परंडा, दि. ५ एप्रिल – शिक्षण महर्षी रा.गे. शिंदे महाविद्यालय, परंडा येथे निरोप समारंभाच्या कार्यक्रमात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. B.Sc. च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या कु. वर्षा भारत खरात या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करत असताना अचानक स्टेजवर कोसळून अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे जागीच मृत्यू झाला. ही अत्यंत दुःखद घटना शुक्रवार, दिनांक ४ एप्रिल रोजी दुपारी घडली.
कु. वर्षा खरात ही मूळची माढा तालुक्यातील नाडी गावच्या रहिवासी होती. १० वी नंतर त्यांनी परंडा येथील शिक्षण महर्षी रा.गे. शिंदे महाविद्यालयात B.Sc. च्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला होता. गेली तीन वर्षे त्या अत्यंत मन लावून शिक्षण घेत होती. ५ एप्रिलपासून B.Sc. तृतीय वर्षाच्या परीक्षेला सुरुवात होणार होती. त्याआधी कॉलेजकडून विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात सहभागी होत वर्षा खरात आपले मनोगत व्यक्त करत होती. तिने बोलण्यास सुरुवात केल्यानंतर काही क्षणातच त्या अचानक स्टेजवर कोसळली. कार्यक्रमात उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
वर्षा हिला बालपणापासूनच हृदयाचा त्रास होता. तिच्यावर सुमारे १५ वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, अशी माहिती तिचे वडील भारत खरात यांनी दिली. शिक्षणात प्रगतीशील, मित्रमैत्रिणींसोबत मनमिळावू स्वभाव असलेल्या वर्षा यांच्या अकस्मात निधनाने महाविद्यालयात आणि नाडी गावात शोककळा पसरली आहे.
कॉलेज प्रशासनाच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जड अंतःकरणाने कु. वर्षा खरात यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विद्यार्थिनींच्या अशा आकस्मिक निधनाने महाविद्यालयात एक वेगळेच शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
या दुःखद घटनेमुळे वर्षाच्या शिक्षक, वर्गमित्र, मैत्रिणी आणि संपूर्ण महाविद्यालय कुटुंबाने हळहळ व्यक्त केली आहे. तिच्या आठवणी आणि चेहऱ्यावरचं हसू कायम लक्षात राहील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.