.सी त ते टेक्निकल टेक्सटाइल पार्क होणार हाय त्याच्याबद्दल हाय हे

रावश्या – केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार त्यामुळं हे होणारच, उद्योगमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं ना हे होणार आहे म्हणून तू बिनधास्त रहा, राणा दादा पाठपुरावा करायल्यात

आबाश्या – काय म्हणले होते उद्योगमंत्री ध्यानात हाय का तुझ्या

रावश्या – नाही ध्यानात

आबाश्या – लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी एक समिती स्थापन करू आणि ही समिती एक महिन्यात अहवाल देईल असं सांगितलं व्हतं…

रावश्या – व्हय व्हय सांगितलं व्हतं पण त्याला दोन वरीस झालं

आबाश्या – व्हय २० मार्च २०२३ ला त्यांनी हे सांगितलं

रावश्या – मग ते खरच हाय की आता ते उद्योजकांना काय कसली ती अभिरुची दाखवून अर्ज करायला सांगितलं हाय एम.आय.डी.सी. नं

आबाश्या – मग त्या समितीचा अहवाल कुठाय? समितीचे अध्यक्ष कोण? किती जणांची समिती?

रावश्या – लय खोलात नको जाऊ जरा सकारात्मक वाग आज योगा डे आहे, सकारात्मक इचार कर

आबाश्या – आरं प्रश्न पडला पाहिजे, इचारलं पाहिजे कोपराला लागलेला गुळ चाटता बी येत नाय अन् खाता बी येत नाय

रावश्या – कुणाला इचरणार तू? आज शनिवार जिल्हा कचेरी बंद..मंत्रालय बंद.. कुणाला इचारणार

आबाश्या – आपल्या मन की बात या विकासाच्या गप्पा करणाऱ्या नेत्यांना कधी समजणार रं?

रावश्या – समजल समजल…

आबाश्या – तुझ्या वळखीचे पत्रकार हायत त्यांना तर इचार समिती स्थापन झाली का? समितीचा अहवाल आला का? कौडगाव एम.आय. डी.सी. त टेक्निकल टेक्स्टाईल पार्क होईल का? कधीपर्यंत होईल? इचार लगा मला बी त्यात काही तरी काम मिळालं तर बरं होईल

रावश्या – मला वाटतंय त्यांच्याकडं बी ही माहिती नसल मग त्या अभिरुचीच काय? आपण किती दिवस उद्योग येणार येणार हे ऐकत बसायचं?

आबाश्या – म्हणून तर म्हणतो मग म्हण तू बी ही गाणं…. गं कुणी तरी येणार येणार गं….

आकाश महादेव नरोटे

कार्यकारी संपादक

कार्यकारी संपादक

दैनिक जनमत ८४२१५३१९७६