हिप्परगा येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

0
122




सलगरा, दि.१७ (प्रतिक भोसले)

 हिप्परगा रवा येथील राष्ट्रीय शाळेचे शताब्दी वर्ष व ७५ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात आ. ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने सुरु केलेल्या वाचनालयाचा शुभारंभ दि.१७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार तथा ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानराज चौगुले हे होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व आ. ज्ञानराज चौगुले यांनी येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. या वाचनालयात विविध साहित्यिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भविष्यात या ठिकाणी भव्य असे वाचनालय उभे करून त्यातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा संपूर्ण इतिहास व या लढ्यातील हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेचे महत्त्व या बाबतची सखोल माहिती लोकांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ज्या शाळेतून खरी उर्जा मिळाली, त्या लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वामी रामानंद तीर्थ यांनी येथे मुख्याध्यापक म्हणून फक्त ज्ञानदानाचेच कार्य न करता देशभक्ती अन स्वातंत्र्यलढ्याचे धडेही विद्यार्थ्यांना दिले आहेत. 

उस्मानाबाद – हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झालेले उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक आयुष्यभर क्रियाशील राहिले आणि आजही क्रियाशील आहेत, ज्यांनी या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची सदैव जाणीव राहील, मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेमुळे मराठवाड्याचा विकास झाल्याचे प्रतिपादन या वेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. जिल्हा प्रशासनामार्फत मुक्तीसंग्रामातील महत्त्वाची स्मारके, संग्रामाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या मुळे मुक्तीसंग्राम लढ्याला निश्चितच उजाळा मिळेल असे सुद्धा जिल्हाधिकारी बोलताना म्हणाले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, परंतु हैद्राबाद, काश्मीर व जुनागढ संस्थानांतील जनता गुलामीतच होती. मराठवाडा निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडले गेले. त्यात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर होता. या लढयात अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, निजाम शरण येण्यास तयार नव्हता त्या वेळी भारत सरकारने पोलीस ॲक्शन सुरु केली. व शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जुलूमी राजवटीतून मुक्त झाला. या लढयामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर मराठवाडयाची उस्मानाबाद जिल्हयासह सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरु झाली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.

या कार्यक्रमा वेळी हैदराबाद मुक्तिसंग्राम पुस्तकाचे लेखक वसंतराव पोतदार यांच्या पत्नी सुशीलाबाई वसंतराव पोतदार यांच्यासह रूक्मीनबाई पंढरी मुळे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी नगराध्यक्ष रजाक आत्तार, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, सरपंच राम मोरे, माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजीत लोमटे, मुख्याध्यापक एस.बी.भुईटे, चेअरमन संतोष गवळी, तंटामुक्ती अध्यक्ष बाजीराव जाधव, धर्मवीर जाधव, विजय पवार, किरण गायकवाड, रूक्मीनबाई होनाळकर, ज्ञानज्योती संस्थेचे विजय वडदरे, अमर सरगर, बी.के. पवार, सरपंच नामदेव लोभे, जगन  पाटील, प्रेम लांडगे, शिवा सुतार, जगदीश लांडगे, अभिमान खराडे, शाम नारायणकर, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष भरत सुतार यांच्या सह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here