गंजेवाडी (ता. तुळजापूर) – गंजेवाडी येथील शेतकरी दत्तात्रय पांडुरंग गंजे यांच्या शेतालगत बांधण्यात आलेल्या पाझर तलावामुळे गेली ३० वर्षे त्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, २०१४ पासून नुकसानभरपाईसाठी त्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी इतक्या वर्षांत एकदाही शेताची पाहणी केली नव्हती.
शेतकऱ्याची ही व्यथा सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर जाधव यांनी जलसंधारण विभागाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देत सुरुवातीला निवेदन सादर केले. पुढे ‘पादुका पूजन’ आंदोलनही करण्यात आले. काल, २२ मे रोजी, देशी गाईचे गोमूत्र व शेण घेऊन जलसंधारण अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी जाधव कार्यालयात गेले. मात्र, अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू करत मुख्य गेट बंद करून निषेध नोंदवला.
या आंदोलनाचा धसका घेत जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी तत्काळ जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, “लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही,” असा ठाम पवित्रा जाधव यांनी घेतला. परिणामी, २७ मे रोजी स्थळ पाहणी करण्याचे लेखी आश्वासन विभागाने दिले.
मात्र, आंदोलकांच्या दबावाखाली अखेर आज, २३ मे रोजीच अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी केली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश आल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
- दरोड्याच्या तयारीत असलेले तीन आरोपी अटकेत; गावठी पिस्तूल व पाच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
- येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
- महाळुंग येथील अपघातात हुंडाई कंपनीच्या वेणीव गाडीचा चक्काचूर
- बोंबला!! लोकसेवक बनले मालक
- मुंबईकडे नेत असलेला ८.२७ किलो गांजा येडशी येथे जप्त