धाराशिव – जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या कामामागे राणा पाटील यांची कन्सल्टन्सी असते, ही नवी ‘कमाईची यंत्रणा’ असून तीच भ्रष्टाचाराची मूळ वाहिनी आहे, असा घणाघात युवा सेनेचे राज निकम यांनी केला. “दुसऱ्याच्या नावाने स्वतः पैसे कमविण्याची पद्धत राणा पाटलांनीच जिल्ह्यात आणली आहे,” असा आरोप करत त्यांनी राणा पाटील यांना ‘भ्रष्टाचाराचे भस्मासुर’ ठरवले.
निकम म्हणाले, “कचऱ्याच्या कामात सहभागी असलेले अभय इंगळे यांची मर्यादा गल्लीपुरतीच आहे. ते कालच अमित शिंदे यांना प्रेस नोट द्यायला का लावली, यावरून वाद घालत होते. त्यांची ही धडपड पाहून आम्ही त्या पक्षातून बाहेर पडलो, याचंच समाधान वाटतं.”
निकम पुढे म्हणाले, “सोमनाथ गुरव यांनी जेव्हा सर्व मुद्देसूद माहिती मांडली, तेव्हा भाजपमधील हुशार लोकांनी एकत्र येऊन एक पत्रक काढलं. ते वाचून असं वाटतं की ही मांडणी चौकात उभं राहून ओरडायच्या पद्धतीची होती. यावरून स्पष्ट होते की लोकांसमोर खरे मुद्दे घेऊन जाण्याची तुमच्यात ना क्षमता आहे ना मानसिकता. फक्त राजकारणच तुमचं अंतिम ध्येय आहे.”
उजनी पाईपलाईन प्रकल्पाचे उदाहरण देत निकम म्हणाले, “या प्रकल्पामध्ये कन्सल्टन्सी फक्त नावालाच होती. प्रत्यक्षात त्या कंपनीच्या नावावरून पैसे थेट राणा पाटील यांच्या खिशात जातात, हे आम्ही त्यांच्यासोबत असताना ऐकलेले किस्से आहेत.”
राज निकम यांच्या या परखड टीकेमुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, राणा पाटील समर्थकांकडून यांच्याकडून यावर काय प्रत्युत्तर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.